Wednesday 16 September 2015


Reflections for the Homily of 25th Sunday in Ordinary Times(20/09/2015) by Amol Gonsalves.







सामान्यकाळातील पंचविसावा रविवार



दिनांक: २०/०९/२०१५.
पहिले वाचन: शलमोनाचा ग्रंथ २:१२;१७-२०.
दुसरे वाचन: योकोब ३:१६,४:३.
शुभवर्तमान: मार्क ९:३०-३७.

‘तुम्हामध्ये जो कोणी उच्च होऊ इच्छितो, त्याने सर्वांचा सेवक बनावे’


प्रस्तावना:
     आज आपण सामान्यकाळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पवित्र उपासनेतील तिन्ही वाचने आपल्याला मानवी जीवनातील तीन महत्वपूर्ण अश्या गोष्टीवर विचार-विनिमय करण्यास बोलावत आहे. नितीमत्व, एकाग्रता व नम्रपणा.
     शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण नीतिमान माणूस हा देवाचा पुत्र ठरेल असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत याकोब आपल्याला ह्या जगातील ऐहिक गोष्टींवरचा मोह न धरता ख्रिस्ताच्या वचनांचा ध्यास आपल्या जीवनात कसा उतरावा ह्याविषयी उपदेश करत आहे. तर शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या शिष्यांना नम्रतेविषयी धडा देत आहे. जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने प्रथम सेवक झाले पाहिजे  असे ख्रिस्त म्हणतो.
मानवी जीवनातील अहंकारपणा, मी-पणा मानवाला ख्रिस्ताकडून व त्याच्या शिकवणुकीतून दूर नेत असतो. ख्रिस्ताने गाईच्या गोठ्यात जन्म घेऊन आपल्यासमोर नम्रतेचा धडा व लीनपणाचा सर्वात मोठा कित्ता घालून दिला आहे. ख्रिस्ताच्या नम्रपणाचा व लीनपणाचा धडा आपल्या जीवनात गिरवता यावा म्हणून आपण ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ २:१२; १७-२०.
ह्या ज्ञानग्रंथाद्वारे लेखकाने वाचकांसमोर ‘ज्ञानाचे कार्य’ आणि ‘देवाचे कार्य’ यांचे इस्रायली लोकांच्या इतिहासामध्ये कोणते महत्व होते व ह्या दोन्ही अस्तित्व कशाप्रकारे एक आहेत ह्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शलमोनाचा ग्रंथ हा पाच भागामध्ये विभागलेला आहे.
आजचे पहिले वाचन हे ज्ञानग्रंथातील पहिल्या भागातून घेतले आहे. येथे आपल्याला ‘नितीमानाचे अमरत्व’ व ‘दृष्टांना शिक्षा’ ह्याविषयी लेखक जाणीव करून देत आहे. सत्यपणा, खरेपणा व नितीमत्वपणा हे दैविक गुणधर्म आहेत, आपल्या विपरीत बुद्धीमुळे मनुष्य देवापासून दुरावला. आपल्या दृष्ट कृत्यांमुळे त्याला मरण प्राप्त झाले, परंतु पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नीतिमान मनुष्य हा त्यांच्या चांगल्या कार्यामुळे शाश्वत जीवनास योग्य ठरेल. तो वाईटांपासून व ऐहिक मोहापासून दूर राहील. अशा नीतिमान व चांगल्या लोकांची कसोटी वेळोवेळी केली जाते; परंतु देवावर पूर्ण विश्वास ठेवल्यास नीतिमान मनुष्याची विरोधकांच्या तावडीतून सदैव सुटका होत असते. कारण त्याची चांगली कार्ये व सौम्यपणा त्याच्या मदतीला येत असतात.

दुसरे वाचन: संत याकोबचे पत्र ३:१६, ४:३
संत याकोब आपल्या पत्राद्वारे ख्रिस्ती जणांसमोर खोटे व खरे काय ह्याविषयीची ज्ञान ठेवत आहे. मनात मत्सर व लडपडण्याची वृत्ती बाळगून मनुष्य कदापि सत्य मार्गावर चालत नाही. आपला वाईट कृत्याद्वारे तो पापांचा वाटेकरी होतो. आजचे जग आपल्याला खरे काय व खोटे काय ह्याविषयी अज्ञानात ठेवत असते. परंतु देवाकडून येणारे ज्ञान हे खरे, शांतीप्रिय, सौम्य, अपक्षपाती असते. तथापि, मानवाने स्वत:च्या स्वार्थामुळे जगाच्या ज्ञानात गुंफून खऱ्या ज्ञानाचा विसर पाडून घेतला आहे. संकटवेळी तो देवाकडे आपले गाऱ्हाणे घेऊन येतो. परंतु आपण देवाकडे काय मागावे व काय मागू नये, ह्याविषयीची जाणीव त्याला नसते. त्यामुळे त्याने मागितले त्याला ते मिळत नाही. अयोग्य मार्गाने मागणाऱ्याला कदापि काहीच प्राप्त होत नाही. स्वत:च्या सुखासाठी व चैनबाजीकरीता जो कोणी देवाकडे मागतो, तो देवाठायी स्वार्थी व लबाड ठरला जातो. ‘दुसऱ्यासाठी चांगले मग म्हणजे देव तुम्हाला चांगल्या गोष्टीने फलदायी बनवेल’, हा नियामशास्राचा नियम आहे.

शुभवर्तमान: मार्क ९:३०-३७.
संत मार्कच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त तिन्ही भिन्न भिन्न ठिकाणी आपल्या मृत्यूबद्दल दुसऱ्यांना सांगत असल्याचे आढळून येते. (उदा: मार्क ८:३१-३३.९:३०-३२. १०:३२-३९.)
     ख्रिस्ताने आपल्या मरणाची भविष्यवाणी तीन वेळा का केली असावी? ह्याबद्दल अनेक धर्मपंडीतानी आपल्या अभ्यासात विचार-विनिमय केला आहे. व त्यांनी त्यांच्या मतानुसार दोन महत्वपूर्ण कारणे मांडली आहेत.
१. प्रथम म्हणजे, ख्रिस्ताला आपल्या अंतिम वेळेची जाणीव जन्मापासून होती.
२. दुसरे कारण म्हणजे, येशूला आपल्या शिष्यांना हि सत्य घटना आत्मसात करण्यासाठी सभ्य बनवायचे होते.
आपले राज्य ह्या जगाचे नसून आपण शांतीचा, प्रेमाचा व समेटाचा संदेश देण्यासाठी ह्या जगात आलो आहोत, ह्याविषयी ख्रिस्ताला जाणीव होते, आपण गौरवशाली मसीहा नसून जगाच्या तारणासाठी, कल्याणासाठी स्वत:चा प्राण अर्पिण्यासाठी आलेला देवाचा कोंकरू असल्याचे सत्य ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना पटवून द्यायचे होते.
तसेच संत मार्कच्या शुभवर्तमानातील अध्याय. ९:३३-३७ मध्ये ख्रिस्त शिष्यांना नम्रतेविषयी धडा देत असल्याचे दिसून येते. आपण ज्याला अनुसरतो तो जर वैभवशाली मसीहा असेल, गौरवशाली राजा असेल, तर त्याच्या राज्यात आपल्याला कोणते स्थान मिळेल व त्याच्या राज्यात सर्वात श्रेष्ठ म्हणून कोणाला मानले जाईल, ह्याविषयी शिष्य आपापसात विचारपूस करीत होते. त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी लहान बालकाच्या उदाहरणामार्फत ख्रिस्त आपल्या शिष्यांना; ‘देवराज्याचा वाटेकरी होण्यासाठी श्रेष्ठत्वाची गरज नसते’ ह्याची जाणीव करून देतो. बालके, हे स्वभावाने स्वाभिमानी व वागण्याने नितळ असतात. ह्यास्तव जो कोणी बालकाप्रमाणे आपल्या जीवनात स्वाभिमान व नितळपणा ह्यांचा स्विकार करतो, तो ख्रिस्ताचाच नव्हे तर ज्याने ख्रिस्ताला पाठवले आहे त्याचा स्विकार करतो.

बोधकथा:
२०१० साली “सत्य” नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित केला होता. चित्रपटासाठी प्रेक्षकांचा घवघवून प्रतिसाद मिळाला. त्याचे कारण म्हणजे, दिग्दर्शकाने आजच्या समाजात घडत असलेल्या सत्य घटनेचे प्रदर्शन हे चित्रपटात केले होते. हा चित्रपट आपल्याच समाजात राहत असलेले अपंग, लुळे पांगळे व शरीराने दुबळेपणा सहन करत असलेल्या व्यक्तींवर आधारित होता.
     ह्या चित्रपटातील एक हृद्यस्पर्शी दृष्य म्हणजे, ‘दिवस करमणुकीसाठी सर्व आंधळे, लुळे, पांगले, ह्यांच्यात शर्यत लावण्यात येते, त्यांना कमी वेळात शंभर मीटरचे अंतर पार करायचे असते. शर्यतीचा दिवस उगवतो, सर्वजण चांगल्या तयारीनुसार क्रीडांगणात उतरतात. दहा जणांचा एक संघ त्यात करण्यात आला होता. सर्वजण रांगेत उभे रथून पंचांच्या आदेशाची वाट पाहत होते. आदेश मिळताच शर्यतीला सुरुवत होते. थोडा काळ सरल्यावर त्यांच्यातील एक अपंग मुलगा जमिनीवर कोसळतो. ते पाहताच सर्वजण आपली शर्यत तेथेच सोडून देतात व जमिनीवर पडलेल्या आपल्या साथीदाराच्या मदतीसाठी येतात. त्याचा हात पकडून त्याला उठवतात व आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा सर्वजण शर्यतीला सुरवात करतात.
     खरोखरच मनाचा मोठेपणाचा व दुसऱ्याची सेवा करण्यासाठी स्वत:च्या शर्यतीचा त्याग करण्यासाठी ह्या मुलाकडून खूप काही शिकायला मिळते. “जो कोणी तुमच्यात मोठा व श्रेष्ठ होऊ इच्छितो, त्याने सर्वप्रथम दुसऱ्याचा सेवक बनायला हवे”.

मनन चिंतन:
            आजचे आधुनिक जग हे जाहिरातीचे, प्रसारमाध्यमाचे व तत्वज्ञानाचे युग आहे. सर्वत्र जो तो मान-सन्मान, प्रतिष्ठा, मोठेपणा ह्याच्यामध्ये गुंफलेला आहे. जीवनात आपण कसे होऊ व नव-नवीन उच्च पदवीस्थाने कसे मिळवू? ह्यामध्ये गुरफटत चालला आहे. खरे पाहिले तर हा जगाचा नियम आहे. जगाच्या निर्मितीपासूनच ह्या नियमाची जोड जगाला लागली होती, येशू ख्रिस्ताचे शिष्य ह्या अस्तित्वाला निराळे होते असे नाही. संत मार्कच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे येशूचे शिष्य आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? ह्याविषयी चर्चा करीत होते. तेदेखील मान-सन्मान,  मोठेपणा ह्यामध्ये गुंफून केलेले होते.
     शिष्यांना ठावूक होते कि, येशू ख्रिस्त ज्याने इतके चमत्कार केले आहेत तो सर्वसामान्य मनुष्य नसून एक दैवी मानव आहे. तो एक चमत्कारी असून त्याच्याठायी दैवी शक्ती आहे. त्याचे गौरवशाली राज्य प्रस्थापित करण्यासाठी तो ह्या जगात अवतरला आहे. त्या वैभवशाली राज्याचे भागीदार होण्यासाठी वारस होण्यासाठी त्याने आमची निवड केली आहे. एक दिवस आम्हांला सुद्धा मान-सन्मान, प्रतिष्ठा गाठता येईल.
     परंतु आजच्या शुभवर्तमानाद्वारे ख्रिस्त त्यांना नम्रतेचा व लीनतेचा धडा शिकवत आहे. “जो कोणी तुम्हांमध्ये उच्च होऊ इच्छितो, त्याने सर्वांचा सेवक बनावे”.
     जीवनात यशस्वी होणे किंवा कोणतेही उच्च पद मिळविणे हे मुळीच चुकीचे नाही. देवाने दिलेल्या देणग्यांचा वापर करूनच आपण जीवनात यशस्वी बनत असतो. पण अनेक वेळा आपल्याला, आपल्या यशस्वीपणाचा अहंकार चढतो. आपण दुसऱ्याला विसरतो. दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतो. संकटकाळी त्यांच्या मदतीला पाठ फिरवत असतो. अशा ह्या ‘मी’ घटक वृत्तीला बळी न पडण्यासाठी जीवनात नम्र व लीन राहणे आवश्यक आहे.  
     येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानात आपला संदेश, आपली शिकवून स्पष्ट करण्यासाठी अनेक अशा वृतांचा, दाखल्यांचा व चिन्हांचा वापर केला आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील त्याने ‘बालकाचे’ उदाहरण त्याच्या शिष्यांसमोर ठेवल्याचे आपण पाहतो. छोटी मुले ही मनाने नितळ व शुद्ध असतात. त्यांच्यात कुभावना कदापि नसते. कोण मोठा व कोण छोटा असा भेदभाव ते कदापि करत नसतात. बालकांप्रमाणे नितीमान, नितळ शुद्ध, प्रेमळ होण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पाचारले होते. ते जगातील राज्याचे शिष्य नसून, स्वर्गीय राज्याचे शिष्य होते. ह्याची जाणीव ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना करुन द्यायची होती.
     आजच्या शुभवर्तमानात जो नम्रतेने, लीनपणाने आपले जीवन जगतो, त्याला जग निराळे संबोधते. त्याला जगात किंमत नसते. तो भूतकाळात जीवन जगत असल्याचे जाहीर करतात. प्राणत्याग ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे स्वर्गीय राज्यात त्यांची किंमत अधिक आहे. देवाचे श्रेष्ठत्व त्याला लाभेल. तोच खरा ख्रिस्ताचा अनुयायी व त्याच्या स्वर्ग-राज्याचा भागीदार होण्यास पात्र ठरेल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस यांना प्रभुने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यासाठी त्यांना मनोबल द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जगात शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी अनेक अश्या सेवाभावी संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद सदैव रहावा व त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, प्रत्येक सदस्यात बंधुभाव वाढावा, एकमेकांत जवळीकता निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्री मंडळाचे सदस्य ह्यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आजच्या तरुण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे, प्रसंगी ते निराश होतात. ह्या तरुण पिढीत देवाने दिलेला उत्साह कायम टिकून राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपल्या सामाजिक व वैयक्तिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment