Friday 12 April 2024

  Reflection for the Third Sunday of Easter (14/04/2024) By Br. Jostin Parera


पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार

दिनांक: १४//२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: :१३-१५; १७-१९

दुसरे वाचन: १ योहान: :-

शुभवर्तमान: लुक: २४:३५-४८

प्रस्तावना:

प्रिय बंधू-भगिनीनों, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाच्या करुणेची, त्याच्या शांतीची आणि प्रेमळ उपस्थितीचे वर्णन करून देत आहेत. देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने एकुलता एक पुत्र या जगात पाठवला आणि मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा एकदा देवाचे आपल्यावर असलेले प्रेम येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानद्वारे आपणास अनुभवण्यास मिळाले.

प्रेषितांची कृत्ये यातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण पेत्राचे शलमोनाच्या देवडीवरील भाषणाविषयी ऐकतो. पवित्र आत्माने भरलेला पेत्र पुनरुत्थित प्रभू येशूची सुवार्ता पसरवितो. दुसऱ्या वाचनात योहान आपणास पापांपासून परावृत्त कसे व्हावे यासाठी सल्ला देतो. पुढे योहान म्हणतो की, जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, त्यांच्यामध्ये देवाची प्रिती खरोखर पूर्णत्वास पावली आहे. शुभवर्तमानकार लुक आपल्याला येशूख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयीची घटना कथन करत आहे. येशू ख्रिस्त प्रथम त्यांना आपल्या शांतीचे वरदान देतोआणि तोच पुनरुत्थित ख्रिस्त आहेह्याची खात्री करून देतो व आपल्या शिष्यांना पश्चाताप व क्षमा घोषित करण्याचे कार्य सोपवितो.

आज जर का आपण समाजाकडे निरखून पाहिलं तर आपल्याला समजून येते की जगाला शांतीची, प्रभूयेशूच्या उपस्थितीची आणि क्षमेची नितांत गरज आहेह्या सर्व गोष्टी आपल्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थनाद्वारे भेटल्या आहेत. ह्या मिस्साबलीदानामध्ये सहभागी होत असताना आपल्याला प्रभूची शांती, त्याची उपस्थिती आणि त्याचे कार्य इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष कृपाशक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करू या.


मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानामध्ये येशूख्रिस्ताने दिलेल्या दर्शनाविषयी आपणास ऐकावयास मिळते. पुनरुत्थित झाल्यानंतर येशू खिस्ताने दिलेल्या प्रत्येक दर्शनानंतर प्रभूयेशू शिष्यांना आणि त्याच्या प्रेषितांना सांगतो की, तुम्ही इतरांना सुद्धा सांगा की, ‘प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे. तो पुनरुत्थित झाला आहे. प्रभू येशू त्याच्या दुःखसहन आणि मृत्युद्वारे हादरलेल्या लोकांना एकत्र करीत आहे आणि त्यांच्या समक्ष पुनरुत्थानाच्या गुपित सत्याचा उलघडा करून देत आहे.

आजच्या शुभवर्तमानात रेखाटलेली प्रभूयेशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्यासमोर महत्वाचे वैशिष्ट निदर्शनात आणत आहे. हे वैशिष्टय प्रत्येक ख्रिस्ती समुदयात, ख्रिस्ती लोकांमध्ये जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे आणि ते म्हणजे – ‘ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची उपस्थिती आणि ख्रिस्ताचे विचार (हेतू) ह्या तिन्ही गोष्टी ख्रिस्ती समुद्यात वास करतील.

येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना दर्शन दिले तेव्हा त्यांच्या मुखातून निघालेले पहिले शब्द होते, ‘तुम्हास शांती असो.प्रभू येशू त्यांना शांती देतो कारण त्याचे शिष्य गोंधळून गेले होते आणि यहुद्यांच्या भितीमुळे ते भयभीत झालेले होते. त्यांच्या हृदयात पापांची भावना निर्माण झालेली होती कारण त्यांनी येशूख्रिस्ताचा नकार केलेला होता. येशूख्रिस्ताने निवडलेल्या अनुयायांनी त्याला एकटे सोडले होते; जरी त्यांनी मोठ्या प्रखरतेने सांगितले होते की, त्याच्या बरोबर ते अखेरपर्यंत राहणार- त्यांनी मात्र वेगळेच केले. त्यांना समजले होते की, त्यांनी त्यांचा मालक येशू ख्रिस्त ह्याचा विश्वासघात केला होता. त्यांना त्यांच्या कृती बद्दल दुःख झाले होते. मात्र, आता त्यांना घड्याळाचे काटे परत मागे फिरवता येऊ शकत नव्हते. मात्र येशूख्रिस्ताला त्यांना झालेल्या पश्चातापाची कल्पना झाली होती. त्यामुळे तो त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो.ज्यामुळे त्यांना समजेल की, त्यांच्या पापांची त्यांना क्षमा झालेली आहे. ह्या येशूच्या अपार दयेमुळे आणि करुणेमुळे त्यांची भीती नाहीशी झाली आणि त्यांच्या आनंदाला उधान आले.

हाच प्रभूयेशूचा शांतीचा व क्षमेचा संदेश आपल्याला प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये अनुभवयास मिळतो; क्षमा आणि पश्चाताप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येऊ शकत नाही. ज्या प्रमाणे क्षमा आणि पश्चाताप ह्यंचा संगम एकनिष्ठ आहे. कारण आत्मा शरीराला जिवंत ठेवत असतो आणि शरीरामुळे आत्म्याची अनुभूती आपणास मिळत असते.

काही व्यक्ती पश्चातापावर विश्वास ठेवतात आणि वेळोवेळी पापकबुलीसाठी धर्मगुरूकडे जात असतात. मात्र खेदाची गोष्ट हीच की, त्यांना त्यांच्या पापांची पूर्णक्षमा झाली नाही, ह्याची त्यांच्या मनात चल-विचल होत राहते. कित्येकांना क्षमेची गरज असते पण त्यांना पश्चाताप करायला आवडत नाही. म्हणूनच जेव्हा आपण ह्या दोन्ही गोष्टी अनुभवतो तेव्हा आपणास पुनरुत्थानाच्या सत्याची चव कळून येते.

आपण ह्या भूतलावर/ पृथ्वीवर माणसे (मानव) आहोत. आपण स्वर्गातून उतरलेले दूत नाही. सर्व संत आणि पवित्र स्त्री-पुरुष ह्यांनी त्यांचे जीवन ह्या पृथ्वीवर घालवले आणि समाजात कार्य केले. त्यांना सुद्धा मोह झाले होते, काहीजण तर पापांच्या अंधारात असताना देवाच्या मदतीने पापांपासुन मुक्त झाले (संत अगस्टीन).  आपणसुद्धा मानव आहोत; आपल्या हातून सुद्धा कळत आणि नकळत कित्येक चुका झाल्या असतील. काहिक चुकांची तिव्रता प्रबल असेल आणि त्याचा परिणाम दुःखदायक असतो. आपण लहानाचे मोठे होत असताना कित्येक अनावश्यक गोष्टींच्या आहारी गेलो असाल; आपण काही दृष्ट कृत्ये केली असतील पण प्रकाशात काळोख नाहीसा होतो, आनंदात दुःख हरवून जाते आणि पाण्यात साखर विरघळून जाते त्याच प्रकारे पश्चातापामुळे आपल्याला नवीन पवित्र जीवन, आध्यात्मिक मुक्ती, क्षमा आणि शांतीचे वरदान मिळते आणि वाईट गोष्टी नाहीशा होत असतात.

योहान त्याच्या दुसऱ्या पत्रात आजच्या दुसऱ्या वाचनात सांगतो, ‘जर कोणी पाप केले तर नीतिमान असा तो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. पेत्र आजच्या पहिल्या वाचनातून सांगत आहे की, ‘तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा आणि वळा’. पुनरुत्थानाची एक मौल्यवान भेट जी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आणि आपल्या सर्वांना दिली आहे, ती म्हणजे प्रभूची शांती आणि ही शांती आपल्याद्वारे येशूख्रिस्ताने दिलेल्या क्षमेमार्फत मिळत असते.

तद्नंतर येशूख्रिस्ताची उपस्थिती व प्रचिती आपल्याला आजच्या शुभवर्तमानातून मिळते. येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “तो मीच आहे”. खरोखरच, आज येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये उपस्थित आहे. विश्वासात आपण जेव्हा एकत्रित येऊन प्रार्थना करतो तेव्हा येशूची उपस्थिती आपण अनुभवत असतो. येशू ख्रिस्ताची उपस्थिती प्रत्येक वेळी जेव्हा आपण ख्रिस्तयागासाठी एकत्र येतो तेव्हा होत असते. प्रभूयेशूची उपस्थिती सध्याच्या काळात फक्त आपल्याला त्याची आठवण म्हणून होत नाही, येशूख्रिस्त हा एक आदर्श व्यक्ती म्हणून होत नाही तर ज्याप्रमाणे येशूख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर होता त्याच प्रमाणे त्याची उपस्थिती आपल्याला पवित्र मिस्साबलीदानामधून होत असते.

येशूख्रिस्ताची उपस्थिती ही अतिमौल्यवान भेट आहे. आपण ह्या रविवारच्या दिवशी एकत्रित जमलो असताना येथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती येशुख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे ह्याची कबुली देतात. आज आपण सर्वजण आपल्या गरजा, इच्छा-आकांक्षा घेऊन प्रभूकडे आलो आहोत. येशुख्रिस्त प्रत्येक ख्रिस्तयागात आपल्या विनंत्या, आपल्या गरजा जाणून घ्यायला आणि आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करायला येत असतो.

आपल्यामधील कित्येकांनी उपवास काळामध्ये काही निर्णय घेतले असतील, कोणत्या गोष्टींचा त्याग करावा, कोणत्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात- रोज मिस्साला जाणे, घरात रोजरीची प्रार्थना करणे, बायबल वाचन करणे, गरजवंताना मदत करणे अशा अनेक गोष्टी तुम्ही उपवास काळात केल्या असतील. प्रत्येक वर्षी उपवास काळात केल्या असतील. प्रत्येक वर्षी उपवास काळ येतो आणि उपवास काळ जातो, आपण चांगल्या व्यक्ती होण्याचा प्रयत्न करतो. तर उपवास काळाप्रमाणेच पुनरुत्थान काळातसुद्धा नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा निर्णय घेऊ शकतो. ते म्हणजे येशूची शांती आणि त्याची उपस्थिती ह्याचा अनुभव दुसऱ्यांना सांगितला तर महत्त्वाचे ठरेल. सत्याचे बी पेरणे, दुसऱ्यांविषयी आपुलकी, प्रामाणिकपणाचे जीवन जगणे आणि समाजात इमानदाराचे जीवन जगणे ह्या गोष्टी आपल्याला इतरांच्या जवळ जाण्यास मदत करतील. ह्या पेरलेल्या बियांचे उद्या चांगल्या वृक्षामध्ये रुपांतर होऊन त्याची फळे, त्याची सावली आपण इतरांना देऊ शकतो.

येशूख्रिस्ताचे पुनरुत्थान हे त्याने दिलेले एक महत्त्वाचे चिन्ह आणि एक प्रकारची हमी (Guarantee) होती. ह्याच चिन्हाद्वारे ख्रिस्तसभा एखाद्या भाताच्या शेताप्रमाणे भरून जाईल. ही पिके आपल्याला क्षमा, शांती आणि प्रभूयेशुची उपस्थिती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि येशूख्रिस्ताचे मिशन इतरांना पोहोचविण्यासाठी आपल्याला कार्यक्षम करील.

पुनरुत्थानाची गोष्ट (story) येशूच्या स्वर्गरोहणाने संपलेली नाही तर आज प्रत्येक ख्रिस्ती बंधू-भगिनींनी पुनरुत्थानाची ही गोष्ट पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुझ्या प्रकाशाची लेकरे बनव.

. आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु आणि प्रापंचिक ह्या सर्वांना ख्रिस्ताची तत्वे आणि त्याची शिकवण इतरांपर्यंत पोहचविण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ, भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेमाचे, शांतीचे व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे; पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रकाश एकमेकांवर पसरावा व समाजात ख्रिस्ताची उपस्थिती निर्माण करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

. संपूर्ण जगात शांतीचे वातावरण निर्माण होऊन प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचे रूप पाहून इतरांना आदराने वागवण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

. ह्या मिस्साबलीदानात जमलेल्या सर्व भाविकांना प्रभू येशूने चांगले आरोग्य द्यावे, त्यांच्या कामाधंद्यात भरभराट यावी आणि त्यांनी पुनरुत्थित येशु ख्रिस्ताचे अनुयायी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.





No comments:

Post a Comment