Tuesday 30 September 2014

 Reflections by: Fr. Albert D'Souza














असीसीकर संत फ्रान्सिसचा सण
दिनांक : ०४/१०/२०१४.
पहिले वाचन : बेनसिराक ५०:१,३-४,६-७.
शुभवर्तमान : मत्तय ११:२५-३०.

प्रस्तावना :
     असीसीकर संत फ्रान्सिस हे १२ व्या शतकातले. हा काळ नैतिक, आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक अस्थिरतेचा होता. श्रीमंत व गरीब ह्यात मोठी दरी होती. समाज्यात बदल घडवून आणण्यासाठी त्याने स्व:तापासून सुरवात केली. ह्या कारणास्तव ह्या महापुरुषाला प्रती ख्रिस्त म्हणतात. आजच्या घडीला विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होत आहे आणि हिच सर्वात मोठी समस्या आहे. असिसिकार संत फ्रान्सीस हे पर्यावरणाचे आश्रयदाते आहेत. त्यांच्या मध्यस्तीने ह्या मिस्सा बलिदानात सहभागी होत असताना आपल्याकडून पर्यावरणाची जतन व्हावी म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

ह्या जगात येशू ख्रिस्ताव्यतिरिक्त जर कोणी सर्वात जास्त लोकांची मने जिंकला असेल तर तो आहे गरीबांचा कैवारी असीसीचा संत फ्रान्सिस. ह्या महान संताची निसर्गावरील आपुलकी व प्रेमाविषयी सर्व मोठ मोठे फ्रान्सिस्कन साहित्यीक मोठया ऐैक्याने उल्लेख करतात. ह्या विषयावर कोणाचे दुमत किंवा मतभेद नाही. ह्या संताचा देवाविषयी असा अनुभव होता की, देव हा फक्त मानवाचाच पिता नसून तो सा-या सृष्टीचा पिता आहे. ह्यासाठी निसर्गातील सर्व सजीव-निर्जीव वस्तू त्याच्यासाठी भाऊ व बहिणप्रमाणे होते. त्याने निर्मितीत ‘निर्मात्याला’ पाहिले. त्याच्यासाठी सारी निर्मिती एक आरसा बनला, ज्यात त्याला देवाची प्रतिमा दिसली. ह्यासाठी सर्व सजीव-निर्जीव वस्तूचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. हात धुतल्यानंतर हातावरून खाली पडलेल्या पाण्याचा एक थेंबही कोणाच्या पायाखाली चिरडला जाणार नाही ना! तसेच दगड धोंड्यावर चालत असताना तो फारशी काळजी घेत असे. जेणेकरून त्यांना ईजा होणार नाही. सरपणासाठी जंगलात गेलेल्या बंधूंनी फक्त वाळलेल्या किंवा सुकलेल्या फांद्या आणाव्यात अशी आज्ञा करत. शेतात भाजीपाला लावत असताना शेताचा थोडा भाग मोकळा ठेवावा जेणेकरून जंगली गवताला पण वाढता येईल असा बोध ते आपल्या बंधूंना करीत. ऐके दिवशी एक व्यक्ती दोन कोकरू बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असता त्याची गाठ संताशी झाली, जेव्हा त्यानी हे पाहिले तेव्हा एखाद्या मातेला आपल्या चिमुकल्या रडत्या बाळाचा कळवळा येतो तसा संताना त्या कोकारांचा कळवळा आला. त्याने जाऊन त्यांना स्पर्श केला व त्यांस दया दाखविली. त्याने त्या व्यक्तीला विचारले तु माझ्या भावांचा छळ का करतोस. त्या व्यक्तीने उत्तर दिले मला पैश्याची गरज आहे. मी ह्यांची विक्री करीन व मला पैशे तर विकत घेणा-यांना ह्यांचे मास मिळेल. त्यावर फ्रान्सीस म्हणाला असे होऊ नये, ‘हा घे माझा अंगरखा व विक आणि त्याचे पैशे तू ठेव’. ह्या माझ्या भावांना(कोकरू) माझ्याकडे दे. ही काही ठळक उदाहरणे आपल्याला या महान संताचे निसर्गावरील प्रेम दाखवून देतात. ह्या महान संताचा सण साजरा करत असता आपल्या जीवनास उपयोगी असा काही संदेश आहे का? होय आहे. तो म्हणजे अशा महान संताचे अनुयायी म्हणून आपण निसर्गाशी प्रेमाने व शांतीने वागले पाहिजे. निसर्गातील समतोल बिघडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. हीच काळाची गरज आहे.
पर्यावरणाचे अर्थशास्त्र ह्यात लिहित असताना A. V. Kneese म्हणतात जर का निर्मितीची व निसर्गाची संसद (Parliament) असती तर त्यांचा पहिला निर्णय मानव जातीला समजावून बाहेर हाकलून लावायचा असता; जी फार घातकी आहे. ह्यात किती सत्य आहे ना माझ्या प्रिय बंधु भागाणींनो. ह्या घटनेचा अनुभव आपणास खाली दिसून येतो:
  • अॅसीडचा पाऊस आपल्या अवती भवती असलेले कारखाने मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ओक्साईड हा निसर्गात सोडत असतात. ह्यांचे रुपांतर हवेत अॅसीडमध्ये होते व ते पाऊसात मिसळतात व पाऊसाबरोबर खाली येतात. त्याचा दुष्परिणाम जंगलावर, तलावावर व वास्तूवर होतो.
  • ओझोन नाहीसा होणे: ओझोन हा पर्यावरणातील वरचा थर आहे परंतु हा जेव्हा नाहीसा होतो तेव्हा सूर्याची किरणे सरळ भूमीवर येतात व ह्याने कर्करोग होतो. हवेत सोडलेल्या रसायनामुळे ओझोनचा थर नाहीसा होतो. 
  • विषारी टाकाऊ घटक: भरपूर प्रमाणात औद्योगिक केंद्रातून विषारी टाकाऊ घटकांचे उत्पादन होते व ते न काळजी घेता फेकले जाते.
  •  प्रत्येक वर्षी अकरा मिलीयन हेक्टर जंगल नाहीसे करण्यात येत आहे. 
  •  जमिनीची धुप होत असल्या कारणाने सव्वीस बिलीयन टन जमिनीचा वरचा थर वाहून जात आहे.
  • प्रती वर्षी सहा मिलीयन हेक्टर वाळवंट निर्माण होत आहेत.
  • २०२५ पर्यंत पिण्यायोग्य असे पाणी दुर्मिळ होणार आहे.
  • जवळजवळ दरवर्षी आपल्या देशात दुष्काळ पडतो. प्रत्येक आठवड्याला कुठे ना कुठे जिल्हा-अधिका-याच्या कार्यालयासमोर मोर्चे काढले जातात. जेणेकरून त्यांचा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हावा.

ह्या सर्वास कारणीभूत कोण? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? अश्या ह्या अवस्थेला कोणाकडे बोट करावं?
एके दिवशी मी एका गावात मिस्सा अर्पण करण्यास जात होतो. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी उभा असताना एक शेतकरी म्हणाला या वर्षी पाऊस नाही. ह्या सरकारने काही भलं केलं नाही. हे सरकार पाडून टाकायला पाहिजे. ह्यावर मी माझ्या मनात म्हणालो, “ती त्याची चुक नाही, ही आपली सर्वांची चूक आहे.” आपण कशे झाडे तोडत आहोत. जंगल नाहीशे करत आहोत. आपल्या मनाला पटेल तसे वागत आहोत आणि देवाला व निसर्गाला दोषी ठरवत आहोत. जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल. नाही तर नसर्गच आपल्याला चांगले धडे घडवील. आज आपण अशे काही आजार पाहत आहोत जे आपल्या पूर्वजांच्या काळात अस्तित्वात नव्हते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी निसर्गातील समतोल बदलला नाही. ह्या साठीच आपण काहीतरी केले पाहिजे. आज आपणास नव्या आध्यात्मिकतेची गरज आहे; ती म्हणजे निसर्ग केंद्रित आध्यात्मिकता (creation centric spirituality) ह्या साठी आपण आपल्या गाढ निद्रेतून जागे झाले पाहिजे. प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या मला काय करता येईल ह्याचा विचार करून त्याच रुपांतर कृतीत केलं पाहिजे.
एकदा एक अॅग्लीकन पास्टरने चांगली बाग तयार केल्याबद्दल त्यांची लोकांनी स्तुती केली. त्यावर ते उत्तरले माझ्या पुर्विच्याने ह्या बागेकडे दुर्लक्ष केले होते  कारण त्यांना संपूर्ण जग बदलायचं होत, परंतु त्या जगाचा चिमुकला भाग ते प्रथम बदलू शकले नाहीत. असं म्हणतात हजारो मैलाच्या प्रवासाची सुरवात उचललेल्या एका पावलाने होते. तर मग उचलुया एक पाउल निसर्ग सुरक्षेतेच्या ह्या प्रवासात!

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
संत फ्रान्सीसच्या मध्यस्थीने आपण साऱ्या सृष्टीचा पिता परमेश्वराचरणी आपल्या विनंत्या ठेवूया.
आपले उत्तर असेल :“हे पित्या संत फ्रान्सीसच्या मध्यस्तीने आमची प्रार्थना ऐकून घे”.
१.     पोप फ्रान्सीस, सारे बिशप, सर्व धर्मगुरू व उपधर्मगुरुंसाठी प्रार्थना करूया जेणेकरून ते निसर्गाच्या संगोपनाद्वारे ख्रिस्ताच्या प्रेमाचे प्रतिक बनावेत.
२.     सर्व प्रापंचीकासाठी प्रार्थना करूया; देव आपला पिता जो आपल्याला निसर्गाची निगा राखण्यासाठी आपणास आमंत्रिक करीत आहे त्याच्या आमंत्रणाला आपल्याला पूर्ण मनाने होकार देता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     पर्यावरणाचा आश्रयदाता संत फ्रान्सीसप्रमाणे आपण देखील निसर्गाच संवर्धन कराव आणि ही पृथ्वी सगळ्यांना जगण्यासारखी करून सर्वांनी गुण्या गोविंदाने रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.     ज्या निष्पाप लोकांना वेगवेगळ्या कारणास्तव छळले जाते त्यांना परमेश्वराने धैर्यशक्ती प्रदान करावी व त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग दाखवावा म्हणून आपण करूया.    

No comments:

Post a Comment