Saturday 30 March 2019

Reflection for the Homily of 4th SUNDAY OF LENT (31-03-19) By Br. Lipton Patil  







उपवास काळातील चौथा रविवार

पहिले वाचन: यहोशवा ५:९अ-१२
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२१
शुभवर्तमान: लूक १५:१-३, ११-३२
दिनांक:३१/०३/२०१९ 





विषय: अंधारातून प्रकाशाकडे, सैतानाकडून ख्रिस्ताकडे व ख्रिस्तामध्ये...

प्रस्तावना:
आज आपण प्रायश्चित काळातील चौथ्या रविवारात पदार्पण करीत आहोत. आपण देवाच्या क्षमेचा, दयेचा व अस्सिम प्रेमाचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला निमंत्रण देत आहे.
यहोशवाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणाला कळून येते की, इस्रायली लोकांनी जुनी जीवनपद्धती सोडून नवीन जीवनाला प्रारंभ केला. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात सांगतो की, परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे आपला स्वतःबरोबर समेट केला. जर कोणी ख्रिस्ता ठायी असेल, तर तो नवीन उत्पत्ती आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात उधळ्या पुत्राच्या दाखल्याबद्दल आपण ऐकणार आहोत. आपण सुध्दा आपले जीवन उधळ्या पुत्राप्रमाणे जगून देवाच्या प्रेमापासून दूर गेलो आहोत, परंतु आज देवाच्या प्रेमाचा स्वीकार करण्याची ती वेळ आली आहे. उधळ्यापुत्राप्रमाणे जेव्हा आपण पश्चातापी अंतःकराणाने परमेश्वराकडे धाव घेतो, तेव्हा तो दयाळू बाप आपला स्वीकार करण्यास सतत तयार असतो.
म्हणून पश्चातापी अंतःकराणासाठी आजच्या पवित्र मिसा बलिदानात भक्तीने सहभागी होताना प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहोशवा ५:९अ-१२
          इस्रायली लोक जेव्हा इजिप्त देशातून मुक्त होवून एलीस व सिनाय ह्यांच्यातील सीन नावाच्या वाळवंटात आले, तेव्हा त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली. लोक मोशेला म्हणाले की, येथे आम्ही उपाशी मरावे म्हणून तू आम्हाला ह्या वाळवंटात आणले आहेस का? तेव्हा देवाने इस्राएली लोकांना मान्ना दिला. अन्नाचे नाव मान्ना ठेवले, कारण ते तांदळासारखे पांढरे शुभ्र दिसत होते व चवीला मधासारखे होते. काही काळानंतर म्हणजे मोशेच्या मृत्युनंतर यहोशवाने इस्रायली लोकांना कानन देशात आणून व तो प्रदेश ताब्यात घेतला ज्यात दुधामधाच्या नद्या वाहत होत्या. इस्रायली लोकांनी गीलगालात तळ दिल्यावर व्हलांडणाचा सण साजरा केला. व्हलांडण सणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात उत्त्पन्न झालेल्या धान्याची भाकर व हुरडा त्यांनी खाल्ला. त्या दिवसापासून ते देवावर व देवाने पाठविलेल्या अन्नावर अवलंबून राहिले. देवाने दिलेले अन्न इस्रायली लोकांनी खाल्ले व मान्ना बंद झाला व पुन्हा इस्रायली लोकांना मान्ना मिळाला नाही. मग तद्नंतर, इस्रायली लोक वतनभूमीत आले व तेथे त्यांनी नवीन जीवन जगण्यास सुरुवात केली, जुने ते सोडून दिले.

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७-२१
          संत पौल व करिंथकरांतील लोकांमध्ये तणावाचे संबंध झाले होते. काही लोकांनी संत पौलावर हल्ला करून, तो खोटा प्रेषित असल्याचा दावा केला होता. संत पौलवर खूप अन्याय झाला होता, परंतु अशा परिस्थितीत तो लोकांना जवळ बोलवून घेतो असे ह्या पत्रात दिसून येते. तो लोकांना श्रध्देचे जीवन जगण्यास आमंत्रण करतो व म्हणतो, आपली देवाशी मैत्री ही ख्रिस्तामुळे झाली आहे. परमेश्वराने ख्रिस्ताबरोबर समेट केला आहे. तो नवी निर्मिती आहे. आपल्या पापांसाठी देवाने त्याला पापी असे गणले. प्रभू मध्ये नीतिमान जीवन जगून ख्रिस्ताच्या एकीत राहावे अशे संत पौल नव्याने ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यास सुरुवात करायला सांगत आहे. जुने ते गेले, आता नव्याची सुरुवात झाली आहे.

शुभवर्तमान: लूक १५:१-३, ११-३२
          प्रभू येशूच्या काळात जकातदार, शास्त्री व परुशी हे भ्रष्टाचाराचे जीवन जगत होते. स्वतःला पवित्र व महान समजत व दुसऱ्यांकडून मान व सन्मानांची अपेक्षा करीत असत. जकातदार, शास्त्री व परुशी ख्रिस्ताबद्दल नेहमी कुरकुर करत असत की, ख्रिस्त पापी लोकांचा मित्र व साथीदार आहे. त्यांच्याबरोबर जेवायला बसतो व सामील होतो. असे काही बोलत असताना येशू त्यांना काही दाखले देतो: हरवलेले मेंढरू, नाणे व मुलगा जेणेकरून दैवीकरुणेचा अनुभव जकातदार लोकांना येणार. देव दयाळू व ममताळू आहे. जकातदार म्हणत की. चांगले केल्यास आशीर्वाद व वाईट केल्यास शिक्षा भोगावी लागते. परंतु येशू सांगतो की, पश्चाताप करा व देवाकडे वळा, देव अत्यंत मायाळू व कनवाळू आहे. 

बोधकथा:
एका गावात एका जोडप्याला दोन मुली होत्या. ह्या दोन्ही मुली फार गुणी होत्या. त्या आई-वडीलांच्या आज्ञेत राहत असत. एके दिवशी छोटी मुलगी तिच्या आई-वडिलांना सांगते की, मी आसिक नावाच्या मुलावर प्रेम करते. मला त्याच्या बरोबर लग्न करायचं आहे. आई-वडीलानी खूप विरोध केला परंतु, छोट्या मुलीने ऐकले नाही. तिने पैसा संपत्ती घेऊन असिक नावाच्या मुलाबरोबर ती पळून गेली. काही दिवसांनतर आसिक तिला खूप त्रास द्यायला लागला. तिची मारहाण करू लागला व जे काही तिने पैसा व संपत्ती आणली होती ती सर्वकाही तिच्याकडून घेऊन तिला एकटी सोडून तो निघून गेला. अशा परिस्थितीत ती एकटीच राहत होती. तिला व्यवस्थित जेवायला जेवण मिळत नव्हते. तिला कुणाचा आधार नव्हता. अशावेळी तिला तिच्या आई-वडिलांची आठवण  येते व केलेल्या चुकीबद्दल तिला पश्चाताप होतो. दुःखी व निराग्रस्त मन घेऊन ती तिच्या आई-वडिलांकडे जाते व क्षमा मागते. त्यावेळी तिचे आई-वडील तिला प्रेमाने आलिंगन घालतात व सर्व काही विसरून तिला पुन्हा घरात किंवा त्यांच्या कुटुंबात प्रवेश देतात.

मनन चिंतन:
अस म्हटल जात की, “लोक नवीन तंत्रज्ञान शोधतात, परंतु देव नवीन हृदयाला शोधतो; लोक चांगल्या पद्धतीच्या शोधात आहेत, तर देव चांगल्या लोकांच्या शोधात आहे.”
पाप व वाईट कृत्ये आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असतात. परंतु तोच देव आपल्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावत असतो. माणसावर ईश्वराच्या करुणेचा वर्षाव होऊन जे लोक देव पित्याच्या प्रीतीपासून, करुणेपासून व क्षमेपासून दूर गेले आहेत. अशा लोकांना पुन्हा दैवी करुणेचा, प्रीतीचा व क्षमेचा अनुभव यावा व तो अनुभव उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारेआपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे. या दाख्ल्यातून समजते की, प्रत्येकाला दैवी करुणेच्या स्पर्शाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचे जीवन उधळ्या पुत्रासारखे आहे.आपल्या वाईट वागणुकीमुळे, कृत्यामुळे व इतरांबरोबर चांगले संबंध नसल्यामुळे आपण दूर गेलो आहोत. पण जेव्हा आपण हा दाखला वाचतो तेव्हा हा दाखला आपल्या समोर एक आव्हान ठेवत असतो, ते आहे मन परिवर्तन करण्याचे आव्हान. हा दाखला आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणतो, सैतानाकडून ख्रिस्ताकडे आणतो, इतकेच नव्हे तर, चांगला पश्चाताप करावयास शिकवतो. खरा पश्चाताप करून आपण देवाकडे व शेजाऱ्याजवळ येतो. ह्या दाखल्यातून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो की, ख्रिस्त हा प्रेमळ, दयाळू व क्षमाशील आहे. त्याचे प्रेम व त्याची माया ही अपार आहे.
छोट्या भावाने संपत्ती घेऊन ऐश आरामाचे जीवन तो जगाला व जेव्हा सर्व संपत्ती संपून त्याच्याकडे काहीच राहिले नाही तेव्हा त्याला त्याच्या वडिलांची आठवण आली. म्हणजेच त्याला त्याची चूक समजली. आपण अंधारात जीवन जगात असल्याची त्याला जाणीव झाली. सैतानाच्यासानिध्यात मी वास करीत आहे हे त्याला समजले. अशावेळी तो उठून वडिलांकडे गेला व त्याने केलेल्या चुकी बददल दयेची क्षमेची याचना केली. वडिलांनी त्याच्या अंगात उत्तम झगा घालून, हातात अंगठी  व पायात व्हाणाचे जोड घालून तसेच पुष्ठ वासराची मेजवानी करून आपल्या हरवलेल्या मुलाचा पुन्हा एकदा आपल्या घरात स्वीकार केला.यावरून आपल्याला देवाच्या क्षमाशील व दयाळू स्वभावाची जाणीव होते. या दाखल्यात पित्याच्या प्रेमाविषयी वर्णिले आहे. देवाची माया कधीही उणी पुरात नाही. आपल्या पापांसाठी देवाचा एकुलता पुत्र आम्हा तारावयास क्रुसावर मरण पावला. आपल्याला आपल्या पापांची क्षमा करून क्षमेचा धडा गिरवण्यास शिकवला. आपण ह्या जगात ख्रिस्ताचे प्रेम द्यावयास आलो आहोत म्हणूनच आपणामध्ये शास्त्री व परुशी लोकांची वृत्ती आपल्यामध्ये दिसायला नको.
मोठ्या भावाचे व्यक्तिमत्वार आपण थोड मनन चिंतन करूया. त्याचे व्यक्तिमत्त्व हे फार गुंतागुंतीचे आहे. त्याला वाईट वाटते कारण त्याचा भाऊ परत आला आहे. आपण सुध्दा असेच करत असतो. जेव्हा एकाद्याचे चांगले होते ते आपल्याला बघवत नाही. दुसर्यांच्या आनंदात सहभागी होण्यास आपण नकार देत  असतो. येशू पाप्यांच्या बरोबर जेवतो हे शास्त्री- परुशी ह्यांना आवडत नसे. मोठा भाऊ वडिलांच्या बरोबर राहून सुध्दा नंतर रागावतो, कारण त्याने पित्याच्या प्रेमाचा अनुभव घेतला नव्हता एका गुलामा प्रमाणे तो त्याचे जीवन जगत होता. म्हणूनच तो आपल्या धाकट्या भावाला ‘तुमचा मुलगा’ म्हणून संबोधितो. यावरून तो आपल्या कुटुंबा पासून किंवा आपल्या पित्यापासून किती दूर गेला आहे ह्याची जाणीव होते. छोट्या भावाने पश्चाताप करून त्याची चूक काबुल केली व तो आपल्या पित्याकडे परतला. त्याने आपल्या पित्या बरोबर समेट केला. द्या भक्तीवर असलेली साय असते. दयाळू माणूस दयाळू माणूस दुसऱ्यांना आपल्या वेंगेत घेतो.
आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करुया. बापाला म्हणूया, हे पित्या मी तुजकडे धावत येतो माझा स्वीकार कर.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे देवा दया कर व आमची प्रार्थना कर.
१) दैवीकरुणेचा संदेश अखिल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी व मिशनरी या सर्वावर ख्रिस्ताचा आशीर्वाद सैदव असावा व आपल्या शब्दाद्वारे व कृती द्वारे ख्रिस्ताच्या दयेचा संदेश इतरांपर्यंत त्यांनी पोहचवावा म्हणून प्रभू चरणी प्रार्थना करूया.

२) आज कितीतरी लोक देवाच्या प्रीतीपासून दूर जाऊन नैराश्याचे जीवन जगात आहेत. अशा लोकांना दैवी करुणेचा स्पर्श होऊन देवाच्या प्रेमाचा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आज जगात संपत्ती, धन- दौलत यांच्यामुळे भांडणे होऊन, वाईट व चांगले यातील फरक विसरून एकमेकाबद्दल मनात सूड घेण्याची भावना निर्माण झाली आहे. अशा ह्या सर्व लोकांवर परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद येऊन, इतरांशी समेट घडवून आणण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या गावात, शेजोळ्यात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत, अशा सर्वांना परमेश्वारचा आरोग्यदायी स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या खाजगी, कौटुंबिक व सामाजिक गरजा परभू समोर मांडूया.               
   
  

Thursday 21 March 2019


Reflection for the Homily of 3rd SUNDAY OF LENT 
(24-03-19) By Br. Godfrey Rodrigues






 उपवास काळातील तिसरा रविवार

दिनांक: २४/०३/२०१९
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ, १३-१४
दुसरे वाचन: १ करिंथ १०:१-६, १०-१२
शुभवर्तमान: लुक १३:१-९





पश्चात्ताप करण्याविषयी बोध



प्रस्तावना:

आजच्या प्रायश्चित्त काळातील ह्या तिसऱ्या रविवारी आपण केलेल्या पापांचा आपण पश्चात्ताप करावा, तसेच प्रायश्चित्त संस्कार घेऊन आपल्या पापी जीवनावर मनन चिंतन करण्यासाठी आपली देऊळमाता आपणास बोलावत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, इस्राएली जनतेची सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी व त्यांनी पापांचा पश्चात्ताप करावा म्हणून देव मोशेला पाचारण करीत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात इस्राएली लोकांचा अविश्वास व पापीवृत्ती याचा उल्लेख संत पौल करत असून त्याच्या पापीवृत्तीमुळेच देवाने त्यांचा नाश केला असे सांगत आहे. तर आजच्या लूकलिखित शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू सांगत आहे की, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल व हे एका अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे नमूद केले आहे. आज आपली देऊळमाता पुन्हा एकदा आपणा सर्वांना आपल्या पापांची कबुली करून आपले परिवर्तन करण्याची संधी देत आहे. ह्या संधीचा लाभ घेऊन पापी जीवना पासून परावृत्त होऊन देवाकडे परत यावे व पश्चातापी अंतःकरणाने पापक्षमा मागण्यास व देवाशी एकनिष्ठ राहण्यास लागणारी कृपा व आशीर्वाद मिळावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ, १३-१४

          वरील उताऱ्यात इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर नेण्याची जबाबदारी देव मोशेवर सोपवत आहे. मोशेला देव सर्वप्रथम जळत्या झुडुपामधून दर्शन देतो. हे आपल्याला सांगण्यात आले आहे व देव पवित्र आहे हे जाणून मोशे आपले जोडे काढतो. दिव्य पवित्रतेचा हा विचार निर्गमाच्या पुस्तकात एक प्रमुख विषय म्हणून सादर केलेला आहे. मोशेला एक शंका होती की, मला देवाने पाठवले आहे, हे राजाला व इस्रायली लोकांना कसे पटवून द्यावयाचे? म्हणून देव स्वतःची ओळख स्पष्ट करून देतो. मोशेने देवाचे नाव विचारले कारण नावामधून व्यक्तीचे तत्त्व स्पष्ट होते, असे इस्रायल लोक मानत असे. येथे देवाने यहोवा या व्यक्तिवाचक नामाने स्वतःची ओळख करून दिली. ह्याचा अनुवाद बहुदा ‘देव’ असा केला आहे. यहोवा हे हिब्रू भाषेतील ‘देवाचे नाव’ होय. त्याचाच उल्लेख ‘मी जो आहे, तो आहे’ ह्या शब्दांनी केला आहे.

दुसरे वाचन: १करिंथ १०:१-६, १०-१२

          संत पौल आपल्याला मिळालेल्या महान आशीर्वादाची आठवण करून देत असताना सांगत आहे की, आपला नाश होणार नाही, आपण अपात्र ठरणार नाही असे कोणी मानू नये. जरी देवाने इस्राएली लोकांना इजिप्त देशातील गुलामगिरीतून सोडविले तरी देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. म्हणून त्यांच्या पापामुळे व त्यांच्या अविश्वासामुळे देवाने त्यांचा नाश केला. संत पौल आपल्याला आठवण करून देत आहे की, आपण सर्व पापी आहोत, आपण आपल्या पापांचा पश्चाताप केला पाहिजे. माझ्याकडून पाप होणार नाही अशी घमेंडी वृत्ती आपण सोडून दिली पाहिजे.

शुभवर्तमान: लुक १३:१-९

          प्रभू येशू अंजिराच्या दाखल्याद्वारे आपल्याला सांगत आहे की, जो पश्चाताप करतो तो स्वतःचे पाप ओळखतो, स्वतःचे पातके व मलीन स्थिती पाहतो व त्यापासून देवाकडे वळतो व ख्रिस्ताकडे पापक्षमेची याचना करतो. ख्रिस्त त्याला पापक्षमा देतो व तो मनुष्य बदलतो ज्याला फळ नाही येत ते तोडून टाक असे मालक म्हणतो, म्हणून प्रत्येकाने पश्चाताप करून फळ द्यायला हवे.      

मनन चिंतन

          आजची तिन्ही वाचने आपल्याला एकच संदेश देतात ते म्हणजे, पश्चाताप करा आणि प्रभूच्या प्रेमामध्ये नव्याने जन्म घ्या. ख्रिस्त म्हणतो नव्याने जन्म घेतल्या शिवाय कोणीही देवाचे राज्य पाहू शकणार नाही. ह्याचा अर्थ नव्याने जन्म घेणे म्हणजे पश्चाताप करणे होय. ख्रिस्ती जीवन सुरक्षित चालावे म्हणून परमेश्वराने आपणाला दहा आज्ञा देलेल्या आहेत हे नियम पाळले नाहीत तर आपले अध्यात्मिक जीवन विकसित होणार नाही. उपवास काळात प्रभू येशू आपल्याला सांगतो की, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल. पश्चाताप म्हणजे आपल्या पापांची जाणीव करून तो देवासमोर व्यक्त करून त्यांचा त्याग करणे होय.
          आज प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाला अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे प्रायश्चित करण्यास बोलावत आहे.  परमेश्वराची आपल्या कडून एकच अपेक्षा असते ती म्हणेज आपण  चांगली गोड, रसाळ फळे द्यावीत; तसेच आपल्याला प्राप्त झालेल्या वरदानांचा योग्य तो वापर करून स्वतःचे तसेच इतरांचे जीवन फुलविण्यास पात्र व्हावे म्हणून परमेश्वर आपल्यावर जबाबदारी सोपवतो. मात्र आपण आपल्या स्वार्थी अहंकारी स्वभावामुळे प्रभूची आज्ञा धुडकावून लावतो व पापास प्रवृत्त होतो. पापामुळे आपले जीवन निष्फळ अंजीराच्या झाडासारखे होते. आपण आपल्या पापी वृत्ती मुळे गोड व रसाळ फळे इतरांना देऊ शकत नाही. 
          ह्या उपवास काळातील तिसऱ्या रविवारी, आपण आपल्या पापांची आठवण करु या. आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल मनात दुःख व्यक्त करून, यापुढे पाप न करण्याचा निश्चय करुया. सरते शेवटी परमेश्वराने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन प्रायश्चित संस्कार स्वीकारून देवाच्या प्रेमाचा, क्षमेचा, दयेचा व कृपेचा अनुभव आपण घेऊया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस सर्व बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी ह्या प्रभुने शाररीक, मानसिक व अध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत ह्याची जाणीव आपणा प्रत्येकाला व्हावी व या प्रायश्चित काळात आपण सर्वांनी आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रायश्चित संस्कार घेऊन देवाची करुणा व दया आपल्या जीवनात अनुभवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभूची दया, क्षमा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा प्रभू खिस्तामध्ये आनंदाचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या कला-कौशल्यावर आधारित योग्य ती नोकरी मिळावी जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


Thursday 14 March 2019


Reflection for the Homily of 2nd SUNDAY OF LENT (17-03-19) By Fr. Ashely D’Monte 








उपवास काळातील दुसरा रविवार

दिनांक: १७/०३/२०१९
पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८
दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१
शुभवर्तमान: लुक ९:२८अ-३६






हा माझा निवडलेला पुत्र आहेयाचे तुम्ही ऐका.

प्रस्तावना:
     आज आपण प्रायश्चित काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना परमेश्वराने मानवाशी केलेल्या कराराविषयी सांगत आहे.
उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात ह्या कराराची सुरुवात नमूद करण्यात आली आहे. आब्राहामाने केलेले यज्ञ स्विकारून, देव आब्राहामाशी करार प्रस्थापित करतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिप्पीकरांस पाठवलेल्या पत्रात म्हणतो, ‘आपण स्वर्गीय राज्याचे प्रजाजन आहोत. आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त येऊन, आपले नीच शरीर बदलून त्याच्यासारखे वैभवशाली करील’. तर लुकलिखित शुभवर्तमानात आपण येशूच्या रूपांतराविषयी ऐकतो.
परमेश्वर, आपला पुत्र येशू ह्याच्याद्वारे मानवाशी करार करतो. येशूचे रुपांतर हे त्याच्या वैभवशाली पुनरूत्थानाचे व त्या स्वर्गीय नंदनवनाची एक पूर्वसुचना होती. ह्या नंदनवनात आपण सर्व सामील होण्यास केलेला हा करार होय. येशुप्रमाणे आपल्याही जीवनाचे रुपांतर व्हावे व आपणास त्या स्वर्गीय नंदनवनात प्रवेश मिळावा म्हणून ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८
देव आब्राहामाला उरदेशातून बोलावून त्याच्याशी करार करतो. परमेश्वर त्याला आकाशात पहायला सांगतो, ते ह्यासाठी की, ‘हे सर्व काही स्वप्न नसून हकीकत होती’. परमेश्वर आपल्या वचनांशी एकनिष्ठ राहतो. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे आब्राहामाची संतती होण्याचे वचन परमेश्वर त्याला देतो. आब्राहाम त्याच्या देवावरील विश्वासामुळेच विश्वासाचा पिता' ठरतो व नितीमान गणण्यात येतो. आब्राहामाला व साराला पुत्राचे वचन दिल्यानंतर, परमेश्वर त्यांस आता वतन देण्याचे आश्वासन देतो. त्याच्या पुत्राचा बळीअर्पण करण्यास सांगणे, ही परमेश्वराने आब्राहामाच्या विश्वासाची केलेली परीक्षा होती. परंतु आब्राहाम त्यात उत्तीर्ण होतो. परमेश्वर मेघवाणीतून आब्राहामाला वतन मिळवून देतो. मात्र ह्या वतनावर इस्रायली जनतेचे वर्चस्व फार उशिराने होते. दरम्यानच्या काळात त्यांना अनेक खाच-खळग्यांतून जावे लागते. इस्रायली जनता देवापासून दूर जाते, परंतु परमेश्वर मात्र त्याने केलेला करार मी तुमचा देव व तुम्ही माझी प्रजा आहातहे विसरत नाही.

दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१
पौल ख्रिस्ती बांधवाना आपल्याप्रमाणे ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आवाहन करीत आहे. आपण घेतलेल्या निर्णयावर पौल ख्रिस्ती जनांस विचार-विनिमय करण्यास सांगत आहे. पौल, ‘ख्रिस्ताच्या क्रुसाचे शत्रूअसे संबोधताना, केवळ अधर्मी व जे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्वीकार करत नाही अशांचा उल्लेख करीत नाही; तर अनेक ख्रिस्ती जनही त्यामध्ये सामील आहेत असे त्यांस सांगावयाचे आहे असे दिसून येते. कारण त्यांचा विश्वास व त्यांचे जीवनमान एकसमान नसून, ते विरोधाभास आहे असे वाटते. आपल्या जीवनात येणाऱ्या दु:खांपासून दूर पळून ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे शत्रू बनले आहेत. ते ख्रिस्ताची स्तुतीसुमने गातात व आपण परिपूर्ण कसे व्हावे ह्यासाठी झटतात. पौल म्हणतो, ‘त्यांची वाटचाल ही विनाशाकडे आहे. ते ऐहिक जगात रमले आहेत. त्याविरोधात संत पौल ख्रिस्ती जनास म्हणतो की, ‘हे ऐहिक जग आपले मुळ स्थान नसून स्वर्गीय नंदनवन आपले ध्येय आहे. ह्या भूतलावर आपण फक्त एक क्षणभंगुर जीवन जगतो, परंतु स्वर्गात आपणास चिरकाल जीवन प्राप्त होईल. त्यामुळे आपली दृष्टी ही स्वर्गाकडे असावी; हे स्वर्गातील स्थान आपल्याला, आपला उद्धारक प्रभू येशू मिळवून देईल. जो अखिल पृथ्वीचा अधिपती आहे. येशू, आपले शरीर त्याच्या शरीराप्रमाणे वैभवशाली करून आपणास नवजीवन प्राप्त करून देईल. हे सर्व शक्य होण्यास, ‘प्रभूच्या येण्याची प्रतिक्षा, आपण विश्वासाने करावी व ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे आपले आचरण ठेवावे असे संत पौल म्हणतो.

शुभवर्तमान: लुक ९:२८अ-३६
     येशूच्या रुपांतराची कथा आपणास मार्क, लुक व मत्तय ह्या तीनही शुभवर्तमानात आढळून येते. मत्तय शुभवर्तमानकार येशूला नवीन मोशे म्हणून गणतो. तर लुक शुभवर्तमानकार येशू प्रार्थनेत मग्न होऊन, त्यांस हा अविष्कार होता असे म्हणतो. लुकलिखीत आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू परमेश्वराचा परमप्रिय पुत्र असल्याचे जाहीर होते. येशूचे रुपांतर हे त्याच्या मरणोत्तर पुनरूत्थानाचे व त्यानंतरच्या सार्वकालिक जीवनाची जणू एक पूर्वसुचना करुन देते. येशू प्रार्थना करावयास डोंगरावर जातो. डोंगर हे त्याकाळच्या परंपरेनुसार परमेश्वराच्या प्रकाटीकरणाचे स्थळ होते. येशू प्रार्थना करीत असावा, परमेश्वराचे वैभव एका लखलखीत प्रकाश झोताप्रमाणे त्याच्या शरीराला भेदून गेले व येशूचे वस्र पांढरे शुभ्र झाले व तो दैदीप्यमान दिसू लागला. लखलखीत प्रकाश हे दैवी नगरीचेप्रतिक होय. येशू हा ख्रिस्तम्हणजेच परमेश्वराचा अभिषिक्त’, हे त्यावेळी प्रकट झाले. मग मोशे आणि एलिया हे दोघेजण त्याच्याशी बोलताना त्याच्या शिष्यांना दिसले.
मोशे आणि एलिया ह्या दोघांना परमेश्वराचे दर्शन डोंगरावर झाले होते. मोशेने परमेश्वराकडून दहा आज्ञा सिनायपर्वतावर स्वीकारल्या व एलिया संदेष्याला परमेश्वराचे दर्शन होरेबपर्वतावर झाले आणि येशुसुद्धा ताबोरपर्वतावर प्रार्थना करीत होता. मोशे व एलिया ह्यांनी परमेश्वराने दिलेली जबाबदारी पार पाडली होती. मोशेने इस्रायली जनतेस फारोच्या गुलामगिरीतून सुटका करून सोडवले व वचन दिलेल्या देशात त्यांची वाटचाल केली. तर एलीया संदेष्ट्याने तारणारा आपले तारण कसे करील ह्याचे भाकीत केले होते. हे दोन्ही महापुरुष केवळ येशू करीत असलेल्या समर्पनासाठी, त्याला पाठींबा देण्यासाठी आलेले नसून, ‘येशूहाच मसीहा’, ‘तारणाराआहे ह्याची ग्वाही देण्यास आले होते. स्वर्गातून आलेली वाणी हि येशूच्या बाप्तीस्म्याच्या वेळीसुद्धा होती. ही वाणी सांगते कि, येशू हा देवपुत्र होता व देवाने ख्रिस्ताद्वारे आपणास त्याची मुले म्हणून स्वीकारले आहे. येथे येशूचे रुपांतर हे त्याचे दुख:सहन, मरण व पुनरुत्थान ह्यांची सुरुवात आहे असे संत लुक मांडतो.

मनन चिंतन:
लुकलिखित शुभवर्तमानात आपण ऐकले की, येशू प्रार्थना करीत असता त्याचे रुपांतर झाले. प्रार्थनेत नम्र झालेला येशू उंचावला गेला. येशूने प्रार्थनेला महत्वाचे स्थान दिले. आपल्या बाप्तिस्म्यापूर्वी त्याने प्रार्थना केली, शिष्य निवडण्यापूर्वी त्याने प्रार्थना केली, चमत्कारापुर्वी प्रार्थना केली व शेवटी दु:ख सहन करण्यापुर्वी त्याने प्रार्थना केली. येशूने दिवसातील पुष्कळ वेळ केवळ प्रार्थनेसाठी दिला होता. आपली प्रार्थना ही केवळ पोपटपंची नसावी तर परमेश्वराठायी मन एकरूप करणारी असावी. खऱ्या अंत:करणाने केलेल्या प्रार्थनेत परमेश्वराशी समेट होतो, आपण त्याच्याठायी एकरूप होतो. ख्रिस्त जेव्हा परमेश्वराशी एकरूप झाला तेव्हा तो पूर्णत: प्रकाशमान झाला. परमेश्वराठायी साचलेली एकरूपता आपणालाही प्रकाशमान करते. आपले अंत:करण बदलून टाकते.
येशूचे रुपांतर हे त्याच्या जीवनात कायापालट करणारी घटना होती. ख्रिस्त हा लोकांना चमत्कार करून व आपल्या प्रवचनाद्वारे दयेकडे आकर्षित करीत होता. पण आता मात्र त्याला डोंगर उतरून येरुशलेम नगरीत प्रवेश करावयाचा होता; गेथसमनी बागेची वाट चालत शेवटी कालवरी टेकडी चढायची होती. रूपांतरामुळे येशूला पित्याच्या प्रेमाची जाणीव झाली. ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्यावेळी पित्याने आपल्या प्रेमाची ओळख करून दिली, ‘हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच्या बाबतीत मी संतुष्ट आहे,’ व रूपांतराच्या वेळी परमेश्वर म्हणतो, ‘हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका’.
येशूचे झालेले रुपांतर हे केवळ त्याच्या स्वत:साठी नसून ते शिष्यांसाठी होते. ते त्यांस धीर देण्यासाठी होते. कारण येशू त्याच्या रुपांतरानंतर येरुशलेम नगरीत जाणार होता. तेथे त्याचा छळ होणार होता. त्यास दु:ख सहन करायचे होते व शेवटी एखाद्या लुटारुप्रमाणे क्रुसावर मरण पत्करायचे होते. या सर्व गोष्टी पाहण्यास त्याच्या शिष्यांस धीर देण्याची गरज होती हे येशू जाणून होता. येशू त्यांस भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची जणू एक पुर्वसुचना देतो व त्याच्या पुनरुत्थानाविषयीची कल्पना देतो.
शिष्यांना हा प्रसंग अतिशय आल्हाददायक वाटत होता म्हणून पेत्र म्हणाला, ‘प्रभो आपण येथे असणे फार छान आहे’. परंतु येशू त्यांना तिथे राहावयास मनाई करतो. कारण येशूला त्यांची गरज होती. गेथसमनी बागेत त्याला त्यांच्या प्रार्थनेची गरज होती परंतु ते झोपी गेले; येशूला जेव्हा धरून नेले तेव्हा सर्व शिष्य पळाले. आपणही शिष्या प्रमाणे वागतो का? आनंद, उत्सव सर्वांनाच आवडतात. आनंदाच्या वेळी, यशाच्या वेळी आपण जणू म्हणतो, ‘प्रभो हे सर्व चांगले आहे; परंतु थोडे दु:ख वाट्याला आले तर शिष्यांप्रमाणे आपण पळून जातो. आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो, ‘परमेश्वर हे दु:ख माझ्याच वाटयाला का’? ‘आयुष्यात जर दु:ख नसेल तर सुख काय आहे हे आपणाला कधीच कळणार नाही’. ‘प्रकाशाची जाणीव जशी अंधारात होते त्याच प्रमाणे सुखाची, आनंदाची जाणीव ही दु:खामध्ये होते’. अपयशाच्या चिखलात पाय रोवल्याशिवाय यशाची कमळे हाती लागत नाही. ख्रिस्ताचे खरेखुरे अनुयायी बनायचे असेल तर आपण आपल्या दु:खाचे क्रूस वाहिले पाहिजेत तरच आपणास पास्काचा आनंद मिळेल.
ख्रिस्तासमवेत आपण अनुभवलेला प्रत्येक क्षण सुखकारक असतो. परंतु ज्यावेळी आपण त्यावेळात साधलेला संवाद प्रत्यक्ष जीवनात आचरण करतो, त्यावेळी आपणास खरा आनंद प्राप्त होतो. आजचे जग हे क्षणभंगुर, सुखाच्या मागे धावत आहे व आपणही ह्या शर्यतीत सरपटले जात आहोत. परंतू ख्रिस्त आपणास म्हणतो, ‘खरा आनंद, सुख मी तुम्हाला देत आहे’. जग दु:ख, संकटे ह्यांना टाळण्याचे अनेक उपाय सांगत आहे परंतु ख्रिस्ताने दु:खाला सामोरे कसे जावे व त्यावर मात कशी करावी हे दाखवून दिले आहे.ज्याप्रमाणे येशूचे रुपांतर झाले, त्याचप्रमाणे आपलेही पुनरुत्थानावेळी रुपांतर होईल व येशुप्रमाणे आपणही तेजमान होईल. त्यासाठी आपण आपली दृष्टी स्वर्गीय राज्याकडे लावायला हवी व परमेश्वराची योजना आपल्या जीवनाद्वारे पूर्णत्वास नेली पाहिजे. येशूने सुद्धा तेच केले. आपल्या पापांसाठी त्याने क्रुसावर मरण पत्करले व स्वर्गीय नंदनवनात आपणास सामील करुन घेतले. येशूचे रुपांतर शहरापासून दूर, डोंगरावर झाले, म्हणजेच आपण जर ह्या एैहिक जगात गुरफटले असलो तर परमेश्वराच्या सानिध्यात कधीच येऊ शकणार नाही. आपण थोडा वेळ बाजूला सारून त्याच्या सानिध्यात घालवला पाहिजे. हे एैहिक जग सर्वस्व नसून त्यानंतरही जीवन आहे आणि ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. येशूला आपणा सर्वांस ह्यात सहभागी करून घ्यायचं आहे म्हणूनच तो आपल्या शिष्यांना आपले प्रतिनिधी म्हणून त्याच्या ह्या दैदीप्यमान-पणाचा अनुभव देतो. आपण सर्व त्या चिरंतर जीवनाचे वाटेकरी होऊया, पण त्याअगोदर आपले दैनंदिन जीवन सुखकर बनवूया परमेश्वराच्या सानिध्यात राहून आपले रुपांतर करूया. आपण सर्व जगात राहून ख्रिस्ताकडे वळूया, त्याच्या शिकवणुकी-प्रमाणे वागूया व शेवटी त्या स्वर्गीय नंदनवनात सहभाग घेऊया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद: हे प्रभो, आम्हांस तुझ्या कृपेने नवजीवन दे.

१. आपले परमगुरु, धर्मगुरू, धर्मबंधू व भगिनी यांनी ख्रिस्ताप्रमाणे स्वर्गीय नंदनवनाचे पुढारक व्हावे व त्यांना अडचणींवर मात करण्यास प्रभूने कृपा-शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशाची धुरा वाहणारे आपले राजकीय नेते व पुधाकारी ह्यांच्या हातून आपल्या देशातील  लोकांची सेवा व्हावी व  देशाला प्रगती पथावर न्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपण सर्वांनी ह्या जगातील एैहिक सुखाच्या मागे न लागता, परमेश्वराच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा व येशूप्रमाणे आपलेही रुपांतर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे निराश आहेत, हताश आहेत अशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासूपणे जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.