Wednesday, 22 July 2026

 Reflections for the Homily of 17th Sunday in Ordinary Time (26-07-2026) By Br. Vinan Souz

सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक: २६/०७/२०२६
पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१२

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-३०

शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२


प्रस्तावना:

    आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला आपल्या जीवनातील खरा खजिना कोणता आहे यावर चिंतन करण्यास आमंत्रित करते.

        आजच्या पहिल्या वाचनात राजा सोलोमन संपत्ती, कीर्ती किंवा दीर्घायुष्य न मागता आपल्या लोकांचे योग्य नेतृत्व करण्यासाठी शहाणपणाची याचना करतो. त्याच्या ह्या नम्र आणि विनंतीवर प्रसन्न होऊन देव त्याला ज्ञान आणि विवेक बुद्धीचे वरदान देतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला खात्री देतो की जे देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना देव त्यांच्या चांगुलपणासाठी उपयोगात आणतो. देवाने आपल्याला ख्रिस्तासारखे बनण्यासाठी बोलावले आहे आणि आपल्या गौरवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू शेतातील लपविलेल्या खजिन्याचा आणि अनमोल मोत्याचा दृष्टांत ह्याद्वारे सांगू इच्छितो, की देवाचे राज्य जगातील सर्व संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जो त्याची खरी किंमत ओळखतो, तो आनंदाने सर्व काही सोडून देवाची निवड करतो.

        या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना, प्रभूकडे प्रार्थना करूया की प्रभूलाच आपल्या जीवनाचा खरा खजिना मानून त्याच्या इच्छेनुसार जगण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे मांगुया.

मनन चिंतन:

    आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभु येशू स्वर्गाच्या राज्याविषयीची शिकवण देत असताना, दोन लहान पण अतिशय अर्थपूर्ण दृष्टांत सांगतो. पहिला दृष्टांत एका अशा माणसाचा आहे ज्याला शेतात पुरलेला खजिना सापडतो. तो खजिना पाहिल्यानंतर तो आनंदाने आपल्या जवळ असलेले सर्व काही विकतो, ते शेत विकत घेतो आणि त्या खजिन्याचा मालक बनतो. दुसरा दृष्टांत एका व्यापाऱ्याचा आहे जो उत्कृष्ट मोत्यांच्या शोधात असतो. जेव्हा त्याला अत्यंत मौल्यवान असा एक अनमोल मोती सापडतो, तेव्हा तोही आपली सर्व संपत्ती विकून तो मोती विकत घेतो.

        सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की या दृष्टांतांचा अर्थ असा नाही की आपण आपल्या पैशाने स्वर्गाचे राज्य विकत घेऊ शकतो. देवाचे राज्य अमूल्य आहे; त्याची किंमत कोणत्याही संपत्तीने मोजता येत नाही. ते देवाकडून पात्र ठरणाऱ्यांना विनामूल्य मिळणारी देणगी आहे. एखाद्या व्यक्तीकडे जगातील सर्व संपत्ती असली, तरी तो जर दुष्ट जीवन जगत असेल तर त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. स्वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असते ती हृदयाची संपत्ती म्हणजेच सौम्यता, उदारता, करुणा, दया, प्रेम आणि देवावरील विश्वास.

        आजच्या शुभवर्तमानाशी सर्वांत सुंदरपणे जुळणारे उदाहरण म्हणजे असीसीकर संत फ्रान्सिस. फ्रान्सिस हा श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. तो ऐश्वर्य, मौजमजा आणि प्रतिष्ठेत वाढला. त्याच्याकडे पैशाची, मित्रांची आणि सुखाची कमतरता नव्हती. परंतु त्याच्या अंतःकरणात शांती नव्हती.

        एक दिवस प्रार्थनेत त्याने ख्रिस्ताची हाक ऐकली. कुष्ठरोग्याला मिठी मारताना त्याने येशूचा चेहरा अनुभवला. नंतर सॅन डॅमियानोच्या चर्चमध्ये क्रूसावरील येशूने त्याला म्हटले, "फ्रान्सिस, माझे घर पुन्हा उभे कर." त्या दिवसापासून त्याला ख्रिस्त हा खरा खजिना सापडला.

        फ्रान्सिसने वडिलांची संपत्ती, महागाचे कपडे, व्यवसाय आणि भविष्यातील सर्व सुखांचा त्याग केला. शहराच्या चौकात त्याने अंगावरचे सर्व कपडे उतरवून वडिलांना परत दिले आणि म्हटले, "आतापासून माझा पिता स्वर्गातील परमेश्वर आहे." लोकांनी त्याला वेडा म्हटले, पण प्रत्यक्षात त्याने शुभवर्तमानातील लपलेला खजिना शोधला होता.

        फ्रान्सिसने गरिबी, प्रार्थना, सेवा आणि प्रेमाचे जीवन स्वीकारले. त्याने पक्ष्यांनाही सुवार्ता सांगितली, गरिबांची सेवा केली, कुष्ठरोग्यांना मिठी मारली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले की देव हा सर्वांत मोठा खजिना आहे. आज आठशे वर्षांनंतरही जग त्यांना संत म्हणून ओळखते. कारण त्यांनी सर्व काही गमावले नाही; उलट त्यांनी सर्वांत मोठा खजिना मिळवला.

        बंधूंनो-भगिनींनो, आपण स्वतःला विचारूया की, आपल्या जीवनाचा खरा खजिना कोण आहे? पैसा? मोबाईल? प्रतिष्ठा? की येशू?

        जर आपणास निवडण्यास सांगितले, तर आपण काय निवडणार. सोने, पैसामोबाईल, प्रतिष्ठा, की येशू? आपण सहज म्हणू, "आम्ही येशूची निवड करू." परंतु प्रत्यक्ष जीवनात अनेकदा वेगळेच चित्र दिसते. संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे धावताना अनेक लोक आपला बहुतेक वेळ केवळ व्यवसाय, नोकरी आणि पैसा कमावण्यात घालवतात. आजची संस्कृती आपल्याला सांगते की अधिक पैसा, अधिक यश आणि अधिक मालमत्ता मिळवली तरच खरे सुख मिळते. म्हणून अनेकजण अधिक पैसे कमावण्यासाठी आपल्या कुटुंबाला वेळ देत नाहीत. काहीजण प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी आपल्या ख्रिस्ती मूल्यांशी आणि तत्त्वांशी तडजोड करण्यासही धजत नाही.

        राजा सोलोमनची कथा आपल्यासाठी मोठी प्रेरणा आहे. एका स्वप्नात देवाने त्याला विचारले, "तुला जे हवे आहे ते माग." तरुण असल्यामुळे सोलोमनला संपत्ती, दीर्घायुष्य किंवा कीर्ती मागण्याची संधी होती. परंतु त्याने स्वतःच्या जबाबदारीचा विचार केला आणि देवाला अशी प्रार्थना केली: "मला माझ्या लोकांवर न्यायाने राज्य करण्यासाठी शहाणपण आणि विवेक बुद्धी दे." सोलोमनने संपत्ती नव्हे, तर देवाची बुद्धी आणि मार्गदर्शन मागितले. देव त्याच्या या निवडीवर इतका प्रसन्न झाला की त्याने त्याला केवळ शहाणपणच नव्हे, तर संपत्ती, कीर्ती आणि दीर्घायुष्य यांचाही आशीर्वाद दिला. म्हणूनच आपण आनंदाने गातो: "प्रथम देवाच्या राज्याचा आणि त्याच्या धार्मिकतेचा शोध घ्या; आणि या सर्व गोष्टी तुम्हाला अधिक म्हणून दिल्या जातील." (मत्तय ६:३३).

        संत मदर तेरेसा आणि संत पोप जॉन पॉल दुसरे यांचे जीवनही याच सत्याची साक्ष देते. त्यांनी या जगातून जाताना कोणतीही संपत्ती मागे ठेवली नाही, कारण त्यांनी पृथ्वीवर खजिना साठवला नव्हता. त्यांचा खरा खजिना म्हणजे देवाची सेवा, देऊळमातेची सेवा आणि गरिबांवरील प्रेम. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देवासाठी अर्पण केले आणि त्यातच त्यांना खरा आनंद मिळाला.

        आजच्या शुभवर्तमानातील दृष्टांत आपल्याला शिकवतात की ज्याला स्वर्गाच्या राज्याचा खरा खजिना सापडतो, तो येशूच्या अधिक जवळ राहण्यासाठी आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी आनंदाने सर्व काही सोडण्यास तयार होतो. कारण जगातील सर्व संपत्ती क्षणभंगुर आहे, पण देवाचे राज्य आणि त्याच्याबरोबरचे अनंत जीवन हेच खरे, शाश्वत आणि अमूल्य धन आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला तुझे राज्य पाहण्यास मदत कर.

१) आपले परमगुरु लियो सर्व बिशप्स धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू भगिनी ह्याच्याद्वारे प्रभू येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवताना त्यांना देवाचा अनुभव यावा व जे  लोक देवाचा शोध करत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यास प्रभू येशूची कृपा त्यांना लाभावी म्हणून प्रार्थना करूया.

२) आपल्या सर्व राजकीय पुढार्‍यांनी व नेत्यांनी जनकल्याणासाठी झटावे व जनतेला सेवा कार्याद्वारे मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) जे लोक देवाला मानत नाहीत व जे लोक देवापासून दूर गेले आहेत अशा लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा, व त्याच्या जीवनाचे परिवर्तन होऊन त्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून प्रभुजवळ प्रार्थना करूया.

४) या मिस्साबळीदानात सहभाग घेत असलेल्या आम्हा सर्व बंधू-भगिनीवर देवाचा आशीर्वाद असावा, की त्याद्वारे देवाने आम्हाला स्वर्गाचे राज्य पाहण्याचे भाग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक व सामुदायिक हेतूसाठी प्रभू चरणी प्रार्थना करूया.


Friday, 17 July 2026

Reflections for the Homily of 16th Sunday in Ordinary Time (19-07-2026) By Br. Saurav Patil

 सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक: १९/०७/२०२६
पहिले वाचन: ज्ञान ग्रंथ १२:१३,१६-१९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७

शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३


प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील सोळावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या वाचनातून प्रभू आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडतात. अनेक वेळा आपण लगेच दुसऱ्यांचा न्याय करतो किंवा वाईट पाहून निराश होतो. पण आज देवाचे वचन आपल्याला सांगते की, देव दयाळू आहे, संयमी आहे आणि प्रत्येकाला बदलण्याची संधी देतो. तसेच पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला मदत करतो आणि योग्य मार्ग दाखवतो. या मिस्साबलिदानात भाग घेताना, मोकळ्या मनाणे आणि विश्वासाने देवाचे वचन ऐकूया आणि ते आपल्या जीवनात जगण्याचा प्रयत्न करूया.

मनन चिंतन:

प्रिय ख्रिस्ती बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या तीनही वाचनांचा एकच मुख्य संदेश आहे, देव दयाळू आहे, देव संयमी आहे आणि देव प्रत्येकाला बदलण्याची संधी देतो.

मनुष्य अनेकदा घाई करतो. एखाद्याने चूक केली की आपण लगेच त्याच्याबद्दल मत बनवतो. "हा कधीच सुधारणार नाही", "याच्याकडून काही चांगले होणार नाही", असे आपण सहज बोलून जातो. पण देव तसे करत नाही. देव प्रत्येकाला वेळ देतो. तो प्रत्येकावर प्रेम करतो. तो प्रत्येकाला पश्चात्ताप करण्याची आणि नवीन जीवन सुरू करण्याची संधी देतो.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देव सर्वशक्तिमान आहे. पण देव आपल्या शक्तीचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी करत नाही. तो न्यायी आहे, पण त्याचबरोबर दयाळूही आहे. तो माणसाच्या चुका पाहतो, पण त्याहून अधिक त्याच्या बदलण्याची क्षमता पाहतो. म्हणूनच देव लगेच शिक्षा करत नाही. तो वाट पाहतो. आपण आपल्या आयुष्यातही हे पाहतो. लहान मूल चालायला शिकत असते. ते पडते, पुन्हा उठते, पुन्हा पडते. आई-वडील त्याला रागावत नाहीत. ते त्याला धीर देतात. कारण त्यांना माहीत असते की एक दिवस हे मूल नीट चालायला लागेल. देवही आपल्याशी असाच वागतो. आपण अनेकदा पडतो, पाप करतो, चूक करतो; पण देव म्हणतो, "पुन्हा उठ. मी तुझ्यासोबत आहे."

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला खूप मोठा दिलासा देतात. ते म्हणतात, आपल्याला अनेक वेळा काय प्रार्थना करावी हेच समजत नाही. कधी दुःख असते, कधी आजार असतो, कधी घरातील समस्या असतात, कधी नोकरीची चिंता असते, कधी मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळी शब्दच सुचत नाहीत. पण संत पौल म्हणतात, काळजी करू नका. पवित्र आत्मा आपल्या मदतीला येतो. आपण शांतपणे देवासमोर बसलो तरी चालेल. आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू, आपल्या मनातील वेदना आणि आपल्या हृदयातील भावना देवापर्यंत पोहोचवण्याचे काम पवित्र आत्मा करतो. म्हणून प्रार्थना म्हणजे फक्त मोठमोठे शब्द नाहीत. प्रार्थना म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. "प्रभु, मला मार्ग दाखव." एवढेही मनापासून म्हटले तरी देव ऐकतो.

येशू आज गहू आणि निदण यांचा दाखला सांगतो. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. पण रात्री शत्रू आला आणि त्याने निदण पेरले. काही दिवसांनी गहू आणि निदण दोन्ही उगवले. नोकर म्हणाले, "मालक, आम्ही निदण उपटून टाकू का?" पण मालक म्हणाला, "नाही. निदण उपटताना गहूही उपटला जाईल. दोघांनाही वाढू द्या. कापणीच्या वेळी वेगळे करू." येशू या गोष्टीतून काय सांगू इच्छितो? पहिली गोष्ट म्हणजे या जगात चांगले आणि वाईट दोन्ही असणार आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी जगात वाईट पूर्णपणे संपणार नाही. म्हणून वाईट पाहून निराश होऊ नका. देव सर्व काही पाहत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांचा न्याय करण्याची घाई करू नये. आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्याचा फक्त एक भाग दिसतो. पण देवाला संपूर्ण जीवन दिसते. आज जो चुकीच्या मार्गावर आहे तो उद्या देवाकडे परत येऊ शकतो. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. संत पौल पूर्वी ख्रिस्ती लोकांचा छळ करत होते. पण देवाच्या कृपेने तोच महान प्रेषित झाला. जर देवाने त्याला संधी दिली नसती, तर आज आपल्याला त्याची पत्रे वाचायला मिळाली असती का? म्हणून आपण कोणालाही कायमचा वाईट समजू नये. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाकडे पाहणे. येशू दुसऱ्यांच्या शेताबद्दल बोलत नाही. तो आपल्या मनाच्या शेताबद्दल बोलतो. आपल्या मनात कोणते गहू वाढत आहेत? प्रेम, क्षमा, नम्रता आणि प्रार्थना ह्या गोष्टींची वाढ होते  का? की आपल्या मनात मत्सर, राग, अहंकार, द्वेष, खोटेपणा आणि स्वार्थाचे निंदण वाढत आहे?

आपण रोज मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियावर खूप वेळ घालवतो. त्यातून कधी चांगल्या गोष्टी मिळतात, तर कधी वाईट विचार मनात येतात. म्हणून आपण काय पाहतो, काय ऐकतो आणि कोणासोबत राहतो याची काळजी घेतली पाहिजे. कारण जसे बी पेरू तसे पीक येईल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण अनेकदा देवाला विचारतो, "वाईट लोक सुखात का आहेत?" "चांगल्या लोकांनाच दुःख का येते?" आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगते की, देवाचा न्याय योग्य वेळी होईल. आपल्याला संयम ठेवायचा आहे. देव काहीच विसरत नाही. तो योग्य वेळी योग्य न्याय करतो. म्हणून आपण दुसऱ्यांच कस वाईट होईल याचा विचार करू नये. दुसऱ्याचा बदला घेण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवावा. आपल्या कुटुंबातही हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. पती-पत्नीमध्ये, आई-वडील आणि मुलांमध्ये, भाऊ-बहिणींमध्ये मतभेद होतात. पण जर प्रत्येक जण एकमेकांना बदलण्यासाठी थोडा वेळ, प्रेम आणि क्षमा देईल तर अनेक नाती पुन्हा ऊजुळू शकतात. देव जसा आपल्याला संधी देतो, तशी संधी आपणही दुसऱ्यांना दिली पाहिजे. आज आपण स्वतःला तीन प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न: मी दुसऱ्यांचा न्याय लवकर करतो का? दुसरा प्रश्न: माझ्या मनात कोणते निंदण वाढत आहे, जे मला देवापासून दूर नेत आहे? तिसरा प्रश्न: मी रोज देवाला माझ्या जीवनात चांगुलपणाचे बी पेरू देतो का? जर आपण या तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली, तर आजची वाचन आपल्या जीवनात फळ देतील.

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण देवाकडे एक विशेष कृपा मागूया. प्रभु, मला तुझ्यासारखा संयमी बनव. दुसऱ्यांच्या चुका पाहण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याची बुद्धी दे. माझ्या मनातील राग, मत्सर, अहंकार आणि स्वार्थ दूर कर. माझ्या जीवनात प्रेम, दया, क्षमा, नम्रता आणि विश्वास यांचे चांगले पीक वाढू दे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मी दररोज तुझ्या जवळ येऊ दे.  आमेन.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. विश्वव्यापी ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमचार्य पोप लियो व सर्व कार्डिनल, बिशप्स,  धर्मगुरु, धर्म-भगिनी यांना चांगले स्वास्थ्य लाभावे व परमेश्वराचा शब्द लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याद्वारे परमेश्‍वराचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

२. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अशांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्याला या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवांना चांगले पीक मिळावे आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक बेघर आहेत अन्न-पाण्याविना जीवन जगत आहेत. जे आजारी आहेत अशा सर्वांना योग्य वेळी मदत मिळावी व त्यांच्या ही गरज पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक घरासाठी प्रार्थना करूया.



Thursday, 9 July 2026

Reflections for the Homily of 15th Sunday in Ordinary Time (12-07-2026) By Fr. Cedrick Dapki

 सामान्य काळातील पंधरावा रविवार

दिनांक: १२/०७/२०२६
पहिले वाचन: यशया ५५:१०-११

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१८-२३

शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहोत. आणि आजची उपासना आपणास प्रभूच्या शब्दावर मनन – चिंतन करून त्या शब्दाद्वारे फलदायी जीवन जगण्यास बोलातीव आहे. 

पहिल्या वाचनात, यशया संदेष्टा बॅबिलोनमधील यहुदी गुलाम बांधवांना धीर देतो आणि त्यांना खात्री देतो की, ज्याप्रमाणे पाऊस आणि बर्फ जमिनीला पाणी देऊन बियांना अंकुरित व विकसित होण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे देवाचे वचन त्याचा उद्देश पूर्ण करेल.

दुसऱ्या वाचनात, संत पौल आपल्याला आठवण करून देतात की, ज्याप्रमाणे भरपूर पीक येण्यासाठी बियांना जमिनीत पडून नष्ट व्हावे लागते, त्याचप्रमाणे मानवाला फलदायी होण्यासाठी स्वतःला विसरून प्रभूमध्ये प्रभूमध्ये जीवन जगावे लागेल.

आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त बी पेरणाऱ्याच्या दाखल्याद्वारे सांगू इच्छितो कि जो मनुष्य प्रभूचा शब्द जितका संपूर्ण मानाने व हृदयाने स्वीकारतो व जगतो तो मनुष्य शंभर पटीने फलदायी बनतो.  

प्रभूचे शब्द आपल्या जीवनात आत्मसात करून त्या प्रमाणे जीवन जगण्यास आपणास कृपा व सद्बुद्धी मिळावी म्हणून या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

चीन मधील बांबूची गोष्ट तर ऐकली असेलच! मोसो (Moso) हा चीन एक मधील बांबूचा प्रकार आहे. हा बांबू थंड हवामानात वाढणाऱ्या बांबूंमध्ये सर्वात मोठा आहे, जो पंच्याहत्तर फूट उंच आणि आठ इंच व्यासापर्यंत वाढतो. हा बांबू लावल्यानंतर ५०-६०  दिवसांपर्यंत जमिनीतून वर आल्याचे कोणतीही चिन्ह दाखवत नाही. परंतु अचानक ते ४० दिवसानंतर जणूकाही जादूने ७५ फूट उंचीपर्यंत वाढू लागतो. बांबूची जलद वाढ ही त्या दोन महिन्यांत तयार होणाऱ्या मैलोनमैल मुळांमुळे होते. त्या बांबूची मुळे पहिला खोलवर रुतली गेली, ती मजबूत झाली आणि अश्या ह्या त्याच्या साखोळ परिश्रमामुळे आकाशात उंच वाढले व मजबूत होऊन टिकाऊ बनले. अशाप्रकारे आजची उपासना आपणास प्रभूच्या जीवनात खोलवर रुतून फलदायी होण्यास बोलावत आहे. ज्याचे जीवन प्रभूच्या वचनांवर अवलंबून असते तो कशीच अपयश अनुभवत नाही, या उलट तो प्रभूमध्ये भरभराटीचे जीवन अनुभवत असतो असा संदेश आपणास मिळत आहे.

बी पेरणाऱ्याचा दाखला लक्षात घेतला असता, आजच्या आधुनिक जगात शेतकरी शेती करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतो, , उच्च दर्जाचे बियाणे वापरतो, रासायनिक खाते वापरतो व त्याच्याच साहाय्याने तो शेतात भरघोस पीक घेतो. वाळवंट किंवा डोंगराळ भागात जेथें शेती होऊ शकत नाही तेथें देखील शेतीची मशागत होत आहे.  हा मानवाने आधुनिक जगात आधुनिक तंत्राद्वारे केलेला चमत्कार आहे. परंतु ख्रिस्ताच्या काळी असे न्हवते. भौगोलिक स्थिती लक्षात घेतली असता त्याकाळी लोकांची शेतजमीन कमी होती. कदाचित बियाणे जास्तकाळ टिकून ठेवण्याची कला अवगत नसेल म्हणून एक – एक बियाणे शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचे होते आणि अशामुळे ते पेरणीच्या वेळी काटकसरीने एक-एक बियाणे सांभाळून पेरत असतील आणि त्याच्या नंतरही पुरेसा पाणी, अनुकूल हवामान नसल्याने पिक चांगले येईल याची शाश्वती न्हवती. म्हणून येशुख्रिस्त शेती कशी करावी किंवा शेतात पिक कसे  जास्त आणावे ह्यावर भोध करीत नाही, तर शेतकऱ्याचे जीवन समोर ठेऊन आपले आध्यात्मिक जीवन देवावर अवलंबून ठेऊन कसे जगावे हे स्पष्ट करून देतो.

ख्रिस्त हा देवाचा शब्द बी प्रमाणे संपूर्ण जगात पसरवतो, आणि शब्द हा मोजून-मापून पसरवित नाही, ठराविक किंवा निवडक लोकांना देत नाही, तर हा शब्द उदारतेने संपूर्ण जगात पसरवित आहे, प्रत्येकाला देत आहे.  आणि हा शब्द जो – तो ज्याच्या -त्याच्या क्षमतेप्रमाणे स्वीकारतो व प्रतिसाद देतो. हा शब्द जो पूर्णपणे स्वीकारीत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही किंवा त्यांच्याने प्रभूचे कार्य होत नाही. परंतु जो कोणी हा प्रभूचा शब्द संपूर्ण हृदयाने, मानाने व आत्म्याने स्वीकारतो तो फलद्रूप होतो. कोणी तीसपट, कोणी साठपट तर कोणी शंभरपट.

काही दिवसापासून आपण पावसाची वाट पाहत होतो. जून महिना उलटला तरीही पावसाने काही चिंन्हे दाखवली नाहीत.  वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना ठेवल्या. सृष्टी जणूकाही जीवनहीन झाली होती; रिकामी पडलेली शेत जमीनसुखे डोंगर आणि कोरडी नदी, अशा ह्या देखाव्यात नैसर्गिक जीवन स्तब्ध झाले होते. सगळं झोपल्यासारखं किंवा मेलेल्यासारखं वाटत होतं.  अचानक जुलै महिन्यात पावसाळा सुरवात झाली सर्व ठिकाणी पाणी; शेतात पिक यायला सुरुवात झाली, डोंगर हिरवेगार दिसू लागले व नद्या वाहू लागल्या, अशा प्रकारे सृष्टीने जणूकाही नव्याने सुरुवात केली. आणि हे सर्व शक्य झाले ते म्हणजे पावसामुळेच. म्हणून हा पाऊस विनाकारण आला नाही तर त्याने येऊन आपला उद्देश पूर्ण केला.  ह्या उदाहरणाला आधारित आपण पहिल्या वाचनात पाहतो कि यशया संदेष्ट्याद्वारेपरमेश्वर म्हणतो कि माझे शब्द हे पाण्याप्रमाणे जीवन देणारे आहेत.  पाणी जसा संपूर्ण सृष्टीला जीवन देतो व सृष्टी फलदायी बनवतो तसेच माझे शब्द हे जिवंत शब्द आहेत. त्या पवित्र शब्दाद्वारे मनुष्य विश्वासात व कृपेत वाढतो. तो पवित्र दैवी शब्द ऐकणाऱ्याला सर्वकालिक जीवन देतो, अशी व्यक्ती उत्सुकतेने प्रभूचे कार्य करते आणि  प्रभूच्या वाचनामुळेच फलदायी बनते.

परमेश्वराने मानवास शब्द दिला, पावसाप्रमाणे तो शब्द स्वर्गातून उतरला, तो शब्द देह झाला, मानव बनून जीवन जगाला व पाण्या प्रमाणे तो शब्द संपूर्ण जगभर पसरला.  पित्याचा उद्देश असा होत कि मानवजातीने  या शब्दाचा पूर्णपणे स्वीकार करावा व त्या शब्दाद्वारे त्यांचे तारण व्हावे.  प्रभूचे राज्य हे सुपीक फळ देणारे आहे, भरभराटीचे आहे आणि सर्वकालिक आहे.  म्हणून येशुख्रिस्त आपणास प्रभूचा शब्द हा पूर्णपणे स्विकारून फलद्रूप होण्यासाठी आव्हान करीत आहे.  तीसपट, साठपट व शंभरपट असे पिक देण्यास बोलावीत आहे. म्हणून जगातील ऐहिक गोष्टी बाजूला सारून प्रभूच्या कार्यात विलीन होण्यास तयार असूया व फलद्रूप होण्याचा प्रयत्न करूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे सेवक परमगुरू, महागुरू व धर्मगुरू ज्यांनी प्रभूचे कार्य हाती घेतले आहे त्यांच्या कठीण परिस्थितीत प्रभुने त्यांना राखावे, त्याचा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवण्यास सहाय्य मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या श्रमाला फळ यावे, त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांना शेतात काम करता यावे व नैसर्गिक आपत्ती टाळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. प्रभूचा शब्द प्रत्येकाच्या कानी पडावा, तो शब्द आत्मसात करून प्रभूमध्ये पवित्र जीवन जगण्यास सहाय्य व्हावे तसेच स्वतःचे जीवन फलदायी बनवून इतरांचे जीवन उज्वलीत करता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जगात होणारी युद्धे थांबावीत, प्रभूचा शांतीचा शब्द सर्वत्र पसरून अश्या ठिकाणी शांतीचे वातावरण निर्माण व्हावे व सर्वांना सलोख्याने व प्रेमाने राहता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे आजारी आहेत, दुखात आहेत  व अडचणीत आहेत; अशांना प्रभूचे सांत्वन मिळावे, त्यांच्या वाटेत आलेली सर्व पिडा दूर व्हावी व त्यांना चांगल्या आरोग्याचा व जीवनाचा अनुभव घेता यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. (प्रतिसाद)