Tuesday 26 January 2021


Reflection for the 4th 
SUNDAY IN ORDINARY TIME (31/01/2021) By Suhas Ferrel.




सामान्य काळातील चौथा रविवार

 

दिनांक: ३१/०१/२०२१

पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:३२-३५

शुभवर्तमान: मार्क १:२१-२२



 

प्रस्तावना :

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू- भगिनींनो, आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजच्या उपासनेमध्ये आपण देवाच्या अप्रतिम कृत्याविषयी ऐकणार आहोत. सामान्य माणसाद्वारे देव जेव्हा त्याचे कार्य करीत असतो, तेव्हा तो सामान्य माणूस सामान्य न राहता असामान्य अशी कृत्ये करू लागतो. कारण, त्याच्यावर देवाची कृपा असते; हेच आपण पहिल्या वाचनाद्वारे ऐकणार आहोत. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाद्वारे आपणास विवाहाबद्दल बोध करण्यात आला आहे. पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवून, वैवाहिक जीवन कसे जगावे, आणि त्यांच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाला अधिकाधिक महत्त्व देऊन; देवाची सुवार्ता जगात पसरविण्याचे कार्य करण्याची शिकवण संत पौल करीत आहे. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला येशू ख्रिस्ताची शिकवण ही इतर शास्त्री-परुषांप्रमाणे खोखली नसून स्वर्गातील पवित्र पित्याच्या अधिकाराने आहे हे लक्षात येते. त्यामुळेच सभास्थानातील माणसाच्या अंगात असलेला अशुद्ध आत्मा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो तेव्हा जोराने ओरडू लागतो, रडू लागतो, प्रभू येशूकडे विनवणी करू लागतो व कालांतराने निघून जातो.

आजच्या मिस्साबलिदानामध्ये आपण संपूर्ण तन-मन-धनाने सहभागी होऊन, एकचित्ताने आपल्या सर्व चिंता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायथ्याशी ठेवूया. येशू आपला तारणारा आहे, तोच आपल्याला नवीन जीवन देणार आहे यावर विश्वास ठेवून आजच्या मिस्साबलिदानामध्ये देवाची कृपा आपल्या सर्वांवर नित्य राहावी म्हणून प्रार्थना करूया.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०

जेव्हा देव एखाद्या व्यक्तीची निवड करतो, तेव्हा त्या व्यक्तीवर देवाची विशिष्ट कृपा असते. आपण जर जुन्या करारावर नजर फिरवली तर आपणास कळून चुकते की, जगाच्या प्रारंभापासून देवाने अगणित अशा लोकांची निवड केली होती, ज्यामध्ये राजे, शास्त्री, संदेष्टे यांचा समावेश होता. हे संदेष्टे देवाच्या शब्दाद्वारे जीवन जगले, त्यांचा विकास झाला. आणि ज्या संदेष्ट्यांनी देवाकडे पाठ फिरवली त्यांचा ऱ्हास झाला. हेच आपण पहिल्या वाचनाद्वारे ऐकणार आहोत

 

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:३२-३५

आपल्या जीवनामध्ये आपण देवाला नेहमी अग्रस्थान देणे महत्त्वाचे आहे. माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला इतर कसलीही काळजी नसते, तो बिनधास्तपणे देवाचे कार्य करू शकतो. परंतु, विवाहित माणसांच्या बाबतीत तसे नसते. विवाहित पती किंवा पत्नी हे नेहमी एकमेकांच्या सुख-दुःखाच्या विचारात व्यस्त असतात. आपल्या जीवनामध्ये इतर कोणत्याही गोष्टीला जास्त महत्व न देता देवाला प्रथम स्थान देण्याचा सल्ला संत पौलाद्वारे आपण आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे ऐकतो.

 

शुभवर्तमान: मार्क १:२१-२२

येशू जेव्हा त्याच्या शिष्यांबरोबर कफर्णहूम येथील सभास्थानामध्ये लोकांना शिकवण देऊ लागला, तेव्हा तेथील लोक आश्चर्यचकित झाले. सभास्थानातील भाषणे ही तेथील लोकांसाठी काही नवीन गोष्ट नव्हती. परंतु, ज्या अधिकाराने, ज्या विश्वासाने प्रभू येशू त्यांना बोध करीत होता, ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. सभास्थानातील सामान्य लोकच नव्हे तर, अशुद्ध आत्मेही येशूच्या उपस्थितीने हैराण झाले होते. येशूची कृत्ये पाहताच उपस्थित लोकांना विचार पडला की, ‘हा माणुस नक्की आहे तरी कोण?’ कारण, फक्त माणसेच नव्हे तर अशुद्ध आत्मेही त्याचे ऐकत होती. प्रभुची महती ही वणव्या प्रमाणे सर्वत्र पसरू लागली हे आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो.

 

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो. इथे जमलेली प्रत्येक व्यक्ती हा देवाची निर्मिती आहे. आपल्यापैकी कुणीही हा आकाशातून पडलेला किंवा आकस्मित तयार झालेला नाही. देवाने आपल्या प्रत्येकाला त्याच्या विशिष्ट योजनेप्रमाणे बनविले आहे. देवाची योजना ही आपल्या प्रत्येकासाठी वेगळी असते. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे, ते सर्व देवाच्या इच्छेप्रमाणे घडत असते. आपल्या जीवनातील सर्व सुख- दुःख, सर्व घडामोडी ह्या देवाच्या योजनेचा एक भाग आहे. आपण प्रत्येकजण एका विशिष्ट कार्यासाठी या जगामध्ये जन्मलेले असतो. ते विशिष्ट कार्य म्हणजे आपल्या निर्मात्याची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे इतरांना प्रकट करणे. आपण यिर्मया संदेष्ट्याद्वारे ऐकतो की, ‘परमेश्वराने आपल्या सर्वांच्या चांगल्यासाठी योजना आखल्या आहेत. आपल्याला दु:खवण्याचा त्याचा बेत नसून; उज्वल भविष्य देण्याचे देवाने योजिले आहे.’ (यिर्मया २९:११)

देवाची योजना आपल्या जीवनामध्ये प्रात्यक्षित रूपात आणण्यासाठी आपल्यासमोर वेगवेगळे मार्ग उपलब्ध असतात. आपण करिंथकरांस पहिले पत्र १:२७ मध्ये वाचतो की, “आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि वैयक्तिकरित्या शरीराचे अवयव आहोत.” शरीराचे प्रत्येक अवयव हे आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. म्हणूनच, आपण सुखरूप पणे चांगले जीवन जगत असतो. अगदी त्याचप्रमाणे ख्रिस्ती म्हणून देऊळमातेने आपणा सर्वांना विशिष्ट अशी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी आपण चोखपणे पार पाडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  देवाची कृपा ही आपल्या सर्वांवर असते. आपणापैकी कुणी धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक किंवा इतर मार्गांद्वारे देवाची सुवार्ता पसरविण्याचे कार्य करू शकतो. देवाचे काम करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली एकनिष्ठता. जर आपण पूर्ण निष्ठेने, विश्वासाने आणि चांगल्या हेतूने काम करीत राहिलो तर, देव आपल्याला भरपूर यश आणि कृपा देत असतो. परंतु, आपण आपल्या कामाद्वारे इतरांचे वाईट करण्याचा प्रयत्न केला तर, कालांतराने आपलाही ऱ्हास होतो. हेच आपणाला आजचे पहिले वाचन आवर्जून सांगत आहे.

आज आपण समाजामध्ये ढुंकून पाहिले तर, आपल्या निदर्शनास येते की, आज कुटुंबा-कुटुंबांमध्ये भांडण-तंटे, घटस्पोट, हत्या गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कुटुंबांमधील प्रार्थनेचा अभाव. आई-वडील दोघेही कामाला, सासू-सासरे हे त्यांच्या पलंगाला खिळलेले आणि मुलं-बाळ ही निवांतपणे वाऱ्यावर सोडलेली. तरुण आई-वडील हे आपल्याला सासु-सासर्‍यांना काही निर्णय घेण्याबाबत विचारणे गरजेचे समजत नाहीत आणि त्यांच्यावर बघून घरातील लहान मुलेही त्यांच्या आई-वडिलांना काही सांगायचे महत्त्वाचे मानत नसतात. घरामध्ये मोबाईल, कम्प्युटरचा वापर वाढल्याने संवादाला जागाच शिल्लक राहिली नाही. संवाद नसल्याने कुणाच्या जीवनात काय चालले आहे हे घरातल्यांना नंतर आणि बाहेरच्यांना आधी कळते. आज कितीतरी कुटुंब शुल्लक कारणासाठी उध्वस्त होत असलेली आपण पाहत आहोत. आजचा माणूस हा आध्यात्मिक गोष्टींना बाजूला सारून व्यवहारिक गोष्टींमध्ये जास्त गुरफटलेला आढळून येतो. ज्या देवाने निवारा, अन्न, श्रीमंती सर्व काही दिले त्या देवाला घरात दुय्यम स्थान दिले जाते. माणसाला देवाची आठवण तेव्हाच येते जेव्हा तो एखाद्या अडचणीत किंवा संकटात सापडतो. कारण, त्यावेळी त्याला साथ देणारा कोणीच नसतो. परंतु, देव हा कुणालाही कोणत्याही वेळेमध्ये सोडत नसतो. परमेश्वर नेहमी आपली वाट बघत असतो. आपण जेव्हा एक पाऊल परमेश्वराजवळ जाण्यासाठी उचलतो तेव्हा परमेश्वर दोन पावले आपल्याजवळ येतो. त्यामुळे इतर क्षणिक सुख देणाऱ्या गोष्टीला जास्त महत्व न देता आपण परमेश्वराच्या शब्दाला जास्त महत्त्व दिले पाहिजे. संत पौलाने त्याच्या जीवनामध्ये नेहमी रूढी-परंपरा ह्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले. परंतु, पुनरुत्थित प्रभूशी भेट होताच ‘देवाची सुवार्ता पसरविणे’ हेच त्याच्या जीवनाचे मुख्य ध्येय बनले. तो आवर्जून लोकांना देवाची सुवार्ता सांगू लागला. त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास, एक वेगळेच गांभीर्य होते. तो पूर्ण आत्मविश्वासाने प्रभू येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसविण्यात मग्न होता.

 आजकाल ऑनलाईनचा काळ असल्याने आपणास सर्वत्र पहावयास मिळते की, बहुतेकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे देवाची सुवार्ता जगात पसरविण्याचे काम करीत आहेत. देऊळे, तीर्थक्षेत्रे ही बंद पडली आहेत. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. हिच खरी वेळ आपली ख्रिस्ती श्रद्धा, आपला ख्रिस्ती विश्वास तपासून पाहण्याचा. परिस्थिती अनुकूल नसली तरी आपला ख्रिस्ती विश्वास टिकून राहण्यासाठी कितीतरी धर्मगुरू, धर्मभगिनींनी  इंटरनेटद्वारे लोकांना मिस्साबली उपलब्ध करून देण्याचा जिम्मा हाती घेतला. त्यामुळे लोकांना जरी प्रत्यक्षरीत्या देऊळामध्ये जाता आले नाही तरी, घरी बसल्या मिस्सा ऐकणे शक्य झाले. चर्च म्हणजे केवळ विटा- दगडांनी बांधलेली इमारत नव्हे. तर, ज्याप्रमाणे संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो की, “तुम्ही देवाचे मंदिर आहात. तुमचे शरीर हे देवाचे मंदिर आहे” (१ करिंथ. ३:१६). परंतु, कटू सत्य म्हणजे लोक देवाला विसरू लागले आहेत. चर्च जसे बंद झाले तसे लोकांचे मनही देवाकडे वळण्याचे बंद झाले. लोकांच्या जीवनामधील प्रार्थनेचे महत्त्व कमी होताना दिसू लागले. ‘कोरोना’ ह्या प्राणघाती विषाणूने जगाची वित्तहानी तर झालीच परंतु, ह्या कोरोनाने भरपूर अशा गोष्टी शिकविल्या. माणूस हा कितीही मोठा झाला तरी, परमेश्वरापुढे तो वाळूच्या कणासारखाच आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिले आहे; तोच परमेश्वर ते सर्वकाही पुन्हा घेऊ शकतो. त्यामुळे माणसाने कुठल्याही गोष्टीवर गर्व करता कामा नये. यिर्मया संदेष्टा ९:२३ मध्ये म्हणतो की, “माणसा आपल्या श्रीमंतीवर किंवा बळावर बढाई मारू नको. जर बढाई मारायची असेल तर, ह्या गोष्टीवर मार की, मीच एक परमेश्वर आहे आणि तू मला ओळखतो.”

आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की, प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये सभास्थानातील लोक हे विचारात पडू लागले. की, “हा माणूस नक्की आहे तरी कोण?” कारण, प्रभू येशू हा अधिकाराने बोलत होता. त्याच्या शब्दांमध्ये सत्य होते. त्यामुळेच फक्त माणसेच नव्हे तर, अशुद्ध आत्मेही त्याला घाबरत होते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा प्रभू येशू येतो तेव्हा, आपोआपच वाईट लोक, अशुद्ध सवयी ह्या गायब होऊ लागतात. आपण भरपूर लोकं पाहतो जी अगोदर अतिशय वाईट जीवन जगायची. परंतु, प्रभू येशूचा स्पर्श होताच त्यांच्या जीवनाचा कायापालट होतो. येशू त्यांच्या जीवनामध्ये असे कार्य करतो की, इतरांना आश्चर्याचा धक्काच बसतो.

आज बहुतेकजण हे पापांच्या अंधारात जीवन जगत आहेत. आपल्यापैकी बहुतेकजणांना प्रभू येशूच्या प्रार्थनेची, स्पर्शाची गरज आहे. आपण आपल्या जीवनातील वाईट गोष्टी, वाईट सवयी सोडण्यास तयार आहोत का? शंभर चांगली माणसं जगत असलेल्या जीवनापेक्षा एक पापी माणूस जेव्हा आपले जीवन बदलून चांगले जीवन जगण्यास चालू करतो तेव्हा, देवाला जास्त आनंद होतो. आजच्या मिस्साबलिदानात आपणा सर्वांना देवाचा स्पर्श व्हावा आणि आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगावे म्हणून प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.”

१.    आपले परमगुरु व इतर सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ, आणि प्रापंचिक यांनी देवाच्या हाकेला योग्य प्रतिसाद देऊन येशूचे सतत अनुकरण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया

२.    आपल्या देशातील सर्व राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर जनतेने दिलेली जबाबदारी योग्य मार्गाने पार पाडावी कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया

३.    ज्या व्यक्ती देवाच्या मार्गातून दूर गेलेल्या आहेत व मार्गभ्रष्ट झालेल्या आहेत, अशांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी पुन्हा योग्य मार्गावर चालाव म्हणून आपण प्रार्थना करूया

४.    जगभरातील युवा- युवतींना प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया

५.     गेले अनेक महिने आपण सर्वजण करोना विषाणूमुळे हैराण झालेलो आहोत या संकटातून देवाने आपल्याला मुक्त करावं आणि आपण पूर्वीसारखं नियमित जीवन जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया

६.     थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, आणि वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी ठेवूया.

No comments:

Post a Comment