Thursday, 13 August 2026

Reflections for the Homily of 20th Sunday in Ordinary Time (16-08-2026) By Br. Vinan souz

 सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक: १६/०८/२०२६
पहिले वाचन: यशया ५६:१, ६-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५, २९-३२
शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आपल्याला देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवण्यास, नम्र राहण्यास आणि चिकाटीने प्रार्थना करण्यास बोलावत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, देवाचे घर सर्व लोकांसाठी खुले आहे आणि प्रत्येकाची प्रार्थना तो प्रेमाने ऐकतो. आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, देवाची दया सर्वांवर आहे आणि त्याची वचने व कृपा कधीही बदलत नाहीत. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, कनानी स्त्रीने हार न मानता येशूवर विश्वास ठेवला आणि तिच्या विश्वासामुळे तिच्या मुलीला बरेपणा मिळाला.

आजची वाचने आपल्याला देवाच्या मोठ्या प्रेमाची जाणीव करून देतात. देव कोणालाही दूर करत नाही. तो प्रत्येकाला आपल्याजवळ येण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी आमंत्रण देतो. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी देव आपल्याला स्वीकारतो.

आजच्या पवित्र मिस्साबलिदानात भाग घेत असताना आपण  येशूकडे प्रार्थना करू या की, कनानी स्त्रीसारखा अढळ विश्वास, नम्र हृदय आणि संकटात प्रभूवर विश्वास ठेवण्याची कृपा आपल्याला मिळो.

मनन चिंतन:

आज आपण अशा जगात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. आपल्या हातात स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, यंत्रने आहेत, काही सेकंदांत जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संदेश आपला पोहोचतो. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. तंत्रज्ञान वाढले, पण आपला विश्वास वाढला का? आपल्या संपर्कांची संख्या वाढली, पण देवाशी असलेला आपला संपर्क वाढला का? सोशल मीडियावर आपले हजारो मित्र असू शकतात, पण दुःखाच्या वेळी आपल्या जवळ बसून “मी तुझ्यासोबत आहे” असे म्हणणारा कोणी आहे का?

आजच्या शुभवर्तमानात आपण एक कनानी स्त्रीला पाहतो. कारण तिच्या मुलीला भुताने फारच जर्जर केले होते. ती स्त्री असहाय्य होती. तिच्याकडे सर्व समस्यांचे उत्तर नव्हते. पण तिला एक गोष्ट माहीत होती, येशू तिची मदत करू शकतो. म्हणून ती येशूकडे जाते आणि म्हणते, “प्रभु, दावीदाच्यापुत्रा, माझ्यावर दया करा.”

आजच्या आधुनिक जगात ही स्त्री आपल्यासाठी एक मोठा आदर्श आहे. कारण आज समस्या बदलल्या आहेत, पण माणसाच्या हृदयातील दुःख बदललेले नाही. आजही पालक आपल्या मुलांसाठी चिंतेत आहेत. आजही तरुण भविष्याबद्दल घाबरतात. आजही लोक मानसिक तणाव, एकटेपणा, आर्थिक समस्या, नात्यांतील तणाव आणि अपयश यामुळे त्रस्त आहेत.

फरक एवढाच आहे की पूर्वी माणूस आपल्या दुःखाबद्दल शेजाऱ्याला सांगत असे; आज तो अनेकदा सोशल मीडियावर हसरा फोटो ठेवतो आणि मनात मात्र रडत असतो. बाहेरून सर्व काही ठीक दिसते, पण आतून व्यक्ती तुटलेली असते. परंतू कनानी स्त्री मात्र आपले दुःख लपवत नाही. ती येशूसमोर आपली गरज मांडते. ती म्हणते, “प्रभु, मला मदत कर.” आज आपणही देवासमोर प्रामाणिक होण्याची गरज आहे. आपण लोकांसमोर स्वतःला मजबूत दाखवतो, पण देवासमोर म्हणायला हवे, “प्रभु, मी थकलो आहे. मला तुझी गरज आहे.”

शुभवर्तमानात एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. कनानी स्त्री प्रार्थना करते, पण येशू लगेच उत्तर देत नाही. आजच्या जगाला हे समजणे कठीण आहे. कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. इंटरनेटवर लगेच उत्तर मिळते. ऑनलाइन वस्तू मागवल्यावर काही तासांत किंवा दिवसांत ती घरी येते. संदेश पाठवला की समोरचा व्यक्ती लगेच उत्तर देईल अशी अपेक्षा असते. पण देवाकडून उत्तर मिळण्यास वेळ लागला तर आपण अस्वस्थ होतो. आपण म्हणतो, “मी देवाकडे प्रार्थना केली, पण काही झाले नाही.” पण कनानी स्त्री आपल्याला शिकवते, उत्तर उशिरा मिळाले तरी प्रार्थना सोडू नका. कनानी स्त्रीला येशूकडून लगेच यश मिळाले नाही. तरी ती म्हणते, “प्रभु, मला मदत करा.” हाच आधुनिक तरुणांसाठी संदेश आहे.

म्हणून आपल्याला दररोज स्वतःला विचारावे लागेल, “मी माझ्या जीवनात देवाला किती जागा देतो?” सकाळी उठल्यावर पहिला हात मोबाइलकडे जातो की देवाकडे? झोपण्यापूर्वी शेवटचे काही मिनिटे मोबाईल किंवा स्क्रीनवर जातात की प्रार्थनेत? आपण दिवसातून कित्येक तास इंटरनेटवर असतो; पण देवासाठी किती वेळ देतो? कनानी स्त्रीने येशूला आपले सर्वोच प्राधान्य दिले. आज आपल्यालाही तसे करावे लागेल. शेवटी येशू तीला म्हणतो, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे.” किती सुंदर शब्द! आज येशू आपल्यालाही हाच प्रश्न विचारतो, “तुझा विश्वास किती मोठा आहे?”

आपण संकटात असताना देवाला धरून ठेवतो का? प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळाले तरी विश्वास ठेवतो का? आपल्या मुलासाठी प्रार्थना करताना आशा सोडत नाही का? आपल्या जीवनात अंधार असतानाही देव प्रकाश देईल यावर विश्वास ठेवतो का?

आजच्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये आपण कनानी स्त्रीने केलेली प्रार्थना आपल्या प्रार्थनेत बदलूया: “प्रभु, मला मदत कर. माझ्या कुटुंबाला मदत कर. माझ्या मुलांना मदत कर. आमच्या तरुणांना योग्य मार्ग दाखव. व्यसनात अडकलेल्यांना मुक्त कर. दुःखी लोकांना सांत्वन दे. निराश लोकांना आशा दे. आणि आमचा विश्वास वाढव.” आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना देवराज्याची मुल्ये आपल्या शब्दांद्वारे व कृत्यांद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे लोक असत्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत, अश्या सर्व लोकांना येशू ख्रिस्ताच्या सत्यदायी प्रेमाचा अनुभव यावा व सत्याचा मार्ग त्यांनी अनुसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे स्वार्थापायी चांगल्या सामाजिक कार्यात अडथळा आणतात, त्यांना त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीची जाणीव व्हावी व त्यांनी जनहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता शांतपणे वैयक्तिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी समर्पित करूया.  




Thursday, 6 August 2026

Reflections for the Homily of 19th Sunday in Ordinary Time (09-08-2026) By Fr. Rackson Dinis

 सामान्य काळातील एकोणिसावा रविवार

दिनांक: ०९/०८/२०२६
पहिले वाचन: १ राजे १९:९, ११-१३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ९:१-५

शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला एक सुंदर आणि दिलासा देणाऱ्या  सत्याची आठवण करून देते, “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.” जीवनात दुःख, संकटे, अपयश आणि वादळे येतात. कधी कधी माणसांची साथही सुटते. अशा वेळी आपण स्वतःला एकटे समजतो. परंतु आजची वाचने आपल्याला खात्री  करून देते की, देव आपल्या लेकरांना कधीच एकटे सोडत नाही, तो संकटात धीर देतो, दुःखात बळ देतो आणि पडल्यावर पुन्हा उभे करतो.

या पवित्र मिस्साबलिदानात  सहभागी होताना, आपण आपल्या जीवनातील सर्व चिंता आणि भीती प्रभूच्या चरणी अर्पण करूया. देवाच्या उपस्थितीवर आणि त्याच्या प्रेमावर दृढ विश्वास ठेवण्यासाठी कृपा व सामर्थ्य मागूया.

मनन चिंतन:

आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासणा आपल्याला एका सुंदर विषयावर मनन-चिंतन करण्यास बोलावत आहेत. "देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो."

बंधू-भगिनींनो, आपण लहान असताना चालायला शिकत होतो. चालता चालता आपण पडलो की आई किंवा वडील लगेच धावत यायचे, आपला हात धरायचे आणि पुन्हा उभे करायचे. म्हणून आपल्याला पडण्याची फारशी भीती वाटत नव्हती. कारण एक गोष्ट आपल्याला ठाऊक होती, जरी आपण पडलो तरी पुन्हा आपला हात धरणारे कोणी तरी आहे.

पण आज आपण मोठे झालो आहोत. आता पडणे म्हणजे फक्त जमिनीवर पडणे नाही. जीवनात दुःख येते, संकटे येतात, अपयश येते, कधी आपल्या माणसांची साथही सुटते. अशा वेळी मनात एकच प्रश्न उभा राहतो, आता माझ्यासाठी कोण आहे? माझा हात कोण धरणार? आणि हळूहळू माणसाला वाटू लागते की, “मी एकटाच आहे.”

पण बंधू-भगिनींनो, आज देवाचे वचन आपल्याला एक सुंदर सत्य शिकवते. माणसे कधी- कधी साथ सोडू शकतात, पण देव कधीच साथ सोडत नाही. आपण पडतो तेव्हा तो आपल्याला उचलतोआपण घाबरतो तेव्हा तो धीर देतो, आणि जेव्हा आपण एकटे आहोत असे वाटते, तेव्हा तो आपल्या शेजारीच उभा असतो. म्हणूनच आजची तिन्ही वाचने आपल्याला  “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.” हा संदेश देत आहे.

बंधू-भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर एलिया संदेष्टाला म्हणतो, “बाहेर ये आणि माझ्या समोर उभा राहा.” त्यानंतर प्रचंड वारा वाहतो, पर्वत हादरतात, भूकंप होतो आणि अग्नी प्रकट होते. पण पवित्र शास्त्र पुन्हा पुन्हा सांगते, “परमेश्वर त्या वाऱ्यात नव्हता. परमेश्वर त्या भूकंपात नव्हता. परमेश्वर त्या अग्नीतही नव्हता.” शेवटी एक मंद, शांत स्वर ऐकू येतो आणि त्या शांत स्वरात एलियाला परमेश्वराची उपस्थिती अनुभवायला मिळते.

बंधू-भगिनींनो, आपल्या जीवनातही अनेक वादळे येतात. संकटांचा वारा वाहतो, दुःखाचा भूकंप होतो, परीक्षेची अग्नी पेटते. अशा वेळी आपल्याला वाटते की देव आपल्यापासून दूर गेला आहे. पण आजची वाचणे सागतात, की देव दूर गेलेला नसतो; तो शांतपणे आपल्या सोबत उभा असतो. तो मोठ्या आवाजात नव्हे, तर आपल्या अंतःकरणात हळुवारपणे म्हणत असतो, “घाबरू नको, मी तुझ्याबरोबर आहे.” म्हणूनच, जो देवाच्या उपस्थितीवर विश्वास ठेवतो, त्याला कधीच एकटे वाटत नाही.

बंधू-भगिनींनो, देवाच्या या शब्दावर ज्याने विश्वास ठेवला, त्याचे जीवन कितीही कठीण असले तरी तो खचत नाही. ह्याचे  सुंदर उदाहरण आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्यासमोर मांडतो.

संत पौल म्हणतो, “माझ्या हृदयात मोठे दुःख आहे आणि अखंड वेदना आहेत.” ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारले नव्हते, ह्याचे त्याला दुख वाटत होते. तरीही त्यांनी देवावरील विश्वास सोडला नाही. यातून संत पौल आपल्याला एक सुंदर धडा शिकवतो, तो असा की, खरा विश्वास म्हणजे दुःख नसणे नव्हे; तर दुःखातही देवाची साथ आहे, याची खात्री बाळगणे. म्हणूनच, दुःखातही त्यांना स्वतःला एकटे वाटले नाही.

बंधू-भगिनींनो, पहिल्या वाचनात देवाने एलियाला आपल्या उपस्थितीची खात्री दिली. दुसऱ्या वाचनात संत पौलांनी दुःखातही देवावरील विश्वास अढळ ठेवला. आणि आता शुभवर्तमानात आपण पाहतो की, जो देवावर विश्वास ठेवतो, त्याचा हात देव कधीच सोडत नाही.

आजच्या शुभवर्तमानात शिष्यांची तारू/होडी समुद्राच्या मध्यभागी वादळात सापडते. चारही बाजूंनी लाटा उसळत होत्या. अंधार होता, भीती होती, त्या क्षणी येशू त्यांच्याकडे चालत येतो आणि म्हणतो, “धीर धरा; मी आहे. भिऊ नका.”

पेत्र येशूकडे पाहून तारूतून खाली उतरतो आणि पाण्यावर चालू लागतो. पण ज्या क्षणी त्याची नजर येशूकडून हटून वादळाकडे जाते, त्या क्षणी तो बुडू लागतो. लगेच तो ओरडतो, “प्रभो, मला वाचवा!” आणि येशू तात्काळ आपला हात पुढे करून पेत्राला वाचवतो.

बंधू-भगिनींनो, पेत्राला वाचवणारी गोष्ट त्याची ताकद नव्हती; तर येशूची साथ होती. म्हणूनच आज प्रभू आपल्यालाही सांगत आहे, “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.”

बंधू-भगिनींनो, आजच्या तिन्ही वाचनांतून देव आपल्याला एकच खात्री देतो. जीवनात वादळे येतील, दुःख येईल, लोक साथ सोडतील; पण देव कधीच आपली साथ सोडणार नाही.

एलियाला देव शांत स्वरात भेटला, संत पौलांना दुःखात बळ दिले आणि पेत्र बुडू लागला तेव्हा त्याचा हात धरला. तोच देव आजही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करीत आहे. म्हणून आज आपण फक्त एकच निर्णय घेऊया, संकटांकडे नाही, तर येशूकडे पाहूया. कारण जो येशूचा हात धरतो, त्याला कोणतेही वादळ बुडवू शकत नाही. कारण “देवावर विश्वास ठेवणारा कधीच एकटा नसतो.” आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप लियो सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे युवक व युवती देवापासून दूर गेले आहेत व ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही अशा सर्वांना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या अधिक जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत व ज्यांना जगाच्या एैहिक वस्तूंमध्ये आनंद मिळतो अशा लोकांना तो आनंद सर्वकाळचा नाही तर तो क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव व्हावी व त्यांनी देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जी मुले अनाथ आश्रमामध्ये आहेत व ज्या मुलांना आई-वडिलांनी सोडून दिले आहेत, त्यांची परमेश्वराच्या मायेच्या पंखाखाली वाढ व्हावी व उदारमतवादी आश्रयदात्यांनी त्यांचे आश्रयस्थान बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.




Friday, 31 July 2026

Reflections for the Homily of 18th Sunday in Ordinary Time (02-08-2026) By Fr. Reon Andrades

सामान्य काळातील अठरावा रविवार

दिनांक: ०२/०८/२०२६
पहिले वाचन: यशया ५५: १-३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१

जिथे देव आहे, तिथेच स्वर्ग आहे

प्रस्तावना:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,

आजच्या वाचनांमधून प्रभू आपल्याला देवाच्या राज्याचे खरे स्वरूप समजावून सांगतो. अनेकदा आपण स्वर्ग म्हणजे केवळ दुःख नसलेले, सुखाने भरलेले स्थान अशी कल्पना करतो. परंतु आजची वाचने आपल्याला शिकवते की जिथे देवाची उपस्थिती आहे, तिथेच खरा स्वर्ग आहे. पहिल्या वाचनात परमेश्वर सर्व तहानलेल्या आणि भुकेल्यांना स्वतःकडे येण्याचे आमंत्रण देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की कोणतेही संकट आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. शुभवर्तमानात येशू आपल्या करुणेने लोकांना बरे करतो आणि त्यांच्या भुकेचीही काळजी घेतो. या सर्व वाचनांतून एकच संदेश स्पष्ट होतो, देव आपल्याबरोबर असेल तर संकटातही स्वर्गाचा अनुभव घेता येतो.

या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होऊन प्रभूकडे प्रार्थना करूया की, आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत आपण त्याची उपस्थिती अनुभवू शकू.

 

मनन चिंतन:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,

गेल्या अनेक आठवड्यांपासून आपण येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या देवाच्या राज्याविषयी चिंतन करत आहोत. विविध दाखल्यांद्वारे येशूने देवाचे राज्य कसे आहे, त्याची मूल्ये काय आहेत आणि त्यात प्रवेश करण्यासाठी आपण कसे जगले पाहिजे हे शिकवले. पण आज आपण स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया. माझ्यासाठी देवाचे राज्य म्हणजे नेमके काय? आपण सहज म्हणतो की देवाचे राज्य म्हणजे स्वर्ग. परंतु स्वर्ग म्हणजे काय? ते केवळ दुःखरहित जीवन आहे का? ते फक्त सुख, समाधान, संपत्ती आणि ऐश्वर्याने भरलेले स्थान आहे का? की स्वर्गाची खरी व्याख्या यापेक्षा अधिक खोल आणि व्यापक आहे?

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे प्रत्येकाला प्रेमाने आमंत्रण देतो. तो म्हणतो, "अहो तहानलेल्यांनो, माझ्याकडे या. पैसे नसले तरी या, घ्या आणि खा." या आमंत्रणात एक विलक्षण प्रेम दडलेले आहे. परमेश्वर आपल्या मुलांची भूक, तहान आणि गरज ओळखतो. तो त्यांचे पोषण करण्याचे, त्यांच्याशी चिरंतन करार करण्याचे आणि त्यांना परिपूर्ण जीवन देण्याचे वचन देतो. पण या सर्व वचनांपूर्वी तो एकच अट ठेवतो, "माझ्याकडे या." याचा अर्थ असा की परमेश्वराची देणगी ही केवळ भौतिक गरजा पूर्ण करण्यापुरती मर्यादित नाही; तो स्वतःला देऊ इच्छितो. कारण खरी तृप्ती अन्नाने नाही, तर देवाच्या सहवासाने मिळते.

आज आपण स्वर्गाची कल्पना अनेकदा सुंदर बाग, देवदूत, सोनेरी रस्ते किंवा दूधा-मधाच्या नद्या अशा प्रतिमांमध्ये करतो. या प्रतिमा आपल्याला आशा देतात; परंतु ह्या सर्व गोष्टी स्वर्गाचे संपूर्ण चित्र रेखाटत नाहीत. स्वर्ग म्हणजे सर्वप्रथम देवाची उपस्थिती. कारण जिथे देव आहे तिथे प्रेम आहे, शांती आहे, क्षमा आहे, आनंद आहे आणि खरे सार्वकाळीक जीवन आहे. याउलट, जिथे देव नाही, तिथे कितीही सुखसुविधा असल्या तरी त्या जीवनाला स्वर्ग म्हणता येणार नाही.

आज आपल्या समाजात आपण पाहतो की अनेक लोक अन्याय करून, भ्रष्टाचार करून, इतरांना दुःख देऊन मोठ्या ऐश्वर्यात जगतात. त्यांच्या हातात सत्ता असते, पैसा असतो आणि बाह्यदृष्ट्या ते सुखी दिसतात. पण जर त्यांच्या जीवनात देव नसेल, जर त्यांच्या अंतःकरणात प्रेम, दया आणि सत्य नसेल, तर त्या सुखाला स्वर्ग म्हणता येईल का? निश्चितच नाही. दुसरीकडे एखादी व्यक्ती आजारपणात असेल, गरिबीत असेल, छळ सहन करत असेल किंवा विश्वासासाठी दुःख भोगत असेल; पण जर त्या व्यक्तीबरोबर देव असेल, तर त्या दुःखातही त्या व्यक्तीला आशा, शांती आणि आनंदाचा अनुभव येतो. म्हणूनच देवाशिवायचे सुख स्वर्ग होऊ शकत नाही, आणि देवाबरोबरचे दुःखही स्वर्गाचा अनुभव देऊ शकते.

याच सत्याची पुष्टी दुसऱ्या वाचनात संत पौल करतात. ते विचारतात, "ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपल्याला कोण वेगळे करील? क्लेश, संकट, छळ, उपासमार, नग्नता, धोका की तलवार?" आणि ते ठामपणे उत्तर देतात, "या सर्व गोष्टींमध्ये आपण विजय मिळवतो, कारण ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो." संत पौल संकटे नाहीत असे म्हणत नाहीत. ते स्वतः अनेक संकटांतून गेले. पण त्यांचा विश्वास असा होता की कोणतेही संकट ख्रिस्ताला आपल्या जीवनातून दूर करू शकत नाही. ख्रिस्ताचे प्रेम आपल्या दुःखाचा अर्थ बदलते. तो आपल्याला संकटांतून नेतो, त्यात आपला हात धरून चालतो. देवाची ही सततची उपस्थितीच स्वर्गाचा खरा अनुभव आहे.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की येशूला लोकांचा कळवळा आला. त्यांनी त्यांच्यातील आजारी लोकांना बरे केले आणि नंतर ते उपाशी आहेत हे पाहून त्यांना अन्न दिले. पाच भाकऱ्या आणि दोन मासे घेऊन त्याने हजारो लोकांना तृप्त केले. हा चमत्कार केवळ येशूच्या सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हते; तो त्याच्या करुणेचा आणि प्रेमाचा प्रत्यय होता. हा चमत्कार शक्य झाला कारण त्या लोकांमध्ये येशू स्वतः उपस्थित होता. देवाच्या उपस्थितीमुळे अशक्य शक्य झाले.

आजही आपल्या जीवनात अनेक चमत्कार घडतात. काही वेळा ते एखाद्या संताच्या मध्यस्थीने घडतात, काही वेळा प्रार्थनेतून, तर काही वेळा एखाद्या साध्या व्यक्तीच्या मदतीतून. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की चमत्कार संत करत नाहीत; देव संतांच्या माध्यमातून कार्य करतो. संत हे देवाच्या कृपेची साधने आहेत. म्हणूनच आपला विश्वास व्यक्तींवर नव्हे, तर त्या व्यक्तींमधून कार्य करणाऱ्या देवावर असला पाहिजे.

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अनेकांना वाटते की स्वर्ग हा केवळ मृत्यूनंतर मिळणारा अनुभव आहे. हे अंशतः खरे असले, तरी येशू आपल्याला शिकवतो की देवाचे राज्य आजपासूनच आपल्या जीवनात सुरू होते. जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीत जगतो, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, प्रेम करतो, क्षमा करतो, गरजवंतांची सेवा करतो आणि प्रत्येक परिस्थितीत प्रभूवर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण स्वर्गाचा अनुभव घेऊ लागतो. म्हणून स्वर्ग हा केवळ एक ठिकाण नसून देवाबरोबरचे नाते आहे.

आज या पवित्र मिस्साबलीदानात आपण प्रभूकडे अशी प्रार्थना करूया: "प्रभु, मला केवळ सुख नको, संपत्ती नको, यश नको; परंतुतुझी उपस्थिती माझ्या जीवनात सदैव राहू दे. कारण तू जिथे आहेस, तिथेच माझा स्वर्ग आहे. सुखात असो वा दुःखात, आरोग्यात असो वा आजारपणात, यशात असो वा अपयशात, माझ्या जीवनातून तुझी उपस्थिती कधीही दूर होऊ देऊ नकोस. कारण जिथे देव आहे, तिथेच खरे देवाचे राज्य आहे, आणि खरे स्वर्ग आहे."

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

१) हे प्रभो, देऊळमातेच्या सर्व सेवकांनी नम्र बनून प्रभूची सुवार्ता पुढे ठेवत असलेल्या आव्हानांचा स्वीकार करावा आणि प्रभूच्या सुवार्तेचे निष्ठावंत सेवक बनावे, म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

२) हे प्रभो, दुःख, अन्याय, हिंसा आणि भ्रष्टाचाराने भरलेलं आमचं जग, या सर्व गुलामगिरीतून मुक्त व्हावं आणि आमच्या जगात तुझ्याकडून येणारी शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

३) हे प्रभो, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींना तुझ्या कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि त्यांना नवीन आरोग्य आणि जीवन लाभावे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

४) हे प्रभो तुझ्यावरील विश्वासात जीवन जगून, हे जग सोडून गेलेल्या आमच्या बंधू-भगिनींना स्वर्गाचे सुख लाभावे म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.