Thursday 30 November 2017

Reflections for the homily of First Sunday of Advent   (03-12-2017) By: Br Cedrick Dapki. 






आगमन काळातील पहिला रविवार



दिनांक: ०३-१२-१७
पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, ६४:२ब-७
दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९
शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७










“जागृत रहा कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही”


प्रस्तावना:

     आज पासून ख्रिस्तसभा आगमन काळाला सुरुवात करीत आहे. आगमन काळ म्हणजे प्रभू ख्रिस्त येण्याचा काळ. म्हणून आजची उपासना आपणास जागृत राहून  प्रभू येशूच्या आगमनाची आतुरतेने व पूर्ण तयारीने वाट पाहण्यास आमंत्रित करीत आहे.
     यशयाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की इस्रायल लोक हे बाबिलोनच्या बंदिवासातून मुक्त होऊन देवाची स्तुती गातात व आपल्या अपराधांची कबुली देऊन आपले तारण व्हावे म्हणून देवाला विनवणी करतात. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस उद्देशून म्हणतो की प्रभूच्या कृपेमुळे तुम्हांमध्ये भरभराट झाली आहे आणि हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. मार्कलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त हा आपणास सावध राहण्यास सांगत आहे, कारण तो कोणत्या घटकेस येणार हे कुणास ठाऊक नाही.   
     आजच्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण आपल्या पापांची आठवण करूया आणि ह्या आगमन काळात आपण सदैव जागृत राहून आपल्याला प्रभूच्या आगमनासाठी योग्य ती तयारी करता यावी म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, ६४:२ब-७

     यशया संदेष्टा आपणास सांगत आहे की प्रभू देव हा आपला स्वर्गीय पिता आहे. कारण जेव्हा इस्राएल लोक हे बाबिलोनच्या बंदिवासात होते तेव्हा त्यांची सुटका करणारा हा प्रभू होता आणि हाच प्रभू आपल्या लोकांना वाचवण्यासाठी व त्यांचे जीवन चांगले बनवण्यासाठी इस्राएलात परत येणार होता.  
     यशया संदेष्टा धरणी कंप, आवाज, वारा, वादळ आणि अग्नी अशा नैसर्गिक बाबींचा उल्लेख करून प्रभूच्या येण्याचे संकेत देतो. इस्राएली लोक सुद्धा अशा ह्या उल्लेखाने आनंदीत आहेत कारण धरणी कंप हा देवाची उपस्थिती दर्शवितो (निर्गम १९:१८). ह्याचा अर्थ असा की जेव्हा इस्राएल लोक देवाचा धावा करतील किंवा विलाप करतील तेव्हा प्रभू हा धरणी कंपाच्या रुपात त्यांच्या समोर प्रकट होईल. हे खरे आहे कारण यशया हा अध्याय ६४ मध्ये सांगतो की जो कोण प्रामाणिकपणाचे जीवन जगतो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो व त्याचा धावा करतो त्यांच्याबरोबर देव नेहमी असतो.

दुसरे वाचन: १ करिंथ पत्र १:३-९

     संत पौल करिंथकरास सांगतो की प्रभूद्वारे तुम्हांस खूप काही चांगली दाने   भेटली आहेत. ह्या दानांचा चांगला वापर करा कारण ही दाने तुम्हांला प्रभूच्या प्रेमामुळे भेटली आहेत. ही दाने तुम्हांस प्रभू येशू ख्रिस्त परत येई पर्यत आधार व शक्ती देणार कारण प्रभूचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे.

शुभवर्तमान : मार्क १३:३३-३७

शुभवर्तमानात प्रभू येशू आपणास सावध राहण्यास व सदैव तयारीत राहण्यास सांगत आहे. जागृत राहणे किंवा सावध राहणे हा ख्रिस्ताचा एक महत्वाचा मुद्दा होता. कोणतीही गोष्ट ही सावध राहून किवा जागृत राहून करणे महत्वाचे आहे. येशू ख्रिस्त नेहमी आपणास जागृत राहण्यास का सांगत आहे? कुणासाठी जागृत राहावे? व कशासाठी जागृत राहावे? ह्या सर्वांचे उत्तर फक्त येशू आहे. कारण येशू ख्रिस्त स्व:ताच्या येण्याची वाट पाह्ण्यासाठी आपणा सर्वांना जागृत राहण्यास सांगत आहे.
सावध व जागृत कसे राहावे हे स्पष्ट करण्यासाठी प्रभू एका व्यक्तीचा दाखला देतो, ज्यामध्ये तो त्यांचे घर कामगाराच्या हातात सोपवून त्याच्या प्रवासाला निघतो. परंतु तो कधी परत येईल हे कुणास ठाऊक नाही म्हणून त्याच्या कामगारांनी नेहमी सावध राहणे महत्वाचे होते.
     येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गीय पित्याकडे जाण्या अगोदर शिष्यास व आपणा सर्वांना एक कामगीरी सोपवली. तो परत येणार व नक्कीच येणार हे त्याने स्वत:हा सांगितले. परंतु, तो कधी येणार हे आपणास त्याने कधीच सांगितले नाही (मत्तय १६ :२७) का ? कारण आपण त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी जागृत व तत्पर असलो पाहिजे.

मनन चिंतन :

     आगमन म्हणजे एखादी व्यक्ती येणे किंवा एखादी गोष्ट येणे होय. अशा व्यक्तीची व गोष्टीची आपण आतुरतने वाट पाहत असतो. कारण त्यांचे आगमन आपल्याला आनंद, सुख व शांती देते.
ख्रिस्तसभा आज पासून आगमन काळाला सुरुवात करत आहे. आगमन काळ म्हणजे प्रभू येशू येण्याचा काळ. ह्या काळाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. आणि ह्या काळात आपण येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत आहोत. ह्या दिवसा पासूनच  आपण नाताळ सणाची तयारी करीत असतो. खरेदी कुठली करावी, पदार्थ कोणते बनवावे, गाईचा गोठा कसा करायचा, चांदनी कशी बनवायची ह्या सर्वांकडे आपले जास्त लक्ष असते. परंतु, ह्या सर्व तयारी मध्ये आपले महत्वाचे कार्य किंवा महत्वाची तयारी राहून जाते आणि ती म्हणजे आपली अंत:करणाची तयारी.
     येशूच्या आगमनाची वाट पाहणे म्हणजे आपली आध्यात्मिक तयारी करणे व अंतःकरण शुद्ध ठेवणे होय. आपल्या आत्म्याने ख्रिस्ताला स्वीकारावे म्हणून आपण जागृत राहिले पाहिजे. ह्या आगमन काळात आपला आत्मा किंवा हृद्य तयार केले पाहिजे कारण येशू कधी येईल आणि आपला आत्मा घेऊन जाईल हे आपणास ठाऊक नाही. हाच आजच्या पहिल्या रविवारचा उद्देश आहे की सर्वांनी स्वत:हाच्या आत्म्याची तयारी करा आणि जेव्हा आपण आपल्या आत्म्याची चांगली तयारी करू तेव्हाच येशू ख्रिस्ताची उत्तम अशी भेट ह्या नाताळच्या दिवशी होईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद: हे प्रभू, तुझे स्वागत करण्यास आमचे अंतःकरण शुद्ध ठेव.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू, व धर्म बंधू-भगिनी ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषविण्याची जबाबदारी सोपवली आहे. ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर असावे, पापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
३. जे लोक देऊळमाते पासून दुरावलेले आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेले आहेत, अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास त्याची शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि त्यांना आपल्या अपराधांची जाणीव व्हावी, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ह्या आगमन काळाची सुरुवात करत असताना आपण सर्वांनी ख्रिस्ताचे रूप गरीब, अपंग, लुळे, व बहिरे ह्या सर्वांमध्ये पाहावे व त्यांना त्यांच्या दु:खात व संकटात मदत करावी, ह्यासाठी लागणारी कृपा परमेश्वर चरणी मागुया.  
५. चैनबाजी, अहंकार किंवा आनंद म्हणजे शाश्वत जीवन नाही, ह्याची जाणीव आम्हांला व्हावी व अशा मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना  करू या.
६. आपला प्रभू सर्व जगाचा दया-सागर आहे, तो आपल्या विनंत्या ऐकतो म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी ठेऊ या.  


Thursday 23 November 2017

Reflection for the Homily of the Solemnity of Christ the King (26-11-2017) By Lavet Fernandes. 





ख्रिस्त राजाचा सण







दिनाक: २६/११/२०१७
पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६
शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६

प्रस्तावना :

     आज ख्रिस्तसभा ‘ख्रिस्त राजाचा’ सण साजरा करीत आहे. देऊळमाता आपल्याला आठवण करून देत आहे की, येशु ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृदयाचा, आत्म्याचा, शरीराचा आणि कुटुंबाचा राजा आहे. ख्रिस्ताचे राज्य हे अंनतकाळचे राज्य आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यहेज्केल सांगत आहे की, परमेश्वर स्वतः त्याच्या कळपाचा शोध करून त्यांचा मेंढपाळ होणार आहे. जी मेंढरे हरवली आहेत त्यांना परमेश्वर शोधून काढून त्यांच्या गरजांची पूर्तता करणार आहे. करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला ख्रिस्ताच्या विश्वासात खंबीर व दृढपणे उभे राहण्यास प्रोत्साहित करत आहे. कारण येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे व तो जेव्हा येईल तेव्हा सर्व लोक जिवंत होतील. तसेच मत्तयलिखीत शुभवर्तमानात संत मत्तय आपल्याला सांगतो की, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आपल्या दूतांसह वैभवाने व गौरवाने येईल व सर्वांचा न्याय करील.
     जर आपण न्यायाने व सत्याने जीवन जगलो तर आपण देवाचे राज्य ह्या भूतलावर प्रस्थापित करू शकतो. त्यासाठी लागणारी कृपा व आशिर्वाद आपण ह्या प्रभू भोजनविधीमध्ये सहभाग घेत असताना मागू या. 
   
पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७

     देवाचे लोक जणू मेंढरांचा कळप आहे अशी प्रतिमा पवित्र शास्त्रात आपल्याला आढळ्ते. या संदेशानुसार त्या वेळच्या मेंढळाची म्हणजे इस्रायलच्या अधिपतींची कानउघडणी केली आहे. कारण ते अति लोभी व स्वार्थी होते. आपल्या प्रजेची त्यांना काळजी नव्हती, शिवाय काही मेंढरे इतरांच्या जीवांवर जगून चांगली धष्टपुष्ट झाली होती. याचा अर्थ म्हणजे जे दिन दुबळे होते त्यांच्यावर अधिपतींनी जुलूम करून आपली सत्ता स्थापन केली आणि भरपूर धन मिळवले होते. ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन यहज्केल सांगतो की, न्यायाची पुन:स्थापना होईल.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६

     ‘जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून मरण पावले आहेत, त्यांचे पुनरुस्थान नक्कीच होणार आहे’ हे सांगताना ख्रिस्ताने या पुनरुस्थानाची सुरुवात करून दिली आहे असे पौलाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
     आदामाने जगात पाप व मरण आणले, आणि ख्रिस्ताने समेट, जीवन व पुनरुस्थान आणले. जे ख्रिस्तामध्ये मेले आहेत ते जिवंत होतील. कारण देवाचा पुत्र सर्वशक्तिमान व गौरवशाली आहे हे पृथ्वीवरील सर्व लोक कबुल करतील. अशा प्रकारचा विश्वास संत पौल आपल्या पत्रातून व्यक्त करत आहे.

शुभवर्तमान: मतय २५:३१-४६

     जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आपल्या वैभवाने येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसत्तावर बसेल व त्याच्यासमोर सर्व राष्ट्रातील लोकांना जमविले जाईल. त्यावेळी या परराष्ट्रीय लोकांचे दोन गट करण्यात येतील. त्याच्या उजवीकडे असलेल्यांना ख्रिस्त स्वतः आशिर्वादीत करेल व आपल्या राज्यात राहण्यासाठी त्यांचा स्वीकार करील.
इस्राएल लोकांचा ह्यामध्ये समाविष्ट केलेला नाही. महासंकटाच्या काळात  इस्राएल लोकांचा अतोनात छळ करण्यात येईल व त्यांची सर्व जगभर पांगापांग होईल.  या इस्राएल लोकांपैकी जे राजाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतील त्यांची स्थिती चांगली असेल. जे परराष्ट्रीय लोक अशांना आधार देतील, ते ख्रिस्ताच्या लोकांना मदत करणारे ठरतील व ख्रिस्त त्यांना नीतिमान मानेल. ते सर्वकाळ ख्रिस्त समवेत राहतील.
     जे इस्राएल लोकांना आश्रय देणार नाहीत ते डाव्या बाजूच्या गटात असतील. ते शेरडे असतील व शापग्रस्त ठरतील. जे ख्रिस्ताचा विरोध करतील, ते सार्वकालिक शिक्षा भोगण्यास पात्र ठरतील.

बोधकथा:

     एकदा एका सैनिकाला रोमन न्यायाधिशाच्या समोर आणण्यात आले. त्याचा गुन्हा असा होता की तो ख्रिस्ती होता. न्यायाधीशाने त्याला विचारले की, तू ख्रिस्ती आहेस का? त्या खिस्ती शिपायाने उतर दिले ‘होय’. न्यायाधीशाने त्याविषयी चौकशी केली व त्याला सांगितले की तू रोमन सम्राटाचा शत्रू आहेस. पुन्हा ख्रिस्ती सैनिकाने उत्तर दिले ‘नाही’. तेव्हा न्यायाधीशाने सैनिकाला सांगितले की तुम्ही रोमन सम्राटाच्या पुतळयाला धूप वाहा व त्याला नतमस्तक हो.
ख्रिस्ती सैनिकाने असे करण्यास ठाम नकार दिला. मी फक्त एकाच देवाची पूजा व आराधना करतो आणि तो देव येशू ख्रिस्त आहे. मी येशू ख्रिस्तावरच प्रेम करतो व त्याची आराधना करतो. त्याची जागा कोणिही घेऊ शकत नाही.
     रोमन न्यायाधीशाने सैनिकाला सांगितले की जर तुम्ही नकार दिला तर तुमचा शिरछेध्द करण्यात येईल. तुमचं डोक शरीरापासून अलग करण्यात येईल. ख्रिस्ती सैनिकाने पुन्हा धैर्याने उत्तर दिले की तुम्ही माझे डोके शरीरापासून अलग करू शकता परंतु, तुम्ही माझे हृदय येशू ख्रिस्तापासून दूर करू शकत नाही कारण येशू ख्रिस्त हाच माझा राजा आहे. तो माझे सर्वस्व आहे.

मनन चिंतन:

     येशू ख्रिस्त ह्या जगात लोकांसाठी देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला, जेणेकरून देवाचे राज्य लोकांच्या हृदयात स्थापन केले जाईल.
आपण आपल्या शक्तिशाली देवाला पुढील शब्दांत स्वागत केले पाहिजे. “अहो वेशिनों आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा”, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल (स्तोत्रसंहिता २४:७).
     येशू ख्रिस्ताच्या दुःखसह्नाच्या वेळी त्याला यहुदी राज्याच्या समोर आणण्यात आले. तेव्हा पिलात सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, ‘तू यहुद्याचा राजा आहेस काय’? येशूने उत्तर दिले, ‘मी राजा आहे असे आपण म्हणता’. येशूने उत्तर दिले, ‘माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही (योहान १८:३३-३६).
जर येशू ख्रिस्ताचे राज्य येथले नव्हते तर येशू ख्रिस्त कसा काय राजा आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य हे परलोकांसंबंधीचे व आध्यात्मिक राज्य आहे. दोन हजार वर्षापासून येशू ख्रिस्ताची राजवट सुरु झालेली आहे. प्राचीन कालखंडात ही राजवट सुरु झाली. मध्यम वयोगटातदेखील ही राजवट आधुनिक काळात चालू आहे. रोमन साम्राज्य जरी शक्तिशाली असले तरी त्याचे राज्य मोडकळीस आले. त्यांनी विविध प्रकारची शस्त्रे वापरली; तरी सुदधा त्याचं राज्य संपुष्टात आले. ब्रिटीश साम्राज्याला वाटत होते की त्यांनी सर्व जगावर राज्य करावे, परंतु आज हे राज्य एक छोटस राज्य किवा देश झाला आहे. फ्रेंच साम्राज्य सम्राट नेपोलियन नेतूत्वाखाली फार शक्तिशाली होता, परंतु आजच्या परिस्थितीत ही एक पुरातन गोष्ट बनली आहे. जे साम्राज्य येशू ख्रिस्ताने दोन हजार वर्षा पूर्वी स्थापन केले  ते अजूनपर्यंत वाढत आहे.
अ) आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या घरात बोलावतो परंतु हुदयात नाही.
आपण लूकच्या शुभवर्तमानामध्ये ऐकतो की, परुशी येशू ख्रिस्ताला त्याच्या घरी भोजनास बोलावतो, परंतु तो येशू ख्रिस्ताला अंत:करणाततून पाहुणचार करत नाही तर तो येशू ख्रिस्ताविषयी चुका किवा उणीवा शोधू लागतो. जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या घरी होता तेव्हा तिथे एक पापी स्त्री देखील उपस्थित होती. ती स्त्री तिथे आली व येशू ख्रिस्ताचे पाय पुसले आणि नंतर तिने पायावर सुगंधी तेल लावले. त्या स्त्री ने येशू ख्रिस्ताला तिच्या ह्रदयात स्वीकारले आणि तिला तिच्या पापांची क्षमा मिळाली.
आपण ही आपल्या जीवनात त्या परुशीप्रमाणे वागत असतो. पर्यायी आपण येशू ख्रिस्ताला आपल्या घरी बोलावतो. आपल्या अंगी फक्त येशू ख्रिस्ताचे नाव असते आणि आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. आपल्या घरात येशू ख्रिस्ताची चागली व हुबेहूब दिसणारी चित्रे असतात, परंतु ती फक्त आपली नजर वेधून घेतात आणि आपल्या घराचे सौदर्य वाढवतात. आपले त्यामागे खरे नाते जोपासलेले नसते. त्यामुळे माझ्या जीवनावर येशूच्या शिकवणीबद्द्ल काहीच परिणाम होत नाही.
परुशाने येशूकडून काहीच अपेक्षित केले नाही आणि त्याला काहीच मिळाले नाही. याउलट त्या स्त्री ने येशूकडून क्षमा मागितली आणि येशूने तिला क्षमा दाखवली. 
ब) आपण येशू ख्रिस्ताला आपल्या घरी तसेच आपल्या हृदयात देखील बोलवू शकतो.        येशू ख्रिस्त हा मेरी, मार्था व लाजरस यांचा देखील मित्र होता. त्यांनी नेहमीच येशू ख्रिस्ताला त्यांच्या घरी बोलावून त्याचा आपल्या हृदयात देखील स्वीकार केला. येशू ख्रिस्त त्यांच्या घरी मेजवानीस देखील जात होता; त्यांची ख्रिस्तामध्ये फार मोठी श्रद्धा होती. जेव्हा लाजरस मरण पावलेला होता तेव्हा मार्था येशूकडे येऊन सांगते की, प्रभुजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू ख्रिस्ताने नंतर लाजरसाला मरणातून उठवून त्यांच्या विश्वास वाढविला. ह्या कारणास्तव त्यांनी येशूला आपला रक्षणकर्ता मानले होते.
     येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर अमाऊसच्या रस्त्यावर जेव्हा शिष्य चालत होते तेव्हा त्यांना येशूचे दर्शन झाले. परंतु, त्यांना हे माहित नव्हते की हा येशू ख्रिस्त आहे. त्यांना वाटले की हा कोणी परकीय आहे. त्यांनी त्याला आपल्या घरी बोलावले परंतु हृदयात नाही. जेव्हा त्यांना हे कळून चुकले की हा येशू ख्रिस्त आहे. तेव्हा त्यांच्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत होती (लूक २४:३२). ते फार आनंदित व उत्साहित झाले होते.
     आपल्या जीवनातही आपण येशू ख्रिस्ताला आपल्या घरीच नव्हे तर आपल्या हृदयात बोलावले पाहिजे. जेणेकरून आपले जीवन बदलून जाईल आणि आपण सर्वजण एक धार्मिक व अध्यात्मिक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, तुझे राज्य आम्हामध्ये येवो.

१. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु, धर्मबंधू व धर्मभगिनी ह्या सर्वांनी आपल्या कार्याद्वारे व शुभवार्ताद्वारे ख्रिस्त राजाची सुवार्ता घोषित करून सर्वत्र ख्रिस्ताच्या प्रेमाचे, शांतीचे व सत्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. समाजामध्ये ज्या लोकांना न्याय मिळत नाही अशा लोकांना ख्रिस्त राजाच्या कृपेने व आशीर्वादाने न्यायाचे वरदान मिळावे. त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबले जावे आणि त्यांना समाजाने सन्मान व आदर देऊन त्यांचा समाजामध्ये स्वीकार करण्यात यावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्यांचा आदर्श घेऊन, त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे व आपल्या देशाची व लोकांची नि:स्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना ख्रिस्तराजाचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करू या.


Thursday 16 November 2017

Reflections for the homily of 33rd Sunday in Ordinary Time  (19-11-2017) by Br Camrello D'Mekar. 






सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार




                             


                                                                                                                                           दिनांक: १९/११/२०१७
पहिले वाचन: नीतिसूत्रे: ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र: ५:१-६
शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०


“तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास”

प्रस्तावना:
     आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला आपले मानवी जीवन व परमेश्वराने आपल्याला सोपविलेल्या महत्वाच्या जबाबदारीविषयी सांगत आहे.
आजचे पहिले वाचन नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून घेतले आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे, सामाजिक व्यवहार कसे पार पाडावेत आणि नितीचे जीवन कसे जगावे इत्यादी बाबी स्पष्ट करण्यासाठी, उपदेशक एका आदर्श व सद्गुणी स्त्रीचे व्यक्तीमत्व आपल्यासमोर मांडत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल लोकांना प्रभू येशूच्या पुनरागमनाच्या वेळेची खात्री अपेक्षित नाही, ह्याविषयी बोध करीत आहे. मत्तयलिखीत शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त ‘रुपयांच्या दृष्टांताद्वारे’ आपणास विश्वासामध्ये राहण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
आजच्या ह्या पवित्र ख्रिस्तयागात सहभागी होत असताना देवाने आपल्याला बहाल केलेल्या लहानशा लहान गोष्टीला प्रामाणिक राहून, ख्रिस्तसभेचे कार्य आपल्या कृत्याद्वारे आणि शब्दाद्वारे जगभर पसरावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: नीतिसूत्रे ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१

‘नीतिसूत्रे’ आणि ‘ज्ञानसुत्रे’ ह्या पुस्तकांत शहाणपणाला, सुज्ञतेला (wisdom) व्यक्तीस्वरूप दिले आहे. निर्मितीच्या कार्यातही सुज्ञता देवाला सहकार्य करीत होती. इब्री भाषेत सुज्ञतेसाठी ‘Hokmah’ हा शब्द असून, ग्रीकमध्ये ‘Sophia’ हा शब्द आहे. हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. नीतिसुत्रांच्या पुस्तकात स्त्रीरूप दिलेली ज्ञानसंपदा (Lady wisdom) मार्गदर्शन करते. पुस्तकाचा शेवट सुज्ञ अशा स्त्रीच्या उदाहरणाने होतो. नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचे श्रेय शलमोनला दिलेले आहे. कारण शलमोन हा सुज्ञतेचा प्रेमी म्हणून ओळखला जात होता.
पुढील उतारा हे एक गीत असून त्यामध्ये आदर्श स्त्रीचे वर्णन करण्यात आले आहे. येथे ही स्त्री आपल्या घरातील कुटुंबियांसाठी अन्न-वस्त्राची तरतूद करत आहे, असे दाखविण्यात आले आहे. तीची ही जबाबदारी एवढ्यापुरतीच मर्यादित नसून,  घराबाहेर आणि इतर व्यवसायातही तिची जबाबदारी व सहभाग दिसून येत आहे. तसेच, ती गरजवंतांची काळजी घेते आणि निरक्षितांना सुशिक्षित करण्याची सेवा करते असे आदर्श जीवनाचे वर्णन नीतिसूत्रे ह्या पुस्तकात करण्यात आले आहे.

दुसरे वाचन: थेस्सलननीकाकरांस पहिले पत्र ५: १-६ 

     संत पौल थेस्सलननीकाकरांस पाठविलेल्या पहिल्या पत्रात सांगतो की प्रभूचा दिवस येणार आहे. हा दिवस एक दिवस नसून तो एक विशिष्ट काळ आहे. या काळात देव जगाचा न्याय करील व ख्रिस्ताद्वारे आशीर्वादित करेल. कोणाला कल्पना नसताना ख्रिस्त अंतराळात येईल व त्यानंतर लगेच या काळाची सुरुवात होईल. थेस्सलनीकाकरांस त्यांच्या विश्वासामुळे याविषयीचे शिक्षण मिळाले. म्हणून ते  अंधारात न राहता (अज्ञानी न राहता) ते प्रकाशात चालू लागले. त्यांना सत्याची जाणीव झाली.
येशूच्या दुसऱ्या आगमनाचा प्रश्न वाचकांच्या चिंतेतून पुढे आला आहे. ही घटना जेव्हा घडेल तेव्हा आपली तयारी असेल का? अशी शंका लोकांना सतावत होती. संत पौल लोकांना सांगतो की प्रभूचे येणे हे रात्री अचानक येणाऱ्या चोरासारखे असेल. हे त्यांना अनपेक्षित आणि न रुचणारे असेल.

शुभवर्तमान: मत्तय २५:१४-३०

     देवाने प्रत्येकाला त्याची सेवा करण्यासाठी शक्ती व निरनिराळी क्षमता दिली आहे. तसेच काही प्रमाणात संपत्तीसुद्धा दिली आहे. शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताने ‘रुपयांच्या दृष्टांताद्वारे’ विश्वासू व प्रामाणिक कसे राहायचे ह्याचे महत्व दाखवून दिले आहे.
परदेशी जाणाऱ्या मनुष्याने आपल्या दासांना आपली मालमत्ता वाटून दिली. एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. पाच हजार रुपये म्हणजे ५००० चांदीची नाणी. १००० चांदीच्या नाण्यांचे वजन सुमारे ३० किलो असे. प्रत्येक दासाची बुद्धी व क्षमता किती होती हे त्या मनुष्याला ठाऊक होते. ज्यांना ५००० व २००० चांदीची नाणी मिळाली त्यांनी चांगला व्यापार केला व प्रत्येकाचे भांडवल दुप्पट झाले. हे पाहून त्या धन्याला त्यांचा विश्वासूपणा समजला. त्यांनी आपल्या पैशाचा व वेळेचाही विश्वासूपणे उपयोग केला होता. त्यांच्या विश्वासूपणामुळे ते अधिक जबाबदारी घेण्यास पात्र ठरले. ज्याला १००० रुपये मिळाले होते त्याने व्यापार न करता जमिनीत लपवून ठेवले. ह्या कारणामुळे तो एकनिष्ठ व विश्वासू नव्हता हे दिसून येते. 
मनन चिंतन:

आपल्याला कोणीतरी बक्षीस आणले तर ते घेण्यासाठी आपण लगेच हात पुढे  करतो. हातात घेतल्याशिवाय ते बक्षीस आपल्या मालकीचे होत नाही. ते आपल्यासाठीच असेल, आपले नावही त्यावर लिहिलेले असेल, तरीदेखील ते स्वीकारल्याशिवाय आपल्याला मिळत नाही.
पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने आपले तारण झाले आहे. हे देवाचे आपल्यासाठी दान आहे. हे दान विश्वासाने स्वीकारले, तरच ते आपल्याला मिळेल आणि त्याबरोबरच सर्व आध्यात्मिक आशिर्वादही मिळेल. या दानाचा अव्हेर करणाऱ्या माणसाला तारणाची आशा नाही, कारण तारण दुसऱ्या परमेश्वराशिवाय इतर कोणाकडूनही होऊ शकत नाही. परमेश्वराशिवाय आपल्या तारणासाठी दुसरी व्यक्तीचे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.
दररोजच्या जीवनात अनेक प्रसंगी आपण अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतो. आपण रात्री झोपतो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण उठणार या विश्वासाने आपण डोळे मिटतो. असा विश्वास नसता तर कोणालाही शांत झोप लागली नसती. एखाद्या नेमून दिलेल्या तारखेला वार्षिक परीक्षा सुरु होईल असे जाहीर झाले म्हणजे विद्यार्थी त्याप्रमाणे तयारी करू लागतात. ठरल्या दिवशी परीक्षा होणारच या विश्वासाने ते तयारीला लागतात. मनुष्याला विश्वास परका, अनोळखी आहे असे मुळीच नाही.
देवाचे अचूक पवित्र वचन या विश्वासाचा आधार आहे. विश्वासाचे दोन प्रकार आहेत: बौद्धिक विश्वास आणि अंतकरणापासूनचा विश्वास. पवित्र शास्त्रातील गोष्टी व तत्वे चांगली आहेत असे मानणे हा बौद्धिक विश्वास होय. अंतकरणापासूनचा विश्वास म्हणजे पवित्र शास्त्रातील गोष्टी व तत्वे यांचे सत्य स्वीकारून त्यावर अवलंबून राहणे होय.
विश्वासाचा उगम
     विश्वास हा त्रैक्य देवाचे दान आहे. ‘कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे’ (इफिस २:८). ‘आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे’ (इब्री १२:२). देवाचे वचन ऐकल्याने विश्वास वाढतो व बळकट होतो. केवळ  विश्वासामध्ये काही लाभ आहे असे नाही तर ख्रिस्त माझा तारणारा आहे असा विश्वास धरणे लाभाचे आहे. ख्रिस्ताशिवाय विश्वासाला किंमत नाही. विश्वासाने आपले तारण होते. विश्वासाने तारणाचे सर्व आशीर्वाद प्राप्त होतात. जो विश्वास ठेवीत नाही त्याला तारणाची आशा नाही.
परमेश्वराने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला लोकांचे तारण करण्यासाठी जगात पाठविले. आजच्या जगात माणूस इतका स्वार्थी झाला आहे की त्याच्याकडे देवाशी बोलायला दोन मिनटे सुद्धा नाही.
     जगात असे भरपूर लोक आहेत की ज्यांच्याजवळ पैसा, गाडी आणि बंगला आहे. तरीसुद्धा ते दुखी आहेत. ते आनंदी नाहीत. त्यांचाकडे एवढी संपत्ती असूनसुद्धा त्यांना पाहिजे ते मिळत नाही. तर हे सर्व का होते? ह्या सर्वांचे मूळ कारण म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नाही. माणूस संपत्तीच्या आहारी गेल्यामुळे त्याला देवाचा विसर पडला आहे. पती-पत्नीमध्ये भांडण, संशय, प्रियकर आणि प्रेयसीमध्ये ब्रेकअप, कुटुंबामध्ये भांडणे आणि मारामारी हे सर्व का होते? ह्या सर्व गोष्टींचे कारण म्हणजे त्याचा एकमेकांवर असलेला अविश्वास. प्रार्थनेत, मंदिरात, चर्चमध्ये लोक नेहमी काय मागत असतात हे तुम्हाला माहित आहे का? ते म्हणतात. ‘हे देवा, मला काहीच समस्या, अडचणी नको; मला सुख, शांती दे; पैसा  दे; मला कुठलाच आजार नको; नेहमी माझे चांगले होऊ दे. अशी आहे माणसाची वृत्ती.
     आजच्या शुभवर्तामानामध्ये आपण पाहतो की परदेशी जाणाऱ्या एका मालकाने आपल्या तीन नोकरांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवली. त्याने आपली मालमत्ता त्यांच्यावर का सोपवली असेल? कारण त्याला त्यांच्यावर विश्वास होता. त्याने एकाला पाच हजार, दुसऱ्याला दोन हजार आणि तिसऱ्याला एक हजार दिले होते. त्यांच्या योग्यतेप्रमाणे देऊन तो परदेशी गेला.

बोधकथा:

एक राहुल नावाचा मुलगा असतो. MBA पास होऊन सुद्धा त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. एक दिवस असाच वर्तमानपत्र वाचत असताना त्याला सरकारी नोकरीचा प्रस्ताव आढळून आला. त्याने ठरवले की आपण ह्या मुलाखतीसाठी जायचे. नेहमी प्रमाणे तो सकाळी उठला. देवासमोर उभा राहिला आणि देवाला बोलला की, हे देवा, खूप मेहनत करून आज मी इतपर्यंत पोहोचलो आहे. आज मला साथ दे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू माझा साथ देशील आणि तो मुलाखतीसाठी जातो. मुलाखतीला गेल्यावर त्याला समजते की तिकडे पुष्कळ विद्यार्थी लाच देवून आले होते. कोणी खासदाराच्या मदतीने, कोणी आमदाराच्या मदतीने आणि कोणी पोलिसांना लाच देऊन आले होते. पण राहुलने त्याचा देवावर असलेला विश्वास सोडला नाही. त्याने त्याच्या मनात विचार केला की ज्याचे कोणी नाही त्याचा परमेश्वर आहे. मुलाखत देऊन सर्व विध्यार्थी येत-जात होते. नंतर राहुलची मुलाखतीसाठी जाण्याची वेळ आली. तो मुलाखतीसाठी मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने मॅनेजरला स्वत:विषयी सांगितले आणि मॅनेजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे आणि अचूक दिली. नंतर शेवटी मॅनेजरने त्याला एक प्रश्न केला. ‘राहुल, मी मान्य करतो की तुझा MBA चा सर्व अभ्यासक्रम चांगला आहे. तू तर विज्ञानामध्ये (science) अव्वल दर्जाचा आहेस. पण तू कोणाला लाच देऊन ह्या मुलाखतीसाठी आला आहेस का? त्यावर राहुल थोडा शांत झाला आणि त्याने मॅनेजरला म्हटले, ‘मी कोणालाच पैशे किंवा लाच दिली नाही. मी सकाळी जेव्हा घरातून निघालो तेव्हा माझी आई बोलली, मुलाखतीला जाण्यापूर्वी देवाच्या पाया पड आणि देवाचा आशीर्वाद घे. मी तर फक्त देवाचे नाव घेऊन आलो आहे. माझ्याकडे लाच देण्यासाठी एकही पैसा नाही. आणि माझी कोणत्याही राजकीय मंत्र्यासोबत ओळख सुद्धा नाही. कारण मला माहित आहे की ज्याचं कोणीही नसते त्यांचा परमेश्वर असतो. त्यावर मॅनेजर त्याला म्हणाला, आजपर्यंत ह्या पंधरा वर्षात माझ्याकडे जेवढे मुलाखतीसाठी आले होते ते कुणाच्यातरी मदतीने आले होते. आज पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये असे झाले आहे की जो देवाच्या मदतीने आला आहे. मुलाच्या ह्या विश्वासामुळे मॅनेजरने त्याला नोकरी दिली.
देवाची मानवजातीवर असलेली प्रीती अपार आहे. त्याच्या प्रेमाला सीमा नाही. परंतु, जेव्हा आपण देवाच्या प्रेमाला अनुसरतो आणि जीवनात जास्तीत जास्त चांगले काम करण्याची जबाबदारी पार पाडत नाहीत, तेव्हा आपला देवावर असलेला विश्वास जणूकाही उन्हामध्ये ठेवलेल्या मेणासारखा विरघळत जातो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला विश्वासाचे वरदान दे.

१. आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरु, व्रतस्थ जीवन जगणारे धर्मबंधू आणि धर्मभगिनी ह्यांनी स्वत:च्या जीवनाद्वारे लोकांच्या आध्यात्मिक आणि कौटुंबिक गरजा पूर्ण कराव्यात आणि देवाने सोपविलेले कार्य पूर्णत्वास न्यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या धर्मग्रामातील लोकांसाठी प्रार्थना करू या. आपण सर्वजण एकमेकांबरोबर शांततेने व प्रेमाने राहावे आणि आपल्या शेजाऱ्यावर निस्वार्थी मनाने प्रीती करावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
३. आपले जीवन हे परमेश्वराची देणगी आहे. हे जीवन फुलविण्यासाठी परमेश्वराची उपासना करून त्याच्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आपले भाऊ-बहीण व नातेवाईक जे आपल्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात गेले आहेत, त्यांना देवाचा प्रकाश लाभावा व जे कोणी मरणाची वाट पाहत आहेत त्यांनी आपला आत्मा शुद्ध करून देवाच्या कृपेची याचना करावी म्हणून प्रार्थना करू या.  
५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday 9 November 2017

Reflection for the homily of 32nd Sunday in Ordinary Time (12-11-2017) by Br. Brandon Noon.







सामान्य काळातील बत्तीसावा रविवार


दिनांक: १२-११-२०१७
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८
शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३





"सतत जागृत राहावे व प्रभूची वाट पाहावी"

प्रस्तावना:


     आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणा सर्वाना प्रभूच्या आगमनासाठी सतत जागृत राहण्यास आमंत्रित करीत आहे.
     शलमोनाचा ज्ञानग्रंथ हे पुस्तक आपल्याला सांगते की, ‘ज्ञान हे परमेश्वरामध्ये आहे आणि हे मिळविण्यासाठी आपण देवाच्या सानिध्यात राहणे गरजेचे आहे. तसेच, आजच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानात आपण ‘दहा कुमारींचा दृष्टांत’ ऐकणार आहोत. ह्या दृष्टांतात पाच शहाण्या कुमारींच्या पेटत्या दिव्यांमुळे त्यांना प्रभू पहावयास मिळाला. परंतु, इतर पाच कुमारी ज्या तेल विकत आणायला गेल्या होत्या, त्यांना प्रभूचे दर्शन झाले नाही कारण त्यांनी प्रभूच्या आगमनासाठी पुरेशी तयारी केली नव्हती.      
आपणही प्रभूच्या येण्याची वाट जागृतेने पाहायला हवी कारण प्रभू येशू कोणत्या क्षणाला येईल हे आपणास ठाऊक नाही. म्हणून आजच्या ख्रिस्तयागात सहभागी होत असताना, आपण सतत जागृत राहावे व प्रभूची वाट पाहावी, ह्यासाठी लागणारी कृपा व शक्ती प्रभूकडे मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६

     शलमोनाचा ज्ञानग्रंथ हे पुस्तक आपल्याला ज्ञानाबद्दल सांगत आहे. ज्ञान तेजोमय आहे. त्याची आवड धरणाऱ्यांना ते सहज लाभते. त्याचा शोध घेणाऱ्यांना ते सापडते. जो खऱ्या अंतकरणाने ज्ञानाचा शोध घेतो, त्याच्यापासून हे ज्ञान दूर ठेवले जाणार नाही. जो सकाळी लवकर उठून ज्ञानाचा शोध करील त्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. जो चिंतनामध्ये ज्ञानाविषयी विचार करील, त्याला ते अवश्य सापडेल.  अशा प्रकारचा बोध आपल्याला शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून होत आहे.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८

     थेस्सलनीका येथील ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये ख्रिस्ताच्या परत येण्यासंबधात चुकीच्या कल्पना होत्या म्हणूनच ते अस्वस्थ झाले होते. ख्रिस्ताचे पुनरागमन अगदी लवकरच होणार ह्यामुळे मरण पावलेल्या लोकांचे काय होणार?, हीच चिंता त्यांना सतावत होती. त्याचे गौरवी आगमन व राज्य यांच्यामध्ये समाविष्ट झालेल्या लोकांना कोणता वाटा असणार? ख्रिस्त या पृथ्वीवर परत येणार, परंतु जे प्रियजन ख्रिस्तामध्ये महानिद्रा घेत आहेत, त्यांनाही देव त्याच्याबरोबर परत आणणार आहे. कारण जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते एकदिवस सर्व ख्रिस्ताबरोबर उठतील असा संदेश संत पौल थेस्सलनीकाकरांस देत आहे.

शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३

            स्वर्गाचे राज्य दहा कुमारी सारखे आहे. ज्या दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या, त्यात पाच शहाण्या व पाच मूर्ख होत्या. जेव्हा वर आला तेव्हा त्या दिवे नीट करू लागल्या. परंतु, मूर्ख कुमारींच्याकडे जास्त तेल नव्हते म्हणून फक्त शहाण्या कुमारी मध्ये गेल्या. येथे ‘वर’ ह्याची तुलना प्रभू येशूशी करण्यात आली आहे व दहा कुमारींची तुलना आपल्याशी करण्यात आली आहे.

मनन चिंतन:

     जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी वेळेवर येत नाही किंवा जर एक वाजता येणार असेल तर आपण घड्याळाकडे बघून दरवाजात वाट बघत असतो. आपल लक्ष फक्त आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या येण्याकडे असते. तसेच जेव्हा मासेमारी करणारा बांधव मासेमारीसाठी खोल समुद्रात जातो व जर तो पाच किंवा सहा दिवसात परत आला नाही तर त्याचे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत असतात. जोपर्यंत मासेमारी करणारा बांधव घरी येत नाही तोपर्यंत त्याची घरची माणसे वाट बघत असतात.
     येशू ख्रिस्त आपणास आजच्या शुभवर्तमानाद्वारे सांगत आहे की, आपणही सर्वांनी जागृत राहायला हवे कारण येशू ख्रिस्त कधी येणार यांची आपणाला कल्पना नसते.  आजच्या ‘दहा कुमारींचा दृष्टांत’ ह्या दाखल्यात आपल्याला दहा कुमारींविषयी सांगितले आहे. ह्या दाखल्यात आपण पाहतो की, पाच शहाण्या व पाच मूर्ख कुमारी 'वर' येण्याची वाट पाहत होत्या. जेव्हा वर येण्याची वेळ झाली तेव्हा मूर्ख कुमारींच्याकडे पुरेशे तेल नव्हते. फक्त शहाण्या कुमारी ज्यांचाकडे पुरेसे तेल होते, त्याच वराला भेटू शकल्या. त्यांची वराशी गाठ झाली. परंतु, ज्या कुमारी तेल आणायला गेल्या होत्या त्यांची वराशी भेटू होऊ शकली नाही. त्यांना वराला पाहायला मिळाले नाही. आपण दैनंदिन लग्नाविषयी विचार न करता स्वर्गीय लग्नाविषयी मनन चिंतन करत आहोत. ‘येशू ख्रिस्त’ हा खरा वर आहे व आपण त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत. आपणा सर्वांना बाप्तिस्माद्वारे लग्नाचे आमंत्रण दिले आहे. बाप्तिस्माच्या दिवशी आपल्याला विश्वासाचे निमंत्रण दिले आहे. व आपण जसे मोठे होतो, तसा आपला विश्वास वाढायला हवा. आपणा सर्वाना ठाऊक आहे की, आपले ध्येय स्वर्ग सुखाकडे आहे. आपण आतापासूनच तयारी करायला हवी. पंरतु, आपण याची तयारी करतो का? आपण सर्वजण आपापल्या जगात सर्वजण भाबांवून गेलेलो आहोत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात भरकटून गेलेलो आहोत व ख्रिस्ताला विसरलेलो आहोत. आपल्यामधील काहीकजण रविवारचे ख्रिस्ती आहोत, काहीजण फक्त सणाचे तर काहीकजण वर्षातून एकदाच मिस्साला येत असतो. येशू ख्रिस्त आपणास पाच मूर्ख व पाच शहाणे कुमारिकांचे उदाहरण देऊन सांगत आहे की, तुम्ही सुद्धा शहाण्या कुमारीसारखे सदैव जागृत किंवा तत्पर राहा. कारण येशू ख्रिस्त कोणत्या क्षणाला, कोणत्या वेळेला किंवा कोणत्या दिवशी येईल हे आपल्याला ठाऊक नाही. म्हणून आपण सदैव जागृत राहणे अत्यंत गरजेचे आहे. आपण सदैव जागृत राहणार कसे? तर आपण रोज घरी रोझरीची प्रार्थना करायला हवी, बायबल वाचन करायला हवे. शक्य झालं तर रोज मिस्साबलीदानात भाग घ्यायला हवा नाहीतर निदान रविवारच्या मिस्साला यायला हवे. ह्याद्वारे आपण येशूच्या सानिध्यात राहू व येशु येईल तेव्हा तो आपणास ओळखून स्वर्गामध्ये त्याच्याबरोबर प्रवेश देईल. जर आपण असे केले नाही तर आपली मूर्ख कुमारीसारखी परिस्थिती होईल. तेव्हा प्रभू परमेश्वर आपणास ओळखणार नाही व आपणास स्वर्गाचे दार उघडले जाणार नाही.
     ‘शलमोनाचा ज्ञानग्रंथ’ ह्या पुस्तकात आपण ज्ञानाविषयी ऐकले आहे. जो ज्ञानाचा खऱ्या अंतकरणाने शोध घेतो त्याला कुठलीही अडचण येणार नाही. येथे ज्ञानाची उपमा खुद्द देवाला किंवा येशुख्रिस्ताला दिलेली आहे. म्हणून या जगामध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी भरकटलेल्या तुमच्या-आमच्या सारख्यांना या ज्ञानाची गरज आहे. कारण जेव्हा हे ज्ञान आपणास मिळते किंवा सापडते तेव्हा आपणास कशालाही कमी किंवा उणीव पडणार नाही. आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताला प्रथम स्थान द्यावे व त्या ज्ञानाचा किंवा वराच्या शोधात सदैव जागृत राहावे म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना परमेश्वराने चागंले आरोग्य द्यावे व त्यांना त्यांच्या प्रेषितकार्यात मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी आपल्या जीवनात सतत जागृत राहावे व येशूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खी, आजारी व बेरोजगार आहेत, त्यांना परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील जे तरुण-तरुणी परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.