Tuesday 28 January 2014

Reflections for Homily By Amol Gonsalves.











सामान्य काळातील चौथा रविवार.
"बाळ येशूच्या समर्पणाचा सण."

दिनांक    : ०२-०२-१४.
पहिले वाचनमलाखी; ३: १-४.
दुसरे वाचनइब्री; २: १४-१८.
शुभवर्तमानलूक; २: २२-४०.


''कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.''

प्रस्तावना:

आज पवित्र ख्रिस्तसभा ''यरूशलेम मंदिरात प्रभू येशूच्या समर्पणाचा सण'' साजरा करीत आहे. मलाखी ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण सेनाधीश परमेश्वर, सर्वांचा न्यायधीश ह्याचा दिवस समीप आहे ह्या विषयी ऐकतो.
आपल्या प्रभू ख्रिस्ताने देहरूप धारण करून आपल्याला देवाचे मुले बनविले आहे. देवाचा पुत्र 'ख्रिस्त' हा देवदुतापेक्षा श्रेष्ठ असून देव-प्रेमाद्‌वारे आपल्याला ह्या श्रेष्ठतवाचा लाभ करून दिला आहे, असे आपणास संत पौल इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राद्‌वारे सांगत आहे.
आजच्या शुभवर्तमानात संत लूक आपल्यासमोर मरिया व योसेफ ह्यांनी मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे यरूशलेम मंदिरात येशूचे समर्पण कसे केले व त्यावेळी संदेष्टा शिमोन व संदेष्टी हन्ना ह्यांनी केलेल्या प्रकटीकरणाविषयी ऐकत आहोत. माता मरिया व धन्य योसेफ ह्यांनी यरूशलेम मंदिरात केलेल्या बाळ येशूचे समर्पण आपल्याला आपल्या ''जीवन-समर्पणाविषयी'' आठवण करून देते. अशा समर्पणाची परंपरा आज देखील आपल्यामध्ये प्रज्वलित आहे. बास्तिमाच्यावेळी आपल्याला पवित्र वेदीसमोर ठेऊन, आपल्या भावी आयुष्याचे समर्पण देवापुढे केले जाते.
आज, आपण आपल्या जीवनातील ''ख्रिस्त-समर्पणाचे'' महत्त्व जाणून घेऊ या. व त्यानुसार आपल्या जीवनात बदल घडून आणण्यासाठी आपण पयत्न करावा म्हणून, ह्या मिस्साबलिदानामध्ये कृपा मागू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन:

पवित्र शास्त्रामधील प्रथम ग्रंथ-पंचकातील शेवटचे पुस्तक हे संदेष्टा मलाखी ह्याचे मानले जाते. मलाखीद्‌वारे इस्त्राएलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन असे होते की न्यायाचा दिवस समीप आहे, तो जवळ येत आहे. इस्त्राएली बांधवांची तुच्छतेची वृत्ती आणि धार्मिक घुसफुस लक्षात घेऊन, ''जागे व्हा! उठा'' हा भविष्य संदेश सांगून परमेश्वराबरोबर केलेल्या कराराशी पुन्हा एकदा नव्याने एकनिष्ठ होण्याचे संदेष्टा मलाखी आवाहन देतो ''ज्या प्रभूला तुम्ही शोध करीत आहात, तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल'' असे अभिवचन घोषित करतो. पण! दुर्दैवाने अपेक्षित प्रतिसाद दुरच राहतो. इस्त्राएली लोकांनी आपल्या मनात येईल तशी अर्पणे परकीय देवाच्या पायापाशी अर्पिले व उपासनेत दांभिक उपचार आणून ख-या व सत्य देवाचा अपमान केला. ह्यास्तव संदेष्टा मलाखी प्रखरपणे इस्त्राएली लोकांसमोर दोन महत्त्वपूर्ण प्रश्न मांडतो.
- त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल?
- तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल?
जरी दुराचारी संपन्न झाले व दुर्जनांचा उत्कर्ष झाला तरी सर्व समर्थ सेनाधीश देवाने दिलेले अभिवचन पूर्ततेस येईल. ''त्या दिवशी त्यांची सेवा करणा-या विश्वासू लोकांना तो वाचविल, त्यांच्यावर दया करील. त्या दिवशी न्यायत्वाचा सुर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्याठायी आरोग्य असेल.'' त्या दिवशी सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकटासारखे जाळून जातील.

दुसरे वाचन:

 इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुस-या वाचनात आपण, ख्रिस्त सर्वसमर्थ पित्याचा पुत्र ह्यांची मानखंडना व त्याने स्वत:ला कसे उन्नत केले ह्या विषयी ऐकतो. इब्री लोकांस पत्र अध्याय १ आपल्याला ''देवपुत्र, देवदूताहून श्रेष्ठ आहे.'' ह्या विषयी जाणीव प्राप्त करून देते व अध्याय २ आपल्याला त्या देवपुत्राने दिलेल्या संदेशात दृढ होण्यास आव्हानीत करते. पुत्राचा संदेश हा तारणाविषयी होता. पापी मानवजातीचे तारण कसे साधले गेले ह्याविषयीचा उल्लेख व महत्त्व येथे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ख्रिस्ताने संपूर्णरीत्या मानवीरूपाला ग्रहण करून आम्हासाठी काय केले ह्याचा पाठपुरावा आजचे दुसरे वाचन आपल्याला देते.

शुभवर्तमान:

 संत लूक आपल्याला ''यरूशलेम मंदिरात येशूचे समर्पण'' तसेच येशूची सुंता कशी झाली व त्याच्याविषयी कोणत्या प्रकारचे प्रकटीकरण करण्यात आले ह्याविषयी माहिती पूरवितो.
'येशूचे मंदिरात समर्पण' आपल्यासमोर तीन लक्षणीय गोष्टींचा उल्लेख ठेवितो.

अ. माता मरिया व धन्य योसेफ ह्यांची यहूदी नियमशास्त्राशी एकात्मता:
यहूदी नियमशास्त्रानुसार पुरूष मुलाच्या जन्मानंतर माता सात दिवस ''अशुध्द'' मानली जाते आणि तिला आणखी तेहतीस दिवस घरीच राहावे लागते. त्यानंतर, चाळीसाव्या दिवशी शुध्दीकरणासाठी फक्त यरूशलेम मंदिरात येऊन शुध्दीकरणाचे अर्पण समर्पित करावे लागत असे(लेवीय; १२:१-८). यहूदी शास्त्राप्रमाणे मुलाला नव्हे तर फक्त मातेला शुध्दीकरण्याची गरज असते. पण! संत लूक ''त्यांचे शुध्दीकरणाचे दिवस भरल्यावर'' ह्या वाक्याचा उल्लेख शुभवर्तमानात करतो कारण, मरीयेचे आणि बाळ येशूचे शुध्दीकरणाचे अर्पण जर का वेगवेगळ्या प्रकारे केले असते तर मरीयेस अर्पणाचा खर्च जास्त आला असता ह्यास्तव त्यांनी दोघांचे अर्पण एकत्रित केले.  

ब. हे समर्पण ''सोडवून घेण्यासाठी'' केले जात:
नियमशास्त्रानुसार प्रथम जन्मलेल्या मुलाला भरपाई देऊन सोडवून घेणे आवश्यक होते. प्रथम जन्मलेले सर्वच जीव देवाला समर्पित आहेत असे मानले जाई. यात, प्रथम जन्मलेले पशूंचे होमार्पण करीत आणि पाच शेकेल द्रव्य भरून मुलांना सोडवून घेत (निर्गम;१३:१३, गणना १८:१५-१६).

क. देवाच्या कार्यासाठी नेमलेला सेवक:
मरियेने आपल्या मुलाला खास करून देवाच्या सेवेसाठी अर्पण केले. म्हणूनच येशू त्यावेळी तेथे होता. हन्नानेही पूर्वी याच प्रकारे शमुवेलाला निवास मंडपात समर्पित केले होते (१ शमुवेल; १:११,२१-२८).
ह्या वृतांतात पुढे आपल्याला शिमोन व हन्ना ह्यांच्या बाबतीत सांगितले जाते. शिमोन एक भक्तिमान, सात्विक व नितीमान इस्त्राएली होता (यशया; ४०:१;६१:२). देव आपल्या लोकांचे सांत्वन, सुटका व मुक्तता करील ह्या प्रतिक्षेची वाट पाहत होता. आपण मसिहा-ख्रिस्त पाहिल्यावाचून मरणाला मुकणार नाही असे देवाचे अभिवचन त्याला मिळाले होते. तो क्षण जेव्हा आला तेव्हा त्याने मुलाला उचलून कवटाळले आणि देवाचे आभार मानून आपण मरण्यास तयार असल्याचे म्हटले. तथापि शिमोनाने आणखी सांगितले की, या मुलाचे येणे हे न्यायनिवाडा होण्यास व तारण होण्यास कारणीभूत ठरेल, कारण लोकांच्या अंत:करणाचा भेद उघड केला जाईल व येशूला पुढे मिळणा-या वागणुकीमुळे मरियेला दु:ख सोसावे लागले.
हन्ना ही एक संदेष्टी होती व ती देखील इस्त्राएलच्या सुटकेची व तारणाची वाट पाहत होती. हन्नाच्या आगमनाने शिमोनाच्या शब्दांना दुजोरा मिळाला. देव येशूद्‌वारे यहूदी लोकांची मुक्तता व तारण करील असे केलेले भाकीत पूर्णतेस आले आहे ह्यासाठी, ती देवाचा महिमा व उपकार स्तूती करते.

बोध कथा:

 एकदा एक अख्रिस्ती विधवा बाईचा एकुलता एक मुलगा लहानपणापासून भयानक अशा आजाराने पिडीत होता. आपल्या एकुलत्या मुलाला बरे करण्यासाठी त्या आईने आपली सर्व संपत्ती व शक्ती पणाला लावली. अनेक नामवंत अशा वैद्यांचे औषधे-उपचार करून घेतले पण आजारातून त्या मुलाची काही केल्या सुटका होईना! अशा जीव घेण्या मनस्थितीत जात असताना एके दिवशी त्या बाईला कोणीतरी सांगितले की तुम्ही ख्रिस्ती धर्मगुरूकडे जाऊन आपल्या मुलावर प्रार्थना करून घेण्याचा सल्ला दिला.
त्या बाईला ख्रिस्ती धर्माविषयी व धर्मगुरुविषयी कोणतीही जाणीव नव्हती. आपल्या मुलाच्या आजारातून सुटकेसाठी ती बाई चौकशी करत मुंबईतील एका चर्चमध्ये येऊन पोहचली. दुपारची वेळ होती चर्चच्या सभोवताली कोणीही नव्हते. आपण काय करावे हे त्या बाईला उमजत नव्हते. त्या बाईने आपल्या मुलाला चर्चच्या मुख्यदारी झोपवून, देवाकडे अशी विनवणी केली, ''सर्व-समर्थ परमेश्वरा मला तू कोण आहेस, तू कुठे आहेस ह्याची कल्पना मला नाही. सर्व ठिकाणी जाऊन मी थकली आहे. आता माझ्याकडे पर्यायी मार्ग उरला नाही. मी माझ्या आजारी मुलाला तुझ्या दारी, तुझ्या हाती समर्पित करीते शक्य झाले तर माझ्या मुलाला नव-जीवन बहाल कर. ''खूप वेळानंतर धर्मगुरूने त्या बाईला पाहिले व सर्व काही विचारून झाल्यावर, धर्मगुरू त्या बाईला म्हणाले, ''जर तुझा येशूख्रिस्तावर पूर्ण विश्वास असेल तर तुझा मुलगा नक्कीच बरा होईल, तू विश्वासाने घरी जा.''
दुस-या दिवशी जेव्हा वैदयकिय तपासनी केली गेली तेव्हा तपासनीचा अहवाल सम्य असल्याचे आढळून आले व कोणताही आजार नसल्याचे साध्य झाले. ''देवाला काही अशक्यच नाही'' आपण देखील जर आपले सर्वस्वी येशूला समर्पिले तर तो आपले सर्व दु:ख कष्ट हलके करील व आपल्याला नव-जीवन बहाल करील.

मनन-चिंतन (जीवन ध्येय):

ख्रिस्ताला यरूशलेम देवालयात समर्पित केल्यानंतर त्याच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या त्यात देवाच्या तारणकार्यासंबंधीचा संदेश दडला होता. ''मंदिरातील समर्पण'' ख्रिस्ताला आपल्या जीवनातील पुढील कार्याचे दार उघडून देते. ह्या घटनेपासून ख्रिस्त आपले संपूर्ण जीवन देव कार्यासाठी सज्ज बनवितो. अशा ह्या समर्पित जीवनामधूनच आध्यात्मिक व नैतिक मुल्यांचा खरा उगम होत असतो. देवाने निवडलेल्या लोकांचा तारण-इतिहास ह्यांच घटनेपासून आंरभीत होतो.
ह्यास्तव, आजचा हा ''समर्पणाचा'' सण आपल्याला दोन महत्त्वपूर्ण पैलूवर मनन-चिंतन करण्यास निमंत्रण देतो.
१. ख्रिस्ताचे समर्पित जीवन व
२. आपले समर्पित जीवन.

१. ख्रिस्ताचे समर्पित जीवन:
 ख्रिस्त हा स्वत: तारणारा होता. तो देवपुत्र होता. पहिल्या वाचनात नमुद केल्याप्रमाणे देवाने त्याला देवदूतापेक्षा श्रेष्ठ केले होते. तो सर्व जीवाहून महान व श्रेष्ठ होता. पण ह्या कृतीतून ख्रिस्त मानवी स्वरूपाशी एकचित होतो व सर्व मानवजातीशी एकरूप होतो.
येशूचे समर्पण व समर्पित जीवन हे मानवाच्या तारणासाठी व सेवेसाठी होते. आज, ह्यावरून ख्रिस्ताच्या बाबतीत लिहिलेले एक शास्त्र वचन पूर्णतेस येते. ते असे की, ''मी सेवा करून घ्यावयास आलो नाही; तर सेवा करावयास आलो आहे.''
प्रत्येक समर्पित जीवनात मातृ-पितृचे स्थान मोलाचे असते. ख्रिस्ती जीवनमुल्यावर कार्य करण्यासाठी व त्यानुसार जीवन अनुसरण्यासाठी लाभणारे प्रोत्साहान व प्रेरणादायी जीवन हे आई-वडिलांकडून लाभत असते. ह्यास्तव समर्पित जीवनावर यशस्वीरित्या वाटचाल करण्यासाठी आई-वडिलांना सिंहाचा वाटा उचलावा लागतो. संत लूकने शुभवर्तमानात येशूचे आई-वडील, मरिया व योसेफ ह्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी आई-वडील ह्या नात्याने आपली जबाबदारी तन्मयतेने कशी पार पाडली ह्याविषयी सांगत आहे.

२.आपले समर्पित जीवन:
          प्रभू येशूच्या समर्पणावर चिंतन करीत असताना आपले समर्पित जीवन कसे आहे. ह्यावर थोडावेळ विचार करू या. प्रत्येक ख्रिस्तीजनाच्या समर्पित जीवनाची सुरवात स्नानसंस्काराद्‌वारे होत असते व पुढे दृढीकरण, ख्रिस्तशरीर, प्रायश्चित, रूग्णाभ्यंग, गुरूदिक्षा किंवा लग्न अशा संस्काराद्‌वारे ह्या समर्पित जीवनाचा शेवट होत असतो.
आपल्याला लाभलेले समर्पित जीवनाचे पाचारण आज आपल्याला दोन महत्त्वपूर्ण गोष्टींची आठवण करून देते. ते म्हणजे ख्रिस्ताशी असलेले आपले एकनिष्ठतेचे नाते व ख्रिस्ताने दिलेला सुर्वाता पसरविण्याचा महामंत्र. आज आपण आपल्या कृतीतून, कार्यातून, विचारातून देवाच्या प्रेमाचा संदेश इतरांपर्यंत पोहचवितो का? आपण ख्रिस्ताला खरोखरचं आपल्या जीवनाचा तारणारा प्रभू म्हणून स्विकारले आहे का? शिमोन व हन्ना ह्यांच्या नीतीमान व भक्तीमय जीवन शैलीतून आपणास कोणता संदेश मिळतो? ह्यावर थोडा वेळ विचार करू या. आजचा हा समर्पणाचा दिवस सर्व व्रतस्थ बंधू-भगिनीसाठी विशेष प्रार्थना करण्याचा दिवस म्हणून समजला जातो. ख्रिस्ताने सदैव आपली माया, कृपा व प्रेम त्यांच्या कार्यात दयावी म्हणून आपण प्रार्थना करू या व त्याच्या समर्पक जीवनाचे सार्थक होण्यासाठी याचना करू या.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: अर्पितो मी प्रभूला जीवन हे माझे सारे.

१. आपले परमगुरूस्वामी फ्रान्सिस ह्यांना प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यास त्यांना मनोबल दयावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत,  विशेषकरून आपले राष्टपती, उपराष्टपती, पंतप्रधान व मंत्रीमंडळाचे सदस्य यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आजच्या तरूण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड दयावे लागत आहे. प्रसंगी ते निराश होत आहेत. या तरूण पिढीत असलेला उत्साह कायम टिकून राहावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक अशा संघटना कार्यारत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आर्शिवाद यावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपल्या कुटूंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, प्रत्येक सदस्यात बंधूभाव वाढावा, एकमेकांत जवळीक वाढावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.


Tuesday 21 January 2014

Reflections for Homily By:- Botham Patil.







सामान्य काळातील तिसरा रविवार

दिनांक :- २६/०१/२०१४
पहिले वाचनयशया८:२३-९:३.
दुसरे वाचन१करींथीकरास पत्र१:१०-१३,१७.
शुभवर्तमान: मत्तय ४:१२-२३.

"माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन."

प्रस्तावना:
            आजची उपासना आपणा  सर्वांना येशू हा जगाचा तारणारा व जगाचा प्रकाश आहे हे सांगत आहे. येशूने गालीलातील, कफर्णहूम येथील लोकांस पश्चाताप करण्याचे आमंत्रण दिले व देवाराज्याची घोषणा करण्यास सुरवात केली. ज्याप्रमाणे मासे धरणारे कोळी माणसे धरणारे शिष्य बनले, त्याचप्रमाणे आजची उपासना आपणा सर्वांना ख्रिस्ताचे अनुयायी बनून ख्रिस्ताचा प्रकाश, सर्वांना देण्यासाठी व जे अंधारात आपले जीवन जगत आहेत त्यांना प्रकाशात आणण्यासाठी बोलावत आहे, आपणा सर्वांना प्रभू येशूची पाचारण देणारी वाणी ऐकू येण्यासाठी व ती आपण स्वखुशीने स्विकारण्यासाठी ह्या पवित्र मिस्साबलिदानाद्वारे कृपा व शक्ती मागु या.

पहिले वाचन:
आजच्या पहिल्या वाचनात यशया प्रवक्ता जबुलून आणि नफ्ताली प्रांत ह्यांच्या होणा-या विजयाविषयी बोलत आहे. हे दोन्ही प्रांत अंधारात व संकटात होते कारण दुस-या राज्याच्या राजाने त्यांच्यावर जुलूम केले होते, परंतु यशया प्रवक्ता त्यांस विजयाची घोषणा करत आहे, देवाचा प्रकाश त्यांच्यावर पडला आहे हे तो सांगत आहे.

दुसरे वाचन:
दुस-या वाचनात आपण ऐकतो की करिंथ येथे लोकांमध्ये फूट पडली होती. प्रत्येकजण मी अपुल्लोचा, मी पौलाचा, मी कैफाचा आणि मी ख्रिस्ताचा मनवून घेत होते, म्हणून संत पौल त्यांना एक असावे व त्यांच्यात फूट नसावी म्हणून सांगत आहे. संत पौल त्यांच्या संकुचित वृत्तीबद्दल त्यांची कानउघडणी करत आहे.

सम्यक विवरण :
४० वर्षे प्रवास करून सरतेशेवटी इस्त्रायली जनता पँलेस्टाइनमध्ये पोहचली. तदनंतर यहोशवाने प्रत्येक वंशाला आपआपली जागा वाटून दिली. जबुलून आणि नफ्ताली ह्या दोन जमातींचे लोक गालीलातील उत्तरेकडे वास्तव्यास होते. हा प्रदेश दिसावयास सुंदर शेती बागायतीसाठी सुपीक किंवा सकस होता, म्हणूनच हा प्रदेश शत्रूंच्या हल्ल्यामध्ये कायमचा असयचा. कोणत्याच प्रकारचे संरक्षण त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. यशया प्रवक्ता येशू येण्याच्या ७०० वर्षाअगोदर येरुशलेममध्ये राहत होता आणि त्याने हे सर्वकाही पाहिले होते. असिरियाच्या सैन्याने हा प्रदेश लुटून सर्वकाही नष्ट केले होते आणि तेथील लोकांना गुलाम बनवून घेऊन गेले होते. ह्याच परिस्थितीत देवाचा आत्मा यशायावर आला त्याने अंधारात चालणा-या लोकांस प्रकाशाची घोषणा केली.
शुभवर्तमानकार मत्तय ह्याच प्रकाशाची घोषणा येशूमध्ये करतो. कारण येशूने जेव्हा ह्या विश्वात प्रवेश केला तेव्हा हे सारे विश्व पापाच्या अंधारात बुडून गेले होते. सर्वजण प्रकाश, सुख स्वातंत्र्याच्या शोधात होते, परंतु ते ह्यापासून वंचित होते. योहान बाप्तिसत्याने पश्चातापाची घोषणा केली आणि जेथून त्याने घोषणा करणे बंद केले तेथून येशू ख्रिस्ताने सुरु केले. योहानाने लोकांवर प्रकाश पाडला होता परंतु शुभवर्तमान सांगते;  
"हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यायला आला होता" (योहान :).
         "हा प्रकाश येशू ख्रिस्त होय, ज्याचा प्रत्येक शब्द मनुष्याला प्रकाशित करतो" (योहान :).
येशू ख्रिस्ताला माहित होते की तो ह्या जगात कायमचा राहू शकत नाही आणि त्याचे कार्य नेहमीच चालू राहिले पाहिजे म्हणून तो शिष्यांना पाचारण करतो (मत्तय :१८-२२). येशू ख्रिस्त पेत्र आणि अंद्रिया तसेच याकोब योहान ह्यांना त्याच्यामागे येण्यास पाचारण करतो. त्या चार भावंडांचा हा काही येशूला पाहण्याचा पहिलाच क्षण नव्हता, त्यांनी नक्कीच येशूला पाहिले असेल आणि त्याच्याबरोबर बोलले असतील. परंतु येशूने ह्या घटकेस त्यांच्यासमोर कठीण आव्हान ठेवले ते म्हणजे सर्व काही किंवा त्यांच्याकडे असेल- नसेल ते सोडून त्याच्यामागे येण्याचे, आणि काय प्रतिसाद, "ते लागलेच सर्वकाही सोडून त्याला अनुसरले(मत्तय :२०,२२).
येशूने ज्या माणसांना बोलावले ते काही महान विद्वान नव्हते किंवा संपत्तीने देखील श्रीमंत नव्हते. ते साधे- भोळे मासे पकडणारे कोळी होते. बहुसंख्य अभ्यासकांच असं मत आहे की चांगला किंवा अस्सल कोळी ह्याच्या अंगी खालील गुण असणे गरजेचे आहे जेणेकरून तो चांगला मासे पकडणारा बनू शकतो:
) सहनशीलता/ चिकाटी: जोपर्यंत मासा गळाच्या आमिषाला बळी पडत नाही तोपर्यंत सहनशील असणे गरजेचे आहे. जर मासे धरणारा चंचल उतावळा असेल तर तो कधीच चांगला मच्छीमार बनू शकत नाही. हीच पद्धत माणसे धरताना देखील वापरावी लागते.
) अथक प्रयत्नशील: त्याने कधीही खचून जाता पुन्हा-पुन्हा प्रयत्न करत राहिले पाहिजे.
) धैर्य: तो नेहमी धोका पत्करायला तयार असला पाहिजे. समुद्राच्या लाटा वादळांना घाबरता अथांग सागरात आपल्या लहानश्या नावेणे त्याला किनारा गाठता आला पाहिजे. लोकांच्या बाबतीत देखील हेच आहे, सत्य हे कटू असते आणि लोक जेव्हा त्या सत्याचा प्रतिकार करतात तेव्हा अडचणीत उभे राहून त्याला सामोरे जाणे हे एका चांगल्या मच्छीमाराचे लक्षण आहे.

बोधकथा:

१)        इटलीमध्ये असिसी ह्या शहरात ११८२ मध्ये एका मुलाचा जन्म झाला.घरी गर्भश्रीमंती असूनदेखील हा मुलगा आईने देलेल्या सु-संस्कारामुळे चांगला घडला परंतु मित्रांबरोबर नाच, गाणी, मौजमजा आणि मेजवान्या ह्या सा-या गोष्टीत तो रमून जात असे. वडिलांचे कपडयांचे मोठे दुकान होते, त्या दुकानात तो आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करी व मिळालेल्या पैशातून चैनबाजी करी परंतु त्याला आपले संपूर्ण जीवन ह्या दुकानातच घालवायचे नव्हते तर पराक्रमी योद्धा बनून मोठे नाव कमवायचे होते म्हणून तो महागुरूंच्या संस्थानाचे संरक्षण करणा-या गॉथीयर राजाला सामील झाला.
युद्धासाठी प्रवास करत असताना तो वाटेत आजारी पडला व रात्री तो झोपला असताना आपल्याशी कोणीतरी बोलत आहे असा त्याला भास झाला, तो आवाज त्याला विचारात होता, "धन्यापेक्षा सेवक उदार बनू शकतो का?" "कधीच नाही" त्या युवकाने उत्तर दिले, "तर मग सेवकाच्या मागे लागण्याचा खुळेपणा का करतोस", असे म्हणून तो आवाज बंद झाला. दुस-या दिवशी उठून देवच आपल्याशी बोलला अशी त्या युवकाला खात्री झाली व तो युवक असिसीला पुन्हा परतला व सैनिकी योद्धा बनण्याचे सोडून देवाराज्याचा योद्धा बनला.हा युवक दुसरा तिसरा कोणी नसून महान संत असिसीचा संत फ्रान्सिस होय. 
२)       `एक ख्रिस्ती सुशिक्षित मुलगी चांगल्या पदव्या घेऊन माहिती व तंत्रज्ञानाच्या(IT) कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होती. भरगच्च असा पगार हातात पडे तरी कोणतेच व्यसन तिच्या ठायी नव्हते. तिचा दिवस सुरु व्हायचा आणि नेहमीच्या कामा-काजात संपून जायचा, असा हा तिचा रोजचा जीवनक्रम चालू होता. चांगली नोकरी, चांगला पगार, चांगलं कुटूंब व चांगले मित्र-मैत्रीणी असूनदेखील ती तिच्या जीवनात आनंदी नव्हती. असं काहीतरी होतं ते तिला अस्वस्थ करून सोडत होतं, तिला आपले हे जीवन अपूर्ण किंवा अपूर्त वाटत होते. कशाचातरी तिला अभाव जाणवत होता. तिला हे दररोजचे जीवन स्वस्थ बसू देत नव्हते.
तिने हे सर्व आपल्या आईला सांगितले. तिने देखील तिला प्रार्थना करून प्रभूचा सल्ला घेण्यास सांगितले. तिने प्रभूचा आवाज ऐकला व त्याच दिवशी आपली चांगली नोकरी सोडून आपल्याकडे असलेले सर्वकाही व बैंकेची सर्व पुस्तके आईच्या हाती देऊन धर्मभगिनी होण्यासाठी कॉनवेन्टचा रस्ता धरला. दुनियेची सर्व सुखे सोडून, गरिबांची व गरजुंची सेवा करण्यासाठी व स्वर्गीय सुख मिळविण्यासाठी तिने प्रभूचा मार्ग निवडला व आज ती तरुणी प्रभू येशूची अनुयायी होऊन आपले जीवन इतरांच्या सेवेसाठी समर्पित करून जगत आहे.

मनन चिंतन:
ह्या आधुनिक युगात आपण बघतो की भरपूर लोक पश्चिमात्य देशांतून भारतात गुरूच्या शोधात येत आहेत, जेणेकरून त्यांच्या वस्तूंनी भरलेल्या परंतु मुल्यहीन किंवा अर्थहीन झालेल्या जीवनाला अर्थ मिळू शकेल. त्यांच्यामध्ये कोणत्यातरी प्रकारची जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी एका गुरुकडून दुस-याकडे जातात आणि जर ते का शोधण्यास यशस्वी झाले तर ते त्याला चिकटून राहतात व आपले संपूर्ण जीवन त्याच्याबरोबर निष्ठेने आणि भक्तीने घालवतात. हीच रीत इस्त्रायली लोकांमध्ये होती. जर त्यांना कोणाचा शिष्य व्हायचे असेल तर ते प्रतिष्ठीत व पवित्र असणा-या गुरूचा शोध घेत व त्याचा शिष्य बनून ज्ञान प्राप्त करत असत. परंतु येशूच्या येण्याने हे दृश्य बदलून गेलं. जे बोलाविलेले पहिले शिष्य होते ते येशूच्या शोधात गेले नाहीत तर येशू ख्रिस्ताने स्वतः पुढाकार घेऊन त्यांना त्याच्या मागे येण्यास आमंत्रण दिले. येशूने जेव्हा त्यांना आमंत्रण दिले तेव्हा येशूने त्यांना असे सांगितले नाही की, "तुम्हाला माझ्या मागे यायला आवडेल का? तुम्ही ह्याचा आठवडाभर विचार करा आणि मग सांगा, जर तुम्हाला आवडलं तर हा माझा पत्ता आहे ह्या पत्त्यावर येऊन माझे शिष्य बना." नाही, ह्याप्रकारचे काहीच येशूने त्यांना सांगितले नाही. उलट फक्त एका वाक्यात ते म्हणजे, "माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन." एवढेच बोलून त्यांना पाचारण केले.
चार ही भावंडांनी कोणताच मागचा-पुढचा विचार न करता तसेच कोणताही प्रश्न न विचारता सर्वकाही सोडून ते येशूला अनुसरले, जसं काही त्यांना अगोदरच माहीत असावं, "ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे त्यांना येणा-या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही"(मार्क ९:२९-३०). पण ही त्यांची अपेक्षा नव्हती तर येशूने दिलेले आश्वासन होते. फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर येणा-या सर्व पिढ्यांसाठी देखील हे तितकेच मौल्यवान आहे. ह्या घटनेनंतर ते काही मासे धरणारे उरले नाहीत तर माणसे धरणारे बनले. ते येशूच्या मिशनकार्यात त्याचे सहकारी झाले. बहुतेक लोकांचा असा गैरसमज आहे की येशूच्या मिशनकार्यात सहभागी होणे म्हणजे फक्त धर्मगुरू किंवा धर्मभगिनी होणे किंवा चर्चच्या कोणत्यातरी संघटनेमध्ये सामील होणे परंतु तसे काहीच नाही. हि परमेश्वराची इच्छा असते किंवा त्याला वाटते की आपण त्याचे अनुयायी असले पाहिजे मग आपण कोणीपण का असेनात, त्याचा पाठलाग करण्यासाठी तो आपणा प्रत्येकाला हाक देतो. जर आपण मच्छीमार असू तर तो म्हणतो: "या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे बनवीन." जर आपण शिक्षक असू तर तो म्हणतो: "मला अनुसरा म्हणजे स्वर्गराज्याची रहस्ये उलघडून मी ती इतरांस कशी शिकवावी ह्याचे तुम्हास ज्ञान देईन." जर आपण लेखक, वैद्य, वकील, कवी किंवा परिचारिका असू तर तो सांगतो: "या म्हणजे मी तुम्हाला तुमचा व्यवसाय एका नवीन पद्धतीने आणि स्वर्गराज्याच्या दृष्टीने करायला शिकवीन." आपण ह्याच्यासाठी तयार आहोत का 
परमेश्वराची शक्ती अतुल्य आहे. त्याला कोणत्याही मदतीची गरज नाही. पण मानवावर तो प्रीती करतो, इतकी की, तो आपल्याला त्याची मुले म्हणतो आणि तो आपला पिता बनतो. जशी मुले आईबापांबरोबर काम करतात, तसेच आपणही त्याच्याबरोबर काम करावे अशी देवाची अपेक्षा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या कार्यासाठी प्रेषितांची निवड केली, संत पौल सारख्या महान सुवार्तिकांनी ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. आज ख्रिस्तसभा पाचारण रविवार साजरा करीत आहे. ख्रिस्ताठायी बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येकाला ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, परंतु मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो का? आपल्या गुणवत्तेवरून तो आपणाला बोलावत नाही तर बोलावून आपणाला गुणवान बनवतो कारण "आपल्या योजना त्याच्या योजना नाहीत"(यशया ५५:८-९), त्याला सर्वकाही ठाऊक आहे की आपणास काय उपयुक्त आहे. स्त्री असो व पुरुष तो प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार बोलावतो मग ते काही वैवाहीक जीवन असो वा वैराग्याचे, प्रत्येकाच्या जीवनात तो रंग भरतो व ते रंग इतरांच्या जीवनात भरण्यासाठी आपणाला सज्ज बनवतो. जेव्हा परमेश्वर आपणाला बोलावतो तेव्हा कोणीही सांगू शकत नाही की मी अशक्त आहे. बायबल कितीतरी उदाहरणे दाखवते ज्यात देवाने अशक्त लोकांची निवड करून त्यांस सशक्त बनवले, उदाहरणार्थ: आब्राहाम जो वयाने प्रौढ होता, राहाब जी वैश्या होती, यिर्मया तर तरुण होता आणि जक्कय ठेंगणा होता.
आपण संदेष्टे आहोत संदेश नाहीत, परमेश्वर हा संदेश आहे.आपण आपला प्रचार न करता संदेशाचा प्रचार केला पाहिजे, जेणेकरून परमेश्वराची स्तुती होईल, म्हणून आजच्या ह्या रम्य दिवशी आपण स्वतःला विचारूया:
"जीवन सुंदर आहे, ते अधिक सुंदर बनविण्यासाठी
ह्या सुंदर जीवनाचा सुगंध इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी
सर्वांना ख्रिस्ताठायी परिपूर्ण जीवनाचा अनुभव देण्यासाठी
अंतकरणात ईश्वरी पाचारणाची ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी
मी तयार आहे का? प्रभूचा प्रकाश होण्यासाठी व इतरांना प्रकाशात आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे का? मी इतरांसाठी प्रकाश बनावे, मी इतरांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी, ख्रिस्ताची ओळख इतरांना करून दयावी व प्रभूच्या तारणदायी कृपेचे साधन बनावे ह्यासाठी आपणास कृपा मिळावी म्हणून विशेष प्रार्थना करूया, जेणेकरून आपण शिष्यांप्रमाणे आनंदाने गाऊ शकू:
"आम्ही शिष्य प्रभूचे,
एक शारिरी, एक आत्मा त्याच्या प्रतिछायेचे,
आम्ही शिष्य प्रभूचे."


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे पित्या, आम्हाला तुझे शिष्य बनव.
) ख्रिस्तसभेचे नेते ह्यांनी प्रभूचा प्रकाश अनुभवावा तोच प्रकाश इतरांना त्यांच्या शब्दांद्वारे कृतींद्वारे इतरांपर्यंत पोहचवावा जे अंधारात वाटचाल करत आहेत त्यांना प्रकाशाच्या मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
) जास्तीत जास्त लोक ख्रिस्ताच्या सुवार्तेचे साक्षीदार व्हावे, घर, कारखाने, कार्यालये यांचे मार्ग ख्रिस्ताचे मार्ग व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
) आज आपण आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्व नागरिकांना आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव व्हावी जेथे अन्याय, भ्रष्टाचार अत्याचार होत आहेत त्या विरोधात आवाज उठवावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
) प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी तरुण-तरुणींनी प्रभूची हाक ऐकावी त्याने दिलेल्या पाचारणाला होकार देऊन देवाराज्याची घोषणा सा-या जगभर करावी, प्रभूचा प्रकाश त्याची दया त्यांनी इतरांना दाखवावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
)आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभूचा आशीर्वाद यावा, आपले मानसिक शारीरिक आजार दूर व्हावेत, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती नांदावी आपण सर्वांनी आपल्या दररोजच्या जीवनात प्रभूचे शिष्य बनावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या वैयक्तिक खाजगी हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना करू या.