Thursday 23 September 2021

                                   


   Reflection for 26th Sunday in Ordinary Time (26/09/2021) By Bro. Jeoff Patil 

सामान्य काळातील सव्विसावा रविवार

दिनांक – २६-०९-२०१८

पहिले वाचन – गणना ११:२५-२९

दुसरे वाचन – याकोब ५:१-६

शुभवर्तमान - मार्क ९:३८-४८

“जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे”.



प्रस्तावना

            आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास आमंत्रण देत आहे.

          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि, देवाने मोशेचे काम हलके करण्यासाठी सत्तर जणांची निवड केली. दुसरे वाचन आपल्याला धन व त्याचा गैरवापर कशाप्रकारे वाईट मार्गाला घेऊन जाऊ शकतो हे स्पष्टपणे सांगत आहे. तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्त हा सर्वव्यापी आहे व त्याचे दर्शन आपल्याला चांगल्या व्यक्तीमध्ये व त्याच्या कार्यामध्ये दिसून येते, हे सांगत आहे.

          दैनंदिन जीवन जगात असताना आपण अनेक लोकांच्या संपर्कात येतो जी निस्वार्थीपने दुसऱ्यांची सेवा करतात. ह्या लोकांच्या कार्याचा कधी-कधी चुकीचा अर्थ काढला जातो. आशा लोकांच्या पाठीही उभे राहून त्यांच्या कार्यास आधार द्यावा व त्याद्वारे ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवण्यास आपणास कृपा मिळावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.   

मनन चिंतन

          “जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे”. ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास बोलावत आहे. ख्रिस्ताचे कार्य हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच मर्यादित नाही तर अख्रिस्ती लोकांसाठी सुद्धा आहे. ह्याची जाणीव आपल्याला आजच्या शुभवर्तमानात पाहायला मिळते.

          जेव्हा आपण एकत्र राहत असतो तेव्हा तेथे समस्या उद्भवतात कारण आपल्या बहुतेकजनात मत्सर व राग रुजलेला असतो. एक मनुष्य ख्रिस्ताच्या नावाने भुते काढत होता. कदाचित ह्या मनुष्याने ख्रिस्ताविषयी ऐकले असेल. कारण येशूची ख्याती सर्व ठिकाणी पसरली होती. म्हणून हा मनुष्य येशू हा दैवी रूप आहे, हे जाणून येशूच्या नावाने लोकांस बरे करणे व भुते काढण्यास यशस्वी ठरतो. हे पाहून येशूचे शिष्य थक्क झाले. आपण येशूच्या अधिक जवळ असून सुद्धा लोकांना बरे करण्यास ते असफल ठरले; ह्या गोष्टीची त्यांना लाज वाटली. योहानाने येशूकडे तक्रार केली पण येशूने त्याला सरळ शब्दांत त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. येशू म्हणाला, “जो आपल्या विरुद्ध नाही, तो आपल्या बरोबर आहे”. ह्याचा अर्थ म्हणजे त्या मनुष्याला लाभलेलं सामर्थ्य हे देवाकडून आहे. देव त्याच्याद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता पसरवित होता.

          आपण ख्रिस्ती जीवन जगात असतांना आपल्या जीवनात बरे व वाईट बोलणारे लोक भेटतात, कारण मत्सर हे मतभेदाचे मूळ कारण आहे. आपण ख्रिस्तसभेमध्ये नाही तर सर्व ठिकाणी मतभेद करणारे लोक पाहत असतो.

एका गाढवाला झाडाला बांधले होते. एका रात्री भुताने दोरी कापून गाढव सोडले. गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले. पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. गाढवाच्या मालकाच्या पत्नीला राग आला तिने आणि तिच्या मुलांने शेतकऱ्याच्या घराला आग लावली. शेतकऱ्याने आपल्या घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलाला दोघांना ठार मारले.शेवटी जेंव्हा शेतकऱ्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला "तुझ्यामुळे हे सगळे मेले, तू असं का केलंस?" त्या भूताने उत्तर दिलं "मी कुणालाही ठार मारले नाही, मी फक्त दोरीने बांधलेले गाढव सोडले."

 मत्सर आपल्याला आंधळा बनवू शकतो आणि आपल्याला वाईटाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि आपल्यामध्ये असलेला चांगुलपणा त्याची वाढ थांबू शकतो. येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे कि, देव हा वाईट व बरे करणाऱ्यावर त्याचा प्रकाश टाकतो. तसेच आपण सुद्धा आपल्या जीवनात ते वाईट व बरे त्याच्यात मतभेद न करता सर्वांवर देवाचे प्रेम द्यायला पाहिजे व ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र पसरवली पाहिजे.

          ख्रिस्ताचे कार्य हे फक्त प्रवचन करणे, बाप्तिस्मा देणे किंवा इतरांना ख्रिस्ती धर्मात आनणे ह्यापुरता मर्यादित नाही, तर त्याही पलीकडे आहे; माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाला माणूस म्हणून वागवणे आहे. जेव्हा एखादी अख्रिस्ती व्यक्ती तहानलेल्या व्यक्तीस पाणी पाजते, रोग्यांना औषध देते, दीन-दुबळ्यांची सेवा करते व दुःखितांचे सांत्वन करते तेव्हा ती व्यक्ती ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होते. दुसऱ्या व्हॅटिकन सभेने ख्रिस्ताचे वास्तव्य हे सर्वव्यापी आहे; ह्याची जाणीव अखिल ख्रिस्तसभेला करून दिली आहे. आपल्या ह्या जगात जर देवाचे राज्य प्रस्थापित करायचे असेल तर आपणा सर्वांना एकत्र येऊन देवाचे सेवाकार्य या पृथ्वीवर प्रस्थापित करावे लागेल.

आजच्या शुभवर्तमानातील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पापी वृत्ती. जर आपला कुठलाही अवयव आपणास पापास प्रवृत्त करत असेल तर तो आपण काढून टाकावा. कारण आपला संपूर्ण नाश होण्याएवजी आपण अपंग स्वर्गात गेलेलं बरे. ह्या व्याक्याचा आपण तंतोतंत अर्थ घेऊ नये तर ह्या वाक्याद्वारे येशू ख्रिस्त आपल्या काय संदेश देत आहे, हे महत्वाचे आहे. आपले शारीरिक अवयव हे आपल्यासाठी जगातील सर्व संपत्तीहून अधिक अनमोल आहेत. म्हणून जर आपल्या अनमोल गोष्टी जर आपल्याला पापांकडे नेत असतील, व ख्रिस्त व आपल्यामध्ये दुरी निर्माण करीत असतील तर त्या पापांचा आपण त्याग करावा. असे येशू ख्रिस्त आपल्याला ह्या वाक्याद्वारे संदेश देतो.

स्वर्गराज्यापेक्षा अधिक महत्वाची दुसरी गोष्ट असू शकत नाही हे आपल्याला येशू ख्रिस्त आजच्या उपासनेत पटवून देत आहे. ख्रिस्ताचे खरे शिष्य बनून त्याचे कार्य करण्यास ईश्वरी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थाना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद – हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. व तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.

3.  जी कुटुंबे दैनिक वादविवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला उधान यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

४. जी दापत्ये अजून बाळाच्या देणगीची वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थान करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


Thursday 16 September 2021

  Reflection for 25th Sunday in Ordinary Time (19/09/2021) By Bro. Gilbert Fernandes



सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक – १९-०९-२०१८

पहिले वाचन – शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०

दुसरे वाचन – याकोब  ३:१६,४:३

शुभवर्तमान – मार्क ९:३०-३७


‘जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे.




प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्या नितीमत्व, एकाग्रता व नम्रता ह्या मानवी जीवनातील तीन महत्वपूर्ण गोष्टींवर विचार- विनिमय करण्यास बोलावत आहेत.

        शल्मोनाच्या ज्ञानग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, जर नीतिमान माणूस देवाचा पुत्र असेल तर देव त्याला सहाय्य करील आणि त्याची शत्रूंच्या तावडीतून सुटका करील. दुसऱ्या वाचनात संत याकोब आपल्याला ह्या जगातील ऐहिक गोष्टींचा मोह न धरता, ख्रिस्ताच्या वचनाचा ध्यास आपल्या जीवनात कसा उतरावा ह्या विषयी उपदेश करत आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना बालकाचे उदाहरण देऊन नम्रतेविषयी धडा देत आहे. प्रभू म्हणतो, “जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने प्रथम सेवक झाले पाहिजे”.  

         मानवी जीवनातील अहंकारपणा किंवा मी-पणा मानवाला ख्रिस्ताकडून व त्याच्या शिकवणुकीतून दूर नेत असतो. ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतीरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण करून आपल्यासमोर नम्रतेचे आणि लीनतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये सहभागी होत असतांना, आपणही ख्रिस्तासारखे नम्र व लीन बनावे व त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला प्रभुने द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन - शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०

            शलमोनचा ज्ञानग्रंथ आपल्याला सांगत आहे की, नीतिमान मनुष्य ह्या त्याच्या चांगल्या कार्यामुळे त्याच्या शत्रूंना सतत अडथळा आणत असतो. व त्या कारणामुळे ते त्याला जीवे मारण्यास तयार असतात. हा नीतिमान मनुष्य इतरांनाही चांगले जीवन जगण्यास आव्हान करीत असतो. परंतु ते त्यांना पटत नाही. त्यांना हे ही माहित असते की, देव त्याच्या सहाय्यास येतो तरीही ते त्याला जीवे मारण्याचा कट रचतात.

            परंतु आपण पुढे पाहतो की, नीतिमान हा त्याच्या चांगल्या कार्यामुळे शाश्वत जीवनास योग्य ठरतो. तो वाईटापासून व ऐहिक मोहापासून दूर राहतो. अशा नीतिमान व चांगल्या लोकांची कसोटी वेळो-वेळी केली जाते; परंतु देवावर पूर्ण विश्वास ठेवल्याने नीतिमान मनुष्याची विरोधकाराच्या तावडीतून सदैव सुटका होत असते. कारण त्याची चांगली कार्ये व सौम्यपणा त्याच्या मदतीला येत असतात.

दुसरे वाचन - संत याकोबाचे पत्र ३:१६,४:३

            संत याकोब आपल्या पत्राद्वारे ख्रिस्ती जनांसमोर खोटे व खरे ज्ञान कुठचे हे सांगतो. मुळात ज्ञान कधीच घमेंड करत नाही. जेथे मत्सर असतो आणि तट-फुटी पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेथे खरे ज्ञान नसेत. ज्याला ज्ञान म्हटले जाते ते देवापासून नसते, तर ऐहिक जगापासून असते. ते पापी स्वभावापासून व इंद्रियजन्य असते. ते सैतानाने पुरविलेले असते व यामुळे गोंधळ व अव्यवस्था माजते व सर्व प्रकारचे वाईट घडते.

            परंतु जे ज्ञान देवापासून मिळते ते १००% शुद्ध असते. ते पवित्र असते. या ज्ञानाने तट न पडता शांतीची स्थापना होते.

            पुढे संत याकोब म्हणतो, आपण का भांडतो, तर आपणा प्रत्येकामध्ये पापी स्वभाव असतो. या पापी  स्वभावाचे प्रमुख गुणलक्षण “स्वार्थ” हा आहे. आपण सदा आपल्या फायद्याचे पाहतो व त्यामुळे आपल्याला हवे ते मिळत नाही पण जर का आपण निस्वार्थी जीवन जगलो. दुसऱ्याच्या भल्याचे केले तर नक्कीच आपलेही भले होईल.

शुभवर्तमान - मार्क ९:३०-३७

            मार्क लिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू पुन्हा एकदा आपल्या मरणाविषयी शिष्यांना सांगत आहे. व नेहमी प्रमाणे शिष्यांना काही समजत नाही. आपण पाहतो की, येशूला त्यांच्या मरणाची पूर्व खबर होती व तो आपल्या शिष्यांना त्यासाठी तयार करीत होता. येशूला माहिती होते की, आपले राज्य इथले नाही तर स्वर्गाचे आहे. परंतु शिष्यांना ह्याची जाणीव होत नाही व ते येशूचे राज्य इथले  समजतात व त्या अनुशंगात ते स्वःताच्या मोठेपणाची चर्चा करतात.

            परंतु येशू त्यांचा गैरसमज दूर करतो व सांगतो, देवाच्या राज्यात जो अधिकार गाजवितो तो मोठा असतो असे नाही तर मोठा तो असतो जो स्वतःला दुसऱ्याच्या सेवेसाठी नमवितो. पुढे येशू त्यांना लहान बालकाचे उदाहरण देतो. बालके हे स्वभावाने निर्मळ, स्वाभिमानी व वागण्याने नितळ असतात. ह्यास्तव जो कोणी बालकाप्रमाणे आपल्या जीवनात स्वाभिमान व नितळपणा ह्यांचा स्विकार करतो, तो ख्रिस्ताचाच नव्हे तर ज्याने ख्रिस्ताला पाठवले आहे त्याचा स्विकार करतो.

मनन चिंतन:

            आजचे आधुनिक जग हे जाहिरातीचे, प्रसारमाध्यमाचे व तत्वज्ञानाचे युग आहे. सर्वत्र जो तो मान-सन्मान, प्रतिष्ठा, मोठेपणा ह्याच्यामध्ये गुंफलेला आहे. जीवनात आपण कसे होऊ व नव-नवीन उच्च पदवीस्थाने कसे मिळवू? ह्यामध्ये गुरफटत चालला आहे. खरे पाहिले तर हा जगाचा नियम आहे. जगाच्या निर्मितीपासूनच ह्या नियमाची जोड जगाला लागली होती, येशू ख्रिस्ताचे शिष्य ह्या अस्तित्वाला निराळे होते असे नाही. संत मार्कच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे येशूचे शिष्य आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? ह्याविषयी चर्चा करीत होते. तेदेखील मान-सन्मानमोठेपणा ह्यामध्ये गुंफून गेलेले होते.

        शिष्यांना ठाऊक होते कि, येशू ख्रिस्त ज्याने इतके चमत्कार केले आहेत तो सर्वसामान्य मनुष्य नसून एक दैवी मानव आहे. तो एक चमत्कारी असून त्याच्याठायी दैवी शक्ती आहे. त्याचे गौरवशाली राज्य प्रस्थापित करण्यासाठी तो ह्या जगात अवतरला आहे. त्या वैभवशाली राज्याचे भागीदार होण्यासाठी, वारस होण्यासाठी त्याने आमची निवड केली आहे. एक दिवस आम्हांला सुद्धा मान-सन्मान, प्रतिष्ठा गाठता येईल.

        परंतु आजच्या शुभवर्तमानाद्वारे ख्रिस्त त्यांना नम्रतेचा व लीनतेचा धडा शिकवत आहे. “जो कोणी तुम्हांमध्ये उच्च होऊ इच्छितो, त्याने सर्वांचा सेवक बनावे”.

        जीवनात यशस्वी होणे किंवा कोणतेही उच्च पद मिळविणे हे मुळीच चुकीचे नाही. देवाने दिलेल्या देणग्यांचा वापर करूनच आपण जीवनात यशस्वी बनत असतो. पण अनेक वेळा आपल्याला, आपल्या यशस्वीपणाचा अहंकार चढतो. आपण दुसऱ्याला विसरतो. दुसऱ्याकडे दुर्लक्ष करतो. संकटकाळी त्यांच्या मदतीला पाठ फिरवत असतो. अशा ह्या ‘मी’ घटक वृत्तीला बळी न पडण्यासाठी जीवनात नम्र व लीन राहणे आवश्यक आहे. 

        येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानात आपला संदेश, आपली शिकवणूक स्पष्ट करण्यासाठी अनेक अशा वृतांचा, दाखल्यांचा व चिन्हांचा वापर केला आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील त्याने ‘बालकाचे’ उदाहरण त्याच्या शिष्यांसमोर ठेवल्याचे आपण पाहतो. छोटी मुले ही मनाने नितळ व शुद्ध असतात. त्यांच्यात कुभावना कदापि नसते. कोण मोठा व कोण छोटा असा भेदभाव ते कदापि करत नसतात. बालकांप्रमाणे नितीमान, नितळ शुद्ध, प्रेमळ होण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना पाचारले होते. ते जगातील राज्याचे शिष्य नसून, स्वर्गीय राज्याचे शिष्य होते. ह्याची जाणीव ख्रिस्ताला आपल्या शिष्यांना करुन द्यायची होती.

          आजचे शुभवर्तमान आपल्याला नम्रतेने आणि लीनपणे जीवन जगण्यास बोलावीत आहे. स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जीवन जगणे खूप महत्वाचे आहे. एके दिवशी एक माणूस देवाला म्हणाला, “देवा, मला स्वर्ग आणि नरक कसे आहेत हे जाणून घ्यायचे आहे. देवाने त्या माणसाला दोन खोल्या दाखविल्या पहिल्या खोलीच्या मध्यभागी एका मोठ्या टेबलावर स्वादिष्ट अशा रस्स्याने भरलेले पातेले होते. पण त्या टेबलाभोवती बसलेले लोक पातळ आणि आजारी होते. त्यांच्याकडे लांब हाताचे चमचे होते. त्या चमच्यांनी तो रस्सा घेणे त्यांना शक्य होते. परंतु त्या चमच्यांनी भरलेला रस्सा त्यांच्या स्वतःच्या तोंडाजवळ आणणे त्यांना अशक्य होते. हे त्यांचे दुःख पाहून तो माणूस थरथरला. देव त्याला म्हणाला हे तू नरक पहिले. मग देव त्याला माणसाला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत सुद्धा एका मोठ्या टेबलावर स्वादिष्ट अशा रस्स्याने भरलेले पातेलं होतं, पण त्या टेबलाभोवती बसलेले लोक चांगले आणि सदृढ होते त्यांच्याकडे सुद्धा लांब हाताचे चमचे होते, परंतु ते स्वतःन तो स्वादिष्ट रस्सा न पिता दुसऱ्यांना भरवत होते. हे सर्व दृश पाहून तो माणूस आश्चर्यचकित झाला. देवा त्याला म्हणाला, हे तू स्वर्ग पाहिले आहे. नरकातील लोक स्वतःचा विचार करत होते. ते स्वार्थी वृत्तीचे होते. याउलट स्वर्गातील लोक दुसऱ्यांचा विचार करत होते. ते निस्वार्थी होते.  

आपले जीवन हे निःस्वार्थीपणे दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापरणे गरजेचे आहे. आज आपल्या समोर संत मदर तेरेजा, संत मॅक्सिमिलीयन कोलबे ह्यांसारखे अनेक आदर्श आहेत; ज्यांनी आपले संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या सेवेसाठी व उद्धारासाठी पणाला लावले. आज त्यामुळे ते संत म्हणून गणले जातात. त्यामुळेच जर का आपल्याला सुद्धा श्रेष्ठ व्हायचे असेल तर आपण सुद्धा आपल्या जीवनात निस्वार्थी वृत्तीने व नम्रपणे इतरांची सेवा करण्यास झटावे व त्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराने आपल्याला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू आम्हाला तुझ्यासारखे नम्र बनव.

१) आपल्या ख्रिस्तसभेत अखंडरीत्या कार्य करणारे परमगुरु, महागुरू, धर्म-गुरु आणि धर्म-भगिनी व इतर सर्व ख्रिस्ती-बांधव जे देवाचे कार्य पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने ख्रिस्तामध्ये नम्र होऊन करत आहेत, या सर्वांना देवाने चांगले व निरोगी आरोग्य बहाल करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोक रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची पुष्कळ अशी हानी झाली आहे. ह्या सर्वांना प्रभूने दिलासा द्यावा व त्यांना नव्याने जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून, आपण प्रार्थना करूया.

३) जे लोक आजारी आहेत अश्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास सहनशीलता व शक्ती मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने झटावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

 


 

Thursday 9 September 2021

                                   


Reflection for 24th Sunday in Ordinary Time (12/09/2021) By Bro. Pravin Bandya   




सामान्य काळातील चोविसावा रविवार


दिनांक १२/०९/२०२१

पहिले वाचन: यशया ५०:५-९

दुसरे वाचन: याकोबाचे पत्र २:१४-१८

शुभवर्तमान: मार्क ८:२७-३५


पेत्र येशूला म्हणाला, आपण ख्रिस्त आहा

प्रस्तावना

आज देऊमाता सामान्य काळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वरावरील विश्वासात दृढ होण्यास पाचारण करीत आहे. ‘माझ्याठायी विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्याच्यापासून काय लाभ’ असं संत याकोब आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे. ज्या प्रमाणे एका नाण्याला दोन बाजू म्हणजे छापा आणि काटा असतो, त्याप्रमाणे विश्वासाच्या दोन बाजू आहेत, त्या म्हणजे कृती आणि शब्द. आजच्या शुभवर्तमानात देखील आपण पाहतो कि, पेत्राने प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास फक्त शब्दाने प्रगट केला नाही तर, ख्रिस्ताच्या  मरण, पुनरुत्थान  आणि स्वर्गरोहणानंतर देखील त्याने प्रभू येशूख्रिस्तासाठी आपला प्राण देऊन, कृतीद्वारे विश्वास प्रगट केला. आपणाला देखील प्रभू येशूख्रिस्ताने अशा विश्वासाच्या दानाने परिपूर्ण करावं, म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन

आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर यशया संदेशाद्वारे, आपण दुःखामध्ये विश्वासात कशा प्रकारे टिकून राहावे, याविषयी आपल्याला शिकवत आहे. प्रभू परमेश्वर माझा सहाय्यक आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? अशा पवित्र शब्दांमध्ये यशया संदेष्टा आपलं  सांत्वन करत  आहे.

दुसरे वाचन

आजच्या दुसऱ्या वाचनात संत याकोब म्हणतो, कि विश्वासाला जर कृतीची जोड नसेल तर तो विश्वास निर्जीव आहे. आपल्या चांगल्या कृत्याद्वारे आपला विश्वास सजीव करण्यास प्रभु  येशू ख्रिस्ताची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

शुभवर्तमान

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, कि जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मला अनुसरत राहावे. दुःखामध्ये देखील आपला ख्रिस्तावरिल विश्वास प्रगट करण्यास आजचे शुभवर्तमान आपल्याला पाचारण करीत आहे.

मनन-चिंतन

विश्वास या विषयावर आज आपण मनन चिंतन करीत असताना, विश्वासाच्या तीन भागांवर म्हणजे ‘अपूर्ण विश्वास’, ‘अंधविश्वास’ आणि ‘पूर्ण विश्वास’ ह्या विषयांवर चिंतन करणार आहोत.

        ‘अपूर्ण विश्वास’ म्हणजे, आपण कधी-कधी प्रार्थना करतो पण आपल्या मनात  शंका असते की, माझी प्रार्थना परमेश्वर नक्की ऐकत आहे का? किंवा मी प्रार्थनेला बसलो असताना प्रभू परमेश्वर माझ्या बरोबर उपस्थित आहे का? परमेश्वर माझ्या प्रार्थनेचे उत्तर देईल का? अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शंका आपल्या मनामध्ये निर्माण होतात. परंतु इब्री लोकांस पत्र ११:१ मध्ये प्रभुचे वचन आपणाला सांगत आहे कि, “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे”. म्हणून जरी आपल्याला ख्रिस्त दिसत नसला तरीपण तो आपल्या बरोबर आहे; हा विश्वास आपण बाळगणे   गरजेचे आहे. कारण पुढे अध्याय ११: ६ मध्ये आपण वाचतो कि, “विश्वासावाचून त्याला आनंदित करणे अशक्य आहे”. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे.

Ø दुसरा भाग आहे, अंधविश्वास

अंधविश्वासाविषयी यिर्मया  संदेष्टा अध्याय १७:५ आणि ६ म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. तो वैराणांतल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही; अरण्यांतील वृक्ष स्थळें, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यांत तो वस्ती करील”.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, पेत्राने जिवंत देवाचा पुत्र, प्रभू येशूख्रिस्तावरील आपला विश्वास प्रगट केला कि, आपण जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहा. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया कि,  आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत? जिवंत देवावर कि इतर गोष्टींवर? जर आपण परमेश्वराला सोडून इतर गोष्टींवर विश्वास ठेवत असू, तर आपण देखील अंधविश्वासामध्ये अडकलेले आहोत.

Ø तिसरा भाग आहे, पूर्ण विश्वास

ह्या तिसर्‍या भागावर मनन-चिंतन करीत असताना मी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण विश्वासात टिकून राहण्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे.

एकदा एका कुटुंबामध्ये एक सुंदरशी मुलगी जन्मास आली. ती लहानाची मोठ्ठी झाली. लग्नाच्या वयाची झाली असताना तिच्या आई-वडिलांनी विचार केला कि, आता आपण मुलीचं लग्न करूया आणि म्हणून त्यांनी तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधलं; व तिचा साखरपुडा करण्याचा दिवसही ठरवला. तो महान दिवस उगवताच मुला-मुलीने एकामेकाच्या बोटामंध्ये अंगठ्या घातल्या. अचानक साखरपुडाच्या दुसऱ्याच दिवशी त्या मुलाला आपल्या कंपनीतून पत्र आलं की, परदेशामध्ये आपल्या कंपनीतील काही ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी कमी आहेत, म्हणून तुला काही महिन्यासाठी परदेशातील ऑफिसमध्ये जायचं आहे. त्या मुलाला दुःख झालं कि, कालच माझा साखरपुडा झाला; मी माझ्या प्रेयसी बरोबर कधी शॉपिंग मॉल किंवा सिनेमा पहायलासुद्धा  गेलो नाही, कधी कुठे फिरायला गेलो नाही.  आपल्या काळजावर दगड ठेवून हा मुलगा परदेशामध्ये गेला. त्या वेळेला मोबाईल नव्हते, फोन नव्हते, कधी पत्र पाठवलं तरच एकमेकांविषयी कळत असे. मुलगा परदेशामध्ये जाऊन एक वर्ष निघून गेले; दुसरे वर्ष देखील निघून गेले आणि असे करून जवळ-जवळ  चार ते पाच वर्ष निघून गेली. तरी देखील ह्या मुलाचा काय पत्ता  नाही. आता पत्र देखील नाही. त्या मुलीबरोबरच्या दुसऱ्या मुलींची लग्न झाली. घरची माणसं व सर्व लोक तिला म्हणायला लागली की, तू दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करून घे,  पण ती एकच शब्द म्हणत होती, “ज्या दिवशी त्याने माझ्या बोटामध्ये अंगठी घातली, त्या दिवशी त्याने मला वचन दिलं की, मी तुला घेण्यासाठी पुन्हा येणार, म्हणून माझा विश्वास आहे कि, तो माझ्यासाठी नक्की येणार”. आणखी पाच वर्षे निघून गेली; म्हणजे या गोष्टीला तब्बल दहा वर्षं निघून गेली. आणि दहा वर्षानंतर तो मुलगा परदेशातून संपूर्ण वैभव घेऊन पुन्हा आला. तिला लग्न न केलेले पाहून, तिचा त्याच्यावरील विश्वास बघून त्याला आनंद झाला. त्याने तिच्या बरोबर लग्न केलं आणि पुढील आयुष्य सुखामध्ये घालवलं.

जुन्या करारामध्ये होशेयाच्या पुस्तकातील अध्याय २:१९-२० मध्ये परमेश्वर होशेयास म्हणतो. तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम दया यांच्यासह तुला वधू करून घेईन.  मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील.

परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर परमेश्वराने  एक करार केला आहे. परमेश्वर आपला देव आहे आणि आपण त्याची लोकं आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्माच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये कराराची अंगठी घातलेली आहे आणि तो शेवटच्या दिवशी आपल्याला घ्यायला नक्की येणार आहे. तेव्हा आपला विश्वास कसा असेल? गोष्टीमधल्या त्या मुली प्रमाणे पूर्ण विश्वास असेल की, अपूर्ण विश्वास असेल? किंवा अंधविश्वास असेल? या गोष्टीवर आज आपण मनन-चिंतन करूया. आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया व परमेश्वराने आपल्याला पूर्ण विश्वासाने परिपूर्ण करावं, म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना.

प्रतिसाद: हे प्रभू, आमचा विश्वास वाढव.

१) आपले महागुरू पोप, बिशप्स, कार्डीनल, धर्मगुरू-धर्मभागिनी तसेच ख्रिस्तामध्ये एकरूप होऊन सेवाकार्य करणाऱ्या या सर्व लोकांना प्रभूचे कार्य व्यवस्थितरित्या पुढे नेता यावे व त्यांना चांगले आरोग्य, कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) सध्या जगामध्ये अशांतता दिसून येत आहे. घातकी संकटे कोसळत आहेत. राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक व आर्थिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) सर्व ख्रिस्ती बांधवात एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांना समजून घ्यावं, आप-आपसातली वैर-भावना या गोष्टींचा त्यांग करून प्रेम, सदभावना निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) जे लोक आजारी आहेत, ज्याचं मरण जवळ येऊन ठेपल आहे त्यांनी जीवनात निराश न होता त्यानां प्रभूची प्रेरणा मिळावी व धैर्याने जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) देव प्रीती आहे, तो आपली प्रार्थना ऐकतो म्हणून आता आपण आपल्या स्थानिक गरजा शांतपणे प्रभूचरणी मांडूया.