Reflections for the
Homily of 18th
Sunday in Ordinary Time (02-08-2026) By Fr. Reon Andrades
सामान्य काळातील अठरावा रविवार
दिनांक: ०२/०८/२०२६
पहिले
वाचन: यशया ५५: १-३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९
शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१
जिथे देव आहे, तिथेच स्वर्ग आहे
प्रस्तावना:
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,
आजच्या वाचनांमधून प्रभू आपल्याला देवाच्या राज्याचे खरे स्वरूप
समजावून सांगतो. अनेकदा
आपण स्वर्ग म्हणजे केवळ दुःख नसलेले, सुखाने भरलेले स्थान अशी कल्पना करतो. परंतु आजची वाचने आपल्याला शिकवते की जिथे देवाची उपस्थिती आहे, तिथेच खरा स्वर्ग आहे. पहिल्या वाचनात परमेश्वर सर्व तहानलेल्या आणि
भुकेल्यांना स्वतःकडे येण्याचे आमंत्रण देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की कोणतेही संकट
आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. शुभवर्तमानात येशू आपल्या करुणेने लोकांना बरे
करतो आणि त्यांच्या भुकेचीही काळजी घेतो. या सर्व वाचनांतून एकच संदेश स्पष्ट होतो, देव आपल्याबरोबर असेल तर संकटातही स्वर्गाचा
अनुभव घेता येतो.
या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होऊन प्रभूकडे प्रार्थना करूया की, आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत आपण
त्याची उपस्थिती अनुभवू शकू.
मनन चिंतन:
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,
गेल्या अनेक आठवड्यांपासून आपण येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या
देवाच्या राज्याविषयी चिंतन करत आहोत. विविध दाखल्यांद्वारे येशूने देवाचे राज्य कसे आहे, त्याची मूल्ये काय आहेत आणि त्यात प्रवेश
करण्यासाठी आपण कसे जगले पाहिजे हे शिकवले. पण आज आपण स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया. माझ्यासाठी देवाचे राज्य म्हणजे नेमके काय? आपण सहज म्हणतो की देवाचे राज्य म्हणजे स्वर्ग. परंतु स्वर्ग म्हणजे काय? ते केवळ दुःखरहित जीवन आहे का? ते फक्त सुख, समाधान, संपत्ती आणि ऐश्वर्याने भरलेले स्थान आहे का? की स्वर्गाची खरी व्याख्या यापेक्षा अधिक खोल
आणि व्यापक आहे?
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे
प्रत्येकाला प्रेमाने आमंत्रण देतो. तो म्हणतो, "अहो तहानलेल्यांनो, माझ्याकडे
या. पैसे नसले तरी या, घ्या आणि खा." या आमंत्रणात एक विलक्षण प्रेम दडलेले आहे. परमेश्वर आपल्या मुलांची भूक, तहान आणि गरज ओळखतो. तो त्यांचे पोषण करण्याचे, त्यांच्याशी चिरंतन करार करण्याचे आणि त्यांना
परिपूर्ण जीवन देण्याचे वचन देतो. पण या सर्व वचनांपूर्वी तो एकच अट ठेवतो, "माझ्याकडे या." याचा अर्थ असा की परमेश्वराची देणगी ही केवळ
भौतिक गरजा पूर्ण करण्यापुरती मर्यादित नाही; तो स्वतःला देऊ इच्छितो. कारण खरी तृप्ती अन्नाने नाही, तर देवाच्या सहवासाने मिळते.
आज आपण स्वर्गाची कल्पना अनेकदा सुंदर बाग, देवदूत, सोनेरी रस्ते किंवा दूधा-मधाच्या नद्या अशा प्रतिमांमध्ये करतो. या प्रतिमा आपल्याला आशा देतात; परंतु ह्या सर्व गोष्टी स्वर्गाचे संपूर्ण
चित्र रेखाटत नाहीत. स्वर्ग
म्हणजे सर्वप्रथम
देवाची उपस्थिती. कारण जिथे देव आहे तिथे प्रेम आहे, शांती आहे, क्षमा आहे, आनंद आहे आणि खरे सार्वकाळीक जीवन आहे. याउलट, जिथे देव नाही, तिथे कितीही सुखसुविधा असल्या तरी त्या जीवनाला
स्वर्ग म्हणता येणार नाही.
आज आपल्या समाजात आपण पाहतो की अनेक लोक अन्याय करून, भ्रष्टाचार करून, इतरांना दुःख देऊन मोठ्या ऐश्वर्यात जगतात. त्यांच्या हातात सत्ता असते, पैसा असतो आणि बाह्यदृष्ट्या ते सुखी दिसतात. पण जर त्यांच्या जीवनात देव नसेल, जर त्यांच्या अंतःकरणात प्रेम, दया आणि सत्य नसेल, तर त्या सुखाला स्वर्ग म्हणता येईल का? निश्चितच नाही. दुसरीकडे एखादी व्यक्ती आजारपणात असेल, गरिबीत असेल, छळ सहन करत असेल किंवा विश्वासासाठी दुःख भोगत
असेल; पण जर त्या व्यक्तीबरोबर देव असेल, तर त्या दुःखातही त्या व्यक्तीला आशा, शांती आणि आनंदाचा अनुभव येतो. म्हणूनच देवाशिवायचे सुख स्वर्ग होऊ शकत नाही, आणि देवाबरोबरचे दुःखही स्वर्गाचा अनुभव देऊ
शकते.
याच सत्याची पुष्टी दुसऱ्या वाचनात संत पौल करतात. ते विचारतात, "ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपल्याला कोण वेगळे
करील? क्लेश, संकट, छळ, उपासमार, नग्नता, धोका की तलवार?" आणि ते ठामपणे उत्तर देतात, "या सर्व गोष्टींमध्ये आपण विजय मिळवतो, कारण ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो." संत पौल संकटे नाहीत असे म्हणत नाहीत. ते स्वतः अनेक संकटांतून गेले. पण त्यांचा विश्वास असा होता की कोणतेही संकट
ख्रिस्ताला आपल्या जीवनातून दूर करू शकत नाही. ख्रिस्ताचे प्रेम आपल्या दुःखाचा अर्थ बदलते. तो आपल्याला संकटांतून नेतो, त्यात आपला हात धरून चालतो. देवाची ही सततची उपस्थितीच स्वर्गाचा खरा अनुभव
आहे.
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की येशूला लोकांचा कळवळा आला. त्यांनी त्यांच्यातील आजारी लोकांना बरे केले
आणि नंतर ते उपाशी आहेत हे पाहून त्यांना अन्न दिले. पाच भाकऱ्या आणि दोन मासे घेऊन त्याने हजारो
लोकांना तृप्त केले. हा
चमत्कार केवळ येशूच्या सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हते; तो त्याच्या करुणेचा आणि प्रेमाचा प्रत्यय होता. हा चमत्कार शक्य झाला कारण त्या लोकांमध्ये
येशू स्वतः उपस्थित होता.
देवाच्या उपस्थितीमुळे अशक्य शक्य झाले.
आजही आपल्या जीवनात अनेक चमत्कार घडतात. काही वेळा ते एखाद्या संताच्या मध्यस्थीने
घडतात, काही वेळा प्रार्थनेतून, तर काही वेळा एखाद्या साध्या व्यक्तीच्या
मदतीतून. परंतु
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की चमत्कार संत करत नाहीत; देव संतांच्या माध्यमातून कार्य करतो. संत हे देवाच्या कृपेची साधने आहेत. म्हणूनच आपला विश्वास व्यक्तींवर नव्हे, तर त्या व्यक्तींमधून कार्य करणाऱ्या देवावर
असला पाहिजे.
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अनेकांना वाटते की स्वर्ग हा केवळ मृत्यूनंतर
मिळणारा अनुभव आहे. हे
अंशतः खरे असले,
तरी येशू आपल्याला शिकवतो की देवाचे राज्य
आजपासूनच आपल्या जीवनात सुरू होते. जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीत जगतो, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, प्रेम करतो, क्षमा करतो, गरजवंतांची सेवा करतो आणि प्रत्येक परिस्थितीत
प्रभूवर विश्वास ठेवतो, तेव्हा
आपण स्वर्गाचा अनुभव घेऊ लागतो. म्हणून स्वर्ग हा केवळ एक ठिकाण नसून देवाबरोबरचे नाते आहे.
आज या पवित्र मिस्साबलीदानात आपण प्रभूकडे अशी प्रार्थना करूया: "प्रभु, मला केवळ सुख नको, संपत्ती नको, यश नको; परंतुतुझी उपस्थिती माझ्या जीवनात सदैव राहू दे. कारण तू जिथे आहेस, तिथेच माझा स्वर्ग आहे. सुखात असो वा दुःखात, आरोग्यात असो वा आजारपणात, यशात असो वा अपयशात, माझ्या जीवनातून तुझी उपस्थिती कधीही दूर होऊ
देऊ नकोस. कारण
जिथे देव आहे,
तिथेच खरे देवाचे राज्य आहे, आणि खरे स्वर्ग आहे."
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:
हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.
१) हे प्रभो, देऊळमातेच्या सर्व
सेवकांनी नम्र बनून प्रभूची सुवार्ता पुढे ठेवत असलेल्या आव्हानांचा स्वीकार करावा
आणि प्रभूच्या सुवार्तेचे निष्ठावंत सेवक बनावे, म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.
२) हे प्रभो, दुःख, अन्याय, हिंसा आणि भ्रष्टाचाराने
भरलेलं आमचं जग, या
सर्व गुलामगिरीतून मुक्त व्हावं आणि आमच्या जगात तुझ्याकडून येणारी शांती प्रस्थापित
व्हावी म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.
३) हे प्रभो, शारीरिक आणि मानसिक
आजाराने ग्रासलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींना तुझ्या कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा
आणि त्यांना नवीन आरोग्य आणि जीवन लाभावे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो.
४) हे प्रभो
तुझ्यावरील विश्वासात जीवन जगून, हे
जग सोडून गेलेल्या आमच्या बंधू-भगिनींना स्वर्गाचे सुख लाभावे म्हणून आम्ही आज प्रार्थना
करतो.
५) थोडा वेळ शांत राहून
आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक
व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.