Friday 5 October 2018


Reflections for the homily of 27th  Sunday in Ordinary time 
(07-10-2018) by: Br. Robby Fernandes.





सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार


दिनांक – ७/१०/२०१८
पहिले वाचन उत्पत्ती : २:१८-२४
दुसरे वाचन इब्री लोकांस पत्र २:९-११
शुभवर्तमान मार्क १०:२-१६



 “देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.”

प्रस्तावना

     आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचणे आपल्याला सांगत आहेत की, जे देवाने पवित्र, पावन, मंगल केले होते ते मानवाने स्वतःच्या स्वार्थापायी, ते पवित्र बंधन त्याने पायतळी तुडविले आहे. देवाला प्राधान्य न देता, सैतानाला स्वतःच्या जीवनात प्रथम स्थान दिले; आणि ह्याच कारणास्तव आपण स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करून घेतली.
     आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला असे दिसून येते की, परमेश्वराने सर्व काही चांगले ते निर्माण केले व त्यांना नाव ध्यावे ह्याकरिता मनुष्याला त्यांच्यावर परिपूर्ण अधिकार गाजवायला दिला. तसेच आदम व एवेला निर्माण करून परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले, जेणे करून ते फलद्रूप होतील. दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की, येशूने मरण सोसल्यामुळे त्याला गौरव व थोरवी प्राप्त झाली. जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. हे इब्री पत्र आपल्या सांगत आहे. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये परमेश्वर एक अतूट बंधनाविषयी आपल्याला सूचित करत आहे. “जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नेये.”
     देवाने आपल्याला नर व नारी बनवून संपूर्ण जग आपल्या हवाली केले. आपल्याला परीपूर्ण असा आशीर्वाद दिला. जेणे करून आपण देवाच्या सानिध्यात राहू व जगू. जर आपण देवाच्या सानिध्यात राहण्यास व जगण्यास कमी पडलो असले तर परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन
उत्पत्ती – २:१८-२४

     आजचे पहिले वाचन हे उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेले आहे. परमेश्वराने मनुष्याला बनविल्या नंतर त्यांच्यासाठी एक अनुरुप सहकारी निर्माण केली ह्याचेच एकच कारण, ते म्हणजे – मनुष्य कधीही एकटा नसावा! परमेश्वराने सर्व काही निर्माण केले व त्या सजीव व निर्जीव वस्तूंना आदम कोणती नावे देतो हे पाहण्यासाठी परमेश्वर त्याला त्यांच्याकडे नेतो. त्याने सर्वाना नावे दिली. जेव्हा परमेश्वराने निर्माण केलेल्या अनुरूप सहकारीला पाहून म्हणाला, “आता ही माझ्या हाडातले हाड आणि मासातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. या कारणास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, व ती दोघे एकदेह होतील.”

दुसरे वाचन
इब्री लोकांस पत्र - २:९-११

    ह्या पत्रा मध्ये आपल्याला असे दिसून येते की, ‘येशू ख्रिस्ताला काही वेळे करिता देवदूतापेक्षा कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित’ केलेला असा आपण पाहतो. त्याने त्याच्या दुख सहनाद्वारे, तारणाचा उद्देश पूर्ण करावा हेच उचित होते. त्याने सर्व लोकांना परमेश्वराकडे आणावे ह्यासाठी तो सर्वासाठी, सर्व काही झाला. आणि हे सर्व करण्यासाठी त्याने स्वःताचा प्राण दुसऱ्यासाठी द्यायला कधीही मागे पुढे धजला नाही, ह्याच करणास्तव त्यांना बंधू म्हणावयाची त्याला कधीही लाज वाटली नाही.

शुभवर्तमान
मार्क – १०:२-१६

     काही परुशी येशूची परीक्षा पाहण्याच्या उददेशाने त्यांनी, त्याला प्रश्न विचारला, पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपत्र देणे सशात्र आहे का? हा प्रश्न त्यांनी येशूला विचारला कारण त्याना येशूला पकडायचे होते. पण येशूने चतुरतेने त्यांना उत्तर दिले, मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे. ते लगेच म्हणाले की, मोशेने सूटपत्र देवून तिला टाकायची परवानगी दिली आहे. पण येशू पुढे म्हणाला, हे मोशेने केले कारण, “तुमच्या अंतकरनाच्या कठीणपणामुळे ही आज्ञा त्याने तुम्हांला दिली, पण उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने स्त्री-पुरुषाला निर्माण केले जेन करून ते दोघे एकदेह होतील. म्हणून देवाण जे जोडले आहे. ते मानुशाने तोडू नये.”
     मार्क आपल्याला अजून एक गोष्ट शिकवितो, ते म्हणजे लहान बालके ही देवाच्या जवळची मुले असतात. त्याचे मन हे निर्मळ व सरळ असते, म्हणून येशू बाळकाना त्याच्या जवळ बोलावितो व त्यांना आशीर्वाद देऊन म्हणतो, “बाळकाना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारखेचेच आहे.”.

बोधकथा

     असे म्हणतात की, प्रेम हे आंधळे असते. आणि हा प्रेमरूपी रोग मेल्या वाचुनी सुटत नाही. असेच एका गावामध्ये एक तरुण होता. आणि तो तरुण तडफदार माणूस त्या गावचा श्रीमंत, नावाजलेला व्यक्ती होता. स्वभावाने चांगला, प्रामाणिक व हुशार असा होता. पण त्याला साधे राहणीमान आवडायचे. पण त्याच्या कुटुंबामुळे साधे राहणीमानाचे जीवन जगणे त्याला शक्य होत नव्हते. त्यासाठी त्याने सर्व संपत्तीचा त्याग करून तो दुसऱ्या गावी जाऊन राहू लागला, जेथे त्याला कोणी ही ओळखत नव्हते.
     त्या गावी एक सुंदर मुलगी होती. तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमामध्ये पडला. पण ती मुलगी दिसायला छान व सुंदर असली तरी ती आंधळी होती. पण त्याने मागचा-पुढचा विचार न करता तिच्याशी लग्न करायचे ठरवले. आणि लग्ना साठी ती मुलगी पण राझी  झाली. पण तिचा एकच ध्यास होता की, तिला हे सुंदर जग व ज्या माणसाने तिच्यावर अतोनात प्रेम केल आहे, त्यांना तिला पहायचे होते. लग्नाच्या थोड्या वर्षा नंतर तिचे ते स्वप्न पूर्ण झाले आणि ती सर्व काही पाहू शकत होती. जेव्हा तिणे तिच्या प्रेमिकाला पहाचे जिद्द केली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. कारण तिला हे सुंदर जग पाहता यावे म्हणून तिच्या प्रेमिकाने स्वःताचे डोळे तिच्या खातर दान केले. आणि तिला नवी दृष्टी दिली. हे त्याचे तिच्यावर असलेले प्रेम पाहून तिचे हृदय भरून आले, त्याच बरोबर त्यांच्या मधला लग्नाचा संबध अतूट व भंकम बनला व ती त्याच्याशी मरेपर्यत विश्वासू राहिली.

मनन चिंतन

नाती हि स्वर्गात बांधली जातात 
व पृथ्वीवर साकारली जातात.

     परमेश्वराने मानवाला का उत्पन्न केले? आणि स्त्री-पुरुष असे का निर्माण केले? असे प्रश्न आपल्या डोक्यात घोळत असतात. ह्या प्रश्नाचे उत्तर देवाने दिलेले आहे. ते म्हणजे, ‘ती दोघे एकदेह होतील’ (उत्पत्ती १.२४). सुरवातीचे मूळ सत्य असे आहे कि, ईश्वराने माणसाला एकटा असे निर्माण केले नाही; तर व्यक्तीचा संघ निर्माण केला. देवाने सर्व सृष्टीतील जीव आदमाला दाखवले. कारण आदाम हा देवाच्या प्रतिरुपाप्रमाणे  होता. त्यासाठी देवाने आदामाला सर्व सजीव व निर्जीव वस्तूंना नवे देण्यास सांगितली. पण त्याच्या हृदयाला आनंद देणारी एकही गोष्ट परमेश्वराला भेटली नाही. म्हणून परमेश्वराने एका स्त्रीची निर्मिती केली. तिला पाहून आदाम खुश झाला. प्रेमाचा झरा त्याच्या हृदयात निर्माण झाला. तो आनंदाने म्हणाला, “हि माझ्या हाडाचे हाड आणि मासाचे मास आहे. तिला नारी म्हणावे कारण ती नरापासून बनवली आहे. तेव्हापासून ते दोन नव्हे तर एकदेह झाले.
प्रेम काय आहे? – स्वतःचे जीवन नष्ट करून दुसऱ्यांच्या जीवनाला उंच करणे, स्वतःला संपवून नव्या जीवनाला उफाळा देणे, ‘मीपणा सोडून आम्हीम्हणणे होय. म्हणूनच मानवी अस्तित्व अधिक उच्च स्वरूपाचे व सुखकारक करायला पाहिजे त्यासाठी एकत्र असणारी जी शक्ती आहे ती म्हणजे प्रेमाशक्ती. केवळ प्रेमामुळेच मनुष्य स्वतःच्या कोशातून बाहेर पडून, सक्रियपणे इतरांच्या फायद्यासाठी झटपटू शकतो. प्रेम हा देवाच्या कृपेचा प्रसाद आहे. कारण ईश्वर हा एकमेव लग्नाचा कर्ता आहे. परिणामी विवाहावर ईश्वराचा सर्वोच्च अधिकार आहे. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो कि, “जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये” (मार्क १०:९). हे प्रभूचे शब्द शाश्वत सत्य आहेत. किंबहुना जर आपण आजच्या युगामध्ये डोकावून पहिले तर आपल्याला असे दिसून येते कि, लग्न व प्रेम याचा जाणून-बुजून दुरुपयोग केला जातो. त्यावर दुर्लक्ष केले जाते. ह्या पवित्र संस्काराला दुर्गुण लागले आहेत. लोक आपसात करार करून स्वार्थासाठी एकत्र राहून, देवाने निर्माण केलेल्या पवित्र बंधनाची विटंबना करत आहेत. त्याची प्रतिष्ठा पायदळी तुडवून सैतानी कृत्यांना समाज काही वेळा बळी पडत आहे. आपल्याला देवाचे प्रेम ण समझल्यामुळे स्वतःच्या जीवनाचे आपण वाळवंट करतो. जीवनाच्या वृद्धीसाठी ईश्वराने प्रेमाचा करार केला व वैवाहिक प्रेम हे विवाहाचा करार आहे हे आपल्याला शुभवर्तमानातून दिसून येते. म्हणूनच लेखक ‘झुंडेल’ असे म्हणतात कि, “एकनिष्ठता म्हणजे सखोल प्रेमाची सखोल निवड होय .
विवाह का सात संस्कारातील एक महत्वाचा करार् आहे. जर संस्काराची व्याख्या आपण न्याहाळून पहिली तर आपल्याला असे समझते कि, “संस्कार अदृश्य कृपेचे दृश्य चिन्ह आहे.याचा खरा अर्थ समझण्यासाठी आपण ख्रिस्तापासून सुरवात करायला पाहिजे. ख्रिस्त देवाचा पुत्र असून तो आम्हासाठी या भूतलावर आला. याचा अर्थ असा कि तो माणसाला पृथ्वीवरून स्वर्गाकडे उंचावण्यासाठी या जगात आला. आपलं व देवाचे नातं जे तुटले होते ते जोडण्यासाठी मानवजन्म धारण करून जीवनात प्रेमाचा करार केला. पण, शाश्वत जगाचा धिक्कार करून सैतानाच्या क्षणभंगूर जीवनाचा आपण स्वीकार करून देवानिर्मितीला आपण तडा आणण्याचा प्रयत्न करतो. आपण देवानिर्मिती आहोत हे विसरून देवकृपेलाच आव्हान देतो व त्याच्या प्रेमापासून अलग होतो. आपण स्वतःशी व देवाने निर्माण केलेल्या संस्काराशी निष्ठापूर्ण राहावे व त्याचा सन्मान करावा. म्हणून जे देवाने जोडले ते मानवाने स्वार्थापायी तोडू नये, असा आपण निश्चय करूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना
प्रतिसाद – हे प्रभो, आम्हा सर्वाना सदैव तुझ्या कृपेच्या छायेत राहू दे.

१) परमेश्वराने पवित्र, मंगल नर-नारी बनवली. पण आम्ही आमच्या स्वार्थासाठी, आमच्या स्वतःच्या ‘मी’ पणासाठी हे पवित्र बंधन जे देवाने निर्माण केलेले आहे ते तोडत आहोत. जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने स्वतःच्या स्वार्थापही तोडू नये म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२) येशू ख्रिस्ताने आम्हा सर्वाना उजेडाची लेकरे बनवली आहेत. पण आम्ही खोट्या सुखाच्या मोहाला बळी पडून परमेश्वरापासून दुरावले आहोत. त्यामुळे कुटुंबात शांतता नाही. कुटुंबामध्ये संशय व अहंकार भरलेला आहे. तर या पवित्र बालीदानाद्वारे देवाचा व आम्हा सर्वाचा पुन्हा एकदा नव्याने समेत व्हावा म्हणून प्रार्थान करूया.
३) आजच्या युगामध्ये लग्न हा एक प्रकारचा व्यवहार व खेळ झाला आहे. लोक आपसात करार करून स्वतःच्या स्वार्थापही एकत्र राहून पवित्र संस्काराला व देव निर्मितीला जुमानत नाही. त्यामुळे कुटुंबाना व चरण घरपण राहिले नाही. परमेश्वराने त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हा सर्वांवर करावा जे करून आम्ही ख्रिस्ती आहोत याची जाणीव  आम्हला व्हावी म्हणून परमेश्वराकडे याचन करूया.
४) प्रत्येक कुटुंबाचे ख्रिस्तामध्ये नुतनीकरण व्हावे. लेकरांना, आई-वडिलांच्या कष्टाची  जाणीव व्हावी. व त्यांनी आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांनी त्यांचा आधार बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५) आम्ही सर्वजण देवाची मुले आहोत; म्हणून आमच्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदाभेद न होता, प्रेमाने, प्रीतीने प्रार्थानामय जीवन, पवित्र शास्त्राच्या वचनाद्वारे जीवनाचा कायापालट व्हावा, समाजामधील प्रत्येक कुटुंबाने देंवाचा गौरव करावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

      


No comments:

Post a Comment