Friday 21 April 2017

Reflection for the homily of Divine Mercy Sunday (23/04/2017) By: Baritan Nigrel



पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार
दैवी दयेचा रविवार

दिनांक : 23-4-2017
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २:४२-४७
दुसरे वाचन : १पेत्र १:३-९
शुभवर्तमान : योहान २०:१९-३१


“तेव्हा प्रभूला पाहून त्यांना आनंद झाला.”


प्रस्तावना:

ख्रिस्तसभा आज दैवी दयेचा रविवार साजरा करीत आहे. प्रभू येशू दयेचा व करुणेचा महासागर आहे. त्याचा हृदयातून दयावंत कृपेचा झरा वाहत असतो. प्रभूची दैवी दया आपणास त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यास आवाहन करीत आहे.
आजच्या उपासनेतील पहिले वाचन आपल्याला आठवण करून देते कि, ज्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्वीकार केला, ते एका मनाचे व हृदयाचे होते. ख्रिस्तावरील त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांनी ख्रिस्तामध्ये पुर्नजन्म स्वीकारला.
दुसऱ्या वाचनात पेत्र आपल्याला सांगतो कि, देवाच्या दयेत आपला नवीन जन्म झाला आहे. आणि जो देवावर श्रद्धा ठेवतो त्याला स्वर्गातील वतन प्राप्त होईल.
शुभवर्तमानात संत थोमा त्याच्या ख्रिस्तावरील श्रद्धेची कबुली करून म्हणतो, “माझ्या देवा! माझ्या प्रभो”.
आपणही आपल्या जीवनात पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेऊन त्याच्यावर असलेली श्रद्धेची कबुली करावी व त्याची दैवी दया आपल्या जीवनात अनुभवावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २:४२-४७.

ज्यांनी ख्रिस्ताच्या संदेशाचा स्वीकार करून बाप्तिस्मा स्वीकारला होता ते प्रेषितांच्या सहवासात आले. या वाचनात आपल्याला दिसून येते कि, ते मनाने एक होते. त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या समूहजीवनात पडू लागले. त्यांच्यात परस्पर-सहकार्याची भावना वाढीस लागली. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सर्व नाव ख्रिस्ती एकत्र जमत. त्यांचा प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे होता.
अ.  प्रेषितांनी दिलेल्या धर्मशिक्षणावर चिंतन करणे.
आ.   समूहभावनेची जोपासना करणे.
इ.     पवित्र भाकरीचा विधी साजरा करणे.
ई.     विविध उपकाराबद्दल देवाला धन्यवाद देणे.

 दुसरे वाचन : १पेत्र १:३-९.

देवाच्या थोर दयेमुळे त्याने आम्हांला नवजीवन दिले आहे. ख्रिस्ताच्या नावामुळे ज्यांचा छळ होतो त्यांना पेत्र त्यांचा स्वर्गातल्या वतनांची आठवण करून देतो. हे वतन कोठल्याच विरोधी शक्तीकडून नष्ट होत नाही. ते निरंतर व अविनाशी आहे.
ते वतन प्राप्त होण्यासाठी देवावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे कारण हे तारण देवाच्या महान कृपेने मिळते. त्यात नव्या जीवनात, नव्या आशेमध्ये, नव्याने जन्म होतो व त्यातूनच पुनरुत्थान घडून येते.

शुभवर्तमान : योहान २०:१९-३१

आजच्या शुभवर्तमानात थोमाचा अविश्वास आणि मग विश्वास ठेवणे या दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. येशूच्या शिष्यांनी त्याचे शरीर कबरेतून चोरून नेले होते अशी खोटी बातमी शत्रूंनी गावात पसरविली होती. शिष्य घाबरलेले होते ते एका खोलीत दारे बंद करून बसलेले होते. अकस्मात प्रभू त्यांच्यामध्ये आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो.” त्यांनी आपल्या जिवंत प्रभूला ओळखले तेव्हा प्रभूला पाहून त्यांना आनंद झाला.
थोमाने प्रत्यक्ष ख्रिस्ताला पाहिले नव्हते म्हणून त्याने शिष्यावर विश्वास ठेवला नाही. आठ दिवसानंतर पुन्हा येशू त्यांच्यामध्ये आला. तुम्हास शांती असो असे म्हटल्यावर प्रभू थोमाकडे वळून त्याला आपले हात दाखविले. त्याची शंका दूर केली. तेव्हा थोमाने, “माझ्या प्रभू माझ्या देवा” अशी कबुली केली. तेव्हा येशूने म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस, पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.”

मनन चिंतन

येशूचे पुनरुत्थान म्हणजे मरणावर विजय. तो सार्वकालिक जीवनाचा प्रभू आहे ह्याची प्रचीती पटविणारे सत्य म्हणजे त्याचे पुनरुत्थान.
भूतलावर असा चमत्कार कधी झाला नाही. पण त्या चमत्काराचे जीवनाच्या नवीकरणाचे आपण भागीदार झालो आहोत हे अभिवचन त्याने आपल्याला दिले आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जिवनात पार गेला आहे.
येशूचे पुनरुत्थान व त्याचा मरणावर विजय आपण प्रतिवर्षी साजरा करतो, कारण येशू ख्रिस्ताने हा विजय मिळवून त्यांत आपल्याला भागीदार केले आहे. आपल्याला ठाऊक आहे कि, जगात अनेक थिर व्यक्तींनी आपले सर्व आयुष्य वेचले परंतु ते परत आले नाही. पण आपला प्रभू येशू त्याच्या अनुयायांना जीवन देण्यासाठी मरणातून जिवंत झाला. येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर येशूचे शिष्य यहूद्यांच्या भीतीमुळे दार लावून घाबरून बसले होते. त्यांचे चेहरे दुःखी होते व हृदयात आशा नव्हती. त्यांच्या आयुष्यात सर्वत्र अंधार पसरला होता. येशूला पुरताना त्यांनी आपल्या आकांक्षाही पुरल्या होत्या. पण येशू मरणावर विजय मिळवतो व आपल्याला नवीन आशा व नवीन विश्वास देतो. घाबरलेल्या शिष्यांना येशू म्हणतो, “तुम्हास शांती असो.”  आपला प्रभू जिवंत आहे हे पाहून त्यांना भरपूर आनंद होतो.
येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी व पुनरुत्थान झाले त्यावेळी उच्चारलेले पहिले वाक्य ‘भिऊ नका’ हे होते. थोमाला जिवंत येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले नव्हते म्हणून थोमाने ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. त्याने ख्रिस्ताचे ‘भिऊ नका’ हे शब्द ऐकले नव्हते. म्हणून जेव्हा येशू त्याचा मध्ये येतो तेव्हा आपल्या हातातील व पायातील जखमा थोमाला दाखवितो व बोट घालून पाहण्यास सांगतो. थोमाचा विश्वास भक्कम होतो व तो लगेच म्हणतो, “माझ्या देवा! माझ्या प्रभो!”
प्रभू येशू त्यांना शांती देतो व त्याच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यासाठी त्यांना पाठवितो. ख्रिस्ताचे कार्य आता हे त्याचे शिष्य चालू ठेवतात. म्हणून पहिल्या वाचनात आपण ऐकले कि, अनेकांनी ख्रिस्ताच्या संदेशाचा स्वीकार करून बाप्तिस्मा स्वीकारला.
आज आपण दैवी दयेचा सण साजरा करीत आहोत. प्रभू त्याची दया आपल्याला देतो, म्हणून तो जिवंत झाला आहे. देवाने आपल्यावर केलेली दया त्याचे आपल्यावरील प्रेम दर्शविते. म्हणून देवाची दया व त्याचे प्रेम सदा आपल्या हृदयात, मनात व घरात असावे म्हणून आजच्या या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू आमची श्रध्दा दृढ कर.


१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, बिशप्स आणि व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून प्रार्थना करूया.
२.    ख्रिस्ताच्या दैवी दयेचा अनुभव घेऊन आपण सर्वांनी प्रभूच्या सहवासात एका हृदयाचे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.    जे देवापासून दूर गेले आहेत त्यांची देवावरची श्रध्दा वाढावी  व त्यांचा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात नवीन जन्म व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    प्रभूची शांती सदैव आपल्या कुटुंबात नांदावी व आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या शांतीचे साधन व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

५.   पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढ व्हावा व संत थोमाप्रमाणे आपणही आपल्या श्रध्देची कबुली करावी म्हणून प्रार्थना करूया. 


Thursday 13 April 2017


Reflections for the homily of Easter Sunday (16-04-2017) by: Br Ashley D'monty


पास्काचा सण
दिनांक : १६-०४-२०१७
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४,३७-४३.
दुसरे वाचनः कलस्सेकरांस पत्र: ३:१-४.
शुभवर्तमान: योहान २०:१-९.




"येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते." 


प्रस्तावना:

आज आपण प्रभू येशूचे पुनरुत्थान म्हणजेच पास्काचा सण साजरा करत आहोत. येशू ख्रिस्ताने क्रूसावरील मृत्युद्वारे आपल्यासाठी पापांची क्षमा मिळवली व तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन त्याने आपल्यासाठी पवित्र आत्म्याचे नवजीवन प्राप्त करून दिले.
पहिल्या वाचनात पेत्र ज्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही व जे खऱ्या जिवंत देवाविषयी उत्सुक आहेत त्यांना प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे. कारण प्रभू येशूने मृत्यूवर व जगावर विजय मिळविला आहे. तो मरणांतून उठला आहे हे आजच्या शुभवर्तमानात ऐकतो.
ख्रिस्ती जणांना मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, तर येशूने पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवर विजय मिळवला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपले पुनरुत्थान होणार आहे, अशी श्रद्धा प्रत्येक ख्रिस्ती माणसाची असावी. आपली ही पुनरुत्थित येशुवरील श्रद्धा अधिकाधिक दृढ व्हावी म्हणून आजच्या मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४,३७-४३.
     
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात प्रामुख्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयी तसेच शुभवर्तमानाच्या प्रचाराविषयी केलेल्या आज्ञेबद्दल वृत्तांत आढळून येतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण मरणातून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताविषयी संत पेत्राने दिलेल्या ग्वाहीविषयी ऐकत आहोत.
संत पेत्र म्हणतो, ‘पवित्र आत्म्याने अभिषिक्त केलेला नाझरेथकर येशूने मरणावर विजय मिळवून; तो जीवंताचा व मेलेल्यांचा न्यायधीश बनला आहे. त्यांच्यावर श्रध्दा ठेवणा-या प्रत्येकाला त्यांच्या नावाखाली पापांची क्षमा लाभली आहे.
ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून आम्हाला स्वर्गीय नवजीवनाचे भागीदार बनविले आहे. ज्या देवाने ख्रिस्ताला मरणातून उठविले आहे. तोच देव आम्हाला सुध्दा न्याय-दिनाच्या दिवशी मरणातून उठवून व आपल्या मांगल्यमय जीवनाचे सार्थक घडवून आणील.

दुसरे वाचनः कलस्सेकरांस पत्र: ३:१-४.

आजच्या दुस-या वाचनात संत पौल कलस्सैकरांना, “ख्रिस्ताबरोबर पुनरूत्थित होण्याचे परिणाम स्पष्टपणे नमुद करून देत असताना आपल्याला उद्देशून म्हणतो की ख्रिस्ताबरोबर आपण देखील उठवले गेलो आहोत. आता आपण त्यांच्या पुनरूत्थित जीवनात सहभागी झालो आहोत.
ह्यास्तव, आपले जीवन आता वेगळे असायला हवे. स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष वेधण्यास संत पौल आपल्याला विंनती करतो. कारण तेथे ख्रिस्ताच्या प्रकाशाची, प्रेमाची व सत्याची सत्ता स्थापित आहे.

शुभवर्तमान: योहान २०:१-९.

शुभवर्तमानकार संत योहान आपल्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाविषयीच्या घडलेल्या घटनेचे विवरण करीत असताना रिकामी कबरह्या प्रसंगाचा उल्लेख प्रथमरीत्या नमुद करतो. येशूची रिकामी कबरहा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा गाभा मानला जातो व ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरूत्थानाचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो.
तथापिः या घटनेमधून संत योहान आपल्यासमोर काही आधात्मिक धड्याचे विवरण साधू इच्छितो. तसे पाहिल्यास चारही शुभवर्तमानकांरानी (मत्तय, मार्क, लूक व योहान) सांगितलेल्या पुनरुत्थानाविषयीची विविध प्रंसगाची एका वाक्यात सलगपणे चित्र उभे करणे सोपे नाही.
उदाः संत योहान अध्याय २० ओवी १ मध्ये, “मरिया माग्दालिया एकटीच कबरेजवळ”  असल्याचे नमुद करतो. तथापि संत मत्तय आपल्या २८ व्या अध्याय १ ओवीत, “मरिया माग्दालिया व दुसरी मरीयाह्या दोन व्यक्ती कबरेजवळ असल्याचे नमुद करतो. तर, संत मार्क अध्याय १६ ओवी १ ह्यामध्ये, “मरीया माग्दालिया, याकोबाची आई मरिया व सलोमेह्या तीन व्यक्तीची ओळख देतो.
ह्या विविध वृत्तांतावरून साध्य करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे व त्यांने मेलेल्यांतून पुन्हा उठावेअसा जो शास्त्रलेख लिहिला गेला होता तो आज परिपूर्ण झाला आहे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात येशूच्या बारा शिष्यांपैकी दोन शिष्यांचा उल्लेख केला गेला आहे. शिमोन पेत्र ह्यांचे नाव शुभवर्तमानात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. परंतू, दुस-या शिष्याचे नाव गुपीत असल्याचे दिसून येते. पण, त्या शिष्यांविषयी येशूठायी असलेले प्रेम दर्शविण्यात आले आहे. येशूचा अतिप्रिय शिष्य म्हणून संत योहानाला संबोधले जाते.
मरिया माग्दालिया हिने दिलेल्या वृत्तांतवरून दोन शिष्य, पेत्र व योहान, येशूच्या रिकामी कबरे जवळ येतात व ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे, ‘मी तिस-या दिवशी मरणातून पुन्हा उठेनह्या वचनावर विश्वास ठेवतात.

मनन चिंतन:

सृष्टीच्या नियमानुसार प्राणीवर्गाला जन्मानंतर मृत्यू हा शब्द अटळ आहे. मृत्यूबद्दल अनेक शास्रज्ञांनी संशोधन केले, परंतु मृत्यूला जिंकणे त्यांना शक्य झाले नाही. पृथ्वीतलावर अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. सर्व जग जिंकण्याच्या पराकोटी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक राज्येही जिंकली, परंतु त्यांनाही मृत्यूला शरण जावे लागले. साधू व संत यांनी योगसाधनेद्वारे, तपश्चर्येतून देवाजवळ पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही त्यांना मृत्युपुढे शरणागति पत्करावी लागली. अद्यापही या मर्त्य मानवाला मृत्युच्या अभिशापावर विजय मिळवता आला नाही.
प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच. निसर्गाच्या कालचक्राचा नियम मोडला गेला. मर्त्य मानवाविषयीचा मरणावरील पहिला आणि शेवटचा विजय झाला. तो मृत्युंजयीझाला. येशू ख्रिस्त! देवाचा पुत्र! सुमारे २००० वर्षापूर्वी या पृथ्वीतलावर मानवी देह धारण करून जन्माला आला. सृष्टी नियमाप्रमाणे तहान-भूकथंडी-ताप, आनंद-दुःख, कष्ट सर्व काही मानवीय शरीर रूपाने प्रभू मानवाशी एकरूप झाला, एकजीव झाला. त्यालाही एकच कारण होते – ‘मानवावरील प्रेम’! ज्या मानवाच्या प्रेमासाठी देव स्वर्गातून उतरून आपल्याशी एकरूप झाला, सुख-दुःखात सहभागी झाला, तोच मानव त्याच्यावर बंड करून उठला! केवढा हा दैव दुर्विलास!
आजाऱ्यांना बरे करणारा, आंधळ्यांना दृष्टी देणारा, बहिरे, मुके, लंगडे, भूतग्रस्त यांना त्यांच्या समस्येतून सोडवणारा येशू ख्रिस्त हा आपणावरही अधिकार गाजवणार या भीतीने राज्यकर्ते भयभीत झाले. त्यांनी ख्रिस्ताला ओळखले नाही; त्यामुळेच आपला अधिकार, राज्य वाचवण्यासाठी त्याच्याविरुद्ध त्यांनी अपप्रचार सुरु केला. तर धर्मपंडित, शास्री, पुरुषांचे महत्व कमी होऊ लागले होते, त्यांनाही आपल्या अधिकाराची, पदाची चिंता वाटू लागली होती, त्यामुळे त्यांनी जनतेत आपले वर्चस्व वाढविण्यासाठी प्रभूवर खोटे आरोप करणे सुरु केले. सैतानी खेळ सुरु झाला. देव-दानव युद्ध सुरु झाले. खोटे आरोप ठेवून क्रुसावर मरणदंडाची शिक्षा देण्यात आली.
येशूचे मरण तेथील राज्यकर्त्यांना, धर्मपंडित, शास्री पुरुषांना आनंदाची बातमी होती. मरण म्हणजे शेवट असा त्यांचा विश्वास होता. पुन्हा जुलूम, जबरदस्ती, अन्याय करण्यास ते मोकळे झाले होते. जनता मात्र दुःखी झाली. आपला तारणहार आपल्याला सोडून गेला. सर्व संपले. मरणापुढे सर्वच नतमस्तक होतात! तेही झाले.
पण त्यांचे हे स्वप्न अल्पजीवी ठरले, सर्व काही क्षणभंगुर असे होते. मरण म्हणजे शेवट, मरण म्हणजे दुःख, मरण म्हणजे अंधकार या मरणावर प्रभू येशूने विजय मिळवला. तो मृत्युंजयी झाला. मरणातून तिसऱ्या दिवशी उठला. जिवंत देवाने अंधकाराला हरवले. दुःखावर विजय मिळवला.
माणसे मरणातून पुन्हा जिवंत झालेली उदाहरणे आपल्या ऐकिवात आलेली आहेत. या विषयावर पुस्तकेसुद्धा उपलब्ध आहेत. येशूनेसुद्धा लाझरसाला व नाईमच्या विधवेच्या मुलाला जिवंत केले, पण ते कालांतराने मरण पावले. येशू क्रुसावर मरण पावला. पण तो पुन्हा मरणातून उठला किंबहुना देवापित्याने त्याला मरणातून उठवले. येशू पुन्हा मरण पावला नाही तर त्याला अमरत्व प्राप्त झाले आहे. हे ऐतिहासिक व सार्वकालीक सत्य आहे.
संत पाँलची येशूच्या पुनरुत्थानाविषयी शिकवण अतिशय स्पष्ट आहे. ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे (रोमकरांस पत्र १४:९). येशू आजही आपल्याबरोबर आहे. संत इरेनिउस म्हणतात, ‘तुम्ही देव बनावे म्हणून देव माणूस झाला’, म्हणजेच आपण अमर व्हावे ही देवाची योजना आहे. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकुनिया उठला.

१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, आध्यात्मिक मेंढपाळ बिशप, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनिंना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव त्यांच्या कार्यात यावा. ख्रिस्ती श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेत व विश्वासात त्यांनी आपल्या कार्याद्वारे प्रेरित करावे व स्वर्गीय नवजीवनाचा आनंद उपभोगण्यास मनोब द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज तरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. सतत आजारामुळे ज्या कुटुंबांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वैभवशाली शक्तीने दिलासा दयावा व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५) सर्व धर्म सहभाव, सर्व धर्म स्नेहभाव, सर्व धर्म समीपभाव व सर्व धर्मसन्मानभाव या चौकटीवर विविध धर्मांच्या लोकांनी एकत्रित येऊन ऐकमेकांचा उध्दार व सन्मान करावा, गुण्यागोविंदाने नांदत राहावे व जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

६) आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.

Wednesday 12 April 2017

Reflection for the Homily of  'Easter Vigil' (16/04/17)

By Dominic Brahmane.










पुनरुत्थान रविवार

दिनांक: १६/०४/२०१७
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२.
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८.
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ.
चौथे वाचन: यशया ५४:५-१४.
पाचवे वाचन: यशया ५५:१-११.
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४.
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८.
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११.

शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०.


"येशू मरणातून उठला आहे"


आजच्या ह्या विधीचे चार मुख्य भाग आहेत:   

पहिला भाग: प्रकाश विधी- पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग: प्रभुशब्दविधी- येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचनांमधून देवाने जगाच्या सुरूवातीपासून मानवावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाची आपणाला आठवण करून देतात.
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद- येथे बाप्तिस्म्यासाठी लागणा-या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्यसाधारण आशीर्वाद आहे.
चौथा भाग: ख्रिस्तप्रसादविधी- येथे आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण घेत असतो.   
       
प्रास्ताविक:

        आलेलुया आलेलुया ख्रिस्त आज विजयी झाला मरण जिंकुनिया उठला. आज आम्ही ख्रिस्ती श्रद्धेचा पाया असलेल्या येशूचे पुनरुत्थान मोठ्या वैभवाने साजरे करत आहोत. तारणकार्यातील इतिहासाची ही एक नवीन सुरुवात आहे. जसा प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतो, अंधारमय भोगद्याअंती आशेचा किरण चमकतो अगदी तशाचप्रकारे प्रत्येक वेदनामय उत्तम शुक्रवार नंतर प्रभूवैभवाचा इस्टर (पास्काचा) सण येत असतो. मरिया माग्दालीया व इतर स्रियांप्रमाणे आम्हीही येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवावी व त्याच्या पुनरूत्थानाचे निष्ठावंत साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०. (येशूचे पुनरुत्थान)

चारही शुभवर्तमानात आपल्याला येशूच्या पुनरुत्थानाविषयीचा उल्लेख आढळतो. त्यात काही प्रमाणात साम्य, तर काही प्रमाणात विविधता आढळते. ह्यावरून असे समजते कि, शुभवर्तमानाच्या लेखकांनी हि घटना एकत्रित स्वरूपात नव्हे तर वैयक्तिकरीत्या लिहिली असावी. मत्तयचा काही भाग (मार्क १६:१-८) ह्यातून घेण्यात आला आहे. परंतू भूमिकंपाची कल्पना, देवदुताने सरकवलेली धोंड, सैनिक मरणप्राय होणे आणि स्रियांचे पुनरुत्थित ख्रिस्ताशी झालेले संभाषण हे फक्त मत्तयनेच अंतर्भूत केले आहे.
मत्तयच्या काळात अशी अफवा पसरवली गेली होती कि, येशूच्या शिष्यांनी येशूचे मृत शरीर चोरून नेले व येशूचे पुनरुत्थान ही एक खोटी बाब आहे. येथे मत्तय ठामपणे दैवी मध्यस्थीची कल्पना मांडू इच्छितो आणि ऐतिहासिक सत्यता हि कि, कडक बंदोबस्त असल्याने येशूचे शिष्य त्याचे मृत शरीर चोरू शकले नाहीत.
दुसरे म्हणजे कबरेजवळ गेलेल्या स्रियांनी खरोखर येशूला स्पर्श केला आणि मुख्य याजक व वडील, त्यांचे सैन्य खोटे बोलत आहे हे त्याला स्पष्ट सांगायचे आहे (२८:११-१५). पुनरुत्थान हा बायबलचा केंद्रबिंदू होय. पुनरुत्थानाचा संदर्भ आपल्याला जुन्या करारातही आढळतो (ईयोब १९:२५-२६, स्तोत्र ४९:१५, यशया २६:१९, दानियल १२:२, यहज्केल ३७). परंतू नव्या करारात ह्यावर अधिक भर देण्यात आला आहे. शुभवर्तमानात आढळलेला पुनरुत्थानाचा संदर्भ “१करिंथ १५:३-८” ह्यातून घेण्यात आला आहे (संत पौलानेच ह्यावर प्रथम लिखाण केलेले होते). फक्त रिकाम्या कबरेवरूनच निष्कर्ष काढण्यात आला आहे कि, येशू पुनरुत्थित झाला आहे, कारण येशू पुनरुत्थित झाला आहे परंतू कोणीही त्याचे नयनसाक्षीदार नाहीत.  येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया होय. आपण  जरी त्याचे पुनरुत्थान पुराव्यानिशी सिद्ध करू शकत नसू तरीही आपल्या श्रद्धेच्या दृष्टीकोनातून त्याचा अनुभव नक्कीच घेऊ शकतो.
येशूचे पुनरुत्थान शब्बाथाच्या दिवशी नव्हे तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी झाले. सृष्टीनिर्मिती वेळी देवाने शब्बाथ (शेवटचा दिवस) हा दिवस पवित्र केला. पुनरुत्थानावेळी येशू पहिला दिवस पवित्र करतो. शब्बाथ सूर्यास्तावेळी संपुष्टात आला, परंतू स्रिया कबरेकडे प्रात:काळी गेल्या. त्या येशूच्या पुनरुत्थानाच्या साक्षीदार बनल्या. मरिया माग्दालीयाचा उल्लेख चारही शुभवर्तमानात आढळतो. गणना १९:१५ मध्ये कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेसाठी दोन साक्षीदारांची गरज होती. यहूदी लोकांच्या प्रथेत फक्त पुरुष साक्षीदारांस प्राधान्य दिले जाई. येशूने त्याच्या सार्वजनिक कार्यात बऱ्याच त्यांच्या प्रथा मोडकळीस काढल्या. आणि हा त्याला अपवाद नाही. अकरा शिष्यांपैकी येथे कोणीही आढळला नाही तर “दोन स्रिया” ह्याचे साक्षीदार बनल्या. मार्क (१६:१) शुभवर्तमानात स्रिया येशूचा तैलाभ्यंग करावयास आल्या असा उल्लेख आहे तर मत्तयमध्ये ‘एक स्री’ सुगंधी तेलाने येशूची उत्तरक्रिया करते. तैलाभ्यंग करण्यापलीकडे त्या येशूला कंबरेत पहावयास आल्या होत्या. भूमिकंप, देवदूत शुभ्र वस्र परिधान केलेला आणि धोंड बाजूला सरकवणे हे स्वर्गलोकाची (Eschatological) चिन्हे आहेत. ह्यावरून देव ‘नवयुग’ स्थापन करील असे समजते. येशूचे पुनरुत्थान हे तारणकार्याच्या इतिहासात नवीन सुरुवात आहे.

मनन चिंतन:

‘अंधार अंधाराला मिटवू शकत नाही तर फक्त प्रकाशातच ती क्षमता असते;
तिरस्कार तिरस्काराला दूर करू शकत नाही तर फक्त प्रेमानेच ते साध्य होते’. -मार्टिन ल्युथर किंग.
येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे त्याने त्याच्या प्रकाशानेच अंधाराचा सर्वनाश केला आणि अंधारावर विजय मिळवला. त्याने अंधाराला दोषी न मानता त्या अंधारात ज्योत पेटवली. त्याने काट्याने काटा काढला नाही तर प्रेमाने वैमनस्यावर वर्चस्व गाजवले. म्हणून येशूचे पुनरुत्थान हे फक्त चमत्काराचा एक भाग नसून आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया म्हणून गणला जातो. देवाने जगावर एवढी प्रीती केली कि, त्याने त्याचा पुत्र आपल्या तारणासाठी दिला. त्याच्या पुत्र-प्रेमाचा व मानवावरील निस्सीम प्रेमाचा तो शेवट नव्हता तर तारणकार्यातील इतिहासाची एक नवीन सुरुवात होती. ह्याची प्रचीती आपल्याला आजच्या जुन्या करारातील वाचनातून येते.
     ज्यू (यहूदी) लोकांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत येशूला देवाचा पुत्र मानण्यास नकार दिला. त्यांनी त्यांच्या गर्वामुळे व देवाने दिलेल्या शास्राच्या अज्ञानामुळे असे केले. येशूच्या पुनरुत्थानानंतरही ते येशुशी अनोळखी राहिले म्हणून त्यांनी येशूचे पुनरुत्थान हे निव्वळ अंधश्रद्धा वा अफवा आहे असे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहारेकऱ्यांना येशूच्या शिष्यांनी येशूला चोरून नेले असे सांगण्यास प्रवृत्त केले. त्यांनी अंधकारमय जीवन जगणे पसंत केले. त्यांनी येशूचा शेवट गुडफ्रायडे (उत्तम शुक्रवार) च्या दिवशी केला असे त्यांस वाटले. परंतु सत्य लपत नाही. जसा प्रत्येक रात्रीनंतर दिवस उगवतो, अंधारमय भोगद्याअंती आशेचा किरण चमकतो अगदी तशाचप्रकारे प्रत्येक उत्तम शुक्रवार नंतर इस्टर (पास्काचा) सण येत असतो. संत पौल म्हणतो ‘आपण अंधाराचे नव्हे तर प्रकाशाचे लेकरे आहोत. हे एका बंदिस्त कोशातील अळई (Cacoon) सारखे आहे. त्या अळईला बाहेर येण्यासाठी मरणप्राय यातना सहन कराव्या लागतात परंतू एकदा बाहेर आल्यानंतर त्यास सुंदर, मोहक रूप प्राप्त होते. त्याचे एक सुंदर फुलपाखरू बनते. अगदी त्याचप्रकारे येशूने आपल्याला पापांतून मुक्त करण्यासाठी वेदना सहन केल्या व नवजीवन प्राप्त करून दिले. 
     आपल्याला आनंद करण्याचे कारण म्हणजे आमच्या विश्वासाला आज भक्कम पाया मिळाला आहे. ‘ख्रिस्ती जीवन हे शारीरिक मरणाने संपुष्टात येत नाही तर त्याचे नवजीवनात पदार्पण होत असते’ हि आशा येशूच्या पुनरुत्थानातून आपणास लाभते. येथे, आम्ही आमच्या दु:खानी हिरमसून किंवा खचून जावू नये तर त्यात परमेश्वराच्या योजना काय आहेत ह्याचा शोध करावयास पाचारण आहे. येशूच्या पुनरुत्थानाने परमेश्वर आपणा सर्वांस नवजीवनाची ग्वाही, पुनरूत्थानाचे बक्षीस देवू इच्छितो. म्हणून मरिया माग्दालीया व इतर स्रियांप्रमाणे आम्हीही येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवावी व त्याच्या पुनरूत्थानाचे निष्ठावंत साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आम्हांस नवजीवन दे.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डीनल्स, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी आपले जीवन ख्रिस्ताच्या दु:ख, मरण आणि पुनरुत्थानावर आधारलेले आहे. त्यांनी इतरांनाही ख्रिस्ताचे अनुकरण करून शांती प्रस्थापित करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ती श्रद्धेचा पाया असलेले येशूचे पुनरुत्थान ह्यावर आंम्हा प्रत्येकाने अधिकाधिक दृढ व्हावे व आमची ख्रिस्ती श्रद्धा दिवसेंदिवस वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगात देशांदेशांतील वैमनस्य अधिक शिगेला पोहचत आहे प्रत्येकाला इतर देशावर अधिपत्य गाजवायचे आहे ह्या सर्वातून निष्पाप जनता होरपळत आहे अशा ठिकाणी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आशिर्वादाने सर्वत्र शांती पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबावर व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रेमशांतीचा वर्षाव होऊन त्यांस नवजीवन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


 “लावेरना” ईशज्ञान गुरुविद्यालयातील सर्व धर्मगुरु व बंधूंतर्फे आपणा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.