Thursday 26 July 2018


Reflection for the Homily of 17th Sunday of Ordinary Time
 (29-07-18) By Br. Lavet Fernandes






सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक – २९-७-२०१८
पहिले वाचन – २ राजे ४:४२-४४
दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ४:१-६
शुभवर्तमान – योहान ६:१-१५

"पाच भाकरी आणि दोन लहान मासे"




प्रस्तावना

       आज देऊळ मात सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्ताने केलेल्या ‘पाच भाकरी व दोन मासे’ ह्या चमत्काराबद्दल सांगत आहे.
       आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, ‘देवाने केलेल्या चमत्काराविषयी सूचित करण्यास आलेले आहे. तसेच देवाचा आपल्या लोकांवर असलेल्या अगम्य प्रेमाचा व सामर्थ्याचा उल्लेख करण्यास आला आहे.
       दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की, जेव्हा आपल्याला देवाच्या प्रेमाचा व सामर्थ्याचा अनुभव येतो व त्यातून जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा आपल्याला शेजाऱ्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त करते.
       आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की, येशू ख्रिस्त सर्वसाधारण वस्तूचा वापर करतो. आणि त्या कृतीद्वारे तो आपल्याला त्याचे अलौकिक प्रेम दाखवून देतो. देवाचा अधिकार व सामर्थ्य अमर्यादित आहे; तसेच देवाचे प्रेम अफाट आहे, त्याला सीमा नाही. जर आपल्याला देवाच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे व त्यासाठी लागणारी कृपा व आशीर्वाद आपण ह्या प्रभू भोजनविधीमध्ये मागूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : २ राजे ४: ४२-४४

       शंभर जणांना जेवण घालणे हे त्यांना शक्य नव्हते. परंतु हे शंभर लोक बहुदा संदेष्ट्याच्या समुदायातील होते. वीस भाकरी फार लहान होत्या व त्या इतक्या जणांना पुरे पडल्या नसत्या म्हणून सेवकाने चकित होऊन प्रश्न केला, तेव्हा देवाने दिलेला संदेश एलिशा सांगतो कि, अन्न भरपूर होईल व त्यातून काही अन्न उरेल. असे देवाने सांगितलेल्या भविष्यवाणी द्वारे घडले.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र : ४:१-६

       यहुदी व परराष्ट्रीय यांना ख्रिस्तामध्ये कसे एक करण्यात आले. याविषयी सांगितल्यावर पौलाने त्यांच्या करिता अशी प्रार्थना केली की, त्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतीने एक व्हावे.
       विश्वासणाऱ्याचे वैयक्तिक आचारण ख्रिस्ताला शोभेल असेच असावे. एकमेकांच्या उणीवा दिसत असल्या तरीही, एकमेकांशी अति नम्रतेने व सौम्येतेने वागा. सहनशिलतेने एकमेकांचे दुःख सहन करा. ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकांस वागवून घ्या. हेच पाचारणास शोभेल असे आचारण आहे. 

शुभवर्तमान – योहान ६:१-१५

कोणतीही परिस्थिती येशू ख्रिस्ताला अवघड वाटत नव्हती. दैवी सामर्थ्याने तो रोग्यांना बरे करी. पाच हजार लोकांना भाकर व मासलीने तृप्त केले. हे देवाचे सामर्थ्य होते. यावरून तेथे जमलेल्या लोकांनी येशू हा देव आहे हे ओळखायचे होते. या उद्देशाने येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केला. म्हणून त्यास चिन्ह म्हटले आहे. तरी त्या लोकांनी त्याचे दैवत्व मानले नाही ते त्याला फक्त संदेष्टा म्हणत.
तो देव आहे व हजारों लोकांस अन्न देण्यास समर्थ आहे यावर शिष्यही विश्वास ठेवत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने त्या पाच भाकरी हातात घेतल्या व देवापित्याचे आभार मानले. तो त्या मोडत राहिला. त्याने आपले सामर्थ्य प्रकट केले. सर्वजण जेवून तृप्त झाले. हाच प्रभू आपल्या गरजा पुरवून शांती व समाधान देतो.

बोधकथा

जर्मनी मध्ये हुकुमशहा अडोल्फ हिटलर याच्या राजवटीत युद्ध कैद्याच्या बराचश्या छावण्या होत्या. त्यांना राजकीय कैद्याचे कोंडवाडे म्हणता येईल. त्या छावण्यामध्ये दोन हजार लोकांना शेळ्या-मेंढ्याप्रमाणे कोंडून ठेवले जात असे.
तेथे कमी खाणेपिणे दिले जात असे. दिवस भर चाबकाचे फटके खाऊन त्यांना भरभर काम करावे लागत असे. दररोज त्या छावणीतले प्रत्येकी १० लोक मारले जाऊन त्यांना खंदकात फेकून दिले जात असे व तिथे त्यांची मृत शरीरे पेट्रोल टाकून पेटवली जात असत. तरी दिवसा उन्हात काम करीत असताना त्यातले काही कामगार जोखीम घेऊन तेथून पळून जात असत. एकदा संध्याकाळी काळोख पडल्यावर त्यातले ६० कैदी सटकले. जेलरच्या ते खूप उशिरा लक्षात आले. तेव्हा त्यांनी १५ की.मी अंतर कापले असेल. त्यांचे घर १५० ते २०० कि.मी अंतरावर होते. ते सर्व अंतर ४८ तासात चालून चालून कापायचे होते आणि आपल्या घरी पोहचायचा चंग त्यांनी बांधला होता. आणि ४८ तासात ते अर्धेमेल्या अवस्थेत ते ६० जण आपल्या गावी पोहचले. भुकेने कासावीस होऊन थकलेल्या त्या लोकांच्या अंगात उभे राहण्यास ताकद नव्हती. त्यांच्या लोकांनी त्यांना ओळखून त्यांची सेवा करायला सुरुवात केली. त्यांना योग्य आराम व झोप काढायला लावली. आणि मध्यंतरच्या काळात त्यांच्या करिता जेवणावळ करायला सुरुवात केली परंतु त्या सर्वांनी एकमताने असे सांगितले की तुम्ही आमच्याकरिता जेवणावळ तयार कराच परंतु देवळातल्या फादारांना बोलावून आमचं पापनिवेदन ऐकण्याची व पवित्र मिस्सा करण्याची प्रथम व्यवस्था करा. कारण गेले वर्षभर आम्हाला पवित्र आत्म्याची भाकर अजून मिळालेली नाही. म्हणून आम्ही प्रथम आत्म्याची भाकर खाऊ आणि नंतर शरीराची भाकर म्हणजेच तुम्ही जी जेवणावळ करणार आहात ते पोटभर खाऊ.

मनन चिंतन


आजच्या शुभवर्तमानात आपण पाहत आहोत कि, येशू ख्रिस्ताकडे फक्त पाच भाकऱ्या व दोन मासे होते. तरीसुद्धा त्याने पाच हजार लोकांना जेवण दिले. कारण येशू ख्रिस्ताने लोकांची गरज ओळखली होती. आणि त्याच्याकडे लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार होता.
१.     येशू ख्रिस्ताला मनुष्याची प्रत्येक गरज माहित असते.
जेव्हा ख्रिस्ताने पाहिले कि, मोठा समुदाय त्याच्याकडे येत होता, तेव्हा त्याने फिलीपला विचारले कि, आपण ह्या लोकसमुदयासाठी जेवण कोठून आणणार? ते संपूर्ण दिवस आपल्या बरोबर आहेत. शिमोन म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ पाच भाकऱ्या आहेत. परंतु त्या सर्वांना कशा पुरणार? तेव्हा येशूने त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व सर्वांना ते वाटले.
२.     येशू ख्रिस्त आपली गरज भागवत असतो.
येशू ख्रिस्त आपल्या आध्यात्मिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करत असतो. ह्या सर्व गरजा देवासाठी फार लहान आहेत. येशूने हजारों लोकांना जेवण दिले; वादळ शांत केले; तसेच आपण लूकलिखित शुभवर्तमानात १:३७ मध्ये पाहतो कि, “देवाला काहीच अशक्य होणार नाही.” येशू ख्रिस्ताने खूप चमत्कार केले. जेव्हा कानागावी द्राक्षरस संपला होता तेव्हा त्याने पाण्याचे रुपांतर द्राक्षरसामध्ये केले. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, एका मुलाने पाच भाकऱ्या व मासे दिले आणि त्याद्वारे ख्रिस्ताने पाच हजार लोकांना जेवण दिले. येशू ख्रिस्ताने काही वस्तू शुन्यातून निर्माण केल्या असत्या, परंतु त्याने तसे केले नाही कारण ते त्याचे मिशनकार्य नव्हते. तो नवीन व्यवस्था किंवा रचना करण्यासाठी आला नाही तर जुन्या गोष्टींचे नुतनीकरण करण्यासाठी आला होता. जी मेंढरे हरवली होती व जे आजारी होते त्यांना शोधण्यासाठी व बरे करण्यासाठी आला होता.
३.     जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनात येतो तेव्हा काहीच कमी पडत नाही.
जर प्रभू येशू आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला तर आपल्या जीवनात सुंदर गोष्टी घडत असतात. ह्याविषयी अनेक उदाहरणे बायबलमध्ये पाहावयास मिळतात.
येशू ख्रिस्त गनेसरेत समुद्राच्या किनाऱ्याशी असताना शिमोनला म्हणाला कि, मासे धरण्यासाठी तुम्ही आपले जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला व जाळी फाटू लागली (लुक ५:१-६). जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनात वस्ती करतो तेव्हा तेथे भरपूर असते.
आजचे शुभवर्तमान सांगते कि, पाच हजार लोक जेवल्यावरही बारा टोपल्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या. जेव्हा येशू ख्रिस्त प्रवेश करतो तेव्हा तेथे पुष्कळ प्रमाणात सर्व काही उपलब्ध होते. प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतो व तो आपली काळजी घेतो. मत्तय ६:२६ मध्ये येशू ख्रिस्त सांगतो कि, “आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे.” त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तर चिंतन करा आणि देवावर विश्वास ठेवा.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद:- हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१.     आज आम्ही ख्रिस्तसभेसाठी प्रार्थना करितो, विशेषकरून पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे; त्यांना सर्वांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व देवाची सुवार्ता त्यांनी जगाच्या काना कोपऱ्यात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     जे लोक आजारी आहेत त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा आणि ते लवकरात-लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
३.     जे युवक व युवती देवापासून दूर गेलेले आहेत व ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही, अश्या सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.     समाजामध्ये ज्या लोकांना न्याय मिळत नाही त्यांना ख्रिस्ताच्या कृपेने न्यायाचे वरदान मिळावे व त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबावे आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाने व आदराने समाजामध्ये जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५.     थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.




Thursday 19 July 2018




Reflection for the Homily of 16th Sunday of Ordinary Time 
(22-07-18) By Br. Camrello D’Mekar





सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक : २२/७/२०१८
पहिले वाचन : यिर्मया २३: १-६
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र  २: १३-१८
शुभवर्तमान : मार्क ६: ३०-३४




ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते!

प्रस्तावना

    ख्रिस्ताठायी जमलेल्या भाविकांनो, आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या वाचने आपल्याला येशू ख्रिस्त हा खरा मेंढपाळ आहे ह्याची जाणीव करून देतात.
    आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यिर्मया सांगत आहे कि, जे कळपांचं रक्षण करीत नाहीत अशा मेंढपाळाचा देव निषेध करतो आणि चांगले मेंढपाळ पाठवण्याचे वचन तो आपल्याला देतो. इफिसकरांस पाठवलेल्या पत्रात संत पौल सांगत आहे कि, आपल्या मरणाने ख्रिस्त यहुदी आणि परकीय यांच्यातील भेदाची भिंत दूर करतो आणि सर्वांना देवाची मुले होण्याचा अधिकार देतो. शुभवर्तमानात येशूला त्याच्या शिष्याविषयी असलेली काळजी आणि लोकांविषयी असलेली चिंता ह्याचे नाट्यमय दर्शन आम्हांला घडवते.
आपणही आपल्या जीवनात मेंढपाळांसारखे आहोत. आपल्या कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मेंढराप्रमाणे आपण एकमेकांवर अवलंबून असतो आणि इतरांची मदत आपल्याला हवी असते. प्रभू येशूचा आशिर्वाद आपल्यावर यावा म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलिदानात मध्ये प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : यिर्मया २३:१-६

       संदेष्टा यिर्मया वारंवार आपले संदेश राजांना उद्देशून सांगत असे. लोकांचे धार्मिक जीवन सुव्यवस्थित ठेवण्याची विशेष जबाबदारी राजाचीच असे. या संदर्भात यिर्मयाचे कार्य विशेष लक्षणीय आहे. राजे हे एका मेंढपाळा प्रमाणे असावेत, असे त्याचे म्हणणे होते. देवांच्या लोकांसाठी अधिक चांगला भविष्यकाळ असेल. तो स्वतःच आपला मेंढपाळ असणार. तो आपले मेंढपाळाचे काम विश्वासू नेत्यावर सोपवून देईल. याशिवाय, दाविदाचे ऐतिहासिक राजघराणे संपुष्टात आले असले तरीही, दविदाच्या घरण्यात असा एक नवा राजा उदयास येईल, जो अगदी दाविदा सारखा असेल. देव आमची धार्मिकता’, हे त्याचे नाव मूळ हिब्रूमध्ये सिद्कीयनावाशी जुळणारे आहे. पण या राजाला हे नाव खरोखर सर्वार्थांनी साजेसे असेल. आणि हा राजा हे नाव खरोखर सत्याने धारण करील. यिर्मया येथे दाविदाचा मसीहाकडे (येशू ख्रिस्त) पाहतो आहे. त्याचा जन्म इस्त्राईलच्या तारणासाठी असेल.


दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र २:१३-१८

   जे यहुदी नव्हते त्यांनी सत्याचे वचन म्हणजे सुवार्ता ऐकली. सुवार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला तेव्हाच ते ख्रिस्ताचे झाले. त्यांना ख्रिस्ताने जीवन दिले व ते देवाचे झाले. हा देवाचा मालकी हक्क दाखविण्यासाठी पवित्र आत्म्याचा शिक्का त्यासमयी त्यांच्यावर मारण्यात आला. हा पवित्र आत्मा आता व पुढे मिळणाऱ्या सर्व आशिर्वादाची हमी असा आहे.
इफिस मधील सर्व बंधूजनांना देवाच्या कृपेने ख्रिस्तात मिळालेले अशिर्वाद किती महान होते. देवाने आपल्याला कशाला पाचारण केले या प्रश्नाचे उत्तर देवाच्या ओळखीनेच मिळणार होते. देवाविषयी अधिक कळण्यासाठी आणि त्याचे विचार व मार्ग ओळखण्यासाठी आत्मिक दृष्टीची गरज आहे. ख्रिस्तामध्ये देव किती अगणित आशिर्वाद देत आहे हे पाहण्यासाठी सुदृष्टी हवी आहे.

शुभवर्तमान : मार्क ६:३०-३४

   शुभवर्तमानकार मार्क शिष्यांच्या परत येण्याविषयी सांगत आहे. येशूचे शिष्य त्यांचा अनुभव येशुकडे कथित करीत होते. येशूने त्यांच्या कथा ऐकून घेतल्यावर त्यांना सांगितले कि, एका निवांत आणि शांत स्थळी जाऊन विसावा घ्या. येशू आणि शिष्य मचव्यात बसून एकांतात राहण्यासाठी निघून गेले. पण त्या ठिकाणी सुद्धा लोकांचा समुदाय जमला होता. त्यांना एक मेंढपाळाची गरज होती. म्हणूनच येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवण दिली. शिष्यांनी केलेले चमत्कार आणि सुवार्तेचा केलेला प्रचार आणि कोणकोणत्या खेडे-शहरामध्ये त्यांचे शिष्य गेले होते त्याचा सविस्तर तपशील ते येशूला देत होते. केलेल्या ह्या कामामुळे त्यांना एक मानव म्हणून थकवा आलेला असेलच, ह्याची जाणीव आपल्याला होते. परंतु येशू आपल्या सुखाची व स्वतःच्या आरामावर लक्ष केंद्रित न करता लोकांना शिकवण देण्यास सुरवात करतो. येशू ख्रिस्त निःस्वार्थी आणि निःपक्षपाती मेंढपाळ आहे असे आपल्या निदर्शनास शुभवर्तमानकार आणून देतो. 

मनन चिंतन

  जेव्हा लोकांचा समुदाय येशुजवळ आला, येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवायला सुरवात केली. येशू ख्रिस्ताने लोकांना निराश केले नाही मात्र त्यांना त्याच्याभोवती जमवले. हि वेळ रविवारच्या मिस्सेचे चिन्ह आहे आणि रविवारची मिस्सा-बलिदान देवाच्या राज्याचे चिन्ह आहे.
   प्रत्येक धर्म-ग्रामामध्ये वेगवेगळी भाषा, रीतीरिवाज आणि संस्कृती जोपासणारे गरीब, श्रीमंत, वृद्ध, तरुण, कामगार-मालक असे सर्व एकत्र मिस्साबलीदानासाठी जमत असतात. काही व्यक्ती काही कारणस्तव टिव्हीवरील मिस्सा पाहत असतात. जिथे लहान बालके मिस्सा सुरु असताना रडत नाहीत; साऊंड सिस्टम योग्य असते; त्यात काही अडथळा येत नाही प्रत्येक गोष्ट वेळेवर केली जाते. मात्र देवाचे राज्य, ज्याचे बीज ख्रिस्तसभा आहे ते मात्र ह्या टिव्हीवरच्या कार्यक्रमापेक्षा मोठे आहे. येशू ख्रिस्त प्रत्येकाला आपल्या जवळ घेतो. त्याच्या मध्ये कोणताही भेदभाव नाही. जेव्हा आपण येशूच्या सानिध्यात येतो तेव्हा आपल्या जीवनात बदल घडून येतात. कदाचित आपल्याला काळजी घेण्याची दक्षता आहे कि, आपले पवित्र बलिदान हे सर्व ख्रिस्तीवासियांचे केंद्रबिंदू बनले पाहिजे. प्रवक्ता यिर्मया ह्याने सांगितल्याप्रमाणे देवाचे राज्य दुभागले जात आहे. त्याच्या मध्ये फूट पडत आहे. जेव्हा आपण ख्रिस्त यागासाठी एकत्र जमत असतो, तेव्हा येशू ख्रिस्त आपल्याला एका मेंढपाळाप्रमाणे जवळ घेतो. पवित्र मिस्साबलिदानाचा  कधीही शेवट होणार नाही जो पर्यत आपण येशूच्या बरोबर पवित्र मेजवानीसाठी एकत्र येतो. पवित्र मिस्साबलीदानास एक विशिष्ठ जागा आहे. जेथे आपण वेगवेगळ्या आचार-विचारांची माणसे एकत्र येऊन पुन्हा एकदा आपण आपली आशा आणि श्रद्धा प्रगट करतो. देवाचे मंदिर ही एक जागा आहे. जेथे आपण एकत्र येऊन दुसऱ्यांच्या बाजूला येऊन बसतो. ज्याचे नाव सुद्धा आपल्याला माहित नसते. मात्र आपल्याला ठाऊक असते की त्या व्यक्तीला पवित्र बाप्तिस्म्याद्वारे येशुख्रिस्ताने अभिषेक केला आहे.
       मिस्सा संपण्याअगोदर आपण विचार करायला हवा की, आपण सर्वजण परिपूर्ण (perfect) नाही. समाजाला न्याय मिळावा म्हणून खटपट करू पण मात्र दुसर्यांना क्षमा का करावी ह्याविषयी विचार करत राहू! आपण ख्रिस्तसभेची शिकवण, तिचे नियम तंतोतंतपणे पाळत राहू पण स्वःताच्या जीवनात प्रभू येशूचे अस्तित्व कितपत जपत राहू !  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

1.       आपल्या ख्रिस्त सभेचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्यांना ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेण्यास चांगले आरोग्य आणि पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
2.       आपले पालक वर्ग जे आपल्या मुलाचे पालनपोषण करून त्यांना चांगले शिक्षण देऊन घडवण्याचे कार्य करतात, त्यांनी आपल्या मुलांना चांगली मुल्ये आणि शिक्षण देऊन त्यांना भविष्यात सुसंस्कृत नागरिक होण्यास प्रोस्ताहान करावे म्हणून प्रार्थना करूया.
3.       आपल्या देशाचे कार्य सांभाळणारे कार्यकर्ते ह्यांनी लोकांची सेवा करून आपले काम जबाबदारीने पार पाडावे आणि समाजात शांतीचे वातावरण निर्माण करण्यास त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थन करूया.
4.       आपल्या धर्मग्रामातील गरीब, आजारी आणि गरजवंत लोकांना मदत करण्यास त्यांना चांगले जीवन जगण्यास आणि मानवप्रिती दर्शविण्यास जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे आणि त्यासाठी लागणारे धैर्य त्यांना मिळावे म्हणून प्रार्थना करूया.
5.       यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या काम-धंद्यात कोणतेही व्यत्यय येऊ नयेत आणि पुढच्या काळासाठी पाण्याची साठवण करून पाणी योग्य प्रकारे वापरला जावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


Thursday 12 July 2018


Reflection for the Homily of 15th Sunday of Ordinary Time (15-07-18) By Br. Brandon Noon






सामान्य काळातील पंधरावा रविवार


दिनांक – १५-०७-२०१८
पहिले वाचन: आमोस ७:१२-१५
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र १:३-१४.
शुभवर्तमान: मार्क ६:७-१३




येशूने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून सुवार्ता सांगण्यास पाठविले

प्रस्तावना

आज आपण सामन्य काळातील पंधराव्या रविवार मधे पदार्पण करीत आहोत. आजची उपासना आपणास देवाची सुवार्ता पसरविण्यास आमंत्रण करीत आहे. आजच्या तिन्ही वाचनात आपणाला प्रभू परमेश्वराने केलेल्या महान अशा कार्याचे गुणगान व ख्रिस्ताची शांती संपूर्ण जगभरात कशा प्रकारे पसरावी याविषयी सांगितले आहे.
     पहिल्या वाचनात संदेष्टा आमोसला सांगण्यात आले आहे कि, “जा, माझ्या लोकानां इस्त्राईल मध्ये जाऊन सुवार्ता सांग.” शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या प्रिय शिष्यांना आशिर्वाद सह  अधिकार देऊन प्रेषित कार्य करण्यास पाठवत आहे.
आज देऊळमाता आपण सर्वांना या मिशन कार्यामध्ये सक्रीय सहभाग घेण्यास बोलावत आहे. म्हणून आजच्या या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना, प्रार्थना करूया कि, प्रभुने आपणां सर्वांना सामर्थ्य व कृपा द्यावी जेणेकरून आपण सर्वजण ख्रिस्तसभेच्या मिशन कार्यात सतत कार्यरत राहू. आमेन.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: आमोस ७:१२-१५

पहिल्या वाचनात अमासिया, आमोस ह्या संदेष्ट्याला त्याच्या देशात परत जाण्यास सांगतो; कारण शलमोन राजाच्या मरणाअगोदरच इस्रायलची दोन भागांमध्ये विभागणी झाली होती; यहुदी आणि इस्रायल.
     आमोस हा यहुदिया प्रांतातून इस्रायल प्रांतात देवाची शुभसंदेश सांगण्यासाठी आला होता. पण आमोस अमासियाला सांगतो की, मी स्वतःहून आलो नाही, तर देवाने मला त्याची सुवार्ता सांगण्याकरिता पाठविले आहे.
     आमोस इस्रायल प्रांतात धन-दौलत मिळवण्यासाठी आला नव्हता; कारण मेंढपाळ म्हणून तो त्याच्या कार्यात आनंदी होता. आमोस हा उपदेशक नव्हता, अर्थात संदेष्टा बनणे हे त्याच्या विचारापलिकडचे होते, परंतु देवाने त्याला पाचारण केले आहे असे तो ठामपणे सांगतो व देवाचा संदेश देत इस्रायलच्या काना कोपऱ्यात फिरतो, हे आमोसाचे उदाहरण लक्षणीय आहे.

दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र १:३-१४.

     संत पौल इफिसकरांस ईश्वस्तवन करण्यास सांगतो, कारण देवाने आपणा सर्वांना येशूच्या रक्ताने त्याची लेकरे (दत्तक) म्हणून स्विकारले आहे. अर्थात ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या पवित्र आत्म्याचे वतनदार झालो आहोत. आणि देवाचा कृपाशिर्वाद आपणावर सदैव हजर आहे. पुढे संत पौल म्हणतो की, ज्या ख्रिस्तावर आपण पूर्वीपासून आशा ठेवली आहे, त्या येशूचा गौरव आणि महिमा गाणे अवश्य आहे.
     आपण ऐकलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. ख्रिस्ताने आपणावर पवित्र आत्मा पाठवून शिक्का मोर्तब केला आहे. ख्रिस्तामुळेच आम्हांला मुक्ती मिळाली आहे.

शुभवर्तमान: मार्क ६:७-१३

     अविश्वास असला तरीही सुवार्ताप्रसाराचे कार्य पुढे चालू ठेवणे आवश्यक होते, म्हणून येशूने बारा जणांना या कामगिरीवर पाठवले. प्रेषितांनी बरोबर काय घ्यावे, कोणती वस्त्रे घालावी वैगेरे शुभवर्तमानाच्या तपशिलात वर्णिले आहे त्यात कदाचित फरक आहे; पण ते इतके महत्त्वाचे नाही. प्रवासात जास्त ओझे घ्यायचे नाहीहे सूत्र सर्वांनीच सांगितले आहे. सुवार्ताप्रसाराचे कार्य शिरावर घेतलेल्या व्यक्तींनी अन्नपाणी, मुक्कामाची जागा वैगेरे गोष्टींची उगाच चिंता करू नये. आपल्यावर सोपवलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यात श्रोत्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न गुंतला आहे हे त्यांनी कायम मनात ठेवले पाहिजे. यहुदी लोक परक्या ठिकाणी गेले तर तेथून परताना अनेकदा तिकडची धूळ तिकडेच झटकून टाकीत. पण या प्रसंगी त्यांनी सुवार्ता नाकारल्याचे चिन्ह, रीतसर साक्ष म्हणून ते करायचे होते.
या बारा जणांना येशूने भुते काढण्याचे सामर्थ्य दिले. तथापी सुवार्तेची घोषणा करणे हेच त्यांचे मुख्य कार्य होते हे आपणाला १२वीमध्ये दिसते. ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली.ह्या घोषनेतूनच भुते काढणे व आजाऱ्यांना बरे करणे ही कार्य होतात. तेलाभ्यंग करणे हे येथे प्रतीकात्मक आहे.

बोधकथा

एकदा एक मनुष्य रस्त्यावरून जात असताना त्याने रस्त्यावरील सिग्नल जवळ एक लहान मुलगी भिक मागत असताना पाहिली. तो व्यक्ती मनात राग व्यक्त करत घरी आला आणि देवाला दोष देत म्हणाला, “हे देवा तुला काहीच वाटत नाही का? अतिशय गरीब मुले रस्त्यावर उपाशीपोटी भिक मागत आहेत, तू त्यांना का निर्माण केलेस?” देवाने त्यास उत्तर देत म्हटले, “मी त्यांच्यासाठी तुला निर्माण केले.”

मनन चिंतन

आजची उपासना आपण सर्वांना,परमेश्वराची हाक कशी येते व परमेश्वराचा संदेश संपूर्ण जगभरात कशाप्रकारे पसरावा ह्यावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण करत आहे. आज आपण जगात जर पहिले तर आपणाला समजून येईल की, जो तो शिक्षणाच्या मागे लागला आहे. प्रत्येकाला वाटते की, मी कुणीतरी मोठा होऊन चांगल्या पदवीवर असावा. त्यासाठी चांगले शिक्षण देण्यासाठी आई-वडीलही अतोनात प्रयत्नात असतात. दुसरीकडे आपणास दुष्टीस पडते की, परमेश्वर हाक देताना निःपक्षपाती आहे. तो माणसाचे अंतकरण पाहतो. परमेश्वराला ठाऊक आहे की , सर्व निवडलेले शिष्यगण प्रामाणिक आहेत.
पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वर संदेष्टा आमोस ह्याला बोलावतो. अमोस हा मेंढपाळ होता. तरीही परमेश्वराने  त्याला बोलावले. जेणेकरून तो आपल्या लोकांचा मेंढपाळ होईल. जसा मेंढपाळ मेढऱ्यांची काळजी घेतो त्याचप्रमाणे आमोसला इस्त्राईल लोकांची काळजी घेण्यास बोलावले होते.
आजही परमेश्वर अशा लोकांना त्याच्या मळ्यामध्ये कार्य करण्यासाठी बोलावत आहे. कितीतरी धर्मगुरु, धर्मभगिनी किंवा धर्मबंधू परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत. त्यांनी कधीही त्यांच्या जीवनात मी धर्मगुरू किंवा धर्मभगिनी होईन असा विचार केला नाही. परंतु सर्वकाही परमेश्वराच्या योजनेप्रमाणे त्यांच्या जीवनात घडले.
जेव्हा आपण कुठल्याही दूर प्रवासासाठी निघतो तेव्हा जाण्या अगोदर आपणास मार्गदर्शन केले जाते. उदा. येताना गरजेच्या वस्तू घेऊन योग्य ठिकाणी येण्यास सांगितले जाते. अशाचप्रकारे शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मिशन कार्यासाठी जाण्यापूर्वी मार्गदर्शन करत आहे. प्रभू येशु त्यांना जोडी-जोडीने पाठवतो. व वाटेसाठी काठीवाचून काही न घेण्यास सांगत आहे. ज्या घरात तुम्ही जाल, तेथे जर तुमचे स्वागत नाही केले तर त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुमच्या तळपायाची धूळ तेथेच झटकून पुढे जा, असे सांगतो आहे.  
आपण आज पुढील तीन गोष्टीवर मनन चिंतन करूया.
१.                 काठीवाचून दुसरे काही घेऊ नका:
येशू ख्रिस्त काठी घेण्यास शिष्यांना सांगत आहे. कारण काठीचा उपयोग डोंगराळ भागात चालण्यासाठी होतो. पैसे व भाकर न घेता देवावर परिपूर्णपणे अवलंबून राहण्यास सांगत आहे. परमेश्वराने तुम्हाला निवडले असल्याने तोच तुम्हाला सर्वकाही पुरवील. व त्यांना देवाराज्याची घोषणा करण्यास, लोकांना पश्चाताप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगत आहे.
२. जोडी-जोडीने जा:
 जर परमेश्वराने एकेकट्याला पाठवले असते तर ते बारा जण बारा ठिकाणी गेले असते परंतु जोडी जोडी ने पाठवल्याने फक्त सहा ठिकाणी पोहचू शकले. येशू ख्रिस्ताची काही तरी योजना होती. जर ते दोघे गेले तर काम लवकर होईल व दोघे आळी-पाळीने कार्य करतील.
       उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचले आहे की, जेव्हा आदम एकटा होता तेव्हा एवाची निर्मिती केली. आणि हे उदाहण आपण फक्त लग्नाच्या वेळेला देत असतो. परंतु प्रत्येक मनुष्याला जोडीदाराची गरज असते. प्रत्येकाला मित्र असतात. अध्यात्मिक जीवनातही साथीदाराची गरज असते. जेणे करून आपण एक दुसाऱ्याला मार्गदर्शन करू शकतो. प्रार्थना करू शकतो. जर काही चुकलं असेल तर चूक समजावून देऊ शकतो. कुटुंब हे दोघा किंवा तिघांनीच पूर्ण होते असते म्हणून आपणा प्रत्येकाला आध्यात्मिक जीवनात जोडीदाराची गरज असते. म्हणूनच येशू ख्रिस्ताने दोघां-दोघांना पाठवले.
२.                 तळपायाची धूळ तेथेच झटकून टाका:
आपण जेव्हा कुठलेही काम करत असतो तेव्हा आपणाला यश येईलच असे नाही. कधी कधी आपल्याला अपयशही येऊ शकते. परंतु जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा आपण खचून न जाता आपण पुढचा मार्ग निवडणे गरजेचे आहे. आणि जर आपण अपयशाला धरून बसलो तर आपण पुढे जाणार नाही.
त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे कि, जेव्हा लोक तुमचे ऐकणार नाहीत तेव्हा तुम्ही नाराज होऊ नका, तर तो अपमान तिथेच सोडून पुढे चला व ज्यांना अध्यात्मिकतेची तहान लागलेली आहे, जे प्रभू शब्दांसाठी आतुर आहेत त्यांना जाऊन सुवार्ता सांगा. येशू ख्रिस्ताने हे मार्गदर्शन फक्त धर्मगुरु व धर्मभगिनी ह्यांना दिलेले नाही तर सर्वांना दिलेले आहे. आणि आपण सर्वांनी आपल्या परीने आपल्या घरी, शेजोळात व सर्वत्र अंगी बाळगणे गरजेचे आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1.  आपल्या ख्रिस्तसभेचे आधारस्तंभ परमगुरु, महागुरू, धर्मगुरू यांनी प्रेषित कार्य करण्यास प्रयत्न करावे, यासाठी त्यांना परमेश्वराकडून शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.
2.  आजच्या तरुण पिढीने प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी ईश्वरी पाचारणाला प्रतिसाद द्यावा म्हणून प्रार्थना करूया.
3.  आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांचे आजार व दुःखे हलकी व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
4.  आपल्या देशातील राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या समाजातील गरीब लोकांसाठी विकासाची कार्य करावेत व त्यातून खरा समाज बांधावा, म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.
5.  आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतू साठी प्रार्थना करूया.