Thursday 31 August 2017

Reflections for the homily of 22nd Sunday in Ordinary Time (03-09-2017) by Br Jameson Munis. 


सामान्य काळातील बाविसावा रविवार

दिनांक: ३-९-२०१७
पहिले वाचन: यिर्मया २०:७-९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२ 
शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२७






“स्वत:चा वधस्तंभ घेणे म्हणजे, ख्रिस्ताला स्वत:चे समर्पण करणे”



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला स्वत:चा त्याग करा व आपला वधस्तंभ घेऊन येशूचे अनुकरण करण्यासाठी बोलावीत आहे.
पहिल्या वाचनात आपण पाहतो की, संदेष्टा यिर्मया देवाची सुवार्ता पसरविताना त्याला दु:खांना सामोरे जावे लागते, म्हणून तो शोक करीत देवाकडे तक्रार करत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस मनाचे नवीकरण करुन, आपली शरीरे जिवंत यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावी आणि त्यांनी आयुष्यभर देवाच्या गौरवासाठी जगावे याविषयी सांगत आहे. तसेच, मत्तयलिखीत शुभवर्तमानात येशू शिष्यांना स्वत:चा त्याग करून, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे असे सांगत आहे.
म्हणून आजच्या मिस्साबलीदानात आपण सहभाग घेत असताना दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटावर मात करून देवाची सुवार्ता सातत्याने पसरवित राहावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यिर्मया २०:७-९

यिर्मया संदेष्टा जीवनाला कंटाळून स्वत:च्या मनातली भावना व्यक्त करतो. देवाचे कार्य करत असताना निराशून गेलेला यिर्मया देवाकडे तक्रार करतो: “हे परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलो; तू मजहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करितो” (यिर्मया २०:७). देवाच्या वचनानुसार यिर्मया लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेल्या चुका दाखवितो. याच कारणास्तव यिर्मयाला मारहाण होते. व त्याची निंदा होते. म्हणून यिर्मयाला वाटते की, देवाने आपल्याला संरक्षणाचे आश्वासन दिले असूनही आपल्याला विनाकारण संकटांना सामोरे जावे लागते.  हे सर्व त्याच्या मनाविरुद्ध चालले आहे. ह्यासर्व कारणांमुळे तो इतरांपासून अगदी एकाकी पडला आहे. लोकांची कुजबुज ऐकून त्याला वाईट वाटत आहे. म्हणून तो शोक करीत देवाकडे तक्रार करत आहे. असे संदेष्टा आपल्या वचनाद्वारे नमूद करत आहे.

दुसरे वाचन:  रोमकरांस पत्र १२:१-२ 

संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात लोकांना मनाचे नवीकरण करुन व आपली शरीरे जिवंत यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावी या विषयी सांगत आहे. याचा अर्थ असा की, आयुष्यभर आपण देवाच्या गौरवासाठी जगावे. तसेच, देवाच्या आज्ञांचे पालन करून चांगले कार्य व ऐकमेकांची सेवा करावी म्हणून तो त्यांना उत्तेजित करत आहे. पौलाच्या मते आपण सर्व ख्रिस्तामध्ये जिवंत झालो आहोत. आपले संपूर्ण ख्रिस्ती जीवन एक उपासनाच आहे असे समजावे व त्याप्रमाणे चालावे हाच पौलाने येथे बोध केला आहे.
आपण स्वतःला देवासाठी अर्पण कसे व्हावे, हेच संत पौल पत्राद्वारे सविस्तरपणे सांगत आहे. आता आपण नव्या राज्याचे आहोत, जेथे नितीमत्व, जीवन आणि आत्म्याची सत्ता आहे. आपण या दृष्टीनेच जीवनाकडे पाहावे. ‘तू त्यांना जगातून काढून घावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना सत्यांत समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे’ (योहान १७:१५-१६).
आपल्या मनाचे नवीकरण करणे हेच यशस्वी ख्रिस्ती जीवनाचे सर्वस्व आहे. यामुळेच देवाची इच्छा काय आहे ते आपणाला समजून घेता येईल. देवाची इच्छा समजून घेणे म्हणजे आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देणे व त्यामधून बोध घेणे होय. त्यासाठी देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे, जो आपले अंतकरण शुद्ध करत असतो व आपल्या हातून देवाचे आज्ञापालन स्वाभाविकपणे व्हावे म्हणून मार्गदर्शन करत असतो.  

शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२२

     मत्तयलिखित शुभवर्तमानात दोन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.  पहिली बाब म्हणजे ‘येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान’ आणि दुसरी ‘आत्मत्यागाचे आमंत्रण.’
येशू ख्रिस्त शिष्यांना आपले दु:खसहन व पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. परंतू हे मात्र शिष्यांना समजत नाही. येशूचे बोलणे ऐकून पेत्राला मोठा धक्काच बसतो. पेत्राने ख्रिस्ताच्या बोलण्याचा विरोध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दय असो, असे आपल्याला होणारच नाही. येशूने पेत्राला सांगितले की, “सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, तर माणसाच्या गोष्टीकडे आहे” (मत्तय १६:२२). 
ख्रिस्त आपला वधस्तंभ उचलून घेऊन जाणार होता. शिष्यांनी सुध्दा आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे अशी येशूची इच्छा होती. स्वत:ची इच्छा व ध्येय यांचा त्याग करून देवाची इच्छा मान्य करणे हे सोपे नसते. परंतू, येशू शिष्यांना त्यांच्या त्यागाद्वारे त्यांना मोबदला मिळेल असे आश्वासन देतो. देवाच्या इच्छेप्रमाणे न करता जो जगातील गोष्टी मिळविण्याच्या मागे लागतो तो सर्वच गमावून बसतो. म्हणून सैतानाच्या विचारांचा त्याग करून ख्रिस्ताच्या इच्छा अनुसरणे योग्य आहे.

बोधकथा:

एकदा एका श्रीमंत माणसाच्या मुलाला त्याच्या जीवनात कशाचीच कमतरता नव्हती. त्याच्या सर्व इच्छा त्यांचे श्रीमंत वडील पूर्ण करीत असे. जीवनात तो नेहमी आनंदी असे. मुलाला दुःखापासून दूर रहायचे होते. दुःख त्याच्या जीवनात येऊ नये त्यासाठी वडिलांनी खूप प्रयत्न केले. परंतू वडिल आपल्या मुलाला दु:खापासून दूर करू शकले नाही. त्याने खूप कष्ट केले परंतू त्याच्या हाती निराशाच आली. वडिलांनी मुलाला सांगितले की, ज्याप्रमाणे आपण आपल्या सावलीपासून दूर जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपण दुःखाला सुखापासून काढू शकत नाही. जर आनंद हवा असेल तर दुःख सुध्दा अनुभवले पाहिजे. हे ऐकल्यावर त्या मुलाला त्यांची चूक समजली आणि त्या दिवसापासून त्याने कधीही दुःखाचा तिरस्कार केला नाही.
तात्पर्य:  सुंदर जीवन हे सुख-दु:ख ह्यांनी भरलेले आहे.

मनन चिंतन:

आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात दु:खाच्या सावलीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो. सुख व दु:ख ह्या दोघांचा अर्थ आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनात पहावयास मिळतो. जर यश मिळवायचे असेल तर आपल्याला ख्रिस्ताच्या दु:खमय प्रसंगात उभे राहायला पाहिजे. एका कवीने सुंदर रितीने म्हटले आहे: “सर्वजण सुखात तुमच्या बरोबर असतील, पण दु:खात ते तुम्हाला ओळखणार सुद्धा नाहीत.” सांगण्याचा तात्पर्य म्हणजे, जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपले मित्र खूप असतात. पण जेव्हा दु:ख आपल्या सोबत असते तेव्हा आपले मित्र आपल्यापासून दुरावतात कारण त्यांना आपले दु:ख नको पण सुख पाहिजे. असे दृश्य आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनात पहावयास मिळते.  
जीवनात जर आनंद हवा असेल तर दु:खाला सुद्धा स्वीकारले पाहिजे कारण ज्याप्रमाणे रात्रीनंतर पहाट येते त्याचप्रमाणे दु:ख आणि आनंद एकत्र जोडलेले आहेत. दु:खाशिवाय जीवन नाही. हे आपण कधीच नाकारू शकत नाही. म्हणून दु:खाना सामोरे जाणे हेच ह्या दु:खाचे उत्तर किंवा मार्ग आहे. ज्याला ख्रिस्ताचा शिष्य व्हायचे आहे, त्याने स्वत:च्या इच्छा, मार्ग व हक्क यांचा त्याग करावा व ख्रिस्त ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने जावे.
स्वत:चा वधस्तंभ घेणे म्हणजे, ख्रिस्ताला स्वत:चे समर्पण करणे, त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याचे प्रभुत्व स्वीकारणे व ख्रिस्तासाठी निंदा व छळ सोसणे असे होय. ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणणे होय. असे केले नाही तर कदाचित आपण स्वत:साठी जगलेले जीवन निरुपयोगी ठरेल.
पहिल्या वाचनात आपण यिर्मया संदेष्टा विषयी ऐकले आहे. यिर्मया त्याच्या जीवनात निराश झालेला होता. तो दु:खाला घाबरलेला होता. तो देवावर नाराज होता. असे असूनही त्याचा देवावरील दृढ विश्वासामुळे देव त्याचे दु:ख आणि अडी-अडचणी दूर करतो. तसेच, दुसऱ्या वाचनात सुद्धा अशाच प्रकारचा संदेश आपण ऐकला आहे. तो म्हणजे, संत पौल लोकांना मनाचे नवीकरण करण्यासाठी सांगतो. ते म्हणजे, देवावर विश्वास ठेवून आपल्या दु:खाना सामोरे जाण्यास सांगत आहे. शुभवर्तमानात सुद्धा येशू ख्रिस्त आपल्याला अशाच प्रकारचा उपदेश करीत आहे. येशू शिष्यांना स्वत:चा त्याग करून, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे असे सांगत आहे.
आपला देव तारणारा आहे. जीवनात येणाऱ्या सर्व संकटांची त्याला माहिती आहे. म्हणून, आपण सर्व ख्रिस्ती भाविक येशूच्या सामर्थ्यावर अवलंबून राहण्याची फार गरज आहे. येशूला अनुसरणे म्हणजे स्वत:ला येशूच्या चरणी समर्पित करणे होय.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: प्रभू, आमचा वधस्तंभ उचलण्यास आम्हांला सहाय्य कर.  

१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी देवाच्या शिकवणुकीद्वारे सर्व भाविकांना त्यांचा वधस्तंभ उचलण्यासाठी सहाय्य करावे व त्यांना अधिक देवाकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या लोकांचे जीवन संकटांनी व अडी-अडचणींनी ग्रासलेले आहे, ज्यांच्या जीवनात नेहमी आत्महत्येचा प्रश्न निर्माण होतो; अशा सर्व लोकांना देवाचा आशिर्वाद मिळावा, जेणेकरून परमेश्वराच्या प्रेरणेने त्यांचे जीवन सुखमय व आनंदी होईल, म्हणून आपण प्रार्थना करुया.  
३. आपल्या धर्मग्रामातील सर्व ख्रिस्ती लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व ते स्वत:ला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जगातील मोह मायेचा त्याग करून शुभवर्तमानाच्या मुल्याप्रमाणे जगावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाही तसेच जे कोणी देवापासून दूर जात आहेत अशा सर्व लोकांची प्रभूवरील श्रद्धा बळकट व्हावी आणि त्यांनी देवाच्या सानिध्यात परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. अतिवृष्टीमुळे अनेक लोकांना हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. लोकांची घरे-दारे उध्वस्त झालेली आहेत. ह्या बिकट परिस्थितीमध्ये अशा लोकांना उदार लोकांचे सहाय्य मिळावे व सरकारने त्यांना आर्थिक मदत करून त्यांना सुखरूप ठेवावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.  
६. सर्व युवक-युवतींनी जगातील केवळ आनंद, संपत्ती, मालमत्ता व प्रसिद्धीकडे न धावता शुभवर्तमानातील ख्रिस्ताने दिलेल्या मुल्यांप्रमाणे त्यांनी जीवन जगून, आपले भवितव्य उज्वल करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
७.आता आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.





 








Thursday 24 August 2017

Reflections for the homily of 21st Sunday in Ordinary Time (27-08-2017) by: Br Sadrick Dapki. 






सामान्य काळातील एकविसावा रविवार


दिनांक: २७-०८-२०१७
पहिले वाचन: यशया २२:१९-२३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र  ११: ३३-३६
शुभवर्तमान: मत्तय १६: १३-२०









“आपण ख्रिस्त, जीवंत देवाचे पुत्र आहात”


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना ही येशू ख्रिस्ताची खरी ओळख करून देत आहे. येशू ख्रिस्ताने बारा प्रेषितांची निवड केली होती, परंतू येशूला पहावयाचे होते की, शिष्य आपल्याला कोण म्हणून ओळखत आहेत.
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणराजा हिल्कीया ह्याचा पुत्र एल्याकिम हा आपल्याला दिलेली राज्यसत्ता कशी चालवेलह्याविषयी ऐकतो. दुस-या वाचनात संत पौल आपल्यासमोर देवाच्या प्राविण्याचे व वैभवाचे गीत सादर करतो.
आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताला कोणत्या प्रकाचे स्थान देतो? आपण ख्रिस्ताला कोण म्हणून ओळखतो? अशा महत्वपूर्ण प्रश्नांवर मनन चिंतन करण्यास आजची पवित्र उपासना आपल्याला आमंत्रण देत आहे, ह्यासाठी आपल्याला शक्ती व सामर्थ्य मिळावे म्हणून परमेश्वर पित्याकडे ह्या मिस्साबलीदानात मागुया.  

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया २२:१९-२३

     इझ्राएल हे देवाने तारणासाठी निवडलेले राष्ट्र होते; आणि ह्या राष्ट्रावर अनेक अशा राज्यांनी राज्य केले. ह्यातील काही राजे स्वदेशी तर काही राजे परदेशी होते. काही राजे चांगले तर काही वाईट.
     यशया संदेष्टा हा ‘शेबना’ नावाच्या वरिष्ठ कारभारी ह्या विषयी सांगत आहे. ‘शेबना’ हा ‘हिल्कीया’ राजाचा प्रमुख होता व इजिप्तची बाजू घेणाऱ्या पक्षातील एक नेता होता. यशया संदेष्टा हा देवाने सांगितल्याप्रमाणे राजा झडकाया ह्याचं पश्चाताप करावयास व देवावर विश्वास ठेवावयास सांगतो. असे केल्यास प्रभू देव त्याच्या राज्यास विजय प्राप्त करून देईल. परंतू शेबान, देवाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून यशया सांगतो की शेबनाची अधोगती होईल आणि त्याच्या जागी चांगला व विश्वासू वरिष्ठ सल्लागार निवडला जाईल आणि ज्याचे नाव एल्याकीम असणार आणि तो येरुशलेमकरांचा व यहुद्यांच्या घराण्याचा पिता होईल.

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र  ११: ३३-३६

संत पौलाने रोमकरांस पाठविलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला देवाच्या चांगुलपणाविषयी, दये विषयी व ममतेविषयी भास होतो. जरी देव आपल्याहून कितीही पटीने महान, श्रेष्ठ असला व त्याचे मन कितीही अदभूत असले तरी त्याच्या चांगुलपणाचा व दयेचा हात सदोदित आपल्यावर असतो असे संत पौल आपल्याला येथे पटवून देतो.
मानवाच्या तारणाचा इतिहास जर आपण पडताळून पाहिला तर आपल्याला दिसून येईल की; तारणासाठी निवडलेल्या लोकांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, ते त्याच्या प्रेमाविरुध्द गेले. यहुदी लोकांनी तर देवाचा व ख्रिस्ताचा धिक्कार केला. तरी देखील देवाने मानवावर अखंड प्रिती केली व त्यांच्या तारणासाठी स्वतःच्या पुत्राला खंडणी  म्हणून पाठविले. ह्यास्तव; संत पौल देवाच्या अनंत उपकाराबद्द्ल, देणगीबद्द्ल व महान हृदयाबद्द्ल देवाची स्तुतिगीत गात म्हणतो, “देवाची बुद्धी, ज्ञान व संपती किती प्रचंड आहे. तो जे काही ठरवितो ते मनुष्यांच्या ठरावापेक्षा श्रेष्ठ व अचूक आहे. देवाने आपले मार्ग आम्हांला समजावून सांगितल्याशिवाय आपल्याला कधीच ते समजणार नाहीत.

शुभवर्तमान : मत्तय १६: १३-२०

आजच्या शुभवर्तमानात पेत्राने ख्रिस्त हा जीवंत देवाचा पुत्र आहे ह्या विषयी कबुली देतो. यहुदी लोकांनी ख्रिस्ताला संपूर्णरित्या ओळखले नव्हते. त्याच्या मते त्याचा तारणारा हा एक वैभवशाली व बलवान राजा असेल. त्यांना राजकीय व धार्मिक स्वतंत्र्य प्राप्त करून देईल व सर्व दृष्ट राजांच्या बंदिसातून सर्वांची सुटका करील.
     आपल्या चांगल्या कार्यामुळे ख्रिस्त प्रेमळ, दयाळू, ममताळू व चांगला आहे, तो थोर व अनेक संदेष्ट्यापैकी एक थोर संदेष्टा आहे असे मानले, परंतु तो सर्व मानवजातीत श्रेष्ठ व सर्वोच्य संदेष्टा व खुद्द देवाचा परमप्रिय पुत्र आहे असे यहुदी लोकांनी मानले नाही.
     येशू ख्रिस्ताने पेत्राला व सर्व शिष्यांना केलेला प्रश्न हा एक परीक्षेचा भाग होता. येशूचे शिष्य हे त्याच्या बरोबर किमान दोन वर्षे राहिले, शिकले व येशू ख्रिस्तास जाणून घेतले. आता येशू ख्रिस्तास पहावयाचे होते की हे मला किती खोल पर्यंत ओळखतात. हा प्रश्न त्यांच्या मदतीसाठी होता पण खाली पाडण्यासाठी नव्हे. म्हणून प्रभू त्यांना कार्य पद्धतीने म्हणजेच पायरीने प्रश्न विचारतो. येशू ख्रिस्ताने विचारले, ‘मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात?’ त्यावर त्यांनी अनेक प्रकारची उत्तरे दिली. काहीजण योहान, काहीजण यिर्मया तर काही जण संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणून ओळखतात. येशू ख्रिस्ताला शिष्यांकडून माहिती करून घ्यायचे होते की ते त्यांस काय समजतात? म्हणून आपल्या शिष्यांना आपली खरी ओळख झाली आहे की नाही ह्यासाठी येशू दुसरा प्रश्न विचारतो, ‘तुम्ही मला कोण म्हणून ओळखतात?’ तेव्हा पवित्र आत्म्याच्या शक्तीने प्रेरित होऊन पेत्र म्हणतो, “तुम्ही ख्रिस्त जीवंत देवाचे पुत्र आहात”. ज्या पेत्राने पवित्र आत्म्याच्या सहाय्याने ख्रिस्त कोण आहे त्याची जाणीव करून दिली तोच पेत्र देऊळ मातेचा मुख्य खडक बनून ख्रिस्त सभेचा आधारस्तंभ बनला, ज्यावर ख्रिस्ताने आपली संपूर्ण ख्रिस्तसभा उभारली.
     पुढे शुभवर्तमानात नमूद केल्याप्रमाणे ख्रिस्ताने पेत्राला स्वर्गाच्या किल्ल्या बहाल केल्या. ह्याचा अर्थ असा होतो की “ख्रिस्ताने आपल्या राज्याची संपूर्ण जबाबदारी पेत्रावर सोपवली”. ख्रिस्ताला ठाऊक होते की, त्याला ह्या जगातून निघून आपल्या पित्याकडे परतायचे होते. ह्यास्तव; पेत्राला आपल्या राज्याचा उचित अधिकारी बनवून, जगात देवाचे कार्य पुढे चालवण्यासाठी व सुवार्तेची घोषणा जगभर पसरविण्यासाठी ख्रिस्ताने त्याला मानवी मध्यस्थिचा व मदतीचा उगमस्थान बनवले.

बोधकथा :

     कल्याण येथे  ताबोर आश्रमामध्ये दर आठवड्यात तीन दिवसाची शिबीर भरली जाते व शिबीरच्या शेवटच्या दिवशी ‘आरोग्यदानाची प्रार्थना’ होत असते. ह्या शिबिरामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक येत असतात. कारण त्यांना येशू ख्रिस्ताचा स्पर्श झालेला असतो, त्यांना येशूची जाणीव झालेली असते.
     काही वर्षा अगोदर ह्या ताबोर आश्रमामध्ये शिबीर चालू होती. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक उपस्थित होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी ‘आरोग्यदानाची प्रार्थना’ झाल्यानंतर ज्या लोकांनी मानसिक, शारिरीक व वैयक्तिक हिलिंग अनुभवली त्या लोकांनी साक्ष दिली. असे चालू असतांना प्रवक्त्याने म्हणजेच शिबीर घेणाऱ्या फादराने  लोकांसमोर एक प्रश्न मांडला. ख्रिस्ताच्या दैवी शक्तीने आपण हिलिंग अनुभवली आहे. परंतु हा ख्रिस्त कोण आहे? त्याचे आपल्या जीवनात काय स्थान आहे? हे कोण सांगू शकते का? ह्या प्रश्नाने हॉलमध्ये थोडावेळ शांततेचे वातावरण पसरले. सर्वजण थक्क झाले व काय उत्तर द्यावे ह्यावर विचार करू लागले. तेवढ्यात एक परधर्मीय बांधवाने ज्याने मानसिक हिलिंग अनुभवली होती त्याने उद्गारून म्हटले “प्रभू येशू हा खरा देवाचा पुत्र आहे”, जो मानवाच्या उद्धारासाठी व तारणासाठी धरतीवर आला व आपल्या पापांकरिता मरण पावला. तो माझा परमप्रिय देव आहे. ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा उगम व अंत आहे ही ख्रिस्ताची ओळख परधर्मीय बांधवाने सर्वापुढे मांडली.

मनन चिंतन :

येशू ख्रिस्त हा देव आहे. आपला राजा आहे, तो आपले सर्वस्व आहे. तो देवाचा पुत्र आहे. “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याच्यावर मी संतुष्ट आहे” (मत्तय:३-२७). येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांस प्रश्न केला की, ‘लोक मला काय म्हणून समजतात?’ तेव्हा सर्वाचा आवाज आला की तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात, तुम्ही  यशया संदेष्टा आहात किंवा तुम्ही काही संदेष्ट्यापैकी कुणी एक आहात. असे म्हणत सर्वांनी गोंधळ घातला होता. परंतू, येशू ख्रिस्त म्हणतो, “आता तुम्ही मला कोण म्हणून समजता”? हे ऐकल्यावर शिष्यांमध्ये शांततेचे वातावरण पसरले. कारण दुसरा प्रश्न खूपच अवघड होता. काय उत्तर द्यावे हे कुणालाच समजत नव्हते सर्व ठिकाणी शांतता होती. ही शांतता बघून येशू ख्रिस्तास किती वाईट वाटले असेल की, जे शिष्य माझ्याबरोबर राहिले, शिकले त्यांनी माझं जीवन बघितलं तरी सुद्धा त्यांना मी कोण आहे हे माहित नाही. अशी परिस्थिती आपण सुद्धा अनुभवली असेल, जेव्हा आपल्याच व्यक्तीने ज्याच्यासाठी आपण सर्व काही केले आणि तीच व्यक्ती आपण त्याच्या जीवनात कोण आहोत हे ओळखले नसेल. येशू ख्रिस्ताला सुद्धा मनुष्याप्रमाणे अशा भावना निर्माण झाल्या असतील. तेव्हा काही वेळाने पेत्र समोर येतो व येशूला सांगतो, “आपण ख्रिस्त, जीवंत देवाचे पुत्र आहात”. तेव्हा येशू म्हणतो की,
“मांस आणि रक्ताने तू हे सांगत नाही तर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने सांगतोस” असे म्हणून येशूने स्वर्गाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली.
     हाच येशू ख्रिस्त आपणास तोच प्रश्न विचारतो जो दोन हजार वर्षापूर्वी आपल्या शिष्यांस केला होता. “तुम्ही कोण म्हणून मला ओळखतात?” म्हणजेच ‘तुमच्या जीवनात माझ्यासाठी काय स्थान आहे?’ खूप कठीण प्रश्न वाटतो. कारण आपण तसा विचारच केला नाही. आपण रोज मिस्सासाठी येतो. थोडा वेळ जास्त झाला की घडाळ्याकडे पाहतो, मिस्सामध्येच दुसऱ्या कार्यक्रमाची नियोजन करतो. कधी मिस्साकडे लक्ष नसते. प्रवचनामध्ये काय संदेश दिला ठाऊक नाही अशा ह्या वातावरणात प्रभू आपणास प्रश्न विचारतो की “तुमच्या जीवनात माझ्यासाठी काय स्थान आहे?”
     येशू ख्रिस्त आपणासाठी सर्वकाही आहे. प्रत्येकाने ह्या प्रश्नावर विचारविनिमय केला पाहिजे. तो आपल्या तारणासाठी स्वत:चा गौरव सोडून ह्या धरतीवर आला. आपल्याबरोबर वावरला. शेवटी जाता जाता आपणास पाप मुक्त केले. तो आपला प्रभू आहे म्हणून आपल्या जीवनात आपण त्याला प्रथम स्थान दिले पाहिजे. आपण आजपासूनच विचार करूया की आपण येशू ख्रिस्ताला कोण म्हणून ओळखतो?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परम गुरुस्वामी फ्रान्सिस व महागुरूस्वामी यांना त्यांच्या कामात प्रभूचा सतत आधार लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल ख्रिस्तसभेची प्रगती होत राहावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. संत पेत्राने जसे प्रभू ख्रिस्त हा खऱ्या जीवंत देवाचा पुत्र आहे, ह्याविषयी सर्व मानवजाती समोर साक्ष दिली त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या कार्यातून व कृतीतून जगापुढे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत व त्याचे आपल्या जीवनात काय स्थान आहे ह्याची ग्वाही द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.                       
३. ख्रिस्ताचे अनुयायी जे मिशन कार्यात येशूची सुर्वाता काना कोपऱ्यात पसरवत आहेत  व ज्यांचा येशूच्या नावाने छळ होत आहे अशा मिशनरी लोकांना शक्ती व सामर्थ्य मिळावे व त्यांचे कार्य न डळमळता पुढे न्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
४. आपल्या धर्मग्रामातील तरुण-तरुणी प्रभूच्या कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी स्व:खुशीने पुढाकार घेऊन आपले धर्मग्राम सुरळीत चालविण्यासाठी त्यांना येशू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.      



Thursday 17 August 2017

Reflection for the Homily of 20th Sunday in Ordinary Time (20-08-2017) By Minin Wadkar. 






सामान्य काळातील विसावा रविवार


दिनांक२०-०८-२०१७
पहिले वाचन: यशया ५६:१,६-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५,२९-३२
शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८





“बाई तुझा विश्वास खुप मोठा आहे”







प्रस्तावना:

     आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणाला देवाजवळ येण्यासाठी जात व धर्म ह्यांचा मतभेद न बाळगता फक्त विश्वास व श्रद्धा असावी, म्हणून बोलावीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगत आहे की, परराष्ट्रीय लोक देवाजवळ येण्यासाठी देवाने दिलेल्या आज्ञा पाळत आहेत. ते शब्बाथ पवित्र पाळतात. म्हणून देव त्यांच्यावर संतुष्ट आहे. तसेच, पौल सांगतो की, देव हा केवळ यहुदियांचाच नसून तो परराष्ट्रीय लोकांचा देखील आहे. म्हणून देवाची सुवार्ता तो सर्वांना देत आहे असे आपण पाहतो. व मत्तयलिखीत शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशु कनानी बाईच्या विश्वासाचे प्रतिफळ म्हणून तो तिच्या भूतग्रस्त मुलीला बरे करतो.
     देव सर्वांचे तारण करतो. कारण तो प्रेमाळू व कृपाळू आहे. देवाचा आपणास स्पर्श व्हावा म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये धर्म व जात यांचा मतभेद आचरणात न आणता, केवळ श्रद्धा, प्रार्थना व विश्वास ह्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे, ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना मागुया.   
    
सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५६:१,६-७

देवाचा करार पाळल्यानंतर जे पारितोषिक मिळणार आहे त्याबद्दल यशया संदेष्टा आपल्याला सांगत आहे. न्यायत्वाचे दोन पैलू आहेत. एक आहे न्याय आणि दुसरे आहे तारण. देवाच्या न्यायत्वाचा हेतू केवळ चूक किंवा उणीवा दाखवण्याकडे नाही, तर त्या गोष्टी योग्य करण्याकडे आहे (पाहा रोम ३:२१-२६ आणखी भाष्य ४६:१२,१३). ह्याद्वारे परमेश्वर असे सांगतो की, न्यायाचे तुम्ही पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण व तारण होईल. यशया संदेष्टा विधर्मी किंवा विदेशी लोकांवर आपले लक्ष केंद्रित करतो. विधर्मी लोक देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात व त्याची सेवा करु इच्छितात. देवाने दिलेल्या सर्व आज्ञांचा तंतोतंत पालन करण्याचा ते प्रयत्न करतात. देवाच्या चरणाशी येऊन ते शब्बाथ पाळतात. अशा विधर्मी लोकांच्या भक्तीमुळे देव त्यांच्यावर संतुष्ट आहे. हेच यशया संदेष्टा आपणाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.   
 
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५; २९-३२

     संत पौल यहुदी होता. तो आपल्या धर्माची शिकवण तंतोतंत पाळत असे. जेव्हा तो ख्रिस्ताचा बनला तेव्हा त्याने आणखी जोमाने प्रत्येक यहुदी ज्यांनी ख्रिस्ताला नाकारले होते त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गावात व शहरात जाऊन पौलाने प्रथम यहुदियांना भेट दिली व त्यांना ख्रिस्त स्वीकारण्यास सांगितले. परंतु त्यांनी त्याचा व ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. पौलाचा असा विश्वास होता की यहुदी राष्ट्र, ख्रिस्त व ख्रिस्ताची शिकवणुकीचा स्वीकार करणार. काळांतराने पुष्कळ यहुदी ख्रिस्ताचे अनुकरण करु लागले आणि शेवटी ते ख्रिस्ती झाले.
     पौल हा परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे, असे तो सांगतो. हे प्रेषित कार्य ख्रिस्ताने पौलाला दिले आहे, याची तो कबुली देतो (पाहा प्रेषितांची कृत्ये ९:१५). हे ख्रिस्ताचे वचर्स्व पौल विसरलेला नाही (रोम १:५; गलतीकरांस पत्र २:७-१०; प्रेषितांची कृत्ये २२:२१). पौल स्वत: करत असलेले विधर्मियांसाठी सेवाकार्य सर्वांच्या दृष्टीस आणतो कारण त्याचे हे यश व कार्य इतर यहुदियांनी पाहावे ही पौलाची इच्छा होती. हे सर्व देवाच्या कृपेमुळे शक्य झाले असे पौल मान्य करतो.
     जेव्हा यहुदियांनी ख्रिस्त व त्याची शिकवण ह्यांना नकार दिला तेव्हा प्रेषित पौल ताबडतोब परराष्ट्रीय लोकांकडे वळला. ह्याचे कारण आपण मत्तयच्या शुभवर्तमानात पाहतो (मत्तय २८:१९-२० ‘तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे’). पौलाच्या ह्या सेवा व कार्याद्वारे इतर धर्मियांचे देवाबरोबर समेट घडून आणला गेला. पौलाने असे गृहीत धरले होते की, यहुदी राष्ट्र ख्रिस्ताचा स्वीकार करेल कारण आब्राहामद्वारे देवाने त्यांना पाचारण केले होते. काळांतराने परराष्ट्रीय लोकांनी सुद्धा येशूकडे दुर्लक्ष केले होते. ख्रिस्ताची शिकवण व ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारले नाही. असे असूनही, देव ममताळू आहे व त्यांचा देव स्वीकार करतो, असे संत पौल आपल्या पत्राद्वारे नमूद करतो.   

शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८

     पहिल्या वाचनात आपणाला यशया संदेष्ट्याचे भाकीत ऐकावयास मिळते. ते म्हणजे मसीहा हा केवळ यहुदियांनाच नाही तर, सर्व राष्ट्रांचा आहे. शुभवर्तमानात संत मत्तय सांगतो की, प्रभू येशू कनानी बाईचा विश्वास व श्रद्धा पाहून तीच्या भूतग्रस्त मुलीला बरे करतो. ही घटना आपल्याला मार्कच्या शुभवर्तमानात देखील पहावयास मिळते (मार्क सुद्धा ७:२४-३०). तसेच, आपण पाहतो (मत्तय ८:५-२३) की, येशू परराष्ट्रीय शताधिपतीच्या चाकराला सुद्धा बरे करतो. ‘भूतग्रस्त मुलीला बरे’ व ‘शताधिपतीच्या चाकरास बरे करणे’ ह्या दोन घटने व्यतिरिक्त येशूची शिकवण व त्याने केलेली चिंन्हे (चमत्कार) हे फक्त यहुदियांसाठी होती. पण शताधिपतीच्या विश्वासाने नंतर येशूने भाकीत केले की परराष्ट्रीय लोक हे स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील (मत्तय ८:१०-१२). याचा अर्थ असा होतो की, येशूचे मिशन कार्य हे केवळ यहुदियांसाठीच नसून तर ते परराष्ट्रीय लोकांसाठी सुद्धा उघडे आहे.
सोर व सीदोन: सोर व सीदोन ही दोन शहरे फोऐनेशियाच्या दशिनेकडे आहेत. येशू फोऐनेशिया प्रांतात आला होता.
कनानी बाई: संत मत्तय बाईला कनानी बाई म्हणून संबोधतो कारण ती बाई पेगन (परराष्ट्रीय व विधर्मीय) होती. कनानी लोक हे यहुदियांचे प्राचीन शत्रु होते पण आता ह्या गोष्टीला बरेच दिवस झाले आहेत. बराच काळ ओलांडून गेला आहे.
हे प्रभो, दाविदाचे पुत्र: ‘दाविदाचा पुत्र’ हे शिर्षक मसिहाला उद्देशून वापरले गेले आहे. फोऐनेशियातील लोकांनी येशूने केलेल्या चमत्काराबद्दल नक्कीच ऐकले असेल नाहीतर त्या बाईने येशूला चमत्कार करावयास भाग पाडले नसते व त्याला दाविदाचा पुत्र’ (मसीहा) ह्या नावाने संबोधले नसते. दाविदाचा पुत्र’ हे शिर्षक दावीदाला दिलेल्या वचनाशी एकरूप आहे (१ शमुवेल ७:१२).
हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भुताने फारच त्रासलेली आहे. कनानी बाईकडे येशूने सुरुवातीला लक्ष केंद्रित केले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली. येशूने उत्तर दिले, इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. येशू त्या बाईची विनवणी ऐकते.
मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे!
     बाईच्या मनात कोणतीच शंका नव्हती. तीची गरज येशूला पुढील शब्द बोलण्यास भाग पाडते: ‘मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे!’ ती येशूकडे हताश होऊन आली होती. तीच्या हाती काहीच नव्हते. देवाच्या चांगुलपणावर व दयेवर बाई कोणतीच शंका व्यक्त करत नाही.
मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे”, हे येशूने बाईला वापरलेले विधान कठोर आहे असे वाटते. परंतु, हे दैनंदिन जीवनातील ती सामान्य म्हण आहे. कनानी बाईला माहित होते की, येशूने जेव्हा ह्या म्हणीचा वापर केला तेव्हा हा तिच्यासाठी नव्हता. बाईने उत्तर दिले की, घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. याचा अर्थ असा की बाहेरची लोक सुद्धा धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात.
बाई तुझा विश्वास मोठा आहे: इस्राएलच्या प्रजेस मसिहाचे आगमनाचे भाकीत करण्यात आले होते आणि इस्राएलमधून सर्व राष्ट्रांना ह्या मसिहाचे शुभवर्तमान प्रकट होणार होते. म्हणून, येशू ख्रिस्त सर्वांसाठी ह्या भूतलावर आला होता. ख्रिस्त फक्त यहुदियांनाच नसून तर तो विधर्मियांसाठी सुद्धा आला होता. कनानी बाईने आपला येशुवरील असलेला विश्वास सिद्ध केला. ह्या विश्वासाची तुलना परराष्ट्रीय शताधिपती बरोबर करण्यात आली आहे.
त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली: येशूने बाईचा दृढ विश्वास पाहून तिच्या मुलीला आजारातून बरे केले व बाईची इच्छा पूर्ण केली.
     कनानी बाईचे उदाहरण आपल्याला सांगते की, आपण आपल्या जीवनात आपल्या गरजेविषयी जागृत राहिले पाहिजे. आपण कोण आहोत? आपली स्थिती काय आहे? हे सर्व आपण जाणून घेतले पाहिजे. संयमाने वाट पाहणे, विश्वासाने देवाजवळ येणे, ईत्यादी गोष्टी देवाच्याआशिर्वादाने भरून जातात. अशा तरेणे येशूने म्हटलेल्या शब्दाचे महत्व आपल्याला कळेल, ‘तुझा विश्वास मोठा आहे’.

बोधकथा:
            नुकतेच एक नवीन जोडपं लग्न होऊन आपल्या घरी एका लहान होडीने नदीपलीकडे जात होते. अचानक एक मोठे वादळ आले. पत्नीने जगण्याची सर्व आशा सोडली होती. पती योद्धा होता. त्यांची लहान होडी वादळाने पाण्यावर हेलकावे घेत होती. होडी कोणत्याही क्षणाला बुडणार होती. पण माणूस होडीमध्ये शांत बसला होता, जणूकाही काहीच घडत नव्हते. पत्नी पतीला म्हणाली, ‘तुम्हाला भीती वाटत नाही का’? हा आपल्या जीवनातील शेवटचा क्षण असेल. आपण कदाचित नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहचू शकणार नाही. आपल्याला फक्त दैवी चमत्कारच वाचवू शकतो. पती हसू लागला आणि त्याने आपली तलवार पत्नीच्या गळ्यावर ठेवली व म्हणाला, तुला भीती वाटते का? पत्नीने हसत उत्तर दिले, नाही ! कारण तू माझ्यावर प्रीती करतोस. मी तुझी पत्नी आहे. तू मला मारू शकणार नाही. हे मला ठाऊक आहे. पती म्हणाला, हेच माझे उत्तर आहे. त्याने तलवार बाजूला करून म्हणाला, ‘देव आपल्यावर प्रीती करतो. तो आपले रक्षण करील.
तात्पर्य: देवावर विश्वास ठेवा. 

मनन चिंतन:

     जगामध्ये दोन प्रकारची लोक असतात. पहिली म्हणजे ‘होकारार्थी’ आणि दुसरी ‘नकारार्थी’. होकारार्थी लोक कोणत्याही संकटाला घाबरत नाही. त्यांच्याहाती विश्वास, परिश्रम, चिकाटी, संवेदनशीलता, इत्यादींचे शस्त्र असते. दुसरीकडे, नकारार्थी लोक जीवनांत चिंतन करण्यापेक्षा चिंता फारच करतात. अशा लोकांचे जीवन निराशेने, दु:खाने, संकटाने व्यापलेले असते. आनंद नाही तर केवळ अल्प विश्वासच त्यांच्या पदरी असतो.  जीवनात काहीच साध्य त्यांना करता येत नाही.
     आजच्या उपासनेचा विषय आहे ‘विश्वास’. देवाजवळ येण्यासाठी धर्म, जात, भाषा, रूढी, परंपरा यांचीच केवळ गरज नसून, ‘विश्वासाची’ व श्रद्धेची अत्यंत गरज आहे. कनानी बाई यहुदी नसून, विधर्मी होती. असे असून देखील तीने होकारार्थी विश्वासाने येशूकडे आपली भूतग्रस्त मुलगी आजारातून मुक्त होण्यासाठी आणली होती. स्तोत्र २३:४ सांगतो, ‘मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस’. जात, धर्म, राष्ट्र ह्या सर्वाना सामोरे जाऊन बाई मोठ्याने म्हणाली, ‘हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा’. माझी मुलगी भुताने त्रासलेली आहे. येशू म्हणाला, ‘मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे’. ह्या येशूच्या शब्दाद्वारे असे वाटते की येशूने कठोर शब्द वापरून त्या बाईची अवहेलना केली.
     येशू दयेचा सागर आहे. तो करुणेने भरलेला आहे. तो आजारी व्यक्तींना बरे करण्यासाठी आला असून तो त्यांना तुच्छ लेखण्यासाठी आलेला नाही. असे असून देखील येशूच्या तोंडी असे कठोर शब्द का आले? येशूच्या काळामध्ये यहुदीयांचा विश्वास होता की देव फक्त त्यांच्यासाठी आहे. आपणच देवाची निवडलेली प्रजा आहोत असा त्यांचा दृढ विश्वास होता. असे असून, परराष्ट्रीय व विधर्मियांचा आपणामध्ये समावेश नाही. म्हणूनच, यहुदी लोक त्यांना आपल्यापासून दूर ठेवत. कधी-कधी त्यांना वाईट शब्दाने बोलून त्यांची अवहेलना करत असत.
     येशू यहुदियांच्याच भाषेमध्ये कनानी बाईला उत्तर देतो. ह्यामागे, येशूला त्या बाईचा विश्वास पहावयाचा होता. येशू, धर्म, राष्ट्र व जात ह्यांच्या पलीकडे जाऊन तो ‘देवावरील विश्वास’ किती आहे ह्यावर लक्ष केंद्रित करतो. येशूने त्या बाईला ‘कुत्रा’ या नावाने संबोधले नसून तो त्या बाईला परमेश्वराच्या दयेची शिकवण देत आहे. म्हणजे, देवाकडे जाण्यासाठी जात, पंथ, राष्ट्र इत्यादी महत्वाचे नसून केवळ ‘विश्वास’ किंवा ‘श्रद्धा’ मौल्यवान आहे हे सिद्ध होते.
     यहुदी लोक आतुरतेने मसिहा येण्याची वाट बघत होते. आणि यहुदी लोक परमेश्वराने निवडलेली प्रजा आहे. ह्या प्रजेस सर्व काही देवाने बहाल केले होते. परंतु, ह्याच प्रजेकडे विश्वास नसेल तर ती सर्व काही गमावून बसतील. जर आपण परराष्ट्रीय लोकांकडे (यहुदी नसलेली लोक) नजर टाकली तर, उदाहरणार्थ फोऐनेशियन बाई, जी परमेश्वराने निवडलेल्या प्रजेतली नव्हती, त्या बाईकडे विश्वासाचे दान मोठे होते. तिचे जीवन विश्वासाने भरलेले होते. येशूच्या सानिध्यात राहण्यासाठी धर्म, राष्ट्र, भाषा व जात इत्यादींची गरज नसून, फक्त विश्वासाची गरज आहे.
     आपण नव्या करारामध्ये पाहतो, बारा वर्षे रक्तस्त्रावाने पिडलेली एक स्त्री येशूमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. ती म्हणाली, मी केवळ वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन (मत्तय ९:२०-२१). ह्या विश्वासाने ती बरी झाली. तसेच, प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा’ (लूक १७:५). यावरून असे समजते की, खरोखर देवावरील विश्वास हा जीवनाला नवीन कलाटणी प्राप्त करून देतो. जीवनाला नवीन दिशा प्राप्त होते. विश्वासामुळे कोणत्याही व्यक्तीला देव व येशू प्राप्त होऊ शकतो. विश्वासाने केलेली देवाची आराधना व त्याने दिलेल्या आज्ञा चांगल्याप्रकारे आचरणात आणल्या तर खरोखर देव प्राप्त होऊ शकतो.
                 यशया संदेष्टा सांगतो, विधर्मी लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या. त्यांनी शब्बाथ मोडला नाही तर तो पाळला. त्यामुळे देव त्यांच्यावर संतुष्ट आहे. हे सर्व काही विश्वासामुळे शक्य झाले. संत पौल सांगतो की, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे. पौलाने यहुदी व परराष्ट्रीय लोकांना येशूची शिकवण देण्याचा प्रयत्न करत होता. देवाच्या राज्यामध्ये सर्वांचा समावेश होतो. जात, भाषा, पंथ व धर्म यांचा विचार करण्यात येत नाही. पररार्ष्टीयांचा देवावर विश्वास नव्हता, असे असूनही जेव्हा ती बाई येशू व येशूच्या कार्याबद्दल ऐकते, तेव्हा ती विश्वासाने येशूकडे येते. ‘हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा’ ह्या बाईच्या शब्दांनी येशूला चकित करून सोडले. बाई तुझा विश्वास मोठा आहे. विश्वासामुळे येशूने बाईची प्रार्थना ऐकली. व तिच्या मुलीला येशूने बरे केले. तसेच, आपण पाहतो (मत्तय ८:५-२३) की, येशू परराष्ट्रीय शताधिपतीच्या चाकराला सुद्धा बरे करतो. ही व्यक्ती सुद्धा परराष्ट्रीय होती.
     संत अगुस्तीन सांगतात, ‘तुमच्या विश्वासाची ज्योत पेटवू द्या, कारण सर्व काही शक्य आहे. श्रद्धा म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीमध्ये ठेवलेला विश्वास आणि ह्या श्रद्धेचे पारितोषिक विश्वास आहे’. ‘विश्वास Wi-Fi प्रमाणे आहे; जरी तो अदृश असला तरी त्याच्याकडे जोडण्याची भरपूर क्षमता आहे’. ख्रिस्ती श्रद्धेत वाढ होण्यासाठी विश्वासाची फार गरज आहे. जीवनात धर्म, जात, राष्ट्र इत्यादींची लाट येणार आहे. तरीसुद्धा आपण आपल्या ख्रिस्ती धर्मात खचून न जाता, विश्वासाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. विश्वासाची, श्रद्धेची साथ मिळाली तर खरोखर आपण ह्या जगातील तंटे, वादविवाद, अशांती मिटवू शकतो. भारत व इतर देशात धर्म, जात, राष्ट्रांवरून विश्वासाला तडा गेलेली आहे. धर्माच्या नावाखाली अनेक भाविकांना आपला प्राण द्यावा लागत आहे. आपल्या मनात ‘सर्व-धर्म, जात, भाषा ह्यांचा समभाव’ तसेच  ‘ऐकमेका कडून सहाय्य, हे रुजविण्याची फार गरज आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आमचा विश्वास वाढव.

१. आमचे पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करीत असताना, त्यांनी सदैव धर्म, जात, भाषा इत्यादींचा मतभेद न करता, सर्व भाविकांची विश्वासात वाढ करून त्यांना प्रभूजवळ आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.                                                                                                                                                   २. परमेश्वराने आपल्याला जीवनाची मौल्यवान देणगी दिली आहे, म्हणून आपल्या जीवनात सतत देवाला प्राधान्य देऊन त्याची सेवा करावी व त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक बळकट करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. इराकमधील आपल्या ख्रिस्ती बांधवांवर अत्याचार होत आहेत व ते दडपणाखाली आहेत. त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे व आपला धर्म त्यांना स्वतंत्रपणे पाळता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना येशु बाळाचा आशीर्वाद मिळावा व त्यांचे आजार, दुःख हलके व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.