Friday, 31 July 2026

Reflections for the Homily of 18th Sunday in Ordinary Time (02-08-2026) By Fr. Reon Andrades

सामान्य काळातील अठरावा रविवार

दिनांक: ०२/०८/२०२६
पहिले वाचन: यशया ५५: १-३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१

जिथे देव आहे, तिथेच स्वर्ग आहे

प्रस्तावना:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,

आजच्या वाचनांमधून प्रभू आपल्याला देवाच्या राज्याचे खरे स्वरूप समजावून सांगतो. अनेकदा आपण स्वर्ग म्हणजे केवळ दुःख नसलेले, सुखाने भरलेले स्थान अशी कल्पना करतो. परंतु आजची वाचने आपल्याला शिकवते की जिथे देवाची उपस्थिती आहे, तिथेच खरा स्वर्ग आहे. पहिल्या वाचनात परमेश्वर सर्व तहानलेल्या आणि भुकेल्यांना स्वतःकडे येण्याचे आमंत्रण देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की कोणतेही संकट आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. शुभवर्तमानात येशू आपल्या करुणेने लोकांना बरे करतो आणि त्यांच्या भुकेचीही काळजी घेतो. या सर्व वाचनांतून एकच संदेश स्पष्ट होतो, देव आपल्याबरोबर असेल तर संकटातही स्वर्गाचा अनुभव घेता येतो.

या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होऊन प्रभूकडे प्रार्थना करूया की, आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत आपण त्याची उपस्थिती अनुभवू शकू.

 

मनन चिंतन:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,

गेल्या अनेक आठवड्यांपासून आपण येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या देवाच्या राज्याविषयी चिंतन करत आहोत. विविध दाखल्यांद्वारे येशूने देवाचे राज्य कसे आहे, त्याची मूल्ये काय आहेत आणि त्यात प्रवेश करण्यासाठी आपण कसे जगले पाहिजे हे शिकवले. पण आज आपण स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया. माझ्यासाठी देवाचे राज्य म्हणजे नेमके काय? आपण सहज म्हणतो की देवाचे राज्य म्हणजे स्वर्ग. परंतु स्वर्ग म्हणजे काय? ते केवळ दुःखरहित जीवन आहे का? ते फक्त सुख, समाधान, संपत्ती आणि ऐश्वर्याने भरलेले स्थान आहे का? की स्वर्गाची खरी व्याख्या यापेक्षा अधिक खोल आणि व्यापक आहे?

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे प्रत्येकाला प्रेमाने आमंत्रण देतो. तो म्हणतो, "अहो तहानलेल्यांनो, माझ्याकडे या. पैसे नसले तरी या, घ्या आणि खा." या आमंत्रणात एक विलक्षण प्रेम दडलेले आहे. परमेश्वर आपल्या मुलांची भूक, तहान आणि गरज ओळखतो. तो त्यांचे पोषण करण्याचे, त्यांच्याशी चिरंतन करार करण्याचे आणि त्यांना परिपूर्ण जीवन देण्याचे वचन देतो. पण या सर्व वचनांपूर्वी तो एकच अट ठेवतो, "माझ्याकडे या." याचा अर्थ असा की परमेश्वराची देणगी ही केवळ भौतिक गरजा पूर्ण करण्यापुरती मर्यादित नाही; तो स्वतःला देऊ इच्छितो. कारण खरी तृप्ती अन्नाने नाही, तर देवाच्या सहवासाने मिळते.

आज आपण स्वर्गाची कल्पना अनेकदा सुंदर बाग, देवदूत, सोनेरी रस्ते किंवा दूधा-मधाच्या नद्या अशा प्रतिमांमध्ये करतो. या प्रतिमा आपल्याला आशा देतात; परंतु ह्या सर्व गोष्टी स्वर्गाचे संपूर्ण चित्र रेखाटत नाहीत. स्वर्ग म्हणजे सर्वप्रथम देवाची उपस्थिती. कारण जिथे देव आहे तिथे प्रेम आहे, शांती आहे, क्षमा आहे, आनंद आहे आणि खरे सार्वकाळीक जीवन आहे. याउलट, जिथे देव नाही, तिथे कितीही सुखसुविधा असल्या तरी त्या जीवनाला स्वर्ग म्हणता येणार नाही.

आज आपल्या समाजात आपण पाहतो की अनेक लोक अन्याय करून, भ्रष्टाचार करून, इतरांना दुःख देऊन मोठ्या ऐश्वर्यात जगतात. त्यांच्या हातात सत्ता असते, पैसा असतो आणि बाह्यदृष्ट्या ते सुखी दिसतात. पण जर त्यांच्या जीवनात देव नसेल, जर त्यांच्या अंतःकरणात प्रेम, दया आणि सत्य नसेल, तर त्या सुखाला स्वर्ग म्हणता येईल का? निश्चितच नाही. दुसरीकडे एखादी व्यक्ती आजारपणात असेल, गरिबीत असेल, छळ सहन करत असेल किंवा विश्वासासाठी दुःख भोगत असेल; पण जर त्या व्यक्तीबरोबर देव असेल, तर त्या दुःखातही त्या व्यक्तीला आशा, शांती आणि आनंदाचा अनुभव येतो. म्हणूनच देवाशिवायचे सुख स्वर्ग होऊ शकत नाही, आणि देवाबरोबरचे दुःखही स्वर्गाचा अनुभव देऊ शकते.

याच सत्याची पुष्टी दुसऱ्या वाचनात संत पौल करतात. ते विचारतात, "ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपल्याला कोण वेगळे करील? क्लेश, संकट, छळ, उपासमार, नग्नता, धोका की तलवार?" आणि ते ठामपणे उत्तर देतात, "या सर्व गोष्टींमध्ये आपण विजय मिळवतो, कारण ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो." संत पौल संकटे नाहीत असे म्हणत नाहीत. ते स्वतः अनेक संकटांतून गेले. पण त्यांचा विश्वास असा होता की कोणतेही संकट ख्रिस्ताला आपल्या जीवनातून दूर करू शकत नाही. ख्रिस्ताचे प्रेम आपल्या दुःखाचा अर्थ बदलते. तो आपल्याला संकटांतून नेतो, त्यात आपला हात धरून चालतो. देवाची ही सततची उपस्थितीच स्वर्गाचा खरा अनुभव आहे.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की येशूला लोकांचा कळवळा आला. त्यांनी त्यांच्यातील आजारी लोकांना बरे केले आणि नंतर ते उपाशी आहेत हे पाहून त्यांना अन्न दिले. पाच भाकऱ्या आणि दोन मासे घेऊन त्याने हजारो लोकांना तृप्त केले. हा चमत्कार केवळ येशूच्या सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हते; तो त्याच्या करुणेचा आणि प्रेमाचा प्रत्यय होता. हा चमत्कार शक्य झाला कारण त्या लोकांमध्ये येशू स्वतः उपस्थित होता. देवाच्या उपस्थितीमुळे अशक्य शक्य झाले.

आजही आपल्या जीवनात अनेक चमत्कार घडतात. काही वेळा ते एखाद्या संताच्या मध्यस्थीने घडतात, काही वेळा प्रार्थनेतून, तर काही वेळा एखाद्या साध्या व्यक्तीच्या मदतीतून. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की चमत्कार संत करत नाहीत; देव संतांच्या माध्यमातून कार्य करतो. संत हे देवाच्या कृपेची साधने आहेत. म्हणूनच आपला विश्वास व्यक्तींवर नव्हे, तर त्या व्यक्तींमधून कार्य करणाऱ्या देवावर असला पाहिजे.

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अनेकांना वाटते की स्वर्ग हा केवळ मृत्यूनंतर मिळणारा अनुभव आहे. हे अंशतः खरे असले, तरी येशू आपल्याला शिकवतो की देवाचे राज्य आजपासूनच आपल्या जीवनात सुरू होते. जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीत जगतो, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, प्रेम करतो, क्षमा करतो, गरजवंतांची सेवा करतो आणि प्रत्येक परिस्थितीत प्रभूवर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण स्वर्गाचा अनुभव घेऊ लागतो. म्हणून स्वर्ग हा केवळ एक ठिकाण नसून देवाबरोबरचे नाते आहे.

आज या पवित्र मिस्साबलीदानात आपण प्रभूकडे अशी प्रार्थना करूया: "प्रभु, मला केवळ सुख नको, संपत्ती नको, यश नको; परंतुतुझी उपस्थिती माझ्या जीवनात सदैव राहू दे. कारण तू जिथे आहेस, तिथेच माझा स्वर्ग आहे. सुखात असो वा दुःखात, आरोग्यात असो वा आजारपणात, यशात असो वा अपयशात, माझ्या जीवनातून तुझी उपस्थिती कधीही दूर होऊ देऊ नकोस. कारण जिथे देव आहे, तिथेच खरे देवाचे राज्य आहे, आणि खरे स्वर्ग आहे."

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

१) हे प्रभो, देऊळमातेच्या सर्व सेवकांनी नम्र बनून प्रभूची सुवार्ता पुढे ठेवत असलेल्या आव्हानांचा स्वीकार करावा आणि प्रभूच्या सुवार्तेचे निष्ठावंत सेवक बनावे, म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

२) हे प्रभो, दुःख, अन्याय, हिंसा आणि भ्रष्टाचाराने भरलेलं आमचं जग, या सर्व गुलामगिरीतून मुक्त व्हावं आणि आमच्या जगात तुझ्याकडून येणारी शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

३) हे प्रभो, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींना तुझ्या कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि त्यांना नवीन आरोग्य आणि जीवन लाभावे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

४) हे प्रभो तुझ्यावरील विश्वासात जीवन जगून, हे जग सोडून गेलेल्या आमच्या बंधू-भगिनींना स्वर्गाचे सुख लाभावे म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.






Wednesday, 22 July 2026

 Reflections for the Homily of 17th Sunday in Ordinary Time (26-07-2026) By Br. Vinan Souz

सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक: २६/०७/२०२६
पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१२

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-३०

शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२


प्रस्तावना:

    आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला आपल्या जीवनातील खरा खजिना कोणता आहे यावर चिंतन करण्यास आमंत्रित करते.

        आजच्या पहिल्या वाचनात राजा सोलोमन संपत्ती, कीर्ती किंवा दीर्घायुष्य न मागता आपल्या लोकांचे योग्य नेतृत्व करण्यासाठी शहाणपणाची याचना करतो. त्याच्या ह्या नम्र आणि विनंतीवर प्रसन्न होऊन देव त्याला ज्ञान आणि विवेक बुद्धीचे वरदान देतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला खात्री देतो की जे देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना देव त्यांच्या चांगुलपणासाठी उपयोगात आणतो. देवाने आपल्याला ख्रिस्तासारखे बनण्यासाठी बोलावले आहे आणि आपल्या गौरवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू शेतातील लपविलेल्या खजिन्याचा आणि अनमोल मोत्याचा दृष्टांत ह्याद्वारे सांगू इच्छितो, की देवाचे राज्य जगातील सर्व संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जो त्याची खरी किंमत ओळखतो, तो आनंदाने सर्व काही सोडून देवाची निवड करतो.

        या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना, प्रभूकडे प्रार्थना करूया की प्रभूलाच आपल्या जीवनाचा खरा खजिना मानून त्याच्या इच्छेनुसार जगण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे मांगुया.

मनन चिंतन:

    आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभु येशू स्वर्गाच्या राज्याविषयीची शिकवण देत असताना, दोन लहान पण अतिशय अर्थपूर्ण दृष्टांत सांगतो. पहिला दृष्टांत एका अशा माणसाचा आहे ज्याला शेतात पुरलेला खजिना सापडतो. तो खजिना पाहिल्यानंतर तो आनंदाने आपल्या जवळ असलेले सर्व काही विकतो, ते शेत विकत घेतो आणि त्या खजिन्याचा मालक बनतो. दुसरा दृष्टांत एका व्यापाऱ्याचा आहे जो उत्कृष्ट मोत्यांच्या शोधात असतो. जेव्हा त्याला अत्यंत मौल्यवान असा एक अनमोल मोती सापडतो, तेव्हा तोही आपली सर्व संपत्ती विकून तो मोती विकत घेतो.

        सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की या दृष्टांतांचा अर्थ असा नाही की आपण आपल्या पैशाने स्वर्गाचे राज्य विकत घेऊ शकतो. देवाचे राज्य अमूल्य आहे; त्याची किंमत कोणत्याही संपत्तीने मोजता येत नाही. ते देवाकडून पात्र ठरणाऱ्यांना विनामूल्य मिळणारी देणगी आहे. एखाद्या व्यक्तीकडे जगातील सर्व संपत्ती असली, तरी तो जर दुष्ट जीवन जगत असेल तर त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. स्वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असते ती हृदयाची संपत्ती म्हणजेच सौम्यता, उदारता, करुणा, दया, प्रेम आणि देवावरील विश्वास.

        आजच्या शुभवर्तमानाशी सर्वांत सुंदरपणे जुळणारे उदाहरण म्हणजे असीसीकर संत फ्रान्सिस. फ्रान्सिस हा श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. तो ऐश्वर्य, मौजमजा आणि प्रतिष्ठेत वाढला. त्याच्याकडे पैशाची, मित्रांची आणि सुखाची कमतरता नव्हती. परंतु त्याच्या अंतःकरणात शांती नव्हती.

        एक दिवस प्रार्थनेत त्याने ख्रिस्ताची हाक ऐकली. कुष्ठरोग्याला मिठी मारताना त्याने येशूचा चेहरा अनुभवला. नंतर सॅन डॅमियानोच्या चर्चमध्ये क्रूसावरील येशूने त्याला म्हटले, "फ्रान्सिस, माझे घर पुन्हा उभे कर." त्या दिवसापासून त्याला ख्रिस्त हा खरा खजिना सापडला.

        फ्रान्सिसने वडिलांची संपत्ती, महागाचे कपडे, व्यवसाय आणि भविष्यातील सर्व सुखांचा त्याग केला. शहराच्या चौकात त्याने अंगावरचे सर्व कपडे उतरवून वडिलांना परत दिले आणि म्हटले, "आतापासून माझा पिता स्वर्गातील परमेश्वर आहे." लोकांनी त्याला वेडा म्हटले, पण प्रत्यक्षात त्याने शुभवर्तमानातील लपलेला खजिना शोधला होता.

        फ्रान्सिसने गरिबी, प्रार्थना, सेवा आणि प्रेमाचे जीवन स्वीकारले. त्याने पक्ष्यांनाही सुवार्ता सांगितली, गरिबांची सेवा केली, कुष्ठरोग्यांना मिठी मारली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले की देव हा सर्वांत मोठा खजिना आहे. आज आठशे वर्षांनंतरही जग त्यांना संत म्हणून ओळखते. कारण त्यांनी सर्व काही गमावले नाही; उलट त्यांनी सर्वांत मोठा खजिना मिळवला.

        बंधूंनो-भगिनींनो, आपण स्वतःला विचारूया की, आपल्या जीवनाचा खरा खजिना कोण आहे? पैसा? मोबाईल? प्रतिष्ठा? की येशू?

        जर आपणास निवडण्यास सांगितले, तर आपण काय निवडणार. सोने, पैसामोबाईल, प्रतिष्ठा, की येशू? आपण सहज म्हणू, "आम्ही येशूची निवड करू." परंतु प्रत्यक्ष जीवनात अनेकदा वेगळेच चित्र दिसते. संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे धावताना अनेक लोक आपला बहुतेक वेळ केवळ व्यवसाय, नोकरी आणि पैसा कमावण्यात घालवतात. आजची संस्कृती आपल्याला सांगते की अधिक पैसा, अधिक यश आणि अधिक मालमत्ता मिळवली तरच खरे सुख मिळते. म्हणून अनेकजण अधिक पैसे कमावण्यासाठी आपल्या कुटुंबाला वेळ देत नाहीत. काहीजण प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी आपल्या ख्रिस्ती मूल्यांशी आणि तत्त्वांशी तडजोड करण्यासही धजत नाही.

        राजा सोलोमनची कथा आपल्यासाठी मोठी प्रेरणा आहे. एका स्वप्नात देवाने त्याला विचारले, "तुला जे हवे आहे ते माग." तरुण असल्यामुळे सोलोमनला संपत्ती, दीर्घायुष्य किंवा कीर्ती मागण्याची संधी होती. परंतु त्याने स्वतःच्या जबाबदारीचा विचार केला आणि देवाला अशी प्रार्थना केली: "मला माझ्या लोकांवर न्यायाने राज्य करण्यासाठी शहाणपण आणि विवेक बुद्धी दे." सोलोमनने संपत्ती नव्हे, तर देवाची बुद्धी आणि मार्गदर्शन मागितले. देव त्याच्या या निवडीवर इतका प्रसन्न झाला की त्याने त्याला केवळ शहाणपणच नव्हे, तर संपत्ती, कीर्ती आणि दीर्घायुष्य यांचाही आशीर्वाद दिला. म्हणूनच आपण आनंदाने गातो: "प्रथम देवाच्या राज्याचा आणि त्याच्या धार्मिकतेचा शोध घ्या; आणि या सर्व गोष्टी तुम्हाला अधिक म्हणून दिल्या जातील." (मत्तय ६:३३).

        संत मदर तेरेसा आणि संत पोप जॉन पॉल दुसरे यांचे जीवनही याच सत्याची साक्ष देते. त्यांनी या जगातून जाताना कोणतीही संपत्ती मागे ठेवली नाही, कारण त्यांनी पृथ्वीवर खजिना साठवला नव्हता. त्यांचा खरा खजिना म्हणजे देवाची सेवा, देऊळमातेची सेवा आणि गरिबांवरील प्रेम. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देवासाठी अर्पण केले आणि त्यातच त्यांना खरा आनंद मिळाला.

        आजच्या शुभवर्तमानातील दृष्टांत आपल्याला शिकवतात की ज्याला स्वर्गाच्या राज्याचा खरा खजिना सापडतो, तो येशूच्या अधिक जवळ राहण्यासाठी आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी आनंदाने सर्व काही सोडण्यास तयार होतो. कारण जगातील सर्व संपत्ती क्षणभंगुर आहे, पण देवाचे राज्य आणि त्याच्याबरोबरचे अनंत जीवन हेच खरे, शाश्वत आणि अमूल्य धन आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला तुझे राज्य पाहण्यास मदत कर.

१) आपले परमगुरु लियो सर्व बिशप्स धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू भगिनी ह्याच्याद्वारे प्रभू येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवताना त्यांना देवाचा अनुभव यावा व जे  लोक देवाचा शोध करत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यास प्रभू येशूची कृपा त्यांना लाभावी म्हणून प्रार्थना करूया.

२) आपल्या सर्व राजकीय पुढार्‍यांनी व नेत्यांनी जनकल्याणासाठी झटावे व जनतेला सेवा कार्याद्वारे मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) जे लोक देवाला मानत नाहीत व जे लोक देवापासून दूर गेले आहेत अशा लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा, व त्याच्या जीवनाचे परिवर्तन होऊन त्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून प्रभुजवळ प्रार्थना करूया.

४) या मिस्साबळीदानात सहभाग घेत असलेल्या आम्हा सर्व बंधू-भगिनीवर देवाचा आशीर्वाद असावा, की त्याद्वारे देवाने आम्हाला स्वर्गाचे राज्य पाहण्याचे भाग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक व सामुदायिक हेतूसाठी प्रभू चरणी प्रार्थना करूया.