Thursday 27 February 2020


Reflections for the Homily of 1st SUNDAY OF LENT

(01-03-2020) By Dn. Jackson Nato





प्रायश्चित काळातील पहिला रविवार




दिनांक: ०१/०३/२०२०
पहिले वाचन: उत्पती २:७-९; ३:१-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ५:१२-१९
शुभवर्तमान: मत्तय ४:१-११

“पश्चाताप करा व प्रभुकडे वळा.”


प्रस्तावना:

          आज आपण प्रायश्चित (उपवास) काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. उपवास काळ म्हणजे प्रभूकडे येण्याचा काळ आणि त्यासाठी ख्रिस्तसभा आपल्याला तीन गोष्टींचे पथ्य पाळण्यास सांगत आहे. ती पथ्ये म्हणजे प्रार्थना, उपवास आणि दानधर्म, ज्याद्वारे आपण ऐहिक गोष्टींपासून वंचित राहून ख्रिस्ताजवळ येऊ.
          आजच्या प्रभूशब्दावर मनन चिंतन केले तर; आपल्याला लक्षात येते की, पापामुळे मनुष्य परमेश्वरापासून दूर केला. पण तो दुरावा ख्रिस्ताने आपल्या बलिदानाने भरून काढला व मानवाला पुन्हा एकदा देवाजवळ आणले. आजच्या पहिल्या वाचनात आपण आदाम आणि हव्वाने पाप करून परमेश्वराशी असलेले नाते तोडले ह्याचा वृत्तांत ऐकतो. तर दुसऱ्या वाचनात हे तुटलेले नाते कशाप्रकारे जुळविले ह्याचे स्पष्टीकरण ऐकतो. पुढे शुभवर्तमानात आपण ख्रिस्ताला झालेले मोह व त्यावर त्याने मिळविलेला विजय ह्याबद्दल ऐकतो.
          आजच्या वाचनांचा सारांश असा आहे की, दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेक मोहांना बळी पडतो. हे मोह आपल्याला पापांच्या विळख्यात अडकवतात व देवापासून दूर घेऊन जातात. म्हणून त्यांना बळी न पडता परमेश्वराशी एकनिष्ठ राहावे तसेच  प्रार्थना, दानधर्म व उपवास ह्या हत्यारांनी मोहावर विजय मिळवावा व  त्यासाठी लागणारी कृपा आपण ह्या मिस्साबलीदानामध्ये मागूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पती २:७-९; ३:१-७

          आजच्या पहिल्या वाचनात आपण मानवाची उत्पत्ती व त्याची पापाला बळी पडण्याची गोष्ट ऐकतो. ही गोष्ट शब्दशः सत्य नसली, तरी त्यात दडलेला अर्थ मात्र खरा आहे. तो वेगवेगळ्या चिन्हाद्वारे आपल्यासमोर प्रकट केला आहे. तो असा की, परमेश्वराने नर व नारी निर्माण केले, म्हणजेच मानवास अस्तित्व दिले. सर्व चरांचरांवर त्यांना वर्चस्व दिले आणि मोबदल्यात फक्त परमेश्वराशी आज्ञाधारकपणा व आदराची अपेक्षा केली. ह्या देणगीने मानव गर्वाने फुगून गेला व देवासमान होण्याचा लोभ बाळगला. परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला. ज्याद्वारे पापाने जगात प्रवेश केला. ज्याचा परिणाम असा की, सारी मानवजात परमेश्वरापासून दूर गेली.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ५:१२-१९

          आजचे दुसरे वाचन आपल्याला ख्रिस्ताने मानवासाठी मिळविलेल्या तारणाबद्दल बोध करत आहे. ख्रिस्ताने मिळविलेले तारण हे पापाने पसरविलेल्या नाशापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे. म्हणून ख्रिस्ताच्या तारणदायी कृपेने फक्त आपण ह्या नाशापासून वाचलेले नव्हे तर, त्याही पलिकडे त्याने आपल्याला परमेश्वराची मुले बनविली आहेत. परमेश्वराला बाप किंवा आब्बा म्हणून हाक मारण्यास पात्र केले आहे. त्याद्वारे ख्रिस्ताबरोबर सार्वकाळीक जीवनाचे वारसदार केले आहे.

शुभवर्तमान: मत्तय ४:१-११

          आजचे शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्ताला झालेल्या मोहाबद्दल उपदेश करत आहे. ख्रिस्ताला झालेले मोह हे देवाच्या इच्छेप्रमाणे होते, जेणेकरून सैतान ख्रिस्ताची परीक्षा घेईल व मोबदल्यात पराजित होईल. ख्रिस्ताला झालेले तीन मोह हे कमजोर मानवी वृत्तीचे दर्शन घडवितात. जुन्याकरारापासून तर आजपर्यंत मानव पापाला बळी पडला आहे. तरीसुद्धा ख्रिस्त स्वतःला ह्या मोहाच्या परीक्षेत झोकून देतो. सैतान ख्रिस्ताच्या मानवी पैलूंचे परीक्षण करतो; पण ख्रिस्त त्यातून विजयी बाहेर येतो. ह्याद्वारे आपल्याला आशा देतो की, मानवी वृत्ती कितीही कमजोर असली तरी सैतानाच्या विळख्यात न सापडता त्याला धूडकारून लावण्याची शक्ती त्याच्यात आहे.

बोधकथा:

          काही वर्षपूर्वी अमेरिका रेल्वेसाठी पूल बांधण्यात येत होता. ह्या पुलाचे काम पूर्णत्वास आले तेव्हा एक रेलगाडी पूर्णपणे गाड्यांनी भरलेली जिचे वजन दुप्पट होते अशी पुलावर आणून उभी आहे हे पाहून एका कामगाराने बांधकाम करणाऱ्या माणसाला विचारले, “साहेब दुप्पट वजनाने भरलेली हि रेलगाडी पुलाच्या मध्य्भागी ठेवून तुमचा पूल पाडण्याचा विचार आहे की काय?” त्यावर गवंडी म्हणाला, “नाही, ही रेलगाडी उभी करून मी सिद्ध करू इच्छितो की, हा पूल एवढ वजन झेपून घेण्याएवढा मजबूत आहे.”

मनन चिंतन:

          आपण जीवनात येणारे मोह हे आपल्याला खाली पाडण्यासाठी नव्हे किंवा विध्वंस  करण्यासाठी नाही तर त्याद्वारे आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. आजच्या शुभवर्तमानात आपण ख्रिस्ताला झालेले मोहाच्या वृत्तांत ऐकला. ख्रिस्ताला झालेले हे मोह त्याला पापांत पडण्यासाठी नव्हे तर तो पापात पडू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी होते. ख्रिस्ताने मोहावर विजय मिळविला आणि त्याद्वारे आपणाला दर्शविले की मोहाला बळी पडणे म्हणजे पाप करणे. पाप आपल्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जाते. म्हणून ख्रिस्ताने मोहाला प्रतिकार करून पापात पडण्यास नकार दिला व त्याद्वारे त्याच्या पित्याच्या सहवासात राहण्यास प्राधान्य दिले. उलट आदाम आणि एवेने परमेश्वराच्या सानिध्यात असूनही पाप केले म्हणून आपण पाहतो की, त्यांना एदेन बागेतून म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यातून पळवण्यात आले.
          जर आपण आजच्या पहिल्या वाचना वर आणि शुभवर्तमाना वर नजर टाकली तर आपल्या लक्षात येते की दोन्ही वाचनात मोहाबद्दल वर्णन करण्यात आले आहे. पहिल्या वाचनात आदाम आणि हव्वा ह्यांना झालेला मोह तर शुभवर्तमानात ख्रिस्ताला झालेला मोह पण त्या दोघांचा मोहाकडे पाहण्याचा व ते हाताळण्याचा दृष्टीकोन परस्परविरोधी आहे. त्यांचा दृष्टीकोन नम्रता  गर्व ह्या पैलूतून उद्भवतो. आदाम आणि एवेकडे नजर फिरविली तर आपल्याला कळून चुकते की, ते गर्वाला मुकले. त्यांना देवासमान व्हायचे होते. जेव्हा सैतानाने एवेला म्हटले की, जर ह्या झाडाचं फळ तू खाल्लं तर तू देवासमान होशील तेव्हा ती गर्वाने भरली व तिचे डोळे फिरले. लागलीच तिने फळ खाल्ले व आदामालासुद्धा दिले. उलट येशूकडे पाहिले तर आपल्या लक्षात येते की, ख्रिस्ताने नम्रता अंगिकारली. सैतानाला जाणीव होती की, ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. तरीसुद्धा ख्रिस्ताने हे सिद्ध करावं, त्याने आपल्या दैवी शक्तीचा वापर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावा म्हणून सैतानाने त्याची परीक्षा घेतली, पण ख्रिस्त नम्र राहिला. त्याने अहंकाराची छायासुद्धा स्वतःवर पडून घेतली नाही. अशाप्रकारे त्याने मोहावर विजयी मिळविला.
          अहंकार मनुष्याला अंध करतो. अहंकारामुळे वास्तविकता पाहणे कठीण जाते. आदाम आणि हव्वेला परमेश्वराने फळ न खाण्याविषयी सक्त बंदी घातली होती आणि जर ते फळ खाल्ले किंवा त्याला स्पर्श जरी केला तरी त्याचा परिणाम मृत्यू हे काटेकोरपणे सांगितले होते. पण अहंकाराने त्यांना सैतानाचे शब्द खरे दाखवून देवाच्या शब्दाचा विसर पाडला. सैतानाचा शब्द पाळल्याने ते स्वतःवर मृत्यू ओढून शकतात हे ते विसरले. पण ख्रिस्ताने मात्र परमेश्वराच्या वचना प्राधान्य दिले. तो नम्र राहिला. म्हणून तो देवाचे वचन योग्यप्रकारे अमलात आणू शकला. उदाहरणार्थ; सैतानाने ख्रिस्तासमोर देवाच्या वचनाचा उल्लेख केला, तू जर देवाचा पुत्र असशील तर इथून उडी मार, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, तुला काही होऊ नये म्हणून देव त्याच्या दूतांना पाठवील व ते तुला झेलून धरतील.” पण ख्रिस्त नम्र होता. त्याला स्वतःची पात्रता सिद्ध करायची गरज नव्हती. म्हणून त्याने लागलीच सैतानाचा हेतू ओळखला. सैतानाने जरे शास्त्रलेख प्रकट करून स्वतःचा शहाणपणा प्रकट केला असला, तरी त्यात त्याचा धूर्तपणा होता. हे ओळखून ख्रिस्ताने लागलीच त्याला योग्य उत्तर दिले की, शास्त्रात असे सुद्धा लिहिले आहे की, परमेश्वर तुझा देव ह्यास परीक्षेत पाडू नकोस.” अशाप्रकारे ख्रिस्ताने सैतानाच्या शहाणपणा पराभूत केले.
          आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपण सुद्धा अनेक मोहांना बळी पडतो व कधी-कधी त्यांच्या आहारी जातो. ह्याचे कारण म्हणजे मोह आपल्याला वर-वरून चांगले दृश्य दाखवतात. तात्पुरते समाधान देतात. पण त्यांच्यामागे दडलेले जे कायमस्वरूपी वास्तव असते ते आपल्याला नंतर कळून चुकते. मोहाला शरण जाण्याने आपण पाप आचरणात आणतो. ज्याचा परिणाम असा की, परमेश्वराचे प्रेम हे ऐहिक सुखापेक्षा कमी आहे हे दर्शवतो. म्हणून ह्या गोष्टीस बळी पडू नये, परमेश्वराचे प्रेम हे जगापेक्षा अधिक मौल्यवान आहे. हे ओळखण्यासाठी आपल्याला प्रायश्चित्तकाळ दिलेला आहे. जेणेकरून आपण पापापासून दूर राहून परमेश्वराच्या अधिक जवळ यावे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला तुझ्याशी एकनिष्ठ ठेव.”

१. ख्रिस्ताची शिकवण जगाला देऊन त्याद्वारे जगाला ख्रिस्ताशी एकनिष्ठ करण्यास आपले पोप महाशय, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी व प्रापंचिक सतत प्रयत्न करत असतात. हे कार्य चालू ठेवण्यास त्यांना चांगले आरोग्य व योग्य ती कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज आपल्या देशात धर्माच्या नावाने कल्लोळ माजला आहे. सत्तेच्या नावाने हुकूमशाहीला जन्म घालण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा ह्या घटनांना काढून लावून, समता व बंधुता या मूल्यांना प्राधान्य दिले जावे व त्याद्वारे देशाची सामाजिक,  शैक्षणिक व आर्थिक पातळीवर प्रगती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज जगात वेगवेगळ्या ठिकाणी विशेष करून चीनमध्ये ‘कोरोना’ नावाच्या जीवघेण्या रोगाने बरेचसे लोक ग्रासलेले आहेत.  या रोगापासून होणारा धोका टाळावा व या रोगावर योग्य औषध लवकरात लवकर उपलब्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. उपवास काळ हा परमेश्वराचे प्रेम सर्व गोष्टीहून महान आहे हे ओळखण्याचा काळ. ह्या काळात आपण पापा पासून दूर रहावे व देवाजवळ यावे हयासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.


Friday 21 February 2020


Reflections for the homily on Ash Wednesday (26/02/2020) by Br. Brian V. Motheghar.



राखेचा बुधवार



दिनांक:२६/०२/२०२०
पाहिले वाचन: योएल::१२-१८
दुसरे वाचन: २करिंथ: :२०-:
शुभवर्तमान: मत्तय: :-, १६-१८




विषय: माती असशी मातीत मिळशी.”
प्रस्तावना:
          आज आपण राखेचा बुधवार साजरा करीत आहोत. हा दिवस ख्रिस्तसभेत फार महत्वाचा मानला जातो. कारण आज संपूर्ण ख्रिस्तसभा प्रायश्चित्त काळास सुरुवात करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा योएल हा आपणास सांगत आहे की, “आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदये फाडा परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे वळा.” (योएल: :१३) म्हणजेच आपल्या पापांचा पश्चाताप करून पापमुक्त रहा. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस दुसऱ्या पत्रात सांगत आहे की, “आम्ही देवाच्या वतीने विनंती करतो की, पापांपासून मुक्त व्हा, कारण पहा आताच समय अनुकूल आहे’ व तारणाचा दिवस आहे.’(२ करिंथ. :२०, ६:२) तसेच मत्तयलिखित शुभवर्तमानात ख्रिस्त आपणास योग्य पश्चातापासाठी लागणारे प्रार्थना, उपवास, व दानधर्म कसे करावे ह्याविषयी सांगण्यात आहे.
          देवाने आपल्याला हे चाळीस दिवस त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रार्थना, उपवास, दानधर्म अनेक चांगली कार्ये करण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे ह्या चाळीस दिवसांचा प्रारंभ आपण योग्यरितीने करण्याचा प्रयत्न करू या व ह्या प्रायश्चित्त काळात आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित्त करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास लागणारी कृपा, आशीर्वाद, व शक्ती ह्या मिस्साबलिदानात प्रभू परमेश्वराकडे मागूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: योएल::१२-१८
          संदेष्टा योएल ह्याने ख्रिस्तपूर्व ४०० कालखंडात हे लेखन केलेले असावे. त्याच्या पुस्तकात अनेकदा मंदिराचा संदर्भ येतो, म्हणजेच मंदिराची पुनर्बांधणी त्याकाळी पूर्ण झाली असावी. शासन करणारा प्रभूचा दिवसउगवेल हि त्याच्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
          आजच्या वाचनात संदेष्ट्याने पश्चाताप करण्याचे आवाहन दिव्य संदेशातून केले आहे. संदेष्ट्याने आरंभीच मेंढ्याच्या शिंगाची तुतारी फुंकून सर्व उपासकांना मोठ्या उपवासासाठी पाचारण केले आहे. संदेष्टा लोकांना विलाप, शोक आणि उपवास करण्याचे त्रिविध आवाहन करत आहे; ते सर्व येथे या दिव्य पाचारणात एकवटले आहे. तसेच संदेष्ट्याने मनःपूर्वक पश्चाताप करण्याचे अगत्य, स्पष्टपणे सांगितले आहे. आध्यात्मिकता आत व बाहेर एकसारखी असावी हाच त्याचा आग्रह आहे.
          योएलने परत फिराअसे आवाहन केले आहे कारण आपला देव हा कृपाळू, प्रेमळ व कनवाळू आहे. यासाठी आपण सतत देवाशी एकनिष्ठ असावे.

दुसरे वाचन: करिंथ.: :२०-:
          संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात आपणाला सांगत आहे की, आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.” (.२०) ख्रिस्त वधस्तभावर जे देवपित्याचे कार्य पूर्ण करणार होता त्याच्या आधारे त्याने शांतीची सुवार्ता गाजविली होती. ( इफिस.: :१७) तीच सेवा पौलाने पुढे चालविली आहे. देव आम्हांकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने बोलावे आणि देवाच्या सुवार्तेचे सत्य मांडावे.” (. २०) यासुवार्तेचा सारांश पौल आपल्याला सांगत आहे. (व. २१)
          ख्रिस्ताचा वधस्तंभ देवाची प्रीती जाहीर करतो. तसेच, ख्रिस्तानेही प्रीती केली. (योहान ३:१६, १५:१३) आपला तारणारा निष्पाप होता. त्याला पाप ठाऊक नव्हते व त्याच्या ठायी कपट नव्हते. (इब्री ४:१५, १ योहान ३:५) देवाने जगाचे पाप त्याच्यावर ठेवले यात हेतू हा की, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने ख्रिस्ताचे नीतिमत्व द्यावे. (व. २१) रोम ५:१७ ह्यात आपल्याला देवाने आपल्याला नितीमत्व कसे प्राप्त करून दिले आहे ह्याविषयी सांगण्यात आले आहे. आपणाला हे नीतिमत्व मिळाले आहे का? असेल तर देवाचे आभार माना.

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८
          आपण ज्यांना (ख्रिस्ताला) खुश करण्यासाठी जगतो त्यांच्याकडून प्रतिफळाची अपेक्षा करावी. आपले ख्रिस्ती जीवन कोणाला संतुष्ट करण्यासाठी आहे? व. १ व २ ह्यात आपल्याला ह्याचा सारांश दिला आहे. “तू दानधर्म करतोस तेव्हा.” (व. २-४) परूशी जेव्हा दानधर्म करीत तेव्हा या कृत्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी मिळेल ते पाहत. (व. २) लोकांनी आपला गौरव करावा असे त्यांना मनातून वाटत होते. प्रभू येशू त्यांना ढोंगी म्हणतो. त्यांचे हे धर्माचरण केवळ स्वार्थासाठी होते. (व. २)आपण दानधर्म करता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. ते इतके गुप्त असावे की, तू ते लवकरच विसरून जावे. (व. ३) तर मग, ते प्रतिफळ मनुष्य नव्हेत, तर, देवपिता प्रतिफळ देईल. आपला देव कोणाचा ऋणी नाही. नीति १९:१७ ह्यात आपल्याला देव आपली सत्कृत्ये कोणावर करावी ह्या विषयी सांगण्यात आले आहे.
          जेव्हा तुम्ही प्रार्थना करता.”(व. ६) सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास परूश्यांना फार आवडे. आपण किती धार्मिक आहोत असे पाहणाऱ्यांना वाटावे व त्यांनी आपले कौतुक करावे एवढाच त्यांचा उद्देश होता. आपण लांबलचक प्रार्थना केली तर देव ती ऐकतो असे त्यांना वाटे. (व. ७) प्रार्थना म्हणजे देवपित्याबरोबर एकांतात बोलणे. आपली प्रार्थना फक्त देवपित्याने ऐकण्यासाठी असते. आपण त्याला आपल्या गरजांची आठवण करून देत नाही, (व. ८) तर स्वत:ला त्या गरजांची आठवण देऊन पित्यावर अवलंबून राहतो. (व. ६)
          तुम्ही उपास करता तेव्हा.” (व. १६) आपण उपास करतो म्हणून फार धार्मिक आहोत असे परूशी मानत व तसे दाखविण्याचा प्रयत्नही करीत. हेही ढोंग-नाटकच होते. दानधर्म व प्रार्थना याप्रमाणे उपास देवासाठी गुप्तपणे करायचा होता. कशाचा तरी त्याग करून देवाच्या कार्यासाठी स्वत:ला वेगळे करणे हा खरा उपास आहे. (व. १७, १८)

बोधकथा
          फार पूर्वी एक राजा आपल्या कार्याद्वारे त्याच्या राज्यात बदल घडवून आणत होता. त्याच्या देखरेखीत तो त्याच्या प्रजेला उत्तम असे जीवन व सुखसोई देत होता. तो स्वतःहून आपल्या प्रजेकडे जाऊन त्यांच्या परिस्थितीची देखरेख करत असे. एकेदिवशी तुरुंगात जाऊन त्याला त्याच्या राज्यातील तुरुंग्यांची पडताळणी करून घ्यायची होती. यावर कारागृहातील अधिकारी आश्चर्यचकित झाला. परंतु राजाला कैद्यांची परिस्थिती पाहायची होती. ठरलेल्या दिवशी तो राजा जसा कारागृहात जाऊ लागला, तसेच सर्व कैदी त्याच्या जवळ येऊन विनवणी करू लागले, की, ‘आम्ही ते कार्य केले नाही. आम्ही गुन्हा केला नाही. आम्ही निरपराधी आहे.’ असे विनवू लागले. परंतु एक मनुष्य एका कोपऱ्यात आपले काम चालूच ठेवत होता. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजा त्या कैद्याच्या जवळ येऊन त्याला प्रश्न केला. “तुला काहीही सांगायचे नाही काय? तू इथे का आहेस?” त्यावर त्याने उत्तर दिले, “मी खून केला आहे सरकार.” राजाने दुसरा प्रश्न विचारला, “तुला त्या गुन्ह्याचे वाईट वाटत नाही काय?” त्यावर तो म्हणाला, “हो सरकार मला वाईट वाटते आणि मी त्या शिक्षेस पात्र आहे, म्हणून मी माझ्या गुन्ह्याचा पश्चाताप करत आहे. मी माझ्या सदसद्विवेकबुद्धी पुर्वक पाप केले आहे, ह्याचा मला पश्चाताप होत आहे. म्हणून मी तुमच्याकडे क्षमेची याचना करत नाही तर त्या देवाकडे माझ्या पापांची कबुली करत आहे.”

बोध:
          स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धी पुर्वक चूक करणे हे समजून घेणे म्हणजेच सर्वात मोठी शिक्षा आपण आपल्या स्वतःला देऊ शकतो. हे आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यातील स्रोताकडे परत जाण्यास भाग पाडते. देऊळमाता आपल्याला आज हेच सांगते की स्वतःच्या जीवनाच्या गाभाऱ्यात जाऊन आपल्या पापांची क्षमा मागून या पवित्र प्रायश्चितकाळात सहभागी व्हायला आपणाला आवाहन करत आहे.

मनन चिंतन:
          आजपासून ख्रिस्तसभा आपल्याला नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी आमंत्रण करीत आहे. प्रायश्‍चित्त काळ किंवा उपवास काळ हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील महत्वपूर्वक काळ आहे. ह्या काळात आपण आपल्या पापमय जीवनाचा त्याग करून, ख्रिस्ताच्या अधिक जवळ येण्यास प्रयत्न करत असतो. आजच्या दिवशी आपल्या कपाळाला राख लावली जाते. ही राख आपल्याला आपल्या वाईट कृत्यांची आठवण करून देते. ह्या राखेद्वारे आपल्याला आवाहन केले जाते की, “वाईट मार्ग सोडून चांगल्या जीवनास सुरुवात करा!” “पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” (मार्क १:१५) ह्या शब्दात आपले जीवन बदलण्यास आवाहन दिले जाते.
          राख हे पश्चातापाचे प्रतीक आहे. आपल्याला जुन्या करारात ह्याविषयी काहिक उदाहरणे आढळून येतात. उदाहरणार्थ एस्तेर ४:१-३, इयोब २:८, ३०:१९, ४२:६, यशया ५८:५, ६१:३, यिर्मया ६:२६, २५:३५, दानियेल ९:३, योना ३:६, इत्यादी. आपणाला नव्या करारात सुद्धा ह्याची उदाहरणे दिसून येतात, जेथे प्रभू येशू लोकांना बजावून सांगत आहे की, कशाप्रकारे अविश्वासी लोकांनी पश्चाताप केला असता तर ते वाचले असते. उदाहरणार्थ मत्तय११:२१, लुक १०:१३.
          आज आपण गोणपाट व अंगाला राख ओढण्या ऐवजी कपाळाला राग लावतो. ही राख फक्त देखावा नाही. तर आपल्याला आपल्या मानवी पापमुक्त जीवनाची आठवण करून देत आहे. आजपासून आपण चाळीस दिवसांचा तप ठेवणार आहोत. हा तप कोणासाठी? कशासाठी? ह्याचा आपण कधी विचार केला आहे का? प्रभू येशूने अरंण्यात चाळीस दिवस उपवास केला व सैतानाच्या मोहाला बळी न पडता त्यावर विजयी झाला. आज आपणालासुद्धा हे चाळीस दिवस सैतानी कृत्ये, विचार, शब्द, इत्यादी ह्यांच्यावर मात करण्यासाठी बोलावले आहे. त्यासाठी आपल्याला ख्रिस्तसभा आपले जीवन अजून चांगल्या प्रकारे जगण्यासाठी व आपले देवा बरोबरचे नाते, आपले इतरांबरोबरचे नाते, आपले निसर्गाबरोबरचे किंवा पर्यावरणा बरोबरचे नाते व आपले आपल्या स्वतःबरोबरचे नाते अधिक मजबूत व दृढ करण्यासाठी आमंत्रण देत आहे. हे करण्यासाठी आपल्याला आजच्या पवित्र शास्त्रात तीन मार्ग सुचवले आहेत. ते म्हणजे प्रार्थना, उपवास आणि दानधर्म.
१. प्रार्थना: आजपासून ख्रिस्तसभा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील जो थोडा वेळ आपण प्रार्थनेत घालत होतो, त्यात अधिक भर करण्यास सांगत आहे. जेणेकरून आपले देवा बरोबरचे नाते अधिक दृढ व त्याच्या सहवासात अधिक वेळ घालवण्यासाठी आमंत्रण देत आहे. प्रार्थनेत आपण फक्त मागत बसत नाहीत, तर, आपण देवाबरोबर संवाद साधतो. असे म्हणतात की ‘जगातील सर्व पुस्तके आपण वाचतो, परंतु बायबल असे एकमेव पुस्तक आहे जे आपल्याला वाचते’. म्हणजेच जे आपले जीवन वाचते, जे आपले अंत:करण वाचते. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा देव आपल्याशी त्याच्या शब्दाद्वारे नवजीवनाची गुरुकिल्ली देत असतो. आपल्याला नवीन मार्ग दाखवत असतो. ह्या प्रायश्चित्त काळात देवाचा संदेश ऐकण्यास व त्याच्याशी योग्य संभाषण करण्यासाठी आपल्याला बोलावण्यात आले आहे. प्रार्थनेमुळे आपण कोण आहोत? व देव कोण आहे? ह्याची आपल्याला जाणीव होते. ह्याद्वारे आपण आपली आध्यात्मिक भूक भागवत असतो.
२. उपवास: उपवास हे पश्चातापाचे प्रतीक आहे. पूर्वीच्याकाळी किंवा दुसरी वाँटीकन परिषदेपूर्वी ख्रिस्तसभेची अशी शिकवण होती की, शरीर हे एक पाप आहे. त्याची काळजी करणे म्हणजे आपण पापास आमंत्रण देतो. ही समज आजच्या आधुनिक युगात किंवा दुसऱ्या वाँटीकन परिषदेनंतर चुकीची समजली जाऊ लागली किंवा त्यात सुधारणा करण्यात आली. कारण “आपले शरीर हे देवाचे मंदिर आहे.” (१ करिंथ३:१६, १७, ६:१९) त्यासाठी आजच्या आधुनिक जीवनात आपण आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. तर मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण उपवास कशाचा करावा? कोणत्या गोष्टींचा करावा?
          आज आपल्याला नवीन समज दिली गेली आहे. ती म्हणजे आपण अन्नाचा उपवास करावा; तो फक्त शरीराची जिझ होण्यासाठी नव्हे, तर गरीबांबरोबर आपले ऐक्य साधण्यासाठी. आपण उपवास करावा तो म्हणजे आपल्या वाईट विचारांचा, वाईट कृत्यांचा, अपशब्दांचा, सामाजिक माध्यमांचा (Social Media) दुसऱ्यांविषयींच्या क्रोधाचा, दुसऱ्याविषयींच्या अफवांचा, इत्यादी. जेणेकरून आपले आपल्या देवा बरोबरचे, आपल्या शेजाऱ्या बरोबरचे, आपल्या पर्यावरणा बरोबरचे व आपल्या स्वतःबरोबरचे नाते दृढ व्हावे म्हणून. ह्या वाईट कृतीं पासून दूर राहण्यासाठी आपल्याला आमंत्रण केले आहे. जेणेकरून आपण पास्काच्या (ईस्टरच्या) सोहळ्यास योग्य रीतीने सहभागी होता येईल व निर्मल हृदयाने देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव आपणावर होईल.
३. दानधर्म: दानधर्म करणे म्हणजे आपल्या विपुलतेतून नव्हे तर, आपल्या कमताईतून, आपले आहे नाही त्यातून दान करणे. कारण असे म्हटले जाते की, ‘दु:खापत होईपर्यंत देत राहा.’ किंवा असे सुद्धा म्हटले जाते की, ‘देणाऱ्याचा देव होतो व राखणाऱ्याची राख होते.’ दानधर्माद्वारे आपण दुसऱ्यांचा विचार करतो. ह्या दानधर्माद्वारे आपल्याला समजते की, सर्व संपत्तीवर फक्त देवाचा अधिकार आहे. आपण फक्त त्याचे राखंदार आहोत. असिसिकार संत फ्रांसिस ह्यांच्या शांतीच्या प्रार्थनेत आपण म्हणतो, “देण्यानेच आपल्याला मिळते व अनंतकाळीक आनंद प्राप्त होतो.”
          म्हणून ह्या प्रायश्चितकाळात ह्या तीन मार्गांचा वापर करून आपले जीवन देवसेवेसाठी समर्पित करूया, व पास्काच्या (ईस्टरच्या) सोहळ्यास आपले अंत:करण व आपले नवीन जीवन तयार ठेवूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आण.”
१. आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, व व्रतस्थ ह्या सर्वांना देवाने चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य प्रदान करावे, तसेच ह्या प्रायश्चित काळामध्ये त्यांनी प्रार्थनेचे, उपवासाचे व दानधर्माचे महत्व आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे लोकांना पटवून दयावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ह्या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे व प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ह्या प्रायश्चित काळाद्वारे प्रभूने आपल्याला आपल्या पापांचा धिक्कार करून प्रभूकडे येण्याची एक अनमोल संधी दिली आहे. ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन देवाबरोवर, इतरांबरोबर, पर्यावरणाबरोबर व स्वतःबरोबर समेट घडवून आणण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना प्रभूच्या आशीर्वादाने चांगली नोकरी मिळावी व त्यांचे जीवन सुखमय व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व व्ययक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.