Thursday, 2 July 2026

Reflections for the Homily of 14th Sunday in Ordinary Time (05-07-2026) By Br. Criston Marvi


सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक: ०५/०७/२०२६
पहिले वाचन: जखऱ्या ९: ९-१०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:९-१११३
शुभवर्तमान: मत्तय:११:२५-३०



प्रस्तावना:

प्रिय भाविकांनो आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना ही आपल्याला मनाची शांती मिळवण्यासाठी शांतीच्या राज्यांमध्ये विसावा घेण्यास आमंत्रित करीत आहे. शांतीचा राजा हा मनाने लीन व त्याचा आत्मा आपल्यामध्ये वस्ती करत आहे, जो आपल्याला अनंतकाळात जिवंत ठेवेल.

या पवित्र ख्रिस्तयागात सहभागी होत असताना आपण स्वतःला विचारू या की, माझ्या मनाची शांती ही मला कोठे भेटते? माझ्या मनाची शांती ही मला जगातील गोष्टीद्वारे भेटते? की, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहून मिळते? थकलेले व भाराक्रंत अवस्थेत असताना परमेश्वराची कृपा व येशूची शांती मनामध्ये वस्ती करावी, म्हणून आपण या ख्रिस्तयागात प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

आज शुभवर्तमानमध्ये आपण ऐकले. आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण एकले की, “ पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी, यशस्वी आणि लीन आहे. परंतु हा राजा आहे तरी कोण? दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, आपण आत्म्याच्या अधीन आहोत आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करत आहे. त्याचप्रमाणे शुभावार्तामानात येशू पित्याचे स्तवन करतो, व न्यायी, यशस्वी आणि लीन असा राजा म्हणून शांती देण्यासाठी आपणा सर्वांस त्याच्याकडे बोलावतो. येशू पित्याचे स्तवन करतो. कारण की पित्याने येशूला त्याच्या शिष्यांसमोर प्रगट केले आहे. त्यामुळे पित्यामध्ये व येशूमध्ये एकीचे नाते बांधले आहे. जेव्हा आपल्यामध्ये वाढ होते तेव्हा आपण दुसऱ्या वरती अवलंबून राहण्याचे थांबतो. परंतु येशू ख्रिस्त वाढत गेला तेव्हा त्याचे व पित्याचे नाते अधिकाधिक वाढत गेले.

आपण जर का विचार केला तर आपल्याला समजून येते की, आपण प्रत्येकांवर कसले ना कसले ओझे आहेत. उदाहरणार्थ स्वतःवर असलेली शंका, कारण नसताना स्वतःला दोषी ठरवणे, स्वतःचा किस वाटणे, स्वतः विषयी वाईट विचार येणे, इत्यादी. ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्य व्यक्तीमध्ये घडत असतात. परंतु आपण ह्या सर्व गोष्टींवर मात करून विजय मिळवतो का? की त्याला बळी पडतो? यावर आपण प्रत्येकाने मनन चिंतन करायला हवे.

प्रिय बंधू-भगिनीं येशू ख्रिस्ताचे जीवन हे वेदनारहित, चिंतामुक्त किंवा ओझे नसलेले असे नव्हते, तर ख्रिस्ताला सुद्धा वेदना होत्या. चिंता होती. ओझे होते. परंतु येशू ख्रिस्त आपले सर्व काही हे परमेश्वराला सांगत असे. चिंता, दुःख, भार ह्या सर्वांना सामोरे जाण्यास, त्यांच्याशी झुंज देण्यास, ख्रिस्त आपल्या पित्याकडून सामर्थ्याचा आधार मिळवत असे. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात शांतीची गरज आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारू या, मला जर का एक चांगली व्यक्ती बनायचे असेल तर मला कोणत्या गोष्टीची गरज आहे? ह्या प्रश्नाची भरपूर अशी उत्तरे मिळतील, आणि मनाची शांती हे एक त्याच्यामधले उत्तर असेल. परंतु ती शांती मिळवायची कशी? हा दुसरा प्रश्न असेल. कारण की ह्या जगात सर्वजण शांती मिळवण्याविषयी बोलत आहेत. परंतु खूप कमी लोक शांती पसरविण्यात व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जे कोण शांतीच्या शोधात आहेत त्याच्यातले सर्वांनास ती मिळत नाही. परंतु काही लोकांना मनातली शांती मिळत असते. कारण ते खऱ्या अर्थाने व मनापासून शोधत असतात. इस्रायल लोक एकमेकांना शांतीने शुभेच्छा देत असत. कारण हे अभिवादन देवाने स्वतः स्थापित केले होते. म्हणून मोशे आणि अहरोनच्या वेळेस शांती ही एक आशीर्वाद म्हणून समजली जात होती. स्वर्ग आणि पृथ्वीचा आपला प्रभू परमेश्वर हा वेगळा आहे. नम्र आणि गरीब त्याचे मित्र आहेत. ह्याचे कारण हेच की, हे लोक खऱ्या शांतीच्या शोधात असतात. येशुख्रिस्त हा आपल्या दुःख आणि वेदना समजून घेतो आणि त्यानुसार आपल्याला हवी ती शांती देतो व आपले ओझे हलके करतो. आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये एक होतो तेव्हाच आपल्याला आपले ओझे हलके वाटते.

थोडा वेळ शांत राहून आपण स्वतःला विचारूया की प्रभूची शांती मिळविण्यासाठी मी कश्याप्रकारे प्रयत्न करत आहे? सार्वकालिक शांतीच्या राजाकडे मी कधी मनाच्या शांतीसाठी विनंती केली आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे शांतीच्या राजा, आमची विनंती एकून घे.

१. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार वागण्यास आपल्याला आपल्या धार्मिक नेत्यांना विशेषकरून पोप लियो चोदावे, महागुरू व धर्मगुरू ह्याना प्रभूने मार्गदर्शन करावे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

२.  हे प्रभू परमेश्वरा सृष्टीचा निर्माणकर्ता यंदाच्या पावसाळ्यात आम्हाला चांगला पाऊस दे. व शेती-भातीची कामे सुरुळीतपणे पार पाडाव. व शेतातील जमीन सुपीक व फळदृप्त कर. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

३. हे प्रभू परमेश्वरा ह्या जगातील प्रत्येक मनुष्याचे अधिकार त्याला मिळू दे. आणि त्याला त्याच्या दैनदिन भाकरीचा आस्वाद व त्याच्या मूलभूत गरजा भागवून दे. विशेषकरून जे स्थलांतरित करतात त्यांना योग्य ती नोकरी व काम दे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

४. हे प्रभू परमेश्वरा जे युवक – युवती नोकरीच्या शोधात आहेत, व  ज्यांना जीवनात मार्गदशानाची गरज आहे, अश्या सर्वाना योग्य तो मार्ग दाखव. आणि कुटुंबात त्यांना योग्यरीतीने आधाराचा स्तंभ बनू दे. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

५. जे- जे आत्मे देवाघरी गेलेले आहेत. अशा सवा आत्म्यांना देवाच्या दयेची शांती मिळो व सर्व संतांबरोबर  एकरूप होऊन स्वर्गीय नंदनवनाचा आनंद घेता यावा. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.


Thursday, 25 June 2026

Reflections for the Homily of 13th Sunday in Ordinary Time (28-06-2026) By Br. Oliver Munis

सामान्य काळातील तेरावा रविवार

दिनांक: २८/०६/२०२६
पहिले वाचन: २ राजे ४:८-११, १४-१६अ
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-४, ८-११
शुभवर्तमान: मत्तय - १०:३७-४२


प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण सामन्य काळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. बाप्तिस्म्याद्वारे आपण सर्वजण देवाची लेकरे आणि ख्रिस्ताच्या एका कुटुंबाचे सदस्य झालो आहोत. म्हणून आजची उपासना आपणास आठवण करून देते की, आपल्या जीवनात प्रभूला पहिले स्थान दिले, तरच आपण  खऱ्या अर्थाने इतरांवर प्रेम करू शकतो.

आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशू आपल्याला त्याच्या मार्गावर चालायला आमंत्रण देतो. फक्त कौटुंबिक लोक नाहीत तर जे गरीब, गरजू, परके आणि दुर्लक्षित केलेले व्यक्ती ह्यांच्यासाठी आपल्या हृदयात जागा करण्याचे देव आपल्याला आव्हान करतो. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये ख्रिस्त स्वतः आपल्याला भेटत असतो.

म्हणून आज ह्या पवित्र मिस्साबळीदानात सहभाग घेत असताना, आपण आपल्या स्वार्थी वृत्तीबद्दल पश्चात्ताप करूया. प्रभूकडे कृपेची याचना करूया, जेणेकरून त्याच्या प्रेमाने भरून आपण आपल्या कुटुंबात, समाजात आणि ख्रिस्तसभेत त्याचे साक्षीदार बनू शकू.

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, समजा, आज मिस्सा संपल्यानंतर, चर्चच्या आवारात कुणीतरी तुम्हाला थांबवून विचारलं, “जय ख्रिस्त! तुम्ही कोण आहात?” तुम्ही कदाचित तुमचे नाव सांगाल. पण जर तोच प्रश्न पुन्हा-पुन्हा विचारला, तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांविषयी, पती-पत्नीविषयी, मुलांविषयी, गावाविषयी किंवा नोकरी-व्यवसायाविषयी सांगायला सुरुवात कराल. कारण आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो आणि जिथे आपण राहतो, त्यावरूनच आपली ओळख घडत असते.

जर आपण कुठेही प्रवास केला असेल, मग ती मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा पुण्याची खचाखच भरलेली एसटी बस (ST Bus) आपल्या सोबत प्रवास करणाऱ्या लोकांशी आपण कसे वागतो, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. गर्दीत एखादी वृद्ध व्यक्ती, एखादी आई लहान बाळाला घेऊन उभी असते, एखादी थकलेली व्यक्ती, वजनदार दप्तर (bag) घेऊन उभी असलेली दिसते आणि कधीतरी त्या व्यक्ती आपल्याला विचारतात, थोडे बाजूला सरकून मला जागा देतात का? (थोडा अॅडजस्ट करके, मुझे जगा दो ना?)

प्रिय भाविकांनो, आपण त्याला जागा देतो का? आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला केवळ बसमध्ये जागा द्यायला सांगत नाही; तर आपल्या हृदयात देवाच्या नवीन कुटुंबासाठी जागा निर्माण करण्याचे आमंत्रण देतो. आजचे शुभवर्तमान ऐकताना अनेकांना धक्कादायक वाटू शकते कारण येशू म्हणतो, “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर व मुलीवर प्रेम करितो तो मला योग्य नाही.”

याचा अर्थ येशू आपल्याला कुटुंब सोडायला सांगतो का? नाही. उलट, तो आपल्या प्रेमाला योग्य दिशा देतो. जेव्हा आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे आपण इतरांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ते प्रेम स्वार्थी होऊ लागते. पण जेव्हा ख्रिस्त आपल्या जीवनात प्रथम स्थानावर असतो, तेव्हा आपल्या कुटुंबावरील प्रेम अधिक निस्वार्थी, उदार आणि देवाच्या प्रेमासारखे बनते.

तर आता हे नवीन अंतःकरण आपल्याला कसे मिळते? आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो, “ख्रिस्ताच्या बाप्तीस्माद्वारे आपण त्याच्या मरणात व पुनरुत्थानात सहभागी होतो.” बाप्तिस्मा म्हणजे केवळ ख्रिस्ती होण्याचा दाखला नाही. बाप्तिस्म्यामुळे आपल्या आत्म्यावर देवाची कायमस्वरूपी किंवा अविनाशी आध्यात्मिक मुद्रा उमटते. (Indelible mark) आपण देवाची लेकरे बनतो आणि ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य बनतो. म्हणूनच आता ख्रिस्ताचे कुटुंब हेच आपले कुटुंब बनते.

पोप फ्रान्सिस नेहमी म्हणायचे, “तोदोस, तोदोस, तोदोस!” (सगळे, सगळे, सगळे). म्हणजे या कुटुंबात कुणीही कुणाचं ‘लाडकं’ (favourite) नाही. म्हणजे देवाच्या घरात सगळ्यांसाठी जागा आहे. कुणीही देवाच्या प्रेमापासून दूर नाही. पण ही गोष्ट सोपी नाही. एस.टी. बसमध्ये थोडं अॅडजस्ट करणे सोप्पे असते. पण येशू ज्याची मागणी करत आहे, त्यासाठी स्वतःचा क्रूस उचलावा लागतो. तो म्हणतो, “जो आपला वधस्तंब उचलून घेवून माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही.” गरीबासाठी, समाजातून दुर्लक्षित केलेल्या व्यक्तीसाठी, किंवा ज्याने आपल्याला दुखवले आहे अशा व्यक्तीसाठी आपल्या हृदयात जागा करणे खूप कठीण आहे. कारण त्यासाठी आपला अहंकार बाजूला ठेवावा लागतो. आणि हाच खरा वधस्तंब आहे.

येशू सर्वांचा तारणहार आहे; पण शुभवर्तमानात तो गरीब आणि दुर्बल लोकांना विशेष स्थान देतो. त्यामुळे आपल्या ख्रिस्ती कुटुंबात त्यांच्यासाठीही जागा असलीच पाहिजे. हे आपण पहिल्या वाचनात पाहतो. शुनेमची ती स्त्री एलीशा संदेष्ट्याला पाहते. ती फक्त नमस्कार करून पुढे जात नाही. ती त्याच्यासाठी आपल्या घरावर एक लहानशी खोली बांधते. एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई ठेवते. ती एका अनोळखी व्यक्तीसाठी आपल्या घरात जागा निर्माण करते आणि येशू म्हणतो, “जो ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो, तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.”

उन्हाळ्यात एका थंड पाण्याच्या प्याल्याची किंमत काय असते, हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे. काही वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त भागातील हजारो शेतकरी पायी चालत मुंबईत आले होते. त्यांच्या पायांना फोड आले होते. त्या वेळी अनेक सामान्य नागरिक मध्यरात्री घराबाहेर आले. त्यांनी त्यांना थंड पाणी दिले, बिस्किटे दिली, काहींनी तर स्वतःच्या चपलाही दिल्या. त्यांनी फक्त मदत केली नाही; त्यांनी त्या शेतकऱ्यांमध्ये जणूकाही स्वतः ख्रिस्तालाच ओळखले. हेच आजच्या शुभवर्तमानाचं जिवंत उदाहरण आहे.

तर माझ्या प्रिय भाविकांनो, आपले बाप्तिस्मामय जीवन जगणे म्हणजे काय? तर जेव्हा आपण गरीब, थकलेले, अनोळखी किंवा दुर्लक्षित केलेल्या व्यक्तीला पाहतो, तेव्हा तो आपल्याला परका वाटता कामा नये तर आपण त्याच्यामध्ये आपल्या ख्रिस्ती कुटुंबातील सदस्य ओळखले पाहिजे.

पण हे प्रेम आपल्या स्व:ताला शक्य नाही.

थोड्याच वेळात या वेदीवर ख्रिस्त पुन्हा एकदा आपल्यासाठी स्वतःला अर्पण करणार आहे. तो केवळ पाण्याचा प्याला देत नाही; तर आपल्या तारणासाठी स्वतःचे शरीर आणि रक्त देत आहे. आपण पापी, थकलेले आणि अनेकदा देवापासून दूर गेलेले असलो, तरी तो आपल्या प्रेमाच्या मेजवानीत आपल्यासाठी जागा राखून ठेवतो. ह्याच पवित्र मिस्सामधून आपल्याला इतरांसाठी जागा निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळते.म्हणून आज जेव्हा आपण ख्रिस्ताला या पवित्र भाकारीद्वारे ग्रहण करू आणि या चर्चच्या दरवाजातून बाहेर पडू, तेव्हा प्रभू आपल्यापैकी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो:

तुझ्या हृदयात माझ्यासाठी आणि माझ्या या लहान भावंडांसाठी जागा आहे का?
आज आपण स्वतःलाही हा प्रश्न विचारूया:
आज मी माझ्या हृदयात कोणासाठी जागा निर्माण करणार आहे
?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

धर्मगुरू: प्रिय बंधू-भगिनींनो, प्रभू येशूने आपल्या सर्वांना त्याच्या प्रेमाच्या कुटुंबात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. विश्वासाने आपण आपल्या सर्व गरजा स्वर्गीय पित्याकडे मांडूया.

प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१. संपूर्ण ख्रिस्तसभेसाठी प्रार्थना करत असताना आपण पोप लिओ चौदावे, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी आणि सर्व विश्वासू ह्यांनी ख्रिस्ताला जीवनात प्रथम स्थान देत प्रेम, सेवा आणि ऐक्याचे साक्षीदार व्हावे.

२. जगातील सर्व राष्ट्रांचे नेते आणि प्रशासनासाठी प्रार्थना करूया की, त्यांनी न्याय, शांतता आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करून गरीब आणि दुर्बल लोकांची मनापासून सेवा करावी.

३. गरीब, आजारी, एकाकी, निराधार, स्थलांतरित आणि जीवनात संघर्ष करणाऱ्या सर्व बंधू-भगिनींसाठी प्रार्थना करूया की, प्रभू त्यांना धैर्य देवो आणि आपल्या सेवेतून त्यांना त्याचे प्रेम अनुभवता यावे.

४. आपल्या परिवारांसाठी आणि या ख्रिस्ती समाजासाठी प्रार्थना करूया की, आपल्या घरांमध्ये प्रार्थना, क्षमा, प्रेम आणि परस्पर सेवा वाढावी; तसेच प्रत्येकाने आपल्या हृदयात इतरांसाठी जागा निर्माण करावी.

५. ह्या पवित्र मिस्सामध्ये सहभागी झालेल्या आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया की, प्रभूच्या वचनाने आणि पवित्र मिस्साचे बळ मिळून, आपण आपल्या बाप्तिस्म्याच्या वचनांना विश्वासूपणे जगावे आणि प्रत्येक व्यक्तीत ख्रिस्ताला ओळखण्याची कृपा लाभावी.

६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी विशेष प्रार्थना करूया.

धर्मगुरू: हे स्वर्गीय पिता, तुझ्या पुत्राने आम्हाला एकाच कुटुंबात एकत्र केले आहे. विश्वासाने अर्पण केलेल्या या प्रार्थनेंचा कृपापूर्वक स्वीकार कर आणि आम्हाला तुझ्या इच्छेनुसार जगण्याची कृपा दे. हे आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे मागतो. आमेन


Wednesday, 17 June 2026

Reflections for the Homily of 12th Sunday in Ordinary Time (21-06-2026) By Fr. Trimbak Pardhi


सामान्य काळातील बारावा रविवार

दिनांक: २१/०६/२०२६
पहिले वाचन: यिर्मया २०:१०-१३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१२-१५

शुभवर्तमान: मत्तय १०: २६-३३



प्रस्तावना:

आज देऊळमाता आपल्याला जीवनाला स्पर्श करणाऱ्या एका सुंदर विषयावर संदेश देत आहे. “भिऊ नका कारण देव तुमच्याबरोबर आहे.”

        प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही भीती, चिंता आणि संघर्ष असतात. काहींना भविष्याची चिंता असते, काहींना आरोग्याची, काहींना नोकरीची तर काहींना कुटुंबातील समस्यांची. अनेक वेळा आपण योग्य आणि सत्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासाठी विरोध आणि गैरसमज सहन करावे लागतात. अशा वेळी आपले मन खचते आणि आपण एकटे असल्यासारखे वाटते.

        पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा विरोध आणि दुःख अनुभवत असतानाही देवावर पूर्ण विश्वास ठेवतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतात की आदामामुळे या जगात पाप आले, परंतु येशू ख्रिस्तामुळे आपल्याला कृपा, क्षमा आणि नवीन जीवन प्राप्त झाले. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना आणि आपल्यालाही वारंवार सांगतो, “भिऊ नका,” कारण स्वर्गीय पिता आपल्या प्रत्येकाची काळजी घेतो. आपण त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहोत.

        म्हणूनच आज देऊळमाता आपल्याला आव्हान करते की, कोणत्याही संकटात किंवा भीतीत अडकून जाऊ नये. देवावर विश्वास ठेवावा, सत्यासाठी उभे राहावे आणि धेर्याने ख्रिस्ताची साक्ष द्यावी. कारण देव आपल्या सोबत आहे आणि त्याचे प्रेम कधीही आपल्याला सोडणार नाही."

मनन चिंतन:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मानवी जीवन अनेक प्रकारच्या भीतींनी वेढलेले असते. काहींना भविष्याची चिंता असते, काहींना आजारपणाची भीती वाटते, तर काहींना आर्थिक अडचणी किंवा लोकांच्या टीकेची काळजी असते. कधी कधी सत्यासाठी उभे राहिल्यामुळे विरोध आणि अपमान सहन करावा लागतो. अशा प्रसंगी आपण निराश होतो आणि देव खरोखर आपल्याबरोबर आहे का असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. परंतु आजच्या तिन्ही वाचनांचा मुख्य संदेश आपल्याला धीर देणारा आहे. देव आपल्या सोबत आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका.

        पहिल्या वाचनात आपण यिर्मया संदेष्ट्याचा अनुभव ऐकतो. देवाने त्याला सत्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडले होते. परंतु लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी त्याची थट्टा केली, त्याच्याविरुद्ध कट रचले आणि त्याला अनेक यातना दिल्या. यिर्मयाला भीती वाटत होती. तो म्हणतो, “माझ्या भोवती भीती आहे.” तरीसुद्धा त्याने देवावरील विश्वास सोडला नाही. उलट तो धैर्याने म्हणतो, “प्रभू माझ्याबरोबर बलवान योद्ध्याप्रमाणे आहे.” हा अनुभव आपल्या जीवनालाही लागू होतो. जेव्हा आपण सत्य, प्रामाणिकपणा आणि न्यायाचा मार्ग निवडतो, तेव्हा अनेकदा विरोधाला सामोरे जावे लागते. परंतु अशा वेळी देव आपल्याबरोबर आहे, यावर दृढ विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

        दुसऱ्या वाचनात संत पौल आदाम आणि येशू यांची तुलना करतात. आदामाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे जगात पाप, दुःख आणि मृत्यू आले. परंतु देवाने मानवजातीला सोडून दिले नाही. त्याने आपल्या एकुलत्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला जगात पाठवले. येशूने आपल्या जीवनाने, मृत्यूने आणि पुनरुत्थानाने मानवाला तारणाचा मार्ग दिला. संत पौल सांगतात की, आदामामुळे जे नुकसान झाले, त्यापेक्षा कितीतरी मोठी कृपा आणि जीवन येशूमुळे आपल्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपण कितीही कमकुवत असलो तरी देवाची कृपा आपल्या सर्व मर्यादांपेक्षा मोठी आहे.

        आजच्या शुभवर्तमानात येशू तीन वेळा एकच संदेश देतो, “भिऊ नका.” येशूला माहित आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही भीती असते. अपयशाची भीती, नकाराची भीती, आजाराची भीती, मृत्यूची भीती किंवा लोकांच्या टीकेची भीती. परंतु येशू या सर्व भीतींना उत्तर देतो: “भिऊ नका.” तो सांगतो की सत्य कायमचे लपून राहत नाही. जे गुप्त आहे ते एक दिवस उघड होणारच आहे. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना आपण घाबरू नये.

येशू पुढे एक सुंदर उदाहरण देतो. तो म्हणतो की दोन चिमण्या अगदी कमी किमतीत विकल्या जातात, तरी त्यांच्यापैकी एकही देवाच्या इच्छेशिवाय जमिनीवर पडत नाही. जर देव चिमण्यांची इतकी काळजी घेत असेल, तर तो आपल्या मुलांची किती अधिक काळजी घेईल! येशू म्हणतो, “तुमच्या डोक्यावरील केसही मोजलेले आहेत.” याचा अर्थ देव आपल्याला पूर्णपणे ओळखतो. आपल्या आनंद, दुःख, संघर्ष, अश्रू आणि स्वप्ने त्याला माहित आहेत. आपण कधीही देवासाठी अनोळखी नाही.

        याच सत्याची आठवण करून देणारी एक छोटी गोष्ट आहे. एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर बाजारात गेला होता. गर्दीत तो आईपासून दूर झाला आणि घाबरून रडू लागला. त्याला वाटले की तो एकटा पडला आहे. पण त्याची आई त्याला शोधत होती. काही वेळानंतर तिने त्याला शोधले आणि प्रेमाने मिठी मारली. मुलाला जरी एकटे वाटत होते, तरी त्याची आई त्याला विसरली नव्हती. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनात कधी कधी देव दूर असल्यासारखा वाटतो. परंतु प्रत्यक्षात तो आपल्याला कधीच सोडत नाही किंवा विसरत नाही.

        आजच्या काळात या संदेशाचे विशेष महत्त्व आहे. अनेक लोक भविष्य, नोकरी, आरोग्य आणि आर्थिक समस्यांमुळे चिंतेत जगत आहेत. अशा वेळी भीतीपेक्षा विश्वास निवडणे आवश्यक आहे. यिर्मयाप्रमाणे सत्यासाठी उभे राहणे आवश्यक आहे, जरी त्यासाठी विरोध सहन करावा लागला तरी. सोशल मीडियाच्या युगात इतरांशी तुलना करून निराश होण्याऐवजी देवाने दिलेल्या गुणांची कदर करावी. व्यस्त जीवनात प्रार्थना, बायबल वाचन आणि आत्मपरीक्षणासाठी वेळ काढावा. अपयश किंवा दुःखामुळे आशा सोडू नये, कारण येशूची कृपा आपल्या सर्व कमकुवतपणांपेक्षा मोठी आहे. तसेच प्रेम, दया आणि क्षमेचा मार्ग स्वीकारून आपल्या विश्वासाची साक्ष आपल्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात द्यावी.

        शेवटी, आजच्या देववाणीचा मुख्य संदेश स्पष्ट आहे: भीती नव्हे तर विश्वास, निराशा नव्हे तर आशा आणि स्वार्थ नव्हे तर प्रेम निवडा. देव आपल्या सोबत आहे, आपली काळजी घेतो आणि प्रत्येक परिस्थितीत आपल्याला सामर्थ्य देतो. म्हणून कोणतीही भीती मनात न बाळगता, देवावरील विश्वासाने आणि धैर्याने जीवनाचा प्रवास पुढे चालू ठेवूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला धैर्य दे.

१. पवित्र देऊळमातेचे सेवक पोप लियो सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्म-भगिनी, धर्म-शिक्षक व सर्व ख्रिस्ती प्रापंचिक ह्यांच्याद्वारे तुझी व तुझ्या प्रजेची सेवा करण्यास आणि प्रत्येक कठीण परीस्थितीत तू आम्हा बरोबर आहेस ही जाणीव करून देण्यास लागणारी कृपा त्यांस मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळ व इतर अधिकारी यांनी भारताच्या संविधानातील नियम पाळून देशाचा कारभार चालवावा व निःस्वार्थीपणे देशाची सेवा करावी तसेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण नव्हे, तर आशेचे आणि आपलेपणाची भावना उत्पन्न करावयास ते सतत कार्यरत राहण्यास त्यांना आशीर्वादाने भर म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. पवित्र शास्त्राला अनुसरून देऊळमातेच्या शिकवणीप्रमाणे आम्ही खरे ख्रिस्ती जीवन जगावे. आई-वडिलांचा सन्मान, आजारी भाऊ-बहिणींची सेवा, शेजारप्रीती, अशी सेवादायी कृत्ये आपल्या हातून घडावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ह्या वर्षी चांगला पाऊस पडावा व परमेश्वराने आपल्याला अतिवर्षण व दुष्काळापासून मुक्त करावे म्हणून आपण प्रार्थना करु या.      

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.