Monday 28 March 2016



Reflection for the homily of Divine Mercy Sunday (03/04/1206) By: Allwyn Gonsalves. 






पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दैवी दयेचा रविवार




दिनांक: ०३/०४/२०१६ 
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ५:१२-१६.
दुसरे वाचन: प्रकटीकरण: १:९-११,१२-१३,१७-१९.
शुभवर्तमान: योहान: २०:१९-३१.


                     “ न पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.



प्रस्तावना: 

आज आपण पुनरुत्थानानंतरचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, येशूवरील विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा व एकजीवाचा होता, ह्या समुदयात विविध लोक एकत्र आले. आजचे दुसरे वाचन प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतले आहे, आणि ह्या वाचनात आपणाला, संत योहानला झालेल्या येशूच्या प्रकटीकरणाविषयी ऐकायला मिळते. आजच्या शुभवर्तमानात संत योहान, आपल्याला थोमाचे अविश्वासातून विश्वासाकडे झालेल्या परिवर्तनाबद्दल सांगतो.
त्याचप्रमाणे आज आपण दैवी दयेचा (Divine Mercy)  सण साजरा करीत आहोत. दैवी दयेच्या विश्वासात वाढण्यासाठी आपणास संत फॉस्टीना ह्या महान संताची मदत आपल्या दैनंदिन जीवनात होते. संत फॉस्टीना आपणास तिच्या बरोबर, ‘हे येशूमाझी तुझ्यावर श्रध्दा आहे’ अशी प्रार्थना करावयास आव्हान करते. तिच्या जीवनाचे आचारण आपण सतत करावे व ख्रिस्ती श्रध्देत वाढावे म्हणून आपण देवाकडे त्याच्या दयेसाठी प्रार्थना करूया. संत थोमाने येशूला पाहताच, ‘माझ्या देवा! माझ्या प्रभो!’ हे शब्द उच्चारले. जरी तो सुरूवातीला विश्वासात डगमगला तरी नतंर तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी झाला व ख्रिस्ताच्या शब्दांचा प्रचार सर्वत्र केला. आजच्या शुभर्वतमानात येशू ख्रिस्त आपणास निमंत्रित करून म्हणत आहे, ‘न पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.’ ह्याच पुनरूत्थित ख्रिस्तामध्ये आपला विश्वास सदैव राहून तो आपल्या कार्यात दिसावा म्हणून आपण आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:१२-१६.

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात आपण ऐकतो की, सर्व शिष्य आपली सर्व संपत्ती प्रेषितांच्या चरणाशी ठेवीत व त्यांना काहीही उणे पडत नसे. ह्या पुस्तकात ख्रिस्ती धर्माचा व ऐक्याचा उगम कसा झाला, याबाबत आपणास ऐकायला मिळते. येशूच्या स्वर्गरोह्नानंतर शिष्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना छळ, अडचणी व मनस्ताप सहन करावा लागला. परंतू त्यांची प्रभूवरील श्रद्धा अढळ होती. त्यामुळे हा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता. ख्रिस्ताठायी व ख्रिस्तामुळे त्यांच्यात ऐक्य होते आणि त्यामुळेच त्यांना जगातील कुठलीही शक्ती ख्रिस्तापासून दूर करू शकली नाही.
उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास असमर्थ आहे (रोमकरांस पत्र ८:३९), ख्रिस्ताने आपल्या जीवनात मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे सर्वांस एका छ्ताखाली, एक कळप व देवाची लेकरे म्हणून एकत्रित केले. त्यांना काही उणे पडले नाही ते सर्व आनंदित होते, कारण त्यांनी सर्वप्रथम देवाचा व इतरांचा विचार केला. प्रभू म्हणाला होता जेथे दोघे वा तिघे एकत्रित येतात त्यांच्यामध्ये मी हजर आहे”. ख्रिस्ताच्या प्रितीपासून कोण आपणाला वेगळे करील? (रोम ८:३५)

दुसरे वाचन: प्रकटीकरण १:९-११,१२-१३,१७-१९.

संत योहान विश्वासू लोकांना सांगतो की, देवाने त्याला दर्शन दिले व देवाचा अनुभव लिहिण्यास प्रवुत्त केले आहे. संत योहानला ख्रिस्ती समूहास सामोरे आलेल्या अडचणीची जाणीव होती. आम्ही कोणावर विश्वास ठेवावा? व का ठेवावा? ह्या त्यांच्या प्रश्नास संत योहान उत्तर देत म्हणतो की, ‘प्रत्येकजण जी देवाची मुलं  होतो, तो जगावर विजय मिळवतो आणि त्यामुळे आम्हाला जगावर आमच्या विश्वासाने विजय मिळाला. जग तुम्हाला आनंदित करील, प्रसन्न करील परंतू तुमचा आनंद सर्वकाळ टिकणारा नसेल. देवावरील विश्वासाने तुम्ही त्याच्या प्रीतीचा अनुभव घ्या’, अशी शिकवणूक संत योहान देतो.

शुभवर्तमान: योहान २०: १९-३१

      शिष्य भयभीत झाले होते. आपल्या गुरुनंतर आपले काय होईल? ह्या प्रश्नाने त्यांच्या भित्र्या मनात घर केले होते, लपून बसलेले असताना व दरवाजे बंद असताना प्रभू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहतो व दर्शन देताना म्हणतो, “तुम्हास शांती असो.थोमा हा त्यांच्यामध्ये नव्हता. तो म्हणाला, “त्याच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्यावाचून व खिळे होते त्याजागी आपले बोट घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही”. आपल्या बंधुबरोबर एकत्र न राहिल्यामुळे त्याला पुनरुत्थित येशूला भेटण्याची संधी लाभली नाही.  तरीही विशेषरीत्या येशू, पुन्हा थोमाला दर्शन देतो. थोमाचे हृद्य, प्रीतीने व भक्तीने ओसंडून वाहते म्हणूनच तो उद्गारतो, “माझ्या प्रभू व माझा देवा”. प्रभू भविष्यात येणाऱ्या आपल्या सर्व शिष्यांस उद्देशून म्हणतो की, ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत परंतू पाहिल्यावाचून जे विश्वास ठेवतात ते धन्य होत’.
      थोमा हा प्रभू येशूबरोबर अनेक वर्षे होता. त्याने येशूच्या शक्तीचा अनुभव घेतलेला होता. येशूने अनेक चमत्कार केले होते ह्याचा तो साक्षीदार होता. इतकेच नव्हे तर जेव्हा येशूने लाझरसला मरणातून उठविले होते, तेव्हा थोमा इतर शिष्यांना म्हणाला होता की, आपणही येशूबरोबर जाऊ, जेणेकरून आपल्यालाही मरण प्राप्त होईल. परंतू जेव्हा त्याच्या विश्वासाच्या कसोटीची खरी वेळ आली तेव्हा थोमा डगमगला. विश्वास म्हणजे अंधारात विचार न करता मारलेली उडी (leap of faith). येशू आपल्या शिष्यांना जे पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे होते त्यांना धन्यअसे संबोधतो.


बोध कथा:

अर्नाळा ह्या ठिकाणी काही वर्षाअगोदर, एक बोट मासेमारी करण्यासाठी अथांग सागरात गेल्यावर बेपत्ता झाली. पुष्कळ वर्षानंतर अनेक प्रयत्न केल्यावरही त्या बोटीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. एक स्री जिचा पती त्या बोटीवर होता ती रोज रात्री समुद्रकिनारी जात असे व दूर सागरात एकटक लावून पाहत असे. तिने आपल्या घराचा दरवाजाही कधीही बंद ठेवला नव्हता. तिला अनेकजणांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतू सर्व निष्फळ. तिने आशा सोडली नव्हती. तिचा विश्वास होता कि एकदिवस तिचा पती पुन्हा घरी येईल. जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिच्या ओठावर शब्द होते, “माझे पती आले तर त्यांना सांगा मी त्यांची खुप वाट पाहिली”.
त्या स्त्रीचा विश्वास होता, की तिचा पती जिवंत आहे व एकदिवस तो नक्कीच परत येईल. तिच्या विश्वास आणि प्रीतीमुळे तिने रोज तिच्या पतीला परत येताना पहिले होते. प्रभू उठला आहे व तो आजतागायत जिवंत आहे. त्याला पाहिल्यावर थोमा उत्तरला, “माझ्या देवा, माझ्या प्रभो!”. विश्वास हा अपेक्षित गोष्टीचा भरवसा व अदृश्य गोष्टींची खात्री आहे.

मनन चिंतन:

जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतासारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलाव लागतंअसं म्हणतात. पवित्र शास्त्रामध्ये आपण तीन प्रकारच्या व्यक्ती पाहतो. पहिले ज्यांनी अदभुत गोष्टी पाहिल्या तरी विश्वास ठेवत नाही. उदाह्र्णार्थ, इजिप्तचा फारो राजा. दुसऱ्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे ज्यांनी पाहिल्यावर विश्वास ठेवला. उदाह्र्णार्थ थोमा. ह्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींपेक्षाही तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्ती न पाहता विश्वास ठेवतात त्यांचा समावेश होतो आणि त्यांनाच प्रभू धन्यअसे संबोधतो. नोहाने परमेश्वराची वाणी ऐकली त्याने पाहिले नव्हते तरी त्याने विश्वास ठेवून बोट तयार केली. आब्राहमला भविष्याची कल्पना नसून सुद्धा त्याने देवावर विश्वास ठेऊन आपले घरदार सोडले.
      जर थोमाने शिष्याची साक्ष ऐकून विश्वास ठेवला असता, तर कदाचित त्याचा विश्वास महान असा गणला गेला असता. कारण थोमाने अनेक वेळा प्रभूकडून ऐकले होते की, मानवाच्या पुत्राला जीवे मारले जाईल आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. मेलेल्या लाझरसला प्रभूने कसे उठविले ह्याचाही तो साक्षीदार होता. थोमाला मसीहाजो तारणारा येणारा होता त्याला अनेक दु:खाना सामोरे जावे लागणार होते हे पवित्र शास्त्राद्वारे माहित होते; परंतू थोमाला आपल्या इंद्रियांनी अनुभव घेऊन विश्वास ठेवायचा होता. थोमाला वाटले होते की, तो बरोबर वागत होता व विश्वास ठेवण्यासाठी आपल्या इंद्रियांनी अनुभव घेणे गरजेचे आहे हे त्याला वाटत होते.
      श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. श्रद्धेचा घटक आपल्यात असल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. प्रभू जिवंत असताना सर्व शिष्यांची श्रद्धा प्रभू येशूवर होती. प्रभूपुढे प्रश्न होता अखिल मानवजातीचा. प्रश्न होता चिरंतन अशा अंतिम सत्याचा. प्रश्न होता अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मत्वाचा. जगातील अंतिम व कधीही न बदलणारं शाश्वत सत्य आहे; कुणालाही त्याचा अनुभव आपल्या विलासी रंगमहालात राहून कधीच घेता येणार नाही. केवळ जगायचं या शुद्ध लोचट आसक्तीला, पाण्यातील हत्तीला मगर चिटकतो तस चिटकून त्याचा प्रत्यय कुणालाही कधीही घेता येणार नाही. त्यासाठी जशी दिवसामागून रात्र असते तसा जीवनामागून मृत्यू असतो याचा शरीरातील पेशीपेशींना दाट आणि अमळ परिचय व्हावा लागतो. मन, शरीर, बुद्धी सर्व निकोप आत्मनिर्भर व्हावं लागत. मग सत्य कुणी दुसऱ्यानं सांगाव लागत नाही, पटवून द्यावे लागत नाही तर ते आपोआपच शरीर-शरीरातून प्रकटून पावू लागतं. मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव हे कधीही विचारून, विकत घेऊन किंवा भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे.
आपला विश्वास हा आपल्या अंत:कणातून असावा लागतो. ज्याप्रमाणे दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही किंवा दुसऱ्यांनी पाणी प्राशन केल्याने आपली तृष्णा कधीच शमत नाही, अगदी त्याचप्रमाणे कुणाच्याही केवळ उपदेशामुळे कुणाचाही कधीच उध्दार होत नसतो. जिथं जिथं जीवन असत तिथं तिथं प्रकट करण्याची अनावर ओढ असते. मुक्तीची तळमळ असते. बाहेरून ती दिसत नसेल, पण आतून हे कार्य अखंडितपणे चाललेलं असत म्हणून जीवन म्हणजेच प्रकटनअसे आपण म्हणू शकतो.
कधी कधी या प्रकटनाचा प्रलख्ख देखावा मानवजातीपुढे यावा लागतो; कारण ग्रंथ, उपदेश नितीत्व आणि साक्ष यापलीकडे जाऊन ती आसक्त झालेली असते. जगात दृश्य वस्तूंच्या पलीकडे आणखी काही सूक्ष्म जगत आहे हे पहायलाही तिला अवसर नसतो. थोमाच्याही मनात युद्ध त्यामुळेच पडलं होत. त्याला व शिष्यांना भय वाटत होते, परंतू येशू त्यामध्ये येऊन म्हणतो, “तुम्हास शांती असो”.
एकदा भय संपले की, जो प्रदेश लागतो त्यालाच मुक्ती असे म्हणतात’. अनेकदा आपणही जीवनात असा अनुभव घेतो. धीर गळून पडतो. समोर मार्ग दिसत नाही. प्रभो समोर असला तरीही आपण खोल गर्तेत रुतलेलो असतो. संत कबीर म्हणतात, “आगे थे सदगुरू, दीपक दया हाथी.गुरु नेहमीच आपल्या समोर काळजाचा दिवा लावून असतो, तो आपलं आयुष्य उजळवत असतो. दुःखाचा प्याला तो अगोदर पीतो आणि स्वतःच्या आयुष्याची खंडणी भरुन तो उभा असतो. बऱ्याचदा आपणालाही थोमाप्रमाणे प्रभू जो आपल्या सामर्थ्याचा मूळस्त्रोत आहे त्याचा विसर पडलेला असतो. आपणही शंका घेतो व शंका भयाचे कारण ठरते.
थोमा आपल्या बुद्धीद्वारे आपल्या इंद्रियांचा अनुभव घेवून प्रभूचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होता. प्रभू त्याच्या सर्व शिष्यांना म्हणतो, “तुम्हास शांती असो”. संत पौल लिहितो, “सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमची मने ख्रिस्त येशूच्या द्वारे राखील (फिलीपैकरांस पत्र ४:७) व शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील (४:९).
प्रभू म्हणतो, “माझी शांती मी तुम्हांला देतो, तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भयभीत होऊ देऊ नका” (योहान १४:२७). प्रेम मानवाला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देतो म्हणून ते प्रेम खरखुरं असावं. ते हृदयाच्या गाभाऱ्यातून उमलायला हवं. प्रिती कोणत्याही भीतीतून किंवा दुःखातून मुक्त होण्याचा सहज सुलभ मार्ग आहे.
आपल्या विश्वासाने आपल्या जीवनाला खऱ्या प्रेमाने अर्थ येतो. व हा विश्वास अपेक्षित गोष्टींचा भरवसा व अदृश्य गोष्टींची खात्री असा आहे’ (इब्री ११:१).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची पुनरुत्थित ख्रिस्तावरील श्रद्धा दृढ कर.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या विश्वासपूर्वक पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी तसेच प्रत्येक सदस्यातील बंधुभावाची भावना वृद्धिंगत होऊन एकमेकांतील जवळीकता वाढावी म्हणून आपण प्रार्थना करूया.




Tuesday 22 March 2016



Reflections for the homily of Easter Sunday  (27/03/2016) By: Sadrick Dapki.


 पास्काचा सण








दिनांक: २७/०३/२०१६.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०: ३४, ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरास पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९.



“पुनरुत्थान व जीवन मीच आहे”







प्रस्तावना:

ख्रिस्त मरणातून उठला आहे. त्याने मरणावर विजय मिळविला आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनातील अति महत्त्वाचे घटक म्हणजे, ‘येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान.  आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने आपणांस ‘सत्य’ पटवून देत आहेत की, ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून संपूर्ण जगाला दाखविले की, आपला देव हा जिवंत देव आहे.
पहिल्या वाचनात पेत्र ज्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही व जे खऱ्या जिवंत देवाविषयी उत्सुक आहेत, त्यांना प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे. कारण प्रभू येशूने मृत्यूवर व जगावर विजय मिळविला आहे. शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू ख्रिस्त हा मरणावर विजय मिळवून उठला आहे.
येशू ख्रिस्त म्हणतो, ‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे’ आणि आपण त्याच पुनरुत्थित ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. ‘प्रत्येक अंधारमय भोगद्यानंतर आशेचा किरण दिसत असतो’, म्हणून मृत्यू हा आपल्या जीवनाचा शेवट न मानता आपणदेखील प्रभूच्या पुनरुत्थानात एकदिवस सामील होणार आहोत हा आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून या ख्रिस्तयागात आपण विशेष प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०: ३४, ३७-४३

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात प्रामुख्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयी तसेच शुभवर्तमानाच्या केलेल्या प्रचाराविषयी वृत्तांत आढळून येतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण मरणातून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताविषयी संत पेत्राने दिलेल्या ग्वाहीबद्दल ऐकतो. संत पेत्र म्हणतो, ‘पवित्र आत्म्याने अभिषिक्त केलेल्या नाझरेथकर येशूने मरणावर विजय मिळवून, तो जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश बनला आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावात पापांची क्षमा लाभली आहे’.
ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून आम्हाला स्वर्गीय जीवनाचे भागीदार बनविले आहे. ज्या देवाने ख्रिस्ताला मरणातून उठविले आहे, तोच देव आम्हालासुद्धा न्याय-दिनाच्या दिवशी मरणातून उठवून मांगल्यमय जीवनाचे स्पर्थक घडवून आणील.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सैकरांना, “ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे स्पष्टपणे नमूद करून देत असताना आपल्याला उद्देशून म्हणतो की, ख्रिस्ताबरोबर आपण देखील उठवले गेलो आहोत. आता आपण त्याच्या पुनरुत्थित जीवनात सहभागी झालो आहोत. ह्यास्तव, आपले जीवन आता वेगळे असायला हवे. स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी संत पौल आपल्याला विनंती करतो. कारण तेथे ख्रिस्ताच्या प्रकाशाची, प्रेमाची व सत्याची सत्ता स्थापित केली आहे.

शुभवर्तमान: योहान २०:१-९

संत योहान आपल्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयीच्या घडलेल्या घटनेचे विवरण करीत असताना, ‘रिकामी कबर’ ह्या प्रसंगाचा उल्लेख प्रथमरीत्या नमूद करतो. येशूची ‘रिकामी कबर’ हा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा गाभा मानला जातो व ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरुत्थानाचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो.
प्रत्येक शुभवर्तमानकार ह्या प्रसंगाबद्दल वेगवेगळे प्रसंग मांडतो. जसे संत योहान २०:१ मध्ये म्हणतो, ‘मरिया माग्दालीया एकटीच कबरेजवळ गेली’. संत मत्तय २८:१ मध्ये, ‘मरिया माग्दालीया व दुसरी मरिया, ह्या दोन व्यक्ती कबरेजवळ गेल्याचे नमूद करतो’, तर संत मार्क १६:१ मध्ये म्हणतो, ‘मरिया माग्दालीया, याकोबची आई मरिया व सलोम ह्या तीन व्यक्ती तेथे हजर होत्या’. ह्या विविध वृत्तांवरून आपल्याला एकच महत्त्वाची गोष्ट साध्य करावयास भेटते, ती म्हणजे येशू ख्रिस्त हा मरणातून उठला आहे व ‘त्याने मेलेल्यांतून पुन्हा उठावे’ असा शास्त्रलेख जो लिहिला गेला होता तो पूर्ण झाला आहे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात येशूच्या बारा शिष्यांपैकी दोन शिष्यांचा उल्लेख केला गेला आहे पण त्यापैकी फक्त एकाच शिष्याचे नाव स्पष्टपणे मांडण्यात आले आहे आणि ते म्हणजे ‘शिमोन पेत्र’ व दुसऱ्या शिष्याचे नाव गुपित असल्याचे दिसून येते. परंतु उल्लेखाप्रमाणे आपणास, येशूचा अतिप्रिय शिष्य संत योहानच आहे असे स्पष्ट होते. मरिया माग्दालीया हिने दिलेल्या वृत्तांतावरून दोन शिष्य, पेत्र व योहान, येशूच्या रिकाम्या कबरेजवळ येतात व ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे, “मी तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठेन” ह्या वचनावर विश्वास ठेवतात.

बोधकथा:

लंडन ह्या शहरात घडलेली हि सत्य घटना आहे. १६६६ मध्ये संत पौलाला समर्पित केलेल्या एका महामंदिराला भल्या पहाटे आग लागली व काही क्षणातच ते महामंदिर त्या आगीने भस्म करून टाकले. तब्बल दहा-बारा वर्षाचा काळ उलटल्यानंतर पोप महाशयांनी ‘ख्रिस्तोफर बेल्न’ ह्या नव-शिक्या शिल्पकाराला त्या चर्चच्या पुन:बांधकामासाठी हवा असलेला आराखडा बनविण्यास सांगितला. ख्रिस्तोफरने त्या जागेचे चांगल्याप्रकारे निरीक्षण केले व परिसराचा अभ्यास केला. सुरुवातीला काम थोडे अवघड दिसत होते कारण, त्याला हवे असलेले निकाल मिळत नव्हते.
     परंतु एके दिवशी उध्वस्त झालेल्या त्या चर्चच्या ढिगाऱ्यातून, त्याने एक शिल्प उचलले व त्यावर कोरलेल्या शब्दांना वाचून तो आश्चर्यचकित झाला. आता त्याचा विश्वास बसला की, ह्या चर्चची  पुन: बांधनी होणे शक्य आहे. कारण त्यावर  शिल्पकाराने कोरलेले शब्द होते, ‘होय मी पुन्हा उठेन’. आणि ह्याच शब्दावर विश्वास ठेऊन त्याने त्याचे काम पूर्ण केले व आपणास आज भव्य महामंदिर पहावयास भेटते.

मनन चिंतन:

आपण गोष्टी ऐकतो व त्या गोष्टींमध्ये रमून जातो. काही गोष्टींतून आपणास बोध मिळतो. आणि आपणास काहीतरी शिकावयास भेटते. पण जर ती गोष्ट अपुरी असली तर आपण बैचेन होतो, कारण आपणास त्या गोष्टीचा शेवट भेटत नाही. एक लहान मुलगी शुभवर्तमान वाचावयास बसली, ती येशू ख्रिस्तामध्ये हरवून गेली आणि अचानक रडत-रडत आईकडे धावत येऊन म्हणाली, “त्यांनी त्याला मारले, त्यांनी त्याला मारले”. म्हणून तिच्या आईने तिला दिलासा देऊन म्हटले, “जा आणि गोष्ट पूर्ण कर”.
त्या मुलीप्रमाणे आपल्याला सुद्धा येशूच्या मरण व पुनरुत्थानाची गोष्ट माहित आहे. आपले हृद्य व मन हे पराभूत झालेल्या गोष्टी ऐकून नाहीत तर विजयी झालेल्या गोष्टी ऐकून भरून जाते व आनंदी होते. येशू ख्रिस्त मरण पावल्याने सर्वांनाच दुःख झाले होते व सर्वजण खोलीत बसून शोक करत होते. मरिया माग्दालीया सुद्धा त्या शोकात येशू ख्रिस्ताच्या थडग्याजवळ आली; ती येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल विचार करत होती. ती जीवनामध्ये मृत्यूचा शोध करीत होती; जिवंत देवाला थडग्यामध्ये शोधत होती. परंतु जेव्हा तिला कळून चुकले कि येशू ख्रिस्त येथे नाही तो जिवंत झाला आहे, तिचा आंनद गगणात मावेनासा झाला, तिने गोष्टीचा शेवट बघितला व आनंदित झाली.
‘येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे’ आणि त्याच्यामध्ये आपले जीवन आहे. येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झाला हे आपणास त्याची रिकामी कबर पाहून समजले. येशू ख्रिस्ताच्या मरणाने व पुनरुत्थानाने आपले तारण झाले. हे सर्व त्याने केले ते आपल्या प्रेमाखातीर. ‘देवाने जगावर खूप प्रेम केले’ व जेव्हा हे जग पापामध्ये बुडायला लागले, तेव्हा त्याने आपल्या प्रेमळ पुत्रास पाठविले. जेणेकरून आपण ह्या पापांतून मुक्त होऊ. येशू ख्रिस्ताने आपणावर शेवटपर्यंत प्रेम केले आणि ते प्रेम आपण उत्तम शुक्रवार (Good Friday) च्या दिवशी पाहिले, आणि हेच प्रेम आज पर्यंत जिवंत आहे.
येशू ख्रिस्ताचे प्रेम हे शेवटी विजयी झाले कारण त्याने पापांवर आणि मरणावर विजय मिळविला. तो आपल्याला जीवनाचे नाविन्य देतो. हा पास्काचा उत्सव आपणास मूलगामी नाविन्याची भेट वस्तू देतो. सर्व काही बदलणार, पाप व मृत्यू कधीच विजय मिळवणार नाही, कारण आपण मिस्साबलीदानात विश्वासाने म्हणतो, ‘ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल’.
हे आपले नाविन्यमय जीवन जे आपल्याला देवाच्या प्रेमाने लाभले आहे ते चिन्हाद्वारे दृश्यमय केलेले आहे. वेदीसमोर आपण एक पेटती नवीन आशीर्वाद केलेली ‘पास्कल कॅन्डल’ पाहतो. जिची जळती वात येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे असे दर्शवते. होय, येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे, जो आपल्या जीवनमय वाटचालीत मार्ग दाखवतो, पापांचा व मृत्यूचा अंधकार नाहीसा करतो. एकटेपणामध्ये कठीण परिस्थितीमध्ये प्रेमळ उब देतो आणि आपल्या भय व अनिश्चितते मध्ये मार्गदर्शन करतो. हे आपले नाविन्यमय जीवन जे आपल्याला देवाच्या प्रेमाने लाभले आहे ते पाण्याच्या चिन्हाद्वारे दृश्यमय केले आहे. लवकरच रात्री आशीर्वादित केलेले पाणी तुमच्या अंगावर शिंपडले जाईल. हे पाणी, ‘येशू ख्रिस्त हा जीवन आहे’ असे चिन्हांकित करते, जे आपल्याला आपले रोजचे जीवन ख्रिस्तासारखे व त्याच्या शिकवणीसारखे जगायला समर्थ करत असते.
यंदाच्या वर्षी आपण असामान्य करुणा वर्ष (ज्युबिली वर्ष) पाळत आहोत. देवाची दया हि अपार आहे. तो आपल्याला कधीच वाळीत टाकत नाही; त्याच्याच दयेमुळे आज आपण पापांपासून मुक्त झालो आहोत. म्हणून आज आपण पुनरुत्थित  येशूच्या ऐक्यात राहण्याचे वचन घेत असताना त्याच्याकडे प्रार्थना करुया, जेणेकरून आपण त्याच्यासारखे जीवन जगू आणि ‘पास्काचे साक्षीदार’ बनू. जे अंधारात भटकत आहेत त्यांना पुनरुत्थित येशूचा प्रकाश दाखवू. आणि हा पास्काचा आनंद सर्वांना देऊ..... आल्लेलूया.... आल्लेलूया....आल्लेलूया..... आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला तुझे दर्शन दे.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे, पोप महाशय, बिशप्स, सर्व धर्मगुरु, व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, ह्या सर्वांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य चालू ठेऊन एक उत्तम जीवन जगावं म्हणून आपण प्रार्थना करुया.
 २. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज इतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात, प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
३.  जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव यावा, तसेच त्यांनी पापाच्या अंधकारातून प्रभूच्या प्रकाशात एक नविन जीवनाला सुरुवात करावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे कार्यकर्ते नेमेले गेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नविन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
६. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करुया.

Monday 21 March 2016

Reflections for the homily of Easter Vigil  (26/03/2016) By: Minin Wadkar.







पुनरुत्थित रविवार

‘जागरण विधी’







दिनांक: २६/०३/२०१६.
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: लूक २४:१-१२.


'व्यर्थ न हो बलिदान '






आजच्या या विधीचे चार मुख्य भाग आहेत.
पहिला भाग: प्रकाश विधी:
प्रकाश अंधकार नाहीसा करतो. याच प्रकाशाचे चिन्ह म्हणून पुनरुत्थित येशूला आपण जगाचा प्रकाश आहे असे घोषित करतो.
दुसरा भाग: प्रभूशब्दविधी:
देव साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे. त्याचे प्रेम अपार आहे. ह्याच प्रेमाचा उल्लेख आज आपल्याला जुन्या व नवीन करारातील निवडक वाचनाद्वारे कळून येते.  
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद:
या विधीत बाप्तीस्म्यासाठी लागणाऱ्या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. बाप्तिस्माद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचे वरदान प्राप्त होते.

प्रास्ताविक:
      
      प्रिय ख्रिस्त भाविकांनो, हि रात्र आहे प्रकाशाची, हि रात्र आहे दिव्य तेजाची. हा प्रकाश व दिव्य तेज आहे पुनरुस्थित येशू ख्रिस्त, ज्याने मरणावर विजय मिळविला आणि आम्हांला पाप मुक्ती दिली. येशूचे क्रूसावरील मरण हे व्यर्थ गेले नाही तर त्या क्रुसावर टांगण्यात आलेला येशू पुनरुत्थित झाला आणि ह्याच क्रूसाला आपण मानवंदना करतो आणि येशूला आपण आपला तारणारा घोषित करतो. या शुभ प्रसंगी ख्रिस्तसभा सर्वांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावीत आहे. येशूच्या शब्दावर व त्याने केलेल्या दैवी चमत्कारावर आपण विश्वास ठेऊया आणि त्याच्या बरोबर शाश्वत जीवन जगण्यासाठी प्रवास सुरु करूया.

सम्यक विवरण: 

       आजचा विधी हा ‘पास्काचा जागरण विधी’  म्हणून ओळखला जातो. हे नाव व दिवस यहूद्यांच्या पास्काच्या सणावरून देण्यात आलेले आहे.
अ)जुन्या करारातील सात वाचनांद्वारे आपल्याला देवाने मानवाच्या जीवनासाठी व कल्याणासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची ओळख करून देतात. देव जगाची निर्मिती करून तो मानवास आपल्याच प्रतीरुपाप्रमाणे निर्माण करतो व त्याच्या हातात साऱ्या सुष्टीची   देखरेख करण्याची जबाबदारी सोपवितो. पाप मानवाला देवापासून दूर नेते. परंतु देव मानवाच्या तारणासाठी संदेष्टे पाठवून मानवास आपल्या जवळ आणतो. मानवाने केलेले पाप व देवाने मानवाची केलेली पापातून मुक्तता यांची पुनरावृत्ती या वाचानांद्वारे होते.
ब) संत पौलाचे रोमकरांस पत्र ह्याद्वारे सर्व ख्रिस्ती बांधवाना प्रभूमध्ये जीवन जगण्यास सांगत आहे. तो म्हणतो, “स्नानसंस्काराद्वारे, प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व ख्रिस्ताद्वारे पुनरुत्थित होतो.” त्याचे सर्व जीवन हे ख्रिस्तात सुरु होते व ख्रिस्तामध्येच संपते. ख्रिस्ती लोकांनी आपले जीवन चांगल्या रितीने जगावे व त्यांनी कुमार्ग सोडून ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार चालावे म्हणून पौल सांगत आहे. तो म्हणतो, स्नान संस्काराद्वारे मानवाने आपला पूर्वीचा कुमार्ग सोडावा व तो अशाप्रकारे सोडावा कि, त्याने जणू म्हणावे मी पापासाठी मेलो आहे. स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक व्यक्ती देवाचे लेकरू होत असते.
क) लुकलिखीत शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक दफन करीत असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्दाथ दिवस आड आल्याने प्रभू येशूचा मृतदेह घाईत दफन केला गेला होता. या कारणामुळे स्त्रियांना यहुदी रीतीप्रमाणे गंधरस लावता आले नव्हते. ह्यासाठीच त्या भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी थडग्यापाशी गेल्या होत्या. परंतु त्यांना येशू ख्रिस्ताचे शरीर सापडले नाही. येथे लुक, स्त्रिया आणि लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष यांच्यात झालेल्या येशूच्या पुनरुत्थानाविषयीच्या संभाषणाबद्दल सांगतो. पुढे स्त्रियांनी कबरेपासून परत येऊन अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगितले.   

बोथकथा:

रोहिणी सरकार ही साहवीत शिकणारी मुलगी. घरातील आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. वडील तुटपुंजा पगारावर काम करत होते. नववीत शिकणाऱ्या मोठ्या भावाची एक किडनी पूर्णत: निकामी झालेली तर दुसरी त्याच वाटेवर. आठवीतील मोठी बहिण मोणिका आणि रोहिणी यांच्या हुड्यांचे टेंशन डोक्यावर असलेल्या वडिलांचे डोळे अधू होत चाललेले होते. या सगळ्या समस्यावर रोहिणीने एक ‘जालीम’ उपाय शोधून काढला. आपण आत्महत्या केली, वडिलांना डोळे, भावाला किडनी देता येईल आणि हुड्यांचा खर्च वाचेल असे तिच्या डोक्यात आले. तिने आपल्या मनातील हा विचार मोनिकाजवळ बोलूनही दाखवला. मात्र तिने ही गोष्ट हसण्यावारी नेली. रोहिणी पूर्ण गांभीर्याने हा विचार करत होती, हे मोनिकाला तिच्या मृत्युनंतर समजले. रोहिणीच्या अचानक जाण्याने सगळ्या घराला धक्काच बसला होता. आणि त्यात भर म्हणून आपल्या अवयांचा भाऊ-वडिलांसाठी उपयोग व्हावा, अशी इच्छा व्यक्त करणारी तिची चिट्ठी मिळाली. आपल्या लाडक्या बहिणीचा आदर, सन्मान व आठवण ठेवण्यासाठी तीची ती शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली. आजूबाजूच्या लोकांनी रोहिणीच्या मरणाबद्दल दु:ख व्यक्त करून ‘मरणाने जग जिंकले, मरण जीवन देऊन गेले’ असे घोषित केले.  
‘ही आत्महत्या नव्हे तर देहदान होय’. आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी व त्यांचे ओझे हलके करण्यासाठी रोहिणीने स्वत:चा विचार न करता, सर्वस्व बहाल केले. ही कथा आत्महत्तेसाठी प्रवृत्त करत नाही तर दुसऱ्यांना आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यासाठी प्रेरणा देते.
‘भावाला किडनी आणि वडिलांना डोळे मिळावेत अशी तिची इच्छा होती.’


मनन चिंतन:
‘ व्यर्थ न हो बलिदान ’

जीवनाची सुरुवात जन्माने होते आणि शेवट मरणाने. जन्माच्या वेळी पाळण्यात किंवा आईच्या कुशितील नवोदित बाळ रडत असते आणि आजूबाजूची माणसे मात्र आनंदाने गाणी गात असतात. तर मरणाच्यावेळी दफन भूमीजवळ एकत्र जमलेली माणसे, दु:खाचा तांडव मांडत असतात पण त्यावेळी मात्र शवपेटीतील मृत व्यक्ती गप्प निपचित पडलेली असते, केवढा हा विरोधाभास. ह्याचे कारण म्हणजे मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होत नाही. कुठल्याही प्रकारचे मरण असो, युद्धातील मरण, आजारामुळे मरण, आत्महत्येचे मरण, नैसर्गिक आपत्तीने आलेले मरण, हे सर्व मरण, मरण असते.
‘ज्याप्रमाणे पेटती मेणबत्ती अचानक वाऱ्याच्या झोकाने विझुन जाते तसे मानवी जीवन हे कोणत्याही क्षणी संपू शकते, कारण मरण हे मरण असते आणि मरणावर आपला ताबा नसतो.’ आपल्याला एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे आणि ती म्हणजे मरण हे एक ‘मोठे बलिदान’ आहे. माणसाची खरी ओळख त्याच्या मरणानंतर होते. जिवंत असताना बऱ्याच हालअपेष्टा काढाव्या लागतात, त्याच हालअपेष्टांचे फळ चांगले असेल तर जीवन हे सदोदित फुललेले असते. असे म्हणतात की, ‘जीवन हे देवाचे दान आहे आणि जीवनात आपण जे काही करतो, ते आपले देवासाठी दान असते.’ आपण जे देवासाठी करतो ते नेहमी चांगलेच असते. म्हणूनच मरणानंतर आपलं बलिदान व्यर्थ न जाता त्या मरणाला एक नवीन जीवनाची पालवी फुटली पाहिजे. माणसाचे मरण अटल आहे. मरणापासून वाचविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. कारण मरण हे मानवाच्या हातात नाही.
आज आपण येशू ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल विचार करीत आहोत. ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान हे त्याचे ‘मरण’ होते. परंतु येशूचे मरण हे ख्रिस्ती लोकांसाठी शोकांतिका राहत नाही, तर एका शाश्वत सुकांतीकेची सुरुवात ठरते. कारण प्रभू येशु ख्रिस्त, देवाचा पुत्र, मरणानंतर तिसऱ्या दिवशी, मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला. यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये पुनरुत्थान सणाला महत्व प्राप्त झाले आहे. आणि हेच आम्ही आज ह्या शुभरात्री, मोठ्या विश्वासाने प्रकट करतो. संपूर्ण उपवासकाळ आणि विशेषत: पवित्र आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच आज्ञा गुरुवार, उत्तम शुक्रवार आणि पवित्र शनिवार (पास्काची पूर्व संध्या) येशूच्या जीवनातील दु:खसहन, मरण आणि पुनरुत्थान या प्रमुख रहस्यावर प्रकाश झोत टाकून आपल्याला एक नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी आव्हान व प्रेरणा देतात.  
मानव जातीचे तारण करण्यासाठी प्रभू येशु या जगात आला आणि त्याच्या स्वर्गीय देवबापाची ओळख आपणास करून दिली. प्रभू येशु ख्रिस्ताने स्वत:च्या जीवनाद्वारे, आदर्श मानवी जीवन कसे जगावे याचा कित्ता आपल्याला दिला आहे. आणि हे त्याच्या त्यागी जीवनातून स्पष्ट होते. पुनरुत्थित नवजीवन प्राप्त करून घेण्यासाठी अथक परिश्रम, दु:ख, हालअपेष्टा, निंदा, अपमान यांसारख्या गोष्टीला येशूला सामोरे जावे लागले. ‘खरोखर आमच्या व्याधी व क्लेश त्याने आपल्या खांदी घेतले. खरे पाहता! तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हांस आरोग्य प्राप्त झाले’ (यशया ५३:४-५).
 संत नामदेव म्हणतात, -“निंदा स्तुती त्याला समान पै झाली! त्याची स्थिती आली समाधीला! माती आजी सोने ज्या बासे! तो एक निधान योगीराज!
ज्या येशूने आंधळ्यांना डोळस केले, मुक्यानं बोलकं केलं, पक्षघाताने आजारी असलेल्यांना चालतं केलं, कुष्ट रोग्यांना शुद्ध केले, मेलेल्यांना जिवंत केले, इतकच काय तर वादळालादेखील शांत केलं. पण एवढं चांगल कार्य करून सुद्धा येशूला मरणाची शिक्षा देण्यात आली. येशूच्या मरणाला कारणीभूत होते, ते म्हणजे येशूच्या काळातील मुख्य याजक, परुशी व शास्त्री; ज्यांनी नियमशास्त्राचा अभ्यास केला खरा परंतु ते त्याप्रमाणे वागले नाहीत. आपल्या सोयीनुसार त्यांनी त्याचा अर्थ लावला. येशु हाच देवाचा पुत्र आहे, ह्याचे आकलन ते करु शकले नाहीत. दुसरी गोष्ट त्यांना कळून चुकली होती की, येशुमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येणार. कारण तो लोकांना प्रवचन देत असे, सभास्थानात शिकवत असे व देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत असे. त्यामुळे जनसमुदाय येशूच्या मागे चालला होता. ह्याच कारणामुळे मुख्य याजक, परुशी व शास्त्री यांनी येशूचा नाश केला. परंतु येशू मरणातून उठला आणि आपल्याला नवजीवन दिले. म्हणूनच येशूचे बलिदान हे व्यर्थ बलिदान ठरू शकत नाही.
आज पर्यंत ह्या जगामध्ये अनेक राजे महाराजे, साधू-संत, महात्मे व महापुरुष होऊन गेले. परंतु फक्त प्रभू येशूने मरणावर विजय मिळविला. तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. मेलेल्यामधून ख्रिस्ताचे जिवंत उठणे या घटनेसारखी दुसरी अजब आणि महत्त्वाची घटना नाही. या विश्वाच्या उत्पत्तीपासून कधीच अशी घटना घडली नव्हती आणि घडणारही नाही. ख्रिस्त मेलेल्यातून उठला नसता, तर ख्रिस्ती धर्म अस्तित्वात आलाच नसता. ख्रिस्ती समाज किंवा लोकही नसते आणि मनुष्यांना तारणाची आशाही नसती. येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूने वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांना दर्शन दिले हे आपल्याला बायबल मध्ये वाचवयास मिळते. उदाहरणार्थ: मग्दालीया मरिया (मार्क १६:९), अम्माउस वाटेवर दोन शिष्य (मार्क १६: १२), संत पौल दिमिष्काच्या वाटेवर असताना (प्रे. कृत्ये ९:३-८).
संत पौल सांगतो, ‘येशु प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबुल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल (रोमकरास पत्र १०:९). मृताला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती येशुमध्ये आहे. नाईन गावातील विधवेच्या मुलाला येशूने जिवंत केले (लुक ७:११-१७). चार दिवस मृत अवस्थेत असलेल्या लाजरसला त्याने जिवंत केले (योहान ११:३८-४४). येशूने स्वत: मरणावर विजय मिळविला. म्हणून त्याच्या स्मरणार्थ आपणही मरणावर विजय मिळविणार असा विश्वास आज आपण सर्वांनी प्रकट करण्याची गरज आहे. येशूचे पुनरुत्थान ही जगाच्या इतिहासातील सर्वात महान घटना आहे. येशू देवाचा पुत्र आणि जगाचा उद्धारक आहे. हे त्याने मृत्यूतून पुनरुत्थित होऊन लोकांना पटवून दिले. त्याच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला आजही सार्वकालिक जीवनाची आशा आहे.
भयभीत झालेल्या स्त्रियांना दोन पुरुषांनी विचारले की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करिता ? तो येथे नाही, तर उठला आहे. मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे (लूक २४:५-७) असे येशूने आधीच भाकीत केले होते. ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत असून कार्यरत आहे. प्रभू येशूचे क्रुसावरचे मरण हे मानवजातीसाठी केलेले सर्वोच्च बलिदान होय. ह्यामुळे आपल्याला पापांची क्षमा व परमपित्याच्या समीप पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला. आम्ही ख्रिस्ती आहोत याचा आपल्याला गर्व आहे. आजकाल आपल्या कार्याद्वारे आपण विविधरीत्या, विविध क्षेत्रात येशूचे कार्य प्रकट करत आहोत. हे कार्य करत असताना आपल्याला हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. धार्मिक बंधू-भगिनी येशूच्या प्रेमापोटी आपले सर्वस्व पणाला लावून गरजवंताच्या मदतीला सावली सारखे धावून येतात. येशूची दया, प्रीती, करुणा ते त्यांना देतात. पण काहीवेळा कठीण परिस्थितीला मान खाली घालून व गुढघे जमिनीला टेकून आपल्याला जीवनाचे बलिदान द्यावे लागते. येशूचे क्रूसावरील शब्द, ‘बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना ठाऊक नाही’ हे प्रत्येक व्यक्तीला नवजीवन प्राप्त करून देत असते. संतपदावर पोहोचलेल्या पवित्र माणसांच्या जीवनातदेखील अनेक कष्ट आले होते. परंतु त्यांनी येशूचे राज्य प्रस्थापित करण्याची जिद्द कधीच सोडली नाही.
येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती महामंडळाचा आधारस्तंभ असून सुवार्ता कार्याची गुरुकिल्ली आहे. ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. याच पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख सर्वत्र पसरविण्यासाठी, आज देऊळमाता आपणा सर्वांना प्रेरणामय आव्हान करत आहे. ह्या दयेच्या वर्षी, पुनरुत्थित येशूची शांती, करुणा व दया हाती घेऊन आपण सर्वांनी पुन्हा एकदा येशूचे कार्य नव्या जोमाने सुरु करण्याची गरज आहे. यामुळे आपल्या जीवनाला नव्या जीवनाची पालवी फुटून, जीवन अर्थपूर्ण होईल आणि आपले बलिदान व्यर्थ न जाता ते पुनरुत्थित येशूच्या सुखाने, आनंदाने व प्रेरणेने भरून जाईल.
‘मी कुठेही कसा ही असो, पुनरुत्थित ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो.’ 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभो आंम्हास कृपेचे नवजीवन दे.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मबंधूभगिनींना पुनरुत्थित प्रभूचा आनंद व आशा त्यांच्या प्रेषितीय कार्यात सतत मिळावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. आपला ख्रिस्ती समुह पापांच्या दरीतून मुक्त होऊन, परस्पर प्रेम व सौख्यभावनेने प्रफुल्लीत होत रहावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. आज ज्यांनी नव्याने स्नानसंस्कार स्वीकारला आहे अशांनी प्रभूठायी विश्वासू राहून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. ज्या लोकांना ख्रिस्ताची अजूनही ओळख पटलेली नाही अशांना प्रभूच्या प्रेमाची ओळख त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण सर्वांनी विश्वासात घेतलेला पुनरुत्थित प्रभूचा अनुभव सर्वकाळ आपल्या मनी बाळगून त्याच्या सार्वकालिक जीवनात सहभागी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करुया.