Friday, 17 July 2026

Reflections for the Homily of 16th Sunday in Ordinary Time (19-07-2026) By Br. Saurav Patil

 सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक: १९/०७/२०२६
पहिले वाचन: ज्ञान ग्रंथ १२:१३,१६-१९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७

शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३


प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील सोळावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या वाचनातून प्रभू आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडतात. अनेक वेळा आपण लगेच दुसऱ्यांचा न्याय करतो किंवा वाईट पाहून निराश होतो. पण आज देवाचे वचन आपल्याला सांगते की, देव दयाळू आहे, संयमी आहे आणि प्रत्येकाला बदलण्याची संधी देतो. तसेच पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला मदत करतो आणि योग्य मार्ग दाखवतो. या मिस्साबलिदानात भाग घेताना, मोकळ्या मनाणे आणि विश्वासाने देवाचे वचन ऐकूया आणि ते आपल्या जीवनात जगण्याचा प्रयत्न करूया.

मनन चिंतन:

प्रिय ख्रिस्ती बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या तीनही वाचनांचा एकच मुख्य संदेश आहे, देव दयाळू आहे, देव संयमी आहे आणि देव प्रत्येकाला बदलण्याची संधी देतो.

मनुष्य अनेकदा घाई करतो. एखाद्याने चूक केली की आपण लगेच त्याच्याबद्दल मत बनवतो. "हा कधीच सुधारणार नाही", "याच्याकडून काही चांगले होणार नाही", असे आपण सहज बोलून जातो. पण देव तसे करत नाही. देव प्रत्येकाला वेळ देतो. तो प्रत्येकावर प्रेम करतो. तो प्रत्येकाला पश्चात्ताप करण्याची आणि नवीन जीवन सुरू करण्याची संधी देतो.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देव सर्वशक्तिमान आहे. पण देव आपल्या शक्तीचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी करत नाही. तो न्यायी आहे, पण त्याचबरोबर दयाळूही आहे. तो माणसाच्या चुका पाहतो, पण त्याहून अधिक त्याच्या बदलण्याची क्षमता पाहतो. म्हणूनच देव लगेच शिक्षा करत नाही. तो वाट पाहतो. आपण आपल्या आयुष्यातही हे पाहतो. लहान मूल चालायला शिकत असते. ते पडते, पुन्हा उठते, पुन्हा पडते. आई-वडील त्याला रागावत नाहीत. ते त्याला धीर देतात. कारण त्यांना माहीत असते की एक दिवस हे मूल नीट चालायला लागेल. देवही आपल्याशी असाच वागतो. आपण अनेकदा पडतो, पाप करतो, चूक करतो; पण देव म्हणतो, "पुन्हा उठ. मी तुझ्यासोबत आहे."

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला खूप मोठा दिलासा देतात. ते म्हणतात, आपल्याला अनेक वेळा काय प्रार्थना करावी हेच समजत नाही. कधी दुःख असते, कधी आजार असतो, कधी घरातील समस्या असतात, कधी नोकरीची चिंता असते, कधी मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळी शब्दच सुचत नाहीत. पण संत पौल म्हणतात, काळजी करू नका. पवित्र आत्मा आपल्या मदतीला येतो. आपण शांतपणे देवासमोर बसलो तरी चालेल. आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू, आपल्या मनातील वेदना आणि आपल्या हृदयातील भावना देवापर्यंत पोहोचवण्याचे काम पवित्र आत्मा करतो. म्हणून प्रार्थना म्हणजे फक्त मोठमोठे शब्द नाहीत. प्रार्थना म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. "प्रभु, मला मार्ग दाखव." एवढेही मनापासून म्हटले तरी देव ऐकतो.

येशू आज गहू आणि निदण यांचा दाखला सांगतो. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. पण रात्री शत्रू आला आणि त्याने निदण पेरले. काही दिवसांनी गहू आणि निदण दोन्ही उगवले. नोकर म्हणाले, "मालक, आम्ही निदण उपटून टाकू का?" पण मालक म्हणाला, "नाही. निदण उपटताना गहूही उपटला जाईल. दोघांनाही वाढू द्या. कापणीच्या वेळी वेगळे करू." येशू या गोष्टीतून काय सांगू इच्छितो? पहिली गोष्ट म्हणजे या जगात चांगले आणि वाईट दोन्ही असणार आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी जगात वाईट पूर्णपणे संपणार नाही. म्हणून वाईट पाहून निराश होऊ नका. देव सर्व काही पाहत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांचा न्याय करण्याची घाई करू नये. आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्याचा फक्त एक भाग दिसतो. पण देवाला संपूर्ण जीवन दिसते. आज जो चुकीच्या मार्गावर आहे तो उद्या देवाकडे परत येऊ शकतो. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. संत पौल पूर्वी ख्रिस्ती लोकांचा छळ करत होते. पण देवाच्या कृपेने तोच महान प्रेषित झाला. जर देवाने त्याला संधी दिली नसती, तर आज आपल्याला त्याची पत्रे वाचायला मिळाली असती का? म्हणून आपण कोणालाही कायमचा वाईट समजू नये. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाकडे पाहणे. येशू दुसऱ्यांच्या शेताबद्दल बोलत नाही. तो आपल्या मनाच्या शेताबद्दल बोलतो. आपल्या मनात कोणते गहू वाढत आहेत? प्रेम, क्षमा, नम्रता आणि प्रार्थना ह्या गोष्टींची वाढ होते  का? की आपल्या मनात मत्सर, राग, अहंकार, द्वेष, खोटेपणा आणि स्वार्थाचे निंदण वाढत आहे?

आपण रोज मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियावर खूप वेळ घालवतो. त्यातून कधी चांगल्या गोष्टी मिळतात, तर कधी वाईट विचार मनात येतात. म्हणून आपण काय पाहतो, काय ऐकतो आणि कोणासोबत राहतो याची काळजी घेतली पाहिजे. कारण जसे बी पेरू तसे पीक येईल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण अनेकदा देवाला विचारतो, "वाईट लोक सुखात का आहेत?" "चांगल्या लोकांनाच दुःख का येते?" आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगते की, देवाचा न्याय योग्य वेळी होईल. आपल्याला संयम ठेवायचा आहे. देव काहीच विसरत नाही. तो योग्य वेळी योग्य न्याय करतो. म्हणून आपण दुसऱ्यांच कस वाईट होईल याचा विचार करू नये. दुसऱ्याचा बदला घेण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवावा. आपल्या कुटुंबातही हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. पती-पत्नीमध्ये, आई-वडील आणि मुलांमध्ये, भाऊ-बहिणींमध्ये मतभेद होतात. पण जर प्रत्येक जण एकमेकांना बदलण्यासाठी थोडा वेळ, प्रेम आणि क्षमा देईल तर अनेक नाती पुन्हा ऊजुळू शकतात. देव जसा आपल्याला संधी देतो, तशी संधी आपणही दुसऱ्यांना दिली पाहिजे. आज आपण स्वतःला तीन प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न: मी दुसऱ्यांचा न्याय लवकर करतो का? दुसरा प्रश्न: माझ्या मनात कोणते निंदण वाढत आहे, जे मला देवापासून दूर नेत आहे? तिसरा प्रश्न: मी रोज देवाला माझ्या जीवनात चांगुलपणाचे बी पेरू देतो का? जर आपण या तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली, तर आजची वाचन आपल्या जीवनात फळ देतील.

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण देवाकडे एक विशेष कृपा मागूया. प्रभु, मला तुझ्यासारखा संयमी बनव. दुसऱ्यांच्या चुका पाहण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याची बुद्धी दे. माझ्या मनातील राग, मत्सर, अहंकार आणि स्वार्थ दूर कर. माझ्या जीवनात प्रेम, दया, क्षमा, नम्रता आणि विश्वास यांचे चांगले पीक वाढू दे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मी दररोज तुझ्या जवळ येऊ दे.  आमेन.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. विश्वव्यापी ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमचार्य पोप लियो व सर्व कार्डिनल, बिशप्स,  धर्मगुरु, धर्म-भगिनी यांना चांगले स्वास्थ्य लाभावे व परमेश्वराचा शब्द लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याद्वारे परमेश्‍वराचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

२. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अशांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्याला या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवांना चांगले पीक मिळावे आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक बेघर आहेत अन्न-पाण्याविना जीवन जगत आहेत. जे आजारी आहेत अशा सर्वांना योग्य वेळी मदत मिळावी व त्यांच्या ही गरज पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक घरासाठी प्रार्थना करूया.



Thursday, 9 July 2026

Reflections for the Homily of 15th Sunday in Ordinary Time (12-07-2026) By Fr. Cedrick Dapki

 सामान्य काळातील पंधरावा रविवार

दिनांक: १२/०७/२०२६
पहिले वाचन: यशया ५५:१०-११

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१८-२३

शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहोत. आणि आजची उपासना आपणास प्रभूच्या शब्दावर मनन – चिंतन करून त्या शब्दाद्वारे फलदायी जीवन जगण्यास बोलातीव आहे. 

पहिल्या वाचनात, यशया संदेष्टा बॅबिलोनमधील यहुदी गुलाम बांधवांना धीर देतो आणि त्यांना खात्री देतो की, ज्याप्रमाणे पाऊस आणि बर्फ जमिनीला पाणी देऊन बियांना अंकुरित व विकसित होण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे देवाचे वचन त्याचा उद्देश पूर्ण करेल.

दुसऱ्या वाचनात, संत पौल आपल्याला आठवण करून देतात की, ज्याप्रमाणे भरपूर पीक येण्यासाठी बियांना जमिनीत पडून नष्ट व्हावे लागते, त्याचप्रमाणे मानवाला फलदायी होण्यासाठी स्वतःला विसरून प्रभूमध्ये प्रभूमध्ये जीवन जगावे लागेल.

आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त बी पेरणाऱ्याच्या दाखल्याद्वारे सांगू इच्छितो कि जो मनुष्य प्रभूचा शब्द जितका संपूर्ण मानाने व हृदयाने स्वीकारतो व जगतो तो मनुष्य शंभर पटीने फलदायी बनतो.  

प्रभूचे शब्द आपल्या जीवनात आत्मसात करून त्या प्रमाणे जीवन जगण्यास आपणास कृपा व सद्बुद्धी मिळावी म्हणून या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

चीन मधील बांबूची गोष्ट तर ऐकली असेलच! मोसो (Moso) हा चीन एक मधील बांबूचा प्रकार आहे. हा बांबू थंड हवामानात वाढणाऱ्या बांबूंमध्ये सर्वात मोठा आहे, जो पंच्याहत्तर फूट उंच आणि आठ इंच व्यासापर्यंत वाढतो. हा बांबू लावल्यानंतर ५०-६०  दिवसांपर्यंत जमिनीतून वर आल्याचे कोणतीही चिन्ह दाखवत नाही. परंतु अचानक ते ४० दिवसानंतर जणूकाही जादूने ७५ फूट उंचीपर्यंत वाढू लागतो. बांबूची जलद वाढ ही त्या दोन महिन्यांत तयार होणाऱ्या मैलोनमैल मुळांमुळे होते. त्या बांबूची मुळे पहिला खोलवर रुतली गेली, ती मजबूत झाली आणि अश्या ह्या त्याच्या साखोळ परिश्रमामुळे आकाशात उंच वाढले व मजबूत होऊन टिकाऊ बनले. अशाप्रकारे आजची उपासना आपणास प्रभूच्या जीवनात खोलवर रुतून फलदायी होण्यास बोलावत आहे. ज्याचे जीवन प्रभूच्या वचनांवर अवलंबून असते तो कशीच अपयश अनुभवत नाही, या उलट तो प्रभूमध्ये भरभराटीचे जीवन अनुभवत असतो असा संदेश आपणास मिळत आहे.

बी पेरणाऱ्याचा दाखला लक्षात घेतला असता, आजच्या आधुनिक जगात शेतकरी शेती करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतो, , उच्च दर्जाचे बियाणे वापरतो, रासायनिक खाते वापरतो व त्याच्याच साहाय्याने तो शेतात भरघोस पीक घेतो. वाळवंट किंवा डोंगराळ भागात जेथें शेती होऊ शकत नाही तेथें देखील शेतीची मशागत होत आहे.  हा मानवाने आधुनिक जगात आधुनिक तंत्राद्वारे केलेला चमत्कार आहे. परंतु ख्रिस्ताच्या काळी असे न्हवते. भौगोलिक स्थिती लक्षात घेतली असता त्याकाळी लोकांची शेतजमीन कमी होती. कदाचित बियाणे जास्तकाळ टिकून ठेवण्याची कला अवगत नसेल म्हणून एक – एक बियाणे शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचे होते आणि अशामुळे ते पेरणीच्या वेळी काटकसरीने एक-एक बियाणे सांभाळून पेरत असतील आणि त्याच्या नंतरही पुरेसा पाणी, अनुकूल हवामान नसल्याने पिक चांगले येईल याची शाश्वती न्हवती. म्हणून येशुख्रिस्त शेती कशी करावी किंवा शेतात पिक कसे  जास्त आणावे ह्यावर भोध करीत नाही, तर शेतकऱ्याचे जीवन समोर ठेऊन आपले आध्यात्मिक जीवन देवावर अवलंबून ठेऊन कसे जगावे हे स्पष्ट करून देतो.

ख्रिस्त हा देवाचा शब्द बी प्रमाणे संपूर्ण जगात पसरवतो, आणि शब्द हा मोजून-मापून पसरवित नाही, ठराविक किंवा निवडक लोकांना देत नाही, तर हा शब्द उदारतेने संपूर्ण जगात पसरवित आहे, प्रत्येकाला देत आहे.  आणि हा शब्द जो – तो ज्याच्या -त्याच्या क्षमतेप्रमाणे स्वीकारतो व प्रतिसाद देतो. हा शब्द जो पूर्णपणे स्वीकारीत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही किंवा त्यांच्याने प्रभूचे कार्य होत नाही. परंतु जो कोणी हा प्रभूचा शब्द संपूर्ण हृदयाने, मानाने व आत्म्याने स्वीकारतो तो फलद्रूप होतो. कोणी तीसपट, कोणी साठपट तर कोणी शंभरपट.

काही दिवसापासून आपण पावसाची वाट पाहत होतो. जून महिना उलटला तरीही पावसाने काही चिंन्हे दाखवली नाहीत.  वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना ठेवल्या. सृष्टी जणूकाही जीवनहीन झाली होती; रिकामी पडलेली शेत जमीनसुखे डोंगर आणि कोरडी नदी, अशा ह्या देखाव्यात नैसर्गिक जीवन स्तब्ध झाले होते. सगळं झोपल्यासारखं किंवा मेलेल्यासारखं वाटत होतं.  अचानक जुलै महिन्यात पावसाळा सुरवात झाली सर्व ठिकाणी पाणी; शेतात पिक यायला सुरुवात झाली, डोंगर हिरवेगार दिसू लागले व नद्या वाहू लागल्या, अशा प्रकारे सृष्टीने जणूकाही नव्याने सुरुवात केली. आणि हे सर्व शक्य झाले ते म्हणजे पावसामुळेच. म्हणून हा पाऊस विनाकारण आला नाही तर त्याने येऊन आपला उद्देश पूर्ण केला.  ह्या उदाहरणाला आधारित आपण पहिल्या वाचनात पाहतो कि यशया संदेष्ट्याद्वारेपरमेश्वर म्हणतो कि माझे शब्द हे पाण्याप्रमाणे जीवन देणारे आहेत.  पाणी जसा संपूर्ण सृष्टीला जीवन देतो व सृष्टी फलदायी बनवतो तसेच माझे शब्द हे जिवंत शब्द आहेत. त्या पवित्र शब्दाद्वारे मनुष्य विश्वासात व कृपेत वाढतो. तो पवित्र दैवी शब्द ऐकणाऱ्याला सर्वकालिक जीवन देतो, अशी व्यक्ती उत्सुकतेने प्रभूचे कार्य करते आणि  प्रभूच्या वाचनामुळेच फलदायी बनते.

परमेश्वराने मानवास शब्द दिला, पावसाप्रमाणे तो शब्द स्वर्गातून उतरला, तो शब्द देह झाला, मानव बनून जीवन जगाला व पाण्या प्रमाणे तो शब्द संपूर्ण जगभर पसरला.  पित्याचा उद्देश असा होत कि मानवजातीने  या शब्दाचा पूर्णपणे स्वीकार करावा व त्या शब्दाद्वारे त्यांचे तारण व्हावे.  प्रभूचे राज्य हे सुपीक फळ देणारे आहे, भरभराटीचे आहे आणि सर्वकालिक आहे.  म्हणून येशुख्रिस्त आपणास प्रभूचा शब्द हा पूर्णपणे स्विकारून फलद्रूप होण्यासाठी आव्हान करीत आहे.  तीसपट, साठपट व शंभरपट असे पिक देण्यास बोलावीत आहे. म्हणून जगातील ऐहिक गोष्टी बाजूला सारून प्रभूच्या कार्यात विलीन होण्यास तयार असूया व फलद्रूप होण्याचा प्रयत्न करूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे सेवक परमगुरू, महागुरू व धर्मगुरू ज्यांनी प्रभूचे कार्य हाती घेतले आहे त्यांच्या कठीण परिस्थितीत प्रभुने त्यांना राखावे, त्याचा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवण्यास सहाय्य मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या श्रमाला फळ यावे, त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांना शेतात काम करता यावे व नैसर्गिक आपत्ती टाळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. प्रभूचा शब्द प्रत्येकाच्या कानी पडावा, तो शब्द आत्मसात करून प्रभूमध्ये पवित्र जीवन जगण्यास सहाय्य व्हावे तसेच स्वतःचे जीवन फलदायी बनवून इतरांचे जीवन उज्वलीत करता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जगात होणारी युद्धे थांबावीत, प्रभूचा शांतीचा शब्द सर्वत्र पसरून अश्या ठिकाणी शांतीचे वातावरण निर्माण व्हावे व सर्वांना सलोख्याने व प्रेमाने राहता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे आजारी आहेत, दुखात आहेत  व अडचणीत आहेत; अशांना प्रभूचे सांत्वन मिळावे, त्यांच्या वाटेत आलेली सर्व पिडा दूर व्हावी व त्यांना चांगल्या आरोग्याचा व जीवनाचा अनुभव घेता यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. (प्रतिसाद) 




Thursday, 2 July 2026

Reflections for the Homily of 14th Sunday in Ordinary Time (05-07-2026) By Br. Criston Marvi


सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक: ०५/०७/२०२६
पहिले वाचन: जखऱ्या ९: ९-१०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:९-१११३
शुभवर्तमान: मत्तय:११:२५-३०



प्रस्तावना:

प्रिय भाविकांनो आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना ही आपल्याला मनाची शांती मिळवण्यासाठी शांतीच्या राज्यांमध्ये विसावा घेण्यास आमंत्रित करीत आहे. शांतीचा राजा हा मनाने लीन व त्याचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करत आहे, जो आपल्याला अनंतकाळात जिवंत ठेवेल.

या पवित्र ख्रिस्तयागात सहभागी होत असताना आपण स्वतःला विचारू या की, माझ्या मनाची शांती ही मला कोठे भेटते? माझ्या मनाची शांती ही मला जगातील गोष्टीद्वारे भेटते? की, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहून मिळते? थकलेले व भाराक्रंत अवस्थेत असताना परमेश्वराची कृपा व येशूची शांती मनामध्ये वस्ती करावी, म्हणून आपण या ख्रिस्तयागात प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

आज शुभवर्तमानमध्ये आपण ऐकले. आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण एकले की, “ पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी, यशस्वी आणि लीन आहे. परंतु हा राजा आहे तरी कोण? दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, आपण आत्म्याच्या अधीन आहोत आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करत आहे. त्याचप्रमाणे शुभावार्तामानात येशू पित्याचे स्तवन करतो, व न्यायी, यशस्वी आणि लीन असा राजा म्हणून शांती देण्यासाठी आपणा सर्वांस त्याच्याकडे बोलावतो. येशू पित्याचे स्तवन करतो. कारण की पित्याने येशूला त्याच्या शिष्यांसमोर प्रगट केले आहे. त्यामुळे पित्यामध्ये व येशूमध्ये एकीचे नाते बांधले आहे. जेव्हा आपल्यामध्ये वाढ होते तेव्हा आपण दुसऱ्या वरती अवलंबून राहण्याचे थांबतो. परंतु येशू ख्रिस्त वाढत गेला तेव्हा त्याचे व पित्याचे नाते अधिकाधिक वाढत गेले.

आपण जर का विचार केला तर आपल्याला समजून येते की, आपण प्रत्येकांवर कसले ना कसले ओझे आहेत. उदाहरणार्थ स्वतःवर असलेली शंका, कारण नसताना स्वतःला दोषी ठरवणे, स्वतःचा किस वाटणे, स्वतः विषयी वाईट विचार येणे, इत्यादी. ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्य व्यक्तीमध्ये घडत असतात. परंतु आपण ह्या सर्व गोष्टींवर मात करून विजय मिळवतो का? की त्याला बळी पडतो? यावर आपण प्रत्येकाने मनन चिंतन करायला हवे.

प्रिय बंधू-भगिनीं येशू ख्रिस्ताचे जीवन हे वेदनारहित, चिंतामुक्त किंवा ओझे नसलेले असे नव्हते, तर ख्रिस्ताला सुद्धा वेदना होत्या. चिंता होती. ओझे होते. परंतु येशू ख्रिस्त आपले सर्व काही हे परमेश्वराला सांगत असे. चिंता, दुःख, भार ह्या सर्वांना सामोरे जाण्यास, त्यांच्याशी झुंज देण्यास, ख्रिस्त आपल्या पित्याकडून सामर्थ्याचा आधार मिळवत असे. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात शांतीची गरज आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारू या, मला जर का एक चांगली व्यक्ती बनायचे असेल तर मला कोणत्या गोष्टीची गरज आहे? ह्या प्रश्नाची भरपूर अशी उत्तरे मिळतील, आणि मनाची शांती हे एक त्याच्यामधले उत्तर असेल. परंतु ती शांती मिळवायची कशी? हा दुसरा प्रश्न असेल. कारण की ह्या जगात सर्वजण शांती मिळवण्याविषयी बोलत आहेत. परंतु खूप कमी लोक शांती पसरविण्यात व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जे कोण शांतीच्या शोधात आहेत त्याच्यातले सर्वांनास ती मिळत नाही. परंतु काही लोकांना मनातली शांती मिळत असते. कारण ते खऱ्या अर्थाने व मनापासून शोधत असतात. इस्रायल लोक एकमेकांना शांतीने शुभेच्छा देत असत. कारण हे अभिवादन देवाने स्वतः स्थापित केले होते. म्हणून मोशे आणि अहरोनच्या वेळेस शांती ही एक आशीर्वाद म्हणून समजली जात होती. स्वर्ग आणि पृथ्वीचा आपला प्रभू परमेश्वर हा वेगळा आहे. नम्र आणि गरीब त्याचे मित्र आहेत. ह्याचे कारण हेच की, हे लोक खऱ्या शांतीच्या शोधात असतात. येशुख्रिस्त हा आपल्या दुःख आणि वेदना समजून घेतो आणि त्यानुसार आपल्याला हवी ती शांती देतो व आपले ओझे हलके करतो. आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये एक होतो तेव्हाच आपल्याला आपले ओझे हलके वाटते.

थोडा वेळ शांत राहून आपण स्वतःला विचारूया की प्रभूची शांती मिळविण्यासाठी मी कश्याप्रकारे प्रयत्न करत आहे? सार्वकालिक शांतीच्या राजाकडे मी कधी मनाच्या शांतीसाठी विनंती केली आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे शांतीच्या राजा, आमची विनंती एकून घे.

१. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार वागण्यास आपल्याला आपल्या धार्मिक नेत्यांना विशेषकरून पोप लियो चोदावे, महागुरू व धर्मगुरू ह्याना प्रभूने मार्गदर्शन करावे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

२.  हे प्रभू परमेश्वरा सृष्टीचा निर्माणकर्ता यंदाच्या पावसाळ्यात आम्हाला चांगला पाऊस दे. व शेती-भातीची कामे सुरुळीतपणे पार पाडाव. व शेतातील जमीन सुपीक व फळदृप्त कर. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

३. हे प्रभू परमेश्वरा ह्या जगातील प्रत्येक मनुष्याचे अधिकार त्याला मिळू दे. आणि त्याला त्याच्या दैनदिन भाकरीचा आस्वाद व त्याच्या मूलभूत गरजा भागवून दे. विशेषकरून जे स्थलांतरित करतात त्यांना योग्य ती नोकरी व काम दे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

४. हे प्रभू परमेश्वरा जे युवक – युवती नोकरीच्या शोधात आहेत, व  ज्यांना जीवनात मार्गदशानाची गरज आहे, अश्या सर्वाना योग्य तो मार्ग दाखव. आणि कुटुंबात त्यांना योग्यरीतीने आधाराचा स्तंभ बनू दे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

५. जे- जे आत्मे देवाघरी गेलेले आहेत. अशा सवा आत्म्यांना देवाच्या दयेची शांती मिळो व सर्व संतांबरोबर  एकरूप होऊन स्वर्गीय नंदनवनाचा आनंद घेता यावा. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.