Wednesday, 17 June 2015

Reflection for the Homily By: Valerian Patil.






सामान्य काळातील बारावा रविवार



दिनांक: २१/०६/२०१५
पहिले वाचन: इयोब ३:१, ८-११
दुसरे वाचन: २ करींथ ५: १४-१७
शुभवर्तमान: मार्क ४: ३५-४१

प्रस्तावना:
            आज आपण सामान्य काळातील बारावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो आणि आईच्या गर्भाशयातच किंवा जन्मताच मी मरण का पावलो नाही असे प्रश्न विचारतो. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात, ‘ख्रिस्ताच्या प्रेमाच्या नियंत्रणाखाली आम्ही आहोत, जो कोणी ख्रिस्ताशी संयुक्त झालेला आहे तो ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती आहे असे सांगत आहे. तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त समुद्रातील वादळाला शांत करून शिष्यांना धीर देत असल्याचे आपण पाहतो.
     आपल्या जीवनात येणाऱ्या कितीतरी लहान-मोठ्या संकटाना पाहून आपण भयग्रस्त होत असतो, परंतु येशू आम्हाला आमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी विशेष कृपा देत असतो. तीच विशेष कृपा ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असतांना मागूया. 

पहिले वाचन: इयोब ३:१, ८-११
            इयोबचे पहिले भाषण, ह्यामध्ये त्याने स्वत:चे दुःख वर्णिले आहे. इथे एका माणसाच्या अनुभवातून सर्वसाधारण मानवजातीचा उल्लेख केलेला आहे असे समजते. शोकाच्या जबर आघाताने व्याकूळ झालेला माणूस ‘इयोब’ हा होय. इयोब म्हणतो जन्मतःच मेलो असतो तर बरे झाले असते. इयोबच्या भाषणातून निराशेचा सूर लावलेला आपणास जाणवतो. आता त्याने प्रश्न उपस्थित केले की, असे शापित जन्माला येण्यापेक्षा, मी जन्मताच मेलो का नाही? आईच्या उदरातून मृत असाच बाहेर का आलो नाही? अश्या शापित जीवनापेक्षा त्याला मरण अधिक प्रिय झाले आहे असे येथे दिसून येते.

दुसरे वाचन: २ करींथ ५: १४-१७
            ख्रिस्ताचे मरण आणि पुनरूत्थान यांचा एक परिणाम म्हणजे, पौलाला मिळालेली ‘नवी दृष्टी’ होय. तो आता ख्रिस्ताकडे नव्या दृष्टीकोनातून पाहतो. जर कोणी ख्रिस्ताठायी वसत असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. या वास्तव विधानातून ख्रिस्ताच्या थोर महात्त्वपुर्णतेचे दर्शन होते आणि त्यावरून जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे असे ठामपणे म्हणता येते. ख्रिस्ताचे त्याच्यावरील हे व्यक्तीगत प्रेम पौलाला स्वतःसाठी (स्वार्थी) जीवन जगण्यापासून परावृत्त करते. व ख्रिस्ताठायी जगण्यास प्रवृत्त करते. खरोखर पेत्र हा ख्रिस्तासाठी जगला व ख्रिस्तासाठीच मेला. ख्रिस्ताचे मरण व पुनरुस्थान हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचे होते.

शुभवर्तमान: मार्क ४: ३५-४१
     ह्या विशिष्ट उताऱ्यात विविध क्षेत्रामधील अधिकाराची उदाहरणे व त्याबाबतीत केलेल्या चमत्काराचे वृत्तांत आपणास ऐकावयास मिळतात. येशूने चमत्कार केल्याचे नव्या करारात ठामपणे व स्पष्टपणे नमूद केले आहे. हा चमत्कार येशूचा निसर्गावर असलेला अधिकार स्पष्ट करतो. गालील सरोवराच्या अगर समुद्राच्या भोवताली उंच डोंगर आहेत आणि या रांगांच्या दरम्यान अरुंद एकेरी दऱ्या आहेत. या दऱ्यांतून वारा अचानक सोसाट्याने उसळून वाहतो, त्यामुळे लाटा उफाळून केव्हाही  तेथील समुद्रात वादळ निर्माण होते.
     जेव्हा येशू व शिष्य माचाव्यात होता, तेव्हा वादळ सुरु झाले. तेव्हा शिष्य खूप घाबरले त्यांनी येशूला निद्रावस्थेत असलेल्या येशूला जागे करून त्याच्याकडे त्यांच्या बचावाची मागणी केली. त्यांनतर येशूने वाऱ्याला आणि वादळाला धमकावले आणि खवळलेला समुद्र शांत झाला. हे कृत्य निर्माणकर्त्याशिवाय अन्य कोणालाही शक्य झाले नसते. जुन्या करारात केवळ देवच एक वादळे उठवणारा व शांत करणारा आहे असे आपणास वाचावयास मिळते. शिष्यांना यातील फक्त अर्धेच सत्य उमगले आणि ते स्पष्टपणे बोलण्याचे भानही त्यांना उरले नव्हते, कारण ते घाबरले होते.
     येशूच्या शिष्यांनी त्याच्यावर अ-विश्वास दाखवला, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांची कानउघडणी केली. ह्या कृत्याने शिष्यांचा येशूवर असलेला विश्वास दृढ झाला. एखाद वादळ शांत करणे अगर न करणे हे विश्वासावर नव्हे तर देवाच्या इच्छेनुसार अवलंबून असते हेच येथे दिसते. देवाचे कार्य केवळ देवालाच करता येते.

बोधकथा:
      मासेमारी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि आम्ही आमचे उदरनिर्वाह ह्या मासेमारीच्या व्यवसायावर करतो. मे महिन्याचे दिवस होते आणि ह्या मे महिन्यात समुद्रात वादळ होत असतात. एकदा मी, माझा भाऊ आणि माझे वडील, मे महिन्यात पहाटे समुद्रात मासेमारी करण्यास गेलो होतो. पहाटेचे चार वाजले होते आणि आम्ही समुद्र किना-यावरून मासेमारीसाठी आमची बोट घेऊन निघालो होतो.
     अर्ध्यातासानंतर आम्हास समुद्राच्या लाटांचा प्रवाह वाढत असल्याचे आढळले. त्यावेळी आमची बोट थोडी लहान होती. त्या बोटीचे चालक माझे वडील होते. वडिलांनी आम्हाला झोपेतून उठवले आणि सावध राहण्यास सांगितले. आमच्या बरोबर असलेल्या बोटी सुद्धा सावध होत्या. अचानक समुद्राच्या लाटांचा प्रवाह वाढत गेला. आमच्या पुढे जात असलेली एक बोट एका क्षणात पाण्यात बुडाली.
     त्या बोटीतील माणसे आपला जीव वाचण्यासाठी इतर बोटींना हाका मारू लागली. माझ्यातर जीवात जीव राहिला नव्हता. माझा भाऊ तर आपला प्राण हातात घेऊन उभा होता. परंतु माझे वडील मात्र शांतपणे आमची बोट वल्हवत होते. वडिलांनी आम्हांला सुखरूप नेले आणि आणले.
येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या जीवनाच्या नावेत असतो तेव्हा आपण आपल्या जीवनाची नाव कितीतरी वादळे किंवा संकटे असली तरी ती सुखरूपपणे समुद्र किनारी आणू शकतो.

मनन चिंतन:
     आजचे शुभवर्तमान आपल्याला महत्वाचा संदेश देत आहे. आपलं जीवन एका बोटीसारखे आहे व जग एका समुद्रप्रमाणे आहे. त्या समुद्रात कधी वादळ, संकटे येतात परंतु जर आपण येशूवर विश्वास ठेवला तर तो आपली बोट त्या वादळातून समुद्र किनारी नेईल. परंतु बऱ्याचदा आपण शिष्यांसारखे एखादे संकट उंबरठ्यावर दिसू लागल्यास आपला विश्वास ढासळतो व आपण अविश्वासू बनतो. प्रत्येकाच्या जीवनात वादळे, संकटे येतात मग ती लहान किंवा मोठी असतात. परंतु त्या संकटांना कश्याप्रकारे सामोरे जावे ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. शांतपणे, दृढ विश्वासाने वादळ सोसता यावे म्हणून देवाने संत पेत्राला शक्ती पुरवली. बऱ्याच वेळा देव आम्हालाही संकटातून वाचव असतो, तो आम्हाला मरणाच्या दाढेतून सोडवतो आणि काही वेळा आमच्या मरणाने आपल्या नावाचा गौरव करून घेतो (उदा. त्याचे विश्वासू शिष्य बनून जगल्याचा बहुमान आपल्याला मरनानंतर प्राप्त होतो).
आज्ञापालनाच्या वाटेने चालताना व प्रभू येशूच्या आज्ञा पाळताना छळाची वादळे उठली, संकटाचे वारे घोंगावू लागले, अगर दुसरी काही आपत्ती आली तरी आपण त्याच्यावर सर्वस्वी विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव आपला राखण करणारा आहे हेच आपण आजच्या शुभवर्तमानात तसेच इतर दोन्ही वाचनात ऐकले. तो आपला फक्त निर्माणकर्ताच नव्हे तर तो आपला संरक्षणकर्ता देखील  आहे. कधी-कधी आपल्याला वाटते जेव्हा आपण आज्ञाभंग करतो तेव्हा आपल्या जीवनात संकटे येतात, परंतु हे नेहमीच खरे असते असे नाही. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्या समुद्रातून प्रवास करावा लागतो. संकटे बऱ्याचदा माणसाला देवाच्या जवळ आणतात. उदा. जसे शिष्य येशूच्या जवळ आले. पहिल्या प्रथम ते घाबरले नंतर त्यांनी येशूला उठवले, कारण त्यांना ठाऊक होते, येशूच त्यांना ह्या संकटातून बाहेर काढील. चमत्कार हा महत्वाचा नव्हता तर त्याहून महत्वाचे होते शिष्य व येशू ह्याचा संपर्क, कारण येशू त्यांना घडवत होता. जीवनात त्यांना धाडसी बनवत होता.
  जशी इयोब व पेत्र ह्यांच्या जीवनात किती तरी वादळे व संकटे आली परंतु त्यांनी त्यांचा देवावरील विश्वास डळमळीत होऊ दिला नाही तर तो कायम ठेवला. ते देवाच्या आज्ञेत राहिले. तसेच आपणसुद्धा आपल्या जीवनात न डगमगता देवावर विश्वास ठेवावा म्हणून आजची उपासना आपणा सर्वांस पाचारण करीत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
1. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ बंधूभगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात, त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपणा प्रार्थना करूया. 
2. यंदाच्या वर्षी चांगले हवामान मिळावे, चांगला पाऊस लाभावा व सर्व शेती-बागा पिकांनी व फळाफुलांनी बहरून याव्यात म्हणून आपणा प्रार्थना करूया. 
3. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आपणा प्रार्थना करूया.
4. जे लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना देवाचा स्पर्श होऊन त्यांनी येशूला आपला तारणारा आहे असा विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
5. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.



Friday, 12 June 2015

 Reflections for Homily By: Manuel Fernandes


सामान्य काळातील अकरावा रविवार


दिनांक: १४/०६/२०१५
पहिले वाचन: यहेज्केल. १७:२२-२४
दुसरे वाचन: २ करिंथ  ५: ६-१०
शुभवर्तमान: मार्क ४: २६-३४

प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देव म्हणतो की, ‘मी निचास उंच व जे स्वत:ला उंच असे मानतात त्यांना नमविल’. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथिकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये, ‘श्रद्धेच्या मार्गदर्शनाने आम्ही धैर्याने वागतो आणि प्रभूला संतोषविणे हेच आमचे ध्येय होय’ असे म्हणतो. तर संत मार्कलिखित शुभवर्तमानात येशू देवराज्याची तुलना ‘मोहरीच्या बी’ बरोबर करतो. मोहरीचे बी दिसण्यात जरी लहान असले तरी रुजल्यानंतर ते सर्व झाड्पाल्यांमध्ये मोठे होते आणि त्याच्या सावलीत पक्षांना बसण्यास आसरा मिळतो.
 मोहरीचा दाणा खूपच लहान असतो परंतु तो रुजला, वाढला आणि त्याचे वृक्षात रुपांतर झाले तर अनेकांच्या आश्रयाचे ते आशास्थान बनते. आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर जर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते. म्हणून त्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या मिस्साबलीत मागुया व प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल: १७:२२-२४
     यहेज्केल संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आलेला देवाचा संदेश समजण्यासाठी या मागची पार्श्वभूमी जाणून घेणे योग्य ठरेल. शलमोन राजा कालवश झाल्यानंतर दोन राज्यांची स्थापना करण्यात आली. त्यापैकी एक म्हणजे इस्रायल होय; परंतु त्याची यहेज्केल असतांना धूळधाण करण्यात आली होती.
     येशू येण्याच्या ६०० वर्षापूर्वी, बाबीलोन शहराचा राजा नेबुकदनेझर ह्याने येरुशलेम शहर धुळीस मिळविले आणि त्या शहराचा राजा जेहोयाकिम ह्याला त्याच्या प्रजेसह बंदिस्त केले. नंतर नेबुकदनेझर ह्याने स्वत:चा गौरव करवून घेण्यासाठी झेदेकीया याची राजा म्हणून तेथे नियुक्ती केली. यिर्मया संदेष्टा त्याकाळात जिवंत होता, त्याला त्या शहरात राहण्यासाठी राजाकडून काहीही हरकत नव्हती. देवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे येरुशलेम शहर वाचविण्यासाठी नेबुकदनेझर व झेदेकीयाने स्वत:ला बाबीलोनच्या राज्याला शरण यावे असे संदेश पाठविले.
     झेदेकीया राजाने हे सर्व संदेश धुडकावून लावले. तसेच त्याने इजिप्तच्या राज्याच्या बळावर नेबुकदनेझर राजाविरुद्ध बंद पुकारला. काही काळानंतर बाबिलोनवासियांनी जेरुसलेम शहरावर हल्ला चढवून त्यात असलेली देऊळे ह्यावर कब्जा मिळविला आणि राजाला कारावासात ठेविले. नेबुकदनेझरने झेदेकीया राजाच्या मुलांची कत्तल केली व राजाचे डोळे काढून त्याला आंधळे केले.
     साधारणत: हा इस्रायलचा अंत असायला हवा होता, कारण बाबीलोनचा राजा अतिशय बलशाली होता व त्याच्याकडून त्यांची सुटका होणे अशक्यच होते. ह्याच काळात परमेश्वराने यहेज्केल संदेष्ट्याद्वारे संदेश पाठविला. ह्या संदेशामध्ये झाडे व पक्षी म्हणजेच राज्य आणि त्यात वसणारी जनता.
            पॅलेस्टीन शहराच्या उत्तरेला असलेल्या पर्वतरांगांना ‘लेबनॉन’ असे म्हणतात. त्यावर उंच आणि सुंदर अश्या प्रतीचे झाड उगवते. त्या झाडापासून उत्कृष्ट लाकूड मिळते, त्यास ‘लेबनॉनचे गंधसरू’ म्हणून ओळखले जात. शलमोन राजाने हेच गंधसरू येरुशलेमचे मंदिर बांधण्यासाठी वापरले. यहोवाने संदेष्ट्याद्वारे सांगितले की, तो स्वत: गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी घेऊन ती लावील आणि त्याचे रुपांतर तो सुंदर व बलाढ्य अश्या झाडामध्ये होईल. ह्या झाडाच्या छायेखाली सर्व पशु पक्षी निवास करतील. हे झाड परमेश्वराच्या राज्याचे प्रतिक होय. सर्व राष्ट्रे ह्यात सहभागी होण्यासाठी तो आमंत्रण करतो.
     त्याचबरोबर कालांतराने ही सर्व राष्ट्रे एका मागोमाग नाश पावतील असे यहोवा म्हणतो; परंतु आपणास इतिहासातून कळते की, देवाचे राज्य सदा सर्वदा टिकेल, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही.

दुसरे वाचन: २ करिंथ  ५: ६-१०
देवाकडे आपल्याला केवळ विश्वासाने जाता येते. पौल पुढे म्हणतो, शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृह्वास करणे हे आम्हांस अधिक बरे वाटते कारण या स्थितीत प्रभूला नेत्रांनी पाहता येते, आता विश्वासाने त्याला पाहण्याची गरज नाही. ख्रिस्ताचे दुसरे येणे होण्यापूर्वीच पौल मरण पावला तर त्याला देहरहित अस्तित्वाचा अनुभव घ्यावा लागेल याची त्याला जाणीव असल्याचे येथे दिसते. पण ही देहरहीत अवस्था कशी असेल ह्याविषयी त्याने काहीच सूचित केलेले नाही.
अखेरीस आपल्या भावी अवस्थेविषयी अंदाज बांधणे महत्वाचे नाही, आपण कोणत्याही स्थितीत असले तरी तेथूनही देवाला निश्चयपूर्वक संतोष देत राहणे हेच महत्त्वाचे आहे. आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. त्यावेळी आपण प्रत्येकाला देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळेल, मग ते बरे असो वा वाईट असो. देहाने केलेल्या गोष्टी म्हणजे या जीवनात कोणाही व्यक्तीने केलेले कृत्य असाच या संदर्भाचा अर्थ आहे. आमच्या सर्व कृत्याबद्दल आपण देवाला जबाबदार आहोत आणि योग्य असेल त्याप्रमाणे आम्हाला लाभ होईल किंवा हानी सोसावी लागेल.

शुभवर्तमान: मार्क ४: २६-३४
आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या राज्याची सतत शांतपणे वाढ होत असते हे आम्हाला पहिल्या दाखल्यातून सांगण्यात आले आहे. आपण चिंतातूर होऊन धडपड करण्याची काहीच गरज नाही. पेरलेले बी वाढून आपोआप फळ देईल. नैसर्गिक वाढीची प्रतिक्रिया आम्हाला समजत नाही. पण त्या वाढीत सहभागी होण्यासाठी ती समजून घेण्याची आम्हाला गरज नाहीच फक्त बीज अंकुरून वाढीस लागण्याच्या स्थितीत असणं मात्र गरजेचे आहे. पीक मिळण्याचे अभिवचन तर आहेच पण त्याबरोबर पवित्र शास्रात अनेकदा देवाच्या न्यायाची सूचनाही आहे.
दुसऱ्या दाखल्यामध्ये पुन्हा जवळजवळ लक्षात न येणारी वाढ आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम याचे वर्णन केले आहे. ‘मोहरीचे बी’ अगदी छोटे असते पण त्याची वाढ झाली की कालांतराने मध्यपूर्वेतील एक मोठ्यात-मोठया रोपात त्याची गणना केली जाते. देव-राज्याची वाढही अशीच असते. प्रारंभी ते अगदी अल्प वाटते पण अखेरीच त्याचाच जय होतो.

मनन चिंतन:
“स्वर्गराज्य मोहरीच्या दाणासारखे आहे.”
प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वसामान्य लोकांना देवाची योजना आणि स्वर्गराज्याची शिकवणूक देताना साध्या व व्यवहारातील अनेक गोष्टीचे दाखले दिले. आजच्या शुभवर्तमानातील मोहरीच्या दाण्याचा दाखला खूपच प्रेरणादायी आहे. मोहरीचा दाणा खूपच लहान असतो परंतु तो रुजला, वाढला आणि त्याचे वृक्षात रुपांतर झाले तर अनेकांच्या आश्रयाचे ते आशास्थान बनते. आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर जर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते.
आज आपण आपल्या जीवनावर मनन चिंतन करू या. आपल्या जीवनाला पोषक आणि प्रेरणादायी शब्द आपण लक्षपूर्वक ऐकतो का? आपल्या दररोजच्या आचरणाशी त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो का? आपले जीवन खरोखरच परमेश्वराच्या आध्यात्मिक कृपादानांनी बहरत आहे का?
आपल्या जीवनात परमेश्वराला प्राधान्य दिलेले असेल तरच आपण त्याच्या कृपेचा अनुभव प्राप्त करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे सर्वस्व अर्पण करून आपणा सर्वांचे तारण केले. प्रभू येशू ख्रिस्ताठायी आपण सर्वजण मोहरीच्या दाण्यासारखे आहोत. आपण जरी स्वतःला अपात्र समजत असलो; अनेक प्रकारच्या वाईट वर्तणुकीमुळे देवापासून दूर गेलेलो असलो तरीसुद्धा परमेश्वर आपल्यावर करुणामय दृष्टीने पाहतो. आपण देखील देवाचा म्हणजेच स्वर्गराज्याचा शोध घेतला पाहिजे.
देवाचे राज्य:
देवराज्यासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानात दोन दाखले सांगितले आहेत. जमिनीत बी टाकल्यावर शेतकरी त्याची मशागत करून निश्चींतपणे झोपतो. त्या बीजाला अंकुर कसा फुटतो व त्याचे रोपटे तयार होऊन त्याला कणीस कसे लागते हे शेतकऱ्याला कधीच कळत नाही. देवाने घातलेल्या निसर्गाच्या नियमानुसार सर्व काही घडत असते. आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. देवाचे राज्य तसेच आहे. देवाच्या वचनाचा अंकुर माणसाच्या जीवनात वाढत जातो आणि माणूस देवाच्या आधीन असल्यामुळे देवराज्याच्या दिशेने आपोआप वाटचाल सुरु करतो.
प्रभू येशूने सांगितलेला दुसरा दाखला मोहरीच्या दाण्याचा आहे. अगदी लहान असलेला मोहरीचा दाणा हळूहळू वाढत जातो व त्याचे रुपांतर मोठया वृक्षात होते. आज आपण पाहत आहोत की देवाच्या वचनावर श्रद्धा ठेऊन ख्रिस्तसभेचा पाया अशाच बारा प्रेषिताच्या सहाय्याने उभा राहिला. आज त्याचे महावृक्षात रुपांतर झाले. देवाचे राज्य छोटयाशा कृतीद्वारे सुरु होते व देवाच्या योजनेप्रमाणे ते बहरते व फलद्रूप बनते.
आपल्या जीवनात देवराज्याचा अंकुर वाढवा म्हणून विश्वासाने आपण आपले सर्वस्व देवाच्या हातात सोपवू या. श्रद्धेने त्याच्या कृपेवर अवलंबून राहू या. आपली छोटीशी कृती मग ती प्रार्थना, उपासना, भक्ती व सेवा अशा माध्यमातून जर सुरु झाली तर देवाच्या योजनेप्रमाणे विशाल स्वरूप धारण करू शकते. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
  1. आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. जे आजारी आहेत त्यांना चांगले आरोग्य, जे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे व जे एकटे आहेत अशांना प्रभूप्रेमाचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहेत, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे लोक दुःखी-कष्टी व बेरोजगार आहेत अशांना देवाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे चांगले काम दयावे व त्यांच्यावर असलेली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करूया.

Thursday, 4 June 2015


Reflection for the Feast of Body and Blood of Christ  by Glen Fernandes. 







येशूच्या अतिपवित्र शरीराचा आणि रक्ताचा सण

दिनांक: ०७/०६/२०१५
पहिले वाचन: निर्गम २६:३ .
दुसरे वाचन: इब्री ९:११-१५
शुभवर्तमान: मार्क १४: १२-१६, २२-२६




प्रस्तावना:

     आज आपण प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करत आहोत. भाकररूप ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती धर्मातील एक महान रहस्य आहे. ख्रिस्ताचे आम्हाला दिव्य दर्शन घडावे, आमचे आत्मिक पोषण व्हावे त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा, त्याची सोबत आम्हांला नित्य लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला.
     निर्गम या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, ईस्त्रायल लोकांनी देवाचे वचन ऐकावे व त्याच्या आज्ञा पाळाव्यात म्हणून मोशे रक्त शिंपडून करार करतो. इब्री लोकांस लिहिलेल्या दुस-या पत्रातून घेतलेल्या वाचनात, ‘ख्रिस्ताने स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानांत गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली’ असे ऐकतो. तर शुभवर्तमानात ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना भाकर व द्राक्षारस देऊन स्वतःला प्रकट केले, याचा बोध करण्यात येतो.
प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करत असताना आपणा सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा एक घटक होता यावे म्हणून ह्या मिस्साबलीदानामध्ये भक्तिपूर्वक सहभागी होऊया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: निर्गम: २६: ३-८

     इस्त्रायली लोकांनी मिसर देश सोडल्यापासून बराच काळ लोटला होता. या काळात देवाने त्यांचा सांभाळ करून त्यांना नियमशास्त्र दिले. देवाने मोशेकरवी अभिवचन देऊन लोकांनी पवित्र्यात राहावे म्हणून मार्गदर्शन केले व मोशेने रक्त शिंपडून देव व त्याची जनता ह्यामध्ये करार केला. देवाचे आज्ञापालन अंतकरणपूर्वक केले पाहिजे. इस्त्रायली लोकांना लीन व नम्र करण्यासाठी रानातला अनुभव त्यांना दिला होता आणि हा अनुभव खडतर असला तरी तोही एक देणगीदायकच होता व लोकांनी या अनुभवाचे स्मरण करावे अशी योजना केली होती. मोशेने यज्ञ व अन्नार्पण करण्यासाठी युवकांना पाचारण केले. मांस व रक्त अर्पण करून देवाला प्रसन्न करण्यासाठी मोशेने नियम तयार केले.

दुसरे वाचन: इब्री ९:११-१५

     ख्रिस्त हा पुढे होणा-या चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुच याजक होऊन आला. ख्रिस्ताने स्वतःचे समर्पण केले. त्याने आपला आत्मयज्ञ करून व आपले शरीर व रक्त बलीदान करून मोशेने दिलेले यज्ञमार्ग रद्द केले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा होत नाही. बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच ख्रिस्त परमपवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली.
ख्रिस्त हा एकदाच युगांच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला. ज्या अर्थी माणसांना, एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेविले आहे, त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुस-यांदा दिसेल.

शुभवर्तमान: मार्क १४: १२-१६, २२-२६

     आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करण्याची येशूची उत्कट इच्छा होती. भोजन कोठे करायचे ते त्याने सांगितले व आज्ञा दिल्या. तो आपला जीव खंडणी म्हणून अर्पिण्यास सिद्ध झाला होता. तो काय करणार होता त्याचे स्मरण त्याच्या शिष्यांनी सदोदित ठेवावे म्हणून त्याने हे भोजन स्थापले (१ करिंथ ११:२३-२६). त्याचे शरीर त्याने अर्पिले. त्याच्या रक्ताच्याद्वारे नवा करार केला गेला. त्याच्या कृतज्ञतेचे स्मरण आपण करावे व त्याची प्रीती आपणास मिळावी म्हणून तो म्हणतो, ‘हे माझ्या आठवणीसाठी करा’ म्हणून लोकांच्या पापासाठी प्रतिदिनी यज्ञ करणे योग्य नाही कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच अनंतकालीन परिपूर्ण असे बनले आहे.

बोधकथा:

१. संत अंतोनी (११९५-१२३१) ह्यांची साक्रामेंतावर अढळ अशी श्रद्धा होती व त्यामुळे त्याच्या श्रद्धेमुळे अनेक चमत्कार घडत असत.
बोनोनीला नावाच्या एका व्यक्तीने संत अंतोनीस त्याच्या श्रद्धेमुळे डिवचले व जे लोक विश्वास ठेवत असत त्यांचीही निंदानालस्ती केली. संत अंतोनी बोनोनिलो म्हणाले, ‘तू जरी विश्वास ठेवत नसलास तरी तुझे गाढव ठेवते व ते सिद्ध करण्यासाठी बोनोनिलोने अंतोनीस पाचारण केले.
     ठरल्याप्रमाणे बोनोनिलोने आपले गाढव आणले. त्याने ते दोन दिवस उपाशी ठेवले होते. तसेच भरपूर चारा ठेविला होता जेणेकरून गाढव साक्रामेंताकडे पाहणारही नाही. परंतु जेव्हा त्या मुक्या प्राण्याने साक्रामेंत पाहिले तेव्हा त्याने जवळ जाऊन वाकून बसले व वंदन केले. तसेच बोनोनिलोलाही त्या साक्रामेंतात प्रभू येशूचे दर्शन घडले.
     संत अंतोनी ह्यांनी मिस्साबालीदानामध्ये हजर असलेल्या प्रभू येशूवर अपार प्रीती केली व त्यानी प्रभूविषयी सर्वांना सांगण्यासाठी आपल्या आयुष्यात प्रयत्न केला.
२. आब्राहाम लिंकन ह्याची निघृण आणि भ्याड हत्येनंतर त्याच्या अंतयात्रेला जनसागर उसळला होता. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दूरदूरवरून आलेल्या अनेक लोकांत एक आई व मुल होते. गर्दीमध्ये आपल्या बाळाने आब्राहाम लिंकन ह्यांना पहावे म्हणून त्या आईने आपल्या छोट्या मुलाला खांद्यावर पकडले होते. आब्राहाम लिंकन ह्यांना पाहिल्यावर त्या बाळाने आईस विचारले, ‘आई कोण आहे ही व्यक्ती?’ त्याची आई उद्गारली, ‘बाळा, नीट बघून घे त्या व्यक्तीने आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःचे बलिदान दिले’.
     ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान केले. त्याचे स्मरण आपण करावे व देवपित्याची उत्तम लेकरे बनावी म्हणून ख्रिस्त ह्या जगात आला.

मनन चिंतन:


) पूर्वी लोकांची अशी श्रद्धा होती की, माणसाचे जीवन हे त्याच्या रक्तात असते. त्यामुळे ते कुठल्याही मांसाचे रक्त प्राशन करत असत. रक्त हे त्यांच्यासाठी पावन होते. त्यामुळे रक्ताचे अर्पण केल्यावर देव प्रसन्न होतो अशी त्याची श्रद्धा होती. त्यामुळे पशुबळी दिले जात असत आणि त्यासाठी अनेक कारणे असत.
१) देवाला प्रसन्न करून अनिष्टापासून टाळण्यासाठी.
२) देवाकडून काहीतरी मागण्याच्या हेतूने उदा. पाऊस
३) व तसेच दिलेल्या वरदानांमुळे देवाचे आभार मानण्यासाठी उदा. चांगलं पीक आल्यामुळे, ते विविध देवांना रक्त सांडून यज्ञ करीत असत. हे सर्व करण्यासाठी लोकांनी याजक नेमलेले असत.
) तसेच कुठलाही करार करण्यासाठी रक्त सांडले जात असे. दोन व्यक्ती कुठलाही करार करण्याअगोदर आपल्या बोटातून थोडं रक्त सांडून ते मिसळत व करार झाल्याचे साध्य होत असे.
     आजच्या वाचनात आपण ऐकतो की, मोशेने देवाबरोबर करार करून घेण्यासाठी प्राण्यांचा बळी देऊन त्यांचे रक्त शिंपडले ते प्राणी निरागस असे.
     तसेच शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभू स्वतःला समर्पण करतो. ख्रिस्त स्वतः सार्वकालिक जीवन देणारा होता. हे जीवन त्याच्यावर विश्वास ठेऊन प्राप्त होते. सार्वकालिक जीवन जगाला देता यावे यासाठी ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण पत्करावे लागले, त्याचा देह वधस्तंभावर खिळला गेला. त्याचे रक्त बहुतांच्या खंडणीसाठी त्या वधस्तंभावर वाहण्यात आले.
     अर्पणाच्या कोकराचा वध केल्यावर ते रक्त वेदीच्या सभोवती ओतीत व कोंकराचा देह सेवन करीत; ‘सेवन करणे’ आणि ‘पिणे’ हे उद्गार ख्रिस्ताच्या मरणाद्वारे तो जे सार्वकालिक जीवन देऊ शकणार होता याचे सूचक आहेत. या अर्थाने जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते.
     ख्रिस्ती धर्मात मिस्साबलीदानाला अतिशय महत्व आहे. ख्रिस्ती लोकांसाठी मिस्साबलीदानातून जीवनासाठी आवश्यक असलेले दान मिळते व श्रद्धा बळकट होऊन आध्यात्मिक जीवनात वाढ होते आणि त्यामुळेच ख्रिस्तसभेत ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण आपण साजरा करतो. ह्या सणाची सुरुवात सर्वप्रथम बेल्जियम ह्या देशात झाली. पोप उर्बन चौथे ह्यांनी संपूर्ण कॅथलिक देऊळमातेत हा सण साजरा करण्यास सातशे वर्षापूर्वी सुरुवात केली.
     भाकररूप ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती धर्मातील एक महान रहस्य आहे. रासायनिक प्रयोग शाळेत जे सिद्ध करता येत नाही ते आपल्याला आत्मिक प्रेरणेने त्याचे अस्तित्व मान्य करावे लागते ह्यालाच ख्रिस्ती श्रद्धा म्हणतात. ख्रिस्ताचे आपल्याला दिव्य दर्शन घडावे, आपले आत्मिक पोषण व्हावे, त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा, त्याची आम्हांला नित्य सोबत लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला. भाकररूपी ख्रिस्त आपल्या दृष्टीच्या पलिकडे आपल्या स्पर्शाच्या पलिकडे, आपल्या इंद्रियांच्या पलिकडे आहे तरी आपली श्रद्धा आहे की, भाकर ही ख्रिस्त-शरीर आहे. ‘ग्रहण इंद्रिया ही हो गुढ, गोचर केवळ श्रद्धेला’ इंद्रियाला गुढ आणि बुद्धीला अगम्य असलेल्या ख्रिस्ताचे हे शरीर आम्ही श्रद्धारुपी डोळ्यांनी पाहत आहोत. आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण साजरा करीत असताना आपण त्याचा स्वीकार करण्यास आणि त्याच्याशी एकजीव होण्यास पात्र ठरावे म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचे नितांत पोषण कर.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशिर्वाद यावा व त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून  त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज हा पवित्र सण साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया.