Thursday, 21 August 2025

 Reflection for the 21st Sunday in Ordinary Time (24/08/2025) By Fr. Cajeten Pereira

सामान्य काळातील एकविसावा रविवार

दिनांक : २४/०८/२०२५

पहिले वाचन: यशया ६६:१८-२१

दुसरे वाचन: ईब्री लोकांस पत्र १२:०५-१३

शुभवर्तमान: लूक १३:२२-३०

प्रस्तावना

      आज देऊळ माता सामन्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला दोन विषयावर मनन-चिंतन करावयास बोलावत आहे. एक म्हणजे- ‘रुंद मार्ग’ जो आपल्याला सैतानाकडे घेऊन जातो, तर दुसरा, ‘अरुंद मार्ग’ जो आपल्याला प्रभू येशूकडे घेऊन जातो, आता ह्या दोघामधील  कोणता मार्ग आपण निवडायचा, हे मात्र स्वतःवर अवलबून आहे. परंतु आज देऊळमाता ईश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा तारण प्राप्तीचा अरुंद मार्ग अनुसरण्यास आपल्याला सांगत आहे.

       आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर, यशया संदेष्टाद्वारे लोकांना सांगतो की, सर्व राष्ट्रांतील लोकांना एकत्र येऊन त्यांनी माझा महिमा व गौरव पाहावा, जेणेकरून त्यांना समजून येईल की, मी त्यांचा देव आहे. दुसरे वाचन हे इब्री लोकांस पत्र ह्यामधून घेतलेले असून, ते आपल्याला  शिस्तीचे महत्त्व पटवून देते, ते तारणप्राप्तीसाठी किती महत्वाचे आहे हे सांगत आहे. तर शुभवर्तमानात  आपले तारण व्हावे म्हणून  अरुंद मार्ग निवडण्यास प्रभू येशू सांगत आहे.

       जर आपण परमेश्वराच्या मार्गावर न चालता इतर मार्गाचा उपयोग केला असेल तर परमेश्वराचरणी क्षमा व याचना मागुया व परमेश्वराच्या मार्गावर सदोदित चालण्यास कृपा व सामर्थ्य मागुया.      

सम्यक-विवरण

पहिले वाचन- यशया: ६६: १८-२१

      पहिले वाचन हे यशया संदेष्टांच्या पुस्तकातून घेतलेले आहे यशया सांगतो, की परमेश्वराला आपले विचार, कामे, आपली मने ठावूक आहेत. त्यामुळे तो आम्हांसर्वांना एकत्र करणार आहे; त्याची महिमा दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे इस्त्रायल लोक परमेश्वराला; पवित्र दाणे अर्पण करत होती त्याचप्रमाणे; परमेश्वर आपणाला शुद्ध करेल.

दुसरे वाचन- इब्री लोकांस पत्र: १२; ५-७,११-१३

       दुसऱ्या वाचनात परमेश्वर आपणाला शिस्तीचे उदाहरण देत आहे. शिस्त आपल्या जीवनाला नवा मार्ग देते. शिस्त आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे फार कठीण असते, पण ह्या शिस्तीमुळे आपल्या जीवनामध्ये नवे वळण लागते व आपल्या जीवनाचा मार्ग नव्या दिशेने कार्यरत होतो व त्यामुळे आपण परमेश्वराचे अनुयायी व मुले बनतो; कारण तो आम्हांवर प्रेम करतो.

शुभवर्तमान-  लुक १३:२२-३०

       आजच्या शुभवर्तमानातील ख्रिस्त आपल्याला संदेश देतो की, तारण प्राप्तीसाठी फक्त अरुंद मार्गाचा पर्याय सुचवतो आहे. लोकांनी येशूची शिकवण ऐकली परंतु त्या शिकवणी प्रमाणे वागले नाहीत त्यामुळे अनेक लोकांना तारण प्राप्त होण्यास कठोर होईल. जे योग्य ठरले आहेत त्यांचीच देव राज्यामध्ये निवड झाली आहे, म्हणून येशू सांगतो, जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ने पहिले होतील.

मनन चिंतन

       येशूला कोणीतरी विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?” तसे पाहता हा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, स्वर्गात किती लोक आहेत? किंवा, कोणी असे विचारेल, “कोणी खरोखरच नरकात जातो का?”

आज काही लोक असा विचार करतात की देव दयाळू असल्याने प्रत्येकजण स्वर्गात प्रवेश करतो. शेवटी, आजचे पहिले वाचन आणि स्तोत्र दोन्ही सर्वांना” संदर्भित करतात, अगदी दूरच्या किनाऱ्यावरील” लोक देखील स्वर्गात प्रवेश करतात. ही आपली आशा आहे पण दुर्दैवाने, मला वाटते की यामुळे काही लोक देवाला आणि त्याच्या दयेला गृहीत धरतात. ते असा विचार आहे की जर प्रत्येकाला स्वर्गात प्रवेश मिळत असेल तर मग कसेही जगण्यास हरकत नाही. चांगले करो किंवा वाईट, स्वर्गात प्रवेश निश्चित आहे.

       धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टी करण्याची गरज नाही. मिस्साला नाही गेलो, प्रार्थना नाही केली तरी चालेल. पापे करायची आणि मग जाऊन प्रायश्चित्त करून देवाची दया आणि क्षमा मिळवायची. तारणाची हमी आहे. विचार करा जर कोणी जाणूनबुजून तुमचे वाईट करते तर तुम्ही त्याच्याशी कसे वागल. त्याला क्षमा करून पुन्हा करण्याची संधी देणार की जाब विचारून पुन्हा नाही करण्याचं वचन घेणार.

       चर्च आपणाला शिकवते की काही लोकांचे स्वर्गात स्वागत झाले आहे. आपण त्यांना संत म्हणतो. म्हणून, “प्रभु, फक्त काही लोकांचेच तारण होईल का ?” असे विचारणाऱ्या व्यक्तीला येशू असे म्हणत नाही की सर्वजण स्वर्गात जातात. तसेच तो असे म्हणत नाही की बहुतेक लोक स्वर्गात जातात. प्रत्यक्षात, तो कधीही कोणत्याही प्रकारची संख्या निर्दिष्ट करत नाही. तो असे सूचित करतो की काही जण स्वतःला बाहेर टाकलेलेअसे पाहतील.

       येशू म्हणतो, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा , कारण मी तुम्हाला सांगतो की, बरेच जण आत जाण्याचा प्रयत्न करतील पण आत जाण्याइतके त्यांना सामर्थ्य मिळणार नाही.येशू स्पष्टपणे म्हणतो की प्रत्येकजण स्वर्गात जाऊ शकत नाहीकिमान ते स्वतःहून तरी प्रवेश करू शकणार नाहीत. आत जाण्यासाठी काय करावे लागते? येशूच्या शिकवणूकीनुसार, केव्हातरी प्रार्थनेत उपस्थित राहणे पुरेसे नाही. जे म्हणतात, “आम्ही तुमच्यासोबत जेवलो, प्यालो आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिकवले,” आणि ते पुरेसे आहे असे त्यांना वाटते, त्यांना येशू म्हणतो, “तुम्ही कुठून आला आहात हे मला माहित नाही.”

यशयाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की, प्रभु म्हणतो, “मी त्यांची कामे आणि त्यांचे विचार जाणतो.देवाला आपले विचार जसे माहीत असतात तसेच आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा तो जाणतो. याचा अर्थ असा की आपण त्याचे अनुसरण करण्याच्या प्रयत्नात कधी प्रामाणिक नसतो तेही तो जाणतो. म्हणून, आपण त्याचे अनुसरण करण्यासाठी प्रयत्नकेले पाहिजे. येथे प्रयत्न ह्या शब्दावर भर देण्यात आली आहे, कारण येशू स्वतः म्हणतो की आपण नेहमीच त्याचे अनुसरण करण्याच्या अर्थाने परिपूर्ण नाही हे त्याला माहित आहे. त्याला आपल्या कमकुवतपणा माहित आहेत. 

      आपण स्वतःला वाचवू शकत नाही पण येशू आपल्याला वाचवू शकतो. आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशूने स्वेच्छेने वधस्तंभावर आपले जीवन अर्पण केले. हे करण्याची त्याची तयारी आपल्यावरील त्याच्या निरपेक्ष प्रेमातून येते. वधस्तंभावर त्याने आपल्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. 

       ज्याप्रमाणे आपल्या पालकांची शिकवण प्रेमात रुजलेली असते, त्याचप्रमाणे येशूची शिकवण देखील आपल्यावरील त्याच्या प्रेमात रुजलेली आहे. येशूला सर्वजण स्वर्गात असावे असे वाटते. त्यामुळे त्याची शिकवण ऐकून त्याच्या आज्ञेचे पालन करण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण कमी पडू तेव्हा येशूचा हात आपणाला सावरेल, मदत करेल. तारणाचा मार्ग मोकळा करून आपणाला स्वर्गात घेऊन जाईल.

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  ‘हे प्रभू तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक’

१) हे प्रभू, खिस्तसभेचे अधिकारी पोप लिओ, सर्व बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित ठेव. सर्व आपत्तीपासून त्याचे रक्षण कर व तुझा शब्द लोकांस देण्यासाठी तू त्यांना तुझ्या शांतीचे साधन बनव.

२) हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा  अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास आम्हा सर्वांना तुझे सामर्थ व बळ लाभूदे जेणे करून आम्हांला तारण प्राप्ती होईल.

३) आज आपण विशेषरित्या प्रार्थना करूया जे लोक पाण्याच्या पुरामुळे बेघर झाले आहेत, संकटामध्ये आहेत, अशा सर्व लोकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व त्यांचे पुन्हा एकदा प्रभूच्या प्रेमाने बहरावे म्हणून प्रार्थना करूया.

४) आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत. त्यांना प्रभूच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवजीवनच तेज त्यांना दिसाव म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

५) आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment