Thursday 30 July 2020

Reflections for the 18th Sunday in Ordinary Time (02/08/2020) by Fr. Benher Patil







सामान्य काळातील अठरावा रविवार

 

दिनांक: ०२/०८/२०२०

पहिले वाचन: यशया ५५:१-३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५; ३७-३९

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१



 

अतुलनीय देवाची प्रीती

प्रस्तावना:

आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाच्या प्रीतीचे वर्णन करताना आढळतात. देव प्रीती आहे. आणि त्याची आपल्या लोकांवरील प्रीती ही मुक्त, अतुलनीय तसेच अपार आहे. त्याच प्रेम इतक अतूट आहे की, आपणास कोणीही  किंवा काहीही कधीच अलिप्त करू शकणार नाही. ह्या सुंदर प्रीतीचा अनुभव आपणा सर्वाना विपुल प्रमाणात मिळावा त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून ते इतरांना देण्याची सुबुद्धी आणि कृपा मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

 सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-३

            आजच्या पहिल्या वाचनात, बाबीलोनात हद्दपार झालेल्या निराशी आणि उदास यहुदी लोकांना, संदेष्टा यशया धीर देत आहे. परक्यांच्या गुलामगिरीत असताना इस्रायेली लोकंची अवस्था फार हलाखीची आणि केविलवाणी झाली होती. अश्या लोकांना संदेष्टा म्हणतो की, त्यांनी आपल्या सुटकेसाठी अथवा सांत्वनासाठी इतरत्र जायची काहीच गरज नाही. कारण, खुद्द परमेश्वर त्यांना शत्रूंच्या हातांतून सोडवून त्यांच्या सर्व गरजा पुरविण्यास समर्थ आहे. त्याचे वात्सल्य आणि औदार्य सर्व मानवी गरजांना पुरून उरणारे आहे असे सूचित तो करतो. मात्र त्यासाठी त्यांनी देवावर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळण्याची आणि त्याच्या शब्दानुसार वागण्याची आवश्यकता आहे असं आव्हान करतो.

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५; ३७-३९

रोमकरांस लिहिलेल्या पत्रात, संत पौल आठव्या अध्यायाच्या शेवटी देवाच्या सामर्थ्यशाली आणि अदभूत प्रेमाची प्रचीती दाखवतो. ख्रिस्तामुळे रोमी ख्रिस्ती लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आणि छळ सोसावे लागत असत. अशा विश्वासू लोकांची श्रद्धा डळमळू नये म्हणून तो लिहितो की देव जर आपणाबरोबर असेल, तर आपल्या विरुद्ध कोण असू शकतो? ख्रिस्ताच्या बलशाली प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकतो? या जगातील कोणीही किवा काहीही आपल्याला कधीच वेगळे करू शकणार नाही, असा दिलासा देत आहे. म्हणूनच प्रत्येक कठीण परिस्थितीत; आपल्या अडचणीत व संकटात आपण न घाबरता देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवला पाहिजे, असा बोध संत पौल आपल्याला करत आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१

            आजच्या शुभवर्तमानात, मत्तय आपणासमोर येशू ख्रिस्ताने केलेल्या आणखी एका चमत्काराविषयी सांगत आहे. योहान बाप्तीस्ताच्या मृत्युनंतर येशू अरण्यात जातो. तेव्हा लोकांचा समुदाय त्याला शोधून त्या एकांत स्थळाकडे गेला. येशुभोवती जमलेले लोक खरोखर गरजवंत होते. काहीना शारीरिक भूक लागली होती,

          येशूला तहानेने आणि भुकेने कासावीस झालेल्या तसेच थकलेल्या लोकांचा खूप कळवला आला. त्याने संपूर्ण समस्या स्वतःच्या हाती घेतली. त्याने पाच भाकरी आणि दोन मासे ह्यावर आशीर्वाद देऊन त्या लोकांना वाटायला दिल्या. अश्याप्रकारे निव्वळ पाच भाकरी आणि दोन मास्यांद्वारे, ख्रिस्ताने चक्क पाच हजार लोकांची शारीरिक भूक शमवली आणि त्यांना तृप्त केले. दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी शिष्यानी सर्वस्वी येशूवर अवलंबून राहावे आणि त्याच्यासारखे दयाळू असावे असा बोध संत मत्तय ह्या चामात्काराद्वारे कळवू इच्छितो.

 मनन चिंतन:

आजच्या वाचनांची सुरुवात यशया संदेष्ट्याच्या आमंत्रणाने होते: “तहानलेल्यानो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला, तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. जे खरोखर अन्न नाही, त्यासाठी पैसे वाया का घालविता?” आपली तहान-भूक तृप्त करणारे असे कोणते अन्न आहे की जे सेवन करण्यासाठी देव आपल्याला बोलावतो? ह्या प्रश्नाच उत्तर आपल्याला इतर वाचनात पाहायला मिळते.

पहिल्या प्रथम परमेश्वर आपणास सांगतो, की आपण नेहमी अश्या ऐहिक गोष्टीना महत्व देतो की ज्या खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान देत नाही. आम्ही आपले जीवन, संसाधने, वेळ इत्यादी आम्हाला पूर्ण करण्यात सक्षम नसलेल्या उद्दिष्टांचा शोध घेण्यासाठी घालवितो. ही ध्येये म्हणजे श्रीमंती, ऐहिक सुख, प्रसिद्धी होय. देव आपल्याला ह्यावून दुसरे काहीतरी शोधण्यासाठी सांगत आहे. काही प्रमाणात त्याच उत्तर आल्याला पहिल्या वाचनात सापडते: “मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल, तुम्ही माझ्याकडे या” ह्यातून आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात येते, की पहिल्याप्रथम आपण देवाचे वचन ऐकलं पाहिजे. देवाचे वाचन जे आपल्या मानवी जीवनाचा पाया आहे (अनुवाद ३२:४७), ज्याच्याद्वारे आपलं पोशन केलं जात (मत्तय ४), ते आपण कान देऊन ऐकण्याची आवश्यकता आहे.

         आजच्या शुभवर्तमानाचा हाच मुख्य विषय संत मत्तय आपणापुढे मांडत आहे. येशू अरण्यात गेल्यावर मोठा लोकसमुदाय त्याचामागे गेला. त्याच्या मुखातून निघणाऱ्या वाणीने तृप्त होण्यासाठी म्हणजेच मनाचं आणि आत्म्याचं समाधान प्राप्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे देवाचे राज्य शोधण्यासाठी ते त्याच्यामागे गेले होते. पण येथे आपल्याला कदाचित प्रश्न पडत असेल की, जेव्हा माणसाचं पोट रिकामे असते, म्हणजेच त्याच्या मुलभूत गरजाच जर भागवल्या गेल्या नाहीत, तर प्रभूच् वचन ते कस ऐकतील? जगामध्ये कोरोना विषाणूमुळे उपासमारी होत असताना, लाखो, करोडो लोकांना जेव्हा अन्नाविना आपले प्राण द्यावे लागत असतील, त्यांना दारिद्र्यामुळे हलाखीचे दिवस काढावे लागत असतील, तर अश्या प्रसंगी देवाच्या राज्याची घोषणा देण्यात, त्याची सुवार्ता सांगण्यात काय अर्थ आहे? अस करून जणू आपण एकप्रकारे त्यांचा अपमान तर करत नाही ना? 

अशाप्रसंगी जर आपण ख्रिस्तासारखे वागलो नाही, तर नक्कीच तो त्यांचा घोर अपमान मानावा लागेल. जेव्हा येशूने लोकांचे तहानेने आणि भुकेने कासावीस झालेले चेहेरे पाहिले, तेव्हा त्यांना घालवून दिले नाही, त्यांना दूर केले नाही, किवां त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, तर त्याने आपल्या शिष्यांना बजावले: त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला दया.” येथेच अदभूत चमत्काराची सुरुवात होते. शिष्यांना आव्हान करून येशूने त्यांना सहेतूक कृतीत प्रत्यक्ष सहभागी केले आणि त्यांनी आणलेल्या वस्तूंच त्याने उपयोगात आणल्या. आपणाकडे जे असेल-नसेल त्याचा जेव्हा त्याग करायला आणि इतरांना वाटायला आपण तयार असतो, तेव्हा खरा चमत्कार घडवून आणतो.

ख्रिस्ताने फक्त पांच भाकरी व दोन मासे आपल्या करुणेने आणि अदभूत सामर्थ्याने रुपांतरीत केल्या व त्या आपल्या शिष्यांना चक्क पाच हजार लोकांची भूक भागविण्यासाठी वाटायला सांगितलं. ह्या घटनेवरून आपल्याला हाच संदेश मिळतो, की आपला देव हा उदार आहे. तो आपल्या लोकांना मोफातपणे आणि उदारतेने त्याच्या गरजा पुरवितो. दुसरा संदेश म्हणजे त्याची आपल्यावरील करूणा आणि प्रेम हे अतूट आणि अमर्यादित आहे. त्याच्या प्रेमापासून काहीही संकटे, भूक, मोह इत्यादी आपल्याला विभक्त करू शकणार नाही.

ज्या परमेश्वराने आपल्यावर मुक्तहस्ते त्याच्या अगणित कृपा व आशीर्वादाचा वर्षाव केला आहे, ज्याने आपल्या सर्व भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक गरजा भागविल्या आहेत आणि भागवत आहे, आज तो आपल्याला त्याच्या औदार्याचे, प्रेमाचे आणि करुणेचे साधन बनून, आपल्या समाज्यात असलेल्या रंजल्या-गांजल्याची सेवा करण्यासाठी आमंत्रण देत आहे. ते स्वीकारून त्याला साजेसं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आजच्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुझ्या करुणामयी प्रेमाचे साधन बनव.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मागुरु तसेच धर्म-भगीनिनी, आपल्या सुवार्तिक आणि सामाजिक कार्याद्वारे देवाच्या लोकांची शारीरिक, तसेच आध्यात्मिक भूक शमविण्यासाठी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 २. समाज्यात असलेल्या मोठ मोठ्या व्यावास्यीकांनी आणि उद्योगपतींनी त्यांना देवाने दिलेल्या विपुल संपतीचा सदुपयोग समाज्यातील गरजवंतासाठी करण्याची सुबुद्धी त्यांना मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ३. सर्व जगातील राष्ट्रांनी एकत्र येऊन ह्या जगातील गरिबी, उपासमारी आणि नैराश्य हटवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

 ४. सर्व ख्रिस्ती लोकांनी येशूचा कित्ता आपणासमोर ठेऊन, त्याच्याप्रमाणे इतरांसाठी उदार, करुणामयी व प्रेमळ जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ५. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर सेवक सेविका आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची विशेषतः कोरोना पिडीत रुग्णांची सेवा करत आहेत. परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा यावा, तसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment