Wednesday 28 October 2015

Reflection for the Homily of 31st Sunday in Ordinary Times   (01/11/2015) By: Xavier Patil.








सामान्यकाळातील एकतिसावा रविवार



दिनांक: ०१-११-१५
पहिले वाचन – प्रकटीकरण ७:२-४, ९-१४
दुसरे वाचन – योहानाचे पहिले पत्र ३:१-३
शुभवर्तमान – मत्तय ५:१-१२ 


‘स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे’



प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील एकतिसावा रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज देऊळमाता सर्व संतांचा सण साजरा करीत आहे. आजच्या उपासनेतील वाचने आपणाला संतांचे अनुकरण करण्यास प्रोत्साहीत करतात.
आजच्या पहिल्या वाचनात देवाने निवडलेल्या लोकांवर शिक्का मारला आहे, कारण त्यांनी त्यांचे झगे कोकराच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत योहान आपणाला देवपित्याने दिलेले प्रतिपादन म्हणजेच ‘आपण सर्वजण देवाची मुले आहोत आणि पुढे काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही’ असे सांगत आहे. तसेच शुभवर्तमानात येशु ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनातून लोकांना केलेला बोध ऐकावयास मिळतो.
प्रत्येक व्यक्ती हा संत बनण्यासाठी देवाने निर्मिलेला आहे. संत बनण्यासाठी महान कृत्ये करण्याची आवश्यकता नाही तर लहान गोष्टी संपूर्ण निष्ठेने व देवावर असणाऱ्या श्रद्धेने करण्याची गरज असते. आपल्या दैनंदिन जीवनात आपणदेखील संताप्रमाणे ख्रिस्ताने दाखवून दिलेल्या वाटेवर चालून देवाची मुले म्हणून सदैव जगावे अशी प्रार्थना ह्या पवित्र मिस्सा-बलीदानामध्ये भाग घेत असता करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन – प्रकटीकरण ७:२-४, ९-१४
ह्या वाचनात संत योहानाने अखेरच्या दिवसातील देवाच्या लोकांचे दोन दृष्टांत सांगितले आहेत. पहिल्या दृष्टांतामध्ये देवाने स्वतःचा शिक्का मोर्तब करून निवडलेली नवीन इस्रायल प्रजा आहे. तर दुसऱ्या दृष्टांतात उद्धार पावलेले असंख्य लोक आणि त्यांच्या मागून येणारी गौरविलेली जनता होय. ‘ख्रिस्ती लोकांनी अखेरच्या न्यायादंडाची भीती बाळगू नये कारण देव त्यांचे सांत्वन करील’ हि खात्री देण्याच्या उद्धेशानेच योहानाने हे लिहिलेले आहे.
जिवंत देवाचा ठसा:
ज्यांच्यावर शिक्का मारला आहे ते देवाचे दास आहेत हे शब्द प्रकाटीकरणाच्या पुस्तकात वारंवार येतात आणि या शब्दांनी उद्धार पावलेले सर्व लोकसमुदाय हा अर्थ व्यक्त होतो. या चिन्हामुळे विध्वंस करणाऱ्या लोकांकडून त्यांचा नाश होणार नाही तर ते वाचतील. ह्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.
दुसऱ्या दृष्टांतात योहानाने कोणाला मोजता आला नाही असा मोठा लोकसमुदाय राज्यवैभवामध्ये देव आणि कोंकरु ह्यांच्यासमोर उभा राहिल्याचे त्याने पहिले. ह्या सर्व लोकसमुदायाने संकटांना सामोरे जाऊन त्यांचे झगे येशूच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.

दुसरे वाचन – योहानाचे पहिले पत्र ३:१-३
ह्या वाचनात योहान म्हणतो, “पाहा पित्याने आपणावर किती प्रीती केली आहे! आपणाला देवाची मुले म्हटले आहे. आपल्याला फक्त नावच नव्हे तर आपण खरोखरच देवाची मुले आहोत. दिव्य पाचारण, हे प्रभावी पाचारण आहे, या संबंधात तो आमच्या मनात कसलाच किंतू राहू देत नाही. देव आम्हाला ‘मुले’ म्हणतो, म्हणूनच जग आपल्याला ओळखीत नाही. जग आणि ख्रिस्ती विश्वास एकत्र नांदने शक्य नाही. हा विचार योहानाच्या लेखांमधून पुन्हा पुन्हा पुढे येतो.
जग ख्रिस्ताच्या अनुयायांना ओळखीत नाही, हे जगाचे उणेपण आहे. पण त्यात नवल करण्यासारखे काहीही नाही. कारण जगाने येशूला देखील ओळखले नाही. योहानाच्या म्हणण्याप्रमाणे आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून कोणालाच माहित नाही पण आपण ख्रिस्तासारखे होऊ असे तो भाकीत करतो.

शुभवर्तमान – मत्तय ५:१-१२
     मत्तयने नमूद केलेल्या महान “प्रवचनांपैकी” हे पहिले प्रवचन आहे. सामान्यत: हे “डोंगरावरील प्रवचन” ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
३-१० चांगले जीवन:
प्रवचनाच्या आरंभीच धन्यतेच्या आठ उद्दगारांतून (धन्यवाद) खऱ्या शिष्यांचे अष्टपैलूपूर्ण चित्रण केले आहे. ‘धन्य’ किंवा ‘सुखी’ या मूळ शब्दाचे यथार्थ भाषांतर होत नाही. मूळ शब्दात ‘अभिनंदन, वाहवा तारीफ आणि प्रशंसा’ हे अर्थभाव आहेत. या गुणांची कास धरावी, ते अंगी बाळगावे; हे गुण मिळून चांगले जीवन होते. या प्रत्येक उद्दगाराच्या बरोबरीने एक एक कारण दिले आहे. जीवनाच्या या मार्गाने चालल्याने कोणाचीही हानी होणार नाही.  त्याद्वारे मिळणारी प्रतिफळे हि भौतिक लाभापेक्षा, आध्यात्मिक अनुभव देणारी आणि देवाशी नाते जोडणाऱ्या स्वरुपाची आहेत.
‘स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे’ या महत्त्वपूर्ण शब्दांनी या वचन मालिकेचा आरंभ व शेवट झाला आहे. जे देवाला आपला राजा म्हणून मान्य करतात, त्यांच्या संदर्भात हे शब्द उच्चारले आहेत.

आठ सुखानंद (Beatitudes) :

1.     जे आत्माचे .................... राज्य त्याचे आहे.
जे स्वतःच्या कारणास्तव नव्हे तर दुसऱ्यांच्या कारणास्तव गरीब आहेत. इथे मत्तय आर्थिक गरिबी विषयी न सांगता जे गुलामगिरी सहन करत आहेत त्यांच्याविषयी सांगत आहे. अशा सर्वांना ‘स्वर्गाचे राज्य’ प्राप्त होईल असे ख्रिस्त सांगतो.

2.     जे शोक .................... सांत्वन करण्यात येईल.
ज्यांचे जीवन कठीण झाले आहे अशा सर्वांचे येशु ख्रिस्त सांत्वन करील. त्यांचे दुःख काढून सुख देण्यात येईल. येशु ख्रिस्त यशया संदेष्टा ह्यांचे शब्द स्वतः’ला उल्लेखून सांगतो की, जे तुरुंगामध्ये अडकले आहेत, जे विनयशील व शोक करत आहेत, अशा सर्वांचे येशु ख्रिस्त त्याच्या पुन: आगमनाने सांत्वन करील.

3.     जे सौम्य .................... पृथ्वीचे वतन भोगतील.   
4.     जे नितीमत्वाचे .................... ते तृप्त होतील.
शास्री व परुशी ह्यांनी जुन्या नियमशास्राचे काटेकोरपणे पालन केले, पण येशु ख्रिस्त त्याच्या शिष्यांस शास्री आणि परुशी ह्यांच्यापेक्षा चांगले जीवन जगण्यास सांगत आहे. शिष्यांचे नितीमत्व शास्री आणि परुशांपेक्षा अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात त्यांना प्रवेश मिळणार नाही (५:२०)

5.     जे दयाळू .................... दया होईल.
शेजाऱ्यांवर दया करणे व त्यांना संकटामध्ये मदत करणे हा प्रेमाचा महामंत्र येशु ख्रिस्त त्यांना देतो. ज्याप्रकारे आपण इतरांवर दया आणि प्रेम तो अगदी त्याचप्रकारचे प्रेम आणि दया देव आपणावर करील. येशु म्हणतो, ‘ ज्या मापाने तुम्ही देता त्याच मापाने तुम्हांला पुन्हा देण्यात येईल’.

6.     जे अंतकरणाचे .................... देवाला पाहतील.
येथे येशु ख्रिस्त यशया संदेष्ट्याच्या शब्दांत शास्री आणि परुश्यांना ढोंगी असे संबोधतो. कारण ते शब्दांनी देवाचा सन्मान करतात, पण त्यांची अंतकरणे मात्र देवापासून दूर आहेत हे प्रभू येशूने जाणले होत,. म्हणून जो कोणी स्वतःच्या अंतकरणाने ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे पाल,ण करील त्यांना स्वर्ग प्राप्त होईल व ते देवाला पाहू शकतील.

7.     जे शांती .................... मुले म्हणतील
येशु ख्रिस्ताच्या पुनरुस्थानानंतर येशूने शिष्यांना दर्शन देऊन त्यांस शांती प्रदान केली, म्हणून शांतीने वागणे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे आद्य कर्तव्य आहे. जी शांती देवाने आपणाला दिली आहे तिचे पालन करावे व इतरांना देखील आपण आपल्या जीवनाद्वारे शांती प्रदान करावी. असे केल्याने आपण देवाची मुले म्हणून ओळखले जाऊ असे येशु ख्रिस्त म्हणतो.

8.     नितीमत्वाकरीता जे झटतात.................... राज्य त्यांचे आहे.
देवाच्या प्रेमाखातर आणि येशूच्या शिकवणुकीचे पालन केल्याने ज्यांचा छळ केला जाईल, अशा सर्वांना स्वर्गाचे राज्य बहाल करण्यात येईल व स्वर्गात त्यांचे प्रतिफळ मोठे असेल असे असे येशु ख्रिस्त म्हणतो.

मनन चिंतन:
आज आपण सर्व संतांचा सण साजरा करीत आहोत आणि आजच्या मिस्साबलीदानाचा प्रारंभ आपण “प्रभूमध्ये सदैव आनंद करा” ह्या वाक्याने झाला आहे. कारण आजची उपासना आपणाला स्वर्गातील संतांच्या आनंदाचा आस्वाद घेण्यास आमंत्रित करत आहे.
आज आपण ख्रिस्तसभेने घोषित किंवा मान्य केलेल्या प्रसिद्ध संतांचाच नव्हे तर ज्या लोकांनी वेगवेगळ्या काळामध्ये देवाच्या वचनांचे प्रामाणिकपणे पालन करून ते आता स्वर्गीय सुख उपभोगत आहेत अशा सर्व संतांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत.
सणाचा थोडक्यात इतिहास :
रोम शहरामध्ये “Panteon” (पान्तेऑन) ह्या नावाचं एक प्रसिद्ध मंदिर होते. हे मंदिर “सर्व देवांचे मंदिर” ह्या नावाने ओळखले जात असे कारण त्या मंदिरामध्ये रोमच्या राजाने अनेक देशांतील देव आणि देवी ह्यांच्या मूर्ती गोळा करून तेथे त्यांची आराधना करत असत. इ.स. ६०९ मध्ये पोप महाशय बॉनिफस चौथे ह्यांनी सर्व मुर्त्या बाहेर काढून Panteon मंदिरात कुमारी मरिया माता, सर्व रक्तसाक्षी आणि सर्व संतांचा सण १३ मे ह्या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली. नंतर पोप महाशय ग्रेगरी तिसरे ह्यांनी इ.स. ७३१ साली वॅटिकन च्या भव्य मंदिरात (Vatican Besilica) एक छोटसं देवालय सर्व संतांच्या सन्मानार्थ बांधले व १ नोव्हेंबर रोजी सर्व संतांचा सण साजरा करण्याची घोषणा केली. आणि अशाप्रकारे ह्या सणास तेथपासून प्रारंभ झाला.
“संत” – संत म्हणजे कोण? ह्या शब्दाचा अर्थ काय? हा प्रश्न आपणाला नक्कीच पडला असणार. ‘संत’ ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. जी माणसं देवाशी जोडली गेली आहेत, अशा सर्वांना आपण संत म्हणतो. कारण त्यांनी देवाच्या वचनांचे तंतोतंत पालन केले. त्यांनी काही मोठे चमत्कार किंवा मोठया गोष्टी केल्या नाहीत तर त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांनी देवाची आज्ञा पाळली. थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांच्या जीवनाचा सारांश आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणाला ऐकावयास मिळतो.
कदाचित जगाच्या दृष्टीकोनातून ते असमर्थ, अडाणी, अनाकर्षक, अर्धवट किंवा मंद बुद्धीचे असले तरी देवाच्या दृष्टीकोनातून ते सर्वजण महान असे होते. परमेश्वराच्या शक्ती आणि सामर्थ्याने त्यांनी संकटावर, आजारांवर, गुलामगिरीवर व गरीबीवर मात केली म्हणूनच आपण सर्वजण त्यांचा आदर आपल्या डोळ्यासमोर ठेवतो व त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.
 नोविशिएट (Novitiate) मध्ये असताना मी एक रेखाटलेले चित्र भिंतीवर लावलेले पाहिले होते. त्या चित्रात एक लहान मुलगा कुठलातरी विचार करीत होता, आणि त्या चित्राखाली एक वाक्य लिहिले होते, “मी कोण आहे?” मित्रांनो हा प्रश्न आपण कित्येकवेळा स्वतःलाच विचारला असणार, त्याच उत्तर “मी मुलगा/ मुलगी आहे, मी डॉक्टर, इंजिनियर, चित्रकार, कलाकार अश्या कितीतरी विशेषनांनी दिले असणार.
आजचे दुसरे वाचन जर आपण लक्षपूर्वक ऐकले असेल तर “मी कोण आहे?” ह्या प्रश्नाचे साध-सोप्प आणि सुंदर उत्तर आपणाला नक्कीच सापडेल. आम्ही सर्वजण देवाची मुले आहोत” हीच आपली पहिली ओळख आहे. देवाने आपणाला त्याची मुले-मुली म्हणून संबोधिले आहे म्हणून देवाच्या वचनांच पालण करून, संतांसारखे धार्मिक मार्गावर चालणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
पुढे आपण काय होणार आहे हे कुणालाच ठाऊक नाही पण आपण ख्रिस्तासारखे होणार असे संत योहान आपणाला सांगत आहे. कारण ‘कोणाला मोजता येणार नाही असा मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकरासमोर उभा राहिलेला योहानाच्या दृष्टीस पडला. हा मोठा लोकसमुदाय म्हणजेच सर्व ‘संतगण’ हिच ती देवाची लेकरे, ज्यांनी त्यांचे कपडे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केली आहेत. ह्याचा अर्थ असा कि, त्यांनी जीवनातील सर्व संकटावर मात करून विजय मिळविला आहे. ह्याच संतांचा स्मृतिदिन आज आपण साजरा करीत आहोत.
संत बनणे जरी कठीण असले तरी ते प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे मुलभूत पाचारण आहे. मग आपण प्रापंचिक असो किंवा धार्मिक व्यक्ती असो. पण कश्याप्रकारे आपण संत बनु शकतो? – संत बनण्यासाठी बुद्धीची, लावण्य किंवा सुंदरपणा, उच्च व्यक्तिमत्त्व, पैसा, संपत्ती किंवा यशाची गरज लागत नाही. तर आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे जे गरीब अंतकरणाचे आहेत, जे शोक करतात, जे लीन, सौम्य, दयाळू आहेत, जे शांतीने जगतात अशाच व्यक्ती संत बनु शकतात. म्हणून आपल्या रोजच्या जीवनात ख्रिस्ताने दिलेल्या मूल्यांचे पालण करावे व संतांसारखे जीवन जगावं म्हणून आपण प्रयत्न करूया व त्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराकडे मागुया.   
   
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो सर्व संताद्वारे आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, फादर्स व सिस्टर्स ह्यांना देवाचे प्रेम, दया व शांती इतरांपर्यंत पोहचवण्यास कृपा व शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे, म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. जे लोक वाईट व्यसनांच्या अधीन गेलेले आहेत व जे युवक-युवती मोहाला बळी पडून देवापासून दूर गेलेले आहेत, अश्या सर्वांना प्रभूचा स्पर्श होऊन त्यांचे मनपरिवर्तन व्हावे व वाईट व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी प्रभूचे ध्यैर्य व सामर्थ्य लाभावे आणि त्यांनी चांगले धार्मिक जीवन जगावे, म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. आज आपण सर्व संताचा सण साजरा करत असताना इथे हजर असलेल्या आपणा सर्वांना संतासारखे जीवन जगण्यास प्रभूचे सामर्थ्य व मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करु या.









Wednesday 21 October 2015


Reflection for the Homily of 30th Sunday in Ordinary Times (25/10/2015) by Leon D`Britto.







सामान्यकाळातील तिसावा रविवार

दिनांक: २५/१०/२०१५
पहिले वाचन: यिर्मया ३१:७-९
दुसरे वाचन: इब्री ५:१-६   
शुभवर्तमान: मार्क १०:४६-५२

तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.


प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील तिसावा रविवार साजरा करीत आहोत. देव एक पिता आहे आणि तो आपल्या लोकांना पुन्हा एकदा सुखात आणि आनंदात ठेवण्याचे वचन देतो’ हे यिर्मया प्रवक्ता इस्त्राएल लोकांस सांगतो. आपण देवाला नाही तर देव आपल्याला निवडत असतो व सर्वकाही त्याच्या इच्छेप्रमाणे होत असते असे इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात आपण ऐकतो. तर शुभवर्तमानात आपण शारिरिक दृष्ट्या आंधळा असलेल्या बार्तीमला त्याच्या विश्वासामुळे येशूकडून आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होत असल्याचा वृतांत ऐकतो.
आपला देव आपल्याबरोबर सदा असतो परंतु ह्या घाई-गडबडीच्या जीवनात आपण त्याला पूर्णपणे ओळखण्यास कमी पडत असतो. आजच्या ह्या मिस्साबलीदानात बार्तीमसारखा आपला विश्वास दृढ करण्यासाठी व ज्याप्रमाणे बार्तीमने येशूला दाविद्पुत्र म्हणून ओळखले तसे देवाला पूर्णपणे ओळखण्यास आपल्याला लागणारी कृपा व शक्ती आपण देवाकडे मांगुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया ३१:७-९
     ह्या उताऱ्यात यिर्मया इस्त्राएल लोकांस म्हणतो, ‘परमेश्वर तुम्हांला उत्तरेच्या देशांतून आणून तुम्हांस पृथ्वीच्या दिगंताहून जमा करील. तेव्हा तुमच्यात काही आंधळे, काही पांगळे, गर्भवती व प्रसूतिवेदना लागलेल्या स्त्रियासुद्धा असतील. तुम्ही सर्वजण अश्रूपात करीत परमेश्वराजवळ येऊन विनंती कराल. मग तो तुम्हांस ठोकर लागणार नाही अशा सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाकडे घेऊन जाईल. कारण परमेश्वर इस्त्राएलचा पिता झाला आहे व एफ्राईम परमेश्वराचा प्रथम जन्मलेला आहे’.

दुसरे वाचन: इब्री ५:१-६   
ह्या उताऱ्यात आपणास सांगण्यात येते की, ‘देवाच्या माणसाची निवड देव स्वतः करत असतो. देवासमोर जेव्हा माणूस येतो तेव्हा त्याच्याकडे स्वतःचे असे काहीही नसते. त्याचे सर्व अधिकार हे देवाच्या हातात असतात आणि हाच आपला सर्वसमर्थ देव आपली त्याचा अनुयायी अथवा शिष्य म्हणून निवड करत असतो. समजा, माणसानेच माणसाला देवाला अनुसरण्यास निवडले असते तर कदाचित त्यातून माणसाचे देवासाठी असलेले प्रेम दिसून आले असते परंतु जेव्हा देव माणसाला आपला शिष्य अथवा अनुयायी म्हणून निवडतो तेव्हा देवाचे माणसावर असलेले विशेष प्रेम दिसून येते.
देवाच्या कार्यासाठी देव आपली निवड करत असतो. पहिले पाउल तो उचलतो. आपल्याला फक्त सदा तत्पर राहून त्याच्या हाकेला प्रतिसाद द्यायची गरज आहे.

शुभवर्तमान: मार्क १०:४६-५२
आजचे शुभवर्तमान आपल्याला बार्तीमच्या दृढ विश्वासाची साक्ष देत आहे. बार्तीमचा विश्वास एखाद्या रहस्यावर अथवा शिकवणूकीवर आधारित नसून, येशू ख्रिस्त मला बरे करेल व मला नवीन-जीवन देईल ह्या विश्वासामध्ये सामावलेला होता. हा त्याचा विश्वास आजच्या शुभवर्तमानातील त्याच्या प्रत्येक कृत्यांतून दिसून येतो.

) येशूला तो पूर्णपणे ओळखतो: आपण मार्कच्या शुभवर्तमनात पाहिले तर आपल्याला समजते की बार्तीमप्रमाणे येशूला कोणीही इतक्या व्यवस्थितपणे ओळखले नव्हते. फक्त बार्तीमयाने येशूला दाविद्पुत्र येशू” म्हणून ओळखले.
बार्तीमीयसाठी दाविद्पुत्र हे नाव येशू हा देवाकडून आलेला आहे हे दर्शविते वयेशू एक राजा आहे’ अशी येशूची प्रतिमा उभी करते. मार्कच्या शुभवर्तमानात आपण पुढे पाहतो की येशू येरुशलेमेत राजा म्हणून प्रवेश करतो (१०:-१०), न्यायालयात येशूला याहुद्यांचा राजा म्हणून म्हटले जाते (१५:-१५), आणि येशू इस्रालचा राजा म्हणून मरण पत्करतो (१५:१६-३२). बार्तीमय अंध असला तरी येशू ख्रिस्ताची ओळख त्याला पटली होती. तो येशूला दाविद्पुत्र व राजा म्हणून ओळखतो.

) तो अडथळ्यांवर मात करतो: मार्कच्या शुभवर्तमानात आपल्याला एक विशेष गोष्ट दिसून येते ती म्हणजे फक्त विश्वासाने पाहिजे असलेले दान मिळत नाही तर विश्वासाबरोबर त्यासाठी श्रम करावे लागतात. (उदा: :, :२७, ३५-३६, :२७, :१८). येथे बार्तीमबरोबर सुद्धा हेच घडते. जेव्हा बार्तीमय येशूच्या नावाने ओरडू लागला तेव्हा लोकांनी त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. कदाचित लोकांना वाटले असेल की बार्तीमसारखा गरीब-भिकारी आंधळा असणे हे उचित आहे परंतु बार्तीमय लोकांच्या अडथळ्याला न जुमानता अजून जोराने येशूला हाक मारतो व येशूकडे पोहोचण्यासाठी लोकांच्या अडथळ्यावर मात करतो.

) तो पूर्ण बदलाची अपेक्षा करतो: येशू ख्रिस्त कदाचित त्याच्याकडे चालत गेला असता परंतु येशू बार्तीमला त्याच्याकडे बोलावून घेतो. आत्तापर्यंत जे कोणी बार्तीमला गप्प बसायला सांगत होते त्यांना बार्तीमला येशूकडे आणून येशूच्या कार्यात मदत करावी लागली. पुढे मार्क लिहतो: तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला’. वरील वाक्यातून मार्क सुवार्तिक आपणास सांगू इच्छितो की, ‘साधा आंधळा माणूस आपल्या स्वतःच्या वस्तू बाजूला न टाकता त्या नेहमीच आपल्या बरोबर ठेवतो. परंतु बार्तीमयचा विश्वास होता की येशू त्याला पूर्णपणे बरे करील. त्याचे शाररीक व्यंग (आंधळेपण) आणि त्याची आर्थी परिस्थिती (भिकारी) ह्याचे प्रतिक ते वस्त्र होते व जेव्हा तो ते वस्त्र फेकतो तेव्हा त्याद्वारे जणू तो हे सांगतो की मला आत्ता हे वस्त्र घेऊन दुसऱ्यांच्या भिक्षेवर अवलंबून राहावे लागणार नाही कारण माझा येशू आत्ता मला बरा करणार आहे.

) तो गरज असलेले दान मागतो: जेव्हा येशू बार्तीमयला म्हणतो की, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तेव्हा बार्तीमय साध्या सोप्या भाषेत फक्त एवढेच म्हणतो की मला दृष्टी हवी आहे’. अश्याच प्रकारचा प्रश्न अध्याय १० आणि ओवी ३६ मध्ये येशू याकोब आणि योहान ह्यांना विचारतो तेव्हा ज्यातून त्यांना वैभव, प्रतिष्ठा मिळेल अशी एकाला डावीकडे व एकाला उजवीकडे बसण्याची इच्छा व्यक्त करतात तर याउलट बार्तीमय अशा कोणत्याही वैभवाची व प्रतिष्ठेची अपेक्षा करत नाही तर जे खरोखरच गरजेचे होते अशी त्याची दृष्टी तो मागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मार्कच्या शुभवर्तमानात बार्तीमय हा पहिला माणूस नव्हे ज्याने विश्वासाने येशूकडून चमत्काराची अपक्षा केली होती परंतु तो एकच असा आहे जो एक अनुयायी म्हणून येशूच्या पाठीमागे जातो
   
बोधकथा
एकदा एक आंधळा मनुष्य त्याच्या मित्राच्या लग्नासाठी गेला होता. लग्नाचा कार्यक्रम एकदम बहारदार होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसापर्यंत बहुतेक लोक ह्या लग्न कार्यक्रमाविषयीच बोलत होते. लग्नातील डेकोरेशन, लायटिंग, जेवण वैगरे-वैगरे व हे सर्व हा आंधळा माणूसही ऐकत होता. परंतु त्याच्या मनात एकच विचार होता की लोकं एवढ सर्व कौतुक करतात, परंतू लग्नाच्यावेळी झालेल्या वैभवशाली घंटानादाविषयी कोणीही काहीच का बोलत नाही? त्यांना त्या ऐकू आल्या नाही का?
या आंधळ्या माणसासाठी वधू-वरांच्या आगमनाच्या वेळी झालेल्या वैभवशाली घंटानाद हा सगळ्यात महत्वाचा होता, कारण त्या घंटानादाने संपूर्ण वातावरण वैभवशाली व आनंददायी झाले होते. परंतु दुसऱ्या सर्वांच्या नजरेत ही गोष्ट आलीच नव्हती. कदाचित तो आंधळा असल्याने त्याचे कान तीक्ष्ण होते म्हणून त्याने घंटानादाचा आनंद अनुभवला. तर त्याने अनुभवलेला आनंद दुसऱ्यांनी पुरेपूर लक्ष न दिल्याने गमावला. जे सामान्य माणसासाठी शुल्लक होते त्यानेच त्या आंधळ्या माणसाला आनंदाने भरून काढले
 
मनन चिंतन
आजच्या शुभवर्तमानात आपण बार्तीमय नावाच्या आंधळ्या माणसाची गोष्ट ऐकतो. जरी तो आंधळा असला तरी त्याचे कान तीक्ष्ण होते. शुभवर्तमान सांगते की येशू तेथून जात असल्याचे त्याने ऐकले. जरी तो पाहू शकत नव्हता तरी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेने त्याने येशूशी संवाद साधला. त्याने येशू आल्याचे ऐकल्यावर आपल्या वाचेद्वारे येशूला मोठ्याने हाक मारली. जरी तो पाहू शकत नव्हता तरी "माझ्यावर दया करा" ह्या हृदयातून निघालेल्या खऱ्या प्रार्थनेने येशूशी संवाद साधला. त्याची ही प्रार्थना त्याचा येशूवर असलेला विश्वास दर्शवितो .
बार्तीमयने येशूला दाविद्पुत्र म्हणून ओळखले व येशू त्याला बरे करील हा विश्वास दाखवला. ह्यावरून आपल्याला समजून येते की, जरी तो शारीरिक दृष्ट्या आंधळा असला तरी तो आध्यात्मिक दृष्ट्या आंधळा नव्हता. त्याने येशूला आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी पाहिले. दुसऱ्यांनी त्याला हा विश्वास प्रकट करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. त्यावेळेला येशू यरीहोमधून येरुशलेमला जात होता परंतु बार्तीमच्या विश्वासाने त्याला थांबून ठेवले. बार्तीमकडे दुर्लक्ष करण्याएवजी येशू थांबला व बार्तीमला आपल्याकडे आणण्यास सांगितले. त्यावेळी आपले वस्त्र हे त्यासाठी सर्वकाही होते परंतु ते तो येशूसाठी सोडतो. ह्याद्वारे बार्तीमय व त्याचा विश्वास आपल्या सर्वाना येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास सांगत आहे. तसेच तो त्याच्या ह्या कृत्यांद्वारे आपल्याला येशूकडे येण्यासाठी आपले सर्वकाही सोडण्यास प्रवृत्त करत आहे. बार्तीमय आपल्याकडील ज्या वस्तू, अधिकार, पैसा, मालमत्ता आपल्याला येशूवर विश्वास ठेवण्यास परावृत्त करतात त्यांना बाजूला सारून येशूकडे धाव घेण्यास सांगत आहे.    
बार्तीमचा विश्वास हा त्याच्या जीवनाचा सुकाणू होता. जरी तो आंधळा होता तरी खरे काय आहे हे त्याने पाहिले होते. जेव्हा त्याला दृष्टी मिळाली तेव्हा तो बहकून न जाता त्याने त्याचा वापर येशूला अनुसरण्यास केला व आपला विश्वास अधिक दृढ केला.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, आमचा विश्वास दृढ कर
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, कार्डीनल्स, महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांना प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे आणि ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यासाठी त्यांना मनोबल मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत अशा लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी ख्रिस्ताचे सामर्थ्य व धैर्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. बार्तीमयसारखा दृढ विश्वास आपणा सर्वाना मिळावा व येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास आपणास ख्रिस्ताची कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्याकडील ज्या वस्तू, अधिकार, पैसा मालमत्ता आपल्याला येशूवर विश्वास ठेवण्यापासून परावृत्त करतात, त्यांना बाजूला सारण्यास आपणास येशूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.