Wednesday 9 February 2022

                                                   

           Reflection for 6th Sunday in Ordinary Time (13/02/2022)  By Bro. Pravin Bandya
सामान्य काळातील सहावा रविवार 

 

पहिले वाचन - यिर्मया १७: ५ - ८

दूसरे वाचन - १ करिथ १५: १२, १६ - २०

शुभवर्तमान - लूक ६: १७, २० – २६

 

“कारण मेलेले उठविले जात नसतील तर ख्रिस्तहि उठविला गेला नाहीं”.



प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्यास पाचारण करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये  यिर्मया संदेष्टा आपल्याला म्हणतो की, ज्या व्यक्तीचे अंतःकरण परमेश्वरापासून दूर आहे तो व्यक्ती शापित आहे. तो वैराणातल्या जूडपा सारखा आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की, आता ख्रिस्त मेलेल्यांतून ऊठविला गेला आहे, तर मेलेल्यांचे पूनरूत्थान नाही असे तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणतात हे कसे? जर ख्रिस्त उठविला गेला आहे, तर आपले देखील पूनरूत्थान आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य कारण स्वर्गाचे राज्य तुमचे आहे. तुम्ही आता भुकेले आहात ते धन्य कारण तुम्ही तृप्त व्हाल; तुम्ही आता रडता ते धन्य कारण तूम्ही हसाल. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या आज्ञेप्रमाणे पवित्र जीवन जगणे. संत पौलने करिंथकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूनरूत्थानावर पूर्ण विश्वास ठेवण्यास परमेश्वरानं आपल्याला कृपेने भरावं, म्हणून प्रार्थना करूया. 

मनन चिंतन

आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत असताना, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहिलं की संत पौल म्हणतो, “आता ख्रिस्त मेलेल्यांतुन उठविला गेला आहे, अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पूनरूत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? जर मेलेल्यांचे पूनरूत्थान नाही तर ख्रिस्त ही उठविला गेला नाही. संत पौलला सांगायचं आहे की, आपणा प्रत्येकाच मेल्यानंतर पूनरूत्थान आहे. पण ते पूनरूत्थान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला पवित्र व त्यागमय जीवन जगणं गरजेच आहे. कारण प्रभू येशू मत्तय २२: १४ मध्ये म्हणतो, “बोलावलेले भरपूर आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत”आज आपल्याला त्यागमय जीवन जगण्यासाठी देऊळमाता पाचारण करीत आहे.

तुमच्या पैकी कित्येक जणांनी ‘चीछोरे’ हा चित्रपट पाहिला आहे? त्या चित्रपटामध्ये  सुशांत सिंघ हा अभिनेता म्हणजे हिरोचा किरदार निभावत आहे. जे आपल्यामध्ये आता नाहीत; परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो.

ह्या चित्रपटामध्ये सुशांत सिंघ  हा विध्यार्थी म्हणून महाविध्यालयामध्ये शिकत होता. ह्या चित्रपटात आपण दोन वर्ग पाहतो. पहिल्या वर्गामध्ये सर्व श्रीमंत घराण्यातील मुलं आहेत; तर दुसऱ्या वर्गामध्ये गरीब घराण्यातील मुलं आहेत. ह्या महाविध्यालयात आपण पाहतो कि,  अभ्यासेतर उपक्रम म्हणजे extracurricular activities होत असत. त्या खेळांमध्ये दुसऱ्या वर्गातील म्हणजे गरीब घराण्यातील मुलं कधीच जिंकत नव्हती कारण त्यांना योग्य ते प्रशिक्षण नव्हते, तसेच ते वाईट जीवनाला बळी पडले होते, आणि म्हणून त्या गरीब  मुलांना अजून कमी लेखलं जात असे. सुशांत हा देखील दुसऱ्या वर्गातील मुलगा होता. ते कधीच पहिल्या वर्गाबरोबर जिंकले नव्हते आणि ह्याचं कारण म्हणजे, ह्या वर्गातील सर्व मुलांना काही न काही प्रकारच्या वाईट सवयी लागल्या होत्या. एक दिवस सुशांतने सर्वांची बैठक घेऊन त्यांना त्या सर्व गोष्टीचा त्याग करायला सांगितले. सुशांत हा दररोज त्याच्या प्रेयसीला भेटत असे, व प्रेमाच्या गोष्टी करीत असे त्याचा त्याने त्याग केला. दुसऱ्या मित्राला नशेचे वाईट व्यसन लागले होते, त्याचा त्याने त्याग केला. तिसरा मित्र जो शिव्या- गाळ व भानगडी करणारा होता, त्याने ती सोडून दिली. अशाप्रकारे दुसऱ्या गटांमध्ये असलेल्या प्रत्येकांनी वाईट जीवन सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्वांनी त्याग केला आणि आपलं लक्ष एकच गोष्टीकडे लावलं की आम्हाला जिंकायच आहे. त्यांनी घेतलेला निर्णय काटोकार पणे पाळला; त्या सर्वांनी प्रयत्न केला आणि शेवटी खरोखरच ९९% त्यांच्या वर्गाचा विजय झाला.  

माझ्या प्रिय जनांनो, ते सर्व विध्यार्थी पूर्वी जगत असलेल्या वाईट जीवनामध्ये अडखळले होते त्यामुळे आपल्या धेय्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं म्हणून ते नेहमी हरत होते. परंतु जेव्हा त्यांनी वाईट गोष्टी सोडण्याचा निर्णय घेतला, वाईट जीवनामधून बाहेर आले व आपले लक्ष  ध्येयाकडे लावलं तेव्हा ते ९९% आपल्या गटाला विजयाकडे नेऊ शकले. आपल्याला देखील ख्रिस्ताच्या पूनरूत्थानामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तेच करायचं आहे. प्रत्येक वाईट गोष्टीचा त्याग करून आपलं लक्ष पूनरूत्थीत ख्रिस्ताकडे लावायला पाहिजे.

संत पौल कलस्सैकरास पत्र ३:१ आणि २ मध्ये म्हणतो, “तुम्ही ख्रिस्ता बरोबर उठविले गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका”. कारण पृथ्वीवरील काही गोष्टी मानवजातीला नाशाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत, ख्रिस्ताच्या पुनरूत्थाना पासून दूर घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्या सोडण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये सहभागी होण्यासाठी आपण त्यागमय जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि वाईट जिवण सोडून त्यागमय जीवन जगण्यासाठी पूनरूत्थीत प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला कृपा, शक्ती व सामर्थ्य द्यावं, म्हणून प्रार्थना करूया

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यास व प्रापंचिकांना मार्गदर्शन करण्यास परमेश्वराने विवेकबुध्दी द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात शांती नांदावी, घरातील वातावरण खेळीमेळीचे राहून, प्रार्थनेला अधिक महत्त्व द्यावे, जेणेकरून ख्रिस्त हाच आपल्या कुटुंबाचा केंद्रबिंदू होईल, ह्यासाठी आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

३) मादक पेये व मद्य यांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीने व कुटुंबाच्या प्रमुखाने केवळ क्षणिक सुखाचा विचार करू नये, तर आपल्या जीवनाला नवे वळण लावण्याचा विचार करावा, म्हणून आपण प्रार्थना  करूया.

४) सुखी जीवनाचा महामंत्र परमेश्वराने आपणा सर्वांना आज दिला आहे. त्याने दिलेल्या वचनांवर आपले जीवन विसंबून ठेवावे आणि जीवनांत आनंद उपभोगावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपल्या धर्मग्रामातील जे कोणी शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त झाले आहेत, त्यांनी प्रार्थनेबरोबर औषधोपचार व मानसोपचारही करावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६) आता आपल्या वैयक्तिक व सामुहिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


2 comments:

  1. Thank you so much for this wonderful ministry. It is a great help for me as I have learned Marathi and doing my ministry among people of Maharashtra. God bless your efforts.
    Fr. Johny Thekkemaly csc

    ReplyDelete