Friday 30 September 2016



Reflection for the Homily of Feast of St. Francis of Assisi (04-10-2016) By Fr. Bemjamin Alphonso



संत फ्रान्सिस असिसिकर

दिनांक : ०४/१०/२०१६
पहिले वाचन : बेनसिरा - ५० : १,३-४,६-७
दुसरे वाचन : गलतीकरास पत्र – ६ : १४-१८
शुभवर्तमान : मत्तय – ११ : २५-३०



 "तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन."





प्रस्तावना


आज आपण निसर्गप्रेमी, पर्यावरणाचा आश्रयदाता संत फ्रान्सीस असिसिकर ह्या महान संताचा सण साजरा करत आहोत. पोप फ्रान्सिस ह्यांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय असाधारण दयेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. तर फ्रान्सिस असिसिकर ह्यांनी आपल्या पवित्र जीवनाद्वारे जगाला दाखवून दिले आहे की आपण प्रत्येक जण दयेचे, शांतीचे, प्रेमाचे उदाहरण जगामध्ये बनू शकतो. देवाचं दुसरे नाव दया आहे. ही दया संत फ्रान्सिसने दाखवलेल्या मार्गाद्वारे आपण जगामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनाद्वारे दया प्रदर्शित करतो का? ह्यावर आपण मनन चिंतन करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन - बेनसिरा - ५० : १,३-४,६-७

पहिले वाचन हे बेनसिरा ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. महापुरोहित सियोन ह्याने मंदिर दुरुस्त करून शहराची मजबुती केली व लोकांना नाशापासून रक्षण करायची दक्षता घेतली.

दुसरे वाचन : गलतीकरास पत्र – ६ : १४-१८

दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतात की आपण सर्वांनी प्रभूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगला पाहिजे. आपण आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण केल्या पाहिजे आणि आपल्याला प्रभूची कृपा मिळत जाईल.

शुभवर्तमान : मत्तय – ११ : २५-३०

 शुभवर्तमानात आपण ऐकतो की, देवाने गुप्त गोष्टी बालकास आणि नम्र लोकांस प्रकट केल्या आहेत आणि विद्वान व विचारवंत लोकांपासून दूर लपवून ठेवल्या आहेत. जो कोणी ख्रिस्ताद्वारे पित्याकडे जातो, तो योग्य वाटेने जातो. पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही. आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रगट करायचं इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. तसेच सौम्य व लीन मनाच्या लोकांना प्रभू त्यांच्या कडे बोलावत आहे.
ख्रिस्त पित्याची दया लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जगात आला होता. पोप फ्रान्सिस म्हणतात देवाचे नाव दया आहे आणि देवाचा पहिला आणि महत्वाचा गुण दया हाच आहे. स्तोत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला दयेविषयी अनेक स्तोत्रे ऐकायला मिळतात. नवा करार आणि ख्रिस्त दयेचा चेहरा आहे. म्हणून प्रभूयेशुच्या प्रत्येक कार्यात आणि प्रवचनात दयेचा फार मोठ्या प्रमाणात उल्लेख आढळतो. पवित्र देऊळमाता ही दया सर्वांपर्यंत पोहचवण्यास प्रयत्न करते. ख्रिस्ताने महारोग्याला व आजाऱ्याना बरे केले व ख्रिस्ताने सर्वाना शत्रुनां मारेकऱ्यांना क्षमा केली. हा सुद्धा दैवी दयेचा एक मोठा भाग आहे.

मनन चिंतन

एकदा एक तरुण झेन गुरूकडे आला. त्याला मठबंधू व्हायचे होते. त्याने गुरुजीना म्हटले मी जीवनात काही महत्वाचे शिकलो नाही परंतु माझ्या वडिलांनी मला सतरंज (Chess) खेळण्यास शिकवले आहे परंतु ज्ञानी होण्यासाठी त्याचा वापर होईल असे मला वाटत नाही. गुरुनी एक सतरंज त्याच्या समोर आणला व एका मठबंधूला त्या ठिकाणी बोलावले आणि त्याबरोबर सतरंज खेळण्यास सांगितले आणि अशी आज्ञा केली की, जो हरेल त्याला मरण स्विकारावे लागेल. त्या तरुण माणसाला कळले की ही जीवन आणि मरणाची गोष्ट आहे. त्याला सतरंजच्या सर्व कला माहिती होत्या आणि त्याला कळले की समोरचा माठबंधू हरणार व त्याला त्याचे जीवन गमवावे लागणार आणि त्याला त्याची दया आली. त्याला कळले की समोरचा मठवासी पवित्र आहे आणि जगाला त्याची जास्त गरज आहे आणि म्हणून तो चुकीच्या हालचाली करू लागला. गुरुजीने सतरंजचा ताबा घेतला आणि त्या युवकाला म्हटला तू जीवनात महत्वाच्या गोष्टी शिकला आहेस. कारण तू दयाळू आहेस. जीवनात तुला सिद्धी प्राप्त होईल.
आपला धर्म दयेचा / प्रेमाचा धर्म आहे. संत फ्रान्सिस असिसि ख्रिस्तापासून हेच नक्की शिकला. परिवर्तना अगोदर संत फ्रान्सिस महारोग्यापासून दूर पळत असे तोच संत फ्रान्सिस परिवर्तनानंतर महारोग्याबरोबर राहू लागला. त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात प्रेम व दया होती. एकदा संत फ्रान्सिस घरात नसताना काही चोर घरात आले. इतर बंधूनी त्याना हाकलून लावले. परंतु संत फ्रान्सिसला जेव्हा ही गोष्ट समझली तेव्हा त्याने त्या बांधून पाठवून चोरनां बोलावून आणायला सांगितले. व ते चोर आल्यावर संत फ्रान्सिस ने त्यांच्याकडून क्षमा मागितली व नंतर त्यांना जेवण दिले.
संत फ्रान्सिसचे पर्यावरणावर प्रेम होते. त्याची तो काळजी घ्यायचा कारण
पर्यावरणामध्ये देवाची दया त्याला साकारलेली दिसायची. संत फ्रान्सिस मनाने लीन, नम्र व दयाळू होता म्हणून ख्रिस्ताने त्याला आपल्या पाच घायचे वरदान दिले. आपण सुद्धा आज ह्या महान संताचा सण साजरा करत असताना आपल्यासाठी प्रार्थना करूया की आपण सुद्धा नम्र, व दयाळू व्हावे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद :  हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१.     आपण आपले पोप फ्रान्सिस, महागुरू व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांच्यासाठी खास प्रार्थना करूया की संत फ्रान्सिस प्रमाणे ते दयेचे व शांतीचे साधन बनावेत.
२.     आपण सर्व तरुणासाठी जे मार्ग चुकले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करूया. संत फ्रान्सिस असिसिकरचे उदाहरण त्यांनी जीवनात पाळावे व त्यांनी जीवनात योग्य मार्ग निवडावा.
३.     आपण जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की संत फ्रान्सिसच्या विनंतीद्वारे ते बरे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.
४.     आपण सर्व मिशनरी व जगाच्या दुर्गम भागात येशूची सुवार्ता पसरविणाऱ्या सर्व बंधू आणि भागीनिसाठी प्रार्थना करूया की त्यांना नेहमी देवाची कृपा, प्रेम व दयेचा साथ मिळावा व योग्य कार्य करण्यास शक्ती मिळावी.




Tuesday 27 September 2016

                                                
Reflection for the Homily of 27th Sunday in Ordinary Time (02-10-2016) By Brandon Noon



सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार


दिनांक - ०२/१०/२०१६
पहिले वाचन - हबक्कूक १:२-३;२:३-४
दुसरे वाचन - २तिमथि १:६-८; १३-१४
शुभवर्तमान - लूक १७:५ -१०



विश्वासाचे सामर्थ्य



प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. ‘विश्वास’ हा आजच्या उपासनेचा मुख्य विषय आहे. विश्वास म्हणजे केवळ भक्ती नाही तर प्रेम आणि मानवसेवा हि त्या विश्वासाची अविभाज्य घटक आहेत. विश्वास हा मानव व देव ह्यामधे घनिष्ट नात जोडतो आणि आजची तिन्हीही वाचने आपल्याला मानव व देव ह्यामधील नातं कशी टिकवायला हवी ह्याविषयी सांगत आहे. म्हणून आजच्या ह्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना प्रभूकडे शिष्यासारखी विनवणी करूया कि, ‘प्रभू आमचा विश्वास वाढव.’

सम्यक विवरण

पहिले वाचन (हबक्कूक १:२-३;२:३-४)

बहुतेक संदेष्ट्यानी देवाचे संदेश लोकांपर्यंत पोहचविले आहेत पण हबक्कूकने मात्र खुद्द देवालाच दोन प्रश्न विचारले आहेत : १. हे परमेश्वरा मी किती वेळा ओरडू? २. मला आधार पहावयास का लावितोस किंवा विपत्ती मला का दाखवतोस?
संदेष्ट्यांचा काळ हा इस्रायलच्या इतिहासात महत्वाचा होता. समुद्राच्या लाटांनी किनारा धुऊन काढावा तसे हे संदेष्टे समाज धुऊन काढीत होते. लोकांना कराराची आठवण करून देणे आणि हृदयातून परमेश्वराचे नाते जोडणे ह्याकडे त्यांचे लक्ष होते.
आजच्या पहिल्या वाचनात आपण बघतो कि,  हबक्कूक गोंधळला होता परंतु, देवाने प्रामाणिकपणे त्याला प्रतिसाद दिला आहे. ह्यावरून दिसून येते कि देव प्रामाणिक प्रश्न विचारात घेतो. देवाने दिलेले उत्तर फक्त हबक्कूकच्या समाधानासाठी नाही तर बाबेलकडून क्लेश भोगणाऱ्या सर्वासाठी आहे. म्हणून परमेश्वर सांगतो, घाबरू नकोस व अंतिम सुटकेचा शुभसंदेश स्पष्टपणे ठळक अक्षरात लिहून काढ जेणेकरून येणाऱ्याला व जाणाऱ्याला स्पष्ट दिसेल. तसेच हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच कारण धार्मिक मनुष्य आपल्या विश्वासानेच वाचेल.

दुसरे वाचन (२तिमथि १:६-८; १३-१४)

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो कि, “विझणारे निखारे पुन्हा वारा घालून पेटव” येथे संत पौल तीमाथीला उत्तेजन व धैर्य देतो जेणेकरून त्याला मिळालेल्या कृपादानाचा पूर्णपणे उपयोग देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी करील. हे कृपादान पवित्र आत्म्याशी निगडीत आहे परंतु याला चैतन्य येण्यासाठी मानवी सहकार्य आवश्यक आहे. तीमथी हा लाजरा बुजरा होता हे स्पष्ट दिसते परंतु पवित्र आत्मा तर सामर्थ्य, प्रीती व संयम देणारा आहे. म्हणून संत पौल आवर्जुन सांगत आहे कि, ख्रिस्तसभेने आपला विश्वास गमवू नये. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे म्हणून येशुख्रिस्ताठायी असलेला विश्वास व प्रीती दृढ ठेवण्यास तो आपणास आव्हान करतो आणि आत्माचा सत्याचा खरा रक्षक आहे.

शुभवर्तमान (लूक १७:५ -१०)

प्रभू येशुख्रिस्त हाच आपल्या समस्या सोडवू शकतो म्हणून त्याच्यावरती विश्वास वाढावा हाच संदेश संत लुक लोकांना सांगतो कि येशु ख्रिस्त हा विश्वासाचा गुरु आहे व जर आपण संपूर्ण मनाने त्याच्या वर विश्वास ठेवला तर आपण कधीच अंधारात चालणार नाही किंवा पडणार नाही.
अल्प-स्वल्प विश्वासानेही मोठमोठी कार्य साध्य होत नाहीत म्हणून शिष्य म्हणतात “आमचा विश्वास वाढवा.” आपले कर्तव्य, नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा, नोकरांना ठरलेल्या वेतनापेक्षा अधिकाची अपेक्षा करण्याचा कोणताही हक्क नाही. ‘प्रौढी’ मिरवण्यास त्यांना काहीच आधार नाही या अर्थाने ते निरुपयोगी आहेत आणि स्वतः आपल्या शिष्याची सेवा करून प्रत्यक्ष येशूख्रिस्ताने उदाहरण दिले आहे. (योहान १३:१-१६; लूक १२:३५-३८; २२-२७)
येशूख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याची तुलना विश्वासाबरोबर केली आहे. माणसाचा विश्वास जर मोहरीच्या दाण्या एवढा उत्तम दर्जेचा असेल तर त्याची कामगिरी भक्कम राहील. ख्रिस्ताने प्रेषिताच्या विनंतीला मोठ्या विश्वासाने आश्वासन दिले नाही, कारण विश्वासाची विपुलता महत्वाची नसून त्याचा दर्जा महत्वाचा आहे. ह्यावरून असे स्पष्ट होते कि, आपण सेवेच्या मोबदल्यात विचार न करता आपण सेवा करणारे दास बनलो पाहिजेत. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात दासाविषयीचा दाखलाही दिलेला आहे.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजची उपासना आपल्याला आपल्या स्वतःच्या विश्वासावर मननचिंतन करण्यास आमंत्रण करीत आहे.
एकदा एक माणूस उंच डोंगरावर चढत असतो. तेव्हा त्याचा पाय घसरून तोल जातो आणि तो खाली पडत असताना नशिबाने त्याच्या हातात झाडाची फांदी लागते व तो त्या फांदीला लटकतो. तेथे लटकलेला असताना तो मनात विचार करतो कि मी जर हात सोडला तर खाली पडेन. म्हणून तो वर आकाशात पाहून ओरडतो, “कोणी आहे का वर?” “मला कोणी वाचवेल का?” तेव्हा अचानक देवाचा आवाज त्यास म्हणतो, “मी तुझा परमेश्वर आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे का? मग तो व्यक्ती उत्तरतो, “होय, माझा खूप विश्वास आहे.” मग परमेश्वर म्हणतो, “जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तू ती फांदी सोड, मग मी तुला खालती झेलून वाचवीन.” मग तो मनुष्य पुन्हा विचार करतो आणि ओरडतो, “आणखी येथी कोणी मला वाचवण्यास आहे का?”
माझ्या प्रिय भाविकानो हा माणूस विश्वासू नव्हता का? तो विश्वासु आणि श्रद्धाळू होता. तो देवाच्या अस्तित्वावरही विश्वास ठेवत होता. त्याचा प्रार्थनेच्या शक्तीवर विश्वास होता. परंतु जर त्याचा एवढा विश्वास होता मग त्याने देवाच्या शब्दावर का नाही विश्वास ठेवला? त्याने ती झाडाची फांदी का नाही सोडली?
कदाचित आपण ह्या व्यक्तीवर हसत असू, पण आपणही ह्या व्यक्तीसमानच आहोत. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो परंतु जेव्हा जीवनात संकटे, दुःखे आणि समस्या येतात तेव्हा आपला देवावरील विश्वास डळमळून जातो. आपल्याला ठाऊक आहे कि येशूचे शिष्य हि त्यांच्या विश्वासात गडबडले होते. त्यांचा विश्वास इतका दृढ नव्हता. त्यांनी ख्रिस्ताचा पाठलाग केला व त्याच्यावर विश्वास ठेवला परंतु गेथसेमनी बागेत शिपायांना बघून ते येशूला सोडून पळून गेले.
शिष्यांचा विश्वास इतका दृढ नव्हता म्हणून आजच्या शुभवर्तमानात ते प्रभूला म्हणतात, “प्रभू आमचा विश्वास वाढव.” शिष्यांना माहित होते कि त्यांचा विश्वास पुरेसा नाही म्हणून त्यांनी प्रभूकडे विनवणी केली. आपण कधी आपला विश्वास वाढवा म्हणून विनवणी केली आहे का? आपण प्रत्येक रविवारी मिस्साला जातो, धार्मिक पुस्तके वाचतो, विविध तप-साधना करतो, परंतु आपल्या विश्वासात वाढ झाली आहे का?
‘प्रभू आमचा विश्वास वाढवा’ या प्रश्नाचे उत्तर येशुख्रिस्त एका दाखल्याने देतो. कोणी एक निरर्थक दास होता तो शेतात काम करून घरी जातो व सरळ स्वयंपाकघरात जातो व आपल्या मालकाला जें बनवतो व जोपर्यंत मालक जेवत नाही तोपर्यंत दास खात नाही. या दाखल्याद्वारे येशुख्रिस्त आपणाला संदेश देतो कि, जर आपला दृढ विश्वास असेल तर आपण पहिली देवाशी जी इच्छा आहे ती पूर्ण करु. देवाची कार्य करण्यास आपण कुरकुर करणार नाही व त्यासाठी जास्त वेळ देण्यास तयार असू.
आपला विश्वास फक्त आपल्या स्वार्थासाठी व आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी नव्हे तर देवाच्या कार्यासाठी किंवा त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी हवा. तसेच आपण आपला विश्वास वाढवण्यासाठी परमेश्वराकडे शिष्याप्रमाणे विनवणी करूया कि, “हे प्रभू आमचा विश्वास वाढव.” तसेच आपण आपला विश्वास बळकट होण्यासाठी रोज प्रार्थना केली पाहिजे. येशुख्रिस्त आपल्या दैनंदिन जीवनात हजर आहे ह्याची आपणास जाणीव व्हायला हवी. जेव्हा आपण जीवनात सुखी, समाधानी व आनंदी असतो तेव्हा आपण देवाला विसरत असतो. आपणामधील खूप जण चांगले आरोग्य, नोकरी व जीवन मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानत असतात.
आपण फक्त अडचणीत किंवा समस्यावेळीच देवाकडे धाव घेत असतो. जेव्हा येशूचे शिष्य बोटीत होते तेव्हा ते किती मासे भेटले आहेत ह्याविषयी बोलत होते, परंतु येशुख्रिस्त त्यांच्या बरोबर आहे ह्याची त्यांना जाणीव नव्हती. परंतु जेव्हा वादळ येते तेव्हा ते येशूला उठवतात (मार्क ५:३७). आपणही जीवनात तसेच करतो जर आपण येशुख्रीस्ताला पहिले स्थान दिले तर आपल्याला दुःखांना व संकटाना सामोरे जायला अवघड वाटणार नाही. पहिल्या वाचनात आपण ऐकले आहे कि, संदेष्टा हबक्कूकला वाटत आहे कि देव त्याचे ऐकत नाही परंतु जेव्हा आपण प्रामाणिक असतो तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकत असतो.
ज्याप्रमाणे संदेष्टा हबक्कूक व शिष्यांचा विश्वास दृढ झाला त्याप्रमाणे आपणही आपला विश्वास बळकट व्हावा व ख्रिस्ताला जीवनात प्रथम स्थान देऊन हा ख्रिस्त अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहचवावा म्हणून आपण देवाकडे कृपा मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू आमचा विश्वास वाढव.


१.      ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.
२.      कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.      आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.      आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारी, दुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५.      आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

Wednesday 21 September 2016



Reflection for the Homily of 26th Sunday in Ordinary Time (25-09-2016) By Glen Fernandes




सामान्य काळातील सव्विसावा रविवार

दिनांक: २५/०९/२०१६.
पहिले वाचन: आमोस ६:१,४-७.
दुसरे वाचन: तीमथी ६:११-१६.
शुभवर्तमान: लूक : १६ : १९ – ३१.





“देवदुताने त्याला आब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले”

 

प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. जिथे न्याय, प्रीती, निती, व बंधुप्रेम आहे तिथे परमेश्वराची शांती नांदेल असा संदेश आपल्याला आज ख्रिस्तसभा देत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा आमोस समाजात गरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवितो आणिश्रीमंतांची त्याबद्दल कानउघडणी करतो.दुसऱ्या वाचनात संत पौल आपला शिष्य तिमथी ह्यास सद्बोध करीत आहे कि,आपण प्रभू येशु पुन्हा येईपर्यंत निष्कलंक व निर्दोष रहावे. आजच्या शुभवर्तमानात आपणास श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर ह्यांचा दाखला ऐकावयासमिळतो.
माणसाला विनाशाकडे नेण्याची क्षमता धनात आहे, म्हणून आपण सुज्ञतेने आपल्याला मिळालेल्या देणग्यांचा, धनाचा, कलांचा गरजुसाठी वापर केला, तर आपल्याला स्वर्गात अविनाशी धन (स्वर्ग) व वारसा प्राप्त होईल. त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन: आमोस ६:१,४-७.

इ.स.पूर्व आठव्या शतकात आमोससंदेष्ट्याने समाजातील अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. श्रीमंत, विलासी व ढोंगी लोकांची दुर्दशा होण्याचे भाकीत आमोसनेकेले.इस्रायली समाज जसजसा संपन्न होत गेला तसतशी श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यातील दरी रुंदावत गेली. गरिबांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊ लागले. श्रीमंत गरिबांच्या जमीनी लुटू लागले. सावकारीने कळस गाठला. पायातील पायतनाच्या मोलाने गरिबांची विक्री होऊ लागली. त्यामुळे संदेष्टा आमोस ह्याने श्रीमंतांवर आसूड उगवला भ्रष्टाचाराला प्रोत्साहान देणाऱ्या आळशी बायकांना धारेवर धरण्यास त्याने सोडले नाही.
      संदेष्ट्याने देवाच्या नावाने हा संदेश दिला आहे हि बाब ध्यानात घेतली पाहिजे देवाला गरिबांवर केलेला अन्याय मुळीच खपत नाही हेच ह्यावरून अधोरेखित केले गेले आहे. त्यांनी देवाच्या नावाने धनावानांविरुद्ध आघाडी उभारली. दुर्बल घटकांचे शोषण होत असल्यामुळे परमेश्वराचा देशावर कोप होईल. परचक्राचेसंकट ओढवेल असा इशारा संदेष्ट्याने दिला.
      हिब्रू धर्माने दुर्बल घटकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. परके, पोरके आणि विधवा ह्यांचे शोषण केले जाऊ नये असा दंडक धर्माने घातला. परमेश्वराने संदेष्ट्याद्वारे अन्याय करणाऱ्या धनावानांनी तंबी दिली कि, तुम्ही गोरगरीबांना छळले आणि त्यांनी माझ्याकडे तक्रार केली, तर मी त्यांना न्याय मिळवून देईन व तुम्हाला कठोर शासन करीन. स्वत: देव गोरगरिबांचा रक्षणकर्ता म्हणून उभा राहिला.

दुसरे वाचन: तीमथी ६:११-१६.

संत पौल तीमथीस आपले आचरण कसे असावे ह्याबद्दल मार्गदर्शन करत आहे. आपले पत्र लिहून झाल्यावर संत पौल शेवटचा मजकूर लिहिताना तीमथीस नितीमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लागण्याचे आवाहन करत आहे. विश्वासासंबंधीचे जे सुयुक्त ते कर, युगानुयूगाच्या जीवनाला बळकट धर अशी लाखमोलाची शिकवणूक संत पौल तीमथीस देत आहे. आध्यात्मिक जीवनातील जडणघडण करत असताना संत पौलाची आपल्या शिष्यांसंबंधीची तळमळ हि वाखाणण्यासारखी आहे. पौल क्रांतिकारक समाजसुधारक नव्हता तर आध्यात्मिक मार्गदर्शक होता.तीमथीला अधिकाराचे व जबाबदारीचे ओझे जाणवत होते. अनेक संकटाना सामोरे जात असताना पौल त्याला देवावर श्रद्धा ठेवून हिंमत बाळगण्याचा संदेश देत आहे.


शुभवर्तमान: लूक : १६ : १९ – ३१.

श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजरस ह्यांचा दाखला आज प्रभू येशु आपणासमोर ठेवत आहे. ह्या दाखल्याद्वारे भोजनाच्या निमित्ताने येशूने आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनासंबंधी महत्वाचे भाष्य केले. येशूला उपेक्षितांबद्द्ल विशेष महत्व होते. दरिद्री व्यक्तीस ‘लाजरस’ हे नाव तो स्पष्टपणे सांगतो परंतु श्रीमंत माणसाचे नावही तो घेत नाही. समाजात श्रीमंत व कंगाल यांच्यात भेदभाव केला जातो, हि गोष्ट त्याला आवडली नाही. म्हणून त्याने समतेचा आग्रह धरला.
श्रीमंती हा देवाचा आशीर्वाद असून दारिद्र्य हा शाप आहे अशी इस्रायली लोकांची धारणा होती. येशूने श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजरस ह्यांचा दृष्टांत सांगून सुखवस्तू, असंवेदनशील आणि चंगळवादी धनवानांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. ‘लाजर’ या शब्दाचा अर्थ ‘देव मदत करतो’ (God is my help) असा आहे. श्रीमंत लोक आपल्या महालात एैशआरामात विलासी जीवन जगत होते. समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांच्या मनात कळवळा नव्हता. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा संत लूकने दिला आहे.
उपेक्षित, पिडीत, कंगाल, आंधळे-पांगळे यांना सामाजिक जीवनात स्थान नव्हते. त्यांची जागा तळागाळात होती. हेच लोक येशूचे आणि देवाचे लाडके होते. स्वर्गात ते आब्राहम आणि मोशे ह्यांच्या पंगतीत ते असतील असे भाकीत संत लूक करत आहे.

बोधकथा:

१. एकदा एक मनुष्य रस्त्याने जात असता त्याने अनेक लुळे, पांगळे, लोक रस्त्याच्या कडेला बसलेले पहिले. समाजातील गरिबी व असमानता पाहून तो मनुष्य अस्वस्थ झाला. मंदिरात येऊन त्याने देवाला प्रश्न केला की, ‘हे देवा तू दयाळू, ममताळू, व कनवाळू आहेस ही समाजातील स्थिती तू कशी पाहू शकतोस. काहीतरी करावे असे तुला नाही का वाटत’? त्यावर देव उत्तरला, ‘मी तुला निर्माण केले आहे.’
बोध: आपल्याला मिळालेली श्रीमंती, धनदौलत, देणगी, कलागुण हे आपल्यासाठी नसून त्याचा वापर इतरांसाठी व समाजाच्या उद्धारासाठी कसा होईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे.
२. एकदा एक मनुष्य त्याच्या गुरूकडे धावत आला व म्हणाला गुरुजी, ‘मला स्वप्नात देवाने सांगितले की, तुमच्याकडे मौल्यवान खडा आहे व मला तो हवा आहे’. गुरूने झोळीतील हिरा बाहेर काढला. गुरूने स्मित हास्य करून तो खडा त्यास दिला. काही वेळ झाल्यावर तो व्यक्ती पुन्हा धावत आला व गुरूस म्हणाला ‘गुरुजी हा खडा तुम्ही घ्या; परंतु मला ती श्रीमंती द्या, ज्यामुळे तुम्ही हा हिरा मला देऊन स्मित हास्य केले’.
बोध: माझ्यासाठी श्रीमंती म्हणजे काय आहे? पैसा, धन, मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक जीवन, परमेश्वर? माणसाने सारे जग कमावले, परंतु स्वत:चा आत्मा गमावला तर त्यास काय लाभ?

मनन चिंतन:

पूर्वी देवाचे राज्य ही तथाकथित धार्मिकांची आणि धनवानांची मिरासदारी होती. येशूने देवराज्याचे दरवाजे गरिबांसाठी खुले केले. त्यांना त्या राज्याचे सन्मान्य नागरिकत्व बहाल केले.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, दरिद्री लाजरस मेला आणि देवदुतांनी त्याला आब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व तो अधोलोकात यातना भोगत होता. श्रीमंत व्यक्तीने लाजरसासाठी काहीही चांगले कृत्य केले नाही तसेच काही वाईटही केले नाही तरीही त्याला नरकात जावे लागले. खरे तर श्रीमंत माणसाने काहीही केलं नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, पिळवणूक गरिबांची दुर्दशा ह्याविषयी काहीही न करणे सुद्धा पाप आहे अशी शिकवणूक संत लुक देत आहे.
      समाजात श्रीमंतांचा वर्ग वाढू लागल्यावर गोरगरीबांची परिस्थिती गंभीर होत जाते. अर्थशास्राच्या नियमाप्रमाणे धन झिरपत दुर्बल घटकापर्यंत गेले पाहिजे. परंतु मानवी चेहरा नसलेल्या भांडवलशाही आणि एकतंत्री राजेशाहीत तसे काही घडत नाही. त्या धनाची डबकी बनत जातात. भारतात एका बाजूला अब्जाधीशांची संख्या वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फुगत आहे. गतकालात व आजही धर्माने धनवानांच्या हितसंबंधाचे रक्षण केले आहे. आणि धनवानांनी धर्मसंस्थाना भरपूर देणग्या देऊन आपले आश्रित केले आहे.येशुभोवती सामान्य लोकांचा नेहमी गराडा असे. त्यांच्यामध्ये बसून त्याने त्यांना प्रवचने दिली. समानतेच्या भूमिकेवरून त्याने त्यांच्याशी संवाद साधला. राजाच्या राजवाड्यात किंवा मंदिरात दुर्बलांना प्रवेश नव्हता ते प्रतिष्ठेच्या वर्तुळाबाहेर फेकले गेले होते; त्यांना येशूने कवेत घेतले.
      देवाच्या राज्यात बसण्याचा पहिला अधिकार आपलाच आहे असे श्रीमंतांनी व धार्मिक पुढाऱ्यांनी ग्राह्यधरले होते. येशूने त्यांचा नामनिर्देशही केला नाही. उलट गोरगरिबांच्या बाजूने दिला. येशूने देवाच्या राज्यात गरिबांना सामावून घेतले परंतु श्रीमंतांना वगळले नाही. मात्र श्रीमंतांच्या डोक्यावर धनदौलतीचे अवजड पेटारे असतात, धनामुळे त्यांच्यात एक आत्मसंतुष्टीपणा येतो. पैशांच्या बळावर ते न्याय विकत घेऊ शकतात. माणसांचा सौदा करू शकतात अनीती पचवू शकतात. आपण पैसा फेकून सर्वकाही करू शकतो आणि प्रसंगी देवालाही वेठीस धरू शकतो असा फसवा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. त्यामुळे देवाच्या राज्यात धनवानांना प्रवेश करणे कठीण आहे असा गंभीर इशारा येशूने दिला आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु , महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थांनी आपल्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व राजकीय नेत्यांनी प्रभू येशु ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जेथे दहशतवाद, आतंकवाद व ताणतणाव निर्माण झाले आहेत अशा ठिकाणी परमेश्वराने त्याची शांती निर्माण करावी व राष्ट्रांमध्ये समेट घडवून आणण्यास ज्या संघटना कार्यरत आहेत त्यांच्या कार्याला यश प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे कोणी देवापासून दूर गेले आहेत त्यांनी मागे वळून परत एकदा येशुला आपला राजा म्हणून स्वीकारावे व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या लहान मुलामुलींनी ख्रिस्ताला स्वीकारून ख्रिस्ती जीवनाच्या मुल्यांवर त्यांनी जीवन जगावे व तोच ख्रिस्त इतरांच्या जीवनात आणण्यास सदैव मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक कौटुंबिकहेतूंसाठी प्रार्थना करूया.



Tuesday 13 September 2016


Reflection for the Homily of 25th Sunday in Ordinary Time (18-09-2016) By Baritan Nigrel.





सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक: १८/०९/२०१६. 
पहिले वाचन: आमोस ८:४-७.  
दुसरे वाचन: १तीमथी २:१-८.
शुभवर्तमान: लूक १६:१-१३.







कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही







प्रस्तावना:

प्रभू येशू ख्रिस्त दयेचा, प्रेमाचा, चांगुलपणाचा आणि कृपेचा महासागर आहे. आपणास खरा आनंद त्याच्यामध्येच मिळत असतो म्हणून आजची उपासना आपणास देवाच्या प्रेमाचा व सेवेचा मार्ग निवडण्यास आमंत्रित करीत आहे.
आजच्या शुभवर्तमानात, प्रभू येशू ख्रिस्त अन्यायी कारभाऱ्याविषयी दृष्टांत सांगत असताना, माणसाने देवाचीच सेवा करावी कारण देवाची व धनाची अशी द्विधा सेवा आपण करू शकत नाही, असा संदेश प्रभू आज आपणास देत आहे.
परमेश्वर पिता आपला धनी आहे व आपण त्याचे कारभारी आहोत. आपला पिता उदार आहे, तो आपल्याला सढळ हाताने जे हवे असते, ते देत असतो. आजच्या या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करू या की, आपणही परमेश्वरासारखे उदार बनावे व सढळ हाताने इतरांना मदत करावी, तसेच आपण सर्वांनी देवाच्या प्रेमाचा, दयेचा व सेवेचा मार्ग निवडून देवाची सेवा-चाकरी करावी म्हणून देवाची कृपा व शक्ती मागूया.

पहिले वाचन: आमोस ८:४-७.

पहिल्या वाचनात आमोस लोकांना सांगत आहे की, पापी लोकांचा ‘अंतसमय’ जवळ आला आहे. त्यांची वेळ भरली आहे. ह्या शेवटच्या दिवसाचा उल्लेख आमोसने अगदी थोडक्या, कठोर, मर्मभेदक शब्दांनी वर्णिला आहे. उदा. लाभाच्या लोभाने त्यांनी व्यापारातील प्रामाणिकपणाला केव्हाच सोडचिठ्ठी दिली होती (५), जास्त पैसा घेऊन कमी विकणे, मापात हातचलाखी करून नफा वाढवणे हेच त्यांचे ध्येय होते. मानवता, दुसऱ्यांविषयी कळवळा हे सर्वच त्यांना परके व पारखे होते. म्हणून आमोस त्यांना सांगत आहे की, त्यांच्या या पापी वृत्तीमुळे त्यांचा ‘अंतसमय’ जवळ आला आहे आणि देव त्यांचा दिव्य न्याय करील.
सहाव्या ओवीमध्ये आमोस – ‘रूपे देऊन’, ‘जोडा देऊन’ व ‘भूस विकून’ असे तीन शब्द वापरतो. याचा अर्थ – ‘रूपे देऊन’ म्हणजे बहुधा गरिबाला दिलेले कर्ज आणि ‘जोडा’ म्हणजे त्याने उधारीवर घेतलेल्या वस्तू. हे सर्व देण्यामध्ये सावकाराच्या मनात एकच हेतू असतो की, हा माणूस कर्ज फेडू शकणार नाही. त्याची उधारी वसूल होणार नाही, मग त्याला दास करून घेऊ (२राजे ४:१). तसेच ‘भूस विकून टाकू’ म्हणजेच नाकारलेल्या वाईट-साईट मातीमोलाच्या वस्तू विकून नफा मिळवायचा असा त्याचा अर्थ होतो.

दुसरे वाचन: १तीमथी २:१-८

पौलाने इथे ‘सार्वजनिक प्रार्थना’ यावर विशेष भर दिला आहे. ‘सर्वांसाठी प्रार्थना’ यावर पौलाचा कटाक्ष आहे आणि अधिकार चालवणाऱ्यांकडे त्याने विशेष लक्ष दिले आहे. १ तीमथीच्या अध्याय २ च्या संदर्भात सांगायचे तर वंश, जात, कुळ, दर्जा अगर परिस्थिती हे काहीही असले तरी देवाची करुणा सर्वांना सारखीच आहे यावर पौलाला येथे भर द्यायचा आहे असे लक्षात येते. कारण ओवी ४ आपल्याला सांगते की, ‘देवाची इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे म्हणून देवाचा पुत्र येशू ख्रिस्त देवाची करुणा आपल्यामध्ये घेऊन आला’ - म्हणून संत पौल सांगतो – ‘येशू ख्रिस्त हा देव व मानव ह्यांमधील एकच दुवा बनला’.

शुभवर्तमान: लूक १६:१-१३

हा ‘अन्यायी कारभाऱ्याचा दाखला’ प्रभू येशूने तेथे जमलेल्या धनलोभी परुश्यांना सांगितला (१४). एका श्रीमंत माणसाने आपल्या जमीन जुमल्याची व्यवस्था पाहण्यास आणि हिशोब ठेवण्यास एक कारभारी नेमला होता. पण त्याने कारभारात बेईमानीचे वर्तन केले असे मालकाच्या लक्षात आले. त्याला कामावरून काढण्यापूर्वी त्याच्या धन्याने त्याच्याजवळ कारभाराचा हिशोब मागितला. तो हिशोब देताना त्याने धन्याला द्यायची असलेली रक्कम खूपच कमी दिली कारण त्याने कागदपत्रात बदल करून स्वतःचा फायदा मिळवला होता. तो आपल्या स्वभावाप्रमाणे वागला म्हणून या माणसाच्या गैरव्यवहाराला प्रभू येशूने मान्यता दिली असे नाही.
या दृष्टांताद्वारे, येशू आपल्याला शिकवीत आहे की, देवाच्या लोकांनी या जगातील धनाकडे योग्यप्रकारे पाहून, त्याचा योग्य तोच वापर करावा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण विश्वासू कारभारी असलं पाहिजे. धनाची चाकरी न करता, उलट त्याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी केला पाहिजे असे आपणास उद्देशून सांगण्यात आले आहे.

बोधकथा:

क्रोएसुस राजा त्याने निर्माण केलेल्या महालावर व परिसरात असलेल्या फुलबागेरवर अतिशय आनंदी आणि गर्विष्ट होता. त्याच्या बढाया तो सतत मारत असे. एके दिवशी त्याच्या दरबारात सलोन नावाचा एक ज्ञानी व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यांसोबत त्याला भेटावयास आला. राजाने त्याला सर्वप्रथम त्याचा महाल न्याहाळण्यासाठी फिरवले तसेच नंतर त्याला फुलबागही दाखवली आणि विचारले, ‘तु माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत आणि आनंदी बघितलाय का’? सलोन विद्वानाने विचार केला आणि सांगितले, ‘होय तुमच्याच दरबारातील तो गरीब व्यक्ती जो त्याच्याकडे काही नसूनसुद्धा तो अगदी आनंदी आणि समाधानी आहे’. त्यावर राजाला अतिशय क्रोध आला व म्हणाला, ‘तुला दिसत नाही का हा माझा महाल आणि ही बाग सर्वांचे येथ आकर्षण आहे आणि ह्या सर्वांचा शिल्पकार मी स्वत: आहे म्हणून माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत आणि आनंदी असू शकतच नाही’. परंतु स्मितहास्य करत सलोन म्हणाला, ‘अहो राजे, सुखी मरण येईपर्यंत आपण म्हणू शकत नाही की आपण आनंदी व समाधानी आहोत’.

     काही दिवसानंतर सायरसच्या राजाने क्रोएसुस राजाच्या राज्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला व त्याच्या महालाची आणि फुलबागेची धुळधान केली. त्याने क्रोएसुस राजालाही मारण्याचा विचार केला आणि त्याला सरण रचून त्यावर झोपवले.  परंतु क्रोएसुस राजाने सलोन ज्ञान्याच्या नावाने मोठी आरोळी ठोकली आणि म्हणाला, ‘तू जे काही म्हणाला होता ते सर्व सत्य होते की, मरणाच्या क्षणापर्यंत कोणी म्हणू शकत नाही की तो खरोखर सुखी, आनंदी, समाधानी आहे;  धनदौलतच फक्त समाधान देत नाही’. 

मनन चिंतन:

मानवाचा जन्म हा देवाची स्तुती, आराधना आणि सेवा करण्यासाठी झालेला आहे. हेच मानवी जीवनाचे परमध्येय आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिले आहे, तो परमेश्वर आपल्यावर अखंडितपणे प्रिती करतो, त्या परमेश्वराला आपण जेव्हा प्रतिसाद देत असतो तेव्हा परमेश्वराचे जीवन नदीच्या प्रवाहासारखे अविरतपणे आपल्यामध्ये संथ वाहत असते. म्हणून आजची उपासना आपल्याला हेच सांगत आहे की, आपण जाणीवपूर्वक परमेश्वराची निवड करायला हवी की ज्यामुळे परमेश्वराचे जीवन आपल्या जीवनामध्ये प्रतिबिंबित होईल; देवाचे जीवन सखोल आणि सुदृढ होईल. जो परमेश्वराला व परमेश्वराची सेवा चाकरी करण्याचा मार्ग स्वीकारतो त्याला परमेश्वर कधीही एकटे सोडत नाही. परमेश्वर त्याच्या शब्दातून, कृतीतून इतरांना प्रकट होत असतो.
देवाने जी माणसे निर्माण केली तीच माणसे देवाला विसरून चकाकणाऱ्या नाण्याच्या मागे लागली आहेत. खरा आनंद देवाच्या प्रेमात, करुणेत सामावलेला आहे, हे सत्य आज आपण विसरलेलो आहोत. म्हणून आपण मन-आनंद मिळविण्यासाठी सतत खटपट करीत असतो. सत्य, पद, प्रसिद्धी वा विविध गोष्टीमध्ये हा आनंद दडलेला आहे, अशी आपली समजूत झाल्याने त्या गोष्टी हस्तगत करण्यासाठी आपण धडपड करीत असतो, काहीजण तर पैशाने जग मिळविण्याची धडपड करत असतात. जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. पण या पैशाचा अतिरेक जर झाला तर ‘सर्व पापांचे मूळकारण पैसाच बनते’.
म्हणून येशू ख्रिस्त आपणास सांगतो, ‘कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवा-चाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रिती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील (लुक १६:१३). समुद्रातील प्रवास कोणीही दोन बोटीवर पाय ठेऊन करीत नसतो. अन्यथा लाटा आणि हेलकावे यामुळे तोल जाऊन त्याला त्याचा प्राण गमवावा लागेल. त्याचप्रमाणे आपल्या या जीवनातील प्रवासामध्ये आपण देवाची सेवा व धनाची सेवा करू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी देवाचीच सेवा करावी असा संदेश प्रभू आज आपल्याला देत आहे.
देवाने आपल्या प्रत्येकाला या जगात एक विशेष कामगिरीसाठी पाठविले आहे. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, वयाने लहान असो की मोठा, विद्वान असो की अज्ञानी. आजच्या शुभवर्तमानातून आपणास सांगण्यात आले की, परमेश्वराने आपल्या सर्वांना या जगात त्याच्या मालमत्तेचे कारभारी म्हणून काम करण्यासाठी पाठविले आहे. शुभवर्तमानामध्ये चांगला कारभारी आपल्या धन्याची इच्छा प्रमाण मानतो, त्याची वागण्याची पद्धत कोणती याचा नीट अभ्यास करतो आणि धन्याला आवडेल तेच कार्य करतो. शुभवर्तमानातला श्रीमंत मनुष्य किंवा धनी हा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः परमेश्वर आहे आणि आपण सर्वजण त्याचे कारभारी आहोत. म्हणून आपण आपल्या जीवनात देवाची इच्छा प्रमाण मानली पाहिजे. आपला धनी जसा दयाळू व क्षमाशील आहे, तसे आपणही दयाळू बनले पाहिजे.
पहिल्या वाचनात आमोस लोकांना सांगत आहे की, पापी लोकांचा ‘अंतसमय’ जवळ आला आहे. त्यांची वेळ भरली आहे. ज्याप्रमाणे कोणतेही पीक त्याच्या स्वतःच्या आंतरिक वाढीने कापणीसाठी पिकून तयार होते, त्याचप्रमाणे न्यायदंड भोगण्यास पापी लोक पिकून तयार झाली आहेत. ते देवाची सेवा न करता धनाची सेवा करीत आहेत म्हणून त्यांच्या पापांची घडे भरली आहेत. देव त्यांचा दिव्य न्याय करील. कारण त्यांची शेवटची वेळ भरली आहे.
आपण सर्वजण देवाचे कारभारी आहोत. देवाची इच्छा व देवाचे कार्य करण्यासाठी त्याने आपल्याला या जगात पाठविले आहे. आमोस सुद्धा आपल्याला आठवण करून देतो की, ‘तुम्ही देवाचीच चाकरी व त्याचीच सेवा करा, कारण आपलाही ‘अंतसमय’ एक दिवस येणार आहे’. देव आपलाही दिव्य न्याय करणार आहे. एक दिवस आपण सर्वांना त्याच्या समोर उभे राहायचे आहे. परमेश्वर पिता आपल्या सगळ्यांना जाब विचारणार आहे. ही वेळ आपल्या जीवनात कधीही येऊ शकते, त्यामुळे सदैव तयार राहण्यातच खरे शहाणपण आहे.
आपला धनी प्रभू परमेश्वर प्रेमाने, दयेने व करुणेने श्रीमंत आहे. आपणदेखील त्याचे कारभारी त्याच्यासारखे श्रीमंत व्हावे म्हणून त्याने आपल्या सर्वांचे तारण करण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यामध्ये पाठविला अशासाठी की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे’. संत पौल ह्याची ग्वाही आपल्याला दुसऱ्या वाचनात देत आहे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविला. कारण देवाची इच्छा आहे की आपणा सर्वांचे तारण व्हावे. यासाठी आपण आपल्या धन्याची सेवा करून त्याच्यासारखे बनायला हवं. संत लुक आपल्याला सांगत आहे – “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा” (लूक ६:३६).
परमेश्वर त्याचे करुणामय हृदय कोणालाही कधीही बंद करीत नसतो. जगाच्या दुःखापासून परमेश्वर कधीच दूर जात नसतो. तो स्वतः ख्रिस्ताद्वारे मानवाच्या देहात अवतरला. मात्र आपणच त्याला आपल्या जीवनात प्रवेश देत नाही. आपण फक्त आपल्या नोकरीवर व जास्त पैसा कसा कमावता येईल ह्यावरच आपले लक्ष केंद्रित करून भीतीचे आणि चिंतेचे जीवन जगतो. त्यात आपलेच नुकसान होत असते. खरा आनंद आपल्याला कोणत्याही भौतिक गोष्टींमध्ये मिळत नाही तर तो फक्त देवामध्येच मिळतो, म्हणून आपण देवाचीच सेवा करूया व आपल्या धन्यासारखे दयाळू व करुणामय प्रतिबिंब या जगात त्याचा प्रेमप्रसार करूया. आमेन.

विश्वासू लोकांचा प्रार्थना:

प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रांपचिक ह्यांनी देवाच्या कृपेने व सामर्थ्याने ख्रिस्ताची सुवार्ता पसरावी व देव आपला खरा धनी आहे ह्याची साक्ष जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्वजण देवाचे कारभारी आहोत म्हणून आपण सर्वांनी देवाची इच्छा व देवाचे कार्य विश्वासाने करावे, त्याच्यासारखे दयाळू व करुणामय बनून त्याचे प्रतिबिंब या जगात बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक देवाला विसरून पैशाचे मागे धावत आहेत, अशांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभू आपला धनी प्रेमाने, दयेने व करुणेने श्रीमंत आहे ह्याचा अनुभव त्यांना प्राप्त व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात जे लोक असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.