Friday, 1 May 2026

Reflections for the homily of Fifth Sunday of Easter (03/05/2026) by Br. Vinan Souz

पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार 

दिनांक: ०३/०५/२०२६

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७.

दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९

शुभवर्तमान: योहान १४:१-१२

प्रस्तावना:

आज देऊळमाता पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला देवाजवळ जाणा-या मार्गाची ओळख करून देत आहे. येशू म्हणतो, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आपल्यावाचून पित्याकडे कोणी येऊ शकत नाही.” या वचनात आपल्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू आहे. आजच्या जगात अनेक मार्ग, अनेक विचारसरणी आणि अनेक आकर्षणे आपल्यासमोर असतात, पण येशू स्पष्टपणे सांगतो की खरा मार्ग तोच आहे.

आपण अनेकदा सुख, यश आणि समाधान चुकीच्या ठिकाणी शोधतो. त्यामुळे जीवनात गोंधळ आणि रिकामेपणा निर्माण होतो. पण येशू आपल्याला दाखवतो की सत्य त्याच्यामध्ये आहे आणि खरे जीवनही त्याच्यामध्येच आहे. जेव्हा आपण त्याच्या मार्गावर चालतो, तेव्हा आपण चुकीच्या दिशेला जात नाही.

आजच्या मिस्साबालीदानात भाग घेत असताना आपण स्वतः विचार करूया की आपण खरोखर येशूला आपल्या जीवनाचा मार्ग मानतो का? चला, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या सत्यात जगण्याचा आणि त्याच्यामध्ये खरे जीवन शोधण्याचा निर्णय घेऊया.

मनन चिंतन:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांच्या मनातील भीती, अस्वस्थता आणि गोंधळ ओळखतो आणि त्यांना सांत्वन देतो: “तुमचे मन व्याकुळ होऊ देऊ नका; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.” ही वाक्ये फक्त शब्द नाहीत, तर ती एक जीवनाचा पाया आहेत. याचा अर्थ असा की ख्रिस्ती जीवन म्हणजे संकटांपासून मुक्त जीवन नाही, तर संकटांमध्येही विश्वासाने उभे राहण्याचे जीवन आहे.

आजच्या जगात आपण अनेक प्रकारच्या चिंता, भीती, असुरक्षितता आणि तणाव यांना सामोरे जात आहोत. नोकरीची चिंता, कुटुंबातील समस्या, आरोग्याचे प्रश्न, भविष्याची भीती, या सर्वांमुळे मन अस्वस्थ होते. अशा वेळी येशू आपल्याला सांगतो, “घाबरू नका, माझ्यावर विश्वास ठेवा.”

येशू पुढे म्हणतो, “माझ्या पित्याच्या  घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत… मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे.” ही वाक्ये आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाची आठवण करून देतात. आपण या जगात कायमचे नाही; आपण प्रवासी आहोत. आपले खरे घर देवाजवळ आहे. पण आज आपण इतके जगात अडकून गेलो आहोत की आपण हे विसरतो. आपण घर, पैसा, प्रतिष्ठा, करिअर यांनाच आपले अंतिम ध्येय समजतो. पण जेव्हा संकट येते, तेव्हा हे सर्व आपल्याला शांती देऊ शकत नाही. फक्त देवच आपल्याला खरी शांती देऊ शकतो. म्हणून येशू म्हणतो, “मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे.” म्हणजे देव आपल्यासाठी आधीच योजना आखत आहे, आपण फक्त विश्वास ठेवायचा आहे.

थोमाचा प्रश्न आपल्या सारखाच आहे: “प्रभु, आम्हाला मार्ग कसा कळणार?” आपणही अनेकदा विचारतो, “माझ्या जीवनाचा मार्ग काय आहे?” “मी काय निर्णय घ्यावा?” “माझे भविष्य काय आहे?” यावर येशू स्पष्ट उत्तर देतो, “मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे.” हे केवळ एक धार्मिक वाक्य नाही; हे एक जीवनाची दिशा आहे. येशू म्हणतो, मी मार्ग आहे, म्हणजेच माझ्या जीवनशैलीप्रमाणे जगा. मी सत्य आहे, म्हणजे खोटेपणापासून दूर राहा. मी जीवन आहे, म्हणजे माझ्यातच खरे जीवन आहे. आज अनेक लोक चुकीच्या मार्गावर जातात कारण ते खरा मार्ग ओळखत नाहीत. पण जो येशूला ओळखतो, तो कधीच हरवत नाही.

एका मोठ्या राज्यात एक राजा होता. तो अत्यंत न्यायी आणि ज्ञानी होता. त्याच्या राज्यात सर्व काही व्यवस्थित होते, पण लोकांमध्ये एक समस्या होती. ते सहज घाबरायचे, निराश व्हायचे आणि संकटात विश्वास गमवायचे. राजाला हे बदलायचे होते. एक दिवस त्याने आपल्या दरबारात जाहीर केले की, “जो कोणी जीवनातील सर्वात मोठ्या समस्येवर योग्य उपाय सांगेल, त्याला मी मोठे बक्षीस देईन.” अनेक लोक आले, त्यांनी विविध उपाय सांगितले, पण राजाला समाधान झाले नाही.

शेवटी एक वृद्ध माणूस आला. त्याने एक साधी गोष्ट सांगितली. त्याने म्हटले, “महाराज, प्रत्येक माणसाच्या जीवनात दु:ख येते. काही लोक त्या दु:खाला पाहून घाबरतात आणि पळून जातात. पण काही लोक त्या दु:खातही स्थिर राहतात, कारण त्यांना माहित असते की दु:ख कायमचे नसते.” राजा खूप प्रभावित झाला. पण त्याने अजून एक परीक्षा घ्यायची ठरवली. त्याने त्या वृद्धाला एक अंगठी दिली आणि सांगितले, “या अंगठीवर एक वाक्य लिहा, जे माणसाला आनंदात नम्र ठेवेल आणि दुःखात धीर देईल.”

काही दिवसांनी वृद्ध माणूस परत आला. त्याने अंगठीवर लिहिले होते, “हेही निघून जाईल.” राजा आश्चर्यचकित झाला. कारण हे वाक्य खूप खोल अर्थ सांगत होते. आनंद असो किंवा दुःख, काहीही कायमचे नाही. म्हणून माणसाने परिस्थितीवर नाही, तर विश्वासावर जगायला हवे.

बंधूंनो आणि भगिनींनो, ही गोष्ट आपल्या जीवनाशी किती जुळते! जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा आपण विचार करतो, “हे कधी संपणार?” आपण निराश होतो, घाबरतो, कधी कधी देवावर रागावतो. पण येशू म्हणतो, “विश्वास ठेवा.” कारण प्रत्येक दु:ख, संकट निघून जाते. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. पण त्यासाठी आपण स्थिर राहिले पाहिजे.

आज अनेक कुटुंबे संकटात आहेत. काही आर्थिक अडचणीत, काही नातेसंबंधातील तणावात, काही आरोग्याच्या समस्यांमध्ये. अशा वेळी लोक देवापासून दूर जातात. ते म्हणतात, “देव मला मदत करत नाही.” पण खरं म्हणजे, देव आपल्यासोबत असतो, फक्त आपण त्याला ओळखत नाही. येशू म्हणतो, “जो मला पाहतो, तो पित्याला पाहतो.” म्हणजे आपण येशूच्या जीवनाकडे पाहिले, तर आपल्याला देवाचे प्रेम दिसेल.

आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विश्वास म्हणजे फक्त चांगल्या काळात देवावर भरोसा ठेवणे नाही, तर वाईट काळातही त्याच्यावर विश्वास ठेवणे. कारण खरा विश्वास संकटातच दिसतो. जेव्हा सर्व काही ठीक असते, तेव्हा कोणालाही विश्वास ठेवणे सोपे असते. पण जेव्हा काहीच ठीक नसते, तेव्हा जो देवावर विश्वास ठेवतो, तोच खरा विश्वासू आहे.

आज आपण स्वतःला विचारूया, माझा विश्वास किती मजबूत आहे? मी अडचणी आल्यावर काय करतो? मी देवावर विश्वास ठेवतो की घाबरतो? मी प्रार्थना करतो की तक्रार करतो? हे प्रश्न आपल्या जीवनाला दिशा देतात.

आपण प्रार्थना करूया की देव आपल्याला मजबूत विश्वास देईल, धैर्य देईल, आणि आपल्या जीवनात त्याचा मार्ग दाखवेल. कारण येशूच आपला मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्यामध्येच आपल्याला शांती, आनंद आणि खरे जीवन मिळते. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभूआम्हाला तुझे साक्षीदार बनव.”

१. आपल्या ख्रिस्तसभेचे महाशय पोप लियोसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेतत्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करु या.

२. पापीजकातदार व समाजाने बहिष्कृत केलेल्या व्यक्तीबरोबर प्रभू तुझे कार्य आम्हाला प्रेरणा देवो जेणेकरून आम्ही तुज्या सुर्वार्तेची घोषणा सर्व ठिकाणी पसरू म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेतअशा सर्वांना त्यांच्या रोगांपासून मुक्तता मिळावी, त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. जे वासनाव्यसन यांच्या अधीन गेले आहेतजे मृत जीवन जगत आहेत त्यांना आमच्या सेवेद्वारे नवजीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. पर्यावरणाची काळजी घेऊन स्वच्छ व सुंदर विश्व बनविण्यासाठी आम्ही झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिककौटुंबिकव वैयक्तिक हेतू आपण प्रभू चरणी अर्पण करू या.



Saturday, 25 April 2026

Reflections for the homily of Fourth Sunday of Easter (26/04/2026) by Br. Saurav Patil


पुनरुत्थान काळातील चौथा रविवार 

दिनांक: २६/०४/२०२६

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४२..

दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५..

शुभवर्तमान: योहान १०:१-१०.



प्रस्तावना:

प्रिय बंधूंनो आणि भघीनींनो, आजच्या पवित्र वचनांमधून देव आपल्याशी अतिशय जवळून आणि प्रेमाने संवाद साधत आहे. आपल्या जीवनात अनेक आवाज, अनेक मार्ग आणि अनेक आकर्षणे आपल्याला वेगवेगळ्या दिशांना खेचत असतात, पण या गोंधळात देव आपल्याला थांबून विचार करायला बोलावतो आपण कोणाचा आवाज ऐकत आहोत आणि कोणत्या मार्गावर चालत आहोत? आजची वाचने आपल्याला आपल्या जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यास आमंत्रण देतात. ती आपल्याला पश्चात्तापाची गरज, ख्रिस्ताच्या दु:खातून मिळणारा आदर्श आणि येशू या खऱ्या मेंढपाळावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व शिकवतात. चला, या वचनांद्वारे देव आपल्याला काय सांगू इच्छितो, ते मनापासून ऐकूया आणि आपल्या जीवनात त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करूया

मनन चिंतन

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या वाचनांमध्ये आपल्याला एक अत्यंत सुंदर आणि आध्यात्मिक सत्य दिसते. येशू ख्रिस्त हा आपला खरा मेंढपाळ आहे, जो आपल्याला पापातून मुक्त करतो, आपल्या जखमा भरून काढतो आणि आपल्याला खरे जीवन देतो. प्रेषितांची कृत्ये या पहिल्या वाचनात संत पेत्र लोकांसमोर उभा राहून धाडसाने सांगतो की ज्याला त्यांनी क्रूसावर खिळले, त्यालाच देवाने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे. हे ऐकून लोकांच्या अंतःकरणाला टोचणी लागते आणि ते विचारतात, “आता आम्ही काय करावे?” या प्रश्नातच त्यांच्या परिवर्तनाची सुरुवात दिसते. पेत्र त्यांना सांगतो पश्चात्ताप करा, बाप्तिस्मा घ्या आणि पापांची क्षमा मिळवा. यामध्ये आपल्यासाठीही एक स्पष्ट संदेश आहे की देव आपल्याला नेहमी नवीन सुरुवात करण्याची संधी देतो; आपण कितीही चुकलो तरी त्याचे प्रेम आणि दया आपल्यासाठी खुलीच असते.

दुसऱ्या वाचनात संत पेत्र आपल्याला येशूच्या दु:खाचा अर्थ समजावून सांगतो. येशूने कोणतेही पाप केले नाही, तरी त्याने अपमान, अन्याय आणि वेदना सहन केल्या, पण त्याने कधीही सूड घेतला नाही. उलट, त्याने सर्व काही देवाच्या हाती सोपवले. या माध्यमातून तो आपल्याला शिकवतो की खरे ख्रिस्ती जीवन म्हणजे फक्त सुखात देवावर विश्वास ठेवणे नव्हे, तर दु:खातही विश्वास टिकवणे होय. “तुम्ही मेंढरांसारखे भरकटले होते, पण आता तुम्ही तुमच्या आत्म्याच्या मेंढपाळाकडे परत आला आहात,” या वाक्यातून आपल्याला जाणवते की येशू आपल्याला हरवलेल्या अवस्थेतून पुन्हा आपल्या जवळ आणतो आणि आपल्या जखमा भरून काढतो.

आजच्या शुभावार्तमानामध्ये येशू स्वतःला “मेंढपाळ” आणि “द्वार” म्हणून ओळख करून देतो. तो सांगतो की खरा मेंढपाळ आपल्या मेंढरांना नावाने ओळखतो, त्यांना सुरक्षित ठेवतो आणि त्यांच्यासाठी आपले जीवन अर्पण करतो. तो पुढे म्हणतो, “मी आलो आहे की त्यांना जीवन मिळावे आणि ते परिपूर्णपणे मिळावे.” याचा अर्थ असा की येशू फक्त आपल्याला पापातून वाचवण्यासाठी नाही, तर आपले जीवन समृद्ध, अर्थपूर्ण आणि पूर्ण करण्यासाठी आला आहे. या तिन्ही वाचनांमध्ये एक स्पष्ट आध्यात्मिक प्रवास दिसतो. पश्चात्तापातून जागृती, ख्रिस्ताच्या उदाहरणातून जीवन आणि शेवटी मेंढपाळाच्या मार्गावर चालणे.

आजच्या जगात हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण अनेक “खोट्या मेंढपाळांच्या आवाजात हरवून जातो. जसे की पैसा, प्रतिष्ठा, सोशल मीडियाचे आकर्षण, आणि तात्पुरता आनंद. हे सर्व आपल्याला काही काळासाठी सुख देतात, पण शेवटी रिकामेपण आणि असंतोष निर्माण करतात. येशू मात्र आपल्याला खरे आणि शाश्वत जीवन देतो. म्हणूनच आज आपल्याला स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपण कोणाचा आवाज ऐकतो? देवाचा की जगाचा? संत पेत्राची हाक आजही आपल्यासाठी आहे, पश्चात्ताप करा, देवाकडे वळा आणि नवे जीवन सुरू करा. तसेच, जीवनातील अडचणी, ताणतणाव आणि अन्याय यामध्येही आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवायला शिकलो पाहिजे, कारण तोच आपल्याला मार्ग दाखवतो आणि शेवटी विजयाकडे नेतो.

म्हणून, प्रिय बंधूंनो-भगिनींनो, आपण आज या वचनातून प्रेरणा घेऊया, आपल्या चुका ओळखून देवाकडे परत वळूया, ख्रिस्ताचे  प्रेम आणि सहनशीलतेचे अनुकरण करूया, आणि आपल्या खऱ्या मेंढपाळाच्या आवाजावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गावर चालूया. कारण त्याच्यामध्येच आपल्याला खरे जीवन, शांती आणि आनंद सापडतो. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वर दया कर आणि तुझ्या कळपाची प्रार्थना ऎक

१) ज्या तरुण तरुणींना परमेश्वर आपल्या मळ्यात कार्य करण्यासाठी पाचारण देत आहे त्यांनी परमेश्वरी हाकेला योग्य प्रतिसाद देऊन परमेश्वर दाखवत आहे त्या मार्गाने आपलं जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) जी लोक हरवलेल्या मेंढरांप्रमाणे ख्रिस्तसभेपासून दुरावलेली आहेत आणि जिवंत देवापासून दूर गेलेली आहेत, अशांना आपल्या जीवनात परमेश्वराचा प्रकाश दिसावा आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच आपल्या जीवनाचा उत्तम मेंढपाळ म्हणून ओळख आणि जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३) आपल्या ख्रिस्तसभेची आणि आपल्या समाजाची धुरा वाहणाऱ्या सर्व नेत्यांनी ख्रिस्तासारखा निस्वार्थी सेवेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा ध्यास घेऊन सदैव लोककल्याणासाठी स्वतःला वाहून घ्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या सर्व आजारी व्यक्तींना परमेश्वरी कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि त्यांना उत्तम मेंढपाळाकडून नवजीवन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपल्या कुटुंबातील आणि धर्मग्रामातील सर्व मृत बंधू-भगिनींना परमेश्वराच्या स्वर्गीय नंदनवनात सार्वकालिक सुखाचा शांतीचा उपभोग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


Thursday, 16 April 2026

Reflections for the homily of Third Sunday of Easter (19/04/2026) by Br. Vinan Souz


पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार

दिनांक: १९/०४/२०२६

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-३३.

दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.

शुभवर्तमान: लुक २४:१३-३५.

प्रस्तावना:

आज अखिल ख्रिस्तसभा पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास संशयातून विश्वासाकडे आणि निराशेतून आशेकडे जाण्याचे आवाहन करत आहे.

        आजच्या पहिल्या वाचनात आपण एकतो कि, पेत्र धाडसाने सांगतो की, येशूला क्रूसावर खिळले असले तरी देवाने येशूला उठविले. देवाची योजना येशूमध्ये पूर्ण झाली असून तो मृत्यूवर विजय मिळवून आपल्याला नवे जीवन देतो. आजच्या दुसऱ्या वाचनात आपण एकतो कि, विश्वासूंना आदरपूर्वक जीवन जगण्याचे आवाहन केले जाते, कारण आपण नाशवंत गोष्टींनी नव्हे तर ख्रिस्ताच्या अमूल्य रक्ताने मुक्त झालो आहोत. आजच्या शुभवर्तमानात आपण कि, अम्माऊस गावाकडे जाणाऱ्या शिष्यांना येशू भेटतो, पण ते येशूला ओळखू शकले नाही. येशू त्यांना शास्त्र समजावून सांगतो आणि त्यांच्या अंतःकरणात आशेची ज्योत पेटवतो. भाकर मोडताना त्यांच्या डोळ्यांना उघड होते आणि ते उठलेल्या प्रभूला ओळखतात.

        आपणही अनेकदा आपल्या जीवनात चालणाऱ्या येशूला ओळखू शकत नाही.
येशू देववचनात आणि पवित्र भाकरीमध्ये स्वतःला प्रकट करतो आणि आपला विश्वास नव्याने जागृत करतो. ही आशा आणि आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवण्यास बोलावलेले आहोत.

        आज ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण प्रार्थना करूया कि, आपले डोळे उघडले जावोत, जेणेकरून आपण येशूला आपल्या जीवनात ओळखू शकू.

मनन चिंतन

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात आपण अम्माऊसच्या वाटेवर चालणाऱ्या दोन शिष्यांची घटना ऐकतो. हे शिष्य खूप निराश होऊन यरुशलेमेहून अम्माऊस गावाकडे जात होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, मनात संभ्रम आणि भविष्याबद्दल अंधार होता. त्यांनी ज्या येशूवर आशा ठेवली होती, तो क्रूसावर खिळला गेला आणि त्यांच्या सर्व अपेक्षा जणू संपल्या होत्या. आज आपल्या जीवनातही अशीच परिस्थिती अनेक वेळा येते. आपण आशा ठेवतो, प्रयत्न करतो, प्रार्थना करतो; पण जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा आपणही निराश होतो, देवापासून दूर जातो, आणि आपला मार्ग बदलतो.

आजच्या जीवनातील एक मोठी समस्या म्हणजे निराशा आणि एकाकीपणा. आधुनिक जगात आपण तंत्रज्ञानाने जोडलेले असलो, तरी मनाने खूप दूर झालो आहोत. सोशल मीडियावर हजारो मित्र असले तरी मन मोकळे करण्यासाठी खरा कोणी नसतो. करिअर, स्पर्धा, आर्थिक ताण, कुटुंबातील तणाव या सर्वांमुळे अनेक लोक आतून तुटत आहेत. काहींना वाटते की देव त्यांच्या जीवनात नाही, किंवा देवाने त्यांना सोडून दिले आहे.

अम्माऊसच्या शिष्यांप्रमाणे आपणही अनेक वेळा देवाला ओळखण्यात अपयशी ठरतो. येशू त्यांच्या सोबत चालत होता, पण ते त्याला ओळखू शकले नाहीत. कारण त्यांच्या डोळ्यांवर निराशेचा पडदा होता. आजही आपल्या जीवनात देव अनेक प्रकारे येतो. लोकांच्या माध्यमातून, घटनांमधून, वचनातून. पण आपण येशूला ओळखत नाही. आपण आपल्या समस्यांमध्ये इतके गुंतून जातो की देवाची उपस्थिती आपल्याला दिसत नाही.

आजच्या शुभवर्तमानात एक महत्त्वाचा भाग म्हणजे येशू त्यांच्याशी संवाद करतो. तो त्यांना विचारतो, “तुम्ही काय बोलत आहात?” देव आपल्यालाही आज विचारतो. तुझ्या मनात काय चाललं आहे? तुझं दुःख काय आहे? आपल्याला आपल्या मनातील वेदना देवाशी बोलायला शिकावे लागेल. प्रार्थना म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर हृदयाची ओळख आहे. जेव्हा आपण देवाशी मन मोकळे करतो, तेव्हा येशू आपल्या जीवनात कार्य करू लागतो.

येशू त्यांना शास्त्र समजावून सांगतो. त्यांचे हृदय प्रज्वलित होते. याचा अर्थ असा की देवाचे वचन आपल्याला नवा प्रकाश देते. आज आपण बायबल वाचन करतो का? की आपण फक्त समस्या सोडवण्यासाठी जगातील उपाय शोधतो? देवाचे वचन आपल्याला योग्य दिशा दाखवते. जेव्हा आपण ते मनापासून ऐकतो, तेव्हा आपल्या जीवनात बदल घडतो.

अॅड्रियन नावाचा एक तरुण होता. तो एका मोठ्या शहरात आयटी कंपनीत काम करत होता. त्याचे जीवन व्यवस्थित चालले होते. चांगली नोकरी, पगार, मित्र, आधुनिक जीवनशैली. पण आतून तो खूप रिकामा होता. त्याच्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. कुटुंबातील मतभेद, प्रेमभंग, कामाचा ताण. एक दिवस तो पूर्णपणे तुटून गेला. त्याला वाटलं की आता काहीच उरले नाही.

एक संध्याकाळी तो एकटाच शहरातील एका लांब रस्त्यावर चालत होता. त्याच्या मनात खूप प्रश्न होते. “देव आहे का? असेल तर तो माझ्या आयुष्यात का काही करत नाही?” तो चालत राहिला. अचानक त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटला. त्या व्यक्तीने त्याच्याशी संवाद सुरू केला. सुरुवातीला अॅड्रियनला वाटले की हा एक साधा माणूस आहे, पण हळूहळू त्यांचे बोलणे खोल होत गेले.

त्या वृद्धाने त्याला विचारले, “तू एवढा का चिंतित आहेस?” अॅड्रियनने आपल्या सर्व समस्या सांगितल्या. त्या व्यक्तीने शांतपणे ऐकले आणि म्हणाला, “तू एकटा नाहीस. देव तुझ्यासोबत चालत आहे, पण तू त्याला पाहत नाहीस.” मग त्याने काही बायबल वचने सांगितली आणि त्यांचा अर्थ समजावून दिला. अॅड्रियनचे मन हळूहळू शांत होऊ लागले.

ते दोघे जवळच्या एका कॅफेमध्ये गेले. तिथे बसून त्यांनी एकत्र जेवण घेतले. जेव्हा त्या वृद्धाने भाकरी मोडली, तेव्हा अॅड्रियनला अचानक काहीतरी जाणवले, जणू देवाची उपस्थिती त्याला स्पर्श करत होती. तो क्षण त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. त्याला समजले की देव कधीच त्याला सोडून गेला नव्हता.

जेव्हा तो परत पाहायला गेला, तेव्हा तो वृद्ध दिसला नाही. पण अॅड्रियनच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली होती. त्याने आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेतला. प्रार्थना सुरू केली, बायबल वाचायला लागला, आणि इतरांना मदत करायला लागला.

ही कथा आपल्याला अम्माऊसच्या शिष्यांची आठवण करून देते. येशू आपल्या जीवनात येतो. आपल्या दुःखात, आपल्या प्रश्नांमध्ये, आपल्या एकाकीपणात. पण आपण त्याला ओळखतो का?

आजच्या शुभवर्तमानाचा मुख्य संदेश म्हणजे:

1. देव आपल्या सोबत चालतो, आपल्याला जाणवत नाही तरी देव आपल्या बरोबर असतो.

2. देवाचे वचन आपल्या जीवनात प्रकाश आणते.

3. मिस्साबलिदानात (भाकर तोडण्यात) आपण येशूला ओळखतो.

अम्माऊसचे शिष्य जेव्हा येशूला ओळखतात, तेव्हा ते ताबडतोब यरुशलेमला परत जातात आणि इतरांना सांगतात. याचा अर्थ असा की देवाचा अनुभव आपण स्वतःपुरता ठेवू नये. आपण तो इतरांशी वाटायला हवा.

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण आपल्या जीवनाकडे पाहूया. आपण कुठे चाललो आहोत? आपण अम्माऊसच्या वाटेवर आहोत का? कि निराश, संभ्रमित, आणि देवापासून दूर? की आपण येशूला आपल्या जीवनात ओळखत आहोत?

आज येशू आपल्याला आमंत्रण देतो, “माझ्यासोबत चाल.”तो आपल्या दुःखात, आपल्या अश्रूंमध्ये, आपल्या संघर्षात आपल्यासोबत आहे. आपल्याला फक्त त्याला ओळखायचे आहे. शेवटी, आपण ही प्रार्थना करूया: प्रभु येशू, आमच्या जीवनाच्या वाटेवर आमच्यासोबत चाल. आमच्या निराशेला आशेत बदल. आमच्या अंधारात प्रकाश दे. आणि आमच्या हृदयात तुझी उपस्थिती आम्हाला जाणवू दे. आमेन.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: करितो मी याचना ऐकावी प्रार्थना.”

१. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया कीदेवाने आपले परमगुरु पोप लियोकार्डिनल्समहागुरूधर्मगुरूतसेच सर्व श्रद्धावंतांना आशीर्वादित करूनसुखी-समाधानी व नीरोगी ठेवावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपण आपल्या सार्वजनिक हितासाठी कार्य करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करुया कीविशेष म्हणजे पोलीस अधिकारीसाफसफाई करणारे कामगाररोजचा आहार पुरवणारे सेवक-सेविकाइत्यादी ह्यांना परमेश्वर सदोदित त्यांच्या बरोबर राहू देत्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावेउदार हस्ते मदत करण्याची सुबुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करूया कीत्यांनी लोकहितासाठी निर्णय घेऊन जनतेच्या प्रगतीस अनुरूप अशी धोरणं बनवावीत व त्यामुळे गोरगरिबांचा उद्धार होऊनत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सदोदित तुझ्या प्रेमाच्या मायेखाली ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. हे प्रभू आम्ही सर्वजण राजनीतिक व आर्थिक महामारीत अडकलेलो आहोत. आमच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिककौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.