Thursday 28 December 2017

 Reflections for the Solemnity of Mary the Mother of God     (01-01-2018) by Br Robby Fernandes.





देव मातेचा सोहळा


दिनांक: १-१-२०१८
पहिले वाचन: गणना ६:२२-२७
दुसरे वाचन: गलतीकरांस ४:४-७
शुभवर्तमान: लुक २:१६-२१








प्रस्तावना:

आज आपण नवीन वर्षात पदार्पण करीत असताना वर्षाच्या पहिल्याच दिवशी ख्रिस्तसभा आपल्याला “देव मातेचा” सोहळा साजरा करण्यासाठी बोलावत आहे.
आज आपण मरिया मातेच्या जीवनावर मनन चिंतन करणार आहोत. मरीयेचे जीवन हे कृपापूर्ण आहे, म्हणजे कृपेने भरलेले आहे. मरीयेच्या हृदयामध्ये खरी नम्रता आहे, कारण ती देवाच्या शब्दापुढे लीन झाली. ती जरी साधी, भोळी स्त्री असली तरी ख्रिस्तसभेने तिला महत्वाचे स्थान दिले आहे. ज्या प्रमाणे ती देवाच्या शब्दापुढे लीन होती, त्याच प्रमाणे मरीयेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या स्वत:च्या अंत:करणात ठेवल्या असे संत लुक आपल्याला सागतो. तिचा आदर्श आपण आपल्या नजरेपुढे ठेऊन नवीन वर्षात चांगले जीवन जगण्यासाठी ह्या पवित्र मिस्सा बलिदानात देवमातेचे सहाय्य मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: गणना ६:२२-२७

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराच्या सांगण्यावरून आशीर्वादाची प्रार्थना अहरोन आणि त्याचे पुत्र लोकांना देतात. कारण ती प्रजा देवाने निवडीलेली आहे. म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “त्यांनी इस्त्रायल लोकावर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. 

दुसरे वाचन: गलतीकरांस ४:४-७

संत पौल स्पष्ट करतो की, आपल्या सर्वांना नवजीवन मिळाले आहे. म्हणूनच  आता पासून आपण गुलाम नाही, देवाचे नुसते पुत्र नाही तर देवाद्वारे वारस ही आहोत. म्हणून देवाने आब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंत:करणात पाठवले आहे.

शुभवर्तमान: लुक २:१६-२१

लुक आपल्याला सागत आहे की, मेंढपाळ येशू ख्रिस्ताला भेटायला आले. तसेच मरीयेने या सर्व गोष्टीचे मनन करून, त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या. या सर्वावरून असे समजते की, मरीयेचा देवावरील अतूट असा विश्वास आणि या विश्वासामुळे मरीयेला त्याच्या कार्यासाठी देवाने निवडले.

बोधकथा

एक नवीन जोडप होत. त्यांच आताच लग्न झाल होत. त्यांचा सुखाचा संसार चालला होता. पण बायकोला त्याची आई आवडत नसे. म्हणून ती सतत त्याच्या आईवर आरोप करत असे. आणि नवरा सतत तिला तिच्या मर्यादेत राहण्यास सांगत असे. एकदा असे झाले की, बायको काही गप्प बसण्यास नावच घेत नव्हती, ती जोरजोराने ओरडून सांगत होती, “मी सोन्याची अंगठी टेबलावरच ठेवली होती, आणि तुमच्या आई शिवाय खोलीत कुणीच आलेल नव्हत.” अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली. ही गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशिलतेच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली दिली. पत्नीला ती चापट सहन झाली नाही. म्हणून ती घर सोडूनच चालली होती, पण जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का? तेव्हा पतीने उत्तर दिले. ‘जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा वडील वारले, आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायची, ज्यात एक वेळच पोट भरायचं. आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची आणि म्हणायची, “बाळा तू खा”, माझ्या भाकऱ्या या डब्यात आहेत. मी पण नेहमी अर्धी भाकर खावून म्हणायचो, आई माझं पोट भरलंय आता मला नाही खायचं. आईने माझी उष्टी अर्धी भाकर खावून माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं. आज मी तीन भाकरी कमवायचा लायकीचा झालो. पण हे कस विसरू की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं. ती आई या स्थितीला अशा अंगठीसाठी भुकेलेली असेल, हा मी विचारही सुद्धा करू शकत नाही. तू तर तीन महिन्यापासून माझ्या सोबत आहे. पण मी तर आईच्या तपश्चर्याला २५ वर्षापासून बघितले आहे. हे एकून दवाज्यामागे उभ्या असलेल्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती समजूच शक
त नव्हती की, मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीच कर्ज फेडतोय की, ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....

मनन चिंतन

माझ्या प्रिय मित्रांनो फ.मु.शिंदे. हे गाजलेले कवी आहेत. ते त्याच्या “आई” या कवितेमध्ये असे लिहितात,
“आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हबरणाऱ्या गाई?”
आई खरंच काय असते!
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते.
दुधावरची साय असते, लेकराची माय असते.”
अशा प्रकारे फ.मु.शिंदे यांनी आईचे वर्णन केलेले आहे.
प्रत्येकाने, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईला ईश्वराचे स्थान दिले आहे. आईची माया व वात्सल्य वेगळ्या प्रकारचे असते जे आपल्याला तिच्याकडे आकर्षित करते. कवी फ.मु.शिंदेने सुद्धा “आई” विषयीचे प्रेम ह्या कवितेमध्ये रंगविलेले आहे. त्यांनी त्यांच्या भावना, विचार ह्या कवितेद्वारे मांडलेले आहेत. ज्या प्रमाणे समुद्राचे पाणी कमी होत नाही, नदी समुद्राला भेटल्याशिवाय राहत नाही, त्याच प्रमाणे आईचे प्रेम कधीही कमी पडत नाही, तिची ओढ कधीही विसरली जात नाही.
येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या आईचे प्रेम, माया अनुभवली होती. तिची ओढ त्याने पाहिली होती. म्हणून ती येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या सुख-दु:खात राहिली. म्हणजे ती जन्मापासून तर मृत्युपर्यंत त्याच्या सोबत राहिली. “From womb to tomb.”
परमेश्वराने तिची निवड केली कारण ती सर्व स्त्रियामध्ये धन्य गणली होती हे लुकचे शुभवर्तमान सांगते आहे (लूक १:४२). परमेश्वराने पुरुषाला न निवडता स्त्रीची निवड केली. कारण प्रभू येशूला मरीयेच्या उदरी पाठवून, परमेश्वराने स्त्रीद्वारे संपूर्ण विश्वाचे तारण केले. म्हणूनच अलीशेबा उच्च स्वरामध्ये बोलली, “स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य.” देवपित्याने आपल्या एकुलत्या पुत्राला ह्या जगात पाठविण्यासाठी एका कुमारिकेची निवड केली. तिच्या गर्भसंभवापासून देव पित्याने तिचा सांभाळ केला व तिला पवित्र ठेवले, जेणेकरून तिला “देवाची माता” म्हणतील’. लुक १:४३ आपल्याला सांगते की, ती खरोखरच “देवाची आई” आहे, म्हणूनच अलीशेबा अशी उद्गारते की, “माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कोठून?”
आजची तिन्ही वाचने आपल्याला पवित्र मरीयेमध्ये असलेली आईची प्रतिमा दर्शविते. पहिल्या वाचनात असे दिसून येते की, परमेश्वर त्याच्या प्रजेला आशीर्वादित करत आहे. मरीयेच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू येशुद्वारे हाच आशीर्वाद परमेश्वराने सर्व विश्वाला बहाल केला. पौल आपल्याला सुचवत आहे की, आपण सर्वजण देवाचे पुत्र नसून वारस आहोत. मरिया माता ही खरोखर देवाची वारस झाली आणि आपणा सर्वाना तिच्याकडून देवाची मुले होण्याचा वारसा लाभलेला आहे. लुकलिखित शुभवर्तमान आपल्या समोर मेंढपाळांचे उदाहरण ठेवत आहे. मेंढपाळ हे अशिक्षित, समाजामध्ये मान-सम्मान नसलेली माणसे होती. पण परमेश्वराच्या नजरेत अशीच माणसे सर्वश्रेष्ठ होती, म्हणूनच गाब्रीयेल देवदूताने परमेश्वराचा पहिला संदेश मेंढपाळाला दिला. तुमचा तारणारा जन्मलेला आहे. या वरून असे दिसून येते की, परमेश्वरासमोर सर्वजण समान दर्जाचे आहेत. त्याच्या नजरेत आपण सर्व त्याची मुले आहोत. म्हणूनच परमेश्वर वाकड्या रेषेवर सरळ लिहू शकतो. म्हणजे परमेश्वराचा निर्णय हा आपल्या निर्णयाहून आगळा-वेगळा असतो. त्याच्याजवळ जात-पात, राग-मत्सर काहीही आढळत नाही.
आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आई ही महत्वाची भूमिका बजावते. ज्या प्रमाणे माशाला पाण्यापासून, फांदीला झाडापासून व नाकाला सुगंधापासून विभक्त करू शकत नाही, त्याच प्रमाणे, आईला तिच्या प्रेमापासून कधीही विभक्त करू शकत नाही. आपल्या जीवनात सर्व काही असलं पण आईच प्रेम नसलं तर काय लाभ! म्हणूनच असे म्हणतात, “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” तात्पर्य हेच की, आपल्या जवळ कितीही अमाप धन-दौलत, पैसा-अडका असला तरी आईच्या प्रेमा बरोबर केव्हाच तुलना करू शकत नाही. खुद्द परमेश्वराला सुद्धा या जगती येण्यासाठी एका आईची गरज भासली. असे नाही कि, परमेश्वर आई शिवाय अवतरू शकत नाही, पण त्याने आईची निवड केली कारण ती “जन्माची शिदोरी” आहे. म्हणूनच फ.मु.शिंदे असे म्हणतात की, “आई असते, जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.”  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: पवित्र माते आम्हासाठी विनंती कर.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्त बंधू- भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना सुख-समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व चांगल्या आरोग्याचे जावो म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रार्थना करूया. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे त्या कार्यरत आहेत. त्याची छळणूक होऊ नये म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करूया.
४. पाचारणासाठी प्रार्थना करूया. अनेक तरुण-तरुणीनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले आहे. त्या सर्वाना पवित्र मातेने विशेष आशीर्वाद द्यावा, त्यांनी प्रभूच्या हाकेला साथ द्यावी. तरुणांनी येशूच्या मळ्यात काम करण्यास होकार द्यावा म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया.
५. आता, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी  ठेऊया. 




  



Reflections for the feast of Holy Family (31-12-2017) by Br Jackson Nato.



पवित्र कुटुंबाचा सण


दिनांक: ३१-१२-२०१८
पहिले वाचन : बेन्सिराची बोध वचने ३:२६;१२-१४
दुसरे वाचन : कलस्सैकरांस पत्र ३:१२–२१
शुभवर्तमान : लुक २:२२–४०








प्रस्तावना :

     आज आपण येशू, योसेफ आणि मरिया ह्यांच्या ‘पवित्र कुटुंबाचा’ सण साजरा करित आहोत. येशू, योसेफ आणि मरिया ह्यांचे जीवन हे सर्व कुटुंबांसाठी प्रेरणादायी कुटुंब आहे म्हणूनच देऊळमातेने आपणासमोर हे ‘पवित्र कुटुंब’ ठेवले आहे.
     आजचे पहिले वाचन बेन्सिराची बोध वचने ह्या पुस्तकातून घेतले आहे. मुलांनी आपल्या आई-वडिलांचा मान कसा राखावा ह्याबद्दल हे पुस्तक आपणास सांगते. कारण असे केल्याने आपण सर्व देवाच्या कृपेस पात्र ठरतो. कलस्सैकरांस लिहिलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला अधर्मी मूल्यांपासून दूर राहून ख्रिस्ती मूल्यांचे अनुकरण करण्यास आव्हान करत आहे. तसेच आजच्या लुककृत शुभवर्तमानात आपण पाहतो की योसेफ व मरीयेने मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे येशूला मंदिरात समर्पण करून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या.
प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाला ‘पवित्र कुटुंबाची’ फार गरज आहे. ज्याप्रमाणे येशू, योसेफ व मरिया ह्यांनी आपले कुटुंब प्रेरणादायी कुटुंब बनवले, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपले कुटुंब प्रेम व शांतीने भरून ह्या ‘पवित्र कुटुंबास’ साक्ष द्यावी म्हणून परमेश्वराकडे याचना करूया.

सम्यक विवरण:  

पहिले वाचन : बेन्सिराची बोध वचने  ३:२६; १२-१४

ह्या वाचनात आपण पाहतो की ह्या पुस्तकाचा लेखक देवाच्या प्रेमाने भारावून गेला आहे. लेखक हेच प्रेम कुटुंबात प्रकट व्हावे म्हणून बोध करत आहे. लेखकाच्या मताप्रमाणे मानवजातीच्या उद्धारासाठी कुटुंब मुलभूत गोष्ट असून, पित्याला महत्वाचे स्थान दिले आहे कारण पिता कुटुंबाच्या मुलभूत गरजा भागविण्यात महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून त्याचा आदर करणे हे कुटुंबाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच आई सुद्धा पित्याच्या गैरहजेरीत महत्वाची भूमिका पार पाडत असते. मुलांचे आईबरोबर घट्ट एकदम जवळचे नाते असते व मुलांची संस्कारमय वातावरणात वाढ व्हावी ह्यास ती प्रथम प्राधान्य देते. ह्या वाचनात लेखक मुलांनी आई-वडिलांचा आदर करावा म्हणून उद्देश करतो. जेव्हा वडील वृद्ध होतात तेव्हाच त्यांना मुलांची खरी गरज भासते. अशावेळी मुलांनी त्यांस प्रेमाने वागवावे, त्यांचा आदर करणे, त्यांच्या वयोमानानुसार आलेल्या मानसिक व शारीरिक आजारात त्यांना सांभाळून घेणे हेच त्यांचे आद्य कर्तव्य आहे. अशी वर्तवणूक देवास खुश करील व देव सर्व प्रार्थनेचे उत्तर आपणास देईल. अशाप्रकारचा बोध लेखक आपल्याला करत आहे.

दुसरे वाचन : कलस्सैकरांस पत्र ३:१२–२१

एपाफास हा संत पौलचा शिष्य होता आणि कलस्सैमध्ये त्याने ख्रिस्ताच्या शिकवणूकीचा प्रचार केला. एक दिवस पौल कैदेत असताना एपाफास पौलला भेटण्यासाठी आला व त्याने तेथे असलेल्या लोकांना शिकवण दिली. कलस्सैमधील ख्रिस्ती लोकांची त्याने पौलकडे तक्रार केली. ह्या तक्रारीस उत्तर म्हणून पौलाने कलस्सैकरांस उद्देशून हे पत्र लिहिले आहे.
संत पौल म्हणतो की, ख्रिस्ताचा स्वीकार केल्याने आपण सर्व नवीन झालो आहोत; नवीन वस्त्र परिधान केले आहेत. ह्याचा अर्थ म्हणजे ख्रिस्ती बनून आपण सहनशिलता, क्षमा व नम्रता ह्या मुल्यांचा स्वीकार केला पाहिजे. ही सर्व मुल्ये प्रेमाने बांधली आहेत म्हणून आपल्या प्रत्येक कृत्यामध्ये ही मुल्ये उठून दिसली पाहिजेत. आपणास जर कोणी विनाकारण इजा पोहोचवत असेल तर त्यांस आपण क्षमा केली पाहिजे. कारण आपल्याला ख्रिस्ताने ह्याचे उदाहरण स्वत: दिले आहे. ख्रिस्ती म्हणून आपले सर्व कार्य हे ख्रिस्ताच्या नावाने करावे ह्याबद्दल संत पौल आपल्याला मार्गदर्शन करतो.

शुभवर्तमान : लुक २:२२–४०

 ह्या शुभवर्तमानात संत लूक मरिया आणि योसेफाने येशूला मंदिरात समर्पण केले व आपली जबाबदारी पूर्ण केली ह्याबद्दल सांगत आहे. यहुदी नियमानुसार प्राणी किंवा मनुष्याच्या उदरातून येणारे पहिले अर्पण देवाला समर्पण करावे लागत असे. पण मनुष्याच्या बाबतीत ह्या नियमातून सुटका करण्यासाठी ‘होमार्पण’ करावे लागे. म्हणून येशूच्या बाबतीत योसेफ व मरीयेने पारव्याचे अर्पण केले. पारवा हे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांचे अर्पण होते. ह्यावरून आपल्याला असे दिसते की ते अतिशय गरीबीचे जीवन जगले. पण त्याबद्दल ते असंतुष्ट नव्हते उलट त्यांनी देवाचे आभार मानले. देवाने त्यांचे दु:ख व कष्ट कमी करण्यासाठी काही चमत्कारी कृत्ये केले नाही तर त्या परिस्थिती अनुभवण्यास भाग पाडले.

मनन चिंतन:

 “चार भिंती उभारल्या तर घर बनते, पण जेव्हा चार हात एकत्र येतात तेव्हा कुटुंब बनते आणि जेव्हा हे कुटुंब त्या चार भिंतीत वास्तव्य करते तेव्हा त्या घराला घरपण येते.” एकवेळ कुटुंब चार भिंतीबाहेर आपले अस्तिव टिकून ठेवू शकते पण चार भिंतीचे अस्तिव कुटुंबांशिवाय शून्य आहे. कारण, कुटुंब जीवंत व्यक्तीने बनलेले असते आणि त्या सजीव व्यक्तीचे कार्य अजीव भिंतीस नवजीवन प्राप्त करते. हे आहे कुटुंबाचे सामर्थ्य.
कुटुंबाचे महत्व प्रत्येक मनुष्याच्या जीवनात गरजेचे आहे. कुटुंब बनण्यासाठी तीन घटक अत्यंत गरजेचे असतात. ते म्हणजे आई, वडील आणि मुल. जसे माळेतील मणी एकत्र ठेवण्यासाठी धाग्याची गरज असते तसेच ह्या तीन व्यक्ती बांधण्यास प्रेमाची गरज असते. जर त्यांची हृदये प्रेमाच्या धाग्यांनी विणलेली असतील तर ते एक आदर्श कुटुंब बनते. तेथे एकमेकाप्रित्यर्थ आदर सन्मान असते. एकमेकाविषयी आपुलकी असते. एकमेकांचा स्वीकार करतात आणि अशा कुटुंबाकडे पाहिले तर जगाच्या उज्ज्वल भविष्याची आशा आपल्या हृदयात रुतून बसते. कारण माणसाची बहुतांश जडणघडण ही कुटुंबात होत असते आणि कुटुंबात जे काही शिकतो तेच तो बाह्यजगात प्रदर्शित करतो. म्हणून कुटुंबात चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. चांगली मुल्ये आत्मसात करणे महत्वाचे असते. ह्या सर्वांची सुरुवात प्रेमाने होत असते. म्हणून जर कुटुंब संस्कारमय असेल तर, समाज संस्कारमय होतो. अशाप्रकारे जगाचे भवितव्य हे कुटुंबावर अवलंबून असते.
     आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. कुटुंब आणि ख्रिस्ती जीवन ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुटुंबाशिवाय ख्रिस्ती मुल्यांची जोपासना करणे फार अवघड आहे. देऊळमाता आपल्याला सांगते की, ‘कुटुंब हे एक छोट चर्च आहे’ आणि अशी अनेक कुटुंब एकत्र आली तर धर्मग्राम तयार होते. जर ह्या छोट्या चर्चला तडा गेली तर संपूर्ण देऊळमातेला तडा जाते. म्हणून हे छोटे चर्च मजबूत ठेवणे गरजेचे आहे. पोप फ्रान्सिस कुटुंबांविषयी म्हणतात, “कुटुंब हे आपले सर्वात जवळचे रुग्णालय आहे. जिथे आजाऱ्यांची काळजी घेतली जाते. आपली पहिली शाळा म्हणजे कुटुंब जिथे जीवनावश्यक गोष्टींचे शिक्षण दिले जाते. युवकांच्या प्रत्येक अडचणीचे स्थिर उत्तर मिळण्याचे ठिकाण म्हणजे कुटुंब. वृद्धांचे अतियोग्य घर”. हे वाक्य दैनंदिन जीवनासाठी पात्र ठरते. कारण प्रत्येक आजाऱ्याला कोणीतरी काळजी करणारा हवा असतो. प्रत्येकाला शिक्षणाची गरज असते. प्रत्येक युवकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असते. प्रत्येक वृद्धाला साथी हवा असतो आणि ह्या सर्व गरजा भागविण्यासाठी कुटुंबाशिवाय अतियोग्य व्यक्ती दुसरीकडे सापडणे कठीण आहे. आणि ह्या सर्व गोष्टींची जेव्हा कुटुंबात पूर्तता होते तेव्हा त्यांच्यामधील नाते मजबूत होते. अशाप्रकारे ते देऊळमातेच्या मजबुतीस कारणीभूत ठरते.
     कुटुंबाचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे ‘जबाबदारी’. कुटुंबातील व्यक्तीची काहीना काही तरी जबाबदारी असते. वडील कुटुंबात आर्थिक हातभार लावतात तर आई जेवण बनविण्यापासून सर्व घरकाम बघते. पण आई वडिलांची सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे त्यांच्या पदरात जी देवाने सुंदर दापत्य दिली आहेत त्यांचे संगोपन करणे. कधी कधी काम आणि मुलांचे संगोपन ह्याचा ताळमेळ साधण्यात आई वडिलांची दमछाक होते आणि मुलांवर दुर्लक्ष होते. अशावेळी आपल्याकडे येणाऱ्या पिढीची जबाबदारी आहे आणि ती आपण कशी म्हणजे योग्यप्रकारे पार पाडली पाहिजे ह्याची स्वत:स आठवण करून दिली पाहिजे. जेव्हा मुले चुकतात, वाईट मार्गाला जातात तेव्हा त्यांची छडी ऐवजी प्रेमाने समजूत घातली पाहिजे. त्यांना जवळ घेऊन चांगले आणि वाईटातील फरक समजावला पाहिजे. असे केल्याने त्यांची काळजी करणारे ते एक चांगले व गुणसंपन्न आहेत, त्यांच्याकडे काहीतरी महान करण्याची क्षमता आहे. ह्यांना पाठींबा देणारे कोणीतरी त्यांचे स्वत:चे आहेत ह्याची त्यांना जाणीव होते व त्या दिशेने पावले उचलण्यास त्यांना दुजोरा मिळतो.
     आपल्या आजूबाजूला आपण खूप कुटुंब पाहतो जी वेगवेगळ्या अडचणीत आहेत. प्रत्येक कुटुंब हे विविध प्रकारच्या त्रासातून जात असते. आर्थिक समस्या, सामाजिक समस्या, आजारपण, वाद, ताणतणाव. अशावेळी आपण पवित्र कुटुंबाकडे पाहिले पाहिजे. येशू ख्रिस्त, मरिया आणि योसेफ हे गरिबीत वाढले. सुताराचे काम करून एक साधेपणाचे जीवन जगले पण अशा परिस्थितीत सुद्धा ते खचले नाहीत. हातावर मोजण्या इतक्या पगारात त्यांनी समाधान मानले व देवाच्या आज्ञेत राहिले. बाळ येशूवर ते चांगले संस्कार करण्यास ते कमी पडले नाहीत. कदाचित येशूला देण्यास त्यांच्याकडे संपत्ती नव्हती. पण त्यांनी त्याला योग्य ती शिकवण दिली. हा आदर्श घेऊन आहे त्या गोष्टीत समाधान मानले पाहिजे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सर्व समस्येतून मार्ग काढण्यास तत्पर असलो पाहिजे.
     आज आपण पाहतो की आज बहुतांश कुटुंबे आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत. मुलांना देण्यास त्यांच्याकडे सर्व आहे, पण वेळ नाही, संस्कार नाहीत आणि म्हणून ही पोकळी ते वेगवेगळ्या आधुनिक यंत्रांनी भरवतात. मुलांना मोबाईल, संगणक, विडीओ गेम्स पुरवता. पण ह्या गोष्टी मुलांना एकाकी बनवतात. त्यांना खऱ्या कुटुंबापासून वंचित करतात आणि ही मुले जेव्हा भविष्यात मोठी होतात तेव्हा कुटुंबात वावरणे त्यांना कठीण जाते. स्वत:चे कुटुंब सांभाळण्यास ते कमी पडतात आणि सरतेशेवटी ते मोडकळीस येतात. असे होऊ नये म्हणून आधीच दक्ष राहिले पाहिजे. संत पोप जोन पौल दुसरे म्हणतात, “जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते”. ह्यावर विश्वास ठेवून प्रार्थनेस एकत्र बसलो पाहिजे जेणेकरून आपले कुटुंब एकत्र राहील. सुख, शांती व समाधान सदैव कुटुंबात नांदत राहतील.
ख्रिस्ती जीवनात कुटुंबाला महत्वाचे स्थान आहे. कारण ख्रिस्ती जीवन हे एकाकीपणाचे जीवन नसून एकमेकांबरोबर जगण्याचे जीवन आहे. एकमेकांवर प्रेम करण्याचे जीवन आहे. ह्यासाठी कुटुंब अतियोग्य जागा आहे. कधीकधी सामाजिक व वैयक्तिक घटकांमुळे कौटुंबिक जीवनास दगा पोहचतो. हे होऊ नये व कौटुंबिक जीवन अधिकाधिक मजबूत व्हावे व ख्रिस्ती मूल्यांनी समृद्ध बनावे म्हणून देऊळमाता आपल्या समोर ‘पवित्र कुटुंबाचा’ आदर्श आपल्यासमोर ठेवत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमच्या कुटुंबाचे संरक्षण कर.

१. आपली देऊळमाता विश्वभर ख्रिस्ताचे प्रेम पसरवत आहे. हे प्रेमाचे कार्य पुढे नेण्यास त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी व अधिका-अधिक लोकांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. कुटुंब हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याचे महत्व जाणून कुटुंबाचे पालन पोषण करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व आपण त्यागमय जीवन जगून आपले कुटुंब सदासर्वदा सुखी रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जी कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, अशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचे, शांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
५. आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचा, मायेचा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.  


       


Friday 22 December 2017

Reflection for the Homily of Christmas Day (25-12-2017) By Br. Rahul Rodrigues.


ख्रिसमस (सकाळीची मिस्सा)


दिनांक: २५/१२/२०१७
पहिले वाचन: यशया ६२:११-१२
दुसरे वाचन: पौलाचे तीताला पत्र ३:४–७  
शुभवर्तमान: लूक २:१५-२०








 ‘देव मानव झाला धरतीवर आला, मानवात शिरला’.


प्रस्तावना:

“आनंद करा, उल्हास करा! अहो पृथ्वीच्या सर्व राष्ट्रांनो प्रीतीचे गीत गा.
कारण आज आपला तारणारा आपल्या तारणासाठी जन्मला आहे.”
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपली वाट पाहण्याची वेळ संपली आहे. ख्रिस्त आम्हा मध्ये जन्मला आहे. तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, दुःखातून सुखाकडे, आणि पापांतून पुण्याकडे नेण्यास आला आहे. ज्याप्रमाणे मेंढपाळ आपली मेंढरे सोडून बाळ येशूला पाहण्यास व त्याचा अनुभव घेण्यासाठी गेले, त्याचप्रमाणे आपण सुद्धा बाळ येशूचा अनुभव घेण्यासाठी इथे जमलो आहोत.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगत आहे की आपला तारणारा आला आहे व आपले तारण त्याच्या हाती आहे. दुसऱ्या वाचनामध्ये तीताला लिहिलेल्या पत्रात संत पौल म्हणतो की, आपल्या तरणाऱ्याचा जन्म आपल्या सत्कार्यामुळे झाला नसून तर देवाची आम्हावरील असलेल्या दयेमुळे व प्रीतीमुळे झाला आहे. लूकलिखित शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की, परमेश्वराची आम्हावरील द्या व प्रीती मेंढपाळानी त्या गाईच्या गोढ्यात जन्मलेल्या ख्रिस्तामध्ये पाहिली.
     ज्याप्रमाणे ख्रिस्त ह्या भूतलावर दिन-दुबळ्यांच्या तारणासाठी अवतरला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा दीन व गरजवंताच्या हितासाठी झटावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया ६२:११-१२

      पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणाला आनंद व हर्ष करण्यास सांगत आहे. कारण आपला तारणारा आला आहे. हा तारणारा आपले उद्धार करील. आपण सर्वजण देवाने निवडलेली लोक आहोत. जसे देवाने मोशेच्या मदतीने इब्री लोकांना फेरोच्या गुलामगिरीतून सोडविले होते, त्याचप्रमाणे हा तारणारा आपणास आपल्या पापांतून व गुलामगिरीतून मुक्त करेल, असा संदेश यशया संदेष्टा आपणास देत आहे.

दुसरे वाचन: पौलाचे तीताला पत्र ३:४–७  

     तीताला लिहिलेल्या पत्रात संत पौल ‘तारण म्हणजे काय’ ह्याचा अर्थ आपणास स्पष्ट करून सांगत आहे. देवाची दया महान आहे. ह्याच देवाच्या महान दयेमुळे आपले तारण झाले आहे. ख्रिस्ताच्या जन्माने आपल्या जीवनाचे नवीकरण झाले आहे. आपण अंधारात भरकटलेलो होतो, पापांच्या जाळ्यात गुरफटून अडकलेलो होतो; परंतु ख्रिस्ताने आपणास ह्या सर्वातून सोडविले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, ख्रिस्ताचे  आगमन व त्याचे नेमलेले कार्य ह्या दोन्हीवर परमेश्वर देवाच्या प्रीतीचा हात आहे. देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करण्यासाठी आला व आपण देवाच्या कृपेने नीतिमान ठरलो आणि आपल्याला युगानुयुग टिकणारे जीवन मिळाले. या सर्व कृतींना ‘तारण’ म्हटलेले आहे. अशा सुंदर शब्दांनी संत पौलने ‘तारण’ ह्या शब्दाचे वर्णन केले आहे.

शुभवर्तमान: लूक २:१-२०

     ख्रिस्तजन्माचा पहिला संदेश हा गरीब धनगरांना दूताच्या मदतीने प्राप्त झाला.. दूत ह्या धनगरांना ख्रिस्तजन्माची कहाणी सांगतो व त्यांना तारणाची आशा दाखवतो. हा संदेश प्रथम धनगरांनाच का देण्यात आला? असा प्रश्न आपल्या मनात आला असेल. ह्याचे उत्तर असे की, गरीब धनगरांना समाजात स्थान नव्हते. समाजाने त्यांना तुच्छ लेखलेले होते. मंदिरात बली अर्पण करण्यासाठी लागणारे कोकरू हे मंदिर अधिकाऱ्याच्या कळपातून पुरविले जाई. धनगर हे ह्या कळपाची राखण करीत असत. धनगर जे मंदिरासाठी लागणाऱ्या कोकरांची काळजी घेत होते, त्यांनाच प्रथम जगाचे पाप-हरण करणारे देवाचे कोकरू पाहण्याचे भाग्य लाभले. धनगरांना दूताचा संदेश मिळाला तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला व ते बेथलेहेमास गेले. त्यांनी देवाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचे गुणगान-गायिले व ह्या सर्व गोष्टी नगरात जाऊन इतरांना कळवल्या.

बोधकथा :

एकदा एक माणूस आपल्या गर्भवती स्त्रीला दवाखान्यात घेऊन जातो कारण त्या स्त्रीची प्रसूतीची वेळ जवळ आली होती. बराच वेळ झाला परंतु डॉक्टर काही सांगत नव्हते. जस-जसा उशिरा झाला त्या व्यक्तीला चिंता वाटू लागली. थोड्याच वेळात डॉक्टर ऑपरेशन थेटर मधून बाहेर आले व त्या व्यक्तीला म्हणाले, “मला माफ करा, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही व बाळ जन्माला येताच मरण पावले.”  हे ऐकून तो माणूस स्वतःला आवरू शकला नाही व मोठ्याने रडू लागला व पूर्ण पणे खचून गेला.
     ज्या बाळासाठी त्याने नऊ महिने वाट पाहिली, तेच बाळ जन्माला येताच मरण पावले. त्या व्यक्तीने डॉक्टरांना विचारले की ह्या हॉस्पिटल मध्ये नेत्र दानाची गरज आहे असे मी ऐकले होते, तर माझ्या बाळाचे डोळे कुणा दुसऱ्याला दृष्टी देण्यास उपयोगी पडू शकतात का ? दुसऱ्या दिवशी त्या बाळाचे डोळे एका श्रीमंत व्यक्तीला व एका आईला देण्यात आले.

मनन चिंतन :

     दोन हजार वर्षा पूर्वी एक बाळ जन्माला आले व आपल्याला पापांच्या अंधकारमय जीवनातून आध्यात्मिक डोळे किवा दृष्टी दिली. ते सुद्धा फुकट, कुठलीही किंमत न मोजता दिली. आपण सार्वजण पापी आहोत. पापांच्या अंधकारातून आपली मुक्तता व्हावी म्हणून परमेश्वराने आपल्या पुत्राला ह्या धरतीवर पाठवले. यशया (यशया ९:२) म्हणतो “आता लोक अधोलोका सारख्या अंधकारात दिवस काढीत आहेत. पण ते तेजस्वी प्रकाश पाहतील. पातळासारख्या अंधकारमय प्रदेशात सध्या लोक राहत आहेत पण त्यांना ‘तेजस्वी प्रकाश’ दिसेल.” येशू हा तेजस्वी प्रकाश आहे जो आपले तारण करावयास ह्या भूतलावर उतरलेला आहे.
     आज आपण नाताळचा सण साजरा करीत असताना आपण परमेश्वराचे मानवावरील प्रेम हे ख्रिस्ताच्या येण्याने कसे परिपूर्ण झाले यावर विचार विनिमय करत आहोत. अखिल मानवजातीच्या तारणासाठी देव मानव झाला. कारण देवाला (ख्रिस्ताला) कोणी बाहेरचा म्हणून तारण करायचे नव्हते तर आपणा सारखे बनून आपले तारण करायचे होते. “देवाने आम्हावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हामध्ये पाठवला” (योहान ३:१६). हे नाथन ह्या प्रवक्त्याने सुद्धा दाविद राजाला सांगितले होते: “राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील व तुझे सिंहासन टिकून राहील (२ शमुवेल ७:१६)
     ख्रिस्ताच्या जन्माने सर्वत्र तारणाची आशा निर्माण झाली. देव मानव झाला. ‘आमचे तारण’ हे त्याचे उद्दिष्ट होते. आपण पाहतो की, त्याच्या जन्माची सुवार्ता त्या गरीब धनगरांना तसेच व तीन राज्यांना सुद्धा मिळाली व येशूचे दर्शन घेऊन त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. त्यांच्या जीवनाचे नूतनीकरण झाले.  
      आज आपणही ख्रिस्ताचे दर्शन, ख्रिस्ताचा अनुभव घेण्यासाठी आलो आहोत व तोच ख्रिस्ताचा अनुभव आपल्याला दुसऱ्यांना द्यायचा आहे. कारण ख्रिस्त केवळ आपल्या तारणासाठी नाही तर सर्वांच्या तारणासाठी आला आहे. म्हणूनच मेंढपाळांनी येशूच्या जन्माची सुवार्ता सर्वाना नगरीत जाऊन सांगितली.
     आज आपण पाहतो की आपल्या समाजात असे बरेच लोक आहेत जे ख्रिस्तापासून दुरावले आहे. ख्रिस्ताच्या प्रेमापासून ते वंचित झाले आहेत. ते ख्रिस्ताच्या प्रेमाबद्दल अज्ञात आहेत व अजूनही पापांच्या व मोहाच्या जाळ्यात गुरफटून पडलेले आहेत. अशा सर्वाना आपण प्रभूच्या प्रेमाची ओळख करून दिली पाहिजे. जे दिन, दुःखी आहेत, ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे अश्यांच्या मद्दतीस धावून जाऊया जेणेकरून त्यांचे तारण होऊ शकेल. आजही ख्रिस्त उघड्यावर, गरीबांमध्ये, तसेच, गाईच्या गोठ्यात जन्म घेत आहे. त्याला आपल्या मायेची, करूणेची उब हवी आहे व ती आपल्या हृदयातच मिळू शकते.
आज जो ख्रिस्त जन्माला आला आहे, त्याला आपल्या हृदयात घेऊया व दुसऱ्यांना देऊया व हीच खरी प्रभू जन्माची सुवार्ता ठरेल. 
सर्वाना नाताळच्या हार्दिक शुभेछा.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

आपला प्रतिसाद: प्रभू आमचे तारण कर.

१. आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमगुरु, महागुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व व्रतस्थ यांनी ख्रिस्ताच्या प्रेमाचा संदेश सर्वाना द्यावा व त्याच्या तारणासाठी त्यांना प्रभूकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे कोणी ख्रिस्तापासून दुर गेले आहेत, पापाच्या आहारी जाऊन वाईट जीवन जगत आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी ख्रिस्ता जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे कोणी दुःखी, कष्टी आहेत व निरनिराळ्या कारणास्तव ख्रिस्त जयंती साजरी करू शकत नाहीत, त्यांनाही ख्रिस्ताचा प्रेमळ अनुभव यावा व ख्रिस्तजन्माने त्यांना  त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यास मद्दत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपले मिशनरी बंधू-भगिनी जे देशाच्या अनेक काना-कोपऱ्यात जाऊन प्रभूची सुवार्ता लोकांना देत आहेत, त्यांना बाळ येशूची कृपा व सामर्थ्य मिळावे व प्रभूची सुवार्ता सर्वाना अशीच त्यांनी द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या समाजात अशी बरीच विवाहित लोक आहेत ज्यांना त्यांच्या प्रेमाचे फळ प्राप्त झालेले नाही. बाळ येशूची कृपा-दृष्टी त्यांच्यावर पडावी व त्यांना त्यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून बालकाचे दान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रभू येशू कडे प्रार्थना करूया.