Thursday 31 October 2019


Reflection for the Homily of 31st SUNDAY IN ORDINARY TIME (03-11-2019) By Fr. Minin wadker.




                           सामान्य काळातील एकतिसावा रविवार




दिनांक: ०३/११/२०१९
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२.
दुसरे वाचन: थेस्सलोनिकाकरांस दुसरे पत्र १:११-२:२.
शुभवर्तमान: लूक १९:१-१०.

प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील एकतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशुला स्विकारून जीवनात आमुलाग्र बदल घडून आणण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात देव हा साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे व तो त्याची चांगल्याप्रकारे निगा राखतो ह्याची आपणास कल्पना येते. दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलोनिकाकरांस प्रार्थनेचे आश्वासन देऊन सांगतो कि, ‘तुम्ही देवाच्या पाचारणाला प्रामाणिक असा व देवाची महिमा सदैव गात रहा; परमेश्वर तुम्हांवर कृपादृष्टीचा वर्षाव करील.तर संत लुकलिखित शुभवर्तमानामध्ये येशू जक्कय नावाच्या जकातदाराला त्याच्या पापांची क्षमा करतो आणि त्याचे व त्याच्या कुटुंबाचे तारण करतो.
येशूच्या आगमनाने जक्कयच्या जीवनात परिवर्तन घडून आले व त्याच्या जीवनाचे सार्थक झाले. आपणसुद्धा जक्कयप्रमाणे येशूला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊया आणि चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहूया. ह्यासाठी लागणारी कृपा व शक्ती ह्या पवित्र मिसाबलीदानात सहभागी होत असताना मागुया. 

सम्यक विवरण
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२

          शलमोनाचा ज्ञानग्रंथ या पुस्तकाचा लेखक सांगतो कि, देव साऱ्या सृष्टीवर प्रेम करतो. तो निर्माता असून तो साऱ्या सृष्टीची काळजी घेतो. देव कोणत्याच गोष्टींचा तिरस्कार करीत नाही कारण तो सर्व सृष्टीची चांगल्या प्रकारे देखरेख करतो. तो सर्वशक्तिमान आहे, त्याची सृष्टीवरील दया व प्रेम अपार आहे. लेखक शेवटी सांगतो कि, ‘देव मनुष्याला त्याच्या पापांची क्षमा करितो व नवे जीवन जगण्यास प्रेरित करतो.
दुसरे वाचन: थेस्सलोनिकांकरांस दुसरे पत्र १:११-२:२
          संत पौल आपल्या पत्राद्वारे धर्म-परिवर्तन केलेल्या लोकांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. संत पौल त्यांस ख्रिस्ती जीवन व विश्वासामध्ये दृढ होण्यास प्रेरणा देतो, जेणेकरून देवाची महिमा प्रगट होईल. येशूची येण्याची दुसरी वेळ जवळ आलेली आहे आणि लोक आळशी जीवन जगत आहे म्हणून पौल थेस्सलोनिकाकरांस विश्वासात घेवून सांगतो कि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. तुमचे पाचारण देवाला मान्य व्हावे म्हणून तुम्ही देवाची स्तुती व महिमा गात राहा.

शुभवर्तमान: लूक १९:१-१०

          लुकलिखीत शुभवर्तमानामध्ये येशूच्या आगमनाने जक्कयचे झालेले हृदयपरिवर्तन व तारण ह्याविषयी ऐकावयास मिळते. रोमन साम्राज्यामध्ये जकातदार बळजबरीने आणि वाजवीपेक्षा अधिक कर वसूल करीत असे. ह्यामुळे सामान्य व्यक्तीला भरपूर त्रास सहन करावा लागे. लेखक सांगतो कि जक्कय मुख्य जकातदार होता. तो इतर कर वसूलदारांपेक्षा जास्त कर वसूल करीत असे.
जक्कय श्रीमंत होता; संपत्तीमुळे तो देवापासून दुरावला होता. जेव्हा येशू जेरीकोला जात होता, तेव्हा जक्कय येशूला पाहण्यासाठी व्याकूळ झाला होता. जक्कय उंचीने कमी असल्यामुळे तो झाडावर चढला आणि येशूला पाहू लागला. जक्क्यचे वर्णन खालील मुद्यावरून स्पष्ट होते.
१. जक्कयची सामाजिक स्थिती
          जक्कय यहुदी होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. अशी मोठी सामाजिक स्थिती असूनही त्याला समाजामध्ये पापी म्हणून संबोधले जात होते. मुख्य जकातदार व श्रीमंत असूनही इतर यहुदी त्याला तुच्छ मानत होते. त्याला समाजामध्ये आदर नव्हता. त्याच्याकडे पुरेसा पैसा होता परंतु त्याचे पाप व भोग यापासून तारण झाले नव्हते. धन व श्रीमंती असूनही तो पैशाच्या व्यवहारामध्ये नीतिमान नव्हता.
२. जक्कय मार्गाच्या शोधात
          जक्कयची मनःस्थिती अत्यंत निराशेने भरलेली होती. त्याला येशूला पहावयाचे होते. परंतु लोकांच्या गर्दीमुळे त्याला येशूला पाहता आले नाही. जक्कयने येशूला पाहण्याचा ठाम निःश्चय केला. म्हणून तो येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला.
३. जक्कयचे तारण
          येशू जक्कयला म्हणाला, ‘जक्कय त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने येशूचे आगत-स्वागत केले. जक्कयने क्षणाचाही विलंब न करता, येशूला आपल्या घरात आणले आणि स्वत:च्या जीवनाचे तारण करून घेतले. लोकांनी केलेली कुरकुर कानी न घेता, जक्कयने निर्धारपणे स्वत:च्या जीवनाला एक नवी दिशा दिली. जक्कय येशूला म्हणाला, ‘मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.हे पाहून येशू जक्क्यला सांगतो की, ‘आज तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे तारण झालेले आहे.
बोधकथा: “Amazing Grace” (आश्चर्यकारक कृपा)
  
          जॉन न्यूटन हा  गुलामांचा व्यापारी होता. १७४८ मध्ये अफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून घेऊन जात असता उत्तर अटलांटिक महासागरात वादळ निर्माण झाले. जहाजात अचानक पाणी शिरू लागले; त्या जहाजातील लोकांनी पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली; परंतु सर्वकाही निष्फळ ठरत होते. हे सर्वकाही चालले पाहूनन्यूटन त्याचा जीव मुठीत आणून ओरडला, “हे परमेश्वरा द्या करा”. आणि काय चमत्कार महासागरातील वादळ काही वेळानंतर शांत झाले आणि त्याच्या सहकाऱ्यांना जहाजात शिरलेले पाणी काढण्यात यश आले. अशाप्रकारे दोन आठवड्यानंतर त्यांचे जहाज सागरकिनारी लागले.ह्या सर्व कृत्याचा आढावा घेत असता, त्याच्या लक्षात आले कि, तो चमत्कारिकरित्या बचावला होता आणि ह्याचा कर्ता-करवीता दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द परमेश्वरच आहे. हि जाणीव झाल्यावर त्याने बायबल वाचन सुरु केले. त्याच्यात परिवर्तन झाले परंतु त्याने त्याक्षणी गुलामांचा व्यापार करणे सोडले नाही, तर आणखी सात वर्षे त्याने तो कारभार चालूठेवला. ह्या वर्षांत त्याने गुलामांना माणुसकीच्या नात्याने वागणूक दिली.  नंतर जॉर्ज व्हाईटफिल्ड आणि जॉन वेस्ली ह्यांच्या संपर्कात राहून त्याने ख्रिस्ती धर्माचा सखोल अभ्यास केला आणि १७६४ साली त्याने अँग्लीकन धर्मगुरू पदाची दिक्षा घेतली. १७७२ मध्ये त्याने जगभर प्रसिद्ध आणि नावाजलेलं भक्तीगीत लिहिलं, “Amazing Grace”(आश्चर्यकारक कृपा).
       ज्याप्रमाणे जक्कयचे ह्र्दयपरिवर्तन झाल्यावर त्याने ख्रिस्ताला स्वीकारले अगदी त्याचप्रकारे जॉन न्यूटन ह्याच्या जीवनातही घडले. 

मनन चिंतन

            देव पापी मनुष्याच्या शोधात येतो व त्याचे तो तारण करतो. बायबलमध्ये जुन्याकरारापासून ते नव्याकरारापर्यंत देवाने वेगवेगळे संदेष्ट्ये मानवाच्या शोधात पाठवले. सर्वात शेवटी देवाने स्वत:च्या पुत्राला भूतलावर मनुष्याच्या तारणासाठी व पापमुक्तीसाठी पाठविले. ह्याला कारण एकच ते म्हणजे देवाचे अपार प्रेम’.
            संत आगुस्तीन म्हणतात, ‘ज्या देवाने तुझ्या परवानगी शिवाय तुझी निर्मिती केलेली आहे, तो देव, तुझ्या सहकार्याशिवाय तुला वाचवू शकणार नाही.याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याला  स्वत:च्या तारणासाठी देवाच्या सानिध्याची नितांत गरज असते. त्याने स्वत:ला विसरून देवाला अंगिकारले पाहिजे. कारण देव प्रेमाळू आहे. तो आपल्याला कधीच सोडणार नाही. म्हणूनच शलमोनाच्या ज्ञानग्रंथात देवाला अखंड सृष्टीची काळजी आहेअसे सांगितले आहे.
             संत पौल सांगतात की आपण देवाची स्तुती गायला पाहिजे. कारण आपले पाचारण हे देवाचे दान आहे. आपल्या पाचारणास देवाची गरज आहे.  प्रत्येक संताला भूतकाळ असतो, तर प्रत्येक पापी मनुष्याला भविष्यकाळ असतोअसे म्हणतात. जक्कयचे जीवन पाप व भोगाने व्यापून गेलेले होते. फक्त पैसा त्याच्या नजरेस येत होता. इतर लोकांच्या नजरेसमोर तो पापी होता. त्याला बहुतेक वेळा अपमानास तोंड द्यावे लागे. अशा परिस्थितीला कंटाळून त्याला तारण प्राप्ती करून घ्यायची होती. येशू बद्दल त्याने ऐकले होते म्हणून त्याला पाहण्यासाठी तो झाडावर चढला आणि प्रत्यक्षात येशूने जक्कयच्या घरी जाऊन त्याचे तारण केले.
               आपल्या ख्रिस्ती जीवनात बहुतेकवेळा आपण सुद्धा धन-दौलत, मान-सन्मान, फसवा-फसवी ह्यांच्या आहारी गेलेलो आहोत. जक्कयप्रमाणे आपल्या जीवनाचे तारण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण येशूला स्विकारले पाहिजे. फक्त येशूच आपले तारण करू शकतो. म्हणून ह्या  मिस्साबलीत येशूने आपल्या ह्या ह्दयरुपी घरात यावे आणि आपले तारण करावे अशी प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:  हे प्रभू येशू, आमचे तारण कर.   
           
१. आपले पोप फ्रान्सिसमहागुरुस्वामीधर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी सर्व लोकांना प्रभूजवळ येण्यास प्रोत्साहीत करावे व त्यांच्या दैनंदिन आचरणातून ख्रिस्ती राहणीमानाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक जीवघेण्या आजाराने ग्रासलेले आहेतत्यांना प्रभूच्या प्रेमाचा व आरोग्याचा स्पर्श व्हावा. हे आजार त्यांना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य लाभावे व परत एकदा त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी भारत देशाची सेवा करीत असताना त्यांनी अहंकार, धन-दौलत, मान-सन्मान ह्यांच्या आहारी न जाता, प्रामाणिकपणे देशाच्या उन्नतीसाठी व भरभराटीसाठी सदैव झटावे म्हणून प्रार्थना करूया. 
४. आज ख्रिस्ती लोकांना खूनबलात्कारछळवणूक व पिळवणूक असे बरेच अत्याचार सहन करावे लागत आहेत तसेच ख्रिस्ती समाजाविरुद्ध बॉम्बस्फोट व दंगली घडवून आणल्या जात आहेत. परमेश्वर कृपेने ते सर्व थांबावे व सर्वत्र प्रेम व शांती निर्माण व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. जे संपत्ती, धनदौलत ह्यांच्या मोहामुळे देवापासून दुरावलेले आहेत, देवाची जागा त्यांच्या ह्या द्रव्याने घेतली आहे अशांना परमेश्वराची महती कळावी व त्यांनी परमेश्वराकडे साधर्म परतावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Thursday 24 October 2019



Reflections for the homily for 30th  Sunday in Ordinary Time (27-10-2019) by Fr. Wilson Gaikwad. 







सामान्य काळातील तिसावा रविवार


दिनांक:  २७-१०-२०१९
पहिले वाचन: बेनसिरा ३५:१२-१४ 
दुसरे वाचन: २ तीमथी ४:६-८८,१६-१८
शुभवर्तमान: लुक १८:९-१४ 

प्रस्तावना:

        आजच्या उपासनेतील तिन्ही वाचनावर आपण जर नजर टाकली तर आपणास नम्र प्रार्थना, अनांथाची प्रार्थना देवाला अधिक प्रसन्न करते याची अनुभूती येते.
          पहिल्या वाचनात बेनसिरा आम्हांस सांगतो प्रार्थनेला कृतीची जोड हवी आहे. प्रार्थनेचे आणि आपल्या दैनंदिन जीवनाचे अतूट नाते आहे. प्रार्थनेचा ढंग वेगळा आणि वागणूक वेगळी असे कधी होऊ शकत नाही. म्हणून आपली प्रार्थना न्यायप्रविष्ट असली पाहिजे. कारण देव न्याय्य आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आम्हांला सुयुद्ध केल्यावर मिळणाऱ्या मुकुटा विषयी सांगत आहे. तो सांगतो “मी सुयुद्ध केले व धाव संपवली आहे व विश्वास राखीला आहे”.
          तसेच आजच्या शुभवर्तमानात आम्हांला दोन व्यक्तीचे उदाहरण देऊन परुशी व जकातदार यांच्या प्रार्थनेचे स्वरूप नमूद केले आहे. परुशी देवापुढे त्याच्या सत्कार्याचा, मी पणाचा, दांभिगतेचा पाढा देवाला  वाचून दाखवत होता ह्यालाच तो प्रार्थना समजत होता. पण जकातदार त्याच्या अंतकरणातील तळमळतेची, नम्रतेची, काकळूतीची व पश्यातापी अंतकरणाची प्रार्थना करत होता. देवापुढे त्यानी ताट मान केली नाही देवाकडे आपल्या दुष्कृत्याबद्दल तो दूर उभाराहुन क्षमा मागत होता. खरेच देवाला नम्रतेची प्रार्थना आवडते. कारण “धनवानांची दुनिया आहे, गरीबाचा भगवान”.
          या पवित्र मिस्सामध्ये सहभागी होत असतांना, आपण सुद्धा जकातदारा सारखे नम्र होऊया व म्हणूया “देवा मला क्षमा करी आलो पापी तुझ्या दारी, तुझी अनंत करूणा  दयेने ऐक प्रार्थना”.  

साम्यक विवरण

पहिले वाचन: बेनसिरा ३५:१२-१४  

          आजतागायत या जगामध्ये पैसा, वैभव, उच्चपद याचंच  साम्राज्य पसरलेलं आहे. त्यामुळे न्याय व  प्रामाणिकपणाला जास्त जागाच उरलेली नाही. दिवसेंदिवस मनुष्य, स्वच्छंदी, स्वकेंद्रीत बनतो आहे. परंतु ईश्वर माणसाच्या श्रीमंतीला, उन्नतीला अधिक महत्व देत नाही तर विनम्रता, दया, लीनतेच्या व दायिकपणाच्या प्रार्थनेला अधिक महत्व देतो. म्हणूनच बेनसिरा लिनता नम्रता, दया व प्रामाणिकपणा या प्रार्थनेच्या पैलू विषयी बोध करतो आहे. 

दुसरे वाचन: २ तीमथी ४:६-८८,१६-१८

          दुसऱ्या वाचनात संत पौल जानिवपूर्वक सांगतो की त्याचा अंत जवळ आला आहे. तरीही मरण किंवा शत्रुत्व त्याला भयभीत करू शकत नाही. आणि तो कधीच निराश झाला नाही त्याने सदोदित देवाला धन्यवाद दिला त्याचा अटळ विश्वास होता. तसेच त्याला ठाऊक होते. ख्रिस्तात जरी तो मरण पावला तरी ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठणार आहे, व सार्वकालीक जीवन त्याला प्राप्त होणार आहे. स्वर्गीय मुकुटाचा तो भागीदार होणार आहे. कारण ख्रिस्ती जनांस मरण हि शोकांतिका नाही तर परिपूर्ण जीवन आहे.

शुभवर्तमान: लुक १८:९-१४ 

          शुभवर्तमानात आपण बघतो की परुशी व जकातदार दोघेही मंदिरात प्रार्थना करत आहे. पण ह्यांच्या प्रार्थनेत फरक होता, विसंगती होती. ती अशी की, परुशी स्वत:च्या महत्कृत्याबद्दल वाहवा करत होता. त्याच्या चांगल्या कामाची जणू पावतीच तो देत होता, आपली गर्विष्ठ प्रवृत्ती सादर करत होता. या उलट जकातदार नम्रतेने आपल्या दुष्कृत्याविषयी परमेश्वराकडे दयेची भिक मांगत होता.    

मनन चिंतन:

          बंधूभगिनीनो ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी माणूस वेगवेगळ्या उपयोजना आखत असतो. कारण त्याची मनोमनी इच्छा असते की देवाने माझे गाऱ्हाणे ऐकावे, मला सदैव आनंदी ठेवावे, वैभव प्राप्त व्हावे. म्हणूनच तो आपल्या परीने प्रयत्न शील असतो. कधी कधी तर देवाशी सैदेबाजी देखील करतो. लाच देण्याचा, आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतो पैसा व संपतीच्या जोरावर देवाला विकत घेऊ पाहतो व आपलसं करू पाहतो. मग त्याला वाटते की मी देवाला विकत घेतले आहे, व देव माझ्या खिशात आहे. पण म्हणतात ना “मनी नाही भाव, देवा मला पाव” परंतु “अरे वेडया माणसा देव बाजाराचा भाजीपाला नाही”. तो सर्वोच्च, सर्वसमर्थ व श्रेष्ठ आहे, प्रेमाचा अथांग सागर आहे. त्यानेच सर्वकाही निर्माण केले आहे. “हि सृष्टी सारी तुझीच किमया, विश्व निर्मिले परमपित्या”. किंबहुना जो पैसा, संपती आपण मिळवितो हे सर्व साध्य करण्यासाठी देवानेच आम्हांला ज्ञान, बुद्धी, व शरीर बहाल केले आहे म्हणूनच सर्व मानवजात हि देवाची कृती आहे, आपण सर्वजण देवाची प्रतिमा आहोत. म्हणून देवाला पैसा आडका, गर्व, अहंमपणा, वरवरचा विश्वास मान्य नाही. तर नम्रता, लिनता, प्रामाणिकपणा हवा आहे. तरच देव आपल्याला पावणार. त्यास भाव भक्ती हवी आहे. देवास रिक्तपनाची प्रार्थना आवडते. म्हणून प्रथम स्वत:ला जगीक गोष्टी पासून रिक्त, रिकामे केले पाहिजे.
          एकदा एक मनुष्य भगवान बुद्धाकडे आला, त्याच्या हातात फुले होती. आपल्याकडे येताना पाहून भगवान बुद्ध त्याला म्हणाले हातातील फुले खाली टाक. तो भांबावला, गडबडला, क्षणात विचार केला भगवान बुद्ध असे का सांगतात! मग त्याने त्याच्या फक्त डाव्याहातातील फुले खाली टाकली. कारण त्याला वाटले की डावा हात अशुभ आहे. पण भगवान बुद्ध त्याला पुन्हा म्हणाले की दुसऱ्या हातातली फुले सुद्धा खाली  टाक. मग त्या माणसाने दोन्ही हातातली फुले खाली टाकून दिली. नंतर भगवान बुद्ध त्याला म्हणतात, तुझ्यातील अहंमपणा, गर्व, श्रीमंती हे पण खाली टाकून मगच माझ्या समीप ये. खरच देवाकडे जाण्यासाठी काहीही लागत नाही. फक्त आपले निर्मळ हृदय, शुद्ध मन, अंतरिक भाव व श्रद्धा ह्याची नितांत गरज आहे. कसलेच मानसिक ओझे न घेता नितळ मनाने जावे लागते. तेव्हाच देव आमचे ऐकतो, आम्हांला स्वीकारतो व पावतो.  
          आजच्या परुशी व जकातदार ह्याच्या दाखल्यात आपण पाहतो की, परुशी त्याच्या सन्मानाचे, कार्याचे, अहंमपणाचे ओझे आणून देवावर भार टाकून देवाला खूश करू पाहतो. जकातदार तर स्वत:ला पूर्णपणे रिक्त करून देवाच्या चरणाशी येतो. दुरुनच देवाकडे मनोभावे प्रार्थना करतो व ईश्वर त्याची प्रार्थना स्विकारतो. चलातर आपल्या जिवनातील परुशाला बाहेर काढूया व जाकातदारा सारखे नम्रतेचे जिवन स्विकारुया व परमेश्वराला आपलेसे करूया त्याचा अनुग्रह घेऊया व म्हणूया “स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणुनी माझे.”  जययेशू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना एक”

१.    ख्रिस्त प्रेमाचा संदेश जगाला देण्यास झटणारे आपले पोप फ्रान्सीस कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनींवर परमेश्वराचा वरदहस्त असावा व ह्या प्रेमाचा अनुभव अधिकाधिक लोकांना यावा म्हणून लागणारी कृपा शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.    आज संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी अशांतता पसरली आहे ह्या अशांततेचे कारण समजून घेऊन त्याजागी शांती प्रस्तापित करण्यास राजकीय व धर्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.    नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोकांची घरे व निवारा उद्वस्थ झालेली आहेत ह्या सर्व लोकांना परमेश्वराचा आश्रय मिळावा व त्यांचे निवास पुन्हा उभे करण्यास अनेक मदतीचे हाथ पुढे यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    आज शिक्षण हि मानवाची मुलभूत गरज निर्माण झाली आहे. ज्यांना शिक्षांना पासून वंचित रहावे लागत आहे अशा सर्वांना चांगले शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्यांनी समाजातील वाईट गोष्टींचा समूळ नाश करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.  आपण प्रत्येकाने परुशासारखे स्वत:च्या महत्कृत्याबद्दल वाहवा न करता आपली गर्विष्ठ प्रवृत्ती सादर न करता जकातदारा प्रमाणे  नम्रतेने आपल्या दुष्कृत्याविषयी परमेश्वराकडे दयेची याचना करावयास आपणाला कृपा व सामर्थ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.    आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडूया.     



Wednesday 16 October 2019


Reflection for the Homily of Mission Sunday (20-10-2019) By Fr. Michael Fernandes.

                                                                





मिशन रविवार




दिनांक: २०/१०/२०१९
वाचन: निर्गम १७:८-१३ 
दुसरे वाचन: २ तिमथी  ३:१४-४:२
शुभवर्तमान: लूक १८: १-८

प्रस्तावना:

     आज देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहे. सर्व साधारणपणे मिशनह्या शब्दाचा अर्थ पाठवलेलाआपल्या स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्तसभा आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्ता पसरविण्यासाठी पाठवत असली तरी मिशन कार्य सर्वात प्रथम घरात सुरु करायला सांगत आहे. Charity begins at home.
मिशन रविवार साजरा करणे म्हणजे नेमके काय करणे? मिशन रविवार साजरा करणे म्हणजे केवळ प्रार्थना करणे (to pray), आज्ञाधारकपणे (obey) जे काही ख्रिस्तसभा सांगेल ते ऐकणे आणि दान पेटीत (to pay) पैसे टाकण्यापर्यंत मर्यादित नाही तर आपल्याला मिळालेल्या स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्त जगात प्रकट करणे होय. ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असता खरे मिशनरी बनण्यास देवाची कृपा मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: निर्गम १७:८-१३

निर्गम पुस्तकातून घेतलेल्या वाचनात मोशे यहोशवाला आपल्यातले काही पुरुष निवडून आमालेकाशी युद्ध करण्यास सांगतो. जोपर्यंत मोशे टेकडीच्या माथ्यावर देवाची काठी घेऊन उभा राहतो तोपर्यंत यहोशवा पराक्रमी होतो. पण मोशेचा जेव्हा हात खाली होत असे तेव्हा आमलेकाची सरशी होई.
     पहिल्या वाचनांत जोपर्यंत मोशे हातात देवाची काठी पकडतो, तेव्हा इस्रायल सरशी होत असतात. ती मोशेची काठी नसून देवाची काठी होती. यहोशवा व मोशे हे आमालेकाच्या विरुद्ध युद्ध जिंकलेले नसून देवच ते युद्ध जिंकत असतो.

दुसरे वाचन: २तिमथी  ३:१४-४:२    

संत पौल आपला शिष्य तीमथी ह्याला तो बालपणापासून जे काही शिकलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तारणासाठी सज्ज होण्यास सांगत आहे. विशेषकरून पवित्र शास्राचा सद्बोध घेऊन नीतिशिक्षणाकरिता देवाचे भक्त व चांगल्या कामासाठी सज्ज होण्यास त्यास संत पौल सांगत आहे.

शुभवर्तमान: लूक १८: १-८

लूकच्या शुभवर्तमानात आपल्याला अत्याग्रही विधवाव जुलमी न्यायाधीशाचा दाखला देण्यात आलेला आहे. अत्याग्रही विधवा सातत्याने न्याय मिळविण्यासाठी न्यायाधीशाकडे जात असते. तेव्हा जुलमी न्यायाधीश म्हणतो, ‘मी देवाला भीत नाही किंवा माणसांना जुमानीत नाही तरी ह्या विधवेचा त्रास मला सहन होत नाही आणि तिला न्याय मिळवून देतो’. अत्याग्रही विधवेचा आणि जुलमी न्यायाधीशाचा संवाद ऐकून येशू आपल्याला एक विशिष्ट बोध देत आहे, तो म्हणतो, ‘अन्यायी न्यायाधीश जर असा वागत असेल, तर आपला स्वर्गीय पिता जे त्याच्याकडे रात्रं-दिवस धावा करतील त्यांना न्याय देणार नाही काय?’
मनुष्य मनुष्याला चांगला न्याय देऊ शकत नसला तरी , खऱ्याचे खोटे करून आणि खोट्याचे खरे करून अनेक खटले जिंकल्याचे आपण ऐकतो परंतु देवाचा न्याय रास्त आणि सत्याशी एकनिष्ठ आहे. खऱ्या-खोट्याचा खेळ तेथे खेळला जात नाही.
     येशूच्या काळात स्रीला दुय्यम स्थान दिले जात असे; आणि विधवेची तर अवहेलना केली जात असे. तिला समाजात स्थान आणि मान नसताना ती एखाद्या पुरुष्याच्या घरी परत परत गेली तर ती एक घृणास्पद गोष्ट मानली जात असे. परंतु ती अत्याग्रही विधवा आपल्याला दाद आणि न्याय मिळेपर्यंत त्या जुलमी न्यायाधीशाकडे जात असे. म्हणून प्रार्थना करताना खचून न जाता सातत्याने आणि सदा सर्वदा आपण प्रार्थना करावी हाच ह्या दाखल्याचा विशेष मुद्दा आपणास पटवून देण्यात आला आहे.

मनन चिंतन:

          येशू ख्रिस्ताचा प्रकाश अनुभवून तोच दिव्य आणि पवित्र प्रकाश जे अंधकारात आहेत त्यांना त्या दिव्य प्रकाशात आणणे व ख्रिस्ताची ओळख करून देणे तीच व्यक्ती खरी मिशनरी. एक मिशनरी जो देवाची उपस्थिती आपल्या हृदयात व जीवनात अनुभवल्या नंतर तीच तो दुसऱ्यांना आपल्या पित्याची साक्ष नेहमी अनुभवली त्या द्वारे त्याने तारण कार्य व देवाचे राज्य पसरविण्यांस एक मोठा मिशनरी झाला. ख्रिस्तामध्ये असलेली देवाची उपस्थिती सर्व लोकांमध्ये दिसावी म्हणून मिशनरी कार्य करत असतो. मिशनरी ख्रिस्तमय जीवन जगून लोकांमध्ये अर्थपूर्ण नातेसंबंध जोडतो, देवाच्या पवित्र मनात आणि हृदयात उभे करत असतो.
          मिशनरी दया व प्रेम ह्याद्वारे आपल्या भोवती असलेल्या लोकांवर व समाजावर ख्रिस्ताचा प्रकाश पसरवत असतो. देवाच्या पवित्र शब्दाद्वारे मिशनरी  समाजात देवा विषयी प्रीती निर्माण करतो. समाजात असलेली अनिश्चितता, अहंकार, भीती, विश्वासाचा अभाव व कमजोरी मिशनरी ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे तो दूर करून प्रेमाने साम्राज्य निर्माण करतो. मिशनरी ख्रिस्ताच्या अनुभवाद्वारे भिती व चिंता दूर करून लोकांना ख्रिस्ताजवळ आणतो.
          मिशनरी हे सर्व करताना तो स्वतःला विसरत असतो. तो लोकांची सेवा करण्यात मग्न असतो. देवाचे राज्य व त्या राज्यात लोकांनी कसे राहावे ह्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. देवाशी लोकांचा पवित्र शब्दाद्वारे समेट व एकी कशी निर्माण करावी ह्यासाठी मिशनरी येशू सारखे जीवन जगत असतो. मिशनरी येशू प्रमाणे त्याग करून लोकांना आपल्या जीवनाचे घटक बनवतो. तो लोकांप्रमाणे साध व गरीबीचे जीवन जगून त्यांची येशूवर श्रद्धा व विश्वास वाढविण्यासाठी मदत करतो. मिशनरी अहोरात्र लोकांबरोबर राहून त्यांचे दुःख व समस्या आपल्या  स्वतःवर घेत असतो. मिशनरी आपल्या जीवनाद्वारे खिस्ताला जाहीर  पणे प्रकट करत असतो. तो स्वतःचा विचार करत नाही पण लोकांमध्ये आनंद व शांती, त्यांना देव कसा अनुभवता येईल, तारणमय जीवन कसे जगता येईल त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो.
          उदाहरण: आमचे Capuchin Italian मिशनरी केनिया इथे अनेक वर्षापासून ख्रिस्ताची सुवार्ता पसरवत आहेत. जंगलात, दऱ्या-खोऱ्यात व डोंगरावर राहणाऱ्या लोकांना ख्रिस्ताची ओळख करून देत आहेत. घरापासून इतक्या दूरच्या देशात येऊन फक्त ख्रिस्ताला हृदयात घेऊन आलेले मिशनरी लोकांसाठी मरण पावले. असेच एक Capuchin मिशनरी एका जंगलात राहून लोकांची सेवा करत होते. त्यांना अस्थमाचा आजार होता व त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असे. एक दिवशी गावात लोकांना भेटत असताना त्यांना शेळीचे दुध पिण्यास दिले व दुसऱ्या दिवशी त्यांचा अस्तमा बरा झाला. काही लोकांनी पैसे  गोळा करून त्यांच्यासाठी दोन शेळ्या विकत घेतल्या. दररोज  शेळीचे दुध प्याल्यानंतर त्यांना बरे वाटायचे.
          एक दिवस एक गरीब व्यक्ती दूरच्या गावातून फादरना भेटण्यास येते. त्या व्यक्तीला पैश्याची गरज होती करण त्याची बायको आजारी व तीन मुलांना खाण्यास अन्न नव्हते. त्या व्यक्तीने फादरना शेळ्या देण्यास विनंती केली. फादरनी कसलाही विचार न करता त्या दोन शेळ्या त्या व्यक्तीला दान म्हणून दिल्या. दुसऱ्या दिवसा पासून त्यांना पुन्हा अस्तामाचा त्रास होवू लागला. अनेक दिवस ते आजारी होते. गावात लोकांना भेटण्यास येत नाही म्हणून लोक त्यांना भेटण्यासाठी जात. फादर मृत्यू पावले होते. गरिबासाठी आपले जीवन अर्पूण ख्रिस्तासारखे बलिदान केले.
          मिशनरी सर्वावर प्रीती करून ख्रिस्त अजून जिवंत आहे असे दर्शवितो. शेजारी कोण? मिशनरी सर्वाना ख्रिस्ताचे प्रेम देऊन जे अंधारात आहेत त्यांना प्रकाश देणे. शेजारी जो देवाच्या प्रेमासाठी भुकेला, तान्ह्लेला असतो तो शेजारी. ज्यांना  नाव आणि चेहरा नाही करण तो गरीब आहे त्याला ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे माणूस म्हणून स्विकारले जाते.
          मिशनरी एकमेकांत व समाजात प्रीतीचे पूल बांधत असतात. हे प्रीतीचे व विश्वासाचे पूल देवाच्या शब्दावर उभारलेले असतात. ख्रिस्ताच्या कृपेद्वारे मिशनरी समाजात जी फुट पडलेली असते. ती ख्रिस्त स्पर्शाद्वारे भरून काढतो. ज्या भेदाच्या  उभारल्या आहेत. त्या तोडून एक कुटुंब व समाज देवाच्या उपस्थितीत निर्माण करतो. फक्त प्रेम प्रसरविणे समाजात हे ध्येय मिशनरी आपल्या मनात ठेवून येशू ख्रिस्ताचे नाव व शुभवर्तमान तो पसरवित असतो. ह्या ख्रिस्त प्रीतीला सीमा, जात पात नाही.
          मिशन रविवार देवाची शुभवार्ता लोकांना देण्यासाठी प्रथम ख्रिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्विकारावा लागेल. येशूच्या शिकवणी नुसार आपले मानवी व आध्यात्मिक जीवन हे समाजात व देऊळमातेत जे गरीब व गरजू आहेत त्यांना देवाची प्रीतीत व श्रद्धेत आणावे.  येशू ख्रिस्ताने समाजात एकमेकांशी प्रेमाचे संबंध जोडण्यास पूर्णपणे वचनबद्ध राहिला व सर्वांना देवाच्या राज्यांची गोडी लावली.
          प्रत्येक मिशनरी हाच ख्रिस्ताचा बोध, शिकवण व संदेश घेऊन लोकांमध्ये जातो. मिशनरी आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रगट करतो. स्वातामध्ये असलेला जिवंत ख्रिस्त तो शुभवर्तमानाद्वारे लोकांना देत असतो. प्रत्येकाचे कार्य व मिशन एकच, ते म्हणजे सर्व लोकांमध्ये ख्रिस्ताचा चेहरा ओळखावा व त्यांची सेवा करावी. प्रत्येक ख्रिस्ती हा मिशनरी आहे. जो सेवा करण्यासाठी आपल्या मनात व हृदयात असलेली भीती व अनिश्चितता टाकून लोकांमध्ये ख्रिस्ताचा चेहरा पाहतो. सेवा करत असलेल्या लोकांना ख्रिस्ताच्या प्रीतीत परिवर्तन करावे व ख्रिस्ताचे अस्तित्व व ओळख घेण्यासाठी त्यांना शुभवर्तमान शिकवतो. ख्रिस्त हा खरा देवाचा पुत्र जो शब्द होऊन देह झाला, आम्हामध्ये राहिला, आपल्या जीवनाचा तो खरा मार्ग, सत्य व जीवन झाला.
          मिशन रविवारी एक प्रेमाचे, सेवेचे बंधन व संबंध निर्माण करण्यास येशूची शिकवण लोकापेर्यत पोहचविण्यास आमंत्रण देत आहे. असा समाज व देऊळ माता निर्माण करावी की जेथे ख्रिस्ताच्या शब्दाला मान व सन्मान मिळेल. देवाची कृपा व आशीर्वाद सर्वांना उपलब्ध आहेत जर ख्रिस्ताला जीवनाचा राजा व भाकर स्वीकारली  तर येशू जिवंत भाकर एकमेकांची सेवा व आधार देण्यास आपल्या जागामध्ये पाठवत असतो. आज जागात गरज आहे. ती सलोखा व बंधू भावाचे संबंध निर्माण करण्याची. देवाच्या सुवर्तेद्वारे ख्रिस्त आपल्यात व दुसऱ्यामध्ये हजर असतो व परीवर्तन करून एक सुंदर व निर्मळ जगण्यास कृपा देतो अशी शिकवण प्रत्येक ख्रिस्ती जानांनी द्यावी.    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना.’

१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी स्वत:ला मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता पसरविण्यास धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता नैतिकता व सत्यता ह्यांनी प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते बनावेत म्हणून प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.