Wednesday 31 January 2018

Reflections for the homily of 5th Sunday in Ordinary Time   
(04-02-2018) by Br Lavet Fernandes. 






सामान्य काळातील पाचवा रविवार

दिनांक: //२०१८
पहिले वाचन: ईयोब ७:--
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र  ९:१६-१९२२-२३
शुभवर्तमान: मार्क १:२९-३९


संकटसमयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. 




प्रस्तावना:

          आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्ताच्या दैवीस्पर्शाबद्दल सांगत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, दु:खाने निराश झालेला ईयोब परमेश्वराशी वाद घालतो व आपले दु:, कष्ट व चिंता पूर्ण अंत:करणाने देवापुढे प्रकट करतो. करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात संत पौल आपल्या सेवेद्वारे व सुवार्तेद्वारे ख्रिस्ताची ओळख इतरांना देतो व आपण येशूचे दास आहे ह्याची ग्वाही देतो. शुभवर्तमानात संत मार्क सांगतो की, जेव्हा येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य सभास्थानातून पेत्राच्या घरी गेले तेव्हा कफर्णहूमातील घर ख्रिस्ताच्या कार्याचे केंद्र बनले. तसेच ख्रिस्ताने सर्वांची सेवा केल्यानंतर आपला काही वेळ पित्याच्या सहवासात घालविला.
          आपल्यालाही देवाची कुपा व दैवी शक्ती मिळावी म्हणून आपण ह्या प्रभूभोजनविधी मध्ये विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण :

पहिले वाचन : ईयोब ७:-, -

          इयोब ह्या पुस्तकात इयोब आपले दु:ख व्यक्त करतो. देवा, हे देवा, अद्याप तू मला का जगू देतोस? एकदाचे संपून जावे ही ईयोबची इच्छा उसळून येते. ईयोबने त्यात आपल्या सर्वसाधारण अनुभवाची भर घालून पुन्हा देवाला विनविले आहे. येथे इयोबने आपली निराशा सर्वसामान्यपणे मानवी अस्तित्त्वाचा एक अंश असल्याचे दाखवले आहे. दैनंदिन जीवनात येणारे कष्ट आणि खडतर परिश्रम हेच मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करून देते असे आपल्याला ह्या वाचनातून समजते. म्हणून आपले जीवन एवढे क्षणभंगूर आहे तरी ते किती कष्टप्रदा नको नकोसे वाटते असा विरोधाभास आहे.

दुसरे वाचन : करिंथकरास पहिले पत्र  ९:१६-१९, २२-२३

          प्रिती करणे हा ख्रिस्ताचा नियम आहे. म्हणून अधिकाधिक लोकांचे व निरनिराळ्या गटातील लोकांचे तारण व्हावे या ज्वलत इच्छेला व प्रीतीला पौल पेटलेला होता. संत पौल स्व:त दास बनून करिंथकरांस ख्रिस्ताची ओळख व्हावी म्हणून तो आपल्या सेवेद्वारे व सुवार्तेद्वारे लोकांना प्रेरित करत असे. यहुदी लोकांनी ख्रिस्ताकडे यावे यासाठी पौल यहुदी सभास्थानातील उपासनेला हजर राहत असे. तसेच जे यहुदी नव्हते त्यांच्या परंपरा व रूढींना त्याने तुच्छ मानले नाही तर ख्रिस्ताप्रमाणे सर्व  लोकांचा स्वीकार केला.   
  
शुभवर्तमान : मार्क १:२९-३९

          संत मार्क आपल्या शुभवर्तमानात येशूने पेत्राच्या सासूला व इतर रोगी ह्यांना बरे केले ह्याचे वर्णन करत आहे. येशूच्या ह्या कार्याद्वारे संत मार्क सागंतो की पेत्राचे कफर्णहुमातील घर येशूच्या कार्याचे केंद्र बनले.
          सभास्थानातून निघाल्यावर येशू व त्याचे शिष्य शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. तेव्हा शिमोनाची (पेत्र) सासू तापाने पडली होती. येशूला हे कळल्यावर त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला, आणि ती त्याची सेवा करू लागली. तसेच, येशूने नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ लोकांना रोगमुक्त केले. दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सेवा केल्यावर ख्रिस्त पहाटेस उठला व तो प्रार्थना करण्यासाठी रानात गेला. कफर्णहूमातील लोकप्रियते पासून तो दूर गेला व त्याने पित्याच्या सहवासात वेळ घालविला. ह्या सर्व घटनेद्वारे संत मार्क येशूच्या दैवीशक्तीचे स्वरूप स्पष्ट करतो.

बोधकथा :

          काही वर्षापूर्वी मुंबईतील एक लीजनरी बाई कलकत्याला गेली होती. मदर तेरेजाचे आश्रम खूप जवळ होते, म्हणून तिने मदरला भेटून जायचं ठरवल. तिला वाटलं मदर तेरेजा एखाद्या राणी प्रमाणे ऑफिसात (कचेरीत) पंख्याखाली बसली असेल आणि तिच्या सिस्टरांना सर्व काम करायला लावत असेल; परंतु तो तीचा गैरसमज ठरला. कारण ती तेथे गेल्यावर तिला समजलं की मदर दुसऱ्या सिस्टरांना घेऊन पिडीतांना भेटण्यासाठी गेली आहे आणि ती त्याच्या झोपडपट्टीतून तीन तासांनीच परत येईल. त्या बाईने झोपडपट्टीचा पत्ता मागितला व ती जवळच असल्यामुळे तेथे गेली आणि मदर तिला तेथे भेटली.   मदर जे काम करीत होती ते पाहून त्या बाईला मदरांचा किळस आला. कारण एका ब्रेनच्या कॅसरग्रस्त महिलेची डोके मदरच्या हातात होते आणि दुसरी एक सिस्टर कात्रीने हळूहळू तिचे केस कापत होती. त्याच वेळेला तिच्या मस्तकातून किंवा डोक्यातून वळवळणारे किडे खाली पडत होते. मदरला एवढ कठिण काम करत असताना कसलंच वाईट वाटत नव्हतं. ते पाहून त्या बाईने डोक्यावर एक हात ठेवून मदरांना स्वतःची ओळख करून दिली. नंतर म्हटले, मदर एवढं घाणेरड काम तुम्ही कसं करता? तुम्हांला काम करायला प्रेरणा आणि शक्ती कोण पुरवतो? मला तर हा सर्व प्रकार पाहून शिसारी आली आणि अंगावर काटे उभे राहिले. त्यावर मदर म्हणाल्या, ‘जनसेवा हीच ख्रिस्तसेवा आहे. हे डोकं माझ्या ख्रिस्ताच आहे.

मनन चिंतन:

          आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला असे ऐकायला मिळते की, जेव्हा पेत्राची सासू तापाने पडली होती तेव्हा शिष्यांनी जाऊन ख्रिस्ताला तिच्याविषयी सांगितले. ख्रिस्ताने ह्या विनंतीकडे दुलर्क्ष केले नाही तर त्याने जवळ जाऊन तिला उठविले व तिचा ताप गेला. इतकेच नव्हे तर त्याच क्षणी तिला शक्ती मिळाली व ती उठून त्यांची सेवा करू लागली.

पेत्राने येशू ख्रिस्ताला बोलावले.
     पेत्राने येशू ख्रिस्ताला त्यांच्या घरी येण्यास निमंत्रण दिले होते. परंतु त्याचे घर व्यवस्थित नव्हते. सर्व ठिकाणी राढा झाला होता. त्यामुळे तो पाहुण्याचा चांगल्याप्रकारे पाहुणचार करू शकला नाही. तसेच त्यांची सासू देखील आजारी होती. तरी देखील पेत्राने ख्रिस्ताला त्याच्या घरी बोलावले. या कारणास्तव: येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी व शहरातील लोकांसाठी एक आशीर्वाद बनला.
          जेव्हा येशू ख्रिस्ताने पेत्राच्या सासूला बरे केले तेव्हा ती बातमी सर्व ठिकाणी पोहोचली व येशू ख्रिस्ताची प्रतिष्ठा वाढली. जे लोक नाना प्रकारच्या रोगांनी पछाडलेली कितीतरी माणसे होती, ती सर्व माणसे पेत्राच्या घरी आणली होती. तेथे येशू ख्रिस्ताने सर्व रोग्यांना बरे केले व भूतग्रस्तांना मुक्त केले. हेच घर कफर्णहुमातील ख्रिस्ताच्या कार्याचे केंद्र बनले.
          आपणही ख्रिस्ताला आपल्या घरी येण्यास आमंत्रण दिले पाहिजे. जरी आपण गरीब असलो तरी येशू ख्रिस्त आपल्या घरी येतो. एकदा तो आपल्या घरी आला म्हणजे आपल्याच नव्हे तर आजूबाजूच्या कुटुंबाला ही आशीर्वाद मिळतो.

लोकांनी किंवा शिष्यांनी ख्रिस्ताला तिच्या आजाराविषयी सांगितले.
    जेव्हा ख्रिस्त त्याच्या घरी आला तेव्हा त्यांनी ख्रिस्ताला तिच्या आजाराविषयी सांगितले. लोकांनी ख्रिस्ताला आव्हान केले की तिला ह्या आजारातून मुक्त कर. हे सर्व त्याच्या सरळ हृदयातून आले. ख्रिस्ताने त्याच्या हृदयाकडे पाहून पेत्राच्या सासूला आजारातून मुक्त केले. स्तोत्रसंहिता ५०:१५ मध्ये आपण वाचतो की, “संकटसमयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील”.
          कधी-कधी आपण आपल्या जीवनात गोंधळून जात असतो. आपल्याला माहित नसते की आपण देवाकडे काय मागावे. आपण देवाकडे ऐहिक व क्षणिक गोष्टी मागत असतो. उदा: पैसा, मालमत्ता, आरोग्य व भेटवस्तू. परंतु आपण देवाकडे नेहमी आध्यात्मिक व धार्मिक गोष्टी मागितल्या पाहिजेत. जेणेकरून आपण वाईट व पापी गोष्टीपासून दूर राहू. संत पौल आपल्याला फिलीपीकरांस पत्र अध्याय ४ ओवी ६ मध्ये सांगत आहे की, “कशाविषयी चिंता करू नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.

येशू ख्रिस्ताने तिचा हात धरला व तिला उठवले.
          ख्रिस्ताने पेत्राच्या सासुंचा  हात पकडला व तिला उठवले. ख्रिस्ताच्या स्पर्शामध्ये दैवी शक्ती होती. त्याने अनेकदा अनेक लोकांना त्यांच्या दैवी स्पर्शाने बरे केले. जेव्हा एक कुष्टरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा (मार्क १:४०).
          जुन्या करारात आपण पाहतो की, देवाने त्यांच्या लोकांचा हात धरला, जेणेकरून त्यांच संरक्षण करण्यासाठी व त्यांना सामर्थ्य देण्यासाठी आणि देव इस्राएली लोकांना बोलला की, “मी परमेश्वराने न्यायानुसार बोलाविले आहे, मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन (यशया ४२:).
          देवाने आपला हात धरवा व आपल्यासाठी दैवी शक्तीने स्पर्श करावे म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करू या, तसेच त्यांची कृपा व आशीर्वाद मागु या. जसा यशया संदेष्टा आपल्याला अध्याय ४१ ओवी १० मध्ये सांगत आहे की, “तू भिऊ नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यहि करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे.

. आज आम्ही ख्रिस्तसभेसाठी प्रार्थना करतो; विशेषकरून पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरु व धर्मभगिनी ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची सुवार्ता जगाच्या काना-कोपऱ्यात पसरावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करु या.
. जे युवक व युवती देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही, अशा सर्व युवक व युवतींना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
. येथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांची श्रद्धा वाढावी. तसेच त्यांनी ह्या जगातील संपत्तीवर, वस्तूवर व व्यक्तीवर अवलंबून न राहता ख्रिस्ताच्या वचनावर व श्रद्धेवर अवलंबून राहून, त्यांचा विश्वास अधिकाअधिक बळकट व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आता थोडा वेळ शांत राहून, आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी विशेष प्रार्थना करू या.
         


Wednesday 24 January 2018

 Reflections for the homily of 4th Sunday in Ordinary Time   (28-01-2018) by Br Camrello D'Mekar. 



सामान्यकाळातील चौथा रविवार


दिनांक: २८-०१-२०१८
पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०
दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र ७:३२-३५
शुभवर्तमान:  मार्क १:२१-२८








“तो त्यांना अधिकार असल्यासारखा शिकवीत होता”.

प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी जमलेल्या भक्तगणांनो, आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजच्या चिंतनाचा मुख्य विषय आहे: येशू ख्रिस्ताचा त्याच्या शब्दांवर आणि कृत्यावर असलेला अधिकार.
     पहिल्या वाचनात अनुवादक मोशेद्वारे देवाचा संदेश लोकांना सांगत आहे. देव लोकांमधून एका संदेष्ट्याची निवड करणार ह्याची जाणीव आपल्याला ह्या वाचनातून दिसून येते. दुसऱ्या वाचनात संत पौल विवाह म्हणजे काय, त्यांनी त्याचे विवाहीक जीवन कसे जगावे ह्या बद्दल बोध करत आहे; तसेच अविवाहीत स्त्री आणि पुरुषाने जीवनात प्रभू येशूला अधिका-अधिक महत्व देऊन, ख्रिस्ताची सेवा करावी म्हणून सांगत आहे. शुभवर्तमानात येशूख्रिस्त सभास्थानात अधिकाराने शिकवण देत आहे असे आपण पाहतो; ह्याच अधिकाराने येशूख्रिस्त अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याला मुक्त करतो, त्यामुळे सर्व लोक ह्याविषयी थक्क होतात.
     बाप्तिस्माद्वारे आपण येशुख्रिस्ताचे निवडलेले झालेलो आहोत. एक ख्रिस्ती म्हणून आपली जबाबदारी येशूचे कार्य चालू ठेऊन, देवाने प्रस्थापिलेले राज्य अनैतिक रीतींपासून जपावे व अधिकाराने येशूच्या लोकांची सेवा करावी असे आहे. हे सर्व कार्य प्रामाणिकपणे करण्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या ख्रिस्तयागामध्ये सहभागी होत असताना मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०

     अनुवाद ह्या पुस्तकातील एक महत्वाचा भाग म्हणजे लोकांना दिलेली स्थाने, त्याच्या पदव्या आणि त्याच्या नेमणुका इत्यादी. हे सर्व देवाने मोशेच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या लोकांना बहाल केलेले आहे. शास्त्रे, राजे, याजक आणि प्रवक्ते हे लोकांच्या सेवेसाठी दिले जातील असे परमेश्वराचे वचन होते. त्यामुळे लोकांचे सामाजिक आणि धार्मिक जीवन व्यवस्थितपणे सुरु राहील. प्रवक्त्यांना देवाचे मुख असे सुद्धा म्हणण्यात येते. कारण ते देवाचा शब्द त्याच्या मुखातून लोकांपर्यंत पोहचवत असतात. ज्याप्रमाणे शास्त्रे, राजे आणि याजक होऊन गेले होते त्याचप्रमाणे प्रभूचा संदेश देण्यासाठी प्रवक्त्यांची गरज होती. त्यामुळे प्रभू त्यांच्यामधूनच एखादा प्रवक्ता निवडण्याचा विचार करतो.

दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र ७:३२-३५

     पहिल्या शतकात ज्यांचा वाड्निश्चय झाला असेल त्यांनी विवाह करणे अगत्याचे होते. काही कारणाने लगेच विवाह झाला नाही तरी हे वाग्दत वधूवर कायमचे एकमेकांचे बांधलेले असत. घटसस्फोट हाच वाड्निश्चय मोडण्याचे एकमेव साधन होते. वाड्निश्चय झालेल्या काही तरुणांनी आताच विवाह करावा किंवा करू नये असा प्रश्न उपस्थित केला होता. करिंथमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी हा प्रश्न विचारला होता.
     प्रत्येक ख्रिस्ती अविवाहित पुरुषाने प्रभूला संतोष कसा देता येईल तेच पाहावे, तेच त्याचे कर्तव्य आहे; स्वत:ला संतोष देण्याची कल्पना येथे नव्हतीच. विवाहित पुरुष आपल्या पत्नीला संतोष देता यावा हीच खटपट करीत असतो, ख्रिस्ती विवाहात स्वार्थी, आत्म-केंद्रितपणाला मुळीच स्थान नाही. पतीचा निम्मा वेळ पत्नीची मनधरणी करण्यात व निम्मा वेळ प्रभूला संतोष देण्यात खर्च होतो; विवाहामुळे त्याच्यावर आणखी अधिक जबाबदाऱ्या येतात. पाचारणाच्या संबंधात अविवाहित स्त्रीची स्थिती काही वेगळी नाही. पण तिच्या बाबतील थोड्या वेगळ्या प्रकारे बोध केला आहे. तिने देहाने व आत्म्याने प्रभूची एकनिष्ठ असावे. विवाहित स्त्रीनेही स्वत:ला नव्हे तर आपल्या पतीला संतोष द्यावा हेच तिचे कर्तव्य आहे.

शुभवर्तमान: मार्क १:२१-२२

     कफर्णहुम येथील एका सभास्थानात येशूचे ठाम निर्धाराने भाषण ऐकून लोक चकित झाले. येशूचे वक्तव्य त्यांच्या नेहमीच्या शिक्षकांहून अगदी वेगळे होते आणि त्याच्या शब्दांना अधिकाराचे धारधार वलय होते. येशूने जे केले, तो जे बोलला ते पाहून व ऐकून ओळ आश्चर्याने थक्क झाले असे मार्क अनेकदा सांगतो पण त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असे नाही हे ही तो सांगतो.
     येशूचा अधिकार केवळ सभास्थानातील उपासकांनीच ओळखला असे नाही, अशुद्ध आत्म्याच्या कऱ्हात असणाऱ्या एका माणसानेही ते ओळखले. हा माणूस सर्वस्वी शत्रूच्या शक्तीला वश झालेला होता.
     पवित्र शास्त्रात भुते काढणे हा काही जादूटोण्याच्या प्रकार नाही त्यासाठी मंत्रतंत्र अगर नावे उच्चारण्याची गरज नाही, तर संबधित व्यक्तींना येशूची सुवार्ता सांगणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे.

बोधकथा:

     नेल्सन बालपणापासून वडिलांबरोबर जंगलात टोळीत रहात होता. वडील टोळी प्रमुख होते. दक्षिण आफ्रिकेतील कुणु गावात राहणारा हा मुलगा आपल्या संस्कृतीला जपायचा. त्याचे वडील त्याला खूप धाडसी कथा सांगायचे. आपल्या लोकांच्या ह्क्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढण्याची वृत्ती त्याच्या ह्या संस्कृतीच्या प्रेमातूनच निर्माण झाली. गोऱ्या लोकांनी काळ्यांवर कुठेकुठे आणि कसेकसे अन्याय केले आहेत. ह्याची त्याला जाणीव होती. आपल्या जातीजमातीच्या नेतृत्वाची कल्पना त्याला त्याच्या संस्कृतीनिष्ठेतून प्राप्त झाली. त्याचे शिक्षण कँथलिक शाळेत झाले. तिथे त्याचे नाव नेल्सन मंडेला हे देण्यात आले. तो जोहान्सबर्गला आला तेव्हा माणसाला गुराढोरांसारखे वागवतात त्याने पाहिले आणि त्याच्यातील क्रांतिकारक जागा झाला. नेल्सन मंडेलाने आपल्या लोकांच्या हक्कासाठी स्वतःकायदयाचा अभ्यास केला होता. मात्र कायद्याचे प्रशिक्षण लोकांना देण्यासाठी मंडेलाला गावी जाण्यास सरकारने बंदी घातली होती.
     त्याने इतर आफ्रिकन देशात प्रवास केला होता. १९५२ साली तरूण मंडेलाने आपल्या लोकांचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले. आपली लढाई पुढे नेताना १९६४ साली मंडेलाचे कम्युनिस्ट व इतर विरोधी पार्टीबरोबर खटले उडाले होते.
     युरोपच्या गोऱ्या लोकांनी दक्षिण आफ्रिकेवर आक्रमण करून तेथील खनिज संपती लुटून नेली व स्त्रीपुरुषांना गुलाम म्हणून युरोप अमेरीकेत नेले. हा व्यापार चालू ठेवण्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिका ताब्यात घेऊन त्यांच्यावर राज्य केले. माणूस म्हणून त्यांना जगता येत नव्हते. म्हणूनच ह्या गोऱ्या लोकांना हाकलून देण्यासाठी काळ्यांची लढाई चालू होती. महात्मा गांधी तिथे असताना त्यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. इंग्रजांना हाकलून देण्याची मोहीम मंडेलाने सुरु केली तेव्हा त्यालाही २७ वर्षे तुरुंगात काढावी लागली. अनेक संघर्षाना तोंड द्यावे लागले. अग्नी दिव्यातून ते पोळून निघाले. परंतु मरगळलेल्या समाज्याला त्याने जीवन दिले. १९९७ साली त्यांना स्वातंत्र्य लाभले आणि नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष  झाले. १८ जुलै २००८ रोजी ते ९० वर्षाचे झाले.
     नेल्सन मंडेला ह्यांना बी. बी. सी. टी. व्ही. च्या प्रतिनिधीने विचारले, “तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत आणि राष्ट्राध्यक्षांच्या मोहिमेत कसे यशवी झालात?” मंडेला म्हणाले, “दृष्टीकोण सकारात्मक असला की यश धावून येते. मी आशावधी असून यशाचे स्वप्न पाहून अखंड कष्ट करतो.” बी. बी. सी. टीव्हीने त्यांच्यावर अर्धातास कार्यक्रम तयार केला. त्याचे नाव होते, “सकारात्मक दृष्टीकोण ठेवा आणि राष्ट्राध्यक्ष बना” निराशावादी लोक निरर्थक जीवन जगतात नाहीतर आत्महत्या करतात. ह्या दृष्टिकोणामुळे मंडेलांना १९९३ साली शांततेचे नोबेल पारितोषिक लाभले.   

मनन चिंतन:

येशू ख्रिस्त अधिकारवाणीने शिकवतो आणि भूत लागलेल्या माणसाला मोकळे करतो. येशूच्या शब्दामध्ये शक्ती आहे. या शक्तीचा अनुभव लोकांच्या दृष्टीने नवीनच आहे. येशू आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करतो; आपल्या चुकीच्या कल्पना, आपले विचार सुधारतो; खोटे देव आणि फसव्या कल्पना सवयी किंवा अंधप्रथा यांची बंधने झुगारून देतो.
     या नव्या देवराज्याची आपल्या देशाला गरज आहे. प्रस्थापिताविरुद्ध जाण्याची गरज आहे. संपूर्ण जीवन शुद्ध करायला हवं, आपल्यावर अनेक पगडे बसले आहेत. ते सर्व फेकून दिल्याशिवाय देवाच्या अधिकाराची जाणीव होणार नाही. अनेक रूढी आणि परंपरा आपल्याला इतरांपासून दुरावत असतात. माणूस माणसाला ओळखत नाही. देवावर आणि शेजाऱ्यावर असलेले प्रेम ह्यामध्ये दुरावा दिसरून येत आहे. पूर्वी माणूस डोके वर करून चालत होता मात्र आजच्या युगात माणूस चालताना डोके खाली ठेऊन चालत आहे; त्याचा अर्थ असा नाही कि रस्त्यावर अनेक खड्डे आहेत तर माणसाचे लक्ष मोबाईल फोनने वेढलेले आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्याच्यावर आपण दुर्लक्ष करतो.
     जातीच्या नावाखाली आपण माणसांना उच्च-निच मानतो. असंख्य लोकांना जातीच्या गुलामगिरीत ठेवतो. हे भूत झुगारून देणे ख्रिस्ती धर्मालाही जमलं नाही. त्यासाठी अधिकारवाणी आमच्यात निर्माण झाली नाही. ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी संत मदर तेरेसा ह्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्या शब्दांद्वारे आणि कृत्यांद्वारे ह्या रूढी आणि परंपरा लयास लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मानाने सर्वात श्रेष्ठ हा माणुसकीचा धर्म आहे. आपण ख्रिस्ती बांधव आहोत. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवण देते कि आपण देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे आहोत. आपल्याला देवाने त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे. म्हणूनच आपल्याला इतरांमध्ये देव पाहणे अगत्याचे आहे. आपल्याला आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अनैतिक परंपरा थांबवण्याची गरज आहे. कधी-कधी ख्रिस्ती धर्मामध्ये जातीभेद जाणवतो. भारतीयांच्या रक्तामध्येच ते मिसळले आहे. ख्रिस्ताची जीवनमूल्येच आम्हाला नवीन जीवन देऊ शकतात.
     दलितांच्या व आदिवासींचा प्रश्न देशव्यापी आहे. तसा तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. ह्या प्रश्नांना हात घालण्यासाठी आमच्या गुरुजनांकडे अधिकारवाणी असायला हवी.
ख्रिस्ताची अधिकारवाणी त्याच्या निर्मळ जीवनातून तयार झाली होती. त्याची मुळे स्वर्गात होती. या मातीनं त्याला माखलं नव्हतं. आपण बाप्तिस्माद्वारे देवाची मुले बनत असतो. आपल्यालासुद्धा येशूख्रिस्ताप्रमाणे तीन महान देणग्या भेटल्या आहेत. आपण सामान्य धर्मगुरू / याजक बनत असतो; आपण देवाचे प्रवक्ते बनत असतो आणि तसेच आपल्याला राजेपद सुद्धा प्राप्त होत असते. आपल्याला आंतरिक स्वातंत्र्याची गरज आहे. आपल्यामध्ये आंतरिक स्वातंत्र्य नाही म्हणून आमच्या शब्दात दैवी धार नाही. म्हणून अशुद्ध आत्मे हाकलून लावणे आम्हाला कठीण जाते.
     यासाठी प्रापंचिक आणि याजकही यांना अध्यात्मिक तयारी करावी लागेल. ख्रिस्ताच्या शक्तीने प्रेरित व्हावे लागेल. आज ही शक्ती जागी होत आहे हे आपलं भाग्य आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, तुझा शब्द कृतीत आणण्यासाठी आम्हांला शक्ती दे.

१. सर्व जगाला सेवेचा आदर्श देण्यासाठी ख्रिस्ती मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केवळ सेवेसाठी करावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. आपल्या राष्ट्राच्या सर्व राज्यकर्त्यांनी आपल्या जनतेची न्यायाने सेवा करून, आपल्या राष्ट्राची प्रगती करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मगग्रामाच्या बंधू-भगिनींनी आपल्या प्रभू येशूख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची घोषणा गर्विष्ठपणे आणि स्वाभिमानाने न करता, ती नम्रपणाने करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशात शांततेचे, अहिंसेचे आणि माणूसकिचे वातावरण निर्माण करून आपण सर्वांनी इतरांच्या सेवेसाठी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी  प्रार्थना करूया.