Wednesday 26 June 2024

 

Reflection for the 13th Sunday in Ordinary Time by Br. Oliver Munis

सामान्य काळातील तेरावा रविवार

दिनांक: ३०/०६/२०२

पहिले वाचन – ज्ञानग्रंथ :- १:१३-१५२:२३-२४

दुसरे वाचन - कारीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५

शुभवर्तमान - मार्क :- ५:२१-४३

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या  बंधू भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला आपला विश्वास जोपासण्यासाठी बोलावत आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, प्रभूयेशू म्हणतो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आजसुद्धा प्रभूयेशुच्या विश्वासाने कितीतरी माणसे बरी होत आहेत. आपणसुद्धा आपल्या दैनदिन जीवनातील आपल्या प्रभूवरील विश्वासाने आपल्याला  संकटकाळात येशूख्रिस्त सांत्वन देतो आणि अनिश्चिततेमध्ये मार्गदर्शन करतो. प्रभूयेशुवर विश्वास ठेवल्याने आपली आध्यात्मिक वाढ होत असते. बऱ्याचदा आव्हानांनी भरलेल्या जगात, येशू ख्रिस्तावरील विश्वास आपल्याला बचावत असतो.

विश्वास हा देवाला हृदयातून दिलेला प्रतिसाद आहे. आपली ख्रिस्तसभा विश्वासावर अवलंबून आहे. एक कॅथोलिक म्हणून, विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. कारण कॅथोलिक चर्च विश्वासावर अवलंबून आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला विश्वासात राहण्याचे अत्यंत महत्वाचे आहे, कारण विश्वास देवाचा मार्ग अनुसरायला मदत करतो आणि स्वर्गात जाण्यास मदत करतो. परंतु आजच्या आधुनिक युगात आपण येशूवरील विश्वासापासून दूर होत चाललो आहोत. आपण अन्य काम किंवा गोष्टीमुळे आपण देवाला वेळ कमी देत आहोत आणि देवापासून दूर चालले आहोत. आजच्या ह्या मिसाबलीदानात, आपण आपला विश्वास या आधुनिक जगात बळकट कसा करू शकू आणि कसा वाढवू शकू त्यासाठी प्रभूपरमेश्वराकडे विशेष कृपा व आशीर्वाद मांगुया.

मनन चिंतन:

आपण उत्पतीच्या पुस्तकात अध्याय आणि ओवी २७ मध्ये वाचतो: “तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर नारी अशी ती निर्माण केली.” देवाने मनुष्याला निर्माण केले आणि त्याला पृथ्वीवर ठेवले तेव्हा मनुष्य निर्दोष होता. देवाची योजना आणि शाश्वत उद्देश मनुष्यांना त्यांचे जीवन समर्पित करणे आणि त्यांना परिपूर्ण, आध्यात्मिक प्रोढता प्रदान करणे होते. परंतु मानव सैतानाच्या भुरळीत पडून पाप केले देवाचा असलेला त्यांच्यावरील विश्वास तुटला आणि जगात मरण आले. मानव हा देवाच्या इच्छेनुसार वागला नाही, त्यासाठी आपणा सर्वाना मरणाचा शिकार व्हावे लागले आहे. परंतु देव हा दयाळू आहे. त्यासाठी देवाने एकुलता एक पुत्र ह्या भूतलावर पाठवला आणि पुत्राने स्वताचा प्राण देऊन त्याने आपल्या पांपावर विशेषरित्या मरणावर विजय मिळवला आहे. आज जो कोणी येशूच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागतो, त्यांचे जीवन सुखमय होते आणि त्याला मरणानंतर अनंतकाळाचे जीवन मिळत असते आणि आपण देवाच्या उद्धेश्यात परत बांधले जातो. मरण हि कधीच देवाची इच्छा नव्हती तर इच्छा होती ती अनंतकाळाच्या जीवनाची.

आजच्या शुभवर्तमानात पाहतो कि, बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता. आणि जेव्हा तिचे सर्व मानवी पर्याय संपले तेव्हा ती येशूकडे वळली: ती प्रभूकडे गर्दीत त्यांच्यामागे गेली व त्याच्या  झग्याला तिने स्पर्श करून ती तिच्या विश्वासाने बरी झाली.  तिचा विश्वास हा बळकट होता त्यामुळे ती बरी झाली.

त्याचप्रकारची एक खरी घटना जोनी एरेक्सन टाडा हिच्या जीवनात घडली होती. एकेकाळी, जोनी एरेक्सन टाडा नावाची एक तरुण स्त्री होती. जोनी तिच्या आयुष्यात खूप आनंदी होती. तथापि, वयाच्या 17 व्या वर्षी एका अपघातामुळे तिच्या मानेला मार बसला व त्यामुळे तीचे शरीर मानेपासून ते तळपायापर्यंत निष्क्रिय  (inactive) झाल्याने तिच्या आयुष्याने एक मोठे वळण घेतले. आव्हानांचा सामना करूनही, जोनीने आपला देवावरचा विश्वास कायम ठेवला आणि देवाबरोबरच्या तिच्या नातेसंबंधात तिला बळ मिळाले.  कालांतराने, जोनी तिच्या शारीरिक मर्यादा असूनही, तिने परिपूर्ण जीवन जगण्याचे नवीन मार्ग शोधून, तिच्या नवीन जीवनाला सुरुवात केली. समान कष्ट आणि संघर्षांना सामोरे जाणाऱ्या इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी तिच्या अनुभवांचा वापर करून, ती एक लेखिका, वक्ता आणि अपंग लोकांसाठी चांगला आदर्श बनली. तिच्या संस्थेद्वारे आणि तिच्या प्रेरणादायी भाषणांद्वारे, आशा आणि श्रद्धेच्या सामर्थ्याचा संदेश पसरवत, जोनीने अनेकांच्या जीवनास स्पर्श करत आहे. हे सर्व ती तिच्यात असणाऱ्या आत्मविश्वासाने करत आहे.

आपणसुद्धा आपल्या आयुष्यात जेव्हा अडथळे किंवा दुख येत असतात आणि आपले जीवन नको-नकोशे वाटते तेव्हा आपण देवावर विश्वास ठेवून, नवीन जीवनाला सुरुवात केली पाहिजे. आजच्या या आधुनिक युगात आपला विश्वास डगमगत चालला आहे. आज तरुण पिढीचे लक्ष काम-व्यवसायावर, शाळेतल्या मुला-मुलींचे लक्ष जास्त अभ्यासावर आणि विडीओ गेम्स (pubg) वर आहे. आणि ५ वर्षाखालील मुलांच्या हातात मोबाईल फोन्स दिले जातात. काम-व्यवसाय, अभ्यास, विडीओ गेम्स व मोबईल गरजेचे आहेत पण आपण देवाला किती व कुठे वेळ देत असतो जेणेकरून आपला विश्वास वाढेल यावर प्रत्येकाने विचारमिनियम करण्याचे गरज आहे.

आजच्या आधुनिक युगात बहुताश ख्रिस्ती भाविक जेव्हा जीवनात दुख व कष्ट येतात जेव्हा आपले सर्व मानवी पर्याय संपतात तेव्हा आपण देवाकडे विश्वासाने वळत असतो. आजारपण, दुःख किंवा अडचणीच्या वेळी आपल्याला परमेश्वराचे मार्गदर्शन आणि शक्ती मिळणे स्वाभाविक आहे. पण मला एक प्रश्न विचारू द्याः देवाबरोबरचा आपला प्रवास केवळ दुःखाच्या क्षणांपुरता मर्यादित असावा का?  नाही, आपला विश्वास आपल्याला, अजून जास्त करावयास बोलावतो. जेव्हा जीवनातील वादळे आपल्या किनाऱ्यांवर धडकतात तेव्हा चर्चला भेट देणे आणि सांत्वन मिळवणे सोपे असते. मात्र, विश्वासाच्या खऱ्या वाढीसाठी अजून अधिक गरज असते. हे आपल्याला आपल्या भक्तीमध्ये ठाम राहण्यास शिकवते, आपल्या आध्यात्मिक जीवनाचे पोषण करण्यास मदत करते.

आणि आपण नेहमी चर्चमध्ये उपस्थित राहणे, संडे स्कूलमध्ये भाग घेणे आणि विश्वास निर्माण करण्याच्या उपक्रमांना (faith-formation) आपल्या जीवनात प्राधान्य देवून आपला विश्वास वाढवला पाहिजे.

तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी देवाच्या विश्वासात राहण्यासाठी एकमेकांना प्रेरित करूया. असा समुदाय निर्माण करूया जिथे विश्वास ही कष्टांची प्रतिक्रिया नसून एक जीवनशैली असेल. आपल्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी आशा आणि शक्तीचा दिपस्तंब असेल. आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असताना, एकमेकांना आधार देत आणि एकमेकांना उंचावत, एकत्र विश्वासात वाढत राहूया आणि स्वर्गात जाण्याचे मार्ग सोप्पे करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१) आपले परमगुरु फ्रान्सीस, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी यांना  देवाचे काम करण्यासाठी विपुल असा आशीर्वाद मिळवा. ते जे निस्वार्थी काम करतात त्यांच्या त्या  कामामध्ये परमेश्वराचे सहाय्य लाभावे व त्यांनी त्याच्या कार्य द्वारे सर्व ख्रिस्ती लोकांना देवाकडे आणावे व त्यांचा विश्वास बळकट व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३)  आपल्या देशात नेहमी शांती नांदत राहावी, द्वेष-मत्सर दूर व्हावा, सर्वांना समानतेचा हक्क व वागणूक मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) जे लोक शारिरीक तसेच मानसिक आजाराने  पछाडलेले आहेत. ज्यांची शस्रक्रिया होणार आहेत अश्या सर्व लोकांवर प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांना नविन आरोग्यदान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) यदांच्या वर्षी चांगले हवामान मिळावे व सर्व शेती-बागा पिकांनी व फळाफुलांनी बहरून याव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

६) आता, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभू चरणी ठेऊ या.