Thursday 28 November 2019


Reflections for the homily of First Sunday of Advent 
               (01-12-2019) by: Br Jackson Nato










आगमन काळातील पहिला रविवार      




दिनांक: १/१२/२०१९
पहिले वाचन: यशया २:१-५
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३: ११-१४
शुभवर्तमान:  मतय  २४: ३७-४४

प्रस्तावना:

          आज आपण आगमन काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला जागृत रहावयास सांगत आहे. आगमन काळ म्हणजे प्रभू येशूच्या येण्याचा काळ. म्हणून त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. ही आपली तयारी कशी असावी याबद्दल आजची उपासना आपल्याला मार्गदर्शन करते.
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा बाबीलोनच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या यहुदी लोकांना, परमेश्वर त्यांचे तारण करेल व एक समृद्ध जीवन बहाल करेल असे आश्वासन देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपली अंधकारमय कृत्ये म्हणजेच वाईट कृत्ये सोडून आपल्याला ख्रिस्ताकडून प्राप्त होणार असलेल्या तारणासाठी तयार राहण्यास सांगत आहे. तर आजच्या शुभवर्तमानात येशू अचानक येईल व त्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे याविषयी बोध मिळतो.
          आगमन काळ म्हणजे फक्त नाताळची तयारी नव्हे तर येशूच्या पुनरागमनाची आणि म्हणून येशू येईल तेव्हा येशूला स्वीकारण्यास आपली तयारी आहे का? जर नसेल तर या मिस्साबालीदानात खिस्ताकडे आपल्या पापांची क्षमा मागूया व येशूसाठी सतत जागृत राहण्यास ह्या मिसाबालीदानात विशेष कृपा मागूया.

सम्यक  विवरण

पहिले वाचन: यशया: २:१-५

          यशया हा जुन्या करारातील एक नावाजलेला संदेष्टा आहे. कारण त्यांच्या जीवन कालात त्याने लोकांना देवाचा संदेश दिला तो काळ म्हणजे इ.स.वी स.न पूर्व ७२२ ते ७००. हा कालखंड इस्रायली लोकांसाठी गंभीर होता. कारण या कालखंडातच म्हणजे इ.स.वी स.न पूर्व ७२२ मध्ये असीरीयाच्या लोकांनी उत्तरीय जमाती म्हणजे इस्रायल वर चढाई केली, त्यांचा वध केला व इस्रायल समूळ नष्ट करण्याच ठरवलं होत. ह्या कारणास्तव यहुदी सुद्धा भयभीत झाले. पण देवाकडे धाव घेण्याएवजी त्यांनी दुसऱ्या राष्ट्रांबरोबर युती करण्यासाठी धाव घेतली. परीणामी यशयाने इस्रायलला दोषी ठरवले व त्यांच्या हद्दपारीचे भाकीत केले.
          हे भाकीत सत्य ठरले बाबीलोन राष्ट्राने यहुद्यांवर चढाई केली व यहुदी लोकांना हद्दपार केले. अशा ह्या हालाखीच्या परिस्थितीत यशया संदेष्टा यहुदी लोकांना तारणाऱ्या विषयी भाकित करतो व एक आशेचा किरण त्यांना दाखवितो. तो असा की, भविष्यात परमेश्वर त्यांना गुलामगिरीतून सोडवेल. परमेश्वराचे मंदिर ज्या डोंगरावर बांधले आहे तो डोंगर सर्व पर्वताहून उंच होईल. म्हणजेच, परमेश्वराला आधी प्राधान्य दिले जाईल. एवढेच नव्हे तर सर्व राष्ट्रांसाठी परमेश्वराचे मंदिर एक आकर्षक केंद्र होईल. परदेशी, अधर्मी, परधर्मी, परमेश्वराकडे वळतील. ते परमेश्वराचा संदेश आत्मसात करून तो सर्वत्र पसरवतील तेव्हा नवीन करार प्रस्थापित करण्यात येईल, जो इस्रायलच नव्हे तर सर्वांसाठी असेल. आणि ह्या काळात लोकं एकमेकांविरुद्ध झगडण्याऐवजी आपसात समेट करून राहतील. अशा प्रकारे यशया संदेष्टा यहुद्यांना आधार देतो व परमेश्वराकडे वळण्याचे आमंत्रण देतो.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३: ११-१४

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार राहण्यास सांगत आहे. रोमी लोकं ख्रिस्ती होण्याअगोदर परधर्मी होते आणि धर्मांतराचे मुख्य कारण म्हणजे, ख्रिस्त हा आपल्याला तारण प्राप्त करून देणार आहे यावर त्याचा विश्वास ठाम झाला होता. म्हणून संत पौल त्यांना त्यांच्या जुन्या सवयी सोडून देण्याविषयी सांगत आहे. जेव्हा तो परधर्मी होते तेव्हा ते झोपेत होते. पण आता मात्र त्यांना तारणासाठी तयार राहायला हवे. त्यासाठी शुभवर्तमानाची मुल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण हे पहिल्या पेक्षा आता अधिक जवळ आहे. संत पौल त्यांचे जुने जीवन रात्री बरोबर व ख्रिस्ती जीवन दिवसाबरोबर तोलतो. म्हणून अंधाकाराची कामे सोडणे म्हणजे त्यांच्या भूतकाळातील सवयी सोडणे व प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करणे म्हणजे ख्रिस्ती मुल्ये आत्मसात करणे.

शुभवर्तमान: मतय २४: ३७-४४

          ह्या शुभवर्तमानाच्या उताऱ्या अगोदर, म्हणजेच  २४ व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहतो की, येशू येरूशलेम मंदिराच्या नाशा विषयी व तदनंतर नव्या युगाच्या सुरुवाती विषयी म्हणजेच त्याच्या परत येण्याविषयी सांगत आहे, आणि त्यासाठी आपण तयार असावे हा बोध करत आहे. कारण येशूचे येणे हे आकस्मित असेल. ज्याप्रमाणे नोहाच्या काळात जलप्रलय आला तेव्हा लोकांना माहित नव्हते. त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे असेल तेंव्हा लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात गुंतलेले असतील. मौजमजा करत असतील पण जे देवाला धरून असतील त्यांना स्वर्गात घेतले जाईल. हे अधिकपणे स्पष्ट करण्यासाठी येशू चोराचे उदाहरण देत आहे. ज्याप्रमाणे चोर आपल्या नकळत येतो. त्याचप्रमाणे ख्रिस्त येईल, म्हणून आपण तयार असले पाहिजे. याचा अर्थ असा की, आपण प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणी ख्रिस्ताला धरून जगलो पाहिजे.

मनन चिंतन:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आजची उपासना आपल्याला जागृत राहण्यास निमंत्रण देत आहे. जागृत राहणे म्हणजे नक्की काय? जागृत राहणे म्हणजे 'सावध असणे, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी होत आहेत त्यांची बारकाईने जाणीव ठेवणे व त्यांपासून जो धोका तयार होतो त्याला सामोरे जाण्यास किंवा त्यापासून सुरक्षित राहण्यास तयार असणे. जेणेकरून त्यापासून उद्भवणाऱ्या परिणामांचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आपण सावध असतो का? जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो तेव्हा आपण योग्य दिशेने चालायला हवे. रस्ता ओलांडताना चहुबाजूला नजर ठेवणे, आजारावर औषधे घेतो तेव्हा ते बरोबर आहेत का? त्याची कालबाह्य तारिख म्हणजेच एक्सपायरी डेट संपली तर नाही ना? अशाप्रकारे आपण काळजी घेतो. एवढेच नव्हे तर आपल्या मुलांना सुद्धा सांगतो की घराबाहेर अनोळखी व्यक्ती पासून शक्यतो दूर राहायचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे आपण स्वतःची व आपल्या जीवलगांची काळजी घेतो. कुठलीही आपत्ती आपल्यावर किंवा आपल्या नातलगांवर उद्भवू नये म्हणून आपण सावध राहतो. थोडक्यात, जागृत राहतो. ही झाली शारीरिक जागृतता.
          मनुष्य हा फक्त शरीर नव्हे; तर शरीर आणि आत्मा यांचे मिलन आहे. म्हणून येशू ह्या शरीरा पलीकडे जाऊन आत्म्याची जागृतता बाळगण्यास आपल्याला सांगत आहे. कारण शरीराने आपण या जगात वावरतो. जगातील गोष्टींचा आनंद उपभोगतो; अर्थात शारीरिक जीवन जगतो. हे जीवन किती काळ टिकेल ६० वर्षे, ७० वर्षे, जास्तीत जास्त १०० किंवा १२० तदनंतर पूर्णविराम. पण आत्मिक जीवन हे सार्वकालिक आहे. म्हणून जर या सर्वकालीक जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल; तर आपले तारण होणे गरजेचे आहे.
          संत पॉल आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणतो की, "आपण विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आपल्या अधिक जवळ आले आहे." या वाक्याचा संदर्भ पाहिला तर, आपल्या लक्षात येईल की; येशूच्या काळातील ख्रिस्ती म्हणजेच येशूच्या पुनरुथानानंतर ज्यांनी ख्रिस्त स्वीकारला होता, त्यांची अशी कल्पना होती की, त्यांच्या जीवन काळातच येशू ढगांवर स्वार होऊन त्याच्या वैभवात पुन्हा येईल. तो येईल तेव्हा जगाचा न्यायनिवाडा करील. पण येशू आजच्या शुभवर्तमानात म्हणतो की, मी चोराप्रमाणे येईन. ज्याप्रमाणे चोर लोकांच्या नकळत ते गाढ झोपेत असतांना व अनपेक्षित वेळी येतो, त्याप्रमाणे तुम्ही या ऐहिक जीवनात गुंतलेले असताना मी येईन.
          येशूचे येणे समजण्यासाठी त्याची तीन काळात विभागणी करणे जरुरीचे आहे. पहिला म्हणजे 'भूतकाळ': 'येशू आला' म्हणजे २००० वर्षांपूर्वी येशू मानवरूप धारण करून या भूतलावर आला. दुसरे म्हणजे 'येशू येईल' 'भविष्यकाळ': म्हणजेच येशू त्याच्या वैभवात जगाच्या अंतकाळी येईल. शेवटी 'येशु येतो' 'वर्तमानकाळ': म्हणजेच येशू साक्रामेंताद्वारे, ख्रिस्तप्रसादा द्वारे किंवा आपल्या मृत्यूद्वारे आपल्या मध्ये येतो. आपणा प्रत्येकाचा मृत्यू अढळ आहे व अनपेक्षित आहे. म्हणजेच मृत्यु कधी येईल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. म्हणून मृत्यूने येशू माझ्यामध्ये येत असेल तर, माझे तारण होण्यासाठी मी पात्र आहे का? नोहाच्या काळात लोक खात-पीत होते, मौज-मस्ती करत होते, आनंद करत होते. पण जलप्रलय आला तोपर्यंत त्यांना काहीच समजले नाही. तेव्हा ते त्यांच्या तारणास मुकले. म्हणून आपण जागृत राहीले पाहीजे.
          जागृत राहणे म्हणजे, आपले रोजचे जीवन सोडून फक्त आध्यात्मिक जीवनाकडे वळणे नव्हे; तर रोजच्या जीवनाला आध्यात्माचा रंग चढविणे. आपले प्रत्येक विचार, कृत्य अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणे. म्हणून येशू म्हणतो की, "जात्यावर बसलेल्या दोघींपैकी एकीला घेतले जाईल व एक ठेवली जाईल." याचा अर्थ असा की, आपले संसारीक किंवा रोजचे जीवन जगणे, त्याचा उपभोग घेणे गरजेचे आहे. पण त्याचा उपभोग घेत असता परमेश्वराचा विसर पडणे, जगाच्या आनंदात ख्रिस्ताचे भान हरपणे चुकीचे आहे.
          आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक अशा प्रसंगांना सामोरे जातो, जिथे आपल्या ख्रिस्ती जीवनाची परीक्षा होते. ख्रिस्ताची शिकवण व ऐहिक लाभ ह्यांच्यात आपण दुभागले जातो का? अशा वेळी आपण ख्रिस्त निवडावा. संत पौलच्या आजच्या दुसऱ्या वाचनातील शिकवणीप्रमाणे 'ख्रिस्ताचे वस्त्र परिधान करावे.' ख्रिस्ताचे वस्त्र; म्हणजेच बाप्तिस्माच्या वेळी आपण परिधान केलेले पांढरे शुभ्र वस्त्र जे आपल्या निष्पाप जीवनाची साक्ष देते. म्हणून सर्वकालिक जीवनाचा लाभ घेण्यासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण या मिसाबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: येशू तुझ्या स्वागतास आम्हाला तत्पर बनव.’

१.ख्रिस्तात जीवन जगण्यास मार्गदर्शन करणारे आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना सतत शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ व्हावा व दैवी कार्य सतत चालू ठेवण्यास त्यांना कृपा व शक्‍ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२.आपल्या देशात, समाजात अनेक लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजा ऐवजी स्वतःच्या स्वार्थास महत्व देत आहेत. त्यांना या स्वार्थी वृत्ती पासून दूर राहण्यास व समाज कल्याणाचा विचार करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आज अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यांना व्यसनमुक्त होण्यास परमेश्वराचे सहाय्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.सत्तेच्या लोभाने राजकारण्यांनी आपल्या राज्यात कल्लोळ घातला आहे व लोकांच्या अपेक्षांचा भंग केला आहे. अशा या परिस्थितीत लोकहिताच्या योजनेस प्राधान्य देण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.जेव्हा आपण ख्रिस्ती जीवनाऐवजी ऐहिक जीवनात गुरफटून जातो. तेव्हा स्वतःला तारणापासून वंचित करतो. याची जाणीव आपणास व्हावी व ख्रिस्ती मूल्यांवर आपले जीवन पुनर्स्थापित करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक, व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

Thursday 21 November 2019

Reflection for the Homily of CHRIST THE KING (24-11-19) By   Br. Rahul Rodrigues





ख्रिस्त राजाचा सण




दिनांक: २४/११/२०१९
पहिले वाचन: २ शमुवेल ५: १-३
दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र  १: १२-२०
शुभवार्मान: लुक  २३: ३५-४३

“ख्रिस्त करुणेचा राजा”

प्रस्तावना:

      आज आपण ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असून आज सामान्य काळातील शेवटचा आठवडा आहे. देऊळ माता आज आपल्याला आठवण करून देत आहे की, प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृदयाचा, आत्म्याचा, शांतीचा, शरीराचा व कुटुंबाचा राजा आहे. त्याचे हे राज्य हे अनंत काळाचे राज्य.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की इस्रायलच्या लोकांनी दावीदला आपला राजा म्हणून निवडले. तर दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ताला विविध अशी उपमा देऊन ख्रिस्ताची श्रेष्ठता आपल्याला सांगत आहे. पुढे लूक लिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त एक विश्वासू चोराला त्याच्या स्वर्ग ऐश्वर्यात तारणाचे आश्‍वासन देतो. प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या ही जीवनाचा राजा व तारण करत आहे. वधस्तंभावरील चोरा प्रमाणे आपल्यालासुद्धा तारणाचा मार्ग प्राप्त व्हावा व येशूची करूणा अनुभवावी म्हणून आपण एक चित्ताने ह्या मिस्साबालीदानात मागूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: २ शमुवेल ५: १-३

          दावीद इस्रायल राष्ट्रांचा राजा होतो हे प्रस्तुत उतारा यातून स्पष्ट करून दिले आहे. इस्रायलच्या सर्व वंशांच्याकडून दावीदला राजा होण्यासाठी विनंती केली गेली. मग इस्रायलच्या सर्व वडीलजणांनी हेब्रोनात एकत्र येऊन दावीदचा अभिषेक केला आणि त्याला इस्रायल वर राजा म्हणून नेमले.

दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र १: १२-२०

          संत पौलने कलस्सैकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ख्रिस्ताच्या सर्व अधिकाराचे योग्यरीतीने विवरण केलेले दिसून येते. तो ख्रिस्ताविषयी सात  गौरवी सत्य सांगत आहे. ती ख्रिस्ताची श्रेष्ठता प्रगट करतात. संत पौल म्हणतो, ख्रिस्त अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्ती ते श्रेष्ठ आहे. तो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी व मृतांतून प्रथम जन्मलेला आहे. त्याच्यामध्ये देवाची सर्व पूर्णता वसते  व समेट करणारा आहे. अशाप्रकारे ख्रिस्ताला सर्वाधिक प्राधान्य व वर्चस्व प्रदान करण्यात आले.

शुभवार्मान: लुक  २३: ३५-४३

          लुक लिखित शुभवार्मानात आपल्याला आपल्या विश्वासाच्या रहस्याचे दर्शन घडते. येशू ख्रिस्त क्रुसावर मरत असताना त्याला आपला तारणकर्ता व राजा म्हणुन घोषित करण्यात येते. लूक लिखित शुभवर्तमानात आजचा मुख्य विषय हा तारण असा आहे व हेच आज आपल्याला शुभवर्तमानात दर्शविण्यात येत आहे. येशू ख्रिस्त हा राजा आहे पण ही गोष्ट फक्त ज्यांचा दृढ विश्वास आहे, तेच मान्य करतात.
          येशूला वधस्तंभावर खिळताना त्याची फार निंदानालस्ती करण्यात आली होती. तसेच त्याला यहुद्यांचा राजा असे शीर्षकही त्याच्या उपहास म्हणून दिले गेले. वधस्तंभावर खिळलेला एका अपराध्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यास म्हटले की, “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” प्रभू येशूने लगेच त्याला त्याच्या तारणाचे अभिवचन दिले. “तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” त्या वधस्तंभावर या अपराधाला सार्वकालिक  जीवन मिळाले.

बोधकथा:

           एकदा एक राजा एक आपल्या राज्यातील गरीब मुलीच्या प्रेमात पडला. मग त्याने ठरवले की, ह्या मुलीला आपण आपल्या राजवाड्यात आणूया व लग्न करूया. परंतु त्याला असे वाटले की, आपण असे केल्यास त्या मुलीवर आपण अन्याय व जबरदस्ती करतो. त्यात त्यास त्याचे प्रेम कुठेच दर्शवले जाणार नाही. मग त्याने बरेचसे दिवस विचार केल्यानंतर व आपल्या राजावाडा व सर्व काही सोडून त्या मुलीच्या शेजारी राहू लागला. त्याचा हा त्याग व प्रेम पाहून ती मुलगी ही त्या राज्याच्या प्रेमात पडते.

मनन चिंतन:
 “देवाचे राज्य सामर्थ्यात नाही केवळ बोलण्यात
प्रारंभी शब्दच हो शब्द देवासह होता.”

          आपण खूप अशा राजा विषयी निरनिराळ्या पद्धतीने ऐकले आहे. इतिहासातही बरेचसे राजे होऊन गेले. त्यामुळे राज्याची प्रतिमा आपल्यासाठी काही नवीन नाही. राजा या शब्दाची फोड केल्यास आपल्याला दोन वेगळे अर्थ मिळतात: ‘रा’ म्हणजे जो राज्य करतो व ‘जा’ म्हणजे जो आपल्या प्रजेला जाणतो तो. बरेच राजे आले आणि धुळीस मिळाले, कारण ते स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठीच जगले. त्यांनी जनतेचा विचार फार कमी; मात्र स्वतःचा विचार जास्त केला. म्हणून आज लोक त्यांना विचारतही नाहीत. किंबहुना काही राजे चांगले सुद्धा होते. त्यांनी लोकांची सेवा केली.
          प्रत्येक राज्याची एक प्रजा होती. त्याचा राजवाडा होता. तो आपल्या थाटा माटात गजब जायचा. आपल्या सिंहासनावर बसून डोक्‍यावर सोन्याचा मुकुट घालून लोकांचा न्याय करत असत व कधी अन्याही करत असत.
          परंतु आजचे लुक लिखित शुभवर्तमानात आपल्यासमोर एक वेगळाच राजा प्रदर्शित करत आहे. तो आपल्या राजवाड्यात नाही तर कालवरीच्या डोंगरावर आहे. तो सिहांसनावर बसला नाही; तर ख्रुसावर निर्बल व हतबल होऊन टांगला आहे. तो लोकांचा न्याय करत नाही व लोक त्याची वाहवा ही करत नाहीत, तर ख्रुसा खाली जमलेले लोक त्याची थटा व निंदानालस्ती करत आहेत.
          मग हा कसा आपला राजा? जो क्रूर असे अपराध्या सारखा क्रुसावर मरत आहे? तर ख्रिस्त हा शांतीचा, प्रेमाचा, दयेच्या राजा आहे. “त्याचे राज्य इथले नाही तर त्याचे राज्य हे स्वर्गाचे आहे.” (योहान १८:३६) खरे पाहता येशूने कधीच राजेपणा सारखा कधीही वावर केला नाही; किंवा, ‘मी राजा आहे’ असे कधी घोषित ही केले नाही. मग येशूला यहुद्यांचा राजा असे का म्हटले? तर पाहता यिर्मया संदेष्ट्याने भाकीत केले होते की; “देव आपल्याला एक राजा देईल व तो त्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित करील.” (यिर्मया २३:५-६) आणि तो अभिषिक्त केलेला असेल. (दानियेल ९:२५) म्हणून जेव्हा येशूने म्हटले की “मीच तो निवडलेला आहे.” (लुक ४:१८) आणि स्वर्गाच्या राज्याचाउल्लेख केला. ह्या कारणास्तव शास्त्री आणि परुषांनी येशूचा गैरफायदा घेतला, व आपल्या जाळ्यात पकडले.
          येशूला हे ठाऊक होते की; हे लोक त्याला जिवे मारू पाहतात. परंतु येशू एका हतबल शेळी सारखे आपले अर्पण करतो. कारण त्याला आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करावयाची असते. येशूला लोकांवर क्रूरतेने किंवा जबरदस्तीने राज्य करावयचे नव्हते, तर त्याला लोकांच्या मनात, त्याच्या हृदयावर राज्य करावयचे होते. जे राज्य कधीच संपुष्टात येनार नाही.
त्यामुळेच येशूकडे राजदंड नव्हता, तर रुमाल होता.
लोक त्याच्यासमोर झुकले नाहीत, तर येशू स्वतः हा झुकला व आपल्या शिष्यांचे पाय धुतले
त्याच्याजवळ सैन्य नव्हते, परंतु शिष्य होते.
तो राजासनावर नाही बसला, परंतु गाढवावर बसला.
त्याने सोन्याचा मुकुट नाही घातला, परंतु काट्यांचा मुकुट घातला.
त्याने कोणाचा प्राण नाही घेतला, परंतु आपला प्राण दिला.
त्याने कुठलीही सीमा नाही ठेवली, तर त्याने सर्वांना आपला राज्यात सामावून घेतले.
त्याने कोणाचे शोषण नाही केले, तर त्याने लोकांची सेवा केली व त्यांना धीर दिला.
          इतकेच नाही तर मरतेवेळी सुद्धा आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली, व आपल्या उजव्या बाजूच्या चोराला स्वर्गाचे आश्वासन दिले. कारण त्याने येशूचे करुणेचे राज्य ओळखले व त्याला कळून चुकले की, येशू दयेचा व करुणेचा राजा आहे. आपणही आज ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असताना आपल्याला सुद्धा स्वर्ग राज्याचा अनुभव यावा, व आपण ही येशूच्या दयेचा व करुणेचा अनुभव घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: ’हे प्रभू तुझे राज्य आम्हांवर येवो.’

१.आपल्या ख्रिस्त सभेचा कारभार पाहणारे पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभू सेवेसाठी अर्पण केले आहे त्यांना देवाची कृपा-आशीर्वाद मिळावा व त्यांनी येशूची सुवार्ता सर्वत्र पसरवली म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.आपले सर्व राजकीय पुढारी व नेते ह्यांनी येशू प्रमाणे जनहितासाठी झटावे व जनतेची अधिकाधिक सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.जे कोणी आजारी,  दुःखी व संकटांनी ग्रासलेले आहेत, आयुष्याला कंटाळलेले आहेत अशांना प्रभुचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.आज ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असताना प्रभू येशूला आपल्या जीवनाचा राजा बनवून त्याचे राज्य आपल्या हृदयात यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

Thursday 14 November 2019


Reflection for the Homily of 33rd SUNDAY IN ORDINARY TIME (17-11-2019) By Br. Lipton Patil









सामन्य काळातील तेहतिसावा रविवार





दिनांक: १७/ ११/२०१९
पहिले वाचन: मलाखी ४: १-२
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३: ७-१२ 
शुभवर्तमान: लुक २१: ५-१९


“परमेश्वराचा दिवस येत आहे”

प्रस्तावना:  

          आजपासून आपण सामान्य काळातील तेहतिसाव्या रविवारात प्रधार्पण करत आहोत. आजच्या उपासनेद्वारे ख्रिस्तसभा  आपणाला सांगत आहे की, “परमेश्वराचा दिवस येत आहे.” अर्थात, परमेश्वर येत आहे; शेवटचा बोध देण्यासाठी व न्यायनिवाडा करण्यासाठी.
           मलाखी संदेष्ठा आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सांगतो की; गर्विष्ठ व दुराचारी यांचा नाश होईल. परंतु जे परमेश्वराचे भय बाळगतात त्यांना प्रभूठायी आरोग्य प्राप्त होईल. थेस्सलनीकाकरांस दुसऱ्या पत्रात आपण ऐकत आहोत की; संत पॉल मनुष्याच्या शारिरीक किंबहुना, आर्थिक जीवनाविषयी मार्गदर्शन करीत आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात येरुशलेमचा विध्वंस व युगाची समाप्ती याविषयी ख्रिस्त बोलत आहे. ख्रिस्ताच्या अश्या ह्या बोलण्यावरून आपणाला असे कळून येते की ख्रिस्त आपल्याला तत्पर राहण्यासाठी बोलावत आहे. माझ्या श्रद्धावंतांनो, आजच्या या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना, थोडावेळ शांत राहूया व पश्चातापी अं:तकरणाने क्षमा मागूया व भक्तिभावाने सहभागी होऊ या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन : मलाखी ४:१-२

          संदेष्टा मलाखी परमेश्वर येत आहे याची घोषणा करत आहे. परमेश्वर आल्यावर गर्विष्ठ व सर्व दुराचारी लोकांचा नाश करील व त्यांना शिक्षेस पात्र ठरवणार आहे. परंतु जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतील व त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतील त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होईल. ते लोक हर्षभरित राहतील.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र: ३:७-१२  

          संत पौल आपल्या जीवना द्वारे प्रभू येशूची सुवार्ता सांगत असे. विश्वासणाऱ्यांणी त्याच्या उपजीविकेची जबाबदारी घेणे योग्यच ठरले असते. पौलाने कोणावर भार टाकला नाही. इतरांना चांगले उदाहरण व्हावे म्हणून त्यांनी स्वतः रात्रदिवस श्रम व कष्ट केले. विश्वासणाऱ्यांणी आपल्या उपजीविकेसाठी व्यवसाय अगर नोकरी करावी व प्रभुजी सेवाही करावी; हा उत्तम कित्ता घालून दिला आहे. कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने उपाशीच राहावे.

शुभवर्तमान: लुक २१:५-१९

           ते मंदिर अति भव्य होते. सुमारे १५ मीटर लांबीचे दगड एकावर एक ठेवून ते बांधलेले होते. सोन्याच्या साखळ्या व वेळी त्यांनी आतील भिंती सुशोभित केल्या होत्या. हे मंदिर त्या काळात एक मोठे आश्चर्य होते. असे असून चिऱ्यावर चिरा राहणार नाही; हे एकूण ऐकणाऱ्यांना मोठा धक्काच बसला. येशू ख्रिस्त खरे तेच सांगत होता. अशी त्यांची खात्री पटली आणि या गोष्टी केव्हा होतील हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
           या प्रश्नांचे उत्तर देताना प्रभू येशूने; जगाचा शेवट होईल, त्यापूर्वी काय घडेल तेही सांगितले. लढाया, भूकंप, भयानक रोगांची साथ व दुष्काळ या गोष्टी जगात प्रामुख्याने घडतील. स्वार्थी मानव आपल्या स्वार्थासाठी एकमेकांचा विध्वंस करताना आढळतील. जगात शांती नसल्यामुळे लोक शांतीच्या शोधात असतील व खोटी ख्रिस्त प्रकट होतील.

मनन चिंतन:

          असे म्हणतात की आपल्या कृत्यांमुळे  ज्याप्रमाणे निसर्गाचे चक्र आज बिघडलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या जीवनाचे चक्र सुद्धा बिघडलेले आहे. 
 माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, आज जगात अतिवृष्टी, चक्रीवादळ, भूकंप व हवामानात बदल इत्यादी गोष्टी घडत आहेत. अशा या गोष्टी घडत असताना, आपण म्हणत असतो की, जगाचा शेवट जवळ आला आहे, आपल्या कृतीमुळे परमेश्वर आपल्यावर कोपला आहे. असे नाना प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये थैमान घालत असतात. अशावेळी आपण खचून जातो की, खरोखरच जगाचा अंत होणार का?  या भीतीने आपण खूपच खचून जातो. आपणास प्रत्येकाला वाटते की, जे काही कमावले आहे. मग तो पैसा घर गाड्या संपत्ती व जमीन असो की नाव हे सर्वकाही नष्ट होईल. आपल्याला शारिरीक सुखाची भीती जास्त असते. शारिरीक सुख कसे मिळेल यावर आपण रात्रंदिवस श्रम करतो व अध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करीत असतो.
           आजच्या तिन्ही वाचनांत आपण ऐकले आहे की,  ख्रिस्त पुन्हा येत आहे व सर्वांचा न्याय होणार आहे. हे सत्य आहे की, ख्रिस्त लवकर येऊन आपल्या प्रत्येकाचा न्याय करणार आहे. प्रत्येकाला आपल्या कार्याचा मोबदला न्यायाने मिळणार आहे. आपला न्याय आपल्या चांगल्या व वाईट कृतीने करणार आहे. जे लोक चांगले जीवन जगतात त्यांचा न्याय चांगल्या रीतीने होईल व जे दृष्ट कृत्य करतात त्यांचा न्याय त्यांच्या कृत्यानेच होईल.  ख्रिस्त आपल्या धनसंपत्ती ने न्याय करत नाही किंवा श्रम व गरीब यावरून न्याय करत नाही. तर  ख्रिस्त आपले अंतःकरण बघतो. आपले मन किती पवित्र व शुद्ध आहे यावरून आपला न्याय होईल. त्यासाठी संत पौल आपल्या मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करतो की,  आपण आपले जीवन कसे जगायचे.  जीवन जगत असताना आपण स्वतः जबाबदार असतो. आपण ख्रिस्ताची सुवार्ता सांगायला कमी पडू नये. आपल्या वागण्यातून आपण ख्रिस्त दुसऱ्यांना दिला पाहिजे. बायबल तत्त्वज्ञानाची व विज्ञानाची किंवा मोठी पुस्तके घेऊन ख्रिस्ताची सुवार्ता सांगितले पाहिजे असे काही नाही. सर्वकाही आपल्यामध्ये आहे. आपल्या स्मितहास्याने दुःखी चेहरे आपण आनंदित करू शकतो.  एकटे पडले आहेत अशांचे  साथीदार बनवून त्यांचा भार कमी करू शकतो. जे संत होऊन गेले त्यांनी काही महान गोष्टी नाही केल्या. तर छोट्या कृत्यातून, त्यांच्या छोट्या कार्यातून इतरांना ख्रिस्त दिला.  अस्सिकर संत फ्रान्सिसनी कृष्ठरोग्यांची सेवा केली.  तसेच पर्यावरणाची काळजी घेतली.  अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ताची माहिती  व प्रेम जगाला प्रकट केले. आपण सुद्धा या गोष्टी करू शकतो व जेव्हा ख्रिस्त येईल न्याय  करायला  तेव्हा आपला न्याय योग्य रीतीने होईल.   
          शुभवर्तमानात सांगितल्या प्रमाणे युगाची समाप्ती होणार आहे.  ही समाप्ती होण्याच्या  आधी काही चिन्हे दिली जातील.  ही चिन्हे आपण आज अनुभवत आहोत. परंतु ही चिन्हे पहात असताना खचून जाऊ नका. कारण ही चिन्हे आपल्यासमोर नवे आव्हान ठेवतात. आपल्याला जागृत करतात  अशासाठी की ख्रिस्त लवकर येत आहे व तो सर्वांचा न्याय निवाडा करणार आहे.  तर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची तयारी केली पाहिजे. आपल्यामधील असलेला अहंकार, गर्विष्ठपणा, राग, मत्सर व क्रोध काढला पाहिजे. सर्वांची दयेने, प्रेमाने व करूणेने वागायला हवे.  आपण आपल्या दररोजच्या जीवनात दुसऱ्यांसाठी अडचण न होता; हे सर्व काही केल्याने प्रत्येकाचा न्याय चांगल्याने होणार व सर्वजण सर्वकालीन जीवनाचा आनंद घेतील व मेल्यानंतरही आपल्याला अनुभवता येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”

१. ख्रिस्त सभेची अखंडितपणे सुवार्ता जगाला पोहोचविणारे पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स,बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ यांना सर्वांना ख्रिस्ताचे प्रेम, कृपा व दया मिळून ख्रिस्ताची सुवार्ता जगभर जोमाने पसरविता यावी  म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. देशात अत्याचार, काळाबाजार, अन्याय व वैराचार ह्यासारख्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळे देशाची उन्नती होत नाही. अशा वेळी आपल्या राजकीय नेत्यांनी होत असलेल्या वाईट गोष्टीवर आवाज उठवून, देशाला योग्य दिशा द्यावी व देशाची चांगल्यारितीने वाटचाल व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या हवामान बदलामुळे कितीतरी लोकांचे नुकसान झाले आहे. काहीकांची घरे उध्वस्त झाली, तर शेतांची नासाडी झाली आहे. परमेश्वराने दया करून हे सर्व काही शांत करावे व लोकांना धीर द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज युवक-युवती जीवनात योग्य साथीदार व नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य साथीदार व नोकरी मिळून त्यांचे जीवन आनंदित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक अतिशय आजारी आहेत, ज्यांची सेवा करायला कोणीही नाही. अशा सर्व लोकांना ख्रिस्ताचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.