Thursday 25 August 2016

Reflection for the Homily of Twenty Second Sunday in Ordinary Time (28-08-2016) By Alfred Rodrigues




सामान्यकाळातील बाविसावा रविवार

दिनांक: २८/०८/२०१६.
पहिले वाचन: बेनसिरा ३ : १९–२१, ३०–३१.
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२ : १८–१९, २२–२८.
शुभवर्तमान: लूक १४ : १,७–१४.




“जो स्वत:ला उंचावितो तो नमवला जाईल व जो नमवतो त्यास उंचावले जाईल”




प्रस्तावना

आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्यास नम्र बनण्यास आमंत्रित करीत आहे.
बेनसिराच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात येत आहे कि, परमेश्वर कितीही सामर्थ्यवान व महान असला तरीही तो नम्र लोकांचा पूज्यभाव स्वीकारतो व आपली रहस्ये विनयशील जनांस प्रकट करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इब्री लोकांस ऐहिक सिओन व स्वर्गींय सिओन ह्यामधील फरक स्पष्ट करून देत आहे. तर लुककृत शुभवर्तमानात ख्रिस्त नम्रता व आदरातिथ्याचा दाखला देऊन म्हणतो कि, ‘जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल’.
ह्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपण ख्रिस्ताकडे नम्रतेचे कृपादान मागूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: बेनसिरा ३: १९–२१, ३०–३१.

बेनसिरा ह्यांची बोधवचने हा ग्रंथ ‘एक्लेझीयास्तस’ या नावाने देखील ओळखला जातो. ह्यामध्ये परमेश्वर आपला प्रेमळ पिता ह्या नात्याने तो त्याच्या मुलांना नम्रपणे वागण्याचा सल्ला देत आहे. कारण तो आपला निर्माणकर्ता परमेश्वर आहे आणि म्हणून आपली जी काही प्रतिष्ठा, मानसन्मान व आदर आहे हे आपलं नसून परमेश्वराकडून मिळालेले दान आहे. म्हणूनच परमेश्वर सांगतो कि प्रतिष्ठीत व नामांकित पुष्कळ आहेत, परंतु तो आपली रहस्ये विनयशील जनांस प्रगट करितो.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२: १८–१९, २२–२८

इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राचा लेखक हा यहुदी धर्मातून ख्रिस्ती झाला होता. जो ह्या वाचनात आपल्यासमोर दोन दृश्य ठेवत आहे. १) परमेश्वराने इस्राएल लोकांबरोबर सिओन पर्वतावर केलेला करार म्हणजेच ‘ऐहिक सिओन’ किंवा जुना करार. २) स्वर्गीय जेरुशलेम म्हणजेच नवीन करार किंवा ‘स्वर्गीय सिओन’.
परमेश्वराने इस्राएल लोकांबरोबर केलेल्या जुन्या करारात इस्राएल लोकांत भय दडलेले होते. परंतु नवीन करारात परमेश्वराविषयी प्रेम समाविष्ट होते.

शुभवर्तमान: लूक १४ : १,७–१४.

शास्त्री व परुशांना भर बाजारात नमस्कार घेणे आवडत असे तसेच त्यांना प्रतिष्ठेने व मानाने दिलेल्या नमस्काराने ते भारावून जात. त्यांना सभागृहात मानाची आसने पटकावण्यासाठी आवडत असे. तसेच मेजवानीच्या प्रसंगी मुख्य बैठ्कांवर आरूढ होणे त्यांना आवडत असे. म्हणूनच ख्रिस्त आजच्या दाखल्यात सांगत आहे कि, कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिल्यास मुख्य आसनावर बसू नका तर अगदी खालच्या जागेवर जाऊन बसा.
या अध्यायातील सर्व प्रसंग भोजनाशी निगडीत आहेत. त्याकाळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचे भोजनावळ हे एक व्यासपीठ होते. भोजनाच्या निमित्ताने येशूने आध्यात्मीक आणि सामाजिक जीवनासबंधी महत्वाचे भाष्य केले. येशूला उपेक्षितांबद्दल विशेष प्रेम होते. समाजात श्रीमंत आणि कंगाल याच्यांत भेदभाव केला जातो, हि गोष्ट त्याला आवडली नाही. त्याने नेहमी सामाजिक समतेचा आग्रह धरला म्हणूनच हा दाखला सांगत असताना ख्रिस्त आपणास बोध देतो कि, ‘जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल’. ख्रिस्त स्वतः देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. (फ़िलिप्पैकरांस पत्र २: ६-८ ) ख्रिस्त आपणासाठी नम्रतेचा एक उत्तम आदर्श आहे. तो सांगतो कि, मी मनाचा सौम्य व लीन आहे. (मत्तय ११: २९ ) उपेक्षित, पिडीत, कंगाल, आंधळे – पांगळे ह्यांना त्या वेळी सामाजिक जीवनात स्थान नव्हते. त्यांची जागा तळागाळात होती. परंतु ते येशूचे, लाडके होते. अनेकदा गरजूंना मानासिकदृष्ट्या पांगळे करण्यासाठी देणग्या दिल्या जातात, अन्नछत्रे उघडली जातात. दुर्बलांवर अधिकार गाजवण्याचे हे एक साधन बनते. परंतु, येशुने, त्यालाही विरोध केला. ‘गोरगरीबांना जेवणावळी दया. असे येशूने सांगितले नाही, तर त्यांना आपल्याबरोबर एकाच मेजावर भोजन करण्यासाठी आमंत्रित करा’ असा आग्रह त्याने धरला.

सत्य घटना

पोप बेनेडिक्ट सोळावे ह्यांनी ज्यावेळी पोपपदाचा त्याग केला त्यावेळी सर्वांना नविन पोप कोण होईल ह्याचे वेध लागले होते. नवीन पोपेच्या निवडणुकीसाठी व्हॅॅटिकनमध्ये सर्व कार्डीनल्स जमले होते. तसेच बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव जमला होता. परंपरेनुसार नव्या पोपची निवड झाली. परंतु त्यानंतर काही वेगळाच प्रकार अनुभवयास आला. कारण, नियमानुसार नवनिर्वाचित पोप लोकांना दर्शन देण्यासाठी ४५ मिनिटाच्या आत वस्त्र परिधान करून बाहेर आले होते. परंतु पोप फ्रान्सिसने अधिक वेळ घेतला त्याचे कारण असे कि, त्यांना जे वस्त्र आणले होते ते त्यांना उच्च व महाग प्रतीचे वाटले, म्हणून त्यांनी एकदम हलक्या प्रतीचे मागवले, त्यामुळे पोपनी लोकांच्या दर्शनाला येण्यासाठी वेळ घेतला परंतु ह्या उदाहरणाद्वारे पोपमहाशयांनी नम्रपणे सेवा करण्याचा निर्धार केला.

मनन चिंतन:

     आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो ख्रिस्त एका शब्बाथ दिवशी परुश्यांतील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला होता. परंतु तो परुशी आहे किंवा तो आपला मित्र किंवा शत्रू आहे, म्हणून त्यास भोजनास जाण्यास नकार दिला नाही तर त्याने दिलेले आमंत्रण स्वीकारले. आपणही आपल्याला कोणत्याही कार्यक्रमाला बोलाविले असता आपण त्यांचा मान राखून उच्च-निच्च, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता आपण त्या आमंत्रणाचा नम्रतेने स्वीकार करावा व त्यांच्या आनंदात सहभागी व्हावे.   
शुभवर्तमानात उल्लेख केल्याप्रमाणे, मेजवानीच्या वेळी कदाचित येशूच्या निदर्शनास आले असेल की, कशाप्रकारे परुश्यांनी आमंत्रित केलेले पाहुणे मंडळी मुख्य आसने पटकावत होती. कदाचित थोड्या वेळाने काही त्यांच्यापेक्षा प्रतिष्ठित लोक आले असतील म्हणून घरधन्याने त्यांचा मान-सन्मान राखण्यासाठी मुख्य आसनांवर बसलेल्या लोकांना आपली आसने त्या प्रतिष्ठित लोकांना द्यावयाची विनंती केली असावी. ख्रिस्ताने त्यावेळी त्यांचा झालेला अवमान व गेलेली अब्रू पाहिली असेल. म्हणून ख्रिस्त आपणास ही वेळ न येऊ देण्यासाठी सल्ला देत आहे, तो म्हणजे नम्रतेचा.
     आजच्या ह्या युगात बहुतेक जण समाजात नावलौकिकता, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपडत आहेत. अनेक वेळेस आपल्या कानावर ‘मी मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे, मी अमेरिकेत एका नामांकित संस्थेत शिक्षण घेत आहे, मी लंडनला डॉक्टरचे शिक्षण घेत आहे. मी परीक्षेत प्रथम आलो, मी राजकीय नेत्याचा मुलगा आहे’ असे अनेक ‘मी-पणाचे’ व्यक्तव्य ऐकण्यास मिळतात, व समाजात काहीही न करता नाव व प्रतिष्ठा कमावण्याची एक प्रकारची सवय जडलेली असते. त्यांच्याविरुद्ध कोणी बोलल्यास त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटते व त्यांना राग येतो.  
     दुसऱ्या उताऱ्यात ख्रिस्त आपले लक्ष निमंत्रित केलेल्या लोकांवरून घरधन्यावर वळवतो. ख्रिस्त सांगतो की, ‘तुम्ही भोजनास निमंत्रण द्याल तेंव्हा ते आपल्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकाला न देता गरीब दुबळ्यांना दया. कारण त्यांच्याजवळ तुम्हाला परत देण्यास काहीच नाही’. परंतु हे ख्रिस्ताचे वचन आपल्यापैकी कित्येकांना मान्य होणार नाही. कारण आपण नेहमी आपली प्रतिष्ठा व मान-सन्मान मिळवण्यासाठी आपल्या स्वकीयांना आपलेसे करतो. आपण त्यांना बिलगून राहतो. त्यांच्याकडून मिळालेली भेट त्यांना परत मिळावी म्हणून आशा बाळगतो.
आज आपण ख्रिस्ताने दिलेल्या वचनावर मनन चिंतन करूया व त्यानुसार आचरण करण्याचा, नम्रतेचा धडा जोपासण्याचा प्रयत्न करूया.  
 
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.


१. अखिल ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप सर्व कार्डीनल्स बिशप, धर्मगुरू, आणि सर्व व्रतस्थ ह्यांनी आपल्या कार्याद्वारे व जीवनाद्वारे नम्रतेची शिकवण साऱ्या जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताने दिलेले नम्रतेचे उदाहरण आपण अंगीकारावे आणि ते आपल्या जीवनाद्वारे इतरांसमोर ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या समाजात असलेल्या गोर-गरिबांना आपल्याकडून योग्य ती मदत व्हावी व त्यांना समाजात आपल्या बरोबरीनं चालण्यासाठी मान प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशातील अन्याय व अत्याचाराचे वातावरण दूर व्हावे व सर्वांनी आपापल्यात असलेला भेदभाव विसरून आपल्या कुटुंबात, समाजात व देशात शांतीचे वातावरण प्रस्थापित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आज जगात सर्वत्र दहशतवाद फोफावत आहे; दहशतवाद्यांना देवाचा प्रेमळ स्पर्श व्हावा व त्यांनी त्याद्वारे आपल्या सैतानी वृत्तीचा त्याग करून शांतीचा मार्ग अवलंबवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Wednesday 17 August 2016

Reflection for the Homily of Twenty First Sunday in Ordinary Time (21-08-2016) By Xavier Patil





सामान्यकाळातील २१ वा रविवार

दिनांक: २१/०८/२०१६.
पहिले वाचन: यशया ६६ : १८ – २१
दुसरे वाचन: इब्री लोकास पत्र १३ : २२ – ३०
शुभावर्तमान: लुक १३ : २२ – ३०.

             

 "रुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा"





प्रस्तावना

आज देऊळमाता सामान्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणाला ‘ईश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा तारण प्राप्तीचा अरुंद मार्ग’ ह्याविषयी सांगत आहे.
आजच्या पाहिल्या वाचनात परमेश्वर, यशया संदेष्टा ह्याच्याद्वारे लोकांना सांगतो कि, सर्व राष्ट्रांतील लोकांना एकत्र करून त्यांनी माझे वैभव आणि महिमा पाहावा अशी वेळ आली आहे. दुसऱ्या वाचनात शिस्तीचे महत्व आपल्या तारणप्राप्तीसाठी किती मौल्यवान व महत्वाचे आहे हे सांगण्यात आले आहे. तर शुभवर्तमानात येशु ख्रिस्त आपणाला अरुंद प्रवेशद्वाराचा उपयोग करून स्वत:च्या  तारणप्राप्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करण्यास आवाहन करत आहे.
कळत-नकळत आपण देवाच्या मार्गावर न चालता इतर मार्गावर भटकत असतो म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात परमेश्वराच्या मार्गावर सदोदित चालण्यास कृपासामार्थ्य मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ६६ : १८–२१

वरील परिच्छेद / उतारा हा यशया संदेष्टा ह्याने जे इजीप्तचा राजा फारो ह्याच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन यरुशलेमेत परत आले होते त्या सर्वांचे सांत्वन किंवा समाधान करण्यासाठी लिहिलेला आहे. यरुशलेमेची दुर्दशा पाहून सर्वजण खिन्न, दु:खी झाले होते. यशया संदेष्टा त्या सर्वांना यरुशलेमच्या भविष्यकाळातील वैभव, प्रतिष्ठा आणि किर्ती ह्याविषयी प्रबोधन करत आहे. सर्व राष्ट्रे आदराने यरुशलेमकडे वळतील; कारण देवाने यरुशलेममधूनच त्यांची सुवार्ता व महिमा इतर राष्ट्रांमध्ये प्रकट करण्यासाठी लोकांची निवड केली आहे. त्या लोकांमधूनच काहीजण याजक व लेवी होतील, असे प्रभूने योजिले आहे.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र  १२: ५–७; ११–१३.

लेखक ह्या पत्राद्वारे सर्व ख्रिस्ती लोकांना संकटे, आपत्ती, दुर्भाग्य व दु:खांना धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे असे सांगत आहे. कारण ह्याद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांना सार्वकालिक जीवनासाठी सुसज्ज करत असतो. ही सर्व दु:खे, संकटे त्याच्या लोकांना वळण, शिस्त लावण्यासाठी देवानेच पाठविली आहेत. म्हणून संकटाला घाबरून न जाता त्याच्यावर मात करायला हवी. नाहीतर संकटे आपला देवावरील विश्वास कमी करतील व आपण तारणप्राप्तीच्या मार्गापासून वंचित राहू.

शुभवर्तमान: लुक १३: २२–३०.

आजच्या शुभवर्तमानातील ख्रिस्ताचा संदेश हा विशेषत: यहुदी लोकांस उद्देशून आहे, कारण यहुदी लोकांनी ख्रिस्ताची शिकवण ऐकली परंतु त्याप्रमाणे वागले नाहीत. म्हणून भविष्यकाळातील यहुद्यांच्या परिस्थितीतीबद्द्ल येशू त्यांना सांगत आहे.
किती लोकांचे तारण होणार? ह्या प्रश्नाचे उत्तर न देता, ख्रिस्त, ‘अनेक जनांना तारण प्राप्त होण्यास कठीण होईल कारण त्यांनी देवाच्या वचनांचे पालन केले नाही, म्हणून आता त्यांनी अरुंद दरवाज्याने देवाच्या राज्यामध्ये समावेश होण्यास प्रयत्न केला पाहिजे असे सांगत आहे. पुढे ख्रिस्त सांगतो की, “दरवाजा बंद झाला आहे” आणि जे देवाच्या राज्यास योग्य ठरले आहेत ते आधीच मध्ये शिरलेले आहेत म्हणून आता जे बाहेर उभे आहे ते त्यांच्या निष्काळजीपणामुळेच बाहेर आहेत. जणूकाही त्यांनी देवाचे आमंत्रण योग्य वेळी स्वीकारले नाही.
परमेश्वर त्यांना ओळखण्यास नाकारतो कारण त्यांनी तारणप्राप्तीसाठी अपात्रता दाखविली. त्यांनी येशूची सोबत किंवा संगत सोडून स्वार्थी जीवन जगले. पापमय जीवन जगुन त्यांनी स्वतः स्वर्गाचे द्वार त्यांच्यासाठी बंद करुन घेतले. स्वर्गाच्या राज्यात जे यहुदी नाहीत, अशा काही बाहेरील लोकांचा समावेश होईल आणि जे स्वतःला यहुदी मानत ते कदाचित स्वर्गाच्या बाहेर असतील. म्हणूनच शुभवर्तमानाचा शेवट “जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होतील” ह्या वाक्याने करण्यात आला आहे.

मनन चिंतन:

जगातील प्रत्येक व्यक्ती, मग ती मुस्लीम, हिंदू, ख्रिस्ती किंवा इतर कोणत्याही धर्माची असो; प्रत्येकजण कळत-नकळत स्वत:च्या तारण प्राप्तीसाठी अहोरात्र झटत असतात. तारण प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळे मार्ग निर्माण केले आहेत, कारण ‘कोणाचे तारण होईल’? हा प्रश्न आपणा प्रत्येकाला सतावत असतो.
     आजच्या शुभवर्तमानातदेखील असाच प्रश्न, एका व्यक्तीने येशूला विचारला. तो म्हणजे ‘तारण प्राप्त होत असलेले लोक थोडे आहे की काय?’ या प्रश्नाचे उत्तर आपणाला जुन्या करारामध्ये सापडते. यशया संदेष्टा म्हणतो की, ‘फक्त थोड्यांचेच तारण होईल’ (यशया १०:१९-२२). तसेच संदेष्टा आमोस सांगतो की, ‘फक्त १० टक्के लोकांचे तारण होईल (आमोस ५:३). कदाचित अशाच प्रकारचे उत्तर त्या व्यक्तीला येशुकडून अपेक्षित होते. पण येशूने त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. कारण येशूला ‘कोणाचे तारण होईल’? ह्यापेक्षा आपण कशाप्रकारे तारण प्राप्त करु शकतो ह्या मार्गाची ओळख देणे महत्वाचे होते. येशूच्या मते जे अहोरात्र तारणासाठी कष्ट करतात जे शारिरीक किंवा ऐहिक सुखाच्या मागे न लागता ईश्वराच्या दिशेने प्रवास करून नि:स्वार्थी जीवन जगत असतात त्यांचे तारण निश्चित आहे.
     पूर्वी असे मानले जायचे कि, फक्त इस्रायल लोकच देवाने निवडलेले लोक आहेत आणि फक्त त्यांचेच तारण होणार. पण आजच्या पहिल्या वाचनात आपणाला कळते कि, ‘सर्वजण तारण प्राप्तीसाठी योग्य आहेत’. पण प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे आहे. परमेश्वराने जरी इस्रायल लोकांनाच निवडले होते तरी तो सर्वांचा देव होता आणि सर्वांसाठी त्याची द्या व प्रेम हे सारखेच आहे.
मी ख्रिस्ती आहे, माझा बाप्तिस्मा झाला आहे, किंवा मी धार्मिक व्यक्ती आहे असे म्हणून आपले तारण मुळीच होणार नाही, तर रोजच्या जीवनात स्वत: पुरते न जगता, फक्त स्वत:च्याच पोटाचा विचार न करता, परोपकार, दानधर्म, ईश्वरभक्ती केल्याने तारण प्राप्त होऊ शकते. जीवनामध्ये जो जितके पुण्य करील, जितकी सत्कर्मे करील व ज्याप्रमाणात ईश्वरभक्ती करील, त्यावर स्वर्गातील उच्च पद अवलंबून असेल.
     देव सर्व मानवांची कृत्ये आणि विचार जाणतो. म्हणून कोणाचे तारण होईल आणि कोणाचे होणार नाही ह्याची चिंता करण्यापेक्षा मी स्वत:च्या जीवनाची पडताळणी करायला हवी. मनुष्य जितका नि:स्वार्थी असेल तितका तो ईश्वराच्या जवळ जातो. स्वार्थी माणसे कधीच सुखी होऊ शकत नाहीत. जे कोणाला फसवत नाहीत, जे बदनामी करत नाहीत, जे कोणाचा विश्वासघात करत नाहीत, खोटे बोलत नाही, चोरी करत नाहीत, चिडत नाहीत, दुसऱ्यांचा तिरस्कार करत नाही आणि जे दुसऱ्यांना दु:ख देत नाहीत अशा सर्व लोकांना परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश प्राप्त होतो.
     अनेक वेळा आपले विचार शास्री आणि परुशी ह्यांच्यासारखे असतात. ते स्वत:ला सज्जन, देवाने निवडलेले किंवा इतर सामान्य लोकांपेक्षा श्रेष्ठ समजतात. पण येशु त्यांची ही चुकीची कल्पना सुधारून सांगतो कि, “देवाच्या राज्यात जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले आहेत. कारण तारणप्राप्ती हि आपोआप भेटत नाही तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. फक्त येशुबरोबर खाऊन पिऊन आपण त्याचे शिष्य होत नाही; तर त्याच्या पावलावर चालणे, त्याच्यासारखे जीवन जगून देवाच्या वचनांचे पालन केल्याने आपण येशूचे खरे अनुयायी होऊ शकतो.
देव प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देतो म्हणून नेहमी चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळवण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात व अनितीने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील.
आपल्यामध्ये जे काही वाईट आहे ते प्रभूला अर्पण करूया आणि जीवनामध्ये पुन्हा एकदा चांगली कृत्ये करण्यास देवाची साथ आणि सामर्थ्य मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. हे प्रभू ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स व सर्व धर्मगुरू ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित ठेव. आध्यात्मिक व शारीरिक अशा सर्व आपत्तीपासून तू त्यांचे संरक्षण कर व सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने व आपुलकीने वागण्यासाठी तू त्यांना आध्यात्मिक शक्ती दे.
२. हे दयावंत परमेश्वरा, तुझा चांगुलपणा अमर्याद आहे, आज आम्ही जे लोक आजारी, दुखी कष्टी, निराशी व संकटग्रस्त आहेत अशा सर्व लोकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा त्यांचे जीवन पुन्हा एकदा प्रभू प्रेमाने बहरावे म्हणून प्रार्थना करतो.
३. हे येशू तू कामगारांचा मित्र व सोबती आहेस म्हणून जे सर्व प्रकारच्या शारीरिक व बौद्धिक कामात गुंतलेले आहेत त्यांच्या सर्व गरजा व योजना पूर्णत्वास नेण्यास त्यांना मदत कर, व जे लोक वैफल्य, नैराश्य आणि संघर्ष ह्यांनी ग्रस्त झालेले आहेत त्यांना तुझ्या सार्वकालिक शांतीचे वरदान दे.
४. हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास आम्हां सर्वाना तुझी कृपाशक्ती आणि सामर्थ्य दे जेणेकरून आम्हाला तारणप्राप्ती  होईल.
५.आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.


Friday 12 August 2016


The Diocese of Pune Celebrates the Feast of St. Maximilian Kolbe as the Prison Ministry Sunday (14 August 2016).




१४ ऑगस्ट (Prison Ministry Sunday in Pune)



संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे

रक्तसाक्षी (१८९४-१९४१)

संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांचा जन्म पोलंड देशात ८ जानेवारी १८९४ रोजी झाला. आपल्या तारुण्यावस्थेतच ते ‘फ्रायर्स मायनर कन्व्हेंच्युअल्स’ (फ्रान्सीसकन) नावाच्या व्रतस्थ धार्मिक संस्थेत दाखल झाले आणि इ.स. १९१८ मध्ये रोम शहरात त्यांना धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यात आली.
संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांचे धन्य कुमारी देवमाता मरिया हिच्यावर विशेष प्रेम होते. त्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या धर्मग्रामात ‘निष्कलंक मरीयेची फौज’ (आर्मी ऑफ इम्मॅक्यूलेट मेरी) नावाची संघटना सुरु केली. लवकरच या संघटनेचा प्रसार संपूर्ण पोलंड देशात आणि इतर देशांमध्ये झाला.
संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे पुढे जपान देशात मिशनरी म्हणून गेले, तेथे त्यांनी धन्य कुमारी निष्कलंक मरिया हिच्या आश्रयाखाली आणि मार्गदर्शनाने ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तेथून परतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये ते ‘युद्धाचे कैदी’ म्हणून सश्रम कारावासासाठी शिक्षा भोगत होते. ते एक धर्मगुरू होते हे फक्त निवडक साथीदार कैद्यांना ठाऊक होते. दर रविवारी ते गुपचूप भूमिगत मिस्सा करायचे. त्यासाठी खायला मिळणारे पाव ते वापरायचे. ख्रिस्तप्रसादाचे लहान तुकडे काड्यांच्या पेटीमध्ये किंवा सिगारेटच्या रिकाम्या पाकिटात घालून ते आजारी कैद्यांपर्यंत पोहचवत असे. त्यांना जो सश्रम कारावास झाला होता, त्यात सर्व कैद्यांना अन्न कमी, मेहनत जास्त असं भारी काम करावं लागत असे. प्यायला पुरेसं पाणी न मिळाल्यामुळे व चाबकांचे फटके खाऊन रक्तबंबाळ झालेले कैदी तहान भागविण्यासाठी स्वतःचे मूत्र पुनः पुन्हा प्यायचे आणि अगदीच निकामी झाल्यावर त्यांना विषाचे इंजेक्शन देऊन ठार मारले जायचे.

कैद्यांना ठार मारण्यासाठी कोणतेही क्षुल्लक कारण पुरेसे होते. एकदा एका छावणीतून (कॉन्सेट्रेशन कॉम्प) दहा कैदी पळून गेले म्हणून संध्याकाळी जेलर छावणीत येऊन म्हणाला, ‘जे पळाले त्यांची शिक्षा आता पुढील कैद्यांना’ भोगावी लागेल. त्याने दहा जणांना उभे केले आणि बजावले की उद्या सकाळी तुम्हां दहा जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात येईल. जेलर हुकुम देऊन गेल्यावर त्या जणातील एका कैद्याला संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांनी ओक्साबोक्सी रडताना पाहिले आणि विचारले तू का रडतोस? त्यावर तो म्हणाला, ‘मी माझ्या पत्नीला व चार मुलांना म्हटलं होत, लढाई लवकर संपण्याकरीता रात्रंदिवस प्रार्थना करीत राहा म्हणजे मग नंतर मी तुम्हांला भेटायला येईन. परंतु आता उद्या सकाळी ते मला गोळ्या घालून ठार मारणार आहेत! संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे जेलरकडे जाऊन म्हणाले, ‘सर त्यामधील एकाने पत्नीला व मुलांना परत भेटण्याचं वचन दिल आहे. तो आता ओक्साबोक्सी रडतोय. मी एकटाच आहे. मला बायकोपोरं नाहीत. त्याच्याऐवजी मला मारा पण त्याला जीवनदान दया. जेलर म्हणाला, ‘ठीक आहे’. शेवटी संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांना १४ ऑगस्ट १९४१मध्ये विषाचे इंजेक्शन देऊन ठार मारण्यात आले आणि त्या कैद्याला अभय मिळालं. त्यानंतर रक्तसाक्षी फा. कोल्बे ह्यांना ३३ वर्षांनंतर १० ऑक्टोबर १९८२ मध्ये संत पोप दुसरे जॉन पॉल ह्यांनी संतपदाचा बहुमान दिला.  

Wednesday 10 August 2016

Reflection for the Homily of Twentieth Sunday in Ordinary Time (14-08-2016) By Nevil Govind.




सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक: १४/०८/२०१६.
पहिले वाचन: यिर्मया ३८:४-६, ८-१०.
दुसरे वाचन: इब्री १२:१-४.
शुभवर्तमान: लूक १२:४९-५३.


मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय?


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपणांस ख्रिस्ताचे अनुयायी बनून त्याचा प्रेमाग्नी इतरांपर्यंत पोहचविण्यास पाचारण करीत आहेत.
पहिल्या वाचनात देवाने यिर्मयाद्वारे, सिद्किया राजाला, बाबेलच्या नबूखदनेसर राजाला शरण जाण्यास सांगितले. परंतु देवाची आज्ञा न पाळता तो यिर्मया संदेष्ट्याला त्याच्या सरदारांच्या स्वाधीन करतो. दुसऱ्या वाचनात इब्री लोकांस ह्या पत्राचा लेखक जुन्याकरारातील एबेल पासून तर ख्रिस्त येण्यापूर्वीच्या सर्व श्रद्धावीरांच्या विश्वासाचा मेघ आपल्यावर आहे आणि त्या सर्वांचा आशीर्वाद आपणावर आहे असे म्हणतो. तर शुभवर्तमानात येशू काळाची पूर्तता व न्यायाचा दिवस कसा असणार ह्याविषयी भाष्य करतो.
येशू हा आपल्या विश्वासाचा मूळ गाभा आणि आदर्श आहे. म्हणून त्याच्या विश्वासात अधिक मुळावले जाण्यासाठी आपण ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यिर्मया ३८:४-६, ८-१०.

     संदेष्टा यिर्मयाच्या काळात सिद्किया हा येरुशलेमेचा राजा होता. तो येरुशलेमेतला शेवटचा राजा होता. त्याने, त्याच्या सेवकांनी व देशाच्या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जी वचने परमेश्वराने सांगितली होती ती ऐकली नाहीत म्हणून देव येरुशलेमेचा नाश करणार होता. त्यात, सिद्किया ह्या शहराचा नाश होऊ नये व त्याचा जीव वाचावा म्हणून देवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे त्याला बाबेलच्या नबूखदनेसर राजाला शरण जाण्यास सांगितले. परंतु तो देवाची आज्ञा पाळण्यास तयार नव्हता. तो देवाला घाबरत नसून आपल्या सरदारांना आणि सैन्यांना अधिक भीत असे. सरदारांच्या सांगण्यावरून तो यिर्मया संदेष्ट्याला त्यांच्या स्वाधीन करतो आणि म्हणतो, “तो तुमच्या हाती आहे आणि राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही” (यिर्मया ३८:५). सरदारांनी यिर्मयाला नेऊन विहिरीत टाकले. तेव्हा एबद-मलेख हा राजाला त्याच्या सरदारांनी केलेल्या चुकीची जाणीव करून देतो आणि संदेष्टा यिर्मयाचे प्राण वाचवितो.

दुसरे वाचन: इब्री १२:१-४.

आपण एवढ्या मोठ्या साक्षी रुपी मेघाने वेढलेले आहोत
ख्रिस्तपूर्व १६६-१६० या काळात मक्काबी बंधूंनी ग्रीक सत्तेविरुद्ध बंड पुकारले होते. त्या बंडापूर्वी आणि बंडाच्या काळात ज्या अनेक निष्ठावंत ज्यू/ यहुदी लोकांचा छळ झाला होता, त्यांचे साक्ष येथे मांडण्यात आले आहेत. इब्री लोकांस ह्या पत्राचा लेखक ह्या उताऱ्यात जुन्याकरारातील एबेल पासून तर ख्रिस्त येण्यापूर्वीच्या सर्व श्रद्धावीरांची उदाहरणे देतो. ह्या सर्व श्रद्धावीरांचा मेघ आपल्यावर आहे; त्यांच्या विश्वासाचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि त्या सर्वांचा आशीर्वाद आपणावर आहे असा त्यांचा विश्वास होता.
 येशू विश्वासाचे खरे उदाहरण: लेखक इब्री लोकांस येशू हा आपल्या विश्वासाचा मूळ गाभा व आपला आदर्श आहे म्हणून आपण त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे असे त्याच्या वाचकांना आवाहन करत आहे.

शुभवर्तमान: लूक १२:४९-५३.

अ)     “मी पृथ्वीवर आग” लावण्यासाठी आलो आहे:
अग्नी ही न्यायाचे चिन्ह आहे असे यहुद्यांचे मानणे होते. पवित्र शास्त्रामधील दिलेल्या खालील ओवी आपणांस ह्याविषयी स्पष्ट बोध करतात: “कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात” (योहान १५:६). तो दिवस ते उघडीस आणील; कारण तो अग्निसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा अग्नीनेच होईल” (१ करिंथ ३:१३). “कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे” (इब्री १२:२७). अग्नीचा दुसरा अर्थ ‘देवाचा आत्मा’ असा होय: “तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील” (लूक ३:१६). म्हणून ख्रिस्त जेव्हा म्हणतो की, “मी पृथ्वीवर आग” लावण्यासाठी आलो आहे” तेव्हा ते गृहीत धरतात की न्यायनिवाडा करण्याची वेळ जवळ आली आहे. अग्नीत खऱ्या धातूची ओळख लागत असते. ख्रिस्ताची शिकवण अग्नीसारखी असून तिच्यातून साधक तावून सुलाखून निघाला पाहिजे, अशी अपेक्षा इथे व्यक्त केली आहे.
ब) मी फूट पाडण्यासाठी आलो आहे: ख्रिस्त म्हणतो, “मी पृथ्वीवर शांतता स्थापण्यासाठी आलो आहे, असे तुम्हांला वाटते काय? नाही. उलट मी फूट पाडण्यासाठी आलो आहे” (लूक १२:५१). जो माझा स्विकार करतो त्याची आणि त्याच्या नातेवाईकांत फूट पडेल. “पाच जणांच्या कुटुंबातील तिघांविरुद्ध दोघे आणि दोघांविरुद्ध तिघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी त्यांच्यात दुफळी निर्माण होईल” (लूक १२:५२-५३). इथे लेखकाने येशूच्या मरणानंतर होणार असलेल्या ख्रिस्ती लोकांच्या पिळवणूकीचे  आणि ख्रिस्ताचा स्वीकार करणाऱ्यांचा छळ येथे कुटुंबाच्या विभागलेल्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे.

मनन-चिंतन:

अग्नीचा/आगीचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. एका बाजूने पाहिले तर अग्नी साहाय्यक आहे पण दुसऱ्या बाजूने पहिले तर ती घातकदेखील आहे. अग्नीचा वापर आपण स्वयंपाक करण्यासाठी, शेकोटीसाठी किंवा वाळलेला कचरा जाळण्यासाठी करत असतो. तीच अग्नी जर स्वयंपाक करताना, शेकोटी पेटवताना किंवा वाळलेला कचरा जाळताना आपल्या कपड्यांना लागली तर कपडे जळून राख होतात. इतकेच नव्हे तर अग्नी अंगाला लागली कि माणसाचा कोळसा होतो व ओळखता देखील येत नाही. आज त्याच आगीचा उपयोग लोक सदुपयोग करण्याऐवजी तीचा दुरुपयोग करतात. तो म्हणजे घर पेटवण्यासाठी, बस, रिक्षा जाळण्यासाठी; मंदिर, मज्जीद आणि चर्चला आग लावण्यासाठी, नवरा/बायको आपल्या बायकोला/नवऱ्याला जाळण्यासाठी, सून सासूला आणि सासू सुनेला जाळण्यासाठी करत असतात.
आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की, “मी पृथ्वीवर आग लावण्यासाठी आलो आहे”. ह्याचा अर्थ असा होत नाही की, ख्रिस्त ह्या पृथ्वीवर खरोखर आग लावण्यासाठी, पृथ्वी भस्म करण्यासाठी किंवा दोघांमध्ये आग लावण्याचे काम करण्यासाठी आला आहे. तर तो प्रेमाची ज्वाला किंवा प्रेमाची अग्नी घेऊन प्रत्येकाच्या जीवनात, हृदयात आणि कार्यात ती पेटती ठेवण्यासाठी आला होता. ख्रिस्ताची अग्नी प्रामाणिकपणाची, सत्याची, एकनिष्ठतेची, करुणेची, दयेची, आपुलकीची आणि सलोख्याची आहे. ती न्यायाची, शुद्धीकरणाची किंवा नूतनीकरण घडून आणण्याचीपण असू शकते. जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांच्या जीवनात ती अग्नी नूतनीकरण घडवून आणणारी व जीवनाला नवीन प्राधान्य मिळवून देणारी असते. ख्रिस्ताची अग्नी त्यांचा सर्वनाश करत नसून ती कठीण हृदयांना पाझर फोडण्याचे कार्य करत असते.     
लूक सुवार्तीक आजच्या शुभवर्तमानात येशूच्या मरणानंतर ख्रिस्ती लोकांचा होत असलेला छळ आपल्या पुढे कुटुंबाच्या उदाहरणाद्वारे सादर करीत आहे. त्याकाळी असलेली स्थिती आजही आपणास आपल्या काळात बघावयास मिळते. आज जर आपण आपल्या समाजात पाहिलं तर आपल्याला प्रत्येकाच्या कुटुंबात वादविवाद, भांडणे, बळी घेणे किंवा घराची विभागणी करणे ही परिस्थिती आढळून येते. तिघांविरुद्ध दोघे किंवा दोघांविरुद्ध तिघे, मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी दुफळी पडलेली दिसून येते. ख्रिस्त ह्या जगात दुफळी पाडण्यासाठी आलेला नव्हता तर तो प्रेमाचा, करुणेचा, दयेचा, आपुलकीचा, ऐक्याचा आणि सलोख्याचा संदेश ह्या जगताला देण्यासाठी आला होता. ज्याने इतरांचे भले केले, तो कुणाचे वाईट का करणार? ज्याने इतरांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली तो दुसऱ्याचा प्राण का घेणार? ज्याने आपल्या पापांसाठी क्रुसावर दु:ख सहन केले तो दुसऱ्यांना दु:ख का देणार?
येशू आजच्या कुटुंबातील झालेली परिस्थिती पाहून आपणा प्रत्येकाला सांगत आहे की, तुम्हीं ‘पृथ्वीवर, एकमेकांत, इतरांत किंवा कुणाच्याही कुटुंबात आग लावू नका तर माझ्या प्रेमाची ज्योत आपल्यात आणि इतरांत पेटती ठेवा. स्वतःचे कुटुंब बनवा त्यात फोड करु नका. इतरांचे भले करा आणि इतरांना प्रेमाच्या अग्नीने जिंका. असिसिकर संत फ्रान्सीस म्हणतात की,
“हे प्रभो, मला तुझ्या शांतीचे साधन बनव.
जेथे द्वेष आहे, तेथे मला प्रेम पेरू दे,
जेथे दु:खावलेली मने आहेत, तेथे मला क्षमा करू दे,
जेथे संशय आहे, तेथे विश्वास निर्माण करू दे,
जेथे वैफल्य आहे, तेथे आशा निर्माण करू दे,
जेथे अंधार आहे, तेथे प्रकाश निर्माण करू दे,
जेथे दु:ख आहे, तेथे आनंद निर्माण करू दे,
हे दिव्य स्वामी, मला अशी कृपा दे की,
सांत्वनाची अपेक्षा करण्याऐवजी मीच सांत्वन करावे.
इतरांनी मला समजून घेण्याऐवजी, मीच त्यांना समजून घ्यावे.
इतरांनी माझ्यावर प्रेम करण्याऐवजी, मीच त्यांच्यावर प्रेम करावे.
कारण प्रेम करण्यातच, आम्ही प्रेम मिळवत असतो.
क्षमा करण्यातच आम्हांला क्षमा होत असते आणि मरणातच आम्ही चिरंतन जीवनात जन्मत असतो.
आज प्रत्येकाने जर वर असिसीकरच्या संत फ्रान्सीसने म्हटल्याप्रमाणे केले तर सर्व ठिकाणी आपणांस द्वेषाची अग्नी सर्वांना भस्म करीत असताना किंवा उध्वस्त करीत असल्याचे आढळणार नाही. सर्व ठिकाणी प्रेमाच्या अग्नीचा भडका पेडलेला दिसेल आणि लोक सलोख्यात राहतील. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे ख्रिस्ता, तुझा प्रेमाग्नी आमच्या हृदयात नेहमी पेटता ठेव.
१. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, व्रतस्थ व इतर सर्व मिशनरी बंधू-भगिनींना देवाचे कार्य करण्यास कृपा व प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील व राज्यातील सरकारने चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करावी व नि:स्वार्थीपणे कार्य करण्यास त्यांना परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाच्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात अनेक बेघर तर काहींनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे अशा ह्या आपल्या देशबांधवांचे परमेश्वराने सांत्वन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेले आहेत, जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत, ज्यांना नोकरी नाही, अशा सर्वांना प्रभूने त्याच्या प्रकाशात आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आजारी आहेत, दु:खी व कष्टी आहेत, ज्यांचं ह्या जगात कुणीच नाही व जे जीवनाला कंटाळले आहेत अशा सर्वांवर देवाचा कृपाशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.