Thursday 25 June 2015


Reflection for Homily By : Wicky Bhavigar





सामान्य काळातील तेरावा रविवार




दिनांक: २८/०६/२०१५.
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ: १: १३-१५.
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र : ८:७-९,१३-१५.
शुभवर्तमान: मार्क ५:२१-४३.

             ‘प्रभूचे सामर्थ्य ओळखा व त्याच्यावर विश्वास ठेवा’ 
  

प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा मुख्य विषय ‘प्रभूचे सामर्थ्य ओळखा व त्याच्यावर विश्वास ठेवा’ आहे. आजच्या तिन्ही वाचनात आपण ऐकतो कि, वेळोवेळी मानव देवापासुन बहकला परंतु देवाने मानवाला पुन्हा आपल्या जवळ आणले. अनेक प्रकारच्या संकटांतून, अडीअडचणींतून देवाने मानवाचा बचाव केला आणि त्याला आपल्या करुणेचा व मायेचा स्पर्श दिला. आजच्या शुभवर्तमानात येशु एका रोगग्रस्त स्त्रीला तिच्या बऱ्याच दिवसापासून जडलेल्या व बऱ्या न होणाऱ्या रोगातून मुक्त करतो.
आपल्याही जीवनात सर्वकाही सुरळीत चालण्यास आपल्याला प्रभूच्या स्पर्शाची गरज आहे. ह्या मिस्साबलीत सहभागी होत असताना आपण प्रभूकडे क्षमेची याचना करूया आणि त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हावर व्हावा म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन
आजच्या पहिल्या वाचनामध्ये म्हटले आहे की, सर्व अधिकार मानवाकडे नसून प्रभूयेशुकडे सोपविले आहे. म्हणूनच येशूने त्याच्या पवित्र सामर्थ्याने सर्व गोष्टींना अस्तित्व असावे म्हणून त्या निर्माण केल्या आहेत. देवापासून दूर झाल्याने आपण पापांमध्ये जगत असतो. पण येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र सामर्थ्याने आणि अधिकाराने मृत्युच्या पाशातून आपल्याला सोडवितो.

दुसरे वाचन
     आजच्या दुसऱ्या वाचनात सांगितले आहे की, आपल्या प्रभूयेशुच्या सामर्थ्याविषयी भरपूर विचार करा. कारण तो संपत्तीने, सामर्थ्याने, सन्मानाने, स्वर्गीय सुखाने धनवान व संपन्न होता. पण तो इतरांच्या भल्यासाठी जगाला व शेवटी स्वताचा प्राण आपणासाठी दिला.

शुभवर्तमान: मार्क ५:२१-४३. 
      आपण शुभवर्तमानात पाहतो की, मनुष्याच्या मनाचा व व्यक्तिमत्त्वाचा नाश करीत असलेल्या अशुद्ध आत्माला काढण्याच्या येशूच्या सामर्थ्याचा लोकांनी अनुभव घेतला. त्याने एका रोगग्रस्त स्त्रीला बरे केल्याने असाध्य रोग बरे करण्याच्या त्याच्या सामर्थ्याची त्यांना प्रचीती आली. तसेच त्याने मृत मुलीला उठविल्याने मृतांनाही जीवन देण्याच्या सामर्थ्याचा त्यांना अनुभव आला.
अ)   रोग किंवा आजार – आजार हा हळूहळू नाश करणारा व अत्यंत हाल करणारा शत्रू आहे (२५, २६). त्या गरीब बाईने वैद्याच्या हातूनही उपचार करून घेतले होते तरी ती बरी झाली नव्हती. अशा व्यक्तीला सभास्थानात जाण्याची परवानगी नव्हती (लेवीय १५:२५-२७). सर्व मानवी प्रयत्न व्यर्थ ठरले होते.
     अश्यावेळी ती स्त्री कसलाही गाजावाजा न करता ख्रिस्ताकडे विश्वासाने आली. ख्रिस्तच तिचा रोग दूर करण्यात समर्थ होता, याची तिला पूर्ण खात्री होती. त्याने तिचा विश्वास ओळखला व तिला रोगमुक्त केले. ख्रिस्ताने जे केले होते, त्याची साक्ष देण्यास त्याने तिला धैर्य दिले (३३) व तिला शांतीने आपल्या समाजात साक्ष देण्यास पाठविले.
ब) मरण: सभास्थानाचा अधिकारी आपल्या मुलीला मरणापासून सोडवू शकत नव्हता. मरण अटळ आहे. ते कायमचे दूर करते. ते दुःखात लोटते. ते आशाहीन बनविते व देवापासून दूर करते. पापामुळे मानव नरकाकडे चालला आहे. हे दुसरे मरण आहे (प्रकटी २१:८; २०:१४,१५). येशूच्या आज्ञेमुळे, ती मुलगी वस्तुतः तीच बारा वर्षाची आहे, भूत नव्हे! हे समजून येण्यास व त्याचे भय नाहीसे होण्यास कशी मदत झाली.
प्रभुने काय केले: मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून तिचा बाप किती दुःखी व निराश झाला असेल. तरी प्रभुने त्याला धीर दिला व स्वतःवर विश्वास सांगितले (३६). प्रभूने त्याला ते सत्य सांगितले (३९). प्रभूने आपल्या अधिकाराने त्या मुलीला मुक्त केले (४१, ४२) त्याने त्या मुलीची गरज ओळखली (४३). ख्रिस्ताने मरणावर विजय मिळविला आहे. तो नरकापासून मुक्त करणारा आहे (योहान ५:२४, रोम ६:२५). मरणातून मुक्त झालेल्याची नावे पुस्तकात लिहिली जातात.

मनन चिंतन:
प्रभूचे सामर्थ्य ओळखा व त्याच्यावर विश्वास ठेवा(१-६).
     नासरेथचे लोक प्रभू येशूला सुतार, मारीयेचा मुलगा, आमच्यापैकी एक गरीब व अशिक्षित असे मानीत होते. तो थोर देवही होता हे त्याने आपल्या कृत्यांनी प्रगट केले होते. तो ज्ञानाने परिपूर्ण होता. तरी त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला नाही(३). त्यांचे विचार सत्याला धरून नव्हते(४). ते ख्रिस्ताला मान देत नव्हते(योहान ७:१५-१७) व सत्य स्वीकारण्यास नम्र नव्हते(४) हा त्याचा अविश्वास होता. आजच्या शुभावर्तमानात प्रभू येशु रोगग्रस्त स्त्रीला बरे करितो व खऱ्या देवाराज्याची सुवार्ता पसरवितो. आपण त्याचा आरोग्यदायी स्पर्श अनुभवासाठी त्याचे देवत्व व सामर्थ्य विश्वासाने स्वीकारायला हवे. आज आपण पाहीले तर तोच प्रभू येशु सर्वासाठी शारिरीक, मानसिक व आत्मिक आरोग्यादानाचा वर्षाव करीत असतो. त्याच्या स्पर्शात तारण व जीवन आहे. त्याच्या वचनात जीवनाची परिपूर्ण आहे. तो करुणेचा आणि ममतेचा झरा आहे. प्रभू येशु केवळ आमचा आरोग्यादातच नव्हे तर सामर्थ्यशाली देव आहे. ह्या येशूवर पूर्ण विश्वास ठेवून त्याला आपले संपूर्ण जीवन समर्पित करुया. ह्या घडलेल्या चमत्काराद्वारे अनेक संदेश आपल्याला घेता येतात. येशुवरील श्रद्धेत बळकट असलेल्या माणसाच्या प्रार्थनेला उत्तर मिळते. आपल्या प्रार्थनेने इतरांच्या जीवनात परिवर्तन घडू शकते. प्रभू येशु आपल्या पापाची क्षमा करणारा देव आहे.
     समाजाने बहिष्कृत ठरवलेला व अस्पृश्य मानल्या गेलेल्या स्त्रीला येशूचा स्पर्श झाला व तिचा रोग अदृश्य झाला. समाजात सन्मानाने जीवन जगण्याची आशा तिलाच नव्हे तर इतरांच्या मनात सुद्धा निर्माण करावी लागेल. प्रभू येशूमुळे असंख्य आजारी व अपंग लोकांना आरोग्यादन मिळाले. प्रभू येशुचा स्पर्श आजसुद्धा तितकाच प्रभावी व गुणकारी आहे. ह्या सामर्थ्यशाली प्रभू येशूच्या कृपेचा, करुणेचा व प्रेमाचा स्पर्श आपल्या प्रत्येकाला व्हावा म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे सामर्थ्यशाली प्रभू आमचा विश्वास मजबूत कर.
  1. अखिल ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व धर्माभागिनीसाठी प्रार्थना करूया की, जेणेकरून त्यांनी आपल्या श्रध्येत दृढ व्हावे व प्रभूच्या लोकांचे परिवर्तन करावे.
  2. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जे आजारी आहेत अश्या सर्वांना सदृढ, शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे व त्याचे सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे कोणी देवापासून दूर गेले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करू या, जेणेकरून त्यांनी मागे वळून परत एकदा सामर्थ्यशाली येशूला आपला देव म्हणून स्वीकारावे व आपले संपूर्ण जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया. 

Wednesday 17 June 2015

Reflection for the Homily By: Valerian Patil.






सामान्य काळातील बारावा रविवार



दिनांक: २१/०६/२०१५
पहिले वाचन: इयोब ३:१, ८-११
दुसरे वाचन: २ करींथ ५: १४-१७
शुभवर्तमान: मार्क ४: ३५-४१

प्रस्तावना:
            आज आपण सामान्य काळातील बारावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो आणि आईच्या गर्भाशयातच किंवा जन्मताच मी मरण का पावलो नाही असे प्रश्न विचारतो. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात, ‘ख्रिस्ताच्या प्रेमाच्या नियंत्रणाखाली आम्ही आहोत, जो कोणी ख्रिस्ताशी संयुक्त झालेला आहे तो ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती आहे असे सांगत आहे. तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त समुद्रातील वादळाला शांत करून शिष्यांना धीर देत असल्याचे आपण पाहतो.
     आपल्या जीवनात येणाऱ्या कितीतरी लहान-मोठ्या संकटाना पाहून आपण भयग्रस्त होत असतो, परंतु येशू आम्हाला आमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी विशेष कृपा देत असतो. तीच विशेष कृपा ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असतांना मागूया. 

पहिले वाचन: इयोब ३:१, ८-११
            इयोबचे पहिले भाषण, ह्यामध्ये त्याने स्वत:चे दुःख वर्णिले आहे. इथे एका माणसाच्या अनुभवातून सर्वसाधारण मानवजातीचा उल्लेख केलेला आहे असे समजते. शोकाच्या जबर आघाताने व्याकूळ झालेला माणूस ‘इयोब’ हा होय. इयोब म्हणतो जन्मतःच मेलो असतो तर बरे झाले असते. इयोबच्या भाषणातून निराशेचा सूर लावलेला आपणास जाणवतो. आता त्याने प्रश्न उपस्थित केले की, असे शापित जन्माला येण्यापेक्षा, मी जन्मताच मेलो का नाही? आईच्या उदरातून मृत असाच बाहेर का आलो नाही? अश्या शापित जीवनापेक्षा त्याला मरण अधिक प्रिय झाले आहे असे येथे दिसून येते.

दुसरे वाचन: २ करींथ ५: १४-१७
            ख्रिस्ताचे मरण आणि पुनरूत्थान यांचा एक परिणाम म्हणजे, पौलाला मिळालेली ‘नवी दृष्टी’ होय. तो आता ख्रिस्ताकडे नव्या दृष्टीकोनातून पाहतो. जर कोणी ख्रिस्ताठायी वसत असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. या वास्तव विधानातून ख्रिस्ताच्या थोर महात्त्वपुर्णतेचे दर्शन होते आणि त्यावरून जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे असे ठामपणे म्हणता येते. ख्रिस्ताचे त्याच्यावरील हे व्यक्तीगत प्रेम पौलाला स्वतःसाठी (स्वार्थी) जीवन जगण्यापासून परावृत्त करते. व ख्रिस्ताठायी जगण्यास प्रवृत्त करते. खरोखर पेत्र हा ख्रिस्तासाठी जगला व ख्रिस्तासाठीच मेला. ख्रिस्ताचे मरण व पुनरुस्थान हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचे होते.

शुभवर्तमान: मार्क ४: ३५-४१
     ह्या विशिष्ट उताऱ्यात विविध क्षेत्रामधील अधिकाराची उदाहरणे व त्याबाबतीत केलेल्या चमत्काराचे वृत्तांत आपणास ऐकावयास मिळतात. येशूने चमत्कार केल्याचे नव्या करारात ठामपणे व स्पष्टपणे नमूद केले आहे. हा चमत्कार येशूचा निसर्गावर असलेला अधिकार स्पष्ट करतो. गालील सरोवराच्या अगर समुद्राच्या भोवताली उंच डोंगर आहेत आणि या रांगांच्या दरम्यान अरुंद एकेरी दऱ्या आहेत. या दऱ्यांतून वारा अचानक सोसाट्याने उसळून वाहतो, त्यामुळे लाटा उफाळून केव्हाही  तेथील समुद्रात वादळ निर्माण होते.
     जेव्हा येशू व शिष्य माचाव्यात होता, तेव्हा वादळ सुरु झाले. तेव्हा शिष्य खूप घाबरले त्यांनी येशूला निद्रावस्थेत असलेल्या येशूला जागे करून त्याच्याकडे त्यांच्या बचावाची मागणी केली. त्यांनतर येशूने वाऱ्याला आणि वादळाला धमकावले आणि खवळलेला समुद्र शांत झाला. हे कृत्य निर्माणकर्त्याशिवाय अन्य कोणालाही शक्य झाले नसते. जुन्या करारात केवळ देवच एक वादळे उठवणारा व शांत करणारा आहे असे आपणास वाचावयास मिळते. शिष्यांना यातील फक्त अर्धेच सत्य उमगले आणि ते स्पष्टपणे बोलण्याचे भानही त्यांना उरले नव्हते, कारण ते घाबरले होते.
     येशूच्या शिष्यांनी त्याच्यावर अ-विश्वास दाखवला, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांची कानउघडणी केली. ह्या कृत्याने शिष्यांचा येशूवर असलेला विश्वास दृढ झाला. एखाद वादळ शांत करणे अगर न करणे हे विश्वासावर नव्हे तर देवाच्या इच्छेनुसार अवलंबून असते हेच येथे दिसते. देवाचे कार्य केवळ देवालाच करता येते.

बोधकथा:
      मासेमारी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि आम्ही आमचे उदरनिर्वाह ह्या मासेमारीच्या व्यवसायावर करतो. मे महिन्याचे दिवस होते आणि ह्या मे महिन्यात समुद्रात वादळ होत असतात. एकदा मी, माझा भाऊ आणि माझे वडील, मे महिन्यात पहाटे समुद्रात मासेमारी करण्यास गेलो होतो. पहाटेचे चार वाजले होते आणि आम्ही समुद्र किना-यावरून मासेमारीसाठी आमची बोट घेऊन निघालो होतो.
     अर्ध्यातासानंतर आम्हास समुद्राच्या लाटांचा प्रवाह वाढत असल्याचे आढळले. त्यावेळी आमची बोट थोडी लहान होती. त्या बोटीचे चालक माझे वडील होते. वडिलांनी आम्हाला झोपेतून उठवले आणि सावध राहण्यास सांगितले. आमच्या बरोबर असलेल्या बोटी सुद्धा सावध होत्या. अचानक समुद्राच्या लाटांचा प्रवाह वाढत गेला. आमच्या पुढे जात असलेली एक बोट एका क्षणात पाण्यात बुडाली.
     त्या बोटीतील माणसे आपला जीव वाचण्यासाठी इतर बोटींना हाका मारू लागली. माझ्यातर जीवात जीव राहिला नव्हता. माझा भाऊ तर आपला प्राण हातात घेऊन उभा होता. परंतु माझे वडील मात्र शांतपणे आमची बोट वल्हवत होते. वडिलांनी आम्हांला सुखरूप नेले आणि आणले.
येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या जीवनाच्या नावेत असतो तेव्हा आपण आपल्या जीवनाची नाव कितीतरी वादळे किंवा संकटे असली तरी ती सुखरूपपणे समुद्र किनारी आणू शकतो.

मनन चिंतन:
     आजचे शुभवर्तमान आपल्याला महत्वाचा संदेश देत आहे. आपलं जीवन एका बोटीसारखे आहे व जग एका समुद्रप्रमाणे आहे. त्या समुद्रात कधी वादळ, संकटे येतात परंतु जर आपण येशूवर विश्वास ठेवला तर तो आपली बोट त्या वादळातून समुद्र किनारी नेईल. परंतु बऱ्याचदा आपण शिष्यांसारखे एखादे संकट उंबरठ्यावर दिसू लागल्यास आपला विश्वास ढासळतो व आपण अविश्वासू बनतो. प्रत्येकाच्या जीवनात वादळे, संकटे येतात मग ती लहान किंवा मोठी असतात. परंतु त्या संकटांना कश्याप्रकारे सामोरे जावे ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. शांतपणे, दृढ विश्वासाने वादळ सोसता यावे म्हणून देवाने संत पेत्राला शक्ती पुरवली. बऱ्याच वेळा देव आम्हालाही संकटातून वाचव असतो, तो आम्हाला मरणाच्या दाढेतून सोडवतो आणि काही वेळा आमच्या मरणाने आपल्या नावाचा गौरव करून घेतो (उदा. त्याचे विश्वासू शिष्य बनून जगल्याचा बहुमान आपल्याला मरनानंतर प्राप्त होतो).
आज्ञापालनाच्या वाटेने चालताना व प्रभू येशूच्या आज्ञा पाळताना छळाची वादळे उठली, संकटाचे वारे घोंगावू लागले, अगर दुसरी काही आपत्ती आली तरी आपण त्याच्यावर सर्वस्वी विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव आपला राखण करणारा आहे हेच आपण आजच्या शुभवर्तमानात तसेच इतर दोन्ही वाचनात ऐकले. तो आपला फक्त निर्माणकर्ताच नव्हे तर तो आपला संरक्षणकर्ता देखील  आहे. कधी-कधी आपल्याला वाटते जेव्हा आपण आज्ञाभंग करतो तेव्हा आपल्या जीवनात संकटे येतात, परंतु हे नेहमीच खरे असते असे नाही. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्या समुद्रातून प्रवास करावा लागतो. संकटे बऱ्याचदा माणसाला देवाच्या जवळ आणतात. उदा. जसे शिष्य येशूच्या जवळ आले. पहिल्या प्रथम ते घाबरले नंतर त्यांनी येशूला उठवले, कारण त्यांना ठाऊक होते, येशूच त्यांना ह्या संकटातून बाहेर काढील. चमत्कार हा महत्वाचा नव्हता तर त्याहून महत्वाचे होते शिष्य व येशू ह्याचा संपर्क, कारण येशू त्यांना घडवत होता. जीवनात त्यांना धाडसी बनवत होता.
  जशी इयोब व पेत्र ह्यांच्या जीवनात किती तरी वादळे व संकटे आली परंतु त्यांनी त्यांचा देवावरील विश्वास डळमळीत होऊ दिला नाही तर तो कायम ठेवला. ते देवाच्या आज्ञेत राहिले. तसेच आपणसुद्धा आपल्या जीवनात न डगमगता देवावर विश्वास ठेवावा म्हणून आजची उपासना आपणा सर्वांस पाचारण करीत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
1. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ बंधूभगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात, त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपणा प्रार्थना करूया. 
2. यंदाच्या वर्षी चांगले हवामान मिळावे, चांगला पाऊस लाभावा व सर्व शेती-बागा पिकांनी व फळाफुलांनी बहरून याव्यात म्हणून आपणा प्रार्थना करूया. 
3. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आपणा प्रार्थना करूया.
4. जे लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना देवाचा स्पर्श होऊन त्यांनी येशूला आपला तारणारा आहे असा विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
5. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.



Friday 12 June 2015

 Reflections for Homily By: Manuel Fernandes


सामान्य काळातील अकरावा रविवार


दिनांक: १४/०६/२०१५
पहिले वाचन: यहेज्केल. १७:२२-२४
दुसरे वाचन: २ करिंथ  ५: ६-१०
शुभवर्तमान: मार्क ४: २६-३४

प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देव म्हणतो की, ‘मी निचास उंच व जे स्वत:ला उंच असे मानतात त्यांना नमविल’. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथिकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये, ‘श्रद्धेच्या मार्गदर्शनाने आम्ही धैर्याने वागतो आणि प्रभूला संतोषविणे हेच आमचे ध्येय होय’ असे म्हणतो. तर संत मार्कलिखित शुभवर्तमानात येशू देवराज्याची तुलना ‘मोहरीच्या बी’ बरोबर करतो. मोहरीचे बी दिसण्यात जरी लहान असले तरी रुजल्यानंतर ते सर्व झाड्पाल्यांमध्ये मोठे होते आणि त्याच्या सावलीत पक्षांना बसण्यास आसरा मिळतो.
 मोहरीचा दाणा खूपच लहान असतो परंतु तो रुजला, वाढला आणि त्याचे वृक्षात रुपांतर झाले तर अनेकांच्या आश्रयाचे ते आशास्थान बनते. आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर जर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते. म्हणून त्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या मिस्साबलीत मागुया व प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल: १७:२२-२४
     यहेज्केल संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आलेला देवाचा संदेश समजण्यासाठी या मागची पार्श्वभूमी जाणून घेणे योग्य ठरेल. शलमोन राजा कालवश झाल्यानंतर दोन राज्यांची स्थापना करण्यात आली. त्यापैकी एक म्हणजे इस्रायल होय; परंतु त्याची यहेज्केल असतांना धूळधाण करण्यात आली होती.
     येशू येण्याच्या ६०० वर्षापूर्वी, बाबीलोन शहराचा राजा नेबुकदनेझर ह्याने येरुशलेम शहर धुळीस मिळविले आणि त्या शहराचा राजा जेहोयाकिम ह्याला त्याच्या प्रजेसह बंदिस्त केले. नंतर नेबुकदनेझर ह्याने स्वत:चा गौरव करवून घेण्यासाठी झेदेकीया याची राजा म्हणून तेथे नियुक्ती केली. यिर्मया संदेष्टा त्याकाळात जिवंत होता, त्याला त्या शहरात राहण्यासाठी राजाकडून काहीही हरकत नव्हती. देवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे येरुशलेम शहर वाचविण्यासाठी नेबुकदनेझर व झेदेकीयाने स्वत:ला बाबीलोनच्या राज्याला शरण यावे असे संदेश पाठविले.
     झेदेकीया राजाने हे सर्व संदेश धुडकावून लावले. तसेच त्याने इजिप्तच्या राज्याच्या बळावर नेबुकदनेझर राजाविरुद्ध बंद पुकारला. काही काळानंतर बाबिलोनवासियांनी जेरुसलेम शहरावर हल्ला चढवून त्यात असलेली देऊळे ह्यावर कब्जा मिळविला आणि राजाला कारावासात ठेविले. नेबुकदनेझरने झेदेकीया राजाच्या मुलांची कत्तल केली व राजाचे डोळे काढून त्याला आंधळे केले.
     साधारणत: हा इस्रायलचा अंत असायला हवा होता, कारण बाबीलोनचा राजा अतिशय बलशाली होता व त्याच्याकडून त्यांची सुटका होणे अशक्यच होते. ह्याच काळात परमेश्वराने यहेज्केल संदेष्ट्याद्वारे संदेश पाठविला. ह्या संदेशामध्ये झाडे व पक्षी म्हणजेच राज्य आणि त्यात वसणारी जनता.
            पॅलेस्टीन शहराच्या उत्तरेला असलेल्या पर्वतरांगांना ‘लेबनॉन’ असे म्हणतात. त्यावर उंच आणि सुंदर अश्या प्रतीचे झाड उगवते. त्या झाडापासून उत्कृष्ट लाकूड मिळते, त्यास ‘लेबनॉनचे गंधसरू’ म्हणून ओळखले जात. शलमोन राजाने हेच गंधसरू येरुशलेमचे मंदिर बांधण्यासाठी वापरले. यहोवाने संदेष्ट्याद्वारे सांगितले की, तो स्वत: गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी घेऊन ती लावील आणि त्याचे रुपांतर तो सुंदर व बलाढ्य अश्या झाडामध्ये होईल. ह्या झाडाच्या छायेखाली सर्व पशु पक्षी निवास करतील. हे झाड परमेश्वराच्या राज्याचे प्रतिक होय. सर्व राष्ट्रे ह्यात सहभागी होण्यासाठी तो आमंत्रण करतो.
     त्याचबरोबर कालांतराने ही सर्व राष्ट्रे एका मागोमाग नाश पावतील असे यहोवा म्हणतो; परंतु आपणास इतिहासातून कळते की, देवाचे राज्य सदा सर्वदा टिकेल, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही.

दुसरे वाचन: २ करिंथ  ५: ६-१०
देवाकडे आपल्याला केवळ विश्वासाने जाता येते. पौल पुढे म्हणतो, शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृह्वास करणे हे आम्हांस अधिक बरे वाटते कारण या स्थितीत प्रभूला नेत्रांनी पाहता येते, आता विश्वासाने त्याला पाहण्याची गरज नाही. ख्रिस्ताचे दुसरे येणे होण्यापूर्वीच पौल मरण पावला तर त्याला देहरहित अस्तित्वाचा अनुभव घ्यावा लागेल याची त्याला जाणीव असल्याचे येथे दिसते. पण ही देहरहीत अवस्था कशी असेल ह्याविषयी त्याने काहीच सूचित केलेले नाही.
अखेरीस आपल्या भावी अवस्थेविषयी अंदाज बांधणे महत्वाचे नाही, आपण कोणत्याही स्थितीत असले तरी तेथूनही देवाला निश्चयपूर्वक संतोष देत राहणे हेच महत्त्वाचे आहे. आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. त्यावेळी आपण प्रत्येकाला देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळेल, मग ते बरे असो वा वाईट असो. देहाने केलेल्या गोष्टी म्हणजे या जीवनात कोणाही व्यक्तीने केलेले कृत्य असाच या संदर्भाचा अर्थ आहे. आमच्या सर्व कृत्याबद्दल आपण देवाला जबाबदार आहोत आणि योग्य असेल त्याप्रमाणे आम्हाला लाभ होईल किंवा हानी सोसावी लागेल.

शुभवर्तमान: मार्क ४: २६-३४
आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या राज्याची सतत शांतपणे वाढ होत असते हे आम्हाला पहिल्या दाखल्यातून सांगण्यात आले आहे. आपण चिंतातूर होऊन धडपड करण्याची काहीच गरज नाही. पेरलेले बी वाढून आपोआप फळ देईल. नैसर्गिक वाढीची प्रतिक्रिया आम्हाला समजत नाही. पण त्या वाढीत सहभागी होण्यासाठी ती समजून घेण्याची आम्हाला गरज नाहीच फक्त बीज अंकुरून वाढीस लागण्याच्या स्थितीत असणं मात्र गरजेचे आहे. पीक मिळण्याचे अभिवचन तर आहेच पण त्याबरोबर पवित्र शास्रात अनेकदा देवाच्या न्यायाची सूचनाही आहे.
दुसऱ्या दाखल्यामध्ये पुन्हा जवळजवळ लक्षात न येणारी वाढ आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम याचे वर्णन केले आहे. ‘मोहरीचे बी’ अगदी छोटे असते पण त्याची वाढ झाली की कालांतराने मध्यपूर्वेतील एक मोठ्यात-मोठया रोपात त्याची गणना केली जाते. देव-राज्याची वाढही अशीच असते. प्रारंभी ते अगदी अल्प वाटते पण अखेरीच त्याचाच जय होतो.

मनन चिंतन:
“स्वर्गराज्य मोहरीच्या दाणासारखे आहे.”
प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वसामान्य लोकांना देवाची योजना आणि स्वर्गराज्याची शिकवणूक देताना साध्या व व्यवहारातील अनेक गोष्टीचे दाखले दिले. आजच्या शुभवर्तमानातील मोहरीच्या दाण्याचा दाखला खूपच प्रेरणादायी आहे. मोहरीचा दाणा खूपच लहान असतो परंतु तो रुजला, वाढला आणि त्याचे वृक्षात रुपांतर झाले तर अनेकांच्या आश्रयाचे ते आशास्थान बनते. आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर जर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते.
आज आपण आपल्या जीवनावर मनन चिंतन करू या. आपल्या जीवनाला पोषक आणि प्रेरणादायी शब्द आपण लक्षपूर्वक ऐकतो का? आपल्या दररोजच्या आचरणाशी त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो का? आपले जीवन खरोखरच परमेश्वराच्या आध्यात्मिक कृपादानांनी बहरत आहे का?
आपल्या जीवनात परमेश्वराला प्राधान्य दिलेले असेल तरच आपण त्याच्या कृपेचा अनुभव प्राप्त करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे सर्वस्व अर्पण करून आपणा सर्वांचे तारण केले. प्रभू येशू ख्रिस्ताठायी आपण सर्वजण मोहरीच्या दाण्यासारखे आहोत. आपण जरी स्वतःला अपात्र समजत असलो; अनेक प्रकारच्या वाईट वर्तणुकीमुळे देवापासून दूर गेलेलो असलो तरीसुद्धा परमेश्वर आपल्यावर करुणामय दृष्टीने पाहतो. आपण देखील देवाचा म्हणजेच स्वर्गराज्याचा शोध घेतला पाहिजे.
देवाचे राज्य:
देवराज्यासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानात दोन दाखले सांगितले आहेत. जमिनीत बी टाकल्यावर शेतकरी त्याची मशागत करून निश्चींतपणे झोपतो. त्या बीजाला अंकुर कसा फुटतो व त्याचे रोपटे तयार होऊन त्याला कणीस कसे लागते हे शेतकऱ्याला कधीच कळत नाही. देवाने घातलेल्या निसर्गाच्या नियमानुसार सर्व काही घडत असते. आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. देवाचे राज्य तसेच आहे. देवाच्या वचनाचा अंकुर माणसाच्या जीवनात वाढत जातो आणि माणूस देवाच्या आधीन असल्यामुळे देवराज्याच्या दिशेने आपोआप वाटचाल सुरु करतो.
प्रभू येशूने सांगितलेला दुसरा दाखला मोहरीच्या दाण्याचा आहे. अगदी लहान असलेला मोहरीचा दाणा हळूहळू वाढत जातो व त्याचे रुपांतर मोठया वृक्षात होते. आज आपण पाहत आहोत की देवाच्या वचनावर श्रद्धा ठेऊन ख्रिस्तसभेचा पाया अशाच बारा प्रेषिताच्या सहाय्याने उभा राहिला. आज त्याचे महावृक्षात रुपांतर झाले. देवाचे राज्य छोटयाशा कृतीद्वारे सुरु होते व देवाच्या योजनेप्रमाणे ते बहरते व फलद्रूप बनते.
आपल्या जीवनात देवराज्याचा अंकुर वाढवा म्हणून विश्वासाने आपण आपले सर्वस्व देवाच्या हातात सोपवू या. श्रद्धेने त्याच्या कृपेवर अवलंबून राहू या. आपली छोटीशी कृती मग ती प्रार्थना, उपासना, भक्ती व सेवा अशा माध्यमातून जर सुरु झाली तर देवाच्या योजनेप्रमाणे विशाल स्वरूप धारण करू शकते. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
  1. आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. जे आजारी आहेत त्यांना चांगले आरोग्य, जे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे व जे एकटे आहेत अशांना प्रभूप्रेमाचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहेत, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे लोक दुःखी-कष्टी व बेरोजगार आहेत अशांना देवाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे चांगले काम दयावे व त्यांच्यावर असलेली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करूया.