Sunday, 5 April 2020


Reflections for the Easter Vigil (12-04-2020) By Br. Brian V. Motheghar.





पुनरुत्थान रविवार
जागरण विधी



दिनांक: १२/०४/२०२०.
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२.
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८.
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१.
चौथे वाचन: यशया ५४:५-१४.
पाचवे वाचन: यशया ५५:१-११.
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४.
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८.
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११.
शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०.







आजच्या ह्या विधीचे चार भाग आहेत:
पहिला भाग: प्रकाश विधी:- पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग: प्रभुशब्दविधी:- येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचने, जगाच्या सुरूवातीपासून देवाने मानवावर प्रेमाचा वर्षाव केला, त्याची आपणाला आठवण करून देतात.
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद:- येथे बाप्तिस्म्यासाठी लागणाऱ्या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्य साधारण आशीर्वाद आहे.
चौथा भाग: ख्रिस्तशरीर स्विकारविधी:- येथे आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण घेतो.
           
प्रास्ताविक:
          प्रिय ख्रिस्ती मित्रांनोया पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला. या शुभप्रसंगी ख्रिस्तसभा साऱ्या जगातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावित आहे. हा प्रभूच्या वल्हांडणाचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्य रहस्ये साजरी करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले; तर त्याच्या मरणावरील विजयात आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन-मृत्यू ओलांडून; वेळ-स्थळ ह्याच्या पलीकडे जाऊन; वल्हांडनाच्या सणाला नवीन अर्थ प्राप्त करून दिला आहे. आता हाच प्रभू येशू ख्रिस्त ह्या वल्हांडन सणाचा मध्यभाग आहे.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२.
          उत्पत्तीच्या पुस्तकातील सुरुवातीच्या भागात देव कोण आहे? त्याचा जगाशी संबंध काय व कसा आहे? हे स्पष्ट केले आहे. सर्वकाही त्याचसाठी व त्याच्याद्वारे अस्तित्त्वात आहे. दहा दिव्य आज्ञांनी सहा दिवसांच्या काळात निर्मीतीची कृत्ये घडून आली. एक ते तीन दिवस आणि चार ते सहा दिवस यांच्यात काही अनुरुपता आहे. अखेरीस सातव्या (शब्बाथ) दिवशी त्याने विसावा घेतला.
          सहाव्या दिवशी सर्व उत्पत्तीचा मुकुटमणी असा मानव ‘नर व नारी’च्या रूपाने निर्माण केला; तेव्हा उत्पत्तीचे हे कार्य शिगेस पोहचले. देवाच्या उत्पत्तीच्या कार्यात मानवाची निर्मीती ही सर्वांत श्रेष्ठ कृती आहे; हे त्यांची निर्मीती व भूमिका यांविषयीच्या विस्तृत विवेचनावरून स्पष्ट होते. (१:२६-२९) "हा वृत्तांत वाचला तर त्यातून पृथ्वीवरील मानव जीवना विषयीची उत्कट कळकळ दिसते. सृष्टी निर्मीतीसंबंधीचे इतर प्राचीन पौर्वात्य वृत्तांत आहेत त्यांच्याशी तुलना करता, मानवी हिताची कळकळ अधिक उठून दिसते. देव फक्त एक आहे. तो काळातीत आहे. तोच आदि आहे. त्याने सर्वकाही उत्पन्न केले. इतर लोक ज्यांना दैवत समजत, ते सूर्य, चंद्र आणि तारे हेही त्याने उत्पन्न केले. त्याचा केवळ एक शब्द हे सर्व साधण्यास समर्थ होता. उत्पत्तीमधील वृत्तांतानुसार देव एकच आहे, तोच सार्वभौम उत्पन्नकर्ता आहे. निर्माण केलेल्या विश्वामध्ये स्त्रीपुरुषांना मानाचे स्थान आहे. कारण देवाने त्यांना दिव्य प्रतिरुपाचे असे निर्माण केले आहे. आम्ही देवाचा भाव प्रतिबिंबित करतो आणि या पृथ्वीवर आम्ही त्याचे प्रतिनिधी आहोत.

दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८.
          उत्पत्तीच्या पुस्तकातील ही एक अतिशय नाट्यमय घटना आहे. ईश्वरपरिज्ञानाच्या दृष्टीनेही ही घटना विशेष महत्त्वाची आहे. इसहाकचे यज्ञार्पण करण्याची निष्ठुर आज्ञेप्रमाणे, अब्राहामने आपल्या मुलाला घेऊन यज्ञार्पणाच्या जागी जड अंत:करणाने वर चढून जाणे, यातील कारुण्य, इसहाकला यज्ञपशूसारखे बांधून वेदीवर ठेवताना अब्राहामची झालेली अवस्था, त्याच्या अंत:करणाला होणाऱ्या वेदना आणि अगदी निर्वाणीच्या क्षणी स्वर्गातून हस्तक्षेप होऊन आनंदी-आनंद यामुळे जागतिक वाङ्मयात या वृत्तांताला उत्तमपणे सांगितलेली कथा म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे. पण एवढेच याचे महत्त्व नाही. अब्राहामच्या विश्वासाची ही अखेरची सत्त्वपरिक्षा आहे. ही कसोटी होती असे आपणाला सांगितले असले, तरी अब्रामच्या दृष्टीने ही वास्तविक देवाची आज्ञा होती आणि ती पाळायची होती. भावनात्मक दृष्टीने आणि ईश्वरविज्ञानाच्या दृष्टीनेही ती अतिशय धक्कादायक होती, कारण आशीर्वादांची सर्व अभिवचने पूर्ण होणे इसहाकवर अवलंबून होते.
          एकीकडे अपत्यप्रेम आणि दुसरीकडे देवाचे आज्ञापालन अशा कात्रीत सापडलेल्या अब्राहामला काही सुचेना. काहीही केले तरी द:ख ठरले. पण टप्प्याटप्प्याने विश्वास व आशायांचा विजय झाला. भय आणि संशयाचे सावट हळूहळू दूर झाले आणि अखेर त्याने मुलाचा वध करण्यासाठी सुरा उगारला. दुसरा कोणताही विचार, भावनिक बंधन, ध्येये वगैरेसर्व बंध बाजूस करून आपण देवाच्या आज्ञेलाच सर्वस्वी महत्त्वाचे मानतो हे त्याने दाखवून दिले आणि त्याचक्षणी ही कसोटी संपली. तो या कसोटीत उत्तमप्रकारे उत्तीर्ण झाला. इसहाकच्या ऐवजी एका एडक्याचे अर्पण केले. अब्राहामने केलेल्या या कठोर आज्ञापालनामुळे अभिवचनांचा दर्जा बदलण्याचे देवदुताने त्याला जाहीर केले.

तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१.
          वल्हांडणापर्यंत घडलेल्या घटनांचे चक्र आणि प्रस्तुत भाग यात बरेचसे साम्य आहे. येथे पुन्हा काही ओळखीचे मुद्दे पुढे येतात. फारोचे मन कठीण होणे, मोशेच्या हातातील काठी समुद्रावर उगारणे आणि इजिप्तचे लोक व इस्राएल लोक यांच्यात देवाने केलेला भेद. इस्राएल लोक इजिप्तमधून बाहेर पडले. फारो आणि इजिप्तचे सैन्य सर्वच नष्ट झाले. येथे निर्गमच्या पुस्तकातील पूर्वार्धाचा उत्कर्षबिंदू गाठला आहे. पण अद्याप देवाच्या सामर्थ्याची आणखी एक अंतिम प्रचिती दिसायची होती, म्हणून देवाने इस्राएल लोकांचे कनानच्या दिशेने जाणे लांबवले. ते इजिप्तमध्ये तांबडया समुद्राच्या पश्चिम बाजूस राहिले. फारो आणि त्याचे सैन्य झपाटयाने पुढे आले. त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या दासांना गाठले. आता आपली पुरती फजिती झाली, आपण सापळ्यात सापडलो असे समजून इस्राएल लोक घाबरून गेले. परंतु मोशेने आपल्या हातातली काठी समुद्रावर सरळ पुढे धरली. समुद्राचे पाणी दुभंगले आणि मधील मोकळ्या वाटेने लोक सुखरूप पलीकडे गेले. इजिप्तचे लोक त्यांच्यामागे आले तेव्हा मोशेने आपला हात पुन्हा पुढे केला. फारो आणि त्याचे सैन्य यांच्यावर पाण्याचे लोटच्या लोट आले. त्यातला एकही वाचला नाही.

चौथे वाचन: यशया ५४:५-१४.
          या अध्यायातील उत्कर्षशांती आणि सुरक्षितता याचे वर्णन केलेले आहे. स्वगृही परत येण्याचे थोर वर्णन केले आहे. पौलाला सारा आणि हागार त्यांच्यात त्याला खरी मंडळी दिसली. तिच्या सभासदांचा जन्म वरून झाला आहे, जगव्यापी विस्ताराचे अभिवचन आणि जुन्या रचनेवर पडणारा भार या गोष्टी प्रेषितांच्या युगात दृष्टोत्पत्तीस येणार होत्या. बहकलेल्या बायकोचे रूपक, अपार सहानुभूतीने दोष नव्हे तर त्यातील वेदना पूढे आणल्या आहेत. येथे पूर्नमिलनातील जिव्हाळा आहे, जो कायमचा, बिनशर्त आणि योग्यता नसताना पात्र आहे. 
          रत्नखचित नगरी, सौंदर्य आणि सामर्थ्य यांच्या मिलापातून साधलेले मंडळीच्या या लखलखणाऱ्या चित्रापूढे संकुचित डेरा आणि उद्ध्वस्त यरुशलेम कोठल्या कोठे लोप पावतात याचा अधिक विस्तार केला आहे. मात्र याचा अर्थानवाद साध्याशब्दांनी केला आहे. त्यात धार्मिकता, अभेद्यता यांची मुळे वैयक्तिक शिष्यत्वात खोल गेलेली आहेत. शिष्यत्व हे नव्या कराराचे एक लक्षण आहे. देवाच्या नगरीचे खरे सामर्थ्य हेच आहे; तिला हल्ल्यापासून कायमचे प्रतिबंधक संरक्षण दिलेले नाही तर निरुत्तर करणारे सत्य हेच शख तिला दिले आहे.

पाचवे वाचन: यशया ५५:१-११.
          येथे गरजवंतांना व तान्हेल्यांना ज्या आपुलकीने व जिव्हाळ्याने आमंत्रण दिले आहे; ते नव्या करारातही दिसत नाही. या अध्यायाचे विवेचन दोनदा कळसास पोहोचतात. दारिद्रय, विपुलता, कार्यध्येय याचे चौफेर आवाहन सर्व मानवी गरजांना पुरून उरणारे आहे. तसेच हे आवाहन फक्त एकवक्तीही असले तर त्याच्यासाठीही आहे. पवित्र शास्त्राच्या समाप्तीच्या वचनात याचेच पडसाद उमटले आहेत, आणि येशूनेही योहान ६:३५ मधून ‘माझ्याकडे या’ ह्या शब्दांतून 'या... खा' असेच आवाहन केले आहे. 'पैक्यावाचून व मोलावाचून सौदा करा' या विरोधाभासातून कृपेद्वारे प्राप्त होणारी व संपूर्ण अवलंबने हे दोन घटक स्पष्ट होतात.
          निमंत्रण हे वैयक्तिक पातळीवर आहे. मनाला आणि इच्छेला आवाहन करून श्रोत्यांना करारामध्ये आणून मशीहाच्या जागतिक सेवाकार्यात सहभागी करण्याचे निमंत्रण आहे. राष्ट्रे याच मशीहाची प्रतीक्षा करीत आहेत. माणूस भुकेला असला तर त्याची भूक भागवण्याची गरज असते, त्याचप्रमाणे तो दुष्ट आहे त्याला तारणाची गरज आहे. देवाचे पाचारण आणि शोध याला पापी व्यक्तीचा प्रतिसाद हवा. इच्छा, सवयी आणि योजना  यांना आवाहन केले आहे. हे आवाहन नकारात्मक (त्यागकरा) आणि होकारात्मक (वळा) असे आहे.

सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४.
          परमेश्वराकडे परत फिरल्या नंतर जर आपण जो सन्मार्ग निवडला आहे त्याच्यावर चिकाटीने चालत राहिलो, तर आमचे कल्याण होईल. पुनरुत्थानाचा आनंद आम्हाबरोबर निरंतर राहील.

सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८.
          हा दिव्यसंदेश यहेज्केलच्या पुस्तकाचा केंद्र बिंदू आहे. हा संदेश थोडक्यात या पुस्तकाचा सारांश आहे. रक्तपात व मूर्तीपूजा करून इस्राएलने देवाचा अपराध केला होता, राष्ट्रांमध्ये पांगापांग, बंदिवास हीच या अपराधाची शिक्षा होती. परंतु देव त्यांना तिकडे तसेच वाऱ्यावर सोडून देणार नव्हता. ते त्यांच्या देशात परत येतील. देव त्यांना शुद्ध करील, त्यांचा पालट करील आणि ते त्याच्या मागे चालतील. देश व देशातील लोक यांची पुन्हा भरभराट होईल. देवाने कार्य केले आहे हे भोवतालच्या राष्ट्रांना समजेल. देव आपल्या लोकांना त्यांच्या बंदिवासातून परत का आणणार त्याचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे. लोकांमध्ये मूळचाच काही चागुलपणा आहे; अगर ते प्रिय वाटावे असे काही त्यांच्यात आहे असेही नाही. आपल्या नावाची नाचक्की होऊ नये ही देवाची इच्छा, हेच ते कारण आहे. देव तारण करण्यासाठी कार्य करतो. पण तो ते आमच्या पात्रतेनुसार नव्हे; तर आपल्या विपुल दयेनुसार करतो.

आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११.
          ‘जे कृपेच्या राज्यात आहेत ते पापाला मेलेले आहेत.’ या वाक्याचा अर्थ या वचनांत दिलेला आहे. कृपा वाढावी यासाठी पाप करण्याची गरज नाही. आपण कृपेत प्रवेश केला आहे. ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला व जे नीतिमान ठरले आहेत त्यांना उद्देशून पौल 'आपण' हा शब्द वापरतो. आपण आपल्या पापामुळे मेलेले होतो (इफिस २.१). आपण नीतिमान ठरलो असलो तरी आपल्याकडून पाप होण्याची शक्यता आहे. जो ख्रिस्त पापासाठी मेला तो पापालाही मेला (व. १०). तसेच, आपणही पापाला मेलो आहोत (व. २). आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हाच ख्रिस्ताचे मरण, पुरले जाणे व जिवंत होणे या सर्व गोष्टीत ख्रिस्ताशी एकरूप झालो. या कृर्तीना ख्रिस्ताच्या मरणात बाप्तिस्मा घेणे असे म्हटले आहे (व. ३).
          आपला पाण्यात बाप्तिस्मा झाला तेव्हा आपण हे सत्य जाहीर केले. याचा अर्थ असा की, आपल्यावर पापाची सत्ता किंवा राज्य आता नाही. पापाचा व आपला संबंध तुटला आहे. आता ख्रिस्ताचे जीवन आपल्याला प्राप्त झाले आहे व त्या जीवनाने आपण पापाची सत्ता नसलेले नवीन जीवन जगू शकतो. या नवीन प्रकारच्या जीवनाने आपण जगावे व वाटचाल करावी.

पार्श्वभूमी:
इंग्रजीमध्ये विजील (vigil, जागरण, पहारा) ह्याचा अर्थ होतो ‘वॉच’ (watch, लक्ष देणे). लष्करामध्ये पहारेकरी लष्करी छावणीवर नेहमी लक्ष ठेवतात किंवा पहारा देतात. काही वर्षाअगोदर प्रत्येक गावामध्ये दिवसा अन् रात्री आळीपाळीने रखवालदार ठेवला जाई जेणेकरून गावाचे रक्षण होईल अथवा अनपेक्षितरित्या शत्रू गावावर हल्ला करून तो गाव आपल्या ताब्यात घेत असत.
ख्रिस्तावर विश्वास ठेवाणारा पहिला समुदाय प्रत्येक मोठ्या सणाच्या संध्याकाळपासून संपूर्ण रात्रभर जागरण करत असे परंतु हे जागरण भीतीमुळे किंवा कशाचाच पहारा करण्यासाठी नव्हते; तर उलट ते कोणाच्यातरी येण्याची आशेने व उत्कंठतेने वाट पाहत असत. ज्याची ते वाट पाहत तो व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त होय. ख्रिस्ती समुदाय एकत्र जमून संपूर्ण रात्रभर पवित्र शास्त्र वाचण्यात, त्याचा खुलासा करून त्यावर मनन-चिंतन करण्यात व प्रभूची प्रार्थना व स्तुती-आराधना करण्यात घालवत असत व हे जागरण पहाटे ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आठवणीने म्हणजेच ख्रिस्तयागाने संपवत असत.
वर्षातील सर्वात महत्वाचं जागरण ते येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी करत असत, त्याला पास्काच जागरणम्हणून ते संबोधित असत. ख्रिस्ती समुदायाने हे नाव आणि त्याची तारीख यहुदी लोकांच्या वल्हांडण सणावरून घेतली आहे. परंतु याहुद्यांपेक्षा ख्रिस्ती जनतेला हा सोहळा सखोल अर्थाचा व अधिक महत्वाचा आहे. यहुद्यांसाठी वल्हांडण म्हणजे परमेश्वराच्या दूताने मिसर देशातील घरांना ओलांडून जाणेआणि यहुद्यांची घरे सुरक्षित ठेवून मिसर देशात जन्मलेल्या माणसांपासून तर गुराढोरांपर्यंत प्रथमवत्स्याचा वध करणे तसेच फारोच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन परमेश्वराने कबूल केलेल्या देशात निघून जाणे. परंतु ख्रिस्ती लोकांसाठी वल्हांडण म्हणजे येशूचे मरणातून पुनरुत्थानाकडे वाटचाल, जणूकाही तिमिरातून तेजाकडे आणि दु:खातून-सुखाकडे. ह्याच घटनेमुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती मरणातून पुनरुत्थानाकडे व पापातून नवीन जीवनाकडे वाटचाल करतो.

शुभवर्तमान: मत्तय २८:१-१०. 
यहुदी लोक मृतांना काळजीपूर्वक पुरत असत. मृतांना कपड्यामध्ये कश्याप्रकारे गुंडाळायचे, विशेषप्रकारचा मलम कसा वापरावा जेणेकरून शरीराचा ऱ्हास होण्यापासून किंवा सडण्यापासून बचाव कसा करता येईल हे सर्वकाही ते मिसरवासियांकडून (इजिप्तच्या लोकांकडून) शिकलेले होते. श्रीमंत लोक फार मोठी रक्कम खर्च करून त्यांच्या घरच्यांना पुरण्यासाठी हे सर्वकाही करत असत.
येशू ख्रिस्त गरीब होता, त्याच्याकडे अशाप्रकारची उत्तरक्रिया करावयास पैसे नव्हते, पुरण्यासाठी त्याच्याकडे स्वतःची कबर देखील नव्हती. परंतु शुभवर्तमान सांगते की निकदेमस नावाच्या श्रीमंत माणसाने (जो येशूचा गुपीत अनुयायी होता: योहान ३:१-२१) सुमारे शंभर रत्तल मिश्रण आणले जेणेकरून यहुद्यांच्या उत्तरक्रियेच्या रितीप्रमाणे येशूची उत्तरक्रिया होईल (योहान १९:३९). ज्यादिवशी येशू मरण पावला तो शुक्रवार होता आणि त्याची उत्तरक्रिया करावयास त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता कारण (वल्हांडण सणाच्या) तयारीचा दिवस सुरु होणार होता (लूक २३:५४, मार्क १५:४२) आणि अश्याप्रकारचे कोणतेही कामे करण्याची नियमशास्त्रानुसार परवानगी नव्हती (निर्गम १६:२३, २०:८, ३१:१४, अनुवाद ५:१२), म्हणून ते तसेच घाईमध्ये परंतु पुन्हा शब्बाथ संपल्यानंतर येऊन नीट पुरण्याच्या आशेने येशूला कपड्यामध्ये गुंडाळून जातात.
शब्बाथानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच सूर्याची पहिली किरणे दिसताचभल्या पहाटे स्त्रिया कबरेवर जाण्यासाठी निघतात, परंतु तेथे पोहचताच त्यांना कबर रिकामी सापडते. येशू पुनरुत्थित झाला आहे हे त्या कबरेवर बसलेला दूत त्यांना सांगतो व कशाप्रकारे येशू ख्रिस्ताने त्याचे दु:खसहन, मरण व पुनरुत्थान ह्याविषयी सांगितले होते व त्याची पूर्तता कशी झाली हे त्यांच्या मनी आणुन दिले (मत्तय १६:२१, १७:२३, २०:१९, २६:३२, लूक २४:७). हे दृश्य येथेच संपत नाही. त्या स्त्रिया परतत असताना येशू त्यांना दर्शन देतो. ते म्हणजे“ही शुभवार्ता स्वत:पुर्ताच न ठेवता इतरांना देखील सांगा” (मत्तय २८:७, २८:१०).

येशूच्या पुनरुत्थानाची सूचकता किंवा अर्थपूर्णता:
(१). पुनरुत्थान सिद्ध् करते की येशू देवाचा पुत्र होता: येशू म्हणाला होता की कोणालाही जीवन देण्याचा आणि तो घेण्याचा अधिकार त्याला आहे’ (योहान १०:१७-१८). 
(२). पवित्र ग्रंथात असलेल्या सत्याची पुष्ठता करते (सिद्ध् करते): जुन्या करारात आणि येशूच्या शिकवणुकीत येशू पुनरुत्थानाविषयी अचूक शिकवण देतो (स्त्रोत्रसंहिता १६:१०, ११०:१). जर येशू कबरेतून बाहेर आला नसता तर धर्मग्रंथ किंवा पवित्रग्रंथ खोटा ठरला असता.
(३). येशूचे पुनरुत्थान, आपले पुनरुत्थान निश्चित करते: येशू मरण पावला व पुन्हा उठला, त्याचप्रमाणे आपणदेखील त्याच्याबरोबर उठविले जाऊ (१ थेस्सलनिकाकरांस पत्र ४:१३-१८). ख्रिस्ती श्रद्धा ही येशूच्या पुनरुत्थानावर बांधली आहे. जर आपण पुनरुत्थान वगळले, तर आपणाकडे काहीच आशा उरत नाही.
(४). भविष्यात होणाऱ्या न्यायाच्या हे प्रमाण (पुरावा) आहे: “त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे” (प्रे. कृत्ये १७:३१).
(५). ख्रिस्ती जीवन जगण्यास सामर्थ्य/ शक्ती देते: आपण आपल्या स्वतःच्या बळावर परमेश्वरासाठी जगू शकत नाही परंतु आपण स्वीकारलेल्या त्याच्या (येशूच्या) मरणातील बाप्तीस्म्याने आपण येशुमध्ये पुरले जाऊ व त्याचा पुनरुत्थानाने परमपित्याची इच्छा व त्याचा गौरव आपल्या जीवनाद्वारे इतरांस दाखवू शकू (रोमकरांस पत्र ६:४). 

मनन चिंतन: 
“ख्रिस्त आज विजयी झाला मरना जिंकूनी या उठला!”
          पुनरुत्थित ख्रिस्ताच्या रहस्यात सहभागी होणाऱ्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज ही रात्र आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची व जल्लोषाची आहे. कारण आजच्या ह्या रम्य, निदान रात्रीत आपला तारणारा मृत्यूवर मात करून मरणातून उठला आहे. कबरे वरून धोंड बाजूला सारली गेली आहे. शुभ शुक्रवारच्या अंधारा नंतर पास्काची पहाट उगवली आहे. आपल्या श्रद्धेनुसार सत्य हे कधीच कबरेत राहू शकत नाही. असत्याची सर्व बंधने तोडून सत्य हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात पुनरुत्थित झाले आहे. आपल्या पुनरुत्थानाद्वारे प्रभू येशू हा जगाच्या स्थळ-काळ मर्यादेपलीकडे गेला आहे. मृत्यु हा ख्रिस्ती जीवनाचा पूर्णविराम नसून, तो एका खऱ्या जीवनाचा प्रारंभ आहे. तेव्हा शुभ शुक्रवाराला अर्थ आहे, तो म्हणजे पास्काच्या प्रकाशात, पुनरुत्थित प्रभूच्या प्रकाशात. म्हणूनच पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त हा आदी आणि अंत आहे. प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्या जीवनाचा पाया आणि कळस आहे. म्हणून हि रात्र आम्हा सर्व श्रद्धावंतानसाठी एक आनंदाची, जल्लोषाची रात्र आहे. ही रात्र वैऱ्याची नव्हे; तर प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची आहे.
          आपण जर आजच्या प्रभूशब्दविधीवर नजर टाकली; तर आपल्याला प्रत्येक वाचनात प्रभूची कीर्ती किती महान आहे हे आढळते. पहिल्या वाचनात आपल्याला आढळते की, उत्पत्ति किंवा निर्मितीद्वारे परमेश्वराने आपल्या अस्तित्वाची कशी निर्मिती केली हे आपल्या निदर्शनास येते. दुसऱ्या वाचनात इसाहाकाच्या अर्पणाद्वारे आपल्याला नवीन करारात येणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या अर्पणाचे, त्याच्या प्रचितीचे व त्याच्या बाबतीत घडणार्‍या घटनांचे वर्णन केलेले दिसून येते. या वाचनात इसहाक आपल्या बापाला प्रश्न विचारतो की, “होमार्पनासाठी कोकरू कोठे आहे?” त्याचे उत्तर आपल्याला नव्या करारात बाप्तिस्मा करणारा योहान देतो, “हे पाहा, देवाचे कोकरु, जगाचे पाप हरण करणारे.” (योहान १:२९,३६) तिसऱ्या वाचनात आपल्याला इस्रायली लोकांना परमेश्वराने फारोच्या गुलामगीरीतून कसे वाचवले व मोशेद्वारे समुद्र कसा विभागला याविषयी सांगण्यात आले आहे. याद्वारे आपल्याला समजते की, परमेश्वर त्याच्या निवडलेल्या प्रजेवर किती प्रेम करतो.
          चौथ्या वाचनात परमेश्वर व आपले संबंध हे यशया संदेष्टा एका पती-पत्नी प्रमाणे आहेत असे दर्शवितो. ज्याप्रमाणे प्रियकर व प्रेयसी एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले असतात, त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. जरी आपण त्याच्यापासून दूर गेलो; तरी तो आपल्या मागे येऊन आपला हात थांबवत असतो. पाचव्या वाचनात आपल्याला परमेश्वराच्या अस्सीम प्रेमाचा अनुभव येतो. सहाव्या वाचनात आपल्याला परमेश्वर कोण आहे? इस्राएली लोकांनी परमेश्वराच्या आज्ञांना का ओळखले नाही? हे सांगण्यात आले आहे. सातव्या वाचनात आपल्याला दिसून येते की, इस्रायली लोकांनी कशाप्रकारे परमेश्वराच्या नावाला कलंक लावला, म्हणून त्यांची दानादान झाली. कारण परमेश्वराचे नाव हे सर्वात मधुर नाम आहे. त्यांना दिलेल्या दहा आज्ञांन मधील दुसरी आज्ञा त्यांनी मोडून टाकली होती. त्याच प्रमाणे आपण आपल्या नामाची प्रचीती करतो का? व देवाच्या नावाला कलंक लावतो का? 
          आठवे वाचन हे नव्या करारातील वाचन आहे. जेथे आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये मरण पावलो तरी जीवन आहे, याची खात्री करून दिली आहे. म्हणून तर हा पास्काचा सण हा आपल्यासाठी एक नवीन आशा घेऊन आला आहे. ज्याप्रमाणे आजच्या तिसऱ्या भागात आपण आपल्या बाप्तीस्म्याचे नूतनीकरण करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचे ख्रिस्तामध्ये नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला आवाहन किंवा पाचारण केले आहे.
          ह्या सर्व वाचनांचा सारांश किंवा कळस हा आपल्याला आजच्या शुभवर्तमानात आढळतो. ह्या सर्व वाचनांचा कळस हा शुभवर्तमानात पुनरुत्थान झालेल्या प्रभू येशूमध्ये आढळतो. या सर्व वाचनांमध्ये एक दुवा आढळून येते. तो म्हणजे तारण प्राप्तीच्या इतिहासात, परमेश्वराचे मानव जातीवर किती प्रेम आहे. त्याचा कळस हा त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ह्या भूतलावर पाठवून; त्याच्या क्रूसावरील प्राणार्पणाद्वारे पूर्णत्वास नेला आहे.
          आजच्या शुभवर्तमानावर बारकाईने लक्ष दिले, तर आपल्या मनात काहीक प्रश्न उद्भवतील:
          १) (२८:१) ‘शब्बाथाचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहण्यासाठी आल्या होत्या.’ प्रश्न:- वल्हांडनाचा सण येवढ्या जोरात चालु असताना देखील, ह्या स्त्रिया वल्हांडनाचा सण सोडून कबरेजवळ का आल्या होत्या? कारण यहुदी लोकांना वल्हांडनाचा सण हा खूप महत्त्वाचा सण होता. ह्याचे उदाहरण आपणाला आजच्या तिसऱ्या वाचनात पहावयास मिळते. ह्या स्त्रिया वल्हांडनाचा सण सोडून कबरीजवळ आल्या होत्या; कारण त्त्यांचा ‘वर’ हा आता कबरेत झोपी गेला होता.(मत्तय ९:१५, मार्क २:१९,२०, लुक ५:३५) जर वराती मधला ‘वरच’ नसेल तर जल्लोष कशाचा? आनंद कशाचा? आणि कसला सण? मग्दालीया मरिया कबरेजवळ आली होती; ‘कारण तिची जी पुष्कळ पापे होती त्यांची तिला क्षमा झाली होती.’ (लुक ७:४७) म्हणून आपल्या प्रेमाखातर उदार, कृतज्ञतेने तिने संसाराच्या रूढी-परंपरांचा धिक्कार करून, स्वतःच्या आनंदाचा त्याग करून, परमेश्वराच्या कबरे जवळ आली होती. ज्याने तिला नवजीवनाची गुरुकिल्ली दिली होती. त्याच्या कबरेजवळ, त्याच्या देहाला सुगंधित द्रव्य लावण्यासाठी ती आली होती. जेणेकरून त्याच्या देहाचा वास येऊ नये. ज्याने तिच्या मनात वास केला होता व तिच्या देहाला पापमुक्त करून सुगंधित, पवित्र केले होते.
          २) (२८:२) ‘तेव्हा पाहा, मोठा भुमिकंप झाला.’ ‘धोंड एकीकडे लोटली गेली होती.’ येशूने क्रुरसावर प्राण सोडला तेव्हा सुद्धा भूमीकंप झाला होता. (मत्तय २७:५१) परंतु त्यावेळेस भुमिकंप किंवा धरणीकंप हा सृष्टीचा सृजनहार मरण पावला होता; म्हणून सृष्टी रडत होती. आता भूमीकंप झाला त्यात प्रभू येशू मरणातून उठून, त्याच्याबरोबर दुसरेजण थडग्यात होते त्यांना सुद्धा उठवले होते म्हणून आनंदोत्सव करत होती. ‘धोंड एकीकडे लोटली गेली होती.’ प्रश्न:- धोंड कोणासाठी बाजूला लोटली गेली होती? येशू ख्रिस्ताला बाहेर येण्यासाठी की, आपल्याला आत जाण्यासाठी? येशू ख्रिस्त जो वेळ-स्थळ यांच्या पलीकडे गेला होता, जो शिष्य जेव्हा खोलीत बंद असताना दरवाजाच्या आरपार जाऊ शकला होता. (योहान २०:१९, २६) त्यासाठी का? नाही. तर कबर उघडली होती ती, मग्दालीयाची मरिया व आम्हा सर्व श्रद्धावंतांसाठी. जेणेकरून आम्ही आत जाऊन आपल्या विश्वासाला अधिक दृढ करू की, खरोखर ख्रिस्त हा मरणावर विजय मिळून जिवंत झाला आहे.
          ३) (२८:९) ‘मग पाहा, येशू त्यांस भेटला व त्यांना आज्ञा केली की, जा माझ्या भावांस सांगा की, त्यांनी गालीलात जावे.’ प्रश्न:- देवदुताने सांगितल्याप्रमाणे त्या हर्षानिशयाने गेल्या. मग येशूला त्यांना वाटेत भेटण्याची काय गरज होती? गरज होती, ती म्हणजे देवदूताने सांगितलेल्या गोष्टींची शिक्कामुहूर्त करण्याची, त्यांचा गैरसमज सुद्धा होऊ शकत होता की, ‘तो तिथे नाही! त्याला कोणीतरी चोरले नाही ना?’ (योहान २०:१३) अशा शंकांनी त्या जाऊ नयेत म्हणून त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी व देवाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी भेट देण्याची गरज होती.
          ‘जा माझ्या भावांस सांगा की त्यांनी गालीलात जावे.’ येशू येथे आपल्या शिष्यांना आता शिष्य नव्हे; तर भाऊ संबोधतो. जे त्याला त्याच्या कठीण व वाईट घटकेस सोडून पळून गेले होते, त्यांना तो आता भाऊ म्हणून संबोधतो. हे आपल्या मानवी विचारसरणी पलीकडे आहे. म्हणून तर ‘परमेश्वराचे विचार हे, आपले नाहीत. त्याचा मार्ग हा आपला नाही.’ (यशया ५५:८) प्रश्न:- गालीलातच का? दुसऱ्या ठिकाणी का नाही? कालवरी, येरुशलेम किंवा इतर ठिकाणी का नाही? असे म्हणतात की, ‘पहिले प्रेम हे खरे प्रेम असते.’ गालील हे असे ठिकाण आहे जिथे येशू ख्रिस्ताला स्विकारण्यात आले होते. कालवरीवर त्याचा धिक्कार करण्यात आला होता. त्या उलट गालीलात येशू त्याच्या शिष्यांच्या पहिल्यांदा प्रेमात पडला. उलट शिष्य येशू ख्रीताच्या प्रेमात पडले. (मत्तय ४:१८-२२; मार्क १:१६-२०; लुक ५:१-११) शिष्यांना पहिले पाचारण गालीलात झाले होते. परंतु ह्याचा आपल्याशी काय संबंध? ह्याचा आपल्या जीवनाशी खोलवर सबंध आहे.
          आपल्याला आपल्या जीवनात कुठे न कुठे परमेश्वराची हाक आली आहे. किंवा आपल्या जीवनाचा असा एक अविभाज्य भाग आहे किंवा क्षण आहे; जिथे आपण परमेश्वराच्या प्रेमात गुंतलेलो होतो. उदाहरणार्थ धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांच्या जीवनातील त्यांचा प्रथम व्रतविधि किंवा गुरुदीक्षाविधी, वैवाहिक जीवनातील लग्नाचा दिवस, ख्रिस्ती जीवनातील बाप्तीस्म्याचा दिवस इत्यादी. हे क्षण आपल्याला शिष्यांप्रमाणे निराशेच्या, संकटांच्या, संशयांच्या वेळी ख्रिस्ताशी एकरूप करत असतात. अशा स्थितीत आपल्याला ख्रिस्त हेच आवाहन करत असतो की, ‘जा तुम्ही तुमच्या गालीलातील अनुभवाकडे जा आणि माझ्या प्रेमाचा आढावा घ्या, माझ्या प्रेमात एकरूप व्हा.’
          आजच्या वस्तुस्थितीत आपल्याला हाच उद्देश करण्यात आला आहे. जगभर कोरोना वायरस सारख्या रोगाने हाहाकार माजला आहे. जेथे आपला प्रभू परमेश्वरावरील विश्वास डळमळत आहे. अशा स्थितीत गालीलाचा अनुभव घेण्यास आज ख्रितसभा आपल्याला बोलवत आहे. म्हणून हा अनुभव तुमच्या पर्यंतच ठेवू नका; तर त्या स्त्रियांप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थाचा संदेश इतरांपर्यंत दिला. त्याचप्रमाणे आपण सुद्धा जाऊन जगजाहीर करूया की, आमचा देव हा, ‘आब्राहामाचा, इसाहाकाचा, याकोबाचा देव आहे.’ (निर्गम ३:६,१५ मत्तय २२:३२ प्रे. कृत्ये ७:३२) तो मेलेल्यांचा नव्हे तर मेलेल्यातून उठून जीवंत देव आहे. ज्याप्रमाणे येशूने मरणावर विजय मिळविला त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या दररोजच्या जीवनात येणाऱ्या मरणावर विजय मिळवूया. म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची व आनंदाची शुभवार्ता संपूर्ण जगाला घोषित करू शकू.

(टीप: पुनरुत्थानाच्या रात्रीच्या मिस्सावेळी पश्चातापविधी, प्रस्तावना व श्रद्धावंतांच्या प्रार्थना वगळण्यात येतात.)

तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्या.





Reflections for the Good Friday (10-04-2020) By Br. Suhas Fereira.





शुभ शुक्रवार





दिनांक: १०/०४/२०२०.
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ४:१४-१६;५:७-९.
शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२.




प्रस्तावना:
          शुभ शुक्रवार! ख्रिस्ताच्या दुखःसहनाचा दिवस. आजच्या दिवशी दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या पापांसाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले होते. ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या मरणाने आपल्या सर्व मानवजातीच्या पापांवर विजय मिळविला म्हणूनच ह्या दिवसाला पवित्र शुक्रवार म्हणून मानला जातो. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनाविषयी  अगोदरच भाकित करीत आहे; आणि दुसऱ्या वाचनात आपणास कळून चुकते की, प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा याजक आहे, ज्याद्वारे संपूर्ण सृष्टीचे तारण होणार होते.
          आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण येशूच्या दुःखसहनाविषयी तसेच त्याच्या क्रूसावरील यातनादायी मरणाविषयी ऐकणार आहोत. येशूने अतोनात कष्ट आणि दुःख सोसले, परंतु एका शब्दानेही त्याने त्याच्या मारेकऱ्यांची निंदा केली नाही. क्रूर शिपायांनी येशूची थट्टा-मस्करी केली, त्याच्या अंगावर थुंकले, त्याचे कपडे फाडले. इतकेच नव्हे तर येशूला क्रुसावर खिळले, परंतु येशूने शेवटच्या घटकेलाही त्यांना क्षमाच केली. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण व दुःखसहनावर चिंतन करत असताना; आपल्यालाही प्रभू येशू ख्रिस्ता प्रमाणे इतरांना क्षमा करण्याची प्रवृत्ती लाभावी म्हणून आजच्या पवित्र उपासनेमध्ये विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास परमेश्वराच्या एकुलत्या एका पूत्राची ओळख करून देत आहे. आपल्या बापाची आज्ञा मनात ठेवून येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी क्रूसावर आपल्या प्राणाची आहुती दिली. तो पडला, घायाळ झाला, परंतु त्याने तक्रार न करता आपल्या सर्वांसाठी मध्यस्थी केली.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ४:१४-१६;५:७-९
          आजच्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो की, प्रभू येशू ख्रिस्त जो प्रमुख याजक आहे; तो आपल्या पित्याच्या अज्ञात एकनिष्ठ होता. त्याच्या मरणाद्वारे त्याने आपल्या सर्वांना जीवन प्राप्त करून दिले आहे. तो देवाचा एकुलता एक पुत्र असूनही त्याने दुःखाचा स्वीकार केला.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२
          आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपणास कळून चुकते की, प्रभू येशू ख्रिस्त हा अतिशय शांत आणि सौम्य स्वभावाचा होता. ज्यावेळी शिपाई त्याला पकडण्यात आले; तेव्हा त्यांने त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा राग व्यक्त न करता शांतपणे स्वतःला त्यांच्या हाती स्वाधीन केले. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपणाला असा संदेश मिळतो की, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली तशीच क्षमा आपणही इतरांना केली पाहिजे.

बोधकथा:
          एकदा बिशपांच्या निवासस्थानामध्ये एक चोर रात्रीच्या वेळेस चोरी करण्यास शिरतो. बिशपांच्या गळ्यावर सुरी ठेवून तो बिशपांना मारण्याची धमकी देतो. परंतु बिशप थोडेही न घाबरता त्या चोराला समजावण्याचा प्रयत्न करतात. रात्री १२:३० ची वेळ. बिशप चोराला फ्रीजमध्ये असलेले जेवण गरम करून खायला देतात. आणि तदनंतर त्याला झोपण्यास खोलीची व्यवस्थाही करतात. “सकाळी उठून शांतपणे पुन्हा बोलू” असे म्हटल्यावर चोर आश्चर्यचकित झाला. त्याने बिशपांना प्रश्न विचारला की, “मी चोर असून सुद्धा तुम्ही माझ्याशी इतक्या प्रेमाशी का वागतात? तेव्हा बिशप म्हणाले, “तु चोर असला तरी देवाचा मुलगा आहेस आणि माझा भाऊ. त्यामुळे माझ्या भावाशी मी प्रेमानेच वागायला हवे ना?” असे म्हणून बिशप झोपायला आपल्या खोलीत निघून गेले. इतक्यात थोड्या वेळात चोराच्या मनात पुन्हा चोरीचा विचाराला आला. त्याची नजर त्याच्या समोर असलेल्या दोन सोनेरी रंगाच्या मेणबत्तींवर गेली. त्या मेणबत्त्या सोन्याच्या समजून चोराने त्या पिशवीत घातल्या आणि लागलीच तेथून पळ काढला. सकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यात पोलीस पहाऱ्यावर असताना नेमका हा चोर त्यांच्या तावडीत सापडला. दोन कानाखाली खातच चोराने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. तेव्हा पोलिसांनी चोराला बिशपांकडे आणले आणि त्या दोन्ही मेणबत्त्या बिशपांकडे देऊन चोराला पुन्हा चोप देऊ लागले. त्यावर बिशपांनी पोलिसांना थांबवले आणि तो चोर, चोर नसून आपणच त्याला ह्या मेणबत्या दिल्याचे सांगितले. त्यावर पोलिस काही न करता तेथून निघून गेले. चोराला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तेव्हा बिशपांनी त्याला सांगितले की, “मी तुला सांगितले होते ना! की, तू माझा भाऊ आहेस म्हणून.” त्यावर चोराला त्याची चूक लक्षात आली. आपल्या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त करून त्या चोराने आपले संपूर्ण आयुष्य प्रभू सेवेत घालविण्याचा निर्णय घेतला.

मनन चिंतन:
          क्रुसावर खिळलेल्या ख्रिस्ताच्या दुःखसहनात सहभागी होण्यास जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. नदी स्वतःचे पाणी कधीच स्वतः पीत नसते; तर इतरांची तहान भागवत असते. फुल स्वतःचा सुगंध स्वतःसाठीच ठेवित नसतात; तर इतरांना देत असतात. झाडे स्वतःची फळे कधीच स्वतः खात नसतात; तर इतरांना देत असतात. होय माझ्या प्रियांनो अगदी अशाच प्रकारे आपणही आपले जीवन स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगले पाहिजे. “स्वतःसाठी जगला तर, मेलास पण इतरांसाठी जगला तरच खरा जगलास.” आजची उपासना हि कुण्या साध्या-सुध्या संदेष्ट्या विषयी किंवा चमत्कारा विषयी बोध देत नाही. तर आजची उपासना परमेश्वराचा एकुलता एक पुत्र खुद्द प्रभू येशू ख्रिस्त यांची महती जगाला पटवून देत आहे. 
          प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये अवतरला तो म्हणजे साधारण मानवाच्या रूपामध्ये. साध्या-सुध्या गव्हाणीमध्ये त्याने मारियेच्या उदरी जन्म घेतला. साधारण माणसाप्रमाणे तो जीवन जगला. तुम्हा-आम्हा सारखे त्याने कष्ट केले, तो राबला. आपल्या सर्व कृतीमध्ये त्याने फक्त इतरांचा विचार केला. स्वतःला कधीही न उंचाविता नम्रपणे इतरांची सेवा केली. तो राजा होता; परंतु सेवक झाला. स्वतःने काट्यांचा मुकुट परिधान केला आणि आपल्याला फुलांच्या पाकळ्यांत ठेवले. परंतु त्याने ज्यांना सर्वकालिक जीवन प्राप्त करून दिले होते; त्यांनीच त्याला मारण्याचा कट रचला.
          आपल्या दैनंदिन जीवनातही बऱ्याच वेळेला आपण अगदी त्या क्रूर शिवरायां प्रमाणेच वागत असतो. परमेश्वर आपल्यावर भरपूर अशी प्रीती, प्रेम करत असतो. परंतु त्या प्रेमाची जाणीव न ठेवता आपण नेहमी पापांच्या आहारी जात असतो. राग, मत्सर, हेवा, द्वेष, चीड, इतरांबद्दल सूडाची भावना, अशा अनेक कितीतरी गोष्टींमुळे आपण देवाच्या दूर जात असतो. कधी-कधी या जागतिक सुखाच्या मागे आपण इतके बेधुंद होतो की, आपल्याला देवाचा जणू विसरच पडलेला असतो. परंतु माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण देवाच्या कितीही दूर गेलो तरी देव मात्र आपल्या जवळ असतो. तो नेहमी आपल्यावर नजर ठेवून असतो. ज्याप्रमाणे आपण लुकच्या शुभवर्तमानात १५ व्या अध्यायात वाचतो की, उधळ्या पुत्राने सर्व धनसंपत्ती विकून मौजमजा केली; परंतु जेव्हा त्याचे डोळे उघडले आणि त्याला समजले की त्याने चूक केली होती; तेव्हा त्याने पुन्हा त्याच्या पित्याकडे धाव घेतली. पित्याने दूरवरून पाहतच धाव घेतली आणि आनंदाने आपल्या परतलेल्या मुलाचा स्विकार केला. पृथ्वीवरील पिता जर आपल्या मुलाच्या परतण्याविषयी इतका खुश असेल; तर आपल्या पापांच्या पश्चातापाने आपला स्वर्गीय पिता किती खुश होईल? लुक १५:७ सांगते, ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतीमनांपेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. परंतू आपण पश्चाताप करण्यासाठी तयार आहोत का? की अजूनही भौतिक सुखाची धुंद आपल्या डोळ्यावर फडफडत आहे.
          आज मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. सृष्टीची हनी तर करतोच; परंतु इतर मानवांची हानी करण्यासाठीही तो पुढे मागे बघत नाही. त्याचाच परिणाम नुकताच जगप्रसिद्ध झालेल्या करोना व्हायरसने आपण अनुभवत आहोत. करोना व्हायरस हा देवाने नाही तर मानवानेच निर्माण केला आहे. त्यामुळे त्याचे परिणामही मानवालाच भोगावे लागत आहेत. आज आपण विशेष प्रार्थना करूया की, मानवाला एकमेकांवर प्रेम करण्यासाठी प्रेरणा लाभू दे. ज्याप्रमाणे ख्रिस्त आपल्यासाठी क्रुसावर मरण पावला; त्याच प्रमाणे आपणही आपले जीवन इतरांसाठी व्यस्थित करावे जेणेकरून परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर सदोदित राहील. आमेन.

Saturday, 4 April 2020


Reflections for the Homily of Maundy Thursday (09-04-2020) By Br. Roshan Rosario.



आज्ञा गुरुवार



दिनांक: ०९/०४/२०२०
पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४
दुसरे वाचन: १ करिंथ.११:२३-२६
शुभवर्तमान: योहान १३:१-१५




विषय: “नवीन आज्ञा तुम्हांस माझी परस्परावर प्रेम करा.

प्रस्थावना:
          आजपासून आपण पवित्र तीन दिवसीय उपासनेमध्ये प्रवेश करीत आहोत. जो प्रायश्चितकाळ आपण राखेच्या बुधवारपासून सुरू केला होता; त्याची सागांता आज होणार आहे. आज पासून आपण नवीन पर्व सुरु करत आहोत; ते म्हणजे प्रभूच्या दु:खसहनाचे व ते आपण त्याच्या पुनरुत्थानापर्यंत चालणार आहोत. परंतु ह्याचा अंत कधीही होणार नाही. कारण, ही तीन दिवशीय उपासना म्हणजे प्रभूच्या अधिक जवळ येण्याचा काळ. ह्या उपासनेद्वारे आपणाला प्रभूच्या पुनरुत्थानाचा सण अधिक भक्तीभावाने साजरा करता येईल.
          आजच्या उपासना विधीचा केंद्रबिंदू प्रेमामध्ये दडलेला आहे. आपल्या प्रभू येशूच्या असीम प्रीतीचे किंवा प्रेमाचे स्वरूप हे त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुऊन एक नवीन उदाहरणाद्वारे आपल्यासमोर ठेवले आहे. आजच्या ह्या आज्ञा गुरुवाराच्या दिवशी प्रभू येशूने आपल्याला एक नवीन आज्ञा दिली आहे; ती आज्ञा म्हणजे ‘निस्वार्थी प्रेम’ किंवा आगळवेगळ प्रेम जे त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुऊन आपल्या पुढे चित्रित केले आहे. आज या आज्ञा गुरुवारी प्रभूने आपणा सर्वांसाठी नविन मेजवानी तयार केली आहे. जेथे प्रभू हाच त्या मेजवानीची भाकर म्हणून आपले पोषण करतो व ह्या वेदीवर दैनंदिन प्रकट होत असतो. ज्याप्रमाणे तो आपल्या शिष्यांना शेवटच्या भोजनावर प्रकट झाला होता.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४
          “मिसरमधील प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा.... मरतील.” अशी नाट्यमय घोषणा निर्गम ११:५ मध्ये आपण पाहतो. ह्या घोषणेच्या परिपूर्तीवरच आता भरपूर लक्ष दिले आहे. आजच्या पहिल्या वचनात इस्राएल लोकांचे सर्व प्रथम जन्मलेले या भयानक प्रसंगातून अनन्यप्रकारे वाचले. इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांना मरण ओलांडून गेले, म्हणून या विलक्षण घटनेला वल्हांडण म्हटले आहे. नव्या करारात येशूच्या मृत्यूचा अर्थ समजून घेण्यामध्ये वल्हांडणाचे प्रमुख महत्त्व आहे. शुभवर्तमानावरच्या वृतांतानुसार अखेरचे भोजन हे वल्हांडणाचे भोजन होते. पुढे याचीच प्रभूभोजन म्हणून स्थापना झाली आहे.

दुसरे वाचन: १ करिंथ.११:२३-२६
          आजच्या दुसऱ्या वाचनात पौलाला प्रभूपासून मिळाले तेच शिक्षण त्याने करिंथकरांना तो तिथे असताना समक्ष सांगितले होते. त्याचाच तो आता पुनरुच्चार करीत आहे. प्रभू येशूला विश्वासघाताने धरून दिले, त्या रात्री त्याने जे केले, जे सांगितले त्याचीच उजळणी येथे केली आहे. येशूच्या मृत्यूचे स्मरण करण्यासाठी त्यांने भाकर मोडायची होती. येशूने आपल्या रक्ताने प्रस्थापित केलेल्या नव्या कराराच्या स्मरणार्थ त्यांने पेल्यातून प्यावयाचे होते. प्रभू भोजनाने प्रभू पुन्हा परत येईपर्यंत त्याच्या मरणाची घोषणा होत असते. येशूने केलेल्या कृतीवर अधिक भर देण्यासाठी पौलाने येशूच्या शब्दांचा पुनरुच्चार केला आहे. येशूने स्वतःचा विचार न करता स्वच्छेने, नि:स्वार्थीपणे त्याच्यासाठी आपले जीवन अर्पण केले. करिंथकरी भोजनाच्या वेळी आपल्या जेवणात इतरांना वाटा देत नव्हते. यातून करिंथकरांचे अपार उणेपण आणि येशूचे अपार उदारपण दिसून येते. त्याच्या मृत्यूची आठवण व्हावी यासाठी नेमलेल्या भोजनाच्या समयी ते याप्रकारे स्वार्थी अप्पलपोटेपणाचे वर्तन करतात. ज्याच्या स्मरणार्थ ते हे भोजन करतात, त्या प्रसंगाचे त्यांचे वर्तन पुन्हा त्याचा विश्वासघात करण्यासारखेच नाही का?

शुभवर्तमान: योहान १३:१-१५
   सेवाभावपवित्र मिस्साबलीदानाची स्थापनाहा आजच्या शुभवर्तमानाचा मुख्य गाभा आहे. ख्रिस्त आपल्या शिष्यांना नवीन आज्ञा देऊन म्हणत आहे, “तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी”(योहान १३:३४). आपल्या शिष्यांवरील असलेली प्रीती ख्रिस्ताने त्यांचे पाय धुवून दर्शविली. आपल्या प्रमुख अतिथींचे पाय धुवून स्वागत करणे ही यहुदी समाजाची परंपरा होती. हे काम घराचा मालक नव्हे तर फक्त चाकर किंवा गुलाम करत असत. त्यामुळेच पेत्राने ख्रिस्ताला आपले पाय धुण्यास नकार दिला. ख्रिस्त राजांचा राजा असूनही त्याने एका चाकराचे काम का करावे? ते केवळ आपल्या शिष्यांना सेवेचे व लीनतेचे उदाहरण घालून देण्यासाठी. योहानच्या मतानुसार त्याच्या ख्रिस्ती मंडळीनी ह्यावरून धडा शिकावा की, प्रत्येक मिस्साबलीदान अर्पण करताना, त्यांना ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञेची आठवण व्हावी व ती आज्ञा आपल्या जीवनात अंगीकारावी. ह्या उताऱ्यात शुभवर्तमानकार योहानने, ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुवून एक नवीन महामंत्र जगाला दिला आहे असे म्हणतो. इतर कोणताही शुभवर्तमानकार आपल्या शुभवर्तमानात ह्या उताऱ्याचा उल्लेख करीत नाही.

बोधकथा:
          असिसिकर संत फ्रान्सीस ह्यांच्या जीवनात घडलेली ही एक सत्य घटना आहे. संत फ्रान्सीस जेव्हा त्यांच्या तारुण्यात होते तेव्हां ते खूप श्रीमंत होते. त्यांना त्यांच्या जीवनात फक्त श्रेष्ठ गोष्टींची आवड होती. आपल्या आजच्या भाषेत बोलायला गेले तर; ते गर्भ श्रीमंत होते. पण त्यांच्या जीवनात एक प्रकारची अस्वस्थता होती, ती म्हणजे आत्मिक शांती. अशा द्विधा मनातील अस्वस्थ परिस्थितीत असतांना संत फ्रान्सीस आपल्या घोड्यावर शहराच्या बाहेर जात होते. त्याच वेळी त्यांच्या समोर एक कुष्ठरोगी आला, कुष्टरोग्याला पाहताच संत फ्रान्सिस ह्यांच्यात एक प्रकारची तिरस्काराची भावना निर्माण झाली; पण त्याचवेळी अं:तकरणात सद्-भावना निर्माण झाली होती. ते आपल्या घोड्यावरून उतरले व त्यांनी त्या कुष्ठरोग्याला आलिंगन दिले व त्याच्या घायांचे चुंबन घेतले. त्याच क्षणी संत फ्रान्सिस ह्यांना त्या कुष्टरोग्यात साक्षात्कार प्रभू येशूचे दर्शन झाले; ते म्हणजे कुष्टरोग्याचे रूप धारण करून खुद्द प्रभू येशूच त्याच्या समोर उभा होता असे त्यांना वाटले. संत फ्रान्सीस सारखे प्रभू येशू त्यंच्या जीवनाद्वारे दोन हजार वर्षा पूर्वीच आपल्यासमोर सेवेचे व प्रेमाचे उदाहरण ठेवत आहेत. जो माणूस इतरांच्या सेवेत नम्र होतो तोच देवाचे उदाहरण आपल्या जीवनात जगत असतो.

मनन चिंतन:
          ख्रिस्ता ठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो. वधस्तंभाच्या मार्गे आपण पित्याकडे चाललो आहोत ह्याची प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण जाणीव होती. स्वतःला त्या वेदनांच्या दरीतून जायचे होते. त्याविषयी विचार करीत न बसता; येशू ख्रिस्ताने शेवटल्या क्षणापर्यंत आपल्या प्रिय शिष्यांवर प्रीती केली. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या वाचनात आपण बघतो की, प्रभू येशू हा यहूदा एस्कायोत जो प्रभू येशूचा विश्वासघात करणार होता त्याच्यावर सुध्दा त्याने प्रीती केली. यहूदा एस्कायौत हा सैतानाच्या मसलतीने चालला होता; तरी येशू ख्रिस्त हताश झाला नाही. त्याच्यावरची प्रीती त्याने कधीही कमी केली नाही. कारण प्रभू हा प्रीतीत तुडुंब भरून वाहणाऱ्या महान नदिवसासारखा आहे.
प्रीती करणे म्हणजे सेवा करणे.
          आजच्या शुभवर्तमानात आपल्याला प्रभू येशूची प्रीत पाहावयास मिळते. पहिल्या प्रथम प्रभू येशूला हे माहित होते व ह्या सर्व गोष्टींची जाणीव होती कि; सर्व गोष्टी त्याच्या हाती दिल्या होत्या. त्याला माहित होते की; त्याच्या धरण्याची, घात करण्याची वेळ जवळ आली होती. पण त्याला हे पण माहीत होते की; त्याच्या गौरवाची वेळ सुध्दा जवळ आली होती. त्याला हे ही माहीत होते की; थोड्याच वेळात तो देवाच्या सिंहासनावर आपली जागा घेणार आहे. अशा सर्व विचारांनी त्याला गर्वाने फुगवले नाही तर, त्याने आपल्या शिष्यांसाठी एक महामंत्र दिला व त्यांच्या जीवनाचे कायापालट करणार असे नम्रतेचे उदाहरण त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुवून त्यांच्या समोर ठेवले. प्रेम पण त्याने त्यांच्यावर केले व हाच प्रेमाचा संदेश व सेवेचा संदेश आपल्याला आपल्या जीवनात पाळण्यास सांगितले आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपला कोणी जवळचा आजारी पडतो आपण त्या व्यक्तीसाठी मोठ्यातले मोठे व लहानातले लहान काम करत असतो. हे काम प्रेमाने व स्वखुशीने करत असतो. कारण आपण त्या माणसावर प्रेम करतो म्हणून.
          दुसरे म्हणजे; येशूला माहित होते की, तो देवापासून किंवा सृष्टीच्या निर्मात्या पासून आला आहे, आणि तो त्याच्याकडे म्हणजेच त्याच्या पित्याकडे परत जाणार आहे. अशा वेळी जेव्हा त्याने अनुभवले की, तो त्याच्या पित्याच्या जवळ परत जाणार आहे तेव्हा; त्याला असे पण वाटले असेल की, माझा आणि ह्या जगाचा काय संबंध? का मी ह्या जगाविषयी चिंता करू? पण अशावेळी दुसरा-तिसरा विचार न करता; जे देवपित्याने त्याला सोपवले होते ते तो पूर्णत्वास नेण्यासाठी झटत होता. म्हणजेच तो आपला स्वतःचा विचार न करता ह्या संपूर्ण मानवजातीचा विचार करत होता, व आपल्याला ते त्याने त्याच्या सेवाकार्याद्वारे सिध्द करून दाखवले आहे. हा पित्याबारोबारचा सबंध त्याला मानव जातीपासून दूर न नेता; त्याला मानवाच्या अधिक जवळ आणले आहे. असे म्हणतात की, जे मानवाच्या अधिक जवळ असतात; म्हणजेच जे इतरांच्या हलाखीच्या वेळी त्यांच्या जवळ असतात तेच देवाच्या हृदयाजवळ असतात.
          तिसरे म्हणजे प्रभू येशूला जाणीव होती की, कोणी एक त्यांच्या मधला त्याचा विश्वासघात करणार आहे. तरी हे सत्य ठाऊक असतांना देखील त्याचा मानवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला नाही किंवा त्यांच्यावर तिरस्काराची भावना ठेवली नाही, तर उलट त्याने त्यांच्यावर दया केली व अधिक प्रीती केली कारण तो प्रीतीने ओतप्रोत भरलेला आहे. जितक्या प्रमाणावर मानवजातीने त्याचा तिरस्कार किंवा विरोध केला तितक्याच प्रमाणात त्याचे आपल्यावरचे प्रेम अधिक वाढत गेले.
          शेवटी आपल्याला प्रभूने प्रेम म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. आणि हे त्याने त्याच्या स्वतःच्या उदाहरणाद्वारे सिद्ध करून आपल्या समोर एक अनुकरण करण्याजोगे उदाहरण ठेवले आहे. आणि ते म्हणजे “प्रीती म्हणजे सेवा करणे होय.” इस्रायली लोकांच्या पद्धतीप्रमाणे ह्या वल्हांडणाच्या महत्त्वाच्या भोजनाला बसण्यापूर्वी घरातील दास हा सर्वांचे पाय धुवत असे. आपणामध्ये मोठा कोण आहे ही स्पर्धा शिष्यांमध्ये चालू होती. ते एकमेकांवर प्रीती करीत नव्हते. फक्त एकच जण जमलेल्या प्रत्येकावर प्रीती करत होता. तोच उठला. तो दास झाला व शिष्यांचे पाय धुवू लागला. असे करताना प्रभू येशूने शिष्यांच्या वृत्तीबद्दल कुरकुर केली. पेत्र दचकला. तरी त्याच्याशी प्रीतीने बोलत येशू पाय धुवत राहिला. त्याने विश्वासघातकी यहुदाचेही पाय धुतले.
          ज्यांचा नवा जन्म झाला आहे, त्यांच्याकडून पाप घडणे शक्य नाही. ते ख्रिस्ताद्वारे शुद्ध होत राहतील. तर त्याच्या आशीर्वादात राहतील, हा धडा प्रभूला पेत्राला शिकवायचा होता. आज आपण आपल्या जगात पहिले; तर परिस्थिती काही वेगळी नाही. आपल्या अवतीभवती आपण अनुभवतो की कित्येक वेळा आपल्याला आपल्या समाजामध्ये मानाचा दर्जा नाही भेटला तर आपण परिस्थती बिकट किंवा वाईट करून टाकतो. व आपल्या कर्तव्यात आपण मागे पाडतो. आपण प्रभू येशूने देलेली आज्ञा किंवा शिकवण विसरतो की, जगात एकाच प्रकारची महानता आहे आणि ती म्हणजे सेवेची महानता. जगात असे कितीतरी लोक आहेत जे उंच दर्जावर उभे आहेत. पण हे विसरून जातात की, येशू सारखी गुडघे टेकून मिळणारी महानता कोणीच प्राप्त करू शकत नाही. लोकांच्या ह्या उंच दर्जाच्या किंवा पदवीच्या लोभामुळे, इच्छेमुळे जगात अशांती पसरलेली आहे. आज आपणाला येशू आपल्या स्वतःच्या उदाहरणातून हे सांगू इच्छित आहे की, जेव्हा आपणाला मोठी पदवी, दर्जा, प्रतिष्ठा, जागा व हक्काचा लोभ होईल; तेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर त्याच देव पुत्राचे सेवाधार्माचे प्रतिकृती किंवा प्रतीभिंब ठेवणे गरजेचे आहे. ते म्हणजे तोच देवपुत्र आपले वस्त्र काढून कमरेस रुमाल बांधून, घुडगे टेकून आपल्या शिष्यांच्या पायाखाली बसला आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्याप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्यासाठी आम्हांला तुझी प्रेरणा आणि शक्ती दे.”
१. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, सर्व बिशप्स व सर्व धर्मगुरू आज धर्मगुरूपदाचा सोहळा साजरा करीत आहेत. प्रभू येशूप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि शक्ती सर्व धर्मगुरूंना मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
२. पवित्र मिस्साबलिदानास आपल्या कुटुंबात महत्त्वाचे स्थान मिळावे व पवित्र ख्रिस्तशरीरात मिळणाऱ्या येशूच्या कृपेचा व शांतीचा अनुभव आपणास यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंना त्यांच्या धार्मिक कार्यात येशूची प्रेरणा, कृपा आणि शक्ती मिळावी, त्याचप्रमाणे जे धर्मगुरू आजारी व वयस्कर आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. या प्रायश्चित काळातील शेवटच्या दिवसात आपण पूर्ण मनाने व अं:तकरणाने परमेश्वराकडे वळून आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची मुल्ये आपल्या कुटुंबात, समाजात पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. संपूर्ण जगात कोरोना वायरस मुळे हजारों लोक या रोगास बळी पडले आहेत, आणि बहुसंख्य लोक मरण पावले आहेत. ह्या रोगावर लवकरात लवकर औषधोपचार मिळावा व जे लोक ह्या रोगास बळी पडले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि सर्वत्र चांगले आरोग्य प्रस्तापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आज आपण सर्व चिकित्सा क्षेत्रात कार्य करणारे व जे कोरोना ग्रस्त व्यक्तींच्या सेवेत आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थ पणे सेवाकार्यात झोकून घेतले आहे; त्यांना परमेश्वराची कृपा व शक्ती, तसेच त्यांच्या कार्यात त्यांना यश प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
७. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.




Wednesday, 1 April 2020


Reflections for the Homily of Palm Sunday (5-04-2020)  By Fr. Wilson Gaikwad.



झावळ्यांचा रविवार



दिनांक: ०५/०४/२०२०
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलिपिकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: मत्तय २६:१४-२७:६६



प्रस्तावना :
“गाओ प्रभू को होसान्ना, दाऊद के पुत्र को होसान्ना
गगनमें गुंजे जयजयकार, धरती आनंद मानाये,
विनम्र होकार गाधहेपर स्वार है नात मेरा.”
          प्रिय बंधू आणि भगिनींनो आज झावळ्यांचा रविवार प्रायश्चित काळाचा कळस आहे. तसेच आज आपण पवित्र आठवड्याला सुरुवात करीत आहोत. झावळ्यांच्या राविवाराला दु:खसहन रविवार असेही संबोधले जाते. आजच्या वाचनामध्ये अनेक विरोधाभास दिसतात. पहिल्या वाचनात यशयाचे दु:ख, तिरस्कार पहावयास मिळतो. दुसऱ्या वाचनात नम्रतेचे आव्हान केले आहे. आणि अत्यंत आनंदमय वातावरणात ह्या सणाची सुरुवात होते. सकाळीच भाविक देवळाच्या बाहेर झावळ्या घेऊन उभे राहतात. त्या आशीर्वादित केल्यावर लोक जल्लोषाने होसान्ना गात देवळात प्रवेश करतात. असेच प्रभू ख्रिस्ताच्या बाबतीत घडले. येशू ख्रिस्त येरुसलेहेमाच्या देवळात प्रवेश करत असतांना, लोकांनी झावळ्या दाखवून, पायघड्या टाकून त्याचे स्वागत केले. परंतु निमिषातच आनंद विरळतो व वातावरण दु:खमय होते. खर तर लोकच आनंद देतात आणि दु:खही देतात. सत्कार करतात, नंतर फुत्कार करतात. हेच नाट्यमय दृश्य आज आपल्याला निदर्शनास येते. एकाक्षणी जयजयकार आणि दुसऱ्याक्षणी अपमान, विरोध, तिरस्कार. खरतर एकच दिवस प्रभूचा सन्मान केला, नंतर त्याला दु;खाच्या दरीत सोडून दिले. हाच आहे मानवाचा रंग आणि विरोधाभास. आजचा रविवार म्हणजे आनंद व दुःख यांचे मिश्रण. आनंद यासाठी की प्रभू येशूचा लोक जयजयकार करतात व दुःख ह्यासाठी की जयजयकार करणारे त्याला नाकारतात.
          आजच्या येशूच्या दु:खासहनात सहभागी होत असताना आपल्यातील दुर्गुणांना तिलांजली देऊन सदगुण अंगीकारुया व विनयशीलता, नम्रता, सहनशीलता हे धारण करूया आणि प्रभूच्या कृपेस पात्र होऊ या.  

सम्यक विवरण:
पहिले वाचन:  यशया ५०: ४-७.
          यशया आम्हांस नम्रतेचे व विनयशीलतेचे सुंदर उदाहरण सादर करतो. त्याचा अपमान- तिरस्कार होतो. पण तू निमूटपणे देवासाठी सहन करतो. कारण देवावर त्याची श्रद्धा व प्रेम होते. त्याचा छळ झाला, अपमान झाला; पण त्याने प्रतिकार केला नाही. याउलट त्याने सहनशीलता दाखवली.

दुसरे वाचन:  फिलीप करांस  पत्र २: ६-११  
          येथे संत पौल आम्हांस पाचारण करतो, ख्रिस्त  देव असून त्याने दास्यत्व स्विकारले. आम्हांसाठी रिक्त झाला, लीन झाला व आम्हांपुढे नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण ठेवले म्हणूनच देवाने त्याला अत्युच्च केले.

शुभवर्तमान: मत्तय २६: १४- २७: ६६.
          सुरुवातीलाच आपण त्याचा शिष्य यहूदा तीस रुपयाला येशूला विकतो. म्हणतात ना, “दाम करी काम, वेड्या दाम करी काम, पैशाची जादू लई न्यारी तान्ह्या पोराला त्याची हाव.” येशूचा घात होतो. हीच मानवाच्या जीवनाची विसंगती आहे. पैशासाठी आपलेच आपल्या जीवावर उठतात याची प्रचिती आजच्या दुःखसहनात आपण अनुभवतो.

मनन चिंतन:
“जया अंगी मोठेपण तया यातना कठीण”
           ह्या अभंगाच्या ओवी प्रमाणे झावळ्यांचा रविवार आम्हांस बोध करतो. कारण धार्मिक, अध्यात्मिक, समाज सेवक, संतगन (रक्तसाक्षी), जीवनात नेहमीच वेदना, घात, एकाकीपणा अनुभवयास येतात. दुसरे एक भजन आहे, “कोणी नसे कुणाचा बंधू सखा न आपुला, येतात संकटे ही सोडीती सात  आपला. खोटे हे नाते सगळे बंधू सखा ना आपुला!”
           खरंच समाजात भली माणसं देवभिरू, पवित्र जेव्हा लोकांना सन्मार्गावर, देव राज्याच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात, समाज सेवेचे नेतृत्व करतात तेव्हा प्रथमत: लोक त्याचा उदो-उदो करतात, जयजयकार करतात. पण जेव्हा तोच भला माणूस संकटात सापडतो, समाजातील वरिष्ठ, धर्मपंडित त्याचा धिक्कार करतात, बहिष्कृत करतात तेव्हा हेच त्याच्या जवळचे जिवलग कार्यकर्ते, लोक त्याला एकाकी पडतात, सोडून जातात. मग त्या भल्या माणसाला स्वतःच्या वेदना, क्लेश व विस्कटलेल्या समाजाला सामोरे जावे लागते कोणाला किंबहुना त्याचे मित्र, सहकारी, आप्तेष्ट कुणीच त्याला साथ देत नाहीत. असेच काही प्रभू येशूच्या बाबतीत घडले आहे, त्याच्या दुखामध्ये त्याला कोणीही सात दिली नाही, त्याला एकाकी पाडले.
           प्रत्येक वर्षी पवित्र आठवडा आपण झावळ्याच्या रविवारी सुरू करतो. प्रथम प्रभू येशूचा येरुसलेमच्या मंदिराच्या प्रवेशाचा जल्लोष करतो. येथे ख्रिस्त राजासारखा घोडा न निवडता गाढवावर बसून मंदिरात प्रवेश करतो; हाच प्रभू येशूचा नम्रपणा आहे. लोक त्याच्यापुढे पायघड्या टाकतात जैतून (ऑलीव) झाडाच्या फांद्या उंचावून त्याचा जल्लोष करतात. स्तुति सुमने उधळतात. खरच कुणाला कल्पना पण नव्हती की, हे जल्लोष करणारे काही क्षणातच पलटवार करतात व त्याच प्रभू येशूला क्रुसी खिळा म्हणून ओरडतात. हाच मानवी जीवनाचा विरोधाभास आहे. अगोदर लोक हार घालतात, नंतर प्रतिकार करतात. त्यांचा पाठिंबा हा मतलबी आणि क्षणिक होता. खरतर प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा मानवांच्या पापांसाठी क्रूस स्विकारला, रक्त सांडले, असहाय्य फटके सहन केले.
          ह्या पवित्र आठवड्यात ख्रिस्ताचे दुःख मरण हयावर मनन करतो. आपणांस अंतरी वेदना होतात पण ह्यालाच जीवन असे नाव आहे. लोक आपणांस उंचावतात पुन्हा खाली पडतात. पण ख्रिस्त आम्हांस बोध करतो; ह्यालाच जीवन म्हणतात. त्रासानंतर आनंद व मरणानंतर पुनरुत्थान आहे. म्हणून जीवनात खचून जाऊ नका, जीवन जगण्यास शिका. प्रभू ख्रीस्ताबरोबर चालत रहा, त्याचा आदर्श घ्या, कारण तोच मार्ग, सत्य, आणि जीवन आहे (योहान १४:६). चला तर गाऊया,
“राहो में कांटे अगर हो, रुकना नही, चलते जाना....”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे दयावंत पिता आमची प्रार्थना ऐकून घे.’
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारेपोप महाशयबिशप्सकार्डीनल्ससर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेतह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.    
२.  जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.  हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येश्याच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.
४.  जे लोक दुःखीकष्टी व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आज आपण सर्व करोनाग्रस्त लोकांसाठी प्रार्थना करूया की, प्रभू येशूच्या दुखासहनाद्वारे ते बरे व्हावेत, व प्रभुने त्यांना स्पर्श करावा व त्यांना पूर्ण बरे करावे.   
५.  आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.