Monday 15 February 2021


 Reflection for the Ash Wednesday (17/02/2021) By Br. Brian Motheghar.   





राखेचा बुधवार



 

दिनांक:१७/०२/२०२१

पहिले वाचन: योएल २:१२-१८

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८

 



विषय: उपवासकाळ - अध्यात्मिक जीवनाचे नुतनीकरण

 

प्रस्तावना:

          आजपासून ख्रिस्तसभा आपल्याला नवीन जीवनाची सुरवात करण्यासाठी आमंत्रण करीत आहे. प्रायश्चित काळ किंवा उपवास काळ हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील महत्वपूर्व काळ आहे. या काळात आपण आपल्या पापमय जीवनाचा त्याग करून देवाच्या अधिक जवळ येण्यास प्रयत्न करत असतो. प्रायश्चित काळ किंवा उपवास काळाची सुरुवात राखेच्या बुधवारी राख कपाळावर फासून होते. हा चाळीस दिवसांचा आध्यात्मिक प्रवास आहे व तो पुनरुत्थानाच्या दिवशी समाप्त होतो. ह्या चाळीस दिवसाच्या कालावधीत खिस्तसभा आपल्याला योग्य असा वेळ देऊन आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूकडे परत येण्यास संधी देत असते. येशूने सुद्धा ४० दिवस उपवास केला व सैतानाच्या मोहाचा सामना केला. उपवास काळाचा उगम इtheच आहे. या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपण ४० दिवसाचा उपवास काळ पाळतो व पुनरुत्थानाची तयारी करत असतो. आज आपण आपले आत्मपरीक्षण करून अंत:करण शुद्ध करण्यास व पवित्र जीवन जगण्यास आणि ह्या प्रायश्चित काळात पात्र होण्यास देवाने आपणाला उपवास व दानधर्म करण्यास शक्ती द्यावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण विशेष प्रार्थना करूया. 

 

प्रायश्चित काळाची पार्श्वभूमी:

१)   उपवासकाळ कोणकोणत्या नावाने ओळखला जातो?

सहा आठवड्यांच्या या काळाला उपवासकाळ, प्रायश्चित काळ आणि स्थानिक भाषेत कोरेज्मा ह्या नावांनी ओळखले जाते. तसेच इंग्रजी भाषेत Lent हा शब्द हया काळासाठी वापरला जातो. प्रत्येक शब्दामागे एक पार्श्वभूमी दडलेली आहे.

अ) उपवासकाळ:  हया काळात उपवासाला अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आलेले असल्यामुळे त्याला उपवासकाळ असे म्हणतात. मराठी भाषेत या शब्दाची फोड पुढील प्रमाणे: ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे वस्ती. उपवास काळ हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा किंवा त्याच्या सहवासात राहण्याचा काळ असतो.

ब) प्रायश्चित्तकाळ: या काळामध्ये ज्या विविध प्रकारांची आध्यात्मिक साधना केली जाते तिच्यामागे भाविकांमध्ये पापांबद्दल प्रायश्चित्त घेण्याची भावना व पर्यायाने पश्चाताप करण्याची इच्छा दडलेली असते. त्यामुळे या काळाला प्रायश्चित्तकाळ म्हणतात.

क) कोरेज्मा: हा पोर्तुगीज शब्द असून, तो लॅटीनमधील क्वाँँड्राझिंटा (Quadraginta) या शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ 'चाळीस दिवसांचा कालावधी असा आहे.

ड) लेन्ट: जुन्या इंग्रजीमधील लेन्टेन ह्या शब्दाचा अर्थ वसंत ऋतू असा होतो. त्याचाच धागा पकडून उपवासकाळ हा अध्यात्माचा वसंतऋतू आहे असे उदगार संत महंतांनी काढलेले आहेत.

२)   उपवासकाळाचा मुख्य हेतू काय असतो?

प्रभूच्या पुनरुत्थानाची सणाची पूर्वतयारी करणे हा उपवासकाळाचा मुख्य हेतू असतो. तसेच आपल्या आध्यात्मिक व सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे ह्या उपवास काळाचे मुख्य हेतू आणि ध्येय ख्रिस्तसभा आपल्या समोर मांडत असते.

३)   उपवासकाळ हा चाळीस दिवसांचाच का असतो?

जसजसा ख्रिस्तसभेचा प्रसार झाला तसतसे नवनवीन प्रश्न उपस्थित झाले. त्यापैकी एक प्रश्न होता उपवासकाळ किती दिवसांचा असावा? हा प्रश्न इ. स. ३२५ साली नायसिया येथे झालेल्या विश्वपरिषदेमध्ये हाती घेण्यात आला व त्या ठिकाणी ४० या आकड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (नायसिया परिषद कॅनन ५). ४० हा आकडा ठरविताना बायबलमधील नोहाच्या काळातील चाळीस दिवसांचा जलप्रलय (उत्पत्ती ७:१२), मोशेचे सिनाय पर्वतावरील चाळीस दिवस (निर्गम २४:१८), इस्राएली लोकांची अरण्यातील चाळीस वर्षे (गणना ३३:३८), एलीया संदेष्ट्याने होरेब (म्हणजेच  सिनाय) पर्वताच्या दिशेने केलेला चाळीस दिवसांचा प्रवास (१ राजे १९:८), योना संदेष्ट्याने निनवेच्या लोकांना पश्चात्ताप करण्यासाठी दिलेला चाळीस दिवसांचा अवधी (योना ३:४) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येशूने अरण्यात केलेला चाळीस दिवसांचा उपवास (मार्क १:१३) इत्यादींचा आधार घेतला गेला. ह्या चाळीस दिवसांची सुरुवात राखेच्या बुधवारी होत असते व इस्टरच्या जागरण विधीने त्याचा समारोप केला जातो.

४)   उपवासकाळात ख्रिस्ती चर्चमधील वातावरण कसे असते?

उपवासकाळ हा आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ते वातावरण ख्रिस्ती मंदिरांत तयार केले जाते. ह्या दिवसांत देवळात फुले ठेवली जात नाहीत. उपासनेतील गायनात “परम ईशाला” हे स्तुतिगीत , “आल्लेलया” हा जयघोष वगळला जातो. गायनातील स्वर करुणरसाने भरलेला असतो. ह्या काळात देवळातील इमाजीपुढे मेणबत्त्या लावू नयेत असा प्रघात आहे कारण सर्व लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनावर असावे अशी ख्रिस्तसभेची धारणा आहे. येशूच्या दुःखसहनाची आठवण करून देणारी क्रुसाच्या वाटेची भक्ती वेदीसाठी आणि धार्मिक विधीसाठी वापरण्यात येणारी जांभळी वस्त्रे संध्याकाळची जादा प्रवचने (पास) आणि वैयक्तिक पापनिवेदन या घटकांमुळे देवळातील वातावरण अधिक गंभीर व गडद बनत जाते. ही वातावरणनिर्मिती भाविकांमध्ये केवळ अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला नको तर पूर्ण पश्चात्तापाद्वारे जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केली जाते.

५)   उपवासकाळात क्रुसाच्या वाटेची भक्ती का केली जाते?

प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ती झालेले यहुदी आपल्या परंपरेप्रमाणे वल्हांडण सणानिमिते जेरुशलेमच्या मंदिराला भेट देत असत. मात्र आता ह्या भेटीमागे प्रभू येशू ख्रिस्तावरील भक्तीची भावना व्यक्त करणे हा हेतू होता. त्यामुळे पिलाताचा राजवाडा ते कालवारीची टेकडी हा संपूर्ण मार्ग चालून येशूच्या दुःखसहनातील विविध घटनांवर चिंतन करण्याची पद्धत सुरू झाली. इ. स. १५०५ मध्ये बेल्जियममधील लुवेन येथील फ्रान्सिस्कन धर्मगरूनी चौदा स्थानांची आध्यात्मिकता प्रसारित करण्यास प्रारंभ केला, ही भक्ती इतकी लोकप्रिय झाली की ती केवळ जेरुसलेमच्या परिसरापुरती मर्यादित राहू शकली नाही. चौदा स्थानांची चित्रे त्यावर प्रार्थना व मनन चिंतन अगदी झपाट्याने सर्वत्र पसरले. आज कित्येक ख्रिस्ती चर्चमध्ये ह्या चौदा स्थानांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. बायबल व्यतिरिक्त ख्रिस्ती परंपरेतून चालत आलेल्या काही घटनांचा उल्लेख या चौदा स्थानांमध्ये करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ वेरोनिका तिचा उल्लेख नवीन करारात नाही. वेरोनिका (Verum + icon) या शब्दाचा अर्थ आहे वास्तव प्रतिमा. त्यावरून वेरोनिका बाईने येशूचा चेहरा पुसला व तिच्या रुमालावर येशूच्या चेहऱ्याचे चित्र उमटले अशी आख्यायिका तयार झाली. त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण, पुनरुत्थान रहस्याशी भाविकांनी एकरूप व्हावे अशी अपेक्षा असते.  मूलगामी ख्रिस्ती समूहाच्या चळवळीमुळे आज ही भक्ती गावागावात केली जाते. तसेच पारंपरिक भक्तीव्यतिरिक्त पर्यावरण सामाजिक प्रश्न, महिलांचे प्रश्न, युवकांच्या समस्या, ज्येष्ठांच्या अडचणी, ह्या विविध विषयांशी सांगड घालून ह्या भक्तीचे वेगवेगळे प्रकार चर्चमधून व गावागावांमधून तसेच एका चर्चमधून दुसऱ्या चर्चमध्ये जाऊन साजरे केले जातात. तसेच काही धर्मग्रामात चौदा अतिशय आजारी विकलांग व्यक्ती निवडून त्यांच्या घरासमोर क्रूसाच्या वाटेची भक्ती करण्याची पद्धत सुरू झाली आहे.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: योएल २:१२-१८.

योएल संदेष्टा सांगतो की आपण पश्चातापी मनाने परमेश्वराकडे जाण्याची गरज आहे. कारण परमेश्वर दयाळू आहे व तो आपल्या पापांची क्षमा करणारा आहे. पश्चाताप करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत: १) उपवास २) शोक ३) रडणे, इत्यादी. ह्या सर्व गोष्टी आपणास आपल्या पापांची आठवण करून देतात. कपडे फाडणे, अंगाला राख लावणे ह्या सर्व गोष्टी पश्चातापाचे प्रतिक असले तरी ते फक्त बाह्य रूप आहे. म्हणून योएल संदेष्टा सांगत आहे की, अशा बाह्य गोष्टी परमेश्वरासाठी समाधानकारक ठरत नाहीत. तर आपल्या अंत:करणाने व हृदयाने केलेली तयारी समाधानकारक ठरते. कारण खरी पश्चातापाची इच्छा (आस्था) ही हृदयातून येते.

योएल संदेष्टा हा सियोनांत कर्ण वाजवण्यास सांगत आहे. हा कर्ण बहुतंशा जुबली किंवा सणानिमित वाजवला जात असे. परंतु ह्या कर्णाचा खरा अर्थ हा देवाच्या आगमनाचा आहे (निर्गम १९:१६,१९, २०:१८) म्हणून योएल हा कर्णाच्या आवाजाद्वारे देवाच्या जवळ येण्याची कल्पना मांडत आहे. कारण देवाचा काळ जवळ आला आहे म्हणून तो सर्वांना उपवास व शोक करून देवाची करुणा व प्रेम अनुभवण्यासाठी बोलावत आहे.

 

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२.

           संत पौल करिंथकरांस पश्चाताप करून देवाकडे वळण्यास सांगत आहे. कारण, येशू ख्रिस्त ज्याला पाप ठाऊक नव्हते  त्याने आपल्या रीता पाप असे केले; जेणेकरून आपण त्याच्या समोर पवित्र होऊ. म्हणून संत पौल आपणा सर्वांस आपल्या पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे येण्यास सांगत आहे. तो आपणांस आशीर्वाद देतो परंतु, तो व्यर्थ जाईल असे करु नका. जर देवाचा आशीर्वाद तुम्हांस हवा असेल तर तुमची हृदये व मने स्वच्छ व देवासाठी आतुर ठेवा म्हणजेच त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येईल. 

 

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८.

शुभवर्तमानात येशू आपणास दान, धर्म व उपवास अशा ह्या तीन गोष्टी ज्या यहुदी परंपरेने केल्या जातात तशाच करावयास सांगत आहे. परंतु ह्या गोष्टी जसे शास्त्री व परुशी करतात तसे नाही; कारण त्यांचे हे वागणे ढोंग्यांचे स्वरूप आहे. जर आपणांस दानधर्म व उपवास करावयाचा असेल तर ते योग्य रीतीने करणे गरजेचे आहे. दुसरे आपणाला बघून आपली वाहवा (स्तुती) किंवा प्रशंसा करतील असे वागु नका; कारण लोकांची प्रशंसा आपणाला स्वर्ग राज्यात घेऊन जाणार नाही; कारण, ती प्रशंसा फक्त तात्पुरतीच असते. जर आपणांस सार्वकालिक सुख हवं असेल तर येशूख्रिस्त आपणास काय सांगत आहे ह्याच्याकडे आपले जास्त लक्ष असू द्या.

जेव्हा तुम्ही दानधर्म करणार तेव्हा तुमचे हे कृत्य दुसऱ्यांना कळता कामा नये. फक्त तुमच्या स्वर्गीय पित्याला जो स्वर्गातून तुम्हाला तुमचा वाटा देईल त्यालाच समजले पाहिजे. तसेच जेव्हा प्रार्थना करणार किंवा उपवास करणार तेव्हा ही तुमची हीच स्थिती राहिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा सार्वकाळीक आशिर्वाद मिळेल.

आज आपण प्रायश्चित्त काळात पदार्पण करत आहोत. हा काळ आपल्याला देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी प्रोत्साहित करतो. ह्या प्रायश्चित्त काळाचे महत्त्व म्हणजे फक्त उपवास करणे, किंवा काही वाईट गोष्टीपासून जसे दारू, सिगारेट ह्या पासून दूर राहणे एवढेच नव्हे तर दुसऱ्यांना क्षमा करणे, दुसऱ्यांना समजून कसे घ्यावे हे शिकवते. हा काळ आपणास देव किती दयाळू व क्षमाशील व प्रेमळ आहे हे सांगते. शत्रूवर प्रेम करा, वाईट करणाऱ्यांचे बरे करा व त्यांच्यासाठी प्रार्थना करा ही आपल्या प्रेमळ येशूची शिकवण आहे आणि आपण त्याच्या शिकवणीनुसार वागलो पाहिजे.

 

मनन चिंतन:

शुभवर्तमानामध्ये आपल्याला दान, धर्म व उपवास या यहुदी धर्मातील तीन मध्यवर्ती सूत्रांवर आधारित शिकवण प्रभू येशू देत आहे. हे सर्व येशूच्या शिष्यांना व आपणा सर्वांना लागू असल्याचे गृहीत धरले जाते. ह्या वाचनात आपण हे सर्व ‘करावे’ किंवा ‘का करू नये’ हे प्रश्न नसून ते ‘कसे’ व ‘का करावे’ हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण दानधर्म व उपवास करत असतांना प्रतिफळ मिळवण्याच्या हेतूने करू नये हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म करू नये. तसेच प्रार्थना करताना निरर्थक बडबड न करता शांतपणे व एकांतात प्रार्थना करावी. तसेच आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा तो लोकांना न दाखवता एकांतात वास करणाऱ्या देवाला दिसला पाहिजे, म्हणजे आपला अदृश्य पिता आपणास उघडपणे त्याचे प्रतिफळ देईल, असे आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे.

कपाळाला राख का लावली जाते व त्या मागचे कारण काय?

राखेचा बुधवार हा प्रायश्चित काळातील (उपवास काळातील) पहिला दिवस. हा दिवस पुनरुत्थानाच्या (इस्टर) ४६ दिवसा अगोदर येतो. मत्तय, मार्क, व लुकलिखित शुभवर्तमानाद्वारे येशूने ४० दिवस अरण्यांत (वाळवंट) उपवास केला व सैतानाच्या मोहाचा सामना केला. उपवास काळाचा उगम इथेच आहे, या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपण ४० दिवसाचा उपवास काळ पाळतो व येशूच्या पुनरुत्थानाची तयारी करत असतो.

राखेच्या बुधवारी आपल्या कपाळाला राख लावली जाते. ही राख आपल्याला आपल्या वाईट कृत्यांची आठवण करून देते. ह्या राखेद्वारे आपल्याला आवाहन केले जाते की, “वाईट मार्ग सोडून चांगल्या जीवनास सुरुवात करा” “पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा” (मार्क १:१५) ह्या शब्दात आपले जीवन बदलण्यास आवाहन दिले जाते. काँस्टनटाईन राजाने ख्रिस्ती धर्मप्रसाराला परवानगी दिल्यानंतर रोम शहरात पश्चाताप्यांना जाहीररीत्या पश्चाताप देण्याची प्रथा सुरु झाली. जुन्या करारात अश्या प्रकारच्या पश्चातापाची प्रथा प्रचलित असल्याचे आपल्याला बायबल मधील विविध वचनांद्वारे कळते: “म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चाताप करीत आहे.” (ईयोब ४२:६). “हे वर्तमान मर्दखायच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठे आक्रदान केले...बहुतेक लोक गोणताट नेसून राखेत पडून राहिले.” (एस्तर ४:१-३). “माझ्या लोकांच्या कन्ये, कमरेला गोनताट गुंडाळ, राखेत लोळ...”(यिर्मया ६:२६). “तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकीला व डोक्यावर हात ठेऊन वाटेने ती रडत ओरडत चालली.”(२ शमुवेल १३:१९). “ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दु:खाने रडत आहेत; ते आपल्या डोक्यात धूळ घालीत आहेत आणि धुळीत लोळत आहेत.”(यहेज्केल २७:३०). “हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोनताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली.”(दनिएल ९:३), आपणाला नव्या करारात सुद्धा अनेक उदाहरणे दिसून येतात जेथे प्रभू येशू लोकांना सांगत आहे की, कशाप्रकारे अविश्वासी लोकांनी पश्चाताप केला असता तर ते वाचले असते. उदाहरणार्थ येशू म्हणतो, “खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणताट व राख अंगावर घेवून पश्चाताप केला असता” (मत्तय ११:२१; लुक १०.१३.)

कपाळाला राख फासणे हे आपल्याला अंत:करणातून करायच्या असलेल्या पश्चातापाचे बाह्य चिन्ह आहे. ह्या बायबल वचनांचा आधार घेऊन अश्या लोकांसाठी उपवासकाळाच्या पहिल्या दिवशी राख फासणे, गोनताट नेसणे व पवित्र गुरुवारी समेट होईपर्यंत श्रधावंतांपासुन दूर राहणे ह्या गोष्टी जाहीरपणे कराव्या लागत. आठव्या ते दहाव्या शतकादरम्यान ही प्रथा बंद पडली आणि केवळ कपाळाला राख लावायची प्रथा सुरु झाली. ह्या दिवशी राखेला आशीर्वाद देऊन (ही राख गत वर्षाच्या झावळ्याच्या रविवारी आशीर्वादित केलेल्या झावळ्यांच्या पात्यापासून बनवली जाते.) ती प्रत्येकाच्या कपाळावर फसली जाते व ही राख कपाळाला लावताना, “मानवा, तू पापी आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील”(उत्पती ३:१९); किंवा “पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” (मार्क १:१५) हे शब्द उच्चारले जातात. खरे पाहता राख म्हणजे नाश, विध्वंस आणि नश्वरता! परंतु इस्टरच्या अग्नीमुळे ह्याच राखेला शुद्धीकरण, पश्चाताप व परिवर्तन ह्या सकारात्मक दृष्टीकोनाचं प्रतिक मानले गेलेले आहे.

आज आपण गोणपाट व अंगाला राख ओढण्या ऐवजी कपाळाला राख लावतो ही राख फक्त देखावा नाही तर आपल्याला आपल्या मानवी पापमुक्त जीवनाची आठवण करून देत आहे. आजपासून आपण चाळीस दिवसांचा तप ठेवणार आहोत हा तप कोणासाठी? कशासाठी? ह्याचा आपण कधी विचार केला आहे का? प्रभू येशूने अरंण्यात चाळीस दिवस उपवास केला व सैतानाच्या मोहाला बळी न पडता त्यावर विजयी झाला. आज आपणालासुद्धा हे चाळीस दिवस सैतानी कृत्ये विचार शब्द इत्यादी ह्यांच्यावर मात करण्यासाठी बोलावले आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू आमचे आत्मपरिवर्तन करण्यास सहाय्य कर.” 

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहनारे आपले परमगुरु पोप फ्रान्सिस तसेचे सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची सुवार्ता पसरविण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ लाभावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करू या.

   २. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहतेहे उत्तम उदाहरण घेऊन आपण प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करूयाप्रत्येक कुटुंबाने एकत्र यावे व प्रार्थना करावी जेणेकरून त्यांच्या  घरात प्रेमशांती व सौख्य नांदावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

    ३. जे  लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या उपवास काळात देवाचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावेम्हणून आपण प्रार्थना करू या.

    ४. जे आजारी आहेत त्यांना देवाने चांगले आरोग्य दयावे तसेच जे लोक आजाऱ्यांना मदत करतात त्यांना देवाने आशीर्वाद दयावाम्हणून आपण प्रार्थना करू या.

     ५. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक गरजासाठी आपण देवाजवळप्रार्थना करू या.




1 comment:

  1. फारच सुंदर अध्यात्मिक माहिती आहे.

    ReplyDelete