Friday 3 March 2017


Reflection for the Homily of 1st Sunday of Lent 
(05-03-17) By Alfred Rodrigues



प्रायश्चित काळातील पहिला रविवार


दिनांक : ०५-०३-२०१७
पहिले वाचन : उत्पत्ती २:७-९,३:१-७
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ५:१२-१९
शुभवर्तमान : मत्तय ४:१-११


“मोहावर विजय मिळवणे”


प्रस्तावना

आज पवित्र ख्रिस्तसभा प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजही उपासना, पापांचा आरंभ व ख्रिस्ताने त्यावर मिळवलेला विजय ह्याविषयी सांगत आहे.
पहिला आदम म्हणजेच जुन्या करारातील आदाम हा पापाचा बळी ठरतो हे आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकतो. आजच्या शुभवर्तमानात नव्या करारातील आदाम म्हणजेच येशू ख्रिस्त हा पापाला बळी न पडता पापावर व मोहावर विजय मिळवतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आदाम व येशू ख्रिस्त यांच्यामधील विरोधाभास दाखविण्यासाठी त्यांची तुलना करतो.
ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने, सैतानाने दाखवलेल्या अमिषाला बळी न पडता मोहावर विजय मिळवला त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या जीवनात मोहावर विजय मिळवण्यास समर्थ ठरावेत म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात परमेश्वराकडून विशेष कृपा व शक्ती मागुया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : उत्पत्ती २:७-९,३:१-७

“मग परमेश्वराने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला(२:७). मूर्तिपूजक केनानी लोकांच्या लिंगपूजेत सापाचा वापर केला जात असे. त्यामुळे लेखकाने येथे येवेला मोहात पाडण्यासाठी सापाचे प्रतिक वापरले आहे.
     देवाने मानवाला ज्ञानवृक्ष सोडून सर्व झाडांची फळे खाण्याची मुभा दिली होती. सापाने मात्र येवेला विचारले, “देवाने तुम्हाला सर्व झाडांचे फळे खाण्यास बंडी केली आहे , हे खरे आहे काय?” तेव्हा येवा संभ्रमात पडली. संभ्रम हि पापांची पहिली पायरी असते. आणि तो संभ्रम हि निर्माण करण्यात साप यशस्वी ठरला. म्हणूनच परमेश्वराने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरउपयोग करून देवासमान होण्याचा क्षणिक मोहामुळे आदाम व येवेने देवाला दुखविले आणि देवाने दिलेल्या देणग्यापासून त्यांनी स्वताःला दूर सारले.

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ५:१२-१९

सर्व मानव जात पापाच्या प्रभावाखाली आहे म्हणून सर्वांना मुक्तीची गरज आहे, असे पौलाचे प्रमेय होते. ज्यू लोक स्वतःला सज्जन समझत होते. त्यांना निरुत्तर करण्यासाठी पौलाने त्यांच्याच धर्मशास्त्रातील सदर्भाचा उल्लेख करून ते कसे पापी आहेत हे दाखवून दिले.
केवळ धर्मशास्त्रातील नियमांच्या पालनामुळे माणसाची मुक्ती होऊ शकत नाही. त्याला ख्रिस्ताच्या कृपेची आवश्यकता असते असा युक्तिवाद पौलाने केलें आहे. देवाचे नितीमत्व असा शब्द पौलाने वापरला आहे. शेवटी तो म्हणतो, माणूस स्वतःच्या सामर्थ्याने नीतिमान होऊ शकत नाही, तर देव त्याला नीतिमान करतो.

शुभवर्तमान : मत्तय ४:१-११

एक मानव ह्या नात्याने येशूला सत्व परीक्षेला सामोरे जावे लागले, हि ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. स्वार्थासाठी आत्मबलाचा वापर करणे आणि सत्ता व संपत्ती मिळवण्यासाठी तत्वाशी तडजोड करणे असे मोहाचे स्वरूप होते. धर्मशास्त्रातील चिरंतन मूल्याच्या आधारेच या मोहाबरोबर मुकाबला करावा लागतो असे येशूने दाखवून दिले आहे.
सैतानाने देवाच्या आणि येशूच्या कार्यातही अडथळे निर्माण केले. त्याला पराभूत करून येशूने दुष्टपणावर विजय मिळवला. येथे देवपुत्र असणे म्हणजे काय हा मुख्य प्रश्न आहे व ते सिद्ध केले आहे.
परीक्षा हि अरण्यात घेतली गेली आहे किंवा घडलेली घटना आहे. म्हणून पवित्र शास्त्रात अरण्याची तुलना मोहाशी केली आहे. आणि त्याच अरण्यात येशूची सुद्धा परीक्षा घेण्यात आली. परंतु येशू ख्रिस्ताने सैतानाच्या मोहाला बळी न पडता त्या परीक्षेवर विजय मिळवला आणि आपण देवपुत्र असल्याचे दाखवून दिले.

बोधकथा

एके दिवशी सुरज पतंग उडवत होता. पतंग उंच आकाशात भरारी घेत होता व त्या पतंगाची दोरी सूरजच्या हातात होती. जसजसा सुरज आपल्या हातातील दोरी सोडत तसतसा पतंग वाऱ्यासंगे बागडत वर जात होता. आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व पक्षी मित्रांना हाय-बाय करत होता. इतर पक्ष्यांप्रमाणे एक ध्रुत कावळा पतंगाच्या सभोवती हिंडत होता. पतंगाचे जीवन पाहून त्या कावळ्याला राहवले नाही म्हणून त्याने पतंगाला प्रश्न केला, “मित्रा, तू इतका खुश दिसतोस पण तुला स्वातंत्र्य नाही कारण त्या मुलाच्या हातातील दोऱ्याने ते हिरावून घेतले आहे. तुला जीवनात आनंदित रहायचे असेल तर तुला ह्या दोऱ्यापासून मुक्त व्हायला हवे. पतंग थोडा वेळ विचार करतो व म्हणतो, “पण मला ह्यातून मुक्त कोण करेल?” त्यावर कावळा उत्तर देतो, “मी माझ्या चोचीने दोर कापून तुला मुक्त करीन.” कावळ्याने क्षणाचाही विचार न करता पतंगाचा दोरा कापून पतंगाला मुक्त केले व व्हायचे ते झाले पतंग गटांगळ्या खात क्षणात खाली कोसळले.

मनन चिंतन

त्या पतंगाप्रमाणे आपणही आपल्या जीवनात अशा मोहाला बळी पडत असतो. आपल्या जीवनात अशा काही संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना किंवा प्रसंग येतात ज्यावेळी आपल्याला परमेश्वराचे स्मरण होत नाही. आपल्या स्वतःवरील असलेला  विश्वास तुटून पडतो व आपण मोहाला बळी पडून सैतानाला अंगीकारतो.
प्रायश्चित काळ हा देवाजवळ येण्याचा काळ आहे. प्रायश्चित काळ हा आपल्याला पापापासून पळून देवाकडे वळण्याचा मंत्र देत आहे. संत पौल आपल्या इफिसकरास पत्रात ६:१० मध्ये म्हणतो, “प्रभूमध्ये व त्यांच्या सामर्थ्यामध्ये बळवंत होत जा. सैतानाच्या डावपेचात तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.”
आजच्या युगात जगताना सैतान त्याच्या शब्दाद्वारे व विचाराने आमिष दाखवून मोहाला बळी पाडतो. पण जर आपल्या जवळ देवाच्या वचनाची शस्त्रसामग्री धारण केलेली असेल तर सैतानाला प्रतिकार करण्यास आपणाला सामर्थ्य मिळते. देवाचे वचन पाळणारा मनुष्य कधीच विनाशाकडे जात नाही तर त्याचे तारण होत असते व त्याला सार्वकालिक जीवनाचा आनंद मिळत असतो.
उपवसाकाळात सैतानाने येशूची सुद्धा परीक्षा घेतली परंतु येशूने सैतानाचा प्रतिकार केला. अनेक वेळा आपण देवाचे वचन चांगल्या प्रकारे आत्मसात न केल्याने आपण सैतानाच्या मोहाला बळी पडतो. पदासाठी, पैशासाठी, संपत्तीसाठी किंवा नावासाठी देवाला नाकारून सैतानाच्या अधीन होतो व त्याचा मोबदला आपल्याला अशांती, असमाधान व दुःख अशा प्रकारच्या नकारात्मक प्रसंगांना बळी पडावे लागते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: प्रभो, तुझ्या मार्गावर चालण्यास आम्हाला प्रेरणा दे.

१.      आपल्या परमगुरुनां देवराज्याची मुल्ये सर्वत्र पसरविता यावीत व त्यांना ह्या कार्यात इतर धार्मिक पुढाऱ्याचे सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.      सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कल्याणाची कामे करत असताना विरोधास तोंड देऊन ख्रिस्ताप्रमाणे ठाम उभे राहावे व त्यांना पवित्र आत्म्याचे पाठबळ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया
३.      ह्या प्रायश्चित काळात प्रभुने आपल्याला आपल्या पापाचा धिक्कार करून त्याच्याकडे येण्याच्या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व त्याच्या शिकवणुकीनुसार चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.      जे आजारी आहे अशांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.      आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment