Thursday 9 November 2023

 




Reflection for the 32nd Sunday in Ordinary Time (12/11/2023) by Br. Trimbak Pardhi




सामान्य काळातील बत्तीसावा रविवार

दिनांक: १२/११/२०२३

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६         

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८

शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३



प्रस्तावना:-

आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास जागृत राहण्यास अथवा सज्ज राहण्यास व पूर्ण तयारीत राहण्याचे आमंत्रण देत आहे.

आजचे पहिले वाचन आपणास सांगते कि, ज्ञान हे परमेश्वरामध्ये आहे आणि त्याच ज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला देवाच्या सानिध्यात राहणे गरजेचे आहे. परमेश्वराचे ज्ञान हे पुस्तकात नव्हे तर अनुभवाद्वारे मिळत असते.

आजच्या दुसर्या वाचनामध्ये आपण ऐकतो कि, ख्रिस्ती लोक येशूच्या पुनरागमनाची आशेने वाट पाहत असता त्यामधील अनेक लोक मरण पावले होते

शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दहा कुमारींचा दृष्टान्त देत आहे. पाच  कुमारीकांना वराचे दर्शन झाले व त्या त्याच्यासोबत मेजवानीस गेल्या कारण त्या तयारीत होत्या. परंतु इतर पाच कुमारीकांना प्रभूचे दर्शन झाले नाही. कारण त्यांनी पूर्णपणे तयारी केली नव्हती. आज प्रभू येशू ख्रिस्त आपणास जागृत राहून, पूर्ण तयारीत राहण्यास सांगत आहे. मानवपुत्र कधी येईल हे आपणास ठाऊक नाही. म्हणून आपण नेहमीच सावध असून मनाची पूर्ण तयारी करू या. आपले चारित्र्य शुद्ध ठेऊया. प्रभूला अनुरूप असे जीवन जगूया.

बोध कथा:

राज्याच्या दरबारामध्ये काही विदुषक असतात. त्यांचे काम म्हणजे, आपल्या गमतीदार बोलण्याद्वारे आणि विचित्र गोष्टींद्वारे लोकांना हसवणे आणि त्यांची करमणूक करणे. राजाच्या दरबारी असलेला एक विदुषक गंमतीस पात्र आणि मूर्खसुद्धा मानला जात असे. एकदा सभागृहामध्ये बसलेल्या राजाने त्याला सांगितले कि, ह्या किल्ल्या घे आणि माझी खोली उघड व तिथे मी आहे का थे पाहून ये. तो लगेच त्या दरवाज्याच्या किल्ल्या गेहेऊन पळत राज्याच्या खोलीत गेला. काही क्षणात पळत-पळत परत येऊन म्हणाला कि, ‘महाराज तुम्ही तिथे नाही. त्यावर राजा हसत त्याला म्हणाला, ‘तुझ्याइतका मूर्ख व्यक्ती मी कुठेच पाहिला नाही. आता एक काम कर तुला जर तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख माणूस कधी कुठे भेटला तर मला येऊन सांग.

काही वर्षांनी राजा म्हातारा झाला.  र्ष्यांनीााय नेक लोक मरण पावले. त्याला म्हातारपणात गंभीर आजाराने ग्रासले. अनेक वैद्यांनी राजावर उपचार केले, परंतु त्याच्या प्रकृतीत फारसा फरक दिसेना.  आजार वाढतच चालला होता. राजा आपली प्रकृति बरी होण्यासाठी काहीही करायला तयार होता. परंतु मरणाला सामोरे जाण्यास तयार नव्हता. मरणाच्या विचाराने तो अगदी घाबरून जात असे. ह्याचेच औचित्य साधून तो विदुषक राजाकडे येऊन त्याला म्हणाला, महाराज मला माझ्यापेक्षा जास्त मूर्ख असा एक मनुष्य सापडला आहे. राजा म्हणाला कोठे आहे तो? त्याला येथे घेऊन ये. तेव्हा विदूषक म्हणाला, ‘तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आहात.’ त्याने पुढे ह्याचे स्पष्टीकरण दिले कि, ‘एखादा मनुष्य म्हातारपणात मरणाच्या प्रवासाची तयारी करत असतो. परंतु तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करता. ह्याउलट मरणा नंतरची तयारी तुम्ही केलीच नाही. तुमची तयारी शून्य आहे. म्हणून मला वाटते कीं माझ्यापेक्षा जास्त मूर्ख मनुष्य तुम्ही आहात.राजाला आपली चूक ताबडतोब लक्षात आली. त्यांने विदूषकाचे आभार मानले व मरणाची तयारी करायला सुरुवात केली.

मनन चिंतन:

देउळमाता आपणास देव्शब्दाद्वारे आवाहन करत आहे कि, आपण सतत जागृत असावे. ह्याचे कारण म्हणजे, तो दिवस, ती घटका कधी येईल हे कोणास ठाऊक नाही. हेच शब्द आपल्याला आठवण करून देतात कि, आपण या जगाचे रहिवासी नसून फक्त प्रवासी आहोत. एक दिवस आपल्या प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. परंतु केव्हा, कुठे व कसा हे आपल्याला ठाऊक नाही. याचा अर्थ असा नाही की, आपण सतत मरणाची भीती बाळगावी. याचा अर्थ असाही नाही की, आपण आपले लक्ष सर्वदा मृत्युकडे केंद्रित करावे आणि आपण आपल्या मरणाविषयीं चिंतीत असावे. सांगण्याचे तात्पर्य हे कि, आपण मरणाची फक्त आठवण ठेवावी व त्याद्वारे सर्वकालिक जीवनावर श्रद्धा ठेऊन आपले दैनिक जीवन जगावे. हे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या जीवनावर कधी संकट येईल, आपण कधी आजारी पडू, किंवा आपल्यावर मरणाचं संकट कधी येईल हे आपल्याला ठाऊक नसणार, म्हणून पूर्ण तयारीने राहणे अगत्याचे आहे

बोधकथेत सांगितल्याप्रमाणे, मूर्ख राजा आपल्या मरणाची तयारी करण्यास अपयशी ठरला. तो आपले भौतिक जीवन वाढविण्यात असफल झाला. स्वर्ग राज्यात जाण्याच्या तयारीत अग्रेसर ठरला नाही. ह्या उलट आपले जीवन कसे अधिक वाढवावे म्हणून तो काहीही करायला तयार होता. म्हणून विदुषकाने राजा मूर्ख आहे सिद्ध करून दाखवले, व राजाला आपल्या मरणाची तयारी करण्यास आठवण करून दिली.

आजच्या पहिल्या वाचनात शलमोनच्या ज्ञानग्रंथात आपल्याला ज्ञानाबद्दल सांगितले आहे. ज्ञान हे देवाने दिलेली देणगी आहे. जो कोणी त्याची आ धरतो त्याला ते लाभते. त्याचा शोध घेणाऱ्यांना ते सापडते. जो खऱ्या अंतकरणाने ज्ञानाचा शोध घेतो, त्याच्यापासून ज्ञान हे, कधीच दूर ठेवले जात नाही. देवाचे ज्ञान हे आपल्याला एकमेकांवर प्रेम करण्यास मदत करत असते, म्हणून हे ज्ञान मिळविण्यासाठी आपणाला देवाच्या सानिध्यात राहणे खूप गरजेचे आहे.

तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात आपण वाचतो कि, ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये ख्रिस्ताचे पुनरागमन अगदी लवकरच होणार हि भावना बाळगून बसले होते. हे जीवन जगत असताना मरण पावलेल्या विश्वासू लोकांचे काय होणार ही चिंता त्यांना सतावित होती. म्हणून संत पौल सांगत आहे कि, जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते एक दिवस सर्व ख्रिस्ता बरोबर उठविले जातील व देवाच्या सानिध्यात असतील.

आपला विश्वास हा येशू ख्रिस्त व त्याच्या पुनरागमनावर आधारित आहे. आपल्या मरणाने नवीन जीवनाला सुरुवात होते. देवपित्याबरोबर, येशू ख्रिस्ता बरोबर आणि पवित्र आत्म्या बरोबर सार्वकालिक जीवन अनुभवण्यास आपणास पाचारण होत असते.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दहा कुमारींचा दृष्टांत देत आहे. त्यातील पाच शहाण्या व पाच मूर्ख होत्या. त्या वर येण्याची वाट पाहत होत्या. जेव्हा वर आला तेव्हा फक्त शहाण्या कुमारीका वराला भेटू शकल्या, कारण त्यांच्याकडे पुरेसे तेल होते, त्या तयारीत आल्या होत्या. परंतु मूर्ख कुमारीका भेटू शकल्या नाहीत, कारण त्यांच्याकडे तेल नव्हते, त्यांनी त्या राजाच्या/वरच्या स्वागतासाठी पुरेशी तयारी केली नव्हती.

आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल किंवा कोणतेही कार्य करायचे असेल तर आपल्याला पूर्ण तयारी करावी लागते. जेव्हा पाहुणे आपल्या घरी येत असतात, तेव्हा आपण खूप तयारी करत असतो. खासकरून थंडपेय, फराळ आणि भोजनाची सोय आपण करत असतो.

आपल्याला शिवाजी आणि अफजलखानाची गोष्ट माहितच आहे. अफजलखानाने एकदा शिवाजीला भोजनाला बोलाविले. शिवाजीराजे हुशार होते. आपल्या शत्रूने आपल्याला भोजना बोलावले आहे म्हणजेच ह्यात त्याचा काहीतरी डाव असणार हे शिवाजीराजे जाणून होते. म्हणून ते तयारीत मेजवानीस गेले. धिप्पाड अफझलखानाने शिवाजीला मिठी मारण्याचे नाटक करताच शिवाजीने आपल्या वाघ नखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली. हे महाराजांना शक्य झाले कारण शिवाजीराजे पूर्ण तयारीने गेले होते.

दुसरे उदाहरण द्यायचे झाले म्हणजे, जुन्या करारात आपण वाचतो की, नोहाने देवाच्या आदेशाप्रमाणे लोकांना सावध व पूर्ण तयारीने राहण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी त्याचे ऐकले नाही त्यामुळे महापूर आल्यावर सर्व काही बुडून गेले. परंतु नोहाने आपले कुटुंब वाचवले कारण, देवाच्या आज्ञेनुसार तो चालला व त्यांनी पूर्ण तयारी केली होती.

आज प्रभु आपणास जागृत व पूर्ण तयारीत राहण्यास सांगत आहे. त्यामुळे जेव्हा आपण मिस्साबालीदानात भाग घेण्यासाठी येत असतो, तेव्हा आपण पाच किंवा दहा मिनिटे अगोदर येऊन ख्रिस्ताचे अतिपवित्र रक्त आणि शरीर सेवन करण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे. मनाची तयारी केल्याशिवाय देवाला स्वीकारण्यास आपण पात्र नसतो. आता आपण थोडावेळ शांत राहून स्वतःला  विचारूया की मी जागृत आहे का? मी प्रभूला भेटण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिसबिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपले प्रेषितकार्य करताना सातत्याने परमेश्वराचा अनुभव यावा व हा अनुभव त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातून इतरांना द्यावयास प्रयत्नशील राहण्यास त्यांस परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. आपण सर्वांनी आपल्या जीवनात सतत जागृत राहून म्हणजेच प्रभू येशूची शिकवण आपल्या कृतीत उतरवून प्रभू येशूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खीआजारी व बेरोजगार आहेतविशेषतः जे गंभीर व दीर्घकाळ आजाराने पिडीत आहेत अशा लोकांस आपण मदतीचा हात देण्यास तयार असण्यास आणि अशाप्रकारे परमेश्वराच्या येण्यासाठी तयारी करण्यास परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक नोकरी धंद्याच्या शोधात आहेत, त्यांना योग्य तो रोजगार मिळावा व त्याच्या योग्दनामुळे त्यांच्या कुटुंबाचा व समाजाचा विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.   


No comments:

Post a Comment