Wednesday, 6 May 2026

Reflections for the homily of sixth Sunday of Easter (10/05/2026) by Fr. Reon Andrades



पुनरुत्थान काळातील सहावा रविवार

दिनांक: १०/०५/२०२६

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ८:५-८, १४-१७.

दुसरे वाचन: १ पेत्र ३: १५-१८

शुभवर्तमान: योहान १४:१५-२१

प्रस्तावना:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पुनरुत्थानकाळातील सहाव्या रविवारी आपण सर्व प्रभूच्या पवित्र वेदीभोवती एकत्र जमलो आहोत. आजची वचनसेवा आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारते, आपल्या जीवनातील सर्वात अनमोल बक्षीस कोणते? जगात आपण अनेक गोष्टी मौल्यवान मानतो. पैसा, संपत्ती, ज्ञान, यश, सन्मान, आरोग्य. काहींना वाटते की शलमोनाला मिळालेले ज्ञान हे सर्वात मोठे दान होते; काहींना वाटते की जीवनातील भौतिक सुखसुविधाच सर्वात मोठे बक्षीस आहेत. परंतु आज येशू आपल्याला सांगतो की, सर्वात उत्कृष्ट आणि चिरंतन बक्षीस म्हणजे पवित्र आत्मा होय.

येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही.” हे शब्द केवळ शिष्यांसाठी नव्हते, तर आपल्या प्रत्येकासाठी आहेत. जीवनात अनेक वेळा आपण एकटे पडतो, निराश होतो, निर्णय घेण्यात गोंधळतो, भीती आणि असुरक्षितता अनुभवतो. अशा वेळी येशू आपल्याला सोडून देत नाही; तो आपल्याला पवित्र आत्म्याची भेट देतो. हा आत्मा आपला मार्गदर्शक, सांत्वनकर्ता, धीर देणारा आणि सत्याकडे नेणारा आहे.

आजच्या जगात आपण समारंभांना जाताना भेटवस्तू घेऊन जातो आणि परतताना परत भेट  (return gift) घेऊन येतो. पण ती बक्षिसे काही दिवसांनी विसरली जातात. येशूही आपल्याकडून एक बक्षीस मागतो, ते म्हणजे प्रेम आणि आज्ञाधारकपणा. “जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता, तर माझ्या आज्ञा पाळा,” असे तो सांगतो. आणि त्याच्या बदल्यात येशू आपल्याला  परत भेट म्हणून पवित्र आत्मा देतो.

आजच्या या पवित्र मिस्साबलीत आपण स्वतःला विचारूया, की मी देवावर खरोखर प्रेम करतो का? मी त्याच्या आज्ञा पाळतो का? मी देवाकडे केवळ गरजा आणि इच्छाच मांडतो, की पवित्र आत्म्याचे दानही मागतो? चला, या पवित्र यज्ञात सहभागी होताना आपण अंत:करण उघडे करूया आणि प्रभूला विनंती करूया, “प्रभु, मला तुझा पवित्र आत्मा दे; मला बदल, मला मार्गदर्शन कर, आणि तुझ्या प्रेमात चालायला शिकव.”

मनन चिंतन:

पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार आपल्याला एक अतिशय सुंदर प्रश्न विचारतो, जगातील सर्वात अनमोल बक्षीस कोणते?

आपण लाकूडतोड्याची गोष्ट ऐकली आहे. त्याला सोन्याची, चांदीची आणि लोखंडाची अशा तीन कुऱ्हाडी मिळाल्या. त्या त्याच्यासाठी मोठे बक्षीस होते. राजा शलमोनाला देवाने विचारले, “तुला काय हवे?” आणि त्याने संपत्ती, वैभव किंवा दीर्घायुष्य न मागता ज्ञान मागितले. म्हणून ज्ञानाचे दान हेही अत्यंत मौल्यवान मानले जाते. परंतु खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलेले सर्वात उत्कृष्ट, सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे पवित्र आत्मा होय. हे कोणते बाह्य बक्षीस नव्हते, तर जीवन बदलून टाकणारी देवाची स्वतःची उपस्थिती होती.

पुनरुत्थानानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही.” येशूला ठाऊक होते की, त्याच्या स्वर्गारोहणानंतर शिष्यांना एकटेपणा, भीती आणि असुरक्षितता जाणवेल म्हणून त्याने त्यांना पवित्र आत्म्याची भेट दिली. हा आत्मा त्यांना धीर देणारा, मार्गदर्शक, सांत्वन करणारा आणि सत्याकडे नेणारा ठरला.

आज आपल्या जीवनातही बक्षिसांचा एक नवीन ट्रेंड आहे. आपण कोणाच्या समारंभाला जातो तेव्हा भेटवस्तू घेऊन जातो. लग्नसमारंभ असो, वाढदिवस असो किंवा इतर कार्यक्रम असो, आपण आहेर देतो आणि परतताना परत भेट (return gift) घेऊन येतो. काही दिवस ते बक्षीस आपल्या टेबलावर दिसते, शोकेसमध्ये ठेवले जाते, आणि नंतर हळूहळू त्याचे महत्त्व कमी होते. आपण त्याला विसरून जातो. पण येशू आपल्याला जे परत भेट देतो, ते कधीच संपणारे नाही. तो आपल्याला आपल्या राज्यात बोलावतो, आपल्या भोजनात सहभागी करतो, आपल्या पित्याजवळ नेतो. आणि तो म्हणतो, “जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता, तर माझ्या आज्ञा पाळा.”

हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे, की मी खरोखर येशूवर प्रेम करतो का? की मी स्वतःवर, माझ्या सुखावर, धनसंपत्तीवर आणि माझ्या इच्छांवर अधिक प्रेम करतो? संत ऑगस्टीन म्हणतात: “Love and do whatever you want.” म्हणजेच, जर प्रेम खरे असेल, तर चुकीचे वर्तन होणार नाही. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याचे वाईट कधीच साधत नाही. उलट त्याची सेवा करतो, त्याग करतो, निष्ठा ठेवतो.

येशूला आपल्या कडून एकच बक्षीस हवे आहे ते म्हणजे प्रेम आणि आज्ञाधारकपणा. आपण त्याच्यावर प्रेम करावे आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात. जर आपण हे बक्षीस त्याला दिले, तर तो आपल्याला परत भेट म्हणून पवित्र आत्मा देतो.

आज आपण देवाकडे अनेक गोष्टी मागतो, आरोग्य, नोकरी, पैसा, घर, यश, परीक्षा, लग्न, प्रवास. आपण नवस करतो, उपवास करतो, तीर्थयात्रा करतो, दूरदूरच्या देवस्थानांना जातो. पण आपण कधी पवित्र आत्म्याचे दान मागतो का? हा प्रश्न गंभीर आहे. कारण बहुतेक वेळा आपण पवित्र आत्मा मागत नाही. कारण पवित्र आत्मा मागणे म्हणजे स्वतःला बदलण्याची तयारी ठेवणे. त्यासाठी शुद्धता हवी, प्रार्थना हवी, आत्मपरीक्षण हवे, वाईटाचा त्याग हवा, अहंकार सोडावा लागतो. हे कठीण वाटते. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानतो. परंतु जर आपण पवित्र आत्मा मागितला, तर आपल्याला बाकी सर्व योग्य वेळी मिळेल. कारण पवित्र आत्मा आपल्याला योग्य निर्णय शिकवतो, योग्य मार्ग दाखवतो, सत्याची ओळख करून देतो, आणि देवाच्या इच्छेनुसार जगायला शिकवतो.

पवित्र आत्मा म्हणजे देवाची सततची साथ. तो आपल्या अंत:करणात बोलतो, संकटात धीर देतो, गोंधळात दिशा दाखवतो, पापात जागं करतो, आणि प्रार्थनेत देवाजवळ नेतो. म्हणून आजच्या या सहाव्या पुनरुत्थान रविवारी आपण स्वतःला विचारूया, की मी देवाकडे काय मागतो? तात्पुरत्या गोष्टी, की अनंतकाळ टिकणारे बक्षीस? जगातील सर्वात अनमोल बक्षीस म्हणजे पवित्र आत्मा. चला, आज आपण देवाला मनापासून म्हणूया,  “प्रभु, मला तुझा पवित्र आत्मा दे. मला बदल, मला मार्गदर्शन कर, मला तुझ्या प्रेमात चालायला शिकव.”

कारण ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे, त्याच्याकडे खऱ्या अर्थाने सर्व काही आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे..”

१) आपल्या ख्रिस्तसभेची आध्यात्मिक काळजी घेणारे आपले पोप महाशयकार्डीनल्सबिशप्सधर्मगुरू-धर्मभगिनी आणि सर्व प्रापंचिक ह्या सर्वावर देवाच्या कृपेचा वर्षाव व्हावा व त्यांच्या कृतीतून देवाचे प्रेम लोकांकडे पोहचावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२) आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी आहेत. अशा सर्व आजारी लोकांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३) आज आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया कीदेशभर पसरलेली अशांतता नष्ट व्हावी व सर्वत्र शांतता व सलोखा नांदावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४) आपल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेऊन सतत देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५). थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिककौटुंबिकव वैयक्तिक हेतू आपण प्रभू चरणी अर्पण करू या.

 


Friday, 1 May 2026

Reflections for the homily of Fifth Sunday of Easter (03/05/2026) by Br. Vinan Souz

पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार 

दिनांक: ०३/०५/२०२६

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७.

दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९

शुभवर्तमान: योहान १४:१-१२

प्रस्तावना:

आज देऊळमाता पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला देवाजवळ जाणा-या मार्गाची ओळख करून देत आहे. येशू म्हणतो, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आपल्यावाचून पित्याकडे कोणी येऊ शकत नाही.” या वचनात आपल्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू आहे. आजच्या जगात अनेक मार्ग, अनेक विचारसरणी आणि अनेक आकर्षणे आपल्यासमोर असतात, पण येशू स्पष्टपणे सांगतो की खरा मार्ग तोच आहे.

आपण अनेकदा सुख, यश आणि समाधान चुकीच्या ठिकाणी शोधतो. त्यामुळे जीवनात गोंधळ आणि रिकामेपणा निर्माण होतो. पण येशू आपल्याला दाखवतो की सत्य त्याच्यामध्ये आहे आणि खरे जीवनही त्याच्यामध्येच आहे. जेव्हा आपण त्याच्या मार्गावर चालतो, तेव्हा आपण चुकीच्या दिशेला जात नाही.

आजच्या मिस्साबालीदानात भाग घेत असताना आपण स्वतः विचार करूया की आपण खरोखर येशूला आपल्या जीवनाचा मार्ग मानतो का? चला, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या सत्यात जगण्याचा आणि त्याच्यामध्ये खरे जीवन शोधण्याचा निर्णय घेऊया.

मनन चिंतन:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांच्या मनातील भीती, अस्वस्थता आणि गोंधळ ओळखतो आणि त्यांना सांत्वन देतो: “तुमचे मन व्याकुळ होऊ देऊ नका; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.” ही वाक्ये फक्त शब्द नाहीत, तर ती एक जीवनाचा पाया आहेत. याचा अर्थ असा की ख्रिस्ती जीवन म्हणजे संकटांपासून मुक्त जीवन नाही, तर संकटांमध्येही विश्वासाने उभे राहण्याचे जीवन आहे.

आजच्या जगात आपण अनेक प्रकारच्या चिंता, भीती, असुरक्षितता आणि तणाव यांना सामोरे जात आहोत. नोकरीची चिंता, कुटुंबातील समस्या, आरोग्याचे प्रश्न, भविष्याची भीती, या सर्वांमुळे मन अस्वस्थ होते. अशा वेळी येशू आपल्याला सांगतो, “घाबरू नका, माझ्यावर विश्वास ठेवा.”

येशू पुढे म्हणतो, “माझ्या पित्याच्या  घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत… मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे.” ही वाक्ये आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाची आठवण करून देतात. आपण या जगात कायमचे नाही; आपण प्रवासी आहोत. आपले खरे घर देवाजवळ आहे. पण आज आपण इतके जगात अडकून गेलो आहोत की आपण हे विसरतो. आपण घर, पैसा, प्रतिष्ठा, करिअर यांनाच आपले अंतिम ध्येय समजतो. पण जेव्हा संकट येते, तेव्हा हे सर्व आपल्याला शांती देऊ शकत नाही. फक्त देवच आपल्याला खरी शांती देऊ शकतो. म्हणून येशू म्हणतो, “मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे.” म्हणजे देव आपल्यासाठी आधीच योजना आखत आहे, आपण फक्त विश्वास ठेवायचा आहे.

थोमाचा प्रश्न आपल्या सारखाच आहे: “प्रभु, आम्हाला मार्ग कसा कळणार?” आपणही अनेकदा विचारतो, “माझ्या जीवनाचा मार्ग काय आहे?” “मी काय निर्णय घ्यावा?” “माझे भविष्य काय आहे?” यावर येशू स्पष्ट उत्तर देतो, “मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे.” हे केवळ एक धार्मिक वाक्य नाही; हे एक जीवनाची दिशा आहे. येशू म्हणतो, मी मार्ग आहे, म्हणजेच माझ्या जीवनशैलीप्रमाणे जगा. मी सत्य आहे, म्हणजे खोटेपणापासून दूर राहा. मी जीवन आहे, म्हणजे माझ्यातच खरे जीवन आहे. आज अनेक लोक चुकीच्या मार्गावर जातात कारण ते खरा मार्ग ओळखत नाहीत. पण जो येशूला ओळखतो, तो कधीच हरवत नाही.

एका मोठ्या राज्यात एक राजा होता. तो अत्यंत न्यायी आणि ज्ञानी होता. त्याच्या राज्यात सर्व काही व्यवस्थित होते, पण लोकांमध्ये एक समस्या होती. ते सहज घाबरायचे, निराश व्हायचे आणि संकटात विश्वास गमवायचे. राजाला हे बदलायचे होते. एक दिवस त्याने आपल्या दरबारात जाहीर केले की, “जो कोणी जीवनातील सर्वात मोठ्या समस्येवर योग्य उपाय सांगेल, त्याला मी मोठे बक्षीस देईन.” अनेक लोक आले, त्यांनी विविध उपाय सांगितले, पण राजाला समाधान झाले नाही.

शेवटी एक वृद्ध माणूस आला. त्याने एक साधी गोष्ट सांगितली. त्याने म्हटले, “महाराज, प्रत्येक माणसाच्या जीवनात दु:ख येते. काही लोक त्या दु:खाला पाहून घाबरतात आणि पळून जातात. पण काही लोक त्या दु:खातही स्थिर राहतात, कारण त्यांना माहित असते की दु:ख कायमचे नसते.” राजा खूप प्रभावित झाला. पण त्याने अजून एक परीक्षा घ्यायची ठरवली. त्याने त्या वृद्धाला एक अंगठी दिली आणि सांगितले, “या अंगठीवर एक वाक्य लिहा, जे माणसाला आनंदात नम्र ठेवेल आणि दुःखात धीर देईल.”

काही दिवसांनी वृद्ध माणूस परत आला. त्याने अंगठीवर लिहिले होते, “हेही निघून जाईल.” राजा आश्चर्यचकित झाला. कारण हे वाक्य खूप खोल अर्थ सांगत होते. आनंद असो किंवा दुःख, काहीही कायमचे नाही. म्हणून माणसाने परिस्थितीवर नाही, तर विश्वासावर जगायला हवे.

बंधूंनो आणि भगिनींनो, ही गोष्ट आपल्या जीवनाशी किती जुळते! जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा आपण विचार करतो, “हे कधी संपणार?” आपण निराश होतो, घाबरतो, कधी कधी देवावर रागावतो. पण येशू म्हणतो, “विश्वास ठेवा.” कारण प्रत्येक दु:ख, संकट निघून जाते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. पण त्यासाठी आपण स्थिर राहिले पाहिजे.

आज अनेक कुटुंबे संकटात आहेत. काही आर्थिक अडचणीत, काही नातेसंबंधातील तणावात, काही आरोग्याच्या समस्यांमध्ये. अशा वेळी लोक देवापासून दूर जातात. ते म्हणतात, “देव मला मदत करत नाही.” पण खरं म्हणजे, देव आपल्यासोबत असतो, फक्त आपण त्याला ओळखत नाही. येशू म्हणतो, “जो मला पाहतो, तो पित्याला पाहतो.” म्हणजे आपण येशूच्या जीवनाकडे पाहिले, तर आपल्याला देवाचे प्रेम दिसेल.

आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विश्वास म्हणजे फक्त चांगल्या काळात देवावर भरोसा ठेवणे नाही, तर वाईट काळातही त्याच्यावर विश्वास ठेवणे. कारण खरा विश्वास संकटातच दिसतो. जेव्हा सर्व काही ठीक असते, तेव्हा कोणालाही विश्वास ठेवणे सोपे असते. पण जेव्हा काहीच ठीक नसते, तेव्हा जो देवावर विश्वास ठेवतो, तोच खरा विश्वासू आहे.

आज आपण स्वतःला विचारूया, माझा विश्वास किती मजबूत आहे? मी अडचणी आल्यावर काय करतो? मी देवावर विश्वास ठेवतो की घाबरतो? मी प्रार्थना करतो की तक्रार करतो? हे प्रश्न आपल्या जीवनाला दिशा देतात.

आपण प्रार्थना करूया की देव आपल्याला मजबूत विश्वास देईल, धैर्य देईल, आणि आपल्या जीवनात त्याचा मार्ग दाखवेल. कारण येशूच आपला मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्यामध्येच आपल्याला शांती, आनंद आणि खरे जीवन मिळते. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभूआम्हाला तुझे साक्षीदार बनव.”

१. आपल्या ख्रिस्तसभेचे महाशय पोप लियोसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेतत्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करु या.

२. पापीजकातदार व समाजाने बहिष्कृत केलेल्या व्यक्तीबरोबर प्रभू तुझे कार्य आम्हाला प्रेरणा देवो जेणेकरून आम्ही तुज्या सुर्वार्तेची घोषणा सर्व ठिकाणी पसरू म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेतअशा सर्वांना त्यांच्या रोगांपासून मुक्तता मिळावी, त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. जे वासनाव्यसन यांच्या अधीन गेले आहेतजे मृत जीवन जगत आहेत त्यांना आमच्या सेवेद्वारे नवजीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. पर्यावरणाची काळजी घेऊन स्वच्छ व सुंदर विश्व बनविण्यासाठी आम्ही झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिककौटुंबिकव वैयक्तिक हेतू आपण प्रभू चरणी अर्पण करू या.