Thursday 22 August 2019




Reflections for the homily of 21st Sunday in Ordinary Time (25-08-2019) by Br. Robby Fernandes 







सामन्य काळातील एकविसावा रविवार





दिनांक- २५/०८/२०१९
पहिले वाचन- यशया: ६६: १८-२१
दुसरे वाचन- इब्री लोकांस पत्र: १२; ५-७,११-१३
शुभवर्तमान- लुक: १३:२२-३०

प्रस्तावाना-

          आज देऊळ माता सामन्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासन आपल्याला दोन विषयावर मनन चिंतन करावयास बोलावत आहे. एक म्हणजे- ‘रुंद मार्ग’ जो आपल्याला सैतानाकडे घेऊन जातो, तर दुसरा, ‘अरुंद मार्ग’ जो आपल्याला प्रभू येशू कडे घेऊन जातो, आता ह्या दोघामधील  कोणता मार्ग आपण निवडायचा, हे मात्र स्वतःवर अवलबून आहे. परंतु आज देऊळमाता ईश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा तारण प्राप्तीचा अरुद मार्ग अनुसरण्यास आपल्याला सांगत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर, यशया संदेष्टाद्वारे लोकांना सांगतो की, सर्व राष्ट्रांतील लोकांना एकत्र येऊन त्यांनी माझा महिमा व गौरव पाहावा, जेणेकरून त्यांना समजून येईल की, मी त्यांचा देव आहे. दुसरे वाचन हे इब्री लोकांस पत्र ह्यामधून घेतलेले असून ते आपल्याला  शिस्तीचे महत्त्व पटवून देते, ते तारणप्राप्तीसाठी किती महत्वाचे आहे हे सांगत आहे. तर शुभवर्तमानात  आपले तारण व्हावे म्हणून  अरुंद मार्ग निवडण्यास प्रभू येशू सांगत आहे.
          जर आपण परमेश्वराच्या मार्गावर न चालता इतर मार्गाचा उपयोग केला असेल तर परमेश्वरा चरणी क्षमा याचना मागुया व परमेश्वराच्या मार्गावर सदोदित चालण्यास कृपा सामर्थ्य मागुया.      

पहिले वाचन- यशया: ६६: १८-२१

          पहिले वाचन हे यशया संदेष्टांच्या पुस्तकातून घेतलेले आहे यशया सांगतो, की परमेश्वराला आपले विचार, कामे, आपली मने ठावूक आहेत. त्यामुळे तो आम्हांसर्वांना एकत्र करणार आहे; त्याची महिमा दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे इस्त्रायल लोक परमेश्वराला; पवित्र दाणे अर्पण करत त्याच प्रमाणे; परमेश्वर आपणाला शुद्ध करेल.

दुसरे वाचन- इब्री लोकांस पत्र: १२; ५-७,११-१३

          दुसऱ्या वाचनात परमेश्वर आपणाला शिस्तीचे उदाहरण देत आहे. शिस्त आपल्या जीवनाला नवा मार्ग देते. शिस्त आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे फार कठीण असते पण ह्या शिस्तीमुळे आपल्या जीवनामध्ये नवे वळण लागते व आपल्या जीवनाचा मार्ग नव्या दिशेने कार्यरत होतो व त्यामुळे आपण परमेश्वराचे अनुयायी व मुले बनतो; कारण तो आम्हांवर प्रेम करतो.

शुभवर्तमान-  लुक १३:२२-३०

          आजच्या शुभवर्तमानातील ख्रिस्त आपल्याला संदेश देतो की, तारण प्राप्तीसाठी फक्त अरुंद मार्गचा पर्याय सुचवतो आहे. लोकांनी येशूची शिकवण ऐकली परंतु त्या शिकवणी प्रमाणे वागले नाहीत त्यामुळे अनेक लोकांना तारण प्राप्त होण्यास कठोर होईल जे योग्य ठरले आहेत त्यांचीच देव राज्यामध्ये निवड झाली आहे, म्हणून येशू सांगतो, जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ने पाहिले होतील.

मनन चिंतन-

          आपले जीवन हे एक प्रवास आहे. ह्या प्रवासामध्ये चालताना अनेक प्रकारच्या लोकांची भेट होते. हा प्रवास दुसरा माणूस आपल्या साठी करू शकत नाही तो फक्त स्वत:लाच पूर्ण करायचा असतो, कारण आपल्या स्वत:लाच  माहित असते की आपले अंतिम मुक्कामाचे ठिकाण कुठे आहे, आणि जर आपण सभोवताली पाहिलं तर आपल्याला समजून येईल की जगातील प्रत्येक व्यक्ती प्रवास करत आहे, किंबहुना प्रत्येकाचा प्रवास करण्याचा मार्ग मात्र अलग असतो. या प्रवासाच्या मार्गावर चालताना व जीवनाचा आस्वाद घेताना खूप अडी-अडचणी आपल्या जीवनामध्ये समुद्राच्या लाटा प्रमाणे येतात व जीवनाच्या कुंपनावर मारा करतात परंतु ह्यामुळे आपल्या जिवनाचे ध्येय व लक्ष विचलित होते. अशा वेळी  आपण आपल्या ध्येया पासून भरकटतो. अशा ह्या परिस्थितीत आपली  देऊळ माता आपणा सर्वांना सांगत आहे की, आपला परमेश्वर प्रभू येशू हाच आपल्या आयुष्याचा मार्ग, सत्य व जीवन आहे.
          आज देऊळ माता आपणासमोर दोन प्रकारचे मार्ग ठेवत आहेत. एक म्हणजे, रुंद मार्ग जो आपणाला नरका मध्ये नेतो व दुसरा म्हणजे, अरुंद मार्ग, जो आपणा सर्वांना स्वर्गाकडे नेतो. आपण सर्वजण तारण प्राप्ती साठी धडपड करत असतो. पण तारणप्राप्ती आपल्याला साध्या व सोप्या मार्गावर होत नसते म्हणून येशू ख्रिस्त सांगतो की, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. जेणे करून तुम्ही सफल व्हाल. बायबल मध्ये आपल्याला दिसून येईल की स्वर्गाची तुलना खूप अशा प्रकारच्या वस्तूशी केलेली आहे. उदा. खमीर, मोहरीचा दाना, धन संपती, तसेच आजची वाचनेसुद्धा आपल्याला तश्याच प्रकारच्या मार्गाची जाणीव करून देतात. जेणे करून आपण जर त्या मार्गाने चाललो तर तारण प्राप्त होईल, आणि तो मार्ग म्हणजे अरुंद मार्ग.
रुंद मार्ग:
रुंद मार्ग हा आपल्याला पापा कडे घेऊन जातो आपल्याला साध्या व सोप्या पद्धतीने व कष्ट न करता सर्व काही मिळविण्याचा आश्वासन हा मार्ग देतो. त्यामुळे बहुतेक लोक ह्या सुखद मार्गाकडे जाण्यासाठी आकर्षित होतात. उदा. पैसा कमावण्यासाठी खूप प्रकारचे मार्ग आपल्या समोर उपलब्ध असतात. आपण कुठल्या मार्गाचा अवलंब करतो ह्यावर सर्वकाही स्थिर आहे. ह्या मार्गावर पुष्कळ लोक चालतात, कारण हा दुसऱ्या मार्गाहून जास्त रुंद व सरळ असतो, ह्या मार्गावर नियम नसतात, काहिहि अडथळे किव्हा कुंपण लावलेले नसते. आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो.
अरुंद मार्ग :
          अरुंद मार्ग हा आपणाला येशू कडे होऊन जातो अरुंद मार्गाद्वारे प्रवास करणे फार कठोर असते, म्हणून येशू म्हणतो, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, कारण पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. कारण आत जाण्याचा मार्ग हा अरुंद आहे, व ह्या मार्गावर दरवाजे सुद्धा अरुंद आहेत त्याच प्रमाणे हा मार्ग सुद्धा लहान, छोटा, लघु असा आहे, व ह्या मार्गावरील सर्व दरवाजे लहान व लघु आकाराचे आहेत. जर आपल्याला हा मार्ग घ्यायचा असेल तर हाल अपेष्टा सहन करायला सुद्धा तत्पर असायला पाहिजे. म्हणून ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आपल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही तर येशू ख्रिस्त ह्या अरुंद मार्गाविषयी, म्हणजे स्वत: विषयी आपल्याला ज्ञात करून देत आहे. कारण तो स्वत:हा अरुंद मार्ग आहे. जो कोणी ह्या मार्गावर चालेल त्यास तारण प्राप्त होईल.
          आपण सर्वजण आताच्या तंत्रज्ञानामध्ये एवढे गुरफटलो आहोत की, आपल्याला माहित नाही, कोठला मार्ग स्वीकारावा आपल्या समोर मृत्यू व जीवन हे दोन्ही ठेवले आहे, आपण फक्त काळजी पुर्वक्तेने मार्ग निवडायचा आहे. जेणे करून आपला देवाच्या राज्यात समावेश होईल.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक’

१)    हे प्रभू, खिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सीस, बिशप्स,धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित ठेव. सर्व आपत्ती पासून त्याचे रक्षण कर व तुझा शब्द लोकांस देण्यासाठी तू त्यांना तुझ्या शांतीचे साधन बनव.
२)    हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा  अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास आम्हा सर्वांना तुझे सामर्थ व बळ लाभूदे जेणे करून आम्हांला तारण प्राप्ती होईल.
३)    आज आपण विशेष रित्या प्रार्थना करूया जे लोक पाण्याच्या पुरामुळे बे-घर झाले आहेत, संकटा मध्ये आहेत, अशा सर्व लोकांना परमे श्वरी कृपेचा अनुभव यावा व त्यांचे पुन्हा एकदा प्रभूच्या प्रेमाने बहरावे म्हणून प्रार्थना करूया.
४)    आपल्या धर्म ग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत. त्यांना प्रभूच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नाविव जीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
५)    आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.
         

No comments:

Post a Comment