Tuesday 31 January 2017

Reflection for the Homily of 5th Sunday in Ordinary Time (05-02-2017) by Br. Glen Fernandes.




सामान्य काळातील पाचवा रविवार

दिनांक: ०५/०२/२०१७.
पहिले वाचन: यशया ५८:७-१०.
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र २:१-५.
शुभवर्तमान: मत्तय ५:१३-१६.



तुम्ही पृथ्वीचे मीठ जगाचा प्रकाश आहात



प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. जीवनात सदैव सत्कर्म करून इतरांच्या जीवनात आनंद पसरवण्यासाठी आजची उपासना आपल्याला बोलावत आहे.
यशया पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात उपवासाचे महत्व पटवून दिले गेले आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास आपला विश्वास प्रभूमध्ये दृढ ठेवण्यास आवाहन देत आहे. देवाच्या सामर्थ्यावर अढळ श्रद्धा ठेवण्यास तो प्रोत्साहान देत आहे. तर शुभवर्तमानात प्रभू येशु पर्वतावरील दिलेल्या प्रवचनात शिष्यांना मीठ व प्रकाश अशा उपमा देत आहे.
ख्रिस्ती जीवन म्हणजे काय? ख्रिस्ती जीवनाचे ओळखपत्र काय? मी खरोखर ख्रिस्ती मूल्यावर जीवन जगतो का? ह्या पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी होता असताना आपल्या पापांची आठवण करूया व दैवी दयेसाठी परमेश्वराची याचना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ५८:७-१०.

यशया प्रवक्ता आपले नैतिक जीवन अढळ राहण्यासाठी चांगुलपणा अंगीकारण्यासाठी बोध करत आहे. चांगले जीवन जगण्यास प्रोत्साहन करण्यासाठी तो उपवासाचे महत्व सांगत आहे. उपवासाचे योग्य पालन म्हणून अन्न भुकेल्यांस वाटायला हवे; लाचारांस व निराश्रीतांस घरी न्यायला हवे असे तो पटवून देत आहे.  
उपवसाबाद्द्ल प्रबोधन करताना यशया सांगतो जर आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे आपले जीवन जगलो तर आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, आपल्या जखमा लवकर भरतील, आपली धार्मिकता आपल्या पुढे चालेल व परमेश्वराचा गौरव आपला पाठीराखा होईल. ह्या शब्दांत प्रभूमय जीवन जगण्यास यशया सांगत आहे.

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र २:१-५.

ह्या उताऱ्यात संत पौल वधस्तंभावरील ख्रिस्ताविषयी बोध करत आहे. तसेच आपला विश्वास मनुष्याच्या बुद्धीमत्तेवर नव्हे, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारण्यास सांगतो. देवाची कृपा हि कोणत्याही परिस्थितीत आपल्यासाठी पुरेशी असते. संत पौलाला त्याच्या जीवनात नेहमीच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. परंतु तरीही संत पौल नम्रतेचा आदर्श त्याच्या शब्दांनी सर्वांसमोर पत्राद्वारे व्यक्त करतो. संत पौल लोकांसमोर नम्र होऊन सांगतो कि, आपले तारण हे परमेश्वराच्या कृपेने होते. तसेच संत पौल लीनतेचे उदाहरण म्हणून वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताबद्दल लोकांस मार्गदर्शन करतो. व त्यांचा विश्वास दृढ व मजबूत ठेवून देवाच्या वचनावर जीवन आधारण्यास बोध करतो.

शुभवर्तमान:

येशू पर्वतावरील प्रवचनात लोकांना जीवनावश्यक उपदेश करीत आहे. समाजात अन्यायाला किळस आलेल्या दारिद्र्याला वैतागलेल्या परंतु प्रभूच्या वचनांसाठी आतुर झालेल्या जनसमुहाला प्रभू ‘मीठ’ व ‘प्रकाश’ ह्या दोन उपमा देत आहे. मत्तय लिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त ह्या दोन्ही उपमांचा वापर करून सांगतो कि, ‘तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल’? पुढे ख्रिस्त म्हणतो, ‘डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखालाई ठेवीत नसतात तर दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वाना प्रकाश देतो’.

बोधकथा:

पारसी लोक जेव्हा ईराण व पर्शिया देशामधून भारतात आले तेव्हा त्यांनी भारतातील राजाला विनंती केली कि, ‘हे महाराज आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी खूप मेहनती व विश्वासू आहोत, म्हणून तुमच्या साम्राज्यात आम्हांला समाविष्ट करा. राजा उत्तरला, ‘मी तुम्हाला समाविष्ट केले असते परंतु माझ्या साम्राज्यात सर्व लोक अगोदरच समाविष्ट आहेत; माझे साम्राज्य म्हणजे दुधाने भरलेले भांडे आहे, तर तुम्हांला कुठे स्थान देऊ?’ त्या लोकांच्या प्रमुखाने उत्तर दिले, ‘हे राजा जरी तुमचे साम्राज्य भरलेले आहे तरी आम्हांला थोडेसे स्थान द्या , दुधाने भरलेल्या भांड्यात आम्ही साखर म्हणून राहू व आपल्या साम्राज्यासाठी झटू’. अशा प्रकारे पारसी लोकांचा भारतात प्रवेश झाला. आज जेथे जेथे पारसी लोक आहेत ते धन्य; ते देशाच्या उन्नतीसाठी झटत आहेत.

२. एका राजाला तीन मुली होत्या. आपल्या मुलीचे प्रेम जाणून घेण्यासाठी त्याने त्यांची परीक्षा घेतली. मोठी म्हणाली, ‘माझे तुमच्यावर जगाच्या सर्व सोने, हिरे, मोती यापेक्षाही जास्त प्रेम आहे.’ दुसरी म्हणाली, ‘जगातील सर्व हुशारी व ज्ञानापेक्षा माझं तुमच्यावर अधिक प्रेम आहे.’ लहान मुलगी म्हणाली, ‘माझं तुमच्यावर मीठप्रीय तसे प्रेम आहे.’ राजा लहान मुलीचे उत्तर ऐकून रागावला व तिला हद्दपार करण्याचे व तिचे तोंड न पाहण्याचे आदेश दिले. प्रधानाने जेव्हा हि गोष्ट ऐकली, तेव्हा त्याने राजाला आपली चूक कळवून देण्यासाठी राजाच्या सर्व मेजवानीतील मिठ न टाकण्याची आज्ञा दिली. जेव्हा राजाने जेवण चाखले तेव्हा तो विस्मयीत झाला व स्पष्टीकरण विचारल्यावर प्रधानाने राजाला त्याची चूक निदर्शनास आणून दिली. राजाला आपल्या मुलीची खरी ओळख पटली व तिच्या कृतीची जाण झाली. मीठ जरी साधारण व कमी किमतीचे असले तरी, मिठाशिवाय जेवणाला अर्थ नाही. प्रभू शिष्यांना मिठ व प्रकाश म्हणून त्यांना नवी जबाबदारी देतो कि, ‘दुसऱ्याच्या जीवनाला रुचकरपणा आणा व त्यांचे अंधारमय जीवन प्रकाशीत करा’.

मनन चिंतन:

आपण कोण आहोत कोठून आलो आहोत आपण कोठे जाणार आहोत हे तीन प्रश्न मानवापुढे अगदी प्राचीन काळापासून पुन्हा पुन्हा उभे राहिले आहेत. फक्त विचारवंत व्यक्तींनाच नाही, तर संस्थाना समाजांना आणि देशांना देखील ह्या तीन मुलभूत मानवी प्रश्नांचा वेळोवेळी सामना करावा लागला आहे.  
     हल्लीच्या काळात मात्र ‘मी कोण आहे?’ ह्या प्रश्नांचे उत्तर केवळ उच्च वैचारिक पातळीवर नाही, तर रोजच्या सामान्य व्यवहारात अनेकदा द्यावं लागते. निवडणुकीत मत नोंदवायला, बँकेत खाते उघडायला, गाडीसाठी कर्ज काढायला, रेल्वेचे आरक्षण करायला, आपण कोठेही काहीही करायला गेलो तरी मी कोण आहे ह्याचा दाखला सादर करावा लागतो. मग प्रश्न असा उभा राहतो कि, ख्रिस्ती म्हणजे कोण? ख्रिस्ती लोकांचे ओळखपत्र काय आहे? ख्रिस्ती कोणाला म्हणायचे? विधर्मी आणि ख्रिस्ती ह्यात काय फरक आहे?
येरुशलेमाच्या मंदिरात परमेश्वराची पूजा-अर्चा घेत असताना, देवाविषयी ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय पर्वतावर येशू जवळ आला होता. येशूने फक्त शब्दाने उपदेशच केला नाही तर त्यांना नवीन ओळखपत्रही दिले. नाव व सन्मान दिला. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रभूने त्यांना मीठ व प्रकाश ह्यांची उपमा दिली. मीठ व प्रकाश ह्या दोन्ही आपल्याला दररोजच्या जीवनात महत्वाच्या आहेत. ज्याप्रमाणे मीठ आणि प्रकाश उपयोगी वस्तू आहेत त्याप्रमाणे आपल्या जीवनाची सुद्धा उपयोगिता असावी. जर मिठाला खारटपणाच नसेल तर ते पायाखाली वाया जाते. आपल्या जीवनाला, राहणीमानाला अर्थ नसेल तर आपलेही जीवन व्यर्थ ठरते. ख्रिस्त आज प्रत्येक मनुष्याला दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश, रुची किंवा चव आणण्यासाठी पाचारण करीत आहे. जिथे दु:ख आहे, तिथे आनंद; ज्यांच्या जीवनात निबिड अंधार आहे, तिथे प्रकाशाचा दिप व गरिबांच्या जीवनात रुचकरपणा टिकवून ठेवण्यासाठी ह्या पाचारणाचा उपयोग करायला हवा. येशूचे ठाम अनुयायी बनण्यास जीवनात मीठ व प्रकाश बनायला हवे.
     एके काळी ख्रिस्ती शाळा, कॉलेज आणि दवाखाने ह्या पथदर्शक संस्था होत्या. त्यांचे कार्य पाहून त्यांच्या सेवाभावाने प्रेरित होऊन इतर धर्मांतील समाजसुधारकांनी अशा प्रकारच्या संस्था उभारल्या. ख्रिस्ती लोक जनसेवा करतात ती प्रभू सेवा समजून करतात असे आपण भूतकाळात म्हणत असू आणि तेही काहीशा अभिमानानेच. पण तेच आजच्या काळात म्हणण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. आपल्यापेक्षा अतिशय चांगल्या दर्जाची सेवा ख्रिस्तीतर लोक आणि संस्था करत असल्याचे आपण सभोवती पाहतो.
आपल्याला ख्रिस्तासारखे व्हायचे असेल तर ख्रिस्त कसा होता हे आपल्याला आधी पूर्णपणे माहित असले पाहिजे. ख्रिस्त आपल्या अंतरंगातून प्रकट झाला पाहिजे. म्हणून खिस्ती जीवनात ख्रिस्ती सेवेस आपण अग्रक्रम दिला पाहिजे. प्रत्येक कामात ख्रिस्ताला पुढे स्थान दिले पाहिजे. ख्रिस्त धर्म काय आहे? त्याची मुलतत्वे काय आहेत? हे आपण जाणून घेतले पाहिजे.
आपल्या धर्माची मुल्ये इतर धर्मांहून निराळी आहेत. तसेच आपल्या प्रभूने दिलेल्या आज्ञेचे पालन करीत राहायचे असेल आणि ख्रिस्ताची लोकांना ओळख करून द्यायची असेल तर त्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले पहिजेत आणि ते आपण सर्वांनी केले पाहिजे.
येशू ख्रिस्त त्याच्या प्रकाशात आपणा सर्वांना एकत्र करून घेतो व आपणास प्रती-ख्रिस्त होण्यास पाचारण करतो. आपल्या व दुसऱ्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा करण्यासाठी सत्कृत्ये करावी लागतात तरच ख्रिस्ताप्रमाणे आपण सुद्धा जगाचे प्रकाश होऊ. येशूच्या अनुयायांनी प्रथम स्वतःच्या जीवनातील अंधकार दूर करायला हवा. कदाचित आपणास फार मोठा प्रकाश होणे शक्य नाही पण मिणमिणता प्रकाश होता येते. म्हणूनच जीवनातील ख्रिस्ताचा प्रकाश न विझविता; आपल्या छोट्याश्या प्रकाशाने इतरांना साथ देऊन त्यांच्या जीवनात तेजमय व आनंदमय प्रकाश झळकवण्यासाठी मदत करावी; हीच गरज आजच्या जगाची व समाजाची आहे हे आपण समजून घेऊया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो द्या कर आणि आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवीदयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा, त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले आहेत त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज जगात अनेक गरीब राष्ट्रांतील लोकांना तसेच आपल्या समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे अन्याय व छळ सहन करावा लागत आहे, अशा सर्व लोकांना त्यांच्यावर होत असलेला अन्याय व छळ सहन करण्यास प्रभूने शक्ती व सामर्थ्य प्रदान करावे तसेच जुलूम करणाऱ्यांस क्षमा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगावे; आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे आणि उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday 26 January 2017

Reflection for the Homily of 4th Sunday in the ordinary Time (29-01-17) By Br Amit D’Britto




सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: २९/०१/२०१७.
पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१.
शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२.


"जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."



प्रस्तावना:

     आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. प्रत्येक मनुष्य हा सुख व आनंदाच्या शोधात असतो. प्रभू येशु ख्रिस्त आज शुभवर्तमानात आनंदी व सुख-समाधानी होण्यासाठी योग्य असा मार्ग दाखवत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा सफन्या लोकांस चांगुलपणाचा मार्ग निवडण्यास विनवणी करतो. कारण त्यामुळेच त्यांचे देवाच्या रागापासून संरक्षण होईल. प्रभू येशु ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन अस्तित्व प्राप्त होते असे संत पौल करिंथकरांस दुसऱ्या वाचनात सांगतो.
ह्या मिसाबलिदानात सहभागी होत असताना आपण आत्म्याने नम्र व लीन होऊन स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३

यिर्मया संदेष्टा येण्याच्या काही वर्षांपूर्वी संदेष्टा सफन्या ह्यांनी यरुशलेमेत उपदेश केला. प्रस्तुत उताऱ्याद्वारे संदेष्टा सफान्या लोकांना देवाने दाखवल्याप्रमाणे योग्य मार्गाचे आचारण करण्यास सांगत आहे. तसेच स्वत:ला शून्यवत करणारी नम्रतेची जीवनशैली स्वीकारण्यास आवाहन करतो. तो म्हणतो कि, ‘जे लोक आत्म्याने दिन आहेत व आज्ञा पालन करतात त्यांना कराराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. तसेच जे गरीब व दिन-दुबळे आहेत त्यांना देवामध्ये सामर्थ्य मिळेल’.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस सांगतो कि देवाने ज्ञानी व शहाणे ह्यांच्या तुलनेत साध्या व भोळ्या लोकांना निवडले आहे. तसेच शक्तिमान लोकांच्या तुलनेत त्याने दुर्बलांची निवड केली आहे. जगातील ऐहिक प्रतिष्ठेची तोरा कोणाला मिरवता येऊ नये याच उद्देशाने देवाने हे केले आहे. तसेच आपल्या सर्वांना ख्रिस्त येशु मध्येच राहणे योग्य आहे असे संत पौल सांगत आहे.



शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२

मत्तयने नमूद केलेल्या महान प्रवचनापैकी हे पहिले प्रवचन होय. सामान्यतः हे ‘डोंगरावरील प्रवचन’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याची रूपरेषा सर्वसाधारणपणे लूक ६:२०-४९ मध्ये दिलेल्या प्रवचनासारखी असली तरी हे प्रवचन खूपच दीर्घ आहे. ‘शिष्यपण’ किंवा ‘स्वर्गाच्या राज्यातील जीवन’ असा मध्यवर्ती मुद्दा घेऊन त्या भोवती संपूर्ण विषयाची मांडणी केली आहे. प्रवचनाच्या आरंभीच धन्यतेच्या आठ उदगारातून खऱ्या शिष्याचे अष्टपैलू-पूर्ण चित्रण केले आहे. ह्या सर्वांमुळे आपले जीवन चांगले होईल असे प्रभू येशू ख्रिस्त आपणास पटवून देत आहे. जीवनात अशा मार्गाने चालल्याने कोणाचीदेखील हानी होणार नाही असे ह्यातून स्पष्ट होते. “स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे” ह्या महत्वपूर्ण शब्दांनी या वाचन मालिकेचा आरंभ व शेवट झाला आहे. जे देवाला ‘राजा’ म्हणून मान्य करतात, त्यांच्या संदर्भात हे शब्द आहेत, आणि त्यांच्या जीवनात त्याचा हेतू परिपूर्ण व्हावा यासाठी ते निश्चयाने प्रतीक्षा करतात.

बोधकथा

एकदा एक श्रीमंत माणूस मदर तेरेजाच्या आश्रमाला भेट देण्यासाठी जातो. जेव्हा तो तेथे पोहचतो तेव्हा मदर तेरेजा ह्या एका अत्यंत आजारी व कुष्टरोगाने ग्रासलेल्या व्यक्तीच्या जखमा साफ करत होत्या. जेव्हा तो श्रीमंत व्यक्ती हे सर्व दृश्य पाहतो तेव्हा तो मदर तेरेजाला म्हणतो, “जर मला लाखो रुपये जरी मिळाले तरी सुद्धा मी हे काम करणार नाही.”  तेव्हा त्याला प्रतिउत्तर देत मदर तेरेजा म्हणाल्या, “मी सुद्धा हे काम कितीही पैसे मिळाले तरी करणार नाही, परंतु हे सर्व मी त्या व्यक्ती मध्ये दिसणाऱ्या प्रभूसाठी आणि त्याने दिलेल्या शिकवणुकीचे योग्य असे पालन करण्यासाठी करत आहे.” आज शुभवर्तमानात प्रभू येशु आपणास हाच मार्ग दाखवत आहे.


मनन चिंतन:

आज जगात सर्वजण सुखाच्या शोधात आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपल्याला आनंदाचा व सुखाचा मार्ग दाखवत आहे. आपण सुख हे पैसा, संपत्ती, अधिकार, व प्रतिष्ठा ह्या सारख्या गोष्टींमध्ये शोधत असतो. परंतु आपण खूप वेळा हरतो व फसतो. आपल्याला आवश्यक व समाधानकारक सुख मिळत नाही.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू जो सुखाचा मार्ग दाखवत आहे तो ह्या सर्व मार्गापासून खूप वेगळा आहे. ह्या जगात जे सुख आपल्याला संपत्ती, अधिकार किंवा प्रतिष्ठेने मिळते ते क्षणिक असते, परंतु आपल्याला जर चिरकाळ आनंद हवा असेल तर आपण प्रभू येशूच्या शिकवणूकीचा मार्ग अवलंबला पाहिजे.
आपण सर्वांनी आत्म्याने ‘दीन’ झाले पाहिजे. आपण ‘सौम्य’ व्हायला हवे कारण आपणास पृथ्वीचे वतन भोगायला मिळेल. तसेच जर आपल्याला तृप्त व्हायचे असेल तर आपण नितीमत्वाचा मार्ग अवलंबला पाहिजे. आपण दयाळू होणे खूप गरजेचे आहे व आपले अंतःकरण शुद्ध ठेवणे गरजेचे आहे; त्यामुळे आपल्याला देवाला पहावयास मिळेल. तसेच आपण हिंसेचा अवलंब न करता शांतीचा मार्ग पत्करला पाहिजे. जर आपला नितीमत्वासाठी छळ झाला तर आपण त्यासाठी तयार असावे कारण स्वर्गाचे राज्य अशाच लोकांचे आहे असे येशु म्हणतो. जर आपणास प्रभूच्या नावाने निंदा किंवा छळ सहन करावा लागला तर तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे कारण ह्याकरीता स्वर्गात आपले प्रतिफळ मोठे असणार आहे.
मोशे ‘सिनाय’ पर्वतावरून खाली येतो आणि लोकांना ‘दहा आज्ञा’ देतो. ह्या दहा आज्ञेद्वारे तो लोकांना योग्य असा मार्ग दाखवून देवाच्या अधिक जवळ आणत असे. आपला प्रभू येशु ख्रिस्त हा ‘नवीन मोशे’ आहे. कारण त्याने सुद्धा लोकांना नवीन आज्ञा दिल्या. आज शुभवर्तमानात आपणा पाहतो कि, ह्या नवीन आज्ञेद्वारे तो लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी व देवाच्या अधिक जवळ येण्यासाठी लोकांना मार्ग दाखवत होता.
कदाचित आपल्याला असे वाटेल कि आज शुभवर्तमान येशु ख्रिस्त ज्या आज्ञा आपणास देत आहे त्या पाळण्यास खूप कठीण आहे. परंतु आपल्या असे लक्षात येते कि, प्रभू येशु ख्रिस्ताने प्रथम शिकवण्या अगोदर हे सर्व कृतीत उतरवले व त्यामुळेच त्याने आपणास योग्य असा आदर्श दिला आहे.
आज  शुभवर्तमानात प्रभू येशु ख्रिस्त ज्या काही पूर्वसूचना देत आहे त्याचे योग्य असे पालन केल्याने आपणास सुखाचा अनुभव ह्या भौतिक जगातच नव्हे तर चिरकाळचा आनंद लाभणार आहे. कदाचित त्यांचे पालन करणे हे कठीण असेल परंतु ते अशक्य नाही. कारण ह्या सर्व आज्ञा कृतीत उतरवणाऱ्या अनेक संतांचे सोदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेत.
आज आपण जगावर जास्त परिणाम घडवणारे व्यक्ती येशु ख्रिस्त, गांधीजी, मदर तेरेजा व मार्टीन लुथर किंग ह्यांच्या जीवनात पाहिले तर असे लक्षात येते कि, हे सर्व व्यक्ती अतिशय लीन, नम्र व प्रेमळ होते. परंतु जे कोणी फार अभिमानी व गर्विष्ठ असतात त्यांचा द्वेष किंवा तिरस्कार केला जातो. प्रभू येशु ख्रिस्ताच्या शब्दात खूप सामर्थ्य आहे. तो म्हणाला, “आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत” (मार्क १३:३१). जर आपण प्रभूच्या शब्दाचा मान राखून त्याची वचने आपल्या आचरणात आणली तर नक्कीच आपल्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे देवा आम्हाला तुझा आशीर्वाद दे.

१.आपले परमगुरु , महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थांनी ख्रिस्ताच्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे; त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आपल्या समाजातील व धर्मग्रामातील जी कुटुंब दुरावलेली आहेत त्यांना प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन पुन्हा आपल्या कुटुंबात प्रेमाने, एकजुटीने रहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
४.ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी आपल्यामधील असलेला अहंकार, स्वार्थ व राग दूर  सारून एकजुटीने समाज बांधणीचे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


Thursday 19 January 2017

   
Reflection for the Homily of Third Sunday in the ordinary Time  (22-01-17) by Br. Jameson Munis. 




सामान्य काळातील तिसरा रविवार

दिनांक: २२/०१/२०१७.
पहिले वाचन: यशया ९:१-४.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:१०-१३.
शुभवर्तमान: मत्तय ४: १२-२३.



"मी तुम्हांला मासे धरणाऱ्यानां नव्हे तर माणसे धरणारा बनवतो"




प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास बोलावत आहे.
यशया पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन देवाच्या दिव्य प्रकाशाविषयी सांगत आहे. देवाचा प्रकाश अंध:काराला व्यापून टाकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ती शिक्षकाची व्यक्तिपूजा केल्याने जी फुट पडते ह्यासंबंधी बोध करतो. तसेच प्रभूचे प्रभुत्व मानून सर्वांनी मिळून त्याच्याशी एकनिष्ठ राहून, त्याची एकमताने सेवा करा असा सल्ला देत आहे. मत्तयलिखित शुभवर्तमानात हेरोद राजा योहानाला अटक करतो आणि येशू आपल्या पहिल्या शिष्यांना म्हणजेच शिमोन, याकोब आणि योहान ह्यांना बोलावतो. मासे धरणाऱ्यानां तो माणसे धरणारा बनवतो आणि देवाच्या राज्यासाठी तसेच लोकांची सेवाकार्य करण्यासाठी पाचारण करतो.
आज आपण मिसाबालीदानात भाग घेत असताना आपली अंतःकरणे साफ करून आपण ख्रिस्ताचे अनुयायी बनण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

शुभवर्तमान:

प्रस्तुत उताऱ्यात योहान देवाच्या राज्याची घोषणा करीत होता. त्याला विरोध झाला. हेरोद हा यहुदिया व  गालील प्रांताचा राजा होता. त्याने अन्यायाने योहानाला अटकेत ठेवले. यानंतर गालील प्रांतात येशु ख्रिस्ताने आपले सेवाकार्य सुरु केले. जी घोषणा योहानाने केली तीच ख्रिस्तानेही केली. जे कोणी अंधारात होते ख्रिस्ताने त्यांची सुर्योद्याप्रमाणे सेवा केली.
     पेत्र व आंद्रिया यांना येशु ख्रिस्ताची ओळख यापूर्वीच झाली होती. ते काबाडकष्ट करून आपला व्यवसाय करीत. प्रभुने त्यांना नवीन कामासाठी बोलाविले. येशु ख्रिस्त जे काम करीत होता ते पुढे नेण्यासाठी, प्रभू येशूने त्यांना नवीन शिकवणूक दिली आणि ते लागलेच त्याला अनुसरले.
     नंतर या शिष्यांसह येशुख्रिस्त गालीलभर फिरला. त्यांनी सभास्थानात सुवार्ता सांगितली. रोग बरे केले. जे दुखणेकरी त्याच्याकडे आले त्या सर्वांना त्याने बरे केले. गालीलातील लोकांना खरोखरच प्रकाश दिसला आणि शिष्यांना जे पाचारण भेटले ते त्यांनी पुढे चालूच ठेवले आणि देवाच्या कार्याला होकार दिला.

बोधकथा:

    एकदा तीन माणसे रात्रीच्या वेळी घोड्यांवर बसून जंगलामधून प्रवास करत होते. जंगलाच्या मधोमध पोहचल्यावर त्यांनी “थांबा” असा आवाज ऐकला. ताबडतोब त्यांनी त्या आवाजाचे पालन केले आणि थांबले. त्यानंतर त्याच आवाजाने त्यांना घोड्यावरून खाली उतरून तिकडचे दगड उचलून त्यांच्या बरोबर त्यांच्या बॅगेत न्यायला सांगितले. जसे-जसे ते पुढे निघाले त्याच वेळी पुन्हा आवाजाने सांगितले, “तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन केले आहे. परंतु उद्या सूर्याच्या उगवत्या किरणाद्वारे तुम्ही दुःखी किंवा आनंदित असाल.”
जेव्हा दिवस उगवला तेव्हा ते आनंदित झाले कारण त्या दगडाचे रुपांतर सोन्यात झाले होते. परंतु एक अति-आनंदित होता तर दोघे दुःखी होते. कारण त्यांनी कमी दगड आणले होते.

मनन चिंतन:

ह्या बोधकथेमधून आपल्याला बोध मिळतो कि, देवाच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे स्वर्गाचे सुख लाभण्यासारखे आहे. देवाचे पाचारण हि एक देणगी असून ती सर्व मालमत्ता व संपत्तीपेक्षा अनमोल आहे. जो देवाच्या हाकेला स्विकारतो आणि देवाचे कार्य करण्यास पुढे येतो तो सतत देवाच्या सानिध्यात राहतो.
बोधकथेत ऐकल्याप्रमाणे जो देवाच्या आज्ञेचे पालन करतो त्याला जास्त सोन्याचे दगड सापडतात व दुसरे निराश होतात. कारण त्यांना तो आवाज देवाचा होता असे नंतर समझले. आपल्या जीवनात सुद्धा अश्याच घटना घडत असतात. जेव्हा आपल्याला देवाची हाक येते तेव्हा आपण स्वार्थी मनाचा आवाज ऐकतो व देवाच्या आज्ञेचे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा आपण देवाच्या आज्ञेचे पालन करतो तेव्हा जीवनात चांगली घटना घडते.
देवाचे पाचारण सर्वांना लाभलेले आहे परंतु आपले कार्य वेगळ्या प्रकारचे असून सर्वांचा हेतू एकच आहे. तो म्हणजे गोरगरीबांची सेवा. देवाचे कार्य मनापासून केल्यामुळे जीवन बदलून जाते. आपल्या जीवनाला प्रेरणा लाभते. तो आनंद आपण पैश्याने विकत घेऊ शकणार नाही. हाच उपदेश आजच्या तिन्ही वाचनात मिळतो. पहिल्या वाचनात ऐकले कि, देवाचा प्रकाश किती मौल्यवान आहे. हा प्रकाश म्हणजे देवाचे ज्ञान, प्रेम, प्रीती आणि सहनशीलता. जेव्हा आपण देवाला अनुसरतो तेव्हा आपल्या वागनुकीत बदल होतात. चांगले कृत्ये करण्यासाठी दैवी शक्ती लाभत असते.  

दुसऱ्या वाचनात आपण ऐकले कि, पौल हा मंडळीतील अव्यवस्था व दैहीकतेविषयी बोलत आहे. कारण येशु हा सर्वांचा प्रभू आहे. तो पौलचा किंवा पेत्राचा नव्हे तर सर्व युगाचा प्रभू आहे. परंतु खोटी शिक्षा देणारे खूप येतील आणि आपल्यात गट पाडतील, जातीभेद निर्माण करतील, श्रीमंतांना जवळ करतील आणि गरिबांना दूर करतील, परंतु आपण एकाच ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. त्यामुळे आपण एकनिष्ठेने राहून प्रभूची आराधना केली पाहिजे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात पहिल्या शिष्यांचे पाचारण आणि त्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला असे वैशिष्ट्य ऐकले आहे. म्हणून ख्रिस्त हा अदृष्य देवाचे  सदृश रूप आहे. त्याने मानवाला स्वत:च्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले आहे. प्रथम मानवाने हि प्रतिमा विद्रूप केली. परंतु जगाचा उद्धारक आणि तारणारा असलेल्या ख्रिस्ताद्वारे पुन्हा एकदा मानवास पूर्वीचे सौंदर्य प्राप्त झाले आहे ते म्हणजे देवाद्वारे मानवाचे पाचारण. सार्वकालिक जीवनाचा आनंद हे देवाने मानवाला दिलेले एक अलौकिक वरदान आहे ते मिळवून देणारी देवाची कृपादेखील तितकीच अलौकिक आहे, म्हणून आजच्या मिस्साबलीदानात भाग घेताना आपली अंतःकरणे शुद्ध करून ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा आपण देवावर अधिक प्रेम करावे आणि देवाच्या आज्ञेत राहून त्याचे कार्य यशस्वी रितीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ लोक ज्यांनी आपले आयुष्य प्रभूच्या कार्यासाठी त्यागलेले आहे अशा सर्व लोकांना चांगले आरोग्य लाभावे; त्यांच्या कार्यात यश यावे आणि त्यांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या त्यांच्यापासून दूर व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाहीत तसेच जे देवापासून दूर गेलेले आहेत अशा सर्व लोकांना देवाचे पाचारण व्हावे आणि त्या पाचारणाद्वारे त्यांचे परिवर्तन घडून यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक त्यांच्या जीवनात निराशून गेलेले आहेत अशा सर्व लोकांना देवाचे धैर्य लाभावे जेणे करून जीवनाचा आनंद उपभोगतील म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक गरीब आहेत व ज्यांना दोन वेळचे अन्न लाभत नाही अशा सर्व लोकांच्या शारिरीक व आत्मिक गरजा पूर्ण व्हाव्या तसेच त्यांचे सर्व दु:ख संकटे त्यांच्यापासून दूर जावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday 12 January 2017

Reflection for the Homily of 2nd Sunday of Ordinary Time (15-01-17) by Br Sadrik Dapki



सामान्य काळातील दुसरा रविवार
दिनांक: १५-१-१७.
पहिले वाचन: यशया ४९:३,५-६.
दुसरे वाचन: १ करंथीकरास पत्र १:१-३.
शुभवर्तमान: योहान १:२९-३४.


“हे पहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू”


प्रस्तावना:
आपण सामान्यकाळाला सुरवात केली आहे. आज आपण सामान्यकाळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास सांगत आहे कि, येशु हा आपला देव आहे आणि तो आपल्यासाठी मरण पत्करून आपणास पापांतून मुक्त करील.
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात यशया म्हणतो की, एक मसीहा येईल जो सर्वांना न्याय देवून एकत्रित आणणार आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल सुद्धा म्हणतो की, पवित्र शास्त्र हे आपणास देवाच्या आश्वासनाबद्दल माहिती देण्यासाठी आणि आपला विश्वास बळकट व्हावा म्हणून लिहिले गेले आहे. शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणार योहान हा येशुबद्दलची साक्ष देतो आणि येशूला ‘देवाचे कोकरू’ असे संबोधतो.
‘परमेश्वराला शरण गेले म्हणजे त्याच्या प्राप्तीचे मार्ग खुले होतात’ असे म्हणतात. म्हणून ह्या मिस्साबलीत जीवित देवाच्या कोकारास शरण जाऊया आणि आपल्या पापांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ४९:३,५-६

बाबेलच्या बंदिवासात असताना इस्रायली लोक देवाची प्रजा म्हणून असलेल्या आपल्या ओळखीबद्दल गोंधळून गेले होते. अशा वेळी यशया संदेष्टा इस्रायली लोकांना देवाने दिलेल्या सुवर्णसंधीचे खात्रीपूर्वक आश्वासन देतो कि, देव याकोबास परत आणून त्यास इस्रायली लोकांमध्ये जोडेल आणि हे सर्व प्रभूचा दास, तारणारा येशु ख्रिस्त ह्याच्या येण्याने परिपूर्ण होईल. आणि तो एका पवित्र कुमारीच्या गर्भात जन्म घेईल.

दुसरे वाचन: करिंथकरास  पहिले पत्र १:१-३

आजचे दुसरे वाचन आपणाला मंदिराविषयी स्पष्टीकरण देते. पौल म्हणतो, करिंथ येथील देवमंदिर हे करिंथचे नव्हे तयार देवाचे मंदिर आहे, आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा देवमंदिराचा अविभाज्य घटक आहे. पौलाचे म्हणणे असे आहे कि, सर्व लोकांनी एकत्र यावे अशी देवाची दैवी इच्छा आहे, म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक व्यक्तीला देवाकडे वळवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जरी आपण येशूच्या बारा शिष्यांपैकी नसलो तरी पौलाच्या म्हणण्यानुसार बाप्तिस्मा घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा संतगणात गणला गेलेला आहे. आणि म्हणून आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलो पाहिजे.   
शेवटी संत पौल म्हणतो कि देवाची कृपा व शांती तुम्हांस असो. कारण कृपा व शांती हि प्रत्येक विश्वासू माणसाला भेटली पाहिजे. कृपेची अभिव्यक्ती हि देवाचा दयाळूपणा व भलेपण प्रतिध्वनीत करतो आणि शांती हे देवाने येशुख्रिस्ताला दिलेले तारणाचे प्रतिक आहे. ह्या शांतीमध्ये पापांची क्षमा व देवाबरोबर समेट यांचा समावेश आहे.

शुभवर्तमान: योहान १:२९-३४.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, योहानाने येशूकडे पाहून म्हटले “हे पहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू” (योहान १:२९). ह्या वाक्याचे स्पष्टीकरण योहानाच्या इतर संदर्भावर आधारून करावयास हवे. येशु पापहरण करण्यासाठी प्रगट झाला (१योहन ३:५). तो आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील (१योहान १:४). तसेच तो आपल्या पापांचे नव्हे तर सर्व जगाच्या पापाबद्दल प्रायश्चित करेल (१योहान २:२९). या संदर्भावरून आपणास समजते कि, येशु हा जिवंत देवाचे कोकरू आहे; जो ह्या भूतलावर आपल्याला पापांपासून मुक्त करावयास आला.  
देवाचा मार्ग तयार करण्यासाठी येणाऱ्या संदेष्टयाचे भाकीत हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानामध्ये पूर्णत्वास येते. हा योहान येशु ख्रिस्ताच्या सहा महिन्याअगोदर जन्मास आला होता. जेणेकरून तो इस्रायली लोकांस बाप्तिस्मा देऊन जगाचा तारणारा येण्याची पूर्व तयारी करेल. इस्रायली लोकांनी योहानाला महान संदेष्टा मानले होते परंतु तो त्याचा खरा-खुरा परिचय देतो आणि म्हणतो कि, ‘माझ्यापेक्षा महान जीवंत देवाचा पुत्र येणार आहे जो तुम्हाला अग्नीने आणि पाण्याने बाप्तिस्मा देईल. मी तर त्याच्या वाहणा सुद्धा उचलणाच्या लायकीचा नाही’. जेव्हा येशु ख्रिस्त त्याच्या समोर येतो तेव्हा तो म्हणतो “पहा हे देवाचे कोकरू, जगाचे पाप वाहून नेणारा”.
बायबलमध्ये कोकरू ह्या शब्दाला फार महत्व आहे. कोकरू हा शब्द तीन महत्वाच्या बाबीचे प्रतिक आहे : सौम्यता, यज्ञ आणि विजय.
1.  कोकरू सौम्यतेचे प्रतिक
कोकरू सौम्य व निरपराधी प्राणी आहे. येशुसुद्धा सौम्य व नम्र होता. मत्तयलिखित शुभवर्तमानात येशु म्हणतो ‘माझ्यापासून शिका कारण मी मनाने लीन व सौम्य आहे’ (मत्तय १९:२९)
2. कोकरू यज्ञपशूचे प्रतिक
जेव्हा योहानाने येशूला देवाचे कोकरू म्हणून संबोधले तेव्हा त्याला अर्पण केलेल्या यज्ञपशुची आठवण झाली. तसेच अब्राहामाला देवाने मुलाऐवजी मेंढरू दिले ह्याची आठवण झाली. येशु ख्रिस्त हा मानवाच्या तारणासाठी कोकरू बनला होता व कालवरी डोंगरावर त्याने स्वतःला अर्पण करून आपणास पापमुक्त केले.
3. कोकरू विजयाचे प्रतिक
यहूदा मक्काबिच्या काळात शिंग असलेले कोकरू विजयाचे प्रतिक बनले. शमुवेल, दावीद व शलमोनाप्रमाणे मक्काबीचे वर्णन शिंग असलेले कोकरू म्हणून केलेले आहे. येशु ‘देवाचे कोकरू’ ह्याने सैतानावर व पापावर विजय मिळवला. हे विजयी कोकरू देवाच्या प्रजेची पापापासून मुक्तता करते आणि त्यांना देवराज्यात घेऊन जाते. तेथे तो त्यांच्यावर सत्ता गाजवतो म्हणून कोकरू हे विजयाचे प्रतिक आहे.

बोधकथा:

एक व्यक्ती शोरूमच्या काचा साफ करत होता जेणेकरून शोरूमधील वस्तू बाहेरून स्पष्ट दिसतील. अशावेळी त्याला काचेवर एक डाग दिसला. तो व्यक्ती डाग साफ करण्यास सुरवात करतो परंतु डाग काही पुसत नव्हता. त्याने खूप साबण लावून प्रयत्न केले पण डाग काही गेला नाही. काही काळाने त्याच्या लक्षात आले कि, तो डाग बाहेरून नाही तर आतमधून आहे. तेव्हा त्या व्यक्तीने आतमधल्या व्यक्तीस तो डाग साफ करण्यास सांगितले व त्याने तो डाग साफ केला आणि काच स्वच्छ दिसू लागली व शोरूम मधील वस्तू स्पष्ट दिसू लागल्या.

मनन चिंतन:

आपण प्रत्येकजण पापी आहोत आणि त्या पापामुळे आपल्या सुद्धा काळजाला पापाचा डाग पडला आहे आणि ते आपण साफ केले पाहिजे. पण त्यासाठी आपल्यामध्ये प्रभू ख्रिस्त आला पाहिजे. केवळ देवच आपल्याला पापमुक्त करु शकतो. आणि म्हणूनच देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला कोकरू बनवून, मानवरूप धारण करून आपल्यामध्ये पाठवलं जेणेकरून आपल्या पापांची क्षमा होईल. योहानाने तोच ख्रिस्त आपणास दाखवला आणि म्हटले पहा, “जगाचे पाप दूर करणारे देवाचे कोकरू.” योहानाच्या म्हणण्याचा उद्देश असा आहे कि, तुम्ही पवित्र व्हा. तुमच्या हृदयाचे दार नीट ठेवा जेणेकरून येशु ख्रिस्त जगाचा तारणारा तुमच्यामध्ये येईल व तुम्हाला साफ करून तारण प्राप्त होईल.
ख्रिस्ताद्वारे देवाने मानवाबरोबर असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा प्रस्थापित केले. जेव्हा आपण पापाच्या दडपणाखाली असतो तेव्हा आपणास तीव्र वेदना होतात पण जेव्हा आपण येशुकडे मदतीसाठी धाव घेतो तेव्हा येशु आपल्या मदतीला धावून येतो. आपल्या पापांची क्षमा करून प्रेम, दया व शांतीने आपणास भरून टाकतो. ह्या कोकराचे रक्त आपणास पापमुक्त करते व पवित्र आत्म्याने भरून आपणास तारण मिळते.
आपण सर्व देवाची प्रेमळ लेकरे आहोत आणि तो आपणास कधीही अंतर देणार नाही व आपल्या प्रेमळ पुत्राद्वारे आपणास्तव पापांपासून सोडवेल. म्हणून आपण त्या जिवंत कोकराकडे प्रार्थना करूया जेणेकरून आपण त्याच्याद्वारे पापांपासून मुक्त होऊ व त्याचे तारण मिळवू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे देवाच्या कोकरा आमची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप महाशय सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व धर्मभागिनी ह्यांनी अनुभवलेला ख्रिस्ताचा प्रकाश सर्व जगात पसरविण्यासाठी प्रयत्न करावे व योहानाप्रमाणे ख्रिस्ताची ओळख सर्वांना करून द्यावी म्हणून प्रार्थना करूया.
२. जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ती ह्या नात्याने आपण सुद्धा योहानाप्रमाणे ख्रिस्ताची ओळख दुसऱ्यांना करून द्यावी म्हणून प्रार्थना करूया.
४. जे लोक दुःखी, कष्टी व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.