Thursday 26 November 2020


                     Reflection for the 1st Sunday of Advent (29/11/2020) by Br. Brian Motheghar


आगमन काळातील पहिला रविवार


 

 

दिनांक: २९-११-२०

पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, १९ब, ६४:२ब-७

दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९

शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७





जागृत रहा”

प्रस्तावना:

आजपासून आपण आगमन काळाला सुरुवात करीत आहोत. आगमन काळ हा प्रभू येशूच्या येण्याचा काळ. प्रभू येण्यासाठी आपल्याला जागृत, तयार, सज्ज राहण्यासाठी हा काळ आवाहन करत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा हा यहुदी लोकांच्या कल्याणासाठी देवाकडे बाप म्हणून हाक मारून विनवीत आहे. कारण पापांच्या फासात अडकून यहुदी किंवा इस्त्रायली लोकांना देवाचा विसर पडला होता म्हणून संदेष्टा लोकांच्या वतीने देवाला साकडं घालतो. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथिकरांमध्ये पडलेल्या वादास प्रतीउत्तर म्हणून पत्र लिहित असताना देवाच्या कृपेत त्यांना सर्व प्रकारच्या सुखसोयी व आशीर्वाद मिळाले आहेत ह्याचे भान ठेवण्यास सांगत आहे. आजच्या मार्कलिखीत शुभवर्तमानात प्रभू येशू आपणा सर्वांना छोटयाश्या परंतु महत्वपूर्ण दाखल्याद्वारे जागृत राहण्यास सांगत आहे. कारण घराचा धनी कधी, कोणत्या घटकेस येणार हे कोणालाच ठाऊक नाही. आजच्या उपासना विधीत सहभागी होत असताना आपण प्रभूच्या येण्यास तयार आहोत का? त्याला आपल्या जीवनात, आपल्या हृदयात स्विकारण्यास तयार आहोत का? की अदयाप पापांचा अंधकार, झोपाळूपणा आपल्याला सत्याच्या प्रकाशात येण्यास अडवत आहे का? हे जाणून घेऊया व प्रकाशाला आपल्या जीवनात स्विकारण्यास तयार होऊया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, १९ब, ६४:२ब-७

      यशया संदेष्टा आपणास सांगत आहे की प्रभू देव हा आपला स्वर्गीय पिता आहे. कारण जेव्हा इस्राएल लोक हे बाबिलोनच्या बंदिवासात होते तेव्हा त्यांची सुटका करणारा हा प्रभू होता आणि हाच प्रभू आपल्या लोकांना वाचवण्यासाठी व त्यांचे जीवन चांगले बनवण्यासाठी इस्राएलात परत येणार होता.

यशया संदेष्टा धरणी कंप, आवाज, वारा, वादळ आणि अग्नी अशा नैसर्गिक बाबींचा उल्लेख करून प्रभूच्या येण्याचे संकेत देतो. इस्राएली लोकंसुद्धा अशा ह्या उल्लेखाने आनंदीत आहेत कारण धरणी कंप हा देवाची उपस्थिती दर्शवितो (निर्गम १९:१८). ह्याचा अर्थ असा की जेव्हा इस्राएल लोक देवाचा धावा करतील किंवा विलाप करतील तेव्हा प्रभू हा धरणी कंपाच्या रुपात त्यांच्या समोर प्रकट होईल. हे खरे आहे कारण यशया हा अध्याय ६४ मध्ये सांगतो की जो कोण प्रामाणिकपणाचे जीवन जगतो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो व त्याचा धावा करतो त्याच्याबरोबर देव नेहमी असतो. 

दुसरे वाचन: १ करिंथ पत्र १:३-९

     संत पौल करिंथकरास सांगतो की प्रभूद्वारे तुम्हांस खूप काही चांगली दाने   भेटली आहेत. ह्या दानांचा चांगला वापर करा. कारण ही दाने तुम्हांला प्रभूच्या प्रेमामुळे भेटली आहेत. ही दाने तुम्हांस प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यत आधार व शक्ती देणार कारण प्रभूचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे. 

शुभवर्तमान : मार्क १३:३३-३७

शुभवर्तमानात प्रभू येशू आपणास सावध राहण्यास व सदैव तयारीत राहण्यास सांगत आहे. जागृत राहणे किंवा सावध राहणे हा ख्रिस्ताचा एक महत्वाचा मुद्दा होता. कोणतीही गोष्ट ही सावध राहून किवा जागृत राहून करणे महत्वाचे आहे. येशू ख्रिस्त नेहमी आपणास जागृत राहण्यास का सांगत आहे? कुणासाठी जागृत राहावे? व कशासाठी जागृत राहावे? ह्या सर्वांचे उत्तर फक्त येशू आहे. कारण येशू ख्रिस्त त्याच्या स्व:ताच्या येण्याची वाट पाह्ण्यासाठी आपणा सर्वांना जागृत राहण्यास सांगत आहे.

सावध व जागृत कसे राहावे हे स्पष्ट करण्यासाठी प्रभू एका घरधन्याचा दाखला देतो. हा घरधनी त्याचे घर कामगाराच्या हातात सोपवून त्याच्या प्रवासाला निघतो. परंतु तो कधी परत येईल हे कुणास ठाऊक नाही म्हणून त्याच्या कामगारांनी नेहमी सावध राहणे महत्वाचे होते.

येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गीय पित्याकडे जाण्याअगोदर शिष्यास व आपणा सर्वांना एक कामगीरी सोपवली. तो परत येणार व नक्कीच येणार हे त्याने स्वत:हा सांगितले. परंतु, तो कधी येणार हे आपणास त्याने कधीच सांगितले नाही (मत्तय १६:२७) का ? कारण आपण त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी जागृत व तत्पर असलो पाहिजे. 

मनन चिंतन :

          आगमन हा पवित्र काळ आहे ज्यामध्ये ख्रिस्तसभा आपल्याला तयार राहण्यासाठी बोलावत आहे. ही तयारी आहे ख्रिस्तजयंती साजरी करण्यासाठी. ख्रिस्ताचे पुनरागमन आपल्या जीवनात करण्यासाठी. ह्या पवित्र काळात ख्रिस्तसभा आपल्याला बऱ्याचशा अशा सूचना देते, ज्यांद्वारे आपण सज्ज असलो पाहिजेत किंवा तयार असलो पाहिजेत. जर आपण ह्या सूचना संपूर्ण हृदयाने, मनाने पाळल्या तर आपण प्रभूच्या आगमनाला आपली तयारी दर्शवू व ख्रिस्तजयंती ही आपल्याला अधिक भक्तिभावाने व जल्लोषाने साजरी करण्यास आनंद भेटेल.

          इस्त्रायली लोकांची अशी समज होती की देव परमेश्वर हा लवकरच येणार व त्यासाठी ते वाट पाहत होते. तो कधी कोणत्या घटकेस येईल ह्याचे त्यांना भान नव्हते. त्यांनी प्रार्थनासुध्दा केली की, परमेश्वराचे परत येणे हे लवकरच असावे नाहीतर त्यांच्यामधील संशय त्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासाचा नाश करून टाकील.

आपण ख्रिस्त युगात जीवन जगत आहोत व आपल्याला अदभूत फायदा आहे की प्रभू परमेश्वर त्याच्या पुत्राच्या रूपाने आपल्यामध्ये वस्ती करत आहे. ज्या परमेश्वराची इस्त्रायली प्रजा परत येण्याची वाट पाहत आहेत तो प्रभू परमेश्वर ख्रिस्ताच्या रुपात आला आहे त्या सत्यावर त्यांचा विश्वास नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवी रुपात आपल्यामध्ये वस्ती केली व आपली मानवता त्याच्या दैवतेत सामावून घेतली व आपल्याला दैवीपणाचा अनुभव बहाल केला आहे आणि आपल्याला त्याच्या पित्याच्या प्रेमात दत्तक मुले व आपल्याला त्याच्या बंधूप्रेमात समाविष्ट करून घेतलं आहे.

          आपला ख्रिस्ती विश्वास आपल्याला शिकवतो की आपण परमेश्वराची निर्मिती आहोत आणि त्याच्या पुत्राच्या देह धारणेने आपण दैविकतेने दत्तक घेतलेली मुले आहोत ह्याचा अर्थ आहे, पवित्र त्रैक्यात सार्वकालीक जीवन व हे जीवन ख्रिस्ताने आपल्या क्रूसावरील बलिदानाने मृत्यूवर मात करून जिंकून घेतले आहे आणि हे येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या जीवनाद्वारे प्रकट केले आहे. त्याने आपल्याला जीवनाच्या संध्याकाळी आनंदीत मरणाचे आश्वासन दिले आहे. परंतु ते पण एका अटीवर. ती अट अशी की आपण त्याची आज्ञा पाळावी व त्याप्रमाणे आपले ख्रिस्ती जीवन जगावे.

आगमन काळातील चारही सप्ताह आपल्याला ख्रिस्तसभा ह्या मुलभूत, वास्तविक, विश्वासिक, सत्याचे सातत्याने आठवण करून देत असते की जेणेकरून आपल्याला ख्रिस्तजयंती साजरी करण्यास सहाय्य मिळेल व ख्रिस्ती जीवन जगण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळेल.

आजच्या उपासना विधीचा प्रमुख घटक किंवा गाभा असा आहे की, आपण ख्रिस्ताला स्विकारण्यास कितपत तयारी केली आहे. ख्रिस्त शुभवर्तमानात आपल्याला ‘जागृत रहा’ म्हणून सांगत आहे. मी मानसिकरित्या जागृत आहे परंतु मी आध्यात्मिकरित्या जागृत आहे का? मी ख्रिस्ताला भेटण्यास व त्याचा आशीर्वाद घेण्यास तयार आहे का? गेले कित्येक महिने मी उपासना विधीत सहभागी झालो नाही. पण आता मला संधी आहे, त्या संधीचा मी उपयोग करणार आहे का? की, मी ख्रिस्ताविना जीवन जगत आहे, तसेच जीवन जगणार? ह्या अशा अनेक प्रश्नांना सामोरे जाण्यास व त्याप्रमाणे आपले जीवन बदलण्यास प्रभू ख्रिस्ताची कृपा आपण ह्या उपासना विधी मध्ये मागुया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद: हे प्रभूतुझे स्वागत करण्यास आमचे अंतःकरण शुद्ध ठेव.

 १. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू, व धर्म बंधू-भगिनी ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषविण्याची जबाबदारी सोपवली आहे. ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर असावेपापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावेम्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.

३. जी लोकं देऊळमाते पासून दुरावलेली आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेली आहेत, अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास त्याची शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि त्यांना आपल्या अपराधांची जाणीव व्हावी, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. ह्या आगमन काळाची सुरुवात करत असताना आपण सर्वांनी ख्रिस्ताचे रूप गरीब, अपंग, लुळेव बहिरे ह्या सर्वांमध्ये पाहावे व त्यांना त्यांच्या दु:खात व संकटात मदत करावी, ह्यासाठी लागणारी कृपा परमेश्वर चरणी मागुया.  

५. चैनबाजी, अहंकार किंवा आनंद म्हणजे शाश्वत जीवन नाहीह्याची जाणीव आम्हांला व्हावी व अशा मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना  करूया.

६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी ठेऊया.


Wednesday 18 November 2020

Reflection for the Solemnity of Christ the King (22/11/2020) by         Br. Suhas Farel




ख्रिस्तराजाचा सण

दिनाक: २२/११/२०२०

पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६

शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६



प्रस्तावना :

आज सामान्य काळातील चौतीसावा रविवार. ख्रिस्ती धर्माच्या दिनदर्शिकतेनुसार आज वर्षाचा शेवटचा रविवार. आजच्या दिवशी देऊळमाता ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे. आजच्या ह्या आनंदाच्या दिवशी देऊळमाता आपल्या प्रत्येकाला आठवण करून देत आहे की, ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृद्याचा, आत्म्याचा, शरीराचा आणि कुटुंबाचाही राजा आहे. ख्रिस्ताचे हे राजासन कोणत्याही माणसाकडून नव्हे तर खुद्द स्वर्गातील पित्याकडून लाभले आहे. म्हणूनच ख्रिस्ताचे राज्य हे काही वेळापुरती मर्यादित नसून अनंतकाळाचे राज्य आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संदेष्टा यहेज्केलद्वारे आपण ऐकणार आहोत की, परमेश्वर त्याच्या हरवलेल्या मेंढराचा शोध करून त्यांचा मेंढपाळ होतो. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला येशू ख्रिस्त हा मेलेल्यांचा नसून जीवनतांचा देव आहे आणि त्या ख्रिस्ताच्या विश्वासात आपण खंबीर असलो पाहिजे असा बोध करत आहे. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकणार आहोत की, परमेश्वर हा त्याच्या दुतासह येईल व आपल्या सर्वांचा न्याय करील. त्यामुळे आपण आपले जीवन परमेश्वराच्या आज्ञेत राहून जगण्यासाठी आणि परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर सदोदित राहण्यासाठी विशेष करून या मिस्साबलिदनामध्ये प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७

          आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकणार आहोत की, देव आपल्या मेंढरांना शोधून काढणार आहे. ज्याप्रमाणे एखादा मेंढपाळ कळपामध्ये आपली मेंढरे शोधून काढून त्यांना हिरव्यागार प्रदेशात चरायला घेऊन जातो. त्याप्रमाणेच आपला देव त्यांच्या लोकांना त्यांच्या दयनीय परिस्थितीमधून काढून उत्तम ठिकाणी नेईल.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६

          दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकणार आहोत की, ज्याप्रामाणे आदमाने जगात पाप आणले आणि मरणास कारणीभूत ठरला. ख्रिस्ताने आपल्या रक्ताने ते पाप धुवून मरणावर विजय मिळविला. त्यामुळे जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते जरी मेले तरी ते ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठतील. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मरणावर विजय मिळविला आहे.

शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६

          शुभवर्तमानामध्ये आपण ऐकणार आहोत की, आपण जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो तेव्हा ती मदत देवाला पोहोचते. शुभवर्तमानामामध्ये दोन लोकांचे गट पाहायला मिळतात. एक गट जो इतरांना मदत करतो, संकटात नेहमी धावून येतो आणि दुसरा गट जो इतरांकडे दुर्लक्ष करतो. जी लोक चांगली कामे करतात त्यांना देवाच्या राज्यात नेहमी स्वीकारले जाते. परंतु जी लोक दुष्कर्म करून, इतरांना दुःख देतात त्याचे नेहमी हाल होतात. ते सार्वकालिक शिक्षेस पात्र ठरतात.

 मनन चिंतन:

ख्रिस्त राज्याची सुवार्ता ह्या जगी सांगाल का

आलेलूया, आलेलूया गौरवे गर्जाल का ?

          आज सामान्य काळातील चौतीसावा रविवार. ख्रिस्ती धर्माच्या दिनदर्शिकतेनुसार आज वर्षाचा शेवटचा रविवार. आजच्या दिवशी देऊळमाता ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे. ज्याप्रमाणे आपण प्रस्तावनेमध्ये ऐकले की ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृदयाचा, आपल्या आत्म्याचा, शांतीचा, शरीराचा व कुटुंबाचा राजा आहे. त्याचे राज्य हे अनंतकाळाचे राज्य आहे. म्हणूनच वधस्तंभावर खिळलेल्या दोन चोरांपैकी एकाने येशूला म्हटले की, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा आणि ताबडतोब प्रभूने त्याला त्याच्या तारणाचे अभिवचन दिले. “तू आज माझ्याबरोबर स्वर्गलोकात असशील.” व त्या वधस्तंभावरच त्या अपराध्याला सार्वकालिक जीवन मिळाले.

          यावरून आपल्याला कळते की, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचे नेहमी तारण होते. फक्त त्यांचेच नाही तर त्यांच्या कुटुंबाचेही तारण होते. प्रेषितांची कृत्ये: १६:३१ एका पास्टरने लोकांना प्रश्न विचारला, ‘तुम्हापैकी किती जणांना सार्वकालिक जीवन पाहिजे? किती जणांना वाटते की आपल्या भावाचे, बहिणीचे तारण व्हावे? किती जणांना वाटते की माझ्या नवऱ्याचे, बायकोचे तारण व्हावे?’ काही जणांचे हात अर्धेच उभे आहेत. नवऱ्याला किंवा बायकोला तारण मिळो वा न मिळो मला त्याचे काही पडले नाही.

          एकदा एका धर्मगुरूंनी आपल्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला की, किती जणांना स्वर्गात जायचं आहे? सर्वांनी एकदम सरळ हात वर केला परंतु एका माणसाने घट्ट हाताची घडी घातली. फादरांनी त्याला कुतूहलाने विचारले, काय रे भावा तुला स्वर्गात जायचे नाही काय? त्यावर तो माणूस म्हणाला, फादर त्या बाकावर वर हात करून ती बाई बसली आहे ना ती माझी बायको आहे. आणि जर का ती स्वर्गात जाणार असेल तर मी कधीच स्वर्गात जाणार नाही. She can turn even heaven into hell. आपल्यापैकी बहुतेक जणांची हीच कथा आहे. म्हणून जेव्हा मी विचारले की आई-बापांना, बहिणीला-भाऊला स्वर्ग मिळावा, तारण व्हावे कोणाला वाटते तेव्हा हात पटकन वर गेले परंतु नवऱ्याला आणि बायकोला तारण प्राप्त व्हावे असे विचारल्यावर काही हात वरती येण्यास कुचबुजले. वाईट वाटून घेऊ नका. परंतु बायकोला नेहमी वाटत असते की सर्व प्रसंगांचे कारण हा नवराच असतो. म्हणून दर रविवारी बायको नवऱ्याला खेचत ओढत चर्चमध्ये आणत असते आणि फादारांचे प्रवचन चालू झाले की नवऱ्याला टोमणे मारणे चालू. कधी कधी नवरा बायकोला ताणे मारत असतो. बायकोला वाटते नवऱ्याने बदलायला हवं, नवऱ्याला वाटते बायकोने बदलायला हवं. सासूला वाटते सुनेने, सुनेला वाटते सासूनं, मुलांना वाटते मुलींनी, मुलींना वाटते मुलाने आणि हे असेच चालू राहते. प्रत्येकाला वाटते की दुसऱ्याने बदलायला हवे. परंतु मदर तेरेजाचे वाक्य लक्षात ठेवा, if you want to bring the change, be the change. आज आपल्या सर्वांना पश्चातापाची गरज आहे आणि पश्चाताप करायचा तो म्हणजे कसा? बायबलमधील पौलाचे करंथिकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये ७:१० मध्ये सांगते, पश्चाताप हा दोन प्रकारचा असतो. जागतिक पश्चाताप आणि आध्यात्मिक पश्चाताप.

          पेत्र आणि जुदास. एकाने देवाला नाकारले तर दुसऱ्याने देवाचा विश्वासघात केला. दोघांनीही पश्चाताप केला; फरक इतकाच की पेत्राने येशूवर पाहिले आणि त्याला तारण प्राप्त झाले. दुसऱ्या बाजूला जुदासने चाळीस नाण्यावर, जगावर विचार केला आणि स्वतःला फासावर टांगविले.

          आज देऊळमाता आपल्याला ख्रिस्त जो राजा आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यास आमंत्रित करीत आहे. आजवर आपण खूप अशा राजांच्या कहाण्या ऐकल्या असतील. बरेचसे राजे उदयास आले आणि धुळीस मिळाले. कारण त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम केले. स्वतःच्या स्वार्थासाठीच जगले. त्यांनी जनतेचा विचार कमी आणि स्वतःचा विचार जास्त केला. काही चांगले राजेही होऊन गेले त्यात शंका नाही. परंतु प्रत्येक राजाची एक प्रजा होती. राजवाडा होता. सिहासन होते. परंतु आजचे शुभवर्तमान आपल्यासमोर एक वेगळ्याच राजाला प्रदर्शित करत आहे. असा राजा ज्याने हिऱ्या-मोत्यांचा नव्हे तर काट्यांचा मुकुट परिधान केला होता. जो राजवाडयात नाही तर गाईच्या गोठयात जन्माला आला. असा राजा ज्याने लोकांचे प्राण घेतले नाही तर लोकांना नवजीवन प्राप्त करून दिले. ज्याने आपले साम्राज्य वाढविले नाही तर आपल्या राज्यांत लोकांना सामावून घेतले. कारण त्याला लोकांच्या मनात, हृदयावर राज्य करायचे होते. म्हणून मरतेवेळीसुद्धा त्याने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली. अशा या राजाचा सण साजरा करत असताना आपल्या प्रत्येकाला त्याच्या स्वर्गीय राज्याचा अनुभव यावा. तसेच येशूच्या दयेचा व करुणेचा स्पर्श आपणा सर्वांना व्हावा म्हणून प्रार्थना करूया. आमेन.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभोतुझे राज्य आम्हामध्ये येवो.

१. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी ह्या सर्वांनी आपल्या कार्याद्वारे व शुभवार्ताद्वारे ख्रिस्त राजाची सुवार्ता घोषित करून सर्वत्र ख्रिस्ताच्या प्रेमाचे, शांतीचे व सत्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.


२. समाजामध्ये ज्या लोकांना न्याय मिळत नाही अशा लोकांना ख्रिस्त राजाच्या कृपेने व आशीर्वादाने न्यायाचे वरदान मिळावे. त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबले जावे आणि त्यांना समाजाने सन्मान व आदर देऊन त्यांचा समाजामध्ये स्वीकार करण्यात यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.


३. आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्यांचा आदर्श घेऊन, त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे व आपल्या देशाची व लोकांची निःस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.


४. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत, विशेषतः जे कोरोना रोगाने बाधित आहेत, त्यांना ख्रिस्तराजाचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.


५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


Thursday 12 November 2020

Reflection for the 33rd Sunday in Ordinary Time (15/11/2020) by  Br. Roshan Rosario



सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार


दिनांक: १५/११/२०२०

पहिले वाचन: नीतिसूत्रे: ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र: ५:१-६

शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०



प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्या समोर ‘प्रतीक्षा करणे’ किंवा ‘वाट पाहणे’ ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावीत आहे. ‘कशाप्रकारे आपण वाट पहायला हवी?’ ह्यावर आजची वाचने आपणांस सल्ला देत आहेत. देवाने आपल्याला भरपूर अशा गुणांनी व दानांनी आशीर्वादित केलेले आहे. आपल्या क्षमते व योग्यतेनुसार देवाने आपणांस ह्या दानांनी व गुणांनी भरलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार ही आपली श्रध्दा व विश्वास आहे आणि म्हणून आपण त्याच्या पुन्हा येण्याची वाट पाहत आहोत. ही वाट पाहत असताना आपण न काम करता, बेकार बसू नये; किंबहुना ज्या गुणांनी परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केले आहे त्यांचा मोठ्या जबाबदारीने वापर करून प्रभूच्या येण्याची तयारी करावी ही देवाची आपल्याकडून  अपेक्षा आहे. ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपण प्रार्थना करूया की, जीवनात चांगला व योग्य मार्ग धरून प्रभूने दिलेल्या गुणांचा त्याच्या गौरवासाठी वापर करावा जेणेकरून तो परमेश्वर आपणास भेटावयास येईल तेव्हा म्हणेल की ‘शाब्बास, भल्या व विश्वासू दासा.’

 पहिले वाचन: नीतिसूत्रे: ३१:१०-१३१९-२०३०-३१

          आजच्या पहिल्या वाचनात स्त्रियांची भूमिका कशी असावी ह्या विषयी सांगत आहे. येथे स्त्री आपल्या घरातील कुटुंबियासाठी अन्नवस्त्राची तरतूद करण्याची जबाबदारी पार पाडताना दाखवली आहे. तिची जबाबदारी ऐवढयापुरतीच मर्यादित नाही. घराबरोबर आर्थिक बाबतीत, व्यवसायातही तिचा सहभाग असतो. ती गरजवंताची काळजी घेते आणि इतरांना  योग्य शिक्षण देण्याची कार्य करते. या कर्तबगार स्त्रीचा पती व तिची मुले तिचा आदर व बहुमान करतात. हयाला कारण तिची कर्तबगारी आहे; पण ती स्वतः देवाला बांधलेली आहे. तिची देवावर अढळ निष्ठा आहे, ही तिच्या सफल जीवनाची मुळ प्रेरणा आहे.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र: ५:१-६

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला येशूच्या दुसऱ्या आगमनाविषयी सांगत आहे. ही घटना घडेल तेव्हा ते आपणाला समजेल की नाही यावर पौलाने उत्तर दिले आहे की प्रभूचा दिवस चोर येतो तसा येईल म्हणजे ते येणे अनपेक्षित आणि न सुचणारे असेल. सावधगिरीचा इशारा देताना येशूने सांगितले तेच पौल सांगत आहे. त्यासाठी त्या दिवसासाठी आपल्याला सतत तयार असावे त्यासाठी आराम न करता व झोपेत न असता आपणास सतर्क रहायला पाहिजे.

 शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०

     आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताने रुपयांच्या दृष्टांताद्वारेविश्वासू व प्रामाणिक कसे राहायचे ह्याचे महत्व दाखवून दिले आहे. परदेशी जाणाऱ्या मनुष्याने आपल्या दासांना आपली मालमत्ता वाटून दिली. एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. आपल्या पैशाचा व वेळेचा विश्वासूपणे उपयोग करून जबाबदारी दाखवणे हा त्या मागचा हेतू होता. ज्यांनी विश्वासूपणा आणि जबाबदारी दाखवली ते शाबासकीस पात्र ठरले, याउलट ज्यांनी विश्वासुपणा व जबाबदारी दाखवली नाही ते शाबसकीस पात्र ठरले नाहीत.

 बोधकथा:

जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक भूमिका असते, जी सांगते की, तुमच्या कृतीतून घडणाऱ्या आणि घडवण्याच्या परिणामांचं तुम्ही स्वत: कारण आहात. बिरबलच्या चातुर्यकथांमधली बादशहाच्या मेव्हण्याची गोष्ट आपणास ठाऊक आहे. एकदा बेगम बादशहाकडे हट्ट धरते, ‘बिरबलापेक्षा माझा भाऊ जास्त हुशार आहे. बिरबलाच्या जागी माझ्या भावालाच प्रधान करा.धर्मसंकटात सापडलेला बादशहा म्हणतो, ‘मी दोघांची परीक्षा घेऊन निर्णय देईन.त्यानंतर एकदा बादशहा निवांत बसलेला असताना त्याच्या कानावर एका बैलगाडीच्या घुंगरांचा आवाज पडतो. तो मेव्हण्याकडे त्याबाबत चौकशी करतो. मेव्हणा धावत जाऊन पाहून येतो आणि सांगतो, ‘काही बैलगाडय़ा राजवाडय़ासमोरच्या रस्त्यावरून चालल्या आहेत. त्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज आहे.बादशहा विचारतो, ‘काय आहे त्या बैलगाडय़ांत?’  मेव्हणा पुन्हा धावत जाऊन पळत येतो, ‘तांदळाची पोती आहेत.असं अनेक वेळा होतं. बैलगाडय़ा कुठून आल्यात?’, ‘कुठे चालल्या आहेत?’, ‘तांदूळ कुठला आहे?’ वगैरे एकामागून एक प्रश्न बादशहा विचारत जातो आणि दरवेळी धावत जाऊन मेव्हणा तेवढय़ा प्रश्नाचं उत्तर घेऊन माघारी येतो. हेलपाटय़ांनी पार थकून जातो. त्यानंतर बादशहा बिरबलाला बोलावून घेतो आणि त्याच्याहीकडे त्या एका बैलगाडीच्या घुंगरांच्या आवाजाची चौकशी करतो. बिरबल मुजरा करून बाहेर पडतो तो थेट दोन-तीन तासांनी परत येतो. आल्यानंतर सांगतो, ‘त्या ५५ बैलगाडय़ा होत्या. सर्वामध्ये मिळून उत्तम प्रतीचा साधारण हजार मण बासमती तांदूळ होता. एक व्यापारी तो विकण्यासाठी शेजारच्या राज्यातल्या बाजारपेठेत घेऊन चालला होता. आपल्या कोठारात तांदूळ भरायचाच होता. मी मालाचा दर्जा तपासला, किंमतही वाजवी होती. एकरप्रमाणे खरेदी होतेय म्हटल्यावर व्यापाऱ्यानं किंमत आणखी कमी केली. गाडय़ा खाली करून घेण्याची व्यवस्था करून मी आपल्याकडे आलो, त्यामुळे थोडा उशीर झाला. घुंगरांच्या आवाजाची आपण चौकशी केलीत, त्यामुळे फटक्यात आपले एक महत्त्वाचे काम झाले.बादशहा समाधानानं हसतो आणि बेगम आणि तिचा भाऊ लाजिरवाणे होतात. 

मनन चिंतन:

          प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे आपण प्रभू येशूच्या पुन्हा येण्याची वाट पाहत आहोत किंवा त्याच्या पुन्हा येण्याची तयारी करीत आहोत. ही तयारी आपण आपल्या विश्वासूपणात व जबाबदारीत दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. हे दाखविण्यासाठी प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात रुपयांचा दृष्टांत आपणासमोर ठेवत आहे. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे धनी तीन दासांना ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे जबाबदारीची कामे पूर्ण करण्यास सोपवून देतो आणि दिलेल्या रकमेच्या प्रमाणातच परतीची अपेक्षा करतो. आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत हे देव जाणतो, तसेच आमच्याकडून जेवढे योग्य तेवढीच त्याला अपेक्षा आहे. आपल्या कामात यशस्वी झालेल्या दोघा नोकरांना धन्याकडून सारखीच शाबासकी मिळते. जरी त्यांना दिलेली  जबाबदारी व त्यांनी साधलेले कार्य भिन्न असले, तरी त्यांना मिळालेले प्रतिफळ मात्र समानच आहे. आपणास दिलेली जबाबदारी जरी थोडी असली, तरी योग्य व आवश्यक ते प्रयत्न आपण केलेच पाहिजेत त्याला पर्याय नाही. कारण आपल्या योग्यते व क्षमतेप्रमाणे परमेश्वराने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आणि त्यानुसार आपण ती जबाबदारी पार पडणे गरजेचे आहे. आपणांस कमी जबाबदारी दिलेली आहे म्हणून आपण बेजबाबदार राहिलो तरी चालेल अशी मनोभावना अंगीकारणे चुकीची आहे. तिसऱ्या नोकराने धन्याचा उद्देश ओळखला नाही. त्याने सेवेपेक्षा सुरक्षिततेला महत्त्व दिले हीच त्याची चूक होती. सेवेसाठी आपणासमोर उपलब्ध असलेल्या प्रत्येक संधीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा ही देवाची अपेक्षा आहे व त्याचे प्रतिफळ आपणास चूकणार नाही. देव त्या धन्यासारखा कठोर, कसून काम करवून घेणारा आहे अशी चुकीची भावना आपण ठेवली, तर त्याला प्रीतीने, खुलेपणाने व मनःपूर्वक प्रतिसाद देणे आपणास कठीण होईल. त्याने दिलेल्या देणग्यांचा उपयोग आपण जबाबदारीने केला पाहिजे. ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार राहण्याचा हाच मार्ग आहे. ‘तयार असणे’ म्हणजे बेकार बसून वाट पाहणे नव्हे, तर आपणाला दिलेल्या संधीचा जास्त लाभ घेऊन सोपवलेली जबाबदारी पार पाडणे होय.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी यांनीं देऊळमातेच्या उन्नतीसाठी दिलेली आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनीना बाप्तिस्मा संस्काराद्वारे दिलेल्या आपल्या ख्रिस्ती जबाबदारीकडे दुर्लक्ष न करता ती विश्वासाने पार पाडण्यास त्यांना देवाची कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

३) हे दयावंत परमेश्वरा आम्ही विशेषकरून ह्या जगात कोरोनाग्रस्त झालेल्या लोकांसाठी प्रार्थना करतो. ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून तुझ्याकडे याचना करतो.

४) आपण आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया की, येशूच्या शिकवणीप्रमाणे चालून परमेश्वराचा आमच्या कामाद्वारे गौरव होण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

Friday 6 November 2020


Reflection for the 32nd Sunday in Ordinary Time (08/11/2020) by Br. David Godinho.


सामान्य काळातील बत्तीसावा रविवार

 

दिनांक: ०८/११/२०२०

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६         

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८

शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३



 प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आपण उपासना वर्षाच्या अखेरीस आलेलो असताना आजची उपासना आपणा प्रत्येकास प्रभू येशूच्या येण्यासाठी सज्ज राहण्यास किंवा आजच्या शुभवर्तमानात नमूद केलेल्या पाच शहाण्या कुमारींप्रामाणे तयारीत राहण्यास व त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास आव्हान करीत आहे. ही तयारी करण्यासाठी आपणांस गरज आहे ‘शहाणपणाची’ किंवा ‘ज्ञानाची’. शलमोनचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगितले आहे की, जो कोणी ज्ञानाचा शोध करील त्याला ते प्राप्त होईल. आणि हे दैवी ज्ञान आपणाजवळ असेलतर प्रभूच्या येण्याची परिपूर्ण तयारी करण्यास ते आपणांस मदत करेल. म्हणून आजच्या प्रभू भोजनात सहभागी होत आसताना प्रभू येशूच्या येण्याची आपण प्रत्येकाने पाच शहाण्या कुमारींप्रमाणे सतत जागृतेने वाट पाहण्यास आणि त्यासाठी तयारीत असण्यास लागणारी कृपा प्रभू जवळ मागुया. 

 पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६         

ज्ञान तेजोमय आणि अक्षय आहे अशा शब्दात आजच्या पहिल्या वाचनात आपणांस ज्ञानाची महती सांगितलेली आहे. कारण ज्ञान किंवा शाहाणपणा हा परमेश्वराचा एक गुणधर्म आहे. जो कोणी ज्ञानाच्या शोधात आहे त्यांस ते सापडेल आणि परमेश्वराच्या मार्गाने चालण्यास ते आपणांस मार्गदर्शन करील आणि त्यामुळे आपण परमेश्वराच्या येण्याच्या तयारीत असण्यासाठी ज्ञानाची आवड धरणे गरजेचे आहे.

 दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८

मृत्यूमुळे दुःख वाटणे हे सहाजिकच आहे; परंतु हा वियोग फक्त काही काळापुरता असतो. ख्रिस्ताचे अनुयायी ह्या नात्याने आपण पुनरुत्थानावर विश्वास ठेवून, जे ख्रिस्तामध्ये झोपी गेले आहेत म्हणजेच मरण पावले आहेत, ते खात्रीने जिवंत होणार आहेत ही आशा बाळगणे नितांत गरजेचे आहे. म्हणून पुनरुत्थानावर विश्वास ठेवून प्रभू येशूच्या येण्याची सतत तयारी करण्यास संत पौल आव्हान करीत आहे आणि त्याच्या पुन्हा येण्याचा विसर पडू देऊ नका आणि ह्याविषयी अजाण राहू नका असा बोध संत पौल थेस्सलनीकरांस करत आहे.

शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३

प्रभू येशूच्या पुन्हा येण्याच्या तयारीत राहण्याची आणि दक्षतेची अत्यंत गरज आहे हे व्यक्त करण्यासाठी प्रभू येशूने आपणासमोर दहा कुमारींचा दाखला मांडला आहे. ह्या कुमारीका दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या, त्यात पाच शहाण्या व पाच मूर्ख होत्या. जेव्हा वर आला तेव्हा त्या झोपेतून उठून दिवे नीट करू लागल्या. पाच ज्या शाहाण्या होत्या त्या पूर्ण तयारीनिशी आल्या कारणाने वरासोबत लग्नसोहळ्यात सहभागी होऊ शकल्या, परंतु मूर्ख कुमारींनी पुरेशी तयारी केली नव्हती आणि म्हणून त्यांस प्रवेश नाकारण्यात आला. प्रभूच्या येण्यास सतत तयार राहण्यास संत मत्तय आपणास आव्हान करीत आहे.

 बोधकथा:

राजू नावाचा एक गरीब माणूस एका लहानशा गावात राहत होता. जरी तो गरीब असला तरी तो मनाने व हृदयाने श्रीमंत होता. कोणात्याही व्यक्तीला मदत करायला तो सतत धावत असे. कोठे गरीब व्यक्ती किंवा भिकारी माणूस दिसला, तर तो लगेच त्याला काही तरी खावयास देई. अशा चांगल्या सद्गुणांनी तो वाढलेला होता. राजू कॉलेज पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. एकदा एका वर्तमान पत्रात हॉटेलसाठी जागा आहे ते पाहून तो त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत जातो. त्या ठिकाणी पोहचल्यावर त्याला एक गरीब भिकारी भेटतो. राजूला त्याची दया येते म्हणून तो त्याला काहीतरी खायला देण्यासाठी जवळच्या दुकानात जाऊन काही खायला घेऊन येतो व त्या भिकाऱ्याला देतो व तसाच मुलाखत देण्यासाठी पुढे निघून जातो. त्या नोकरीसाठी मुलाखत द्यावयाला खूप लोक आलेले होते. जेव्हा राजू मुलाखत द्यावयास जातो, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. ज्या गरीब भिकाऱ्याला राजूने काही खावयास दिले होते, तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो त्या हॉटेलचा मनेजर होता. त्याने राजूला सांगितले की, तू ही मुलाखत पास झालेला आहेस कारण मी भिकाऱ्याच रूप घेऊन त्या रस्त्यावर उभा होतो, कोणीही मला मदत करावयास पुढे आला नाही परंतु तू माझ्या जवळ आला मला खायला दिले. आणि तू खरोखरच माझ मन जिंकल आहेस त्याच बक्षीस म्हणून तुझी ह्या जागे साठी निवड झाली आहे. तू उद्या पासून कामावर ये. दुसऱ्यांना मदत करण्याच्या ह्या गुणधर्मामुळे त्याला ती नोकरी भेटू शकली.

मनन चिंतन:

वेळेवर न आल्यामुळे बस किंवा रेल्वे चुकल्याचा अनुभव, पुरेशी तयारी न केल्यामुळे कामात किंवा परीक्षेत अपयश आल्याचा अनुभव,  तसेच संगीत खुर्ची हा खेळ खेळत असताना पुरेशी दक्षता न घेतल्यामुळे खेळातून बाद होण्याचा अनुभव आपण घेतलेला असेल. सेमिनरीमध्ये ‘सरप्राईज टेस्ट’ नावाची चाचणी घेण्याची एक पद्धत आहे. एखादा विषय शिकविताना प्रोफेसर कधीही चाचणी घेतात. जो कोणी चांगल्याप्रकारे रोज जे काही शिकविलेले आहे त्याची उजळणी करतो तो चांगल्या गुणांनी पास होतो व जो शेवटच्या क्षणाला आभ्यास करावयास थांबतो तो चांगले मार्क्स घेऊ शकत नाही. अशाप्रकारचे अनेक अनुभव आपण अनुभवलेले आहेत.

आजची उपासना आपणास प्रभू येशूच्या पुन्हा येण्यासाठी तयार राहण्यास सांगत आहे. स्वर्ग राज्याच्या गोष्टी सांगण्यासाठी प्रभू येशू लोकांशी निगडीत असलेल्या, त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टींचा दाखल्याद्वारे वापर करत असे. आपल्या शिष्यांनी आपल्या पुन्हा येण्यास कशाप्रकारे तयार रहावे हे सांगण्यासाठी प्रभू येशू त्यांच्यासमोर दहा कुमारीका ज्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या त्यांचा दाखला ठेवत आहे.

यहुदी लोकांची लग्नसमारंभ साजरा करण्याची परंपरा अशी होती. त्यांचे लग्न हे सायंकाळी वधूच्या घरी होई, तदनंतर दोघेही नवविवाहित जोडपे वराच्या घरी लग्नसमारंभ साजरा करण्यासाठी जात असे. तेव्हा वाटेत ह्या नवीन जोडप्याला त्यांचे नातेवाईक किंवा इष्ट-मित्र त्यांचा सत्कार करावयास त्यांच्या घरी चहापाण्याच्या छोट्याश्या कार्यक्रमास बोलावत असत आणि म्हणून ह्या नवविवाहितांना वराच्या घरी पोहचण्यास बराच वेळ होई. जेव्हा वर घराच्या जवळ येई, तेव्हा काही कुमारीका आपल्या हातात दिवे घेऊन त्यांच्या स्वागतास जात असत आणि नंतर लग्नमंडपात ते सर्व एकत्र जात आणि दरवाजा बंद केला जाई आणि हा लग्न समारंभाचा कार्यक्रम काही दिवस चालत असे. अशी ही यहुदी लोकांची परंपरा होती.

प्रभू येशूच्या येण्यास ‘तयारीत रहाणे किंवा जागृत रहाणे’ हे फार महत्त्वाचे आहे ते दाखविण्यासाठी त्याने ही लग्नाची परंपरा घेऊन हा दहा कुमारींचा दाखला सांगितला आहे. ह्या दाखल्यातील काही गोष्टी रूपकात्मक आहेत त्या पुढील प्रमाणे:

१) वर: ह्या दाखल्यातील वर आहे तो म्हणजे खुद्ध प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्या पुन्हा येण्याची आपण आतुरतेने वाट पहायला हवी.

२) दहा कुमारीका: ह्या कुमारीका म्हणजे येशूचे शिष्य आहेत. त्यांतील पाच शहाण्या व पाच मूर्ख. शहाणा व्यक्ती कोण? आणि मूर्ख व्यक्ती कोण? मत्तयच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने ह्या विषयी आपणास सांगितलेले आहे. जो कोणी माझी (येशूची) वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो शहाणा व्यक्ती होय, याउलट जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो मूर्ख व्यक्ती होय.

३) दहा कुमारींनी सोबत आणलेले दिवे: हे दिवे प्रभू येशूच्या ‘पुन्हा येण्यावरील’ आशेचे आणि विश्वासाचे दिवे आहेत. प्रेषितांचा विश्वाससांगिकार प्रकट करताना आपण म्हणतो की, प्रभू पुन्हा येणार ह्यावर माझा विश्वास आहे, कारण प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे तो केव्हा येणार हे आपणांस ठाऊक नाही, परंतु तो येणार आहे हे मात्र नक्की म्हणून आपण आपले विश्वासाचे व आशेचे प्रतिमात्मक दिवे जळते ठेवेणे गरजेचे आहे. हे विश्वासाचे आणि आशेचे दिवे जळते ठेवण्यासाठी प्रभू आपणांस वारंवार आवर्जून सांगत आहे. लूकच्या शुभवर्तमानात १२:३५-३६ मध्ये प्रभू येशू सांगतो की, तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. आणि पुढे तो म्हणतो की, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा.

४) दिवे जळते ठेवण्यासाठी लागणारे तेल: दाखल्यात सांगितल्याप्रमाणे ‘तयारी’ ही ‘पुरेसे तेल’ ह्या शब्दात केली आहे. हे पुरेसे तेल म्हणजे प्रभू येशूच्या शिकवणूकीचे पालन करून ते आपल्या कृतीत उतरविणे होय. मत्तय २५:३५-४६ मध्ये आपणास चांगले कृत्ये करण्याची एक यादी दिलेली आहे ती म्हणजे, भुकेल्यांस अन्न, तहानेल्यास पाणी, जे परके आहेत त्यांस राहावयास जागा, उघडे आहेत त्यांस वस्त्र, आजाऱ्यांना व बंदिवानांना भेट. अशा प्रकारे चांगली कामे करून तसेच हे सर्व करताना प्रार्थनेची सोबत घेऊन आपण प्रभू येशूच्या येण्यास परिपूर्ण तयारी करू शकतो. 

मृत्यू हा अटळ आहे. दोन नोव्हेंबर ह्या दिवशी आपण सर्व मृतांचा दिवस साजरा केला. हा दिवस आपणास जाणीव करून देतो की, आपण एक दिवस मारणार आहोत व त्यासाठी सतत तयारीत असणे फार गरजेचे व महत्वाचे आहे, कारण मरण कधी येणार हे आपण सांगू शकत नाही. वरील बोधकथेत सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात चांगले गुण अंगिकारले पाहिजेत. आज आपल्या समाजात, परिसरात अनेक लोक कोरोनामुळे पिडीत आहेत, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक तसेच आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती खालावलेली आहे अशा लोकांना आपण आपल्या परीने मदत करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या समाजात अत्याचार, अन्याय, अशांती पसरलेली आहे हे सर्व दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत व अशाप्रकारे प्रभू येशूच्या पुन्हा येण्याची तयारी आपण केली पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपले प्रेषितकार्य करताना सातत्याने परमेश्वराचा अनुभव यावा व हा अनुभव त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातून इतरांना द्यावयास प्रयत्नशील राहण्यास त्यांस परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. आपण सर्वांनी आपल्या जीवनात सतत जागृत राहून म्हणजेच प्रभू येशूची शिकवण आपल्या कृतीत उतरवून प्रभू येशूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खी, आजारी व बेरोजगार आहेत, विशेषतः जे कोरोना सारख्या भयानक रोगाने पिडीत आहेत अशा लोकांस मदतीचा हात देण्यास तयार असण्यास आणि अशाप्रकारे परमेश्वराच्या येण्यासाठी तयारी करण्यास परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे संशोधक कोरोनावर लस शोधत आहेत त्यांना वेळीच परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे व ह्या कोरोना महामारीतून सर्व लोकांचा बचाव व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.