Thursday 28 January 2016

Reflection for the homily of 4th Sunday in Ordinary Times (31/01/2016) By: Nevil Govind.















सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: ३१/०१/२०१६
पहिले वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:३१-१३:१३
शुभवर्तमान: लूक ४:२१-३०

‘संदेष्टा स्वदेशांत मान्य होत नाही’



प्रस्तावना:
     आज आपण सामान्यकाळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणांस प्रीती ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास निमंत्रित करत आहे.
यिर्मया संदेष्टा आपल्याला परमेश्वराकडून झालेल्या पाचारणाविषयी आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल, आशा आणि विश्वास ह्यापेक्षा ‘प्रीती’ हे सर्वोत्कृष्ट दान आहे असे स्पष्टपणे मांडत आहे. तर लूक सुवार्तिक, जुन्या करारात यशया संदेष्ट्याने केलेली भविष्यवाणी आज येशूच्या येण्याने पूर्ण झाल्याचे स्पष्ट करतो. जगाच्या तारण कार्यासाठी परमेश्वराने ख्रिस्ताला, आपल्या आत्म्याने परिपूर्ण करून दीनांस सुवार्ता सांगण्यास तयार केले.
ख्रिस्त आज आपणा प्रत्येकाला त्याची प्रीती आत्मसात करून ती इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी निमंत्रण करत आहे. ख्रिस्ताची ही प्रीती आपणांत शेवटपर्यंत राहावी आणि आपल्या जीवनात आपण प्रीतीस प्राधान्य द्यावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
  
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
            यिर्मया तरुण होता तेव्हाच देवाने त्याला यहुदियांच्या पापांचा निषेध करून त्यांच्या राष्ट्राला पूर्वइशारा देण्यासाठी पाचारण केले होते. योशिया राजाच्या कारकिर्दीत २५ वर्षे त्याने देवाचा संदेश दिला होता. यिर्मया हा जुन्याकरारातील फार महत्त्वाचा संदेष्टा होता. तो यहुदीयांच्या बहिष्कारातील कालावधीत देवाचा संदेश इस्त्राएली लोकांस सांगत होता.
१) यिर्मया संदेष्टा हा याजक होता:
     सुमारे ४१ वर्षे देवाचा संदेश यिर्मयाने यहुद्यांना दिला होता. तो हळव्या मनाचा होता, तरी देवाने त्याचा उपयोग राजे, खोटे संदेष्टे व ढोंगी याजक यांना त्यांची पापे दाखवून देण्यास केला. तो मनुष्यासमोर विरोधाच्या वादळात धैर्याने उभा राही व देवासमोर लोकांसाठी मध्यस्थी करीत अश्रू ढाळीत असे. यिर्मया फार कठीण काळात जगला. तो कठीण समयी, आपल्या सेवेत शेवटपर्यंत परमेश्वराशी विश्वासू राहिला. तो आपल्या देवाशी एकनिष्ठ राहिला. तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागला. तो सुमारे ६० वर्षे जगला. तो अधिकाधिक बलवान होत गेला. तो खरी वस्तुस्थिती प्रगट करी. तो देवाच्या रणांगणावर नेहमी आघाडीवर दिसतो. त्याने खोटे, नकली व दुष्ट रूढी व वृत्तींना देवाच्या संदेशाने सतत विरोध केला.
ज्यांना देव सेवेसाठी पाचारण करतो:
१) त्यांनी देवाचे ऐकावे: देवाने यिर्मयाला आपल्या सेवेसाठी घडविले होते. त्याला आपल्या सेवेसाठी वेगळे केले होते व त्या सेवेसाठी नेमले होते (यिर्मया १:५). ही एखाद्या कार्यक्रमाला जाऊन मिळालेली स्फूर्ती नव्हती. यिर्मया तरुण होता. त्याला आपली दुर्बलता समजली म्हणून तो देवासमोर प्रामाणिकपणे ती कबूल करतो व म्हणतो, “मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे” (यिर्मया १:६). ही दुर्बलता त्याच्या सेवेत अडथळा ठरणार नव्हती. त्याला फक्त आज्ञा ऐकायच्या होत्या त्या पाळावयाच्या होत्या (यिर्मया १:७).
२) त्यांनी देवाची आज्ञा पाळावी: आपल्या प्रभूची सेवा करणे म्हणजे सतत त्याची आज्ञा पाळत राहणे (यिर्मया १:१७). यिर्मयाला हेच करायचे होते. देव त्याला बलवान करणार होता (यिर्मया १:१८). देव त्याचा बचाव करणार होता व त्याच्याबरोबर सदैव राहणार होता (यिर्मया १:१९).
स्फूर्ती आली म्हणून देवाची सेवा करण्यास तयार होणे व सुचेल ते करणे, ही प्रभूची सेवा नसते. प्रभू घडवून पाचारण करतो व आपली सेवा स्पष्ट करतो. मग त्या व्यक्तीला फक्त आज्ञापालन करीत राहायचे असते.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:३१-१३:१३
     संत पौलाने हे पत्र करिंथ शहरातील ख्रिस्ती मंडळीला इ.स. ५५ मध्ये लिहिले होते. तेव्हा संत पौल इफिस शहरात राहत होता. हे पत्र करिंथ मंडळींकडून आलेल्या एका पत्राला दिलेले उत्तर होते. करिंथ येथील मंडळीतील विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याने निरनिराळी कृपादाने दिली होती. ही कृपादाने ते इतरांच्या उन्नतीसाठी न वापरता, कित्येक स्वतःच्या स्वार्थासाठी व गटबाजीसाठी किंवा मनाला वाटेल त्याप्रमाणे त्यांचा वापर करत असत.
मंडळी जेव्हा जमत असे, तेव्हा नुसता गोंधळ माजे. एखाद्याला पवित्र आत्म्याने एखादे कृपादान दिले म्हणून तो अधिक आध्यात्मिक झालेला आहे असे नाही. कृपादानाने कोणी आध्यात्मिक ख्रिस्ती बनत नाही. आध्यात्मिक ख्रिस्ती म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा व ज्याच्यात पवित्र आत्म्याचे फळ आढळते तो. करिंथ येथील मंडळीत याच गोष्टींची उणीव होती व त्यामुळे त्यांची कृपादाने निरुपयोगी ठरत होती. यामुळे संत पौलाने करिंथकरांस यशस्वी सेवेचा मार्ग दाखविला.

शुभवर्तमान: लूक ४: २१-३०
     ही येशूच्या जीवनातील घटना ख्रिस्ताच्याच नाझरेथ गावी घडली होती हे संत लूक आपणास सांगतो. यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला (लूक ४:१४). ज्या नाझरेथ गावी तो लहानाचा मोठा झाला तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानांत जाऊन यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट वाचत होता (लूक ४:१६-१७).  
अ) हा शास्त्रलेख आज तुम्हीं ऐकत असताना पूर्ण झाला आहे.
‘प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी’ (लूक ४:१८-१९). ह्या ओवी संत लूकने जुन्याकरारातील यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या आहेत (यशया ६१:१-३). इथे संत लूक संदेष्टा यशयाने केलेली भविष्यवाणी येशूच्या येण्याने पूर्ण झाल्याचे दर्शवितो.
ब) हे वैदया, तू स्वतःलाच बरे कर.
     ख्रिस्ताने सांगितले हे सर्व त्याचाच गावातील लोकांना खरे वाटले नाही. ते उलट म्हणू लागले की, “हा योसेफाचा पुत्र ना? (लूक ४:२२ब). कारण ते येशू हा पाठविलेला ख्रिस्त- मसीहा आहे हे खरे मानायला तयार नव्हते. म्हणून येशू त्यांस ही म्हण लागू करतो. 
क) कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.
     वरील वाक्य येशूने नाझरेथ येथील लोकांस त्यांचा अविश्वास पाहून म्हटले होते. ते येशू हा मसीहा आहे हे मानायला तयार नव्हते. 
ड) एलीया आणि अलिशा संदेष्टा
     नाझरेथच्या लोकांचा अविश्वास येशूने त्यांना दाखवून दिला. ‘मी इतर गावांत जे केले ते तेथे का करीत नाही या तुमच्या प्रश्नाचे उत्तर ‘तुमचा अविश्वास’! मी ख्रिस्त आहे हे मान्य करून तुम्ही माझा स्वीकार करीत नाही’. असे सांगून येशूने त्यांस दोन उदाहरणे सांगितली. देवावर विश्वास ठेवण्यास तयार असलेली एक विधवा (लूक ४:२६) आणि अलिशाच्या शब्दावर विश्वास ठेवणारा नामान नावाचा कुष्ठरोगी (लूक ४:२७). त्यांच्या विश्वासामुळे देव कार्य करू शकला होता. हे सत्य ऐकून लोक इतके संतापले की, त्यांनी येशूला ठार मारण्याचा प्रयत्न केला (लूक ४:२८-२९).

बोधकथा:
           रामपूर गावामध्ये रमेश नावाचा एक मुलगा राहत होता. त्याची एकदा सरपंच पदासाठी निवडणूकीत नाव आलं पण कुणीही त्याला मान्यता देत नव्हते. उलट म्हणत होते की, ह्याचा बाप कोण आम्हांला माहित आहे, तो काय करतो हे आम्हांला ठाऊक आहे. त्याची आई कुठली, ती कुणाची मुलगी, ती काय करते, करत होती हे सर्व आम्हांस ठाऊक आहे. हा भिकारी आमच्या गावाची काय सुधारणा करणार!
हे सर्व ऐकता, त्या तरुणाने आस्था आणि जिद्द सोडली नाही. निवडणूक लढवण्याची वेळ येऊन ठेपली आणि त्याच्या आप्तेष्टांनी त्याच्यावर असलेल्या विश्वासाने त्याला निवडून दिले. त्यानंतर त्या जिद्दी व कर्तव्यप्रेमीने युवकाने गावाचा विकास केला. गावातील सगळे अधर्म कृत्यांची विल्हेवाट लावली, स्रियांना त्यांचा हक्क आणि सुरक्षा मिळवून दिली. अशा प्रकारे त्या गावाला नावारूपाला आणले. त्याची सर्वत्र वाहवा आणि प्रशंसा झाली. मग कुठे लोकांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली, की बाह्यरूपावरून किंवा त्याच्या पालकांच्या गरीबीवरून त्याचे भवितव्य ठरवणे चुकीचे होते.
  
मनन-चिंतन:
     पाचारण म्हणजे काय? पा+चारण म्हणजे ‘परमेश्वराच्या चरणी जाणे’. देवाचे पाचारण हे त्याच्या जवळपास जाण्यास, ‘परमेश्वराबरोबर राहण्यास आणि परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी’ असते. संपूर्ण बायबल आपणांस सांगते की, ‘देव पाचारण केलेल्यांना त्यांच्या आईच्या गर्भाशयांत असतानाच घडवितो. त्यांचा जन्म होण्याअगोदर पवित्र करतो आणि त्यांस राष्ट्रांचा संदेष्टे म्हणून नेमतो. तो त्यांस कधी अंतर देत नाही. तो त्यांचा बचाव करण्यासाठी सतत त्यांच्या बरोबर राहतो’. देव त्यांना विविध कार्ये करण्याची कृपादाने देतो. काहींना ज्ञानाचे वचन तर काहींना विद्देचे, विश्वासाचे, निरोगी करण्याचे, अदभूत कार्ये करण्याचे, संदेश देण्याचे, आत्मे ओळखण्याचे, विविध भाषा बोलण्याचे आणि त्यांचे अर्थ सांगण्याचे वरदान देत असतो.
     येशू ज्या नाझरेथ गावात लहानाचा मोठा झाला होता तेथेच तो जातो आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात, त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट दिला जातो. तो उलगडून येशू त्यात लिहिलेले त्यांच्यासमोर वाचतो: “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे” (यशया ६१:१-२, लूक ४:१८). तो ग्रंथपट वाचून झाल्यावर येशू त्यांस म्हणतो, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे” (लूक ४:२१). परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण त्याने मला दीनांस सुवार्ता सांगण्यास अभिषिक्त केले आहे; ज्याची तुम्ही वाट पाहता तो ख्रिस्त-मसीहा मीच आहे. पण गावाचे लोक हे खरे मानायला तयार नव्हते. उलट ते म्हणू लागले, ‘हा योसेफाचा पुत्र ना? थोडक्यात म्हणायचे म्हणजे येशू तू कोण आहेस, कुणाचा मुलगा, कोठे राहतोस हे सर्व आम्हांला ठाऊक आहे. इग्रंजी भाषेत एक म्हण म्हटली जाते, “familiarity breeds contempt” म्हणूनच येशू त्यांना म्हणतो की, तुम्ही मला ही म्हण लागू करणार, हे वैदया, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमांत ज्या गोष्टी केल्यास, त्या येथेही आपल्या गावी कर. जर का तू ह्या गोष्टी केल्यास तरच आम्हीं तुच तो मसीहा-ख्रिस्त आहेस असे मानू. म्हणूनच ख्रिस्त त्यांस म्हणतो, ‘कोणताही संदेष्टा स्वदेशांत मान्य होत नाही’. समाजात राहणाऱ्या आणि वावरणाऱ्या माणसाला त्याच्याच समाजातील लोक मान्य करत नाही.  
येशूने नासरेथवासियांचा अविश्वास त्यांना दाखवून दिला तो असा की, ‘मी इतर गावांत जे केले ते येथे मी का करीत नाही? या तुमच्या प्रश्नाचे उत्तर ‘तुमचा अविश्वास! मी ख्रिस्त आहे हे मान्य करून तुम्हीं माझा स्वीकार करीत नाही’. हिंदी भाषेत म्हटलेले आहे की, ‘मुजे तो अपनोने लुटा गैरोमें कहाँ दम था, मेरी कष्टीं वहाँ डुबी जहाँ पानी कम था’|
कठोर काळजाच्या व ताठ मानेच्या लोकांस येशू एलिया आणि अलिशा संदेष्ट्यांची उदाहरणे देत म्हणतो, ‘त्या काळी इस्त्राएलांत पुष्कळ विधवा होत्या; तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठविले नव्हते. तर ‘सीदोन परदेशांतील सारफथ येथील एका विधवेकडे’ मात्र त्याला पाठविले होते. तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्त्राएलांत पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही; तर सुरीयाचा नामान मात्र शुद्ध झाला. कारण ती एक विधवा देवावर विश्वास ठेवण्यास तयार होती आणि अलिशाच्या शब्दांवर विश्वास ठेवणारा नामान नावाचा कुष्ठरोगी, त्यांच्या विश्वासामुळे बरा झाला होता. येशूने सांगितेले हे सत्य त्यांना पचले नाही. कारण ‘Truth is always Bitter’ म्हणजे सत्य नेहमी कटू असते.  
अध्याय ४ मधील ओवी तिसावी सांगते की, ‘येशू त्यांच्यामधून निघून गेला’. येशू नाझरेथहून का निघून गेला? बायबल आपणांस सांगते की, येशू यानंतर पुन्हा कधीच नाझरेथ गावी आला नाही. येशू आपल्या स्वदेशांत आला परंतु त्याच्याच लोकांनी त्याचा ख्रिस्त म्हणून स्वीकार केला नाही.
एक १६ वर्षाचा मुलगा जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरला तेव्हा सर्व म्हणाले हा छोटासा मुलगा काय करणार! ह्या छोट्याशा मुलाने जेव्हा शतक पटकावले तेव्हा लोक म्हणू लागले की हा आमची शान आहे. आज तोच मुलगा सचिन रमेश तेंडुलकर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेला आहे. 
आपण देखील आपल्या जीवानांत कित्येकवेळेस इतरांना प्राधान्य देत नाही. जो आपल्या गावाचा विकास घडवू इच्छितो त्याला आपण पाठिंबा देत नाही. आपण आपल्या जीवनात तुलनात्मक दृष्टीकोन बाळगतो. आपल्या स्वतःच्या मुलांवर आपण दुर्लक्ष केले, तर त्यांच्या मनात मी माझ्या आई-वडिलांना नकोशी/नकोशा आहे असे वाटत असते. आज सुरीने/ चाकूने वा तलवारीने केलेल्या जखमा सहन होतील, पण ‘न केलेला स्वीकार’ मान्य होणार नाही. तो अधिक खोलवर घाव करू शकतो. प्रेमात न केलेला स्वीकार बळी घेतो, घरात न केलेला स्वीकार घर उध्वस्त करते आणि समाजाने न केलेला स्वीकार माणसाला मातीत मिळवितो. सर्वकाही माझ्याकडून, माझ्या द्वारे आणि माझ्याबरोबर चालू होते. मी जर स्वतःचा स्वीकार केला तर मी इतरांचा स्वीकार करेन आणि जर का मी इतरांचा स्वीकार केला तर मी माझ्या समाजाचा, गावाचा, राज्याचा, देशाचा आणि ह्या जगाचा स्वीकार करेन. जर खुद्द परमेश्वर कुणालाही आपल्यापासून वेगळे करीत नाही, त्यांचा धिक्कार करीत नाही व त्यांना कमी लेखत नाही तर आपण कोण त्यांस न स्वीकारणारे. म्हणूनच म्हणतो, ‘एक जुटीने कंबर बांधू, कर निर्धार मनाचा, देह जीझावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेसी!
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आम्हांला ख्रिस्ताच्या प्रीतीने भरून टाक.
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक ह्यांना प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यासाठी परमगुरुस्वामी ह्यांना मनोबल लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताची प्रीती आपण आपल्या जीवनात आत्मसात करावी आणि तीच प्रीती आपण आपल्या कृत्यातून इतरांपर्यंत पोहचविण्यास आपणांस परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. जगात शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी अनेक सेवाभावी संघटना कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद सदैव राहावा व त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत; विशेषकरून आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे सदस्य ह्यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे आणि त्यांनी देवाची प्रीती त्यांच्या देशभल्यासाठी आत्मसात करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया. 



No comments:

Post a Comment