Thursday 27 August 2020

 

Reflections for the 22nd Sunday in Ordinary Time (30/08/2020) by Dn. Godfrey Rodriques





साध्या काळातील बाविसावा रविवार

दिनांक: ३०/०८/२०२०

पहिले वाचन: यिर्मया २०:७-९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२ 

शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२७

 




आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे

प्रस्तावना:

आज आपण साध्या काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना स्वतःचा त्याग करून, स्वतःचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आपणा प्रत्येकास आमंत्रित करीत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यिर्मया आपल्याला जाणीव करून देत आहे की, देवाची सुवार्ता पसरविताना आपणा प्रत्येकाला दुःखाला सामोरे जावे लागेल. तर आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणा प्रत्येकास स्वतःच्या शरीराचा जिवंत यज्ञ म्हणून समर्पित करण्यास व सदैव देवाचा गौरव करण्यास बोलावत आहे. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना स्वतःचा त्याग करून आपल्या दुःखाचा व निराशेचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास बोलावत आहे.

ह्यास्तव आजची उपासना आपणा प्रत्येकास आपल्या दैनंदिन जीवनात निराश व हताश न होता दुःखावर मात करण्यास, दैवी दयेचा अनुभव घेण्यास, व ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवण्यास आमंत्रण देत आहे.


 पहिले वाचन: यिर्मया २०:७-९

यिर्मया शोक करत सांगतो की, “हे परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलो” (२०:७). यिर्मया परमेश्वराविरूद्ध बोलतो, कारण त्याला स्वतःच्या फसवणुकीची जाणीव होत होती व आपण परमेश्वरापेक्षा प्रबळ नाही म्हणून तो शोक करत होता. फसवणूक हा शब्द बायबल मध्ये १ राजे २२ ह्या पुस्तकात वापरला आहे व त्याद्वारे परमेश्वराने आहाबचा नाश केला. जर यिर्मयाची श्रद्धा दृढ नसती, तर यिर्मयाला सुद्धा कठीण परिस्थितीतून जावे लागले असते आणि जर असे झाले असते, तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य नसते कारण लोकांना व दुसऱ्या संदेष्ट्यांना यिर्मयाने केलेल्या चुकीची जाणीव होती (१७:१४-१८). तरीसुद्धा यिर्मयाची श्रद्धा व त्याचा परमेश्वरावर असलेला विश्वास भक्कम होता व परमेश्वराने ह्या दु:खदायक समयी यिर्मयाचा हाथ सोडला नाही. मी म्हणालो, मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा माझ्या हाडांत कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरितां आवरितां थकलो, पण मला ते साधेना” (२०:९).


दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२

नवीन जीवितक्रम: आपली शरीरे जिवंत, पवित्र देवाला समर्पित करा”, संत पौल हे आवाहन प्रत्येक ख्रिस्ती लोकांपुढे ठेवत आहे, कारण आपली शरीरे पवित्र आत्म्याची मंदिरे आहेत तसेच पवित्र आत्म्याची कार्ये वाहण्याची साधने सुद्धा आहेत, म्हणूनच आपण आपली शरीरे देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी कारण ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे व परमेश्वराची खरी आराधना आहे. स्वत:चे शरीर परमेश्वराला अर्पण करणे हिच खरी आराधना आहे. पुढे संत पौल लोकांस याचना करून सांगतो की तुम्ही युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नविकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया.

 

शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२२

मत्तयलिखित शुभवर्तमानात दोन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.  पहिली बाब म्हणजे येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थानआणि दुसरी आत्मत्यागाचे आमंत्रण.

येशू ख्रिस्त शिष्यांना आपले दु:खसहन व पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. परंतू हे मात्र शिष्यांना समजत नाही. येशूचे बोलणे ऐकून पेत्राला मोठा धक्काच बसतो. पेत्राने ख्रिस्ताच्या बोलण्याचा विरोध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दय असो, असे आपल्याला होणारच नाही. येशूने पेत्राला सांगितले की, “सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, तर माणसाच्या गोष्टीकडे आहे” (मत्तय १६:२२). 

ख्रिस्त आपला वधस्तंभ उचलून घेऊन जाणार होता. शिष्यांनी सुध्दा आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे अशी येशूची इच्छा होती. स्वत:ची इच्छा व ध्येय यांचा त्याग करून देवाची इच्छा मान्य करणे हे सोपे नसते. परंतू, येशू शिष्यांना त्यांच्या त्यागाद्वारे त्यांना मोबदला मिळेल असे आश्वासन देतो. देवाच्या इच्छेप्रमाणे न करता जो जगातील गोष्टी मिळविण्याच्या मागे लागतो तो सर्वच गमावून बसतो. म्हणून सैतानाच्या विचारांचा त्याग करून ख्रिस्ताच्या इच्छा अनुसरणे योग्य आहे.

 

मनन चिंतन:

आपल्या जीवनाचे आकाश हे सदैव निळे असते असे नाही, तर कधीकधी वेदनेच्या, यातनेच्या ढगांनी झाकले जाते. आपल्या आयुष्याच्या पाऊल वाटा सदैव फुलांनी सजवलेल्या असतात असे नाही, तर त्यावर कधीकधी संकटाचे आणि दुःखाचे काटे-कुटे आणि संशयाचे व निराशेचे दगड-धोंडे पसरलेले असतातच. आपले आयुष्य आपल्या जीवनाच्या ओंजळीत नेहमी सुखाचाच वर्षाव करीत नाही, त्या सुखाच्या धांन्यात कधीकधी दुःखाचे खडेही असतात.

अशाप्रकारे सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख हा जणू आपल्या जीवनाचा क्रम बनत असतो. आणि अशा ह्या सुख-दुःखाच्या जीवनात सुखात आपण हर्ष करतो, दुःखात आपण खचून जातो, आणि ते सहाजिकच आहे; परंतु ख्रिस्त आज आपणास जाणीव करून देत आहे की, दुःखात खितपत न पडता, दु:खांना आपला आधारस्तंभ बनवा, दुःखांना आपल्या विषयाचे साधन बनवा, कारण जेव्हा आपण दुःखांना सामोरे जातो, तेव्हाच आपण धाडसी बनत असतो आणि आपली दुःखेच आपणाला आपल्या धाडसीपणाची जाणीव करून देत असतात. इतकेच नव्हे, तर जीवन सर्वकाही संपून गेलेले असे वाटते, तेव्हा तीच वेळ असते काहीतरी नवीन घडण्याची, काहीतरी नाविण्य घडवून आणण्याची. ख्रिस्ताच्या त्या क्रुसावरील  मरणानेच पुनरुत्थानाची पहाट शक्य झाली, शुक्रवारच्या त्या दुःखदायक क्लेशामुळेच रविवारचे पुनरुत्थान अधिक सुखमय बनले. अशाप्रकारे सुखानंतर दुख व दुःखानंतर सुख हे सहाजिकच आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा हा अतिशय हताश झाला होता, तरीसुद्धा त्याच्या देवावरील दृढ विश्वासाने दुःखावर मात करत देवाची सुवार्ता तो पसरवत गेला. दुःखामुळेच जणूकाही तो धाडसी बनला. सर्व तेव्हाच शक्य झाले, जेव्हा तो दुःखांना सामोरे गेला. त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस आवर्जून सांगत आहे की, पुनरुत्थानाशिवाय आपली ख्रिस्तावरील श्रद्धा व्यर्थ आहे. यास्तव पुनरुत्थानासाठी गरज आहे, ती मरणाची, दुःखांना सामोरे जाण्याची म्हणून दुःखांना घाबरून न जाता त्यांना सामोरे जाण्यास संत पौल रोमकराबरोबर आज आपणाला सुद्धा आवर्जून सांगत आहे. आजच्या शुभमवर्तमानात सुद्धा येशू ख्रिस्त आपल्याला अशाच प्रकारचा आदेश करत आहे. येशू शिष्यांना स्वतःचा त्याग करून आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे असे सांगत आहे. कारण ख्रिस्तला ठाऊक होते की, माझ्या दुःखसहनाने व मरणानेच पुनरुत्थान शक्य आहे. ख्रिस्ताला ठाऊक होते की दुःखानंतर लाभलेले सुख हे अतिशय आनंददायक असते. त्याचप्रमाणे शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्प्यात ख्रिस्त आत्मत्याग करण्यास आमंत्रित करीत आहे. ख्रिस्त जाणीव करून देतो की, जो कोणी दुःखांना घाबरून दूर पळतो, तो शरीराचे चोचले पुरवतो व जो कोणी दुःखांना सामोरे जातो तो अनंत काळाच्या सुखास पात्र ठरतो. म्हणूनच ख्रिस्त त्याच्या शिष्यांना व आज आपणा प्रत्येकाला खचित सांगतो की, माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल, तर त्याने  स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. यास्तव स्वर्गीय व अनंत काळाच्या सुखात सहभागी व्हावे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वाना देव राज्याची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्सनर्सेसव इतर सेवक सेविका ह्यांनी आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करत आहेत. त्यांना परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद व त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा यावातसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

 




Wednesday 19 August 2020

Reflections for the 21st Sunday in Ordinary Time (23/08/2020) by Fr. Michael Fernades






सामान्य काळातील एकविसावा रविवार

 

दिनांक: २३/०८/२०२०

पहिले वाचन: यशया २२:१९-२३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:३३-३६

शुभवर्तमान: मत्तय १६:१३-२०

 



मी स्वतःला ओळखतो – मी कोण आहे?

 

प्रस्तावना:

आजची तिन्ही वाचने आपणास येशू ख्रिस्ताला ओळखण्यास आमंत्रण देत आहे. त्याला ओळखण्यास श्रद्धेची व विश्वासाची भरपूर गरज आहे. आपली अंतकरणं शुद्ध व निर्मळ ठेवण्यास आजची उपासना आपली आध्यात्मिक तयारी करत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टाद्वारे परमेश्वर आपल्याला देवाचे आदेश पाळण्यास व त्याच्या आज्ञेनुसार वागण्यास सांगत आहे. शेबनाला देव ताकीद देत आहे की, तुला सर्व महत्त्वाच्या पदावरून व कामावरून काढले जाईल. गर्विष्ठ जीवन जगला म्हणून तुला नवीन राजा सर्व चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवील. सर्वकाही काढून घेऊन ते सर्व दुसऱ्याला दिले जाईल. 

आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला सांगितले जात आहे की, देव महान व श्रेष्ठ आहे. त्याची बुद्धी विज्ञान हे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. आपण नम्र होऊन त्याच्या समोर नतमस्तक होऊन त्याचा गौरव करूया.

शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे, “मी तुमच्यासाठी कोण? मी तुमच्या जीवनात कोण आहे? मला तुमच्या जीवनात काय स्थान आहे? संकटात, दुःखात, सुखात, बरी पणात मला तुम्ही कोणती स्थान तुमच्या जीवनात देता? जर मी तुमचा प्रभू असेल, तर त्याप्रमाणे वागतात का? जर मी तुमचा राजा असेल तर एका विश्वास व प्रेमाळू प्रजेप्रमाणे वागता का?

आजच्या मिसा बलिदानात भाग घेत असताना, आपण परमेश्वराकडे आपल्या गर्विष्ठपणाची कबुली देऊया, त्याच प्रमाणे प्रभूला सांगूया की त्याची बुद्धी व ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे, तू सर्वस्व आहे, खरा देव, ईश्वर, प्रभू आहे. जीवनात फक्त त्यालाच स्थान देऊया.

 

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया २२:१९-२३

शेबनाला सर्व पदावर काढून दिले आहे. त्याच्या जागी नवीन राजा म्हणून एल्हे किम त्याची नेमणूक केली आहे. सर्वकाही हिरावून घेतली जाते, कारण तू नेहमी गर्विष्ट राहिला. नवीन राजाला सर्व काही बहाल केले जाईल. कारण देव त्याच्यावर खुश व प्रसन्न झाला आहे. येरुसलेम आणि जुदा यावर तू राज्य करील व त्याला पिता म्हणून संबोधण्यात येईल.  

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:३३-३६

देव ज्ञानी आहे. देव बुद्धिमान आहे. त्याला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. देव गर्विष्ठ नाही. तो सर्वशक्तिमान आहे, पण त्याबरोबर तू दयाळू व मायाळू आहे. त्याचे मन कोणाला माहित नाही. सर्व गोष्टीचा उगम व अस्तित्व देवापासून आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १६:१३-२०

मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात? असा प्रश्न येशू ख्रिस्त शिष्याला विचारत आहे. शिष्य आपलं येशूवर असलेलं प्रेम अनेक उत्तरा द्वारे व्यक्त करत आहेत. तू योहान, एलिया व यिर्मया आहेस, असे लोक ओळखतात व म्हणतात. तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस असे पेत्राने सर्वांच्या वतीने उत्तर दिले.

 बोधकथा:

एक श्रीमंत भाऊ आपल्या एकुलत्या एका मुलाला प्रश्न विचारतो, ‘बाळा, मी तुझा कोण? माझ्यावर तुझं प्रेम आहे का? माझ्या बद्दल तुझं काय मत आहे?’ बापाला वाटले की, मुलगा त्यांच्याविषयी सकारात्मक उत्तर देईल, चांगले विचार व्यक्त करील. कारण त्याने मुलाला सर्व काही दिले होते. पण मुलाने बापाला आश्चर्याचा धक्का दिला, ते रडू लागले कारण मुलांनी म्हटले, ‘तुम्ही माझ्यासाठी कोणीही नाही. कारण तुम्ही मला संपत्ती, पैसा, शिक्षण, बँक बॅलन्स, गाडी इत्यादी दिले आहे; पण तुमचं प्रेम दिलं नाही. मला सर्वांची ओळख करून दिली, पण ख्रिस्ताची, बायबलची, साक्रामेंतची, ओळख करून दिली नाही. तुम्ही माझ्यासाठी कोणीच नाही, एका शुन्याप्रमाणे माझ्या जीवनात तुमचं अस्तित्व व ज्ञान, स्थान आहे.’

 मनन चिंतन:

ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानात आपल्या शिष्यांना असाच एक खरा प्रश्न विचारतात की, “मी कोण आहे? असे लोक आणि तुम्ही म्हणतात?” ख्रिस्ताने अनेक चांगले कार्य केले होते, चमत्कार व प्रवचने दिली होती. शिष्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले व हृदयाने अनुभवलेले होते. त्यांना सुद्धा ख्रिस्ताने आशीर्वाद व कृपा देऊन एक नवीन जीवनाची भेट दिली होती. देवाच्या राज्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या होत्या. प्रीतीच्या, क्षमेच्या, आपुलकीच्या, सेवेच्या किल्ल्या ख्रिस्ताने दुसऱ्यांचे भले करण्यास त्यांना बहाल केल्या होत्या.

ख्रिस्त त्यांच्याबरोबर हिंडला, फिरला, जेवला तसेच देवाची व मनुष्याची ओळख त्यांना करून दिली. तीन वर्ष ख्रिस्ताने त्यांना प्रीती व सेवेबद्दल शिकविले. आता वेळ आली होती त्यांच्या अध्यात्मिक जीवनाच्या परीक्षेची. ख्रिस्ताकडून ह्या शिष्यांनी किती शिकून घेतले होते? त्यांचं येशूबद्दल काय मत होतं? जे काही ते ख्रिस्ताकडून शिकले होते, ती शुभवार्ता लोकांपर्यंत ते कशाप्रकारे पोहोचविणार होते. त्यांना खरोखर ख्रिस्ताची ओळख पटली होती का? इतर लोकांप्रमाणे ते फक्त त्याचे महान कार्य, चमत्कार बघण्यासाठी की, स्वतःला समाजात मान, सन्मान व ओळख मिळावी म्हणून ते येशूचा पाठलाग करत होते का? ख्रिस्ताला त्या सर्वांना जगात प्रेमाची व सेवेची सुवार्ता पसरविण्यास पाठवायचे होते. त्यांची खरोखर तयारी झाली आहे का? विश्वासात व श्रद्धेत त्यांची वाढ झाली आहे का? हे पाहण्यासाठी प्रभू येशू त्यांना हा स्वतःबद्दलचा प्रश्न विचारतो.

आपला वैयक्तिक ख्रिस्ताचा अनुभव काय आहे? ख्रिस्त आपला कोण? इतर लोकांचा अनुभव ठीक आहे, पण आपला अनुभव काय? ख्रिस्ताविषयी दुसरे काय म्हणतात किंवा बोलतात हे महत्त्वाचं नाही. परंतु आपले ख्रिस्ताबरोबरचे माझे वैयक्तिक संबंध सखोल आहेत का? जीवनात संकटे, वादळे, दुःखे व आजार येतात तेव्हा ख्रिस्त आपल्यासाठी जीवनदाता आहे का? आपल्याला कोणीही स्वीकारत नाही, सर्व नाकारतात तेव्हा ख्रिस्त आपल्यासाठी आश्रयदाता आहे का? या कोरोना संकटात ख्रिस्त आपल्या सर्वांचे रक्षण करील असा आपला विश्वास आहे का?

पेत्राने सर्व शिष्यांच्यावतीने उत्तर दिले, ते उत्तर विश्वासाचे, प्रीतीचे, आदराचे होते. तसेच एका मोठ्या आशेचे व अनुभवाचे होते. पेत्राने त्या उत्तराद्वारे दाखवून दिले की, होय, आम्ही तयार आहोत. अशाप्रकारे त्या उत्तराद्वारे त्याने ख्रिस्ताची प्रशंसा व स्तुति केली नाही, तर हे मान्य केले की ख्रिस्त खरा देव, जीवन देणारा जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याच्याविना आपल्याला अस्तित्व नाही. ख्रिस्त प्रकाश देणारा जिवंत दिवा आहे.

अनेक पवित्र पुरुष व स्त्रिया यांना ख्रिस्ताचा मोठा अनुभव आला होता. तो अनुभव लोकांपर्यंत त्यांनी शब्दाने, कृतीद्वारे व जीवनाद्वारे पोहोचविला. तो त्यांचा एकमेव आणि वैयक्तिक अनुभव होता. आज ख्रिस्त एक मोठा व महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे, ‘मी कोण?’ पेत्र व इतर शिष्य श्रद्धेत बळकट नव्हते, त्या सर्वांना ख्रिस्ताने स्वतःचे जीवन अनुभवण्यास अनेक अशा संध्या दिल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पापांकडे नाही, तर हृदयाकडे पाहिले. आपले अंतकरण निर्मळ, शुद्ध व पवित्र असेल, तर तसाच अनुभव आपणा सर्वांना येईल. मग पेत्राप्रमाणे आपणसुद्धा संकटरूपी पाण्यावर चालणार, आणि जर जीवनात दुःखाने बुडू लागलो, तर ख्रिस्त आपल्याला त्याच्या पवित्र व बळकट हाताने वर काढणार आहे फक्त श्रद्धा व विश्वास ठेवण्याची गरज आहे.

ख्रिस्त आपल्याला त्याच्या प्रीतीने समजून व स्वीकारून घेतो, त्यामुळे ख्रिस्ताचा आपल्या जीवनात वैयक्तिक अनुभव असणे फार महत्वाचे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आपले देखील पेत्राप्रमाणे वाईट दिवस संपतील व एक सुंदर जीवनाला सुरुवात होईल. ख्रिस्ताने पेत्राला खडक केले, एक नवीन नाव, दिशा, आशा दिली. त्याचप्रमाणे आपले जीवन बदलून एक नवीन, पवित्र, व सुंदर पर्व आपल्या जीवनात तो सुरू करील.

पेत्राप्रमाणे, आपण ‘तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस’ हे उत्तर देऊन, ख्रिस्ताचे खरे शिष्य व अनुयायी होण्यास तयार आहोत का? आपण स्वतःला ख्रिस्ताच्या जो गरजू व गरीब लोकांमध्ये आहे तेथे त्याला ओखून त्याची सेवा करायला तयार आहोत का? त्याचा अनुभव घेऊन, तो लोकापर्यंत पोहोचविण्यास आणि त्याच्याशी एकरूप होण्यास आज ख्रिस्त आपणांस बोलावीत आहे.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप, बिशप तसेच सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी देवाच्या वचनाचा नम्रपणे आणि प्रामाणिकपणे प्रचार करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

 २. आपल्या जीवनात ख्रिस्ताला अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समेट घडवून आणावा व एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ३. हे प्रभू आम्ही सर्वजण महामारीत अडकलेले आहोत. आमच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ४. आमच्या स्वतःच्या गरजांसाठी विश्सेकरून ज्यांनी आपल्याला प्रार्थनेची विनंती केली आहे अशा सर्वांची  आपण आता आठवण करुया आणि त्यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

 ५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.

Friday 14 August 2020

Reflections for the 20th Sunday in Ordinary Time (16/08/2020) by Fr. Wilson Gaikwad







सामान्य काळातील विसावा रविवार

 

दिनांक: १६/०८/२०२०

पहिले वाचन: यशया ५६:१, ६-७

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५, २९-३२

शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८




‘परमेश्वर हा सर्वांचाच आहे, त्याच्या ठायी भेद नाही!’

 

प्रस्तावना:

आज सामान्य काळातील विसावा रविवार. आजच्या तिन्ही पवित्र वाचनांतून आम्हांस संदेश मिळतो की, “परमेश्वर हा सर्व विश्वाचा, पृथ्वीचा, मानवजातीचा उद्धारकर्ता व तारणकर्ता आहे. त्याच्या प्रेमाला, दातृत्वाला, सीमा व अंत नाही. एखाद्या वाहत्या झऱ्याप्रमाणे त्याची कृपा, प्रीती अविरत वाहत असते. म्हणूनच जो व्यक्ती देवाच्या सानिध्यात येतो, मग तिथे जात-पात धर्माचे बंधन नाही. त्या व्यक्तींना अथवा माणसांना देवाच्या करुणेचा, चमत्काराचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. "मनुष्य व देव यांतील एकमात्र विश्वास हा एकच दुवा आहे.” जेव्हा विश्वासाने आम्ही देवा सदणी व चरणी जातो, तेव्हा तो आम्हाला रिक्त हस्ते परतू देत नाही. त्याचा आशीर्वाद आम्हास मिळतो.

 पहिल्या वाचनात यशया सांगतो की, देवाच्या प्रेमापासून कोणीही वंचित नाही. कोणालाही वगळले नाही. दुसऱ्या वाचनात संत पौल आम्हांस आठवण करून देतो की, देवाच्या करूणेला अंत नाही, ती अटळ आहे. तसेच शुभवर्तमानात एक विधर्मी बाई प्रभू येशूच्या परीक्षेत पास होते, विश्वासास पात्र ठरते. आपण सुद्धा या पवित्र मिस्सात सहभागी होत असताना, श्रद्धेने त्याच्या पदकमली जाऊया व त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊ या.

 सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५६:१, ६-७

येशूच्या संदेष्टा पहिल्या वाचनात परमेश्वराचे औदार्य प्रकट करतो व आमच्या निदर्शनास आणतो की, आपण न्याय बुद्धीने वागले पाहिजे; कारण आपला देव सर्वव्यापी, सर्वांना सामावून घेणारा आहे. त्याच्या ठायी जात-पात, धर्म या गोष्टींना थारा नाही व तु आम्हास आवर्जून सांगतो, “देवाचे मंदिर सर्व राष्ट्रांचे प्रार्थना घर होईल.” (यशया ५६:७)

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५, २९-३२

संत पौल रोमकरांच्या पत्राद्वारे आम्हास ठामपणे सांगतो, “मी यहुदीतरांसाठी प्रेषित आहे. त्याची शिकवण आम्हास बोध करते की, जेव्हा आम्ही समेटाचे, बंधुत्वाचे जीवन जगतो भेदभाव न ठेवता सर्वांचा स्वीकार करतो, तेव्हा आम्ही मेलेल्यातुन जिवंत झाल्यासारखे आहोत.” म्हणूनच प्रभू येशू वर विश्वास ठेवला पाहिजे तो करुणामय आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८

शुभवर्तमानात संत मत्तय प्रभू येशू व विधर्मी स्त्री जेव्हा भेटतात, त्याच्यातील संभाषण चित्रीत करतो. येथे आम्ही बघतो की, प्रथम येशू तिला नाकारतो, पण जेव्हा ती सातत्याने, वारंवार प्रभू येशूला, मुलीला बरं करण्याची विनवणी करते, तेव्हा तिचा विश्वास व तिची तळमळ पाहून प्रभू येशू तिच्या मुलीला बरं करतो, नवजीवन देतो.

 मनन चिंतन:

एक दिवस स्वर्गामध्ये एक चौकस (curious) माणूस संत पेत्राला विचारतो, स्वर्गात किती हिंदू लोक आहेत? पेत्र उत्तर देतो एकही नाही. पुन्हा दुसरा प्रश्न विचारतो, किती मुस्लिम स्वर्गात आहेत? पेत्र उत्तर देतो एकही नाही. पुन्हा चौकस माणूस पेत्राला विचारतो की, तर मग स्वर्गात किती ख्रिस्ती लोक आहेत? पुन्हा तेच उत्तर, एकही नाही. शेवटी हा चौकस माणूस गोंधळून जातो व पेत्राला विचारतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती कोणीही स्वर्गात नाही. मग स्वर्गात आहेत तरी कोण? पेत्र शांतपणे त्या चौकास माणसाला उत्तर देतो की, स्वर्ग ही कोणा एका पंथ, जात-पात, धर्म जहागिरी नाही. तर स्वर्ग हा सर्वांचा सर्वांसाठी आहे. स्वर्गात सर्व मनुष्यांचे स्वागत आहे. तेथे देवाच्या सानिध्यात राहून लोक सार्वकालिक आनंद अनुभवतात.

 होय, प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानकार संत मत्तय मुद्दाम आम्हास जाणीव करून देतो, कारण आजचं शुभवर्तमान त्याचा स्व: अनुभव आहे. मत्तय यहुदी नव्हता, परदेशी होता. तो कर वसुली करणारा होता. त्यालासुद्धा मंदिरात येण्यास, प्रार्थना करण्यास बंदी होती. आपल्याच भाषेत सांगायचे झाले तर त्याला ‘बहिष्कृत’ केले होते. कारण कर वसुली करणाऱ्याचा द्वेष करत होते. अशा या मत्तयचा प्रभू येशू स्वीकार करतो. आजच्या शुभवर्तमानाद्वारे मत्तयला आवर्जून नमूद करायचे आहे, शुभवर्तमानातील बाई सुद्धा यहुदी नव्हती, ती विधर्मी होती. यहुदी लोक तिचा स्वीकार करु शकत नव्हते. असेच उदाहरण आपण योहानकृत शुभवर्तमानात बघतो. प्रभू येशूची शमरोनी स्त्री हिशी भेट याकोबाच्या विहीरीवर होते (योहान ४:४-२६). खरंच प्रभू येशू प्रेमाचा, दयेचा सागर आहे. तो सर्वांनाच स्वीकारतो, म्हणतात ना, “जिसका कोई नही, उसका खुदा है!”

 शुभवर्तमानात प्रथमतः थोडा कटू प्रसंग आहे. विधर्मी बाई प्रभू येशू कडे तिच्या मुलीला आरोग्य देण्यास विनवणी करते. ओरडून, कळकळीने, उच्चारते: ‘प्रभू येशू तू तारणारा आहेस, दाविदाचा पुत्र आहे. सुरुवातीला तिची मानहानी होते. प्रभू येशू तिला नकार देतो, अपमान करतो, अवहेलना करतो, दुर्लक्ष करतो सांगतो की, “मला फक्त इस्राएलाचा हरवलेल्या मेंढरासाठी पाठविले आहे (ओवी २४). मुलाची भाकर कुत्र्यापुढे टाकत नाही, पण ती बाई खूप मार्मिक उत्तर देते. होय प्रभू, “परंतु कुत्रीही, आपल्या धन्याच्या मेजाखाली पडलेले उष्टे चुर खातात” (ओवी २६). आणि ह्याच उत्तरावर खुश होऊन प्रभू येशू तिच्या मुलीला बरे करतो.

 खरंच आपला विश्वास भक्कम, दृढ असेल, तर येशु आपणास नक्कीच स्वीकारतो. तेथे भेदभाव नाही, कारण आम्ही सर्वच देवाची लेकरे आहोत. त्याच्या बागेतील विविध रंगाची, सुगंधाची फुले आहोत.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.

१) आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्या सर्वाना देव राज्यांची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) जगभरात अनेक लोक कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहेतअशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श होऊन त्यांची ह्या रोगापासून मुक्तता व्हावी तसेच डॉक्टर्स, नर्सेस ज्या निस्वार्थी वृत्तीने ह्या रुग्णाची सेवा करतात त्यांना ही तुझा भरपूर आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.


Friday 7 August 2020


Reflections for the 19th Sunday in Ordinary Time (09/08/2020) by Fr. Wilson D’Souza




सामान्य काळातील एकोणिसावा रविवार

 

दिनांक: ०९/०८/२०२०

पहिले वाचन: १ राजे १९:९, ११-१३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ९:१-५

शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३

 




देवाचा अनुभव

 

प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना ‘देवाच्या अनुभवाविषयी’ आपल्याला सांगत आहे. मानवाची निर्मिती करण्यामागे देवाचा एक विशेष हेतू होता; तो म्हणजे ‘मानवाने मानवाशी मानवा सम राहावे.’ ते करण्यासाठी साक्षात देवाच्या अनुभवाची गरज आहे. आजच्या देव स्तुतीत व देव शब्दाद्वारे आपल्याला तो अनुभव बहाल केला जात आहे. देवाचा आवाज ऐकण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी आपली अंतःकरणे तयार करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या पापांची आठवण करूया व देवाजवळ ख्रिस्ताद्वारे क्षमा याचना करूया.

 सम्यक विवरण:

पहिले वाचन: १ राजे १९:९, ११-१३

          साधू, संत, धार्मिक जन आपलं आयुष्य एकांतात घालवत असतात. देवाचा अनुभव घेण्यासाठी ते डोंगरावर, गुहेत एकांतात राहतात. एलिया संदेष्टाला परमेश्वराचा अनुभव गुहेत एकांतात झाला. परमेश्वराचा अनुभव त्याला मंद वाणीतून झाला आणि त्याने आपले मुख झग्याने झाकून घेतले. एलिया संदेष्टासारखा आपल्याला परमेश्वराचा अनुभव देव शब्दाद्वारे यावा म्हणून मनन चिंतनाने पहिले वाचन ऐकुया.

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ९:१-५

          देवाचा अनुभव प्रत्येकाला येत असतो. कारण ती देवाची देणगी आहे. परंतु, मानव त्या अनुभवास अपात्र ठरत असतो. त्याच कारण म्हणजे जगिक व ऐहिक सुखाकडे वाटचाल आनी ह्या गोष्टी आपल्याला ख्रिस्तापासून विभक्त करत असतात. कधी कधी आपले आप्तेष्टे, नातेवाईक आणि कुटुंब ह्याच्या वरील प्रेमामुळे आपण ख्रिस्ताच्या प्रेमापासून, सानिध्यापासून विभक्त होऊ शकतो, असे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात आपणांस सांगत आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३

पाच भाकऱ्या व दोन मासे ह्या चमत्काराने येशूने पाच हजार लोकांना तृप्त केले. लोकांचा निरोप घेऊन देवाशी संपूर्ण रात्र संवाद साधल्या नंतर देवानुभव घेतलेला येशू पाण्यावर चालून आपल्या शिष्याकडे येतो. येशू अशक्य व आजपर्यंत न झालेली गोष्ट करतो, त्यामुळे शिष्य भयभीत होतात; परंतु येशू त्यांना आश्वासन देतो, “भिऊ नका, धीर धरा, मी आहे.” येशू देव आहे व त्याचे समुद्रावर व पाण्यावर साम्राज्य आहे असे आपणांस सांगण्यात आलेले आहे. ज्यांना देवाचा अनुभव नसतो त्यांना पेत्रासारखा भ्याल्याचा ब बुडण्याचा अनुभव येत असतो, “प्रभुजी, आम्हाला वाचवा आणि आमचा विश्वास वाढवा.”

 बोधकथा:

ईश्वराशी आपण एकरूप झालो तर, ईश्वरही आपली मनापासून काळजी घेतो. साधू-संत ईश्वर भक्तीत प्रसिद्ध असतात. ते मनोभावे ईश्वराचे स्मरण करतात, प्राणीमात्रांना ईश्वर निर्मिती मानून त्यांची सेवा करतात. एकदा संत राबियाच्या घरी चोर घुसला, धन तर सापड;लेच नाही; पण दुसराच अनुभव चोराला आला. त्याला घरात एक चादर दिसली व ती घेवून लापता होण्याचा त्याने विचार केला. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली. डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न देखील केला, पण काय फायदा झाला नाही. 

ज्या वेळेला तो चादर आणण्यचा प्रयत्न करी, तेव्हा त्याला वाईट अनुभव येत असे. चादर खाली ठेवली की त्याला बरं वाटत असे. तो हैराण झाला आणि त्यांनी मंद वाणी ऐकली: “तू स्वतःला का अडचणीत टाकत आहेस. माझ्यामध्ये केवळ स्वतःच अस्तित्व नाही, तर ईश्वराचही. जेव्हा मी झोपतो तेव्हा तो जागा असतो.” चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या संत राबियाचे चरण स्पर्श करून दर्शन घेतले व ती चादर तेथेच टाकून निघून गेला. 

मनन चिंतन:

देवाच्या दर्शनाला आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी गुहेत आणि पर्वताकडे गेलेला एलिया ह्याला परमेश्वराचा अनुभव आला. देवाचा अनुभव सोसाट्याच्या वाऱ्यात, भूमीकंपात, अग्नीत झाला नसून, मंद व शांत वाणीत झाला. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचे एक ध्येय आहे आणि ते म्हणजेदेवाशी संवाद, त्याचा अनुभव व वाणी ऐकणे हा असतो आणि हे आपल्या दैनंदिन जीवनात घडत असते. 

देवाचे दर्शन झाल्यावर आणि देवाचा अनुभव घेतल्याने जीवन परिवर्तीत होत असते. मनुष्य देवा सारखा वागतो, बोलतो व चालतो. देवाचा अनुभव आलेला व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जीवनात बदल करतो व नव जीवन जगण्यास लागतो. तो संत पौला प्रमाणे म्हणत असतो, “जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी.” (गलती २:२०) तो स्वतःसाठी मरतो, व दुसऱ्यासाठी जगतो आणि विशेष करून, त्याच जगणं हे जो त्याच्यासाठी मेला व पुन्हा उठविला गेला त्याच्यासाठी असतं. जर कोणी ख्रिस्ताठायी असेल, तर तो नवी उत्पत्ती होते व जुने लयास जाते. त्यासाठी, ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या ख्रिस्तामुळे व त्याच्या अनुभवामुळे हानिकारक वाटतात. त्या गोष्टींना आणि व्यक्तींना ते सहजपणे मुकतात व त्या केरकचरा अशा लेखतात. 

शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना केवळ धीर व धैर्य देत नाही, तर तो खरोखर कोण आहे, हे दाखवून देतो. संपूर्ण रात्र देवाशी संवाद साधल्यानंतर तो समुद्राच्या पाण्यावरती चालू लागला. एकांतात येशूने देवाचे प्रेम अनुभवले. देव अनुभवासाठी प्रार्थनेची गरज आहे, पण त्यासाठी एकांतवासाची व एकटेपणाची गरज असते. आजच्या ह्या घाई-गर्दीच्या जगात एकांतीपणाचा अभाव दिसत आहे. सर्वत्र गोंगाट व आवाज कानी पडत आहे.

कोविड १९ ही देवाने दिलेली अनमोल संधी आहे, पण आपण भयभीत झालो आहोत, घाबरून गेलो आहोत. ज्या येशूने शिष्यांचे सांत्वन केले, तोच येशू आपल्या जीवनरूपी नावेमध्ये उपस्थित आहे. तो आपली ही जीवनाची नौकाकधीच बुडू देणार नाही, उलट अर्थी ह्या कोविड १९ मध्ये आपण त्याचा अनुभव घेऊया.ज्या प्रमाणे त्याने पेत्राला हात दिला, दिलासा दिला. तोच ख्रिस्त आपल्याला वाचवेल, सांभाळेल ह्या विश्वासाने त्याला साथ घालू या, त्याचा हात मागुया. होय प्रभुजी आम्हाला कोरोना पिडातून  आम्हाला वाचव.    

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

 १. चर्चसाठी: आम्ही केवळ शब्दांनी ख्रिस्त सांगत नाही, तर ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणून जगू शकू. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 २. आध्यात्मिक वाढीसाठी: आत्मा आपल्याला आध्यात्मिक अभ्यासाची अंमलबजावणी करण्यास मदत करेल ज्यामुळे आपले ज्ञान आणि देवावरील प्रेम आणखी वाढेल जेणेकरून आपण देवाच्या दैनंदिन आमंत्रणांना उदारपणे प्रतिसाद देऊ शकू. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ३. ख्रिस्ताच्या शरीरात एकता निर्माण करण्यासाठी: सर्व ख्रिस्ती लोक वाईट, दारिद्र्य आणि रोगाचा सामना करण्यास एकत्रितपणे कार्य करतील जेणेकरुन सुवार्तेची कृत्ये तसेच शब्दांमध्ये देखील ती प्रसिद्ध होईल. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ४. कृपेसाठी अरुंद दरवाजाने प्रवेश करण्यासाठी: आत्मा क्षमा, करुणा, आत्म-संयम आणि सेवांच्या कृतींसह जीवन जगण्यास मार्गदर्शन करेल जेणेकरून आपले जीवन देवाचे राज्य प्रगट होईल. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ५. वन्य अग्नि, पूर आणि इतर आपत्तींमुळे त्रस्त असलेल्या सर्वांसाठी: देव त्यांना सांत्वन देईल, त्यांना बरे करील आणि त्यांचे जीवन पुन्हा निर्माण करण्यासाठी संसाधनांकडे मार्गदर्शन करेल. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ६. ज्यांना गरज आहे अशा सर्वांसाठी, हिंसाचाराचे बळी पडलेले, आजारी, मानसिक आजार असलेले: आपण ज्यांची नावे वेदीवर ठेवली आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ७. मरण पावलेल्या सर्व परदेशीय आणि प्रियजनांसाठी: देव त्यांच्या अनंतकाळच्या जीवनाच्या प्रवासात त्यांना मिठी मारेल. आम्ही विशेषत: आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.