Thursday 26 January 2017

Reflection for the Homily of 4th Sunday in the ordinary Time (29-01-17) By Br Amit D’Britto




सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: २९/०१/२०१७.
पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१.
शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२.


"जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."



प्रस्तावना:

     आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. प्रत्येक मनुष्य हा सुख व आनंदाच्या शोधात असतो. प्रभू येशु ख्रिस्त आज शुभवर्तमानात आनंदी व सुख-समाधानी होण्यासाठी योग्य असा मार्ग दाखवत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा सफन्या लोकांस चांगुलपणाचा मार्ग निवडण्यास विनवणी करतो. कारण त्यामुळेच त्यांचे देवाच्या रागापासून संरक्षण होईल. प्रभू येशु ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन अस्तित्व प्राप्त होते असे संत पौल करिंथकरांस दुसऱ्या वाचनात सांगतो.
ह्या मिसाबलिदानात सहभागी होत असताना आपण आत्म्याने नम्र व लीन होऊन स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३

यिर्मया संदेष्टा येण्याच्या काही वर्षांपूर्वी संदेष्टा सफन्या ह्यांनी यरुशलेमेत उपदेश केला. प्रस्तुत उताऱ्याद्वारे संदेष्टा सफान्या लोकांना देवाने दाखवल्याप्रमाणे योग्य मार्गाचे आचारण करण्यास सांगत आहे. तसेच स्वत:ला शून्यवत करणारी नम्रतेची जीवनशैली स्वीकारण्यास आवाहन करतो. तो म्हणतो कि, ‘जे लोक आत्म्याने दिन आहेत व आज्ञा पालन करतात त्यांना कराराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. तसेच जे गरीब व दिन-दुबळे आहेत त्यांना देवामध्ये सामर्थ्य मिळेल’.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस सांगतो कि देवाने ज्ञानी व शहाणे ह्यांच्या तुलनेत साध्या व भोळ्या लोकांना निवडले आहे. तसेच शक्तिमान लोकांच्या तुलनेत त्याने दुर्बलांची निवड केली आहे. जगातील ऐहिक प्रतिष्ठेची तोरा कोणाला मिरवता येऊ नये याच उद्देशाने देवाने हे केले आहे. तसेच आपल्या सर्वांना ख्रिस्त येशु मध्येच राहणे योग्य आहे असे संत पौल सांगत आहे.



शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२

मत्तयने नमूद केलेल्या महान प्रवचनापैकी हे पहिले प्रवचन होय. सामान्यतः हे ‘डोंगरावरील प्रवचन’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याची रूपरेषा सर्वसाधारणपणे लूक ६:२०-४९ मध्ये दिलेल्या प्रवचनासारखी असली तरी हे प्रवचन खूपच दीर्घ आहे. ‘शिष्यपण’ किंवा ‘स्वर्गाच्या राज्यातील जीवन’ असा मध्यवर्ती मुद्दा घेऊन त्या भोवती संपूर्ण विषयाची मांडणी केली आहे. प्रवचनाच्या आरंभीच धन्यतेच्या आठ उदगारातून खऱ्या शिष्याचे अष्टपैलू-पूर्ण चित्रण केले आहे. ह्या सर्वांमुळे आपले जीवन चांगले होईल असे प्रभू येशू ख्रिस्त आपणास पटवून देत आहे. जीवनात अशा मार्गाने चालल्याने कोणाचीदेखील हानी होणार नाही असे ह्यातून स्पष्ट होते. “स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे” ह्या महत्वपूर्ण शब्दांनी या वाचन मालिकेचा आरंभ व शेवट झाला आहे. जे देवाला ‘राजा’ म्हणून मान्य करतात, त्यांच्या संदर्भात हे शब्द आहेत, आणि त्यांच्या जीवनात त्याचा हेतू परिपूर्ण व्हावा यासाठी ते निश्चयाने प्रतीक्षा करतात.

बोधकथा

एकदा एक श्रीमंत माणूस मदर तेरेजाच्या आश्रमाला भेट देण्यासाठी जातो. जेव्हा तो तेथे पोहचतो तेव्हा मदर तेरेजा ह्या एका अत्यंत आजारी व कुष्टरोगाने ग्रासलेल्या व्यक्तीच्या जखमा साफ करत होत्या. जेव्हा तो श्रीमंत व्यक्ती हे सर्व दृश्य पाहतो तेव्हा तो मदर तेरेजाला म्हणतो, “जर मला लाखो रुपये जरी मिळाले तरी सुद्धा मी हे काम करणार नाही.”  तेव्हा त्याला प्रतिउत्तर देत मदर तेरेजा म्हणाल्या, “मी सुद्धा हे काम कितीही पैसे मिळाले तरी करणार नाही, परंतु हे सर्व मी त्या व्यक्ती मध्ये दिसणाऱ्या प्रभूसाठी आणि त्याने दिलेल्या शिकवणुकीचे योग्य असे पालन करण्यासाठी करत आहे.” आज शुभवर्तमानात प्रभू येशु आपणास हाच मार्ग दाखवत आहे.


मनन चिंतन:

आज जगात सर्वजण सुखाच्या शोधात आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपल्याला आनंदाचा व सुखाचा मार्ग दाखवत आहे. आपण सुख हे पैसा, संपत्ती, अधिकार, व प्रतिष्ठा ह्या सारख्या गोष्टींमध्ये शोधत असतो. परंतु आपण खूप वेळा हरतो व फसतो. आपल्याला आवश्यक व समाधानकारक सुख मिळत नाही.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू जो सुखाचा मार्ग दाखवत आहे तो ह्या सर्व मार्गापासून खूप वेगळा आहे. ह्या जगात जे सुख आपल्याला संपत्ती, अधिकार किंवा प्रतिष्ठेने मिळते ते क्षणिक असते, परंतु आपल्याला जर चिरकाळ आनंद हवा असेल तर आपण प्रभू येशूच्या शिकवणूकीचा मार्ग अवलंबला पाहिजे.
आपण सर्वांनी आत्म्याने ‘दीन’ झाले पाहिजे. आपण ‘सौम्य’ व्हायला हवे कारण आपणास पृथ्वीचे वतन भोगायला मिळेल. तसेच जर आपल्याला तृप्त व्हायचे असेल तर आपण नितीमत्वाचा मार्ग अवलंबला पाहिजे. आपण दयाळू होणे खूप गरजेचे आहे व आपले अंतःकरण शुद्ध ठेवणे गरजेचे आहे; त्यामुळे आपल्याला देवाला पहावयास मिळेल. तसेच आपण हिंसेचा अवलंब न करता शांतीचा मार्ग पत्करला पाहिजे. जर आपला नितीमत्वासाठी छळ झाला तर आपण त्यासाठी तयार असावे कारण स्वर्गाचे राज्य अशाच लोकांचे आहे असे येशु म्हणतो. जर आपणास प्रभूच्या नावाने निंदा किंवा छळ सहन करावा लागला तर तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे कारण ह्याकरीता स्वर्गात आपले प्रतिफळ मोठे असणार आहे.
मोशे ‘सिनाय’ पर्वतावरून खाली येतो आणि लोकांना ‘दहा आज्ञा’ देतो. ह्या दहा आज्ञेद्वारे तो लोकांना योग्य असा मार्ग दाखवून देवाच्या अधिक जवळ आणत असे. आपला प्रभू येशु ख्रिस्त हा ‘नवीन मोशे’ आहे. कारण त्याने सुद्धा लोकांना नवीन आज्ञा दिल्या. आज शुभवर्तमानात आपणा पाहतो कि, ह्या नवीन आज्ञेद्वारे तो लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी व देवाच्या अधिक जवळ येण्यासाठी लोकांना मार्ग दाखवत होता.
कदाचित आपल्याला असे वाटेल कि आज शुभवर्तमान येशु ख्रिस्त ज्या आज्ञा आपणास देत आहे त्या पाळण्यास खूप कठीण आहे. परंतु आपल्या असे लक्षात येते कि, प्रभू येशु ख्रिस्ताने प्रथम शिकवण्या अगोदर हे सर्व कृतीत उतरवले व त्यामुळेच त्याने आपणास योग्य असा आदर्श दिला आहे.
आज  शुभवर्तमानात प्रभू येशु ख्रिस्त ज्या काही पूर्वसूचना देत आहे त्याचे योग्य असे पालन केल्याने आपणास सुखाचा अनुभव ह्या भौतिक जगातच नव्हे तर चिरकाळचा आनंद लाभणार आहे. कदाचित त्यांचे पालन करणे हे कठीण असेल परंतु ते अशक्य नाही. कारण ह्या सर्व आज्ञा कृतीत उतरवणाऱ्या अनेक संतांचे सोदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेत.
आज आपण जगावर जास्त परिणाम घडवणारे व्यक्ती येशु ख्रिस्त, गांधीजी, मदर तेरेजा व मार्टीन लुथर किंग ह्यांच्या जीवनात पाहिले तर असे लक्षात येते कि, हे सर्व व्यक्ती अतिशय लीन, नम्र व प्रेमळ होते. परंतु जे कोणी फार अभिमानी व गर्विष्ठ असतात त्यांचा द्वेष किंवा तिरस्कार केला जातो. प्रभू येशु ख्रिस्ताच्या शब्दात खूप सामर्थ्य आहे. तो म्हणाला, “आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत” (मार्क १३:३१). जर आपण प्रभूच्या शब्दाचा मान राखून त्याची वचने आपल्या आचरणात आणली तर नक्कीच आपल्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे देवा आम्हाला तुझा आशीर्वाद दे.

१.आपले परमगुरु , महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थांनी ख्रिस्ताच्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे; त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आपल्या समाजातील व धर्मग्रामातील जी कुटुंब दुरावलेली आहेत त्यांना प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन पुन्हा आपल्या कुटुंबात प्रेमाने, एकजुटीने रहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
४.ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी आपल्यामधील असलेला अहंकार, स्वार्थ व राग दूर  सारून एकजुटीने समाज बांधणीचे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment