Friday 29 September 2017

Reflection for the Homily of 26h Sunday in Ordinary Time  
(01-10-2017)  By Lipton Patil. 



सामान्य काळातील सव्विसावा रविवार


दिनांक: ०१-१०-२०१७
पहिले वाचन: यहेज्केल १८:२५-२८
दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र २:१-११
शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२





प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास आज्ञाधारकपणा ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल सांगतो की, जर पापी लोकांनी दुष्कृत्ये सोडून सात्विकतेचे जीवन जगले तर त्यांचे तारण होईल व सात्विक लोकांनी सात्विकता सोडून दुष्कृत्ये करू लागले तर त्यांचा नाश होईल. आजच्या दुस-या वाचनात संत पौल फिलिप्पिकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये सांगतो की सर्वांनी एकमेकांवर प्रेम करून एकदिलाने व एकमनाने रहावे आणि ख्रिस्तासारखे जीवन जगावे. तसेच आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त दोन मुलांच्याबोधकथेद्वारे आज्ञाधारकपणाचा संदेश आपणाला देत आहे.
जर आपण देवाच्या आज्ञेचे पालन केले नसेल तर पश्चातापी अंतकरणाने त्याची क्षमा मागूया व त्याच्या आज्ञेप्रमाणे चालण्यास त्याची कृपा व शक्ती लाभावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यहेज्केल १८: २५-२८

     बाबिलोन देशांत बंदिवासात असलेल्या इस्त्राएल लोकांना मुक्त करण्यासाठी देवाने यहेज्केलची निवड केली. यिर्मयाप्रमाणे यहेज्केलही संदेष्टा होता जो लोकांना विश्वासाने देवाचे वचन सांगत असे. देवाची सुवार्ता लोकापर्यत पोहवचण्याचे काम करत असे. यहेज्केल लोकांना चागले जीवन कसे जगायचे याबद्दल उपदेश करतो. जेणेकरून ही लोक चांगले जीवन जगून देवाकडे वळू शकतात.

दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र  २:१-११

फिलिप्पिकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये संत पौल सांगतो की एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे उदाहरण सदोदित मनी बाळगावे.

शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२

ह्या येशूच्या दाखल्याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. शास्त्री व परुशी ह्यांनी  देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्याचे सांगुन त्या पाळल्याच नाहीत. दुसरीकडे आपण पाहतो की जकातदार व वेश्या लोकांनी त्यांनी देवाच्या आज्ञा न सांगता पाळल्या.
हा दाखला कोणाचीच स्तुती करण्यासाठी वापरलेला नाही तर तो फक्त दोन प्रकारच्या अर्धवट किंवा अपूर्ण असणा-या लोकांची प्रतिमा दर्शविण्यासाठी आपल्यासमोर ठेवण्यात आला आहे. ह्याचा अर्थ असा की एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ नाही. दाखल्यामधील एकही मुलगा वडिलांना आनंद देण्यासारखा नव्हता, दोघेपण असमाधानकारक होते; परंतू शेवटी ज्याने पश्चाताप करून वडिलांच्या आज्ञेचे पालन केले तो अनिश्चितपणे दुस-यापेक्षा चांगला होता.
ज्या मुलाने वडिलांच्या आज्ञेचे पालन कोणताच प्रश्न न विचारता किंवा त्याचा मान राखून केला असता तर तो परिपूर्ण किंवा उत्कृष्ट मुलगा म्हणून संबोधण्यात आले असते. परंतू दाखल्यातील सत्य आपल्याला वेगळीच परिस्थिती दाखवते. ही दाखल्यातील स्थिती ह्या जगात दोन प्रकारचे लोक असल्याचे आपल्याला सांगते. एक गट असा जो धार्मिक प्रकारचा दिसतो परंतू जेव्हा ती धार्मिकता आपल्या जीवनाद्वारे दाखविण्याची वेळ येते तेव्हा हे त्या धर्मिकतेमध्ये मागे पडतात आणि दुसरा गट जो धार्मिक नसूनदेखील काही अनपेक्षित क्षणाला धार्मिक असल्याचे आपल्याला दिसून येते. कृतीची जागा कोणीही दिलेले वचन कधीच घेऊ शकत नाही असे हा दाखला स्पष्ट करतो. बोललेले चांगले शब्द कोणत्याही केलेल्या चांगल्या कृत्यांची जागा घेऊ शकत नाही. ख्रिस्ती जीवन हे शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात घडणा-या कृतीला जास्त प्राधान्य देते.  

मनन चिंतन:

            आजच्या युगामध्ये आपणाला अनेक अश्या व्यक्ती भेटतात की ज्या आपणाला वचन देतात परंतू त्यांचे पालन करीत नाही. अनेक प्रेमाच्या गोष्टीमध्ये अशाप्रकारचे वचन तोडण्याचे वातावरण ऐकायला भेटते. तसेच निवडणुकीच्या अगोदर सर्व पक्षांचे उमेदवार लोकांना अनेक प्रकारची वचने देतात पण निवडणूक संपताच ते सर्व विसरून जातात. अशाप्रकारची माणसे आपणाला सर्व क्षेत्रांत दिसतात. हे लोक दुस-यांना मदत करण्याऐवजी स्वतःचेच खिशे भरतात. ते फक्त स्वतःच्याच भल्यासाठी जगतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने अशा लोकांविषयीची तुलना, “एका माणसाचे दोन मुलगेह्या बोधकथेद्वारे केली आहे.
ह्या बोधकथेत दोन प्रकारच्या व्यक्ती प्रस्तूत केल्या आहेत. ह्या दृष्टांतामध्ये दोघा मुलांची मनोवृत्ती चांगली नव्हती परंतू जो धाकटा मुलगा असतो त्याला नंतर कळून चुकले की त्याने वडीलांच्या आज्ञेचा भंग केलेला आहे म्हणून तो पश्चाताप करतो आणि वडीलांची आज्ञा पाळतो.
इथे प्रभू येशू यहूदी लोक व जकातदार ह्यामध्ये असलेली तुलना दर्शवली आहे. यहूदी लोकांनी ईश्वराच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून ते देवाच्या शिक्षेस पात्र ठरले आहेत परंतू जे पापी लोक होते त्यांनी त्यांच्या जीवनाचा कायापालट करून देवाच्या शिक्षेस मुकले आहेत. म्हणून आपण इतरांच्या वाईट कृत्यांकडे लक्ष न देता ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालावे आणि हाच मार्ग आहे सु:खदायी जीवन जगण्याचा.
जर आपण सत्याच्या म्हणजेच देवाच्या मार्गावर आहोत तर आपण दुस-यांचे ऐकू नये कारण ज्याप्रकारे चांगले शब्द आपणाला प्रेरणा देतात त्याचप्रमाणे वाईट शब्द व विचार आपला आत्मविश्वास कमजोर करतात. म्हणून आपण काय ऐकायचे व काय नाही ह्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणूनच असे म्हणतात: ऐकावे जनांचे पण करावे मनाचे”.
अनेकदा आपण देवालाच दोषी ठरवतो. जीवनामध्ये घडणा-या सर्व वाईट गोष्टी देवामुळेच घडतात असा आपला विचार असतो. पण आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल सांगतो की देवाचा न्याय सर्वांसाठी समान आहे. प्रत्येकाच्या दुष्कृत्यामुळे त्यांचा नाश होतो व सत्कृत्यामुळे तारण होते. म्हणून आपण पापमय जीवनाचा त्याग करून धार्मिकतेच्या मार्गावर चालले पाहिजे. अनेकदा आपण वाईट गोष्टी, विचार व कृत्ये सोडण्यास तयार होत नाही. कधी-कधी दुष्कृत्य सोडण्यास आपण जास्त वेळ लावतो तर कधी प्रयत्नच करीत नाही. आणि मग असा प्रसंग आपल्यासमोर उभा राहतो की आपल्याला बदलण्याची इच्छा असते परंतू वेळ मात्र निघून गेली असते.
जर आपण देवाची आज्ञा पाळून धार्मिकतेच्या मार्गावर चाललो तरच समाज्यामध्ये ऐकता, प्रेम, बंधूभाव, सेवा, नम्रता व लीनता दिसून येणार. दुस-या वाचनात संत पौल सांगतो की आपली जी मनोवृत्ती आहे ती ख्रिस्तासारखी असली पाहिजे. ख्रिस्तासारखे आपण देखील लीन झालो पाहिजे. कारण येशू ख्रिस्त हा ईश्वर असूनही आपणामध्ये जन्म घेऊन दासाचे रूप धारण केले व शेवटी क्रुसावर मरून आपणाला पापमुक्त केले.
जगामध्ये जे पहिले पाप आदाम व ऐवा ह्यांच्याकडून घडले ते म्हणजे आज्ञाभंग होय. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून पापांचे दुष्परिणाम त्यांच्या जीवनात एकामागोमाग एक यायला लागले. आजच्या युगामध्ये देखील आज्ञाभंग होताना दिसून येते. प्रत्येक कुटुंबात, समाजात व देशात होणा-या लढाई, मारहाणी, भेदभाव ह्या सर्वांचे मूळ कारण आज्ञाभंग होय.
म्हणून आजच्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना येशूख्रिस्ताचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेवून जीवनामध्ये विनम्रता, लीनता, सेवाभाव, क्षमा, प्रेम व त्यागाची वाट निवडून ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया व ईश्वराचे प्रेम दुस-यापर्यंत पोहचवून आपले जीवन धन्य करावे म्हणून प्रार्थना करूया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना..

प्रतिसाद: प्रभो, आमची प्रार्थना ऐक.  

  १. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांनी स्वतः सत्याच्या मार्गावर चालून इतरांना सत्याच्या मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
 २. सर्व ख्रिस्ती भाविकांनी स्वार्थाचे जीवन सोडून इतरांच्या अडचणीत त्यांना हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
 ३.  सर्व युवक-युवती व लहान मुलांनी त्यांच्या आईवडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागावे व जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात करून वाईट गोष्टी टाळाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.    आपण सर्वांनी येशू ख्रिस्तासारखे सेवाभावी आणि विनम्र जीवन जगावे व देवाने दिलेल्या सर्व देणग्यांचा योग्य वापर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.   थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करूया.   
           
  



Thursday 21 September 2017

Reflection for the Homily of 25th Sunday in Ordinary Time  
(24-09-2017)  By Godfrey Patil. 







सामान्य काळातील पंचविसावा रविवार




दिनांक: २४/०९/२०१७
पहिले वाचन: यशया ५५:६-९
दुसरे वाचन: फिलीपीकरांस १:२०-२४,२७
शुभवर्तमान: मत्तय २०: १-१६






प्रस्तावना :

     आज देऊळमाता सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला स्वर्गराज्य मिळविण्यासाठी दैवी उदारता व दानशूरता अंगी बाळगण्यास आमंत्रण देत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला देवाची कल्पना तुमची कल्पना नव्हेत, त्याचे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत ह्या विषयी साक्ष देत आहे. तर आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणाला स्वर्गराज्यासाठी व देवासाठी संपूर्ण आयुष्य बहाल करण्यास आव्हान देत आहे. तसेच आजच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानात प्रभू येशूख्रिस्त दाखल्याद्वारे देवाच्या उदारपणाचे व दानशूरतेचे विवेचन केलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्यात स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर न करण्याचा इशारा ख्रिस्त देत आहे.
     आज मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपणाला देवाच्या उदारपणाचे, त्याच्या प्रेमाचे व क्षमेचे दान मिळावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन : यशया ५५:६-९

     आजच्या पहिल्या वाचनात प्रेरक गणला जाणारा देवाचा संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे देव सर्वांसाठी त्याच्याजवळ येण्याचा मार्ग मोकळा करत आहे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास प्रोस्ताहन देत असून, पापी लोकांस पाप सोडून नितीमत्व अंगी बाळगण्यास तसेच स्वत:च्या कल्पना सोडून देवाचे विचार व कल्पना सिद्धीस नेण्यास जणू प्रेरणादायी उपदेश करत आहे. यशया संदेष्ट्याद्वारे देव सर्वाना स्वत:कडे बोलावत असून, देव म्हणतो की, “तुम्ही मजकडे या, मी क्षमाशील आहे; माझ्या विचारांना, माझ्या कल्पनांना तुमच्या जिवनात स्थान द्या, माझ्या मार्गावर चाला, म्हणजे स्वर्गराज्यात तुमचा समावेश केला जाईल.” येथे आपणास देवाची उदारता दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी खुद्ध देव यशया संदेष्ट्याद्वारे तारणदायी संदेश आजच्या पहिल्या वाचनात देत आहे.  

दुसरे वाचन : फिलीपीकरांस १:२०-२४,२७

     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिपीकरांस ख्रिस्ताला पांघरण्याचा, ख्रिस्तामध्ये जीवन जगून खुद्ध ख्रिस्त बनण्याचा इशारा देत आहे. ख्रिस्ताची सुवार्ता अंगी धारण करून जगणे किवा मरणे हे केवळ ख्रिस्तासाठीच असले पाहिजे, व शेवटी जगताना ख्रिस्तासमवेत जगावे तर मरताना ख्रिस्त इतरांना देणे ह्या दोन बाबींचे अतिशय उत्कृष्टपणे वर्णन केलेले आपणाला दिसून येते. आपल्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा हा नक्कीच होतो. परंतू, आपल्या चांगल्या कार्याने मरणानंतर देखील त्याचा गौरव होऊ शकतो म्हणून संत पौल आवर्जून सांगतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.

शुभवर्तमान : मत्तय २०:१-१६

     मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्त एका दाखल्याद्वारे स्वर्गराज्याचे भागीदार होण्यास आमंत्रण देत आहे, तसेच नीतिमान व पापी ह्यांच्यातील भेदाची तफावत नष्ट करित आहे. देव कधीच भेदभाव करीत नाही. सर्वाना तो समानतेने वागवतो. अशाप्रकारे प्रेमाच्या व क्षमेच्या उदारतेने व दानशूरतेने देव आपणा प्रत्येकास स्वर्गराज्याचे हक्कदार होण्यास पात्र ठरवत आहे. शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना न करता, स्वतःला श्रेष्ठ न समजता, दुसऱ्याच्या कमीपणात स्वतःचे योगदान देऊन समाजात जणू समानता प्रस्थापित करण्याचा संदेश ख्रिस्त आपणास देत आहे. अशाप्रकारे उदारता, दानशूरता व समानता ह्या तत्वाच्या माध्यमातून ख्रिस्त आपणास स्वर्गराज्यासाठी झटण्यास आव्हान देत आहे.    

बोध-कथा :

     श्रीमंत घराण्यातील एक देखणी बाई धर्मगुरूकडे येते आणि म्हणते की माझ्याकडे खूप संपत्ती व पैसा आहे. सर्व काही जे मला हवं आहे त्याची काहीच कमतरता नाही, परंतू, कुठेतरी मानसिक सुखाची उणीव मला भासत आहे, कुठेतरी मला माझे हे जीवन असमाधानी वाटत आहे. तिचे हे सर्व बोलणे ऐकून धर्मगुरूंनी चर्चमध्ये काम करणाऱ्या बाईला बोलावले व तिच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचे कथन करावयास सांगितले. ती म्हणाली की दोन वर्षा अगोदर माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला व लगेच त्याच्या तीन महिन्यानंतर माझा मुलगा अपघातात मरण पावला. त्या क्षणा पासून मी हसणे विसरली होती व माझ्या जीवनात जणू दुःखाची मालिकाच सुरु झाली होती. खूप वेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. एके दिवशी मी घरात काम करत असता एक छोटस मांजरीचं पिल्लू आवाज करत घरात शिरलं, त्याच्या आवाजावरून मला जाणवल की हे पिल्लू खूप भुकेलेल आहे. मी स्वयपाक घरात गेली व थोडस दुध त्या मांजरीच्या पिल्लाला दिले. दुध पिऊन झाल्या नंतर त्या पिल्लाने हळूवारपणे माझ्या पायाला स्पर्श करायला सुरवात करून मला जणू स्मित हास्स दिले. मग मी त्या पिल्लाला माझ्या वेंगेत  घेऊन त्याच्याशी जणू खेळायला लागली त्या क्षणाला मला कळून चुकल की मी कुठेतरी माझ दुख विसरत चालली आहे. मी विचार करायला लागली की मी दिलेल्या त्या एक प्याला दुधाने मला खरंच आनंद झाला. तेव्हा पासून मी विचार केला की माझ्याकडे जे काही आहे ते मी इतरांना देईन व मी ते करायला सुरवात केली. मी गरजवंताना मदतीचा हात पुढे केला, आजाऱ्यानां भेटी द्यायला सुरवात केली. आज मला असं वाटते की माझ्या जीवनात सुरु झालेली ती दुख:ची मालिका संपलेली आहे, मला तर असं वाटते की माझ्या इतका आनंदी ह्या जगात कोणीच नसेल. हे सर्व ऐकून त्या श्रीमंत बाईचे डोळे पाण्याने भरून आले व तिने आपली संपत्ती गरिबांना दान करण्याचे ठरवले.

मनन-चिंतन :

ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत,
ज्यांचे स्वर जुळूनी आले त्यांनी दोन गाणी द्यावीत,
ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे,
शेवटी उदारपणात आपले सर्वस्व ख्रिस्ताप्रमाणे दुसऱ्यास द्यावे.

       दानशूरता व उदारता आपणा प्रत्येकाच्या अंगी धारण करण्यास ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. शुभवर्तमानातील दाखल्याद्वारे ख्रिस्त सर्वाना समानतेने वागवून जणू स्वर्गराज्यातील समानतेची व दैवी उदारपणाची प्रचिती प्रतिबिंबित करीत आहे. पहाटेस आलेल्या मजुरास एक रुपया व अकराव्या तासास आलेल्या मजुरास देखील एकच रुपया, असा त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला. मानवी दृष्ट्या हा अन्याय झालेले दिसतो, पण खरं पाहता हा अन्याय मुळीच नाही. कारण मालकाच्या व मजुराच्या ठरावानुसार योग्य तेच पहिल्यास व शेवटच्यास मिळाले. ठराव करून मालकाने मजुरी जर का कमी दिली असती तर अन्याय झाला असता पण ठरवल्याप्रमाणे योग्य तिच मजुरी मालकाने दिली. शेवटच्याला पहिल्या इतकेच देणे हे मालकाच्या दानशूरतेचे लक्षण आहे.
येशू ख्रिस्ताच्या काळात एक दिवस जर का मजुराला काम मिळाले नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब उपाशी राहत असे व ज्याला सकाळीच काम मिळत असे तो आनंदीत होत असे ख्रिस्ताला कामगाराच्या हाल अपेष्टा व उदारनिर्वाहाची पुरेपूर जाणीव होती म्हणून त्याच परिस्थितीला साजेसा असा दाखला ख्रिस्त कथन करतो. ह्या दाखल्यात ख्रिस्ताच्या नजरेत उशिरा येणारे कामगार म्हणजे पापिलोक जे देवशब्द ऐकतात व पश्चाताप करतात आणि सकाळी आलेले कामगार म्हणजे शास्त्री व परुशी जे पाप्यांना कमी लेखतात, जे स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांबरोबर आपल्या श्रेष्ठत्वाची तुलना करतात.
      देव उशिरा आलेल्या कामगारावर समानतेने प्रेम करतो व त्यांना क्षमा करुन स्वर्ग-राज्यात स्थान प्रधान करतो. दोन हजार वर्षा पूर्वी कथन केलेला हा दाखला आज सुद्धा आपल्या प्रत्येकाशी व समाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निगडीत आहे. आज समाजात नजर टाकली तर दिसून येईल की  माणूस उदारता हे ख्रिस्ती तत्व विसरून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नाती-गोती तर विसरतोच पण त्याच बरोबर कोर्टाची पायरीसुद्धा चढतो. का? कारण आज माणूस फक्त ‘मी आणि माझे’ ह्याच गोष्टीचा विचार करतो व ह्या स्वार्थी वृत्तीमुळे भाऊ भावाला, तर माणूस माणुसकी विसरत चालला आहे. माणसाने स्वार्थीपणाला आलिंगन देऊन उदारता, प्रेम, क्षमा व समानता सारख्या ख्रिस्ती मूल्यांना विसरत चालला आहे. म्हणून देऊळमाता आपणा प्रत्येकाला आजच्या उपासनेद्वारे ख्रिस्ताच्या उदारपणाची आठवण करून देत आहे व स्वर्गराज्याचे भागीदारी होण्यास पाचारण करीत आहे. मग तो आपल्या जिवनातील सुरवातीचा तास असु दे कि शेवटचा. स्वर्गाचे राज्य आपण मिळवू शकतो. गरज आहे ती फक्त देवाच्या मळ्यात निस्वार्थीपणे काम करण्याची व सर्वाना समानतेने वागवण्याची.
      शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्यात तुलनात्मक बाबीचे वर्णन केलेले आपणास दिसून येते. दाखल्यात नमुद केल्याप्रमाणे, जेव्हा मालक कामगारांस समानतेने वागवतो व समान मोबदला देतो तेव्हा पहाटेस आलेले कामगार मालका विरुद्ध कुरकुर करायला लागतात व स्वतःची दुसऱ्या बरोबर तुलना करून स्वतःला श्रेष्ठ समजतात व जणू शास्त्री व परुशाप्रमाणे स्वतःच्या पुण्यत्वाची तुलना इतर पापी लोकांबरोबर करतात. कधीकधी आपण सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कमी लेखतो, जेव्हा जेव्हा आपण इतरांना कमी लेखतो तेव्हा तेव्हा आपण शास्त्री व परुशी प्रमाणे स्वार्थात गुंततो. त्याच स्वार्थातून बाहेर पडण्यास आपली देऊळमाता आपणा प्रत्येकाला आजच्या उपासनेद्वारे बोलावत आहे.    
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आज आपण आपल्या पवित्र ख्रिस्तसभेसाठी विशेष प्रार्थना करूया. आपले पोप, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभागिनी व धर्मबंधू यांना प्रभुची सुवार्ता पसरविण्यासाठी भरपूर असा आशिर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
 ३. हे प्रभू परमेश्वरा, जी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीत, त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझ्या कृपेने त्यांचे मनपरिवर्तन व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करतो; ह्या आपत्तीतून बाहेर येऊन नवीन जीवन सुरु करण्यास तू त्यांना मदत कर तसेच नव्याने जीवन जगण्यास त्यांना भरगोस अशी मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.     

Thursday 14 September 2017

Reflection for the Homily of 24th Sunday in Ordinary Time  (17-09-2017)  By Isidore Patil. 






सामान्य काळातील चोविसावा रविवार


दिनांक: १७-०९-२०१७
पहिले वाचन: बेनसिराक २७:३०-२८:
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:-
शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५





"प्रभू ऐकमेकांना क्षमा करण्यास बोलावीत आहे"


प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वराच्या अमर्यादित प्रेमाचा व क्षमेचा अनुभव घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात ऐकमेकांना क्षमा करण्यास बोलावीत आहे
बेनसिरा यांची बोधवचने शेजाऱ्याविषयी कुभावना, संताप व द्वेष ह्यांच्यातून होणारे दुष्परिणाम व्यक्त करतात. म्हणून देवाची कृपा व क्षमा मिळविण्यासाठी हे सर्व सोडून क्षमाशिल होण्यास सांगत आहे. संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की येशू, मरण व पुनरुत्थानाद्वारे मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू आहे.’ मत्तयलिखित शुभवर्तमानात कृतघ्न चाकराच्या दृष्टांताद्वारेप्रभू येशू आपणा सर्वाना देवाच्या अपार क्षमाशिलतेचा अनुभव घेऊन जीवनात क्षमा व दया अंगीकारण्यास बोलावीत आहे.            देव प्रेमळ आहे. देवाची दया व क्षमा अनुभवण्यासाठी आपल्याला संताप, कुभावना, द्वेष सोडून देण्याची फार गरज आहे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र ख्रिस्त यागात सहभागी होत असताना मागूया.

पहिले वाचन: बेनसिराक २७: ३३-२८:

बेनसिरा आपल्याला सांगतो की जो मनुष्य शेजाऱ्यावर क्रोध, कुभावना, राग  व्यक्त करतो तो पापांस बळी पडतो. जो मनुष्य आपल्या शेजाऱ्यावर द्या, क्षमा व प्रेम  दाखवतो त्याच्यावर देव सुध्दा नेहमी संतुष्ट असतो. परमेश्वर हा दयाळू आहे. तो नेहमी विश्वासू लोकांवर द्या दाखवतो. देवाची क्षमा व प्रेम अनुभवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तींनी आपला स्वभाव शांत ठेऊन आपल्या शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने व अंतकरणाने प्रेम केले पाहिजे.  

दुसरे वाचन: रोमकरास पत्र: १४: -

संत पौल सांगतो की आपण बाप्तिस्माद्वारे येशूच्या मरण व पुनरुत्थानात सहभागी झालेलो आहोत. आपण जिवंत किंवा मेलेले असलो तरी आपण येशूचे झालेलो आहोत. आपण सर्वांनी प्रभूसाठी जगले पाहिजे. प्रभू येशु एकदाच मेला व तो आता युगानयुगे जिवंत आहे. प्रभू येशू हा सर्व विश्वासू लोकांचा प्रभू आहे; मग ते मेलेले असोत किंवा जिंवत असोत.

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५

सात वेळा पापक्षमा करून मी फारच उदारपणा दाखवीत आहे असे पेत्राला वाटले. जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” येशूच्या ह्या उत्तराने पेत्राला मोठा धक्काच बसला. येशू पेत्राला देवाच्या अमर्यादित क्षमेचा अर्थ समजून देण्यासाठी कृतघ्न चाकराचा दृष्टांतत्याच्यापुढे ठेवतो. शुभवर्तमान सांगते की एक नोकराला आपल्या राजाला कर्ज द्यायचे होते. कर्ज परतफेड न करता आल्यामुळे राजाने त्याच्यावर दया दाखवून त्याचे सर्व कर्ज माफ केले. त्यानंतर त्या कर्जदाराला त्याचा एक सोबती भेटला ज्याने त्याचे शंभर रुपये घेतले होते. त्या व्यक्तीने विनवणी करून सुद्धा त्याला माफी मिळाली नाही. उलट त्याने त्याला तुरुंगात टाकले. राजाने दाखविलेल्या क्षमेची त्याला आठवण झाली नाही. नंतर जेव्हा राजाला माहिती पडले तेव्हा त्याने त्या क्रूर दासाला शिक्षा केली व कर्ज फेडीपर्यत त्याने तुरुंगात ठेवले. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले सर्व दाखले स्वर्गाची वाट दाखवतात. देवाचे राज्य हे क्षमेचे व प्रेमाचे आहे. म्हणून देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आपण ऐकमेकांना क्षमा केली पाहिजे जेणेकरून देव आपल्याला क्षमा करेल.

बोधकथा:

     संपत्ती आणि जमीन ह्यांच्या वाटपावरून दोन श्रीमंत ख्रिस्ती भावामध्ये वैर व सुडाची भावना वाढीस लागली. लहान भावाच्या घराशेजारी सुंदर फुलबाग होती. एक दिवस मोठ्या भावाच्या मुलीने त्या बागेमधील फुले तोडण्यास बागेत शिरली. हे पाहुन तिच्या मागे ऐकाने आपला कुत्रा सोडला. त्या कुत्र्याने तिला चावले व ती रक्तबंबाळ झाली आणि तिथेच गतप्राण झाली. मोठा भाऊ काहीच तक्रार करु शकला नाही, कारण चुकी त्याच्या मुलीची होती. परंतू, तो बदला घेण्याची संधी पाहू लागला. दोन्ही भावांनी पाऊस पडल्यावर शेकडो एकर जमिनीत बियाणं पेरलं. पावसाने मध्येच दांडी मारल्याने रुजलेले बियाण फुकट गेलं. मोठ्या भावाकडे पुन्हा पेरण्यासाठी भरपूर बियाणं होते. परंतू, छोट्या भावाकडे मात्र काहीच शिल्लक नव्हते. छोट्या भावाला बियाणं उसने घेण्याकरीता तोंड नव्हते. दोघे भाऊ एकमेकांचे मरणशत्रू झाले होते. माझ्या भावाचे बियाणं नसल्यामुळे काही लाखांचे नुकसान होणार ह्यापेक्षा मोठा सूड कोणता असू शकतो असे मोठ्या भावाला वाटले. परंतू, ह्या त्याच्या हट्टी स्वभावामुळे मोठ्या भावाला रात्रीची झोप येत नव्हती आणि जेवणही गोड लागत नव्हते. मध्यरात्रीपर्यंत झोप न आल्यामुळे त्याने लाईट लावली तर त्याची नजर भिंतीवरील क्रुसावर गेली. तेथे लिहिलेले शब्द त्याच्या हृदयात शिरले, ते शब्द असे होते, क्षमा सात वेळा नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी” व “हे पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहित नाही.” अशी वाक्ये वाचून तो सर्व राग व सूड विसरला. आपल्या दोन नोकरांना त्याने उठवले. बियाणांची वीस मोठी पोती भरलेली घेऊन तो आपल्या भावाच्या घराजवळ गेला. दार उघडताच जोराने त्याने भावाला मिठी मारली व म्हणाला, ‘क्रूसावरील ख्रिस्ताने मला तुला क्षमा करायला पाठवले आहे व तुझ्या शंभर एकर शेतजमिनीत पेरण्याकरिता मी वीस पोती बियाणं घेऊन आलो आहे’. ती समेटाची व समंजसपणाची कृती पाहून अपराधी भावाने गहिवरलेल्या शब्दांमध्ये माफी मागितली आणि भावाचे आभार मानले.

मनन चिंतन:

     दैनंदिन जीवनात ऐकमेकांना क्षमा करणेखूप कठीण आहे. पण खरोखर जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहायचे असेल तर आपण शेजाऱ्याविषयीची कुभावना, संतापद्वेष बाजूला सारून त्यांना खऱ्या अंतकरणाने क्षमा करायला पाहिजे. परंतू, किती वेळा आपण ऐकमेकांना क्षमा करावी? जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” ह्याचा अर्थ म्हणजे आपली क्षमा अमर्यादित असली पाहिजे. हे कृतीत आणणे खूप कठीण आहे. पण जर आपण देवाच्या आज्ञेनुसार वागलो तर आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडून येऊ शकतो. जीवनात कित्येकवेळा आपण पाप करतो. पापांची कबुली करून देवाकडे क्षमेची व दयेची याचना करतो, असे असूनही आपण पाप करणे बंद करत नाही. राग, द्वेष, संताप इत्यादी वाईट गुणामुळे आपले देवावर असलेले नाते तुटून जाते. म्हणून देवाची कृपा व क्षमा मिळविण्यासाठी हे सर्व सोडून क्षमाशिल होण्यास बेनसिरा सांगत आहेयेशूने लोकांवर मरेपर्यंत प्रीती केली. “हे बापा त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही (लुक २३:३४).” परंतू, येशूच्या प्रीतीचे फळ त्याला केवळ मरणच प्राप्त झाले. तसेच संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की येशू मरण व पुनरुत्थानाद्वारे मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू आहे.’ जेव्हा पेत्राने येशूला विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी किती वेळा क्षमा करावी?” येशू त्याला सांगतो, “क्षमा सात वेळाच नव्हे तर साताच्या सत्तर वेळा करावी.” प्रभू येशू आपणा सर्वाना देवाच्या अपार क्षमाशिलतेचा अनुभव घेऊन जीवनात क्षमा व दया अंगीकारण्यास बोलावीत आहे. आपण दररोज प्रार्थना करतो. परंतू, प्रार्थनेचे योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्या अंतकरणात राग, द्वेष व क्रोध असतो. आपण येशूने शिकविलेल्या प्रार्थनेत मोठ्या विश्वासाने बोलतो की, ‘जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.’ ह्याद्वारे आपण देवाला आपल्या पापांची क्षमा करण्यास विनंती करतो. जर आपण दुसऱ्यांना त्यांच्या पापांची क्षमा केली नाही तर देव सुद्धा आपल्याला आपल्या पापांची क्षमा करणार नाही. आपल्या जीवनात सुद्धा असे होऊ नये म्हणून आपण ऐकमेकांना क्षमा करून क्षमाशिलता अंगिकारली पाहिजे. कारण आजची उपासना आपल्याला क्षमा करण्याचा बोध देत आहे. ऐकमेकांना क्षमा करण्यासाठी आपल्याला देवाची कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐकून घे.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी व प्रांपचिक यांना ख्रिस्तमळ्यात काम करत असताना त्यांच्यावर देवाचा आशिर्वाद असावा तसेच त्यांनी देवाच्या दैवी क्षमेचा अनुभव लोकांपर्यत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या कुटुंबामध्ये शुल्लक गोष्टीवरून भांडणे, तंटे व वादविवाद निर्माण होतात व कुटुंबातील प्रार्थनामय जीवन व शांती नष्ट होते, अशा कुटुंबांना देवाच्या दयेचा व क्षमेचा स्पर्श व्हावा आणि त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन शांतीचे व क्षमेचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.  
३. आपल्या देशामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, स्त्रीयावर अत्याचार असे प्रकार वाढत आहेत. प्रत्येकाने इतरांच्या प्रतिष्ठेचे भान ठेवून चांगली वागणूक दाखवावी व कुणालाही कमी न लेखता त्यांचा आदर राखावा व राजकीय पुढाऱ्यांनी देशाची निस्वार्थी सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आजच्या तरूण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड दयावे लागत आहे. प्रसंगी ते निराश होत आहेत. या तरूण पिढीत असलेला उत्साह कायम टिकून राहावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.