Tuesday 22 October 2013



Cajeten Pereira comes from St. Gonsalo Gracia Church, Gass, Vasai. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Known as a good musician and a dressmaker with humble and simple Franciscan nature, his sermons are context based and practical oriented. Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune.





 सामान्यकाळातील तीसावा रविवार
/११/२०१३.
वर्ष-क
बेनसिरा; ३५;१२-१४,१६-१८.
२ तीमथी; ४:६-८,१६-१८.
लूक, १८:९-१४.

प्रस्तावना:

नम्रता हा सुखी जीवनाचा पाया आहे. नम्रता आपल्याला सद्गुणी बनविते. प्रभू येशूने त्याच्या जीवनात नम्रतेला अन्यसाधारण महत्व दिले. परंतु गर्वाने व अहंकाराने फुगत चालले विश्व आणि स्वभावाने गर्वीष्ठ झालेला मनुष्य मीच श्रेष्ठ, सद्गुणी व उत्कृष्ठ तर दुसरे नीच, पापी व दृष्ट अशी भावना उभारत आहेत. परिणामी जीवनातील शांती, प्रेम, बंधुत्व नाहीसे होत आहे. नम्रता हा आजच्या तिन्ही वाचनाचा बोध आहे. येशू म्हणतो, ''जो कोणी आपणाला उंच करतो, तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. नम्र झाल्यानेच सुखी जीवन जगता येईल. नम्रतेने जीवनात शांती, प्रेम, बधुंत्व प्रस्थापित करता येईल.

पहिले वाचन:
बेनसिरा बोधवचने ह्यातून घेतलेले आजचे वाचन विनयशील माणसाच्या प्रार्थनेविषयी बोध देतात. आज जगात नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा नाही तर सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा जगावर हुकूम चालवित आहे. परंतू देव माणसाला त्यांच्या सपंत्तीमुळे श्रेष्ठ ठरवित नाही. प्रभू हा न्यायी न्यायाधीश आहे. नम्र व मनापासून सेवा करणा-याची प्रार्थना प्रभू ऐकतो. न्यायाची व सत्याची उभारणी होईपर्यत विनयशील मनुष्य प्रभूकडे अहोरात्र प्रार्थना करतो. विनयशील माणसाच्या प्रार्थना देवाच्या हृदयाला स्पर्श करून कृपेचा वर्षाव करतात.

दुसरे वाचन:
आजच्या वाचनाद्वारे तीमथ्याने आपला आदर्श व्हावा, हाच पौलाचा उद्देश आहे. शत्रुत्व आणि मृत्यू पौलाला घाबरवू शकत नाही किंवा हृदयहीन करू शकत नाही. तो स्वत:विषयी समाधानी आहे. कारण संत पौल म्हणतो, ''ख्रिस्तासाठी विश्वासाशी मी एकनिष्ठ राहिलो, जरी कठीण प्रसंगात सर्वांनी मला सोडले परंतू प्रभू माझ्या पाठीशी राहिला. प्रभूने मला सिहांच्या जबड्यातून मुक्त केले.'' पौलाचा विश्वास होता की, जर आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू. न्यायाच्या दिवशी नीतिमत्वाचा मुकुट प्रभू आपणाला परिधान करतील. ख्रिस्ती लोकांसाठी मृत्यू अंत नसून सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे.

शुभवर्तमान:
आजच्या शुभवर्तमानात येशू आपणाला परूशी व जकातदार ह्या दाखल्याद्वारे प्रार्थना करताना आपला स्वभाव कसा असावा ह्याविषयी स्पष्टीकरण देतो. देवापुढे प्रार्थनेत आपण गर्विष्ठतेचे नव्हे तर नम्रतेचे रूप अंगीकारले पाहिजे. नम्र माणसाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो व त्याच्यावर कृपेचा व क्षमेचा वर्षाव करतो. पापी लोकांचे तारण होईल पण गर्विष्ठ लोकांचे कधीच तारण होणार नाही. कारण पापी मनुष्य देवाकडे क्षमेची भीक मागतो पण गर्विष्ठ देवाकडे कधीच क्षमा मागत नाही. उलट तो देवाकडून आभाराची व स्तुतीची अपेक्षा करतो.

बोध कथा:
. नम्र तो महान: दोन तरुणांनी मौज-मजेसाठी बकरी चोरली. परंतू त्यांची चोरी पकडली गेली. शिक्षा म्हणून त्यांच्या कपाळावर ST ह्याचा अर्थ असा Sheep Thief (बकरी चोर) लिहिण्यात आले. त्यातील एक तरूण हा अपमान सोसू शकला नाही. रागाच्या भरात त्याने आत्महत्या केली. कालांतराने लोक त्याला विसरून गेले.  दुस-या तरूणाने मात्र वेगळा मार्ग निवडला. तो स्वत:शी उद्गाराला, ''मी जे काही केले आहे त्यापासून पळू शकत नाही, म्हणून मी इथेच राहून गमावलेला मान व सन्मान परत मिळवेन.'' तो गरिबांची व गरजवंतांची सेवा करू लागला. जशी वर्ष सरू लागली तशी त्याने प्रामाणिकपणाची भक्कम प्रतिष्ठा उभारली. एके दिवशी एका अनोळखी व्यक्तीने त्या तरूणाच्या, जो आता वृध्द झाला होता त्याच्या कपाळावरची ST ही अक्षरे पाहिली. त्याने गावातील एका मनुष्याला त्याचे रहस्य विचारले. तो मनुष्य म्हणाला, ''हे फार वर्षापूर्वी घडले होते, मलासुध्दा आठवत नाही. पण मला वाटते ती अक्षरे संत पदाचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप आहे.''

. खरी भक्ती: एक महान ऋषी देवाचा फार मोठा भक्त होता. आपली भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे असा त्याचा गैरसमज होता. त्यामुळे तो गर्विष्ठ व अहंकारी बनू लागला. ऋषीला धडा शिकविण्यासाठी देवाने त्याला दर्शन दिले व म्हटले, ''माझ्या भक्ता, तुझा गैरसमज होत आहे. तुझ्याहून माझ्यावर अधिक प्रेम करणारा गंगेच्या तीरावर राहत आहे. त्याच्याकडे जाऊन दोन दिवस राहा म्हणजे तुला ख-या भक्तीचा उलघडा होईल.''
ऋषी गंगेतीरावर जातो. तिथे गरीब शेतकरी राहत होता जो सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करी व आपल्या कामाला जात असे; रात्री झोपेअगोदर तो पुन्हा देवाचे नामस्मरण करी व झोपी जाई. हे पाहून तक्रार करित ऋषी म्हणाला, ''हा शेतकरी देवाचे फक्त दोनदा नाव घेतो, हा कसा काय देवाचा भक्त होऊ शकतो?''
ह्यावर देव ऋषीला म्हणाला, ''ठीक आहे! तू काठोकाठ तेलाने भरलेला हंडा घे व गावप्रर्दक्षिणा कर. पण तेलाचा एक थेंबसुध्दा बाहेर पडता कामा नये.'' देवाने सांगितल्याप्रमाणे ऋषीने केले व देवापुढे हजर झाला. देवाने त्याला विचारले, ''किती वेळा तू माझी आठवण केलीस?'' ''एकदापण नाही'', ऋषी उद्गारला. ''तुम्ही मला तेलाने भरलेल्या हंड्यावर लक्ष केंद्रीत करावयास सागितले; मग मी तुम्हाला कसे स्मरणार?''
तेव्हा देव म्हणाला, ''त्या हंड्याने तुझे लक्ष इतके वेधून घेतले की, तू मला विसरलास. त्या शेतक-याकडे बघ, संसारी जीवनाची ओझे वाहत असताना दिवसातून दोनदा तो माझी आठवण करतो.''

सम्यक् वितरण:
परूशाची प्रार्थना: येशूच्या मनात परूशीविषयी आदरभाव होता कारण ते निवडलेल्या लोकांच्या ख-या विश्वासाचे साक्षीदार होते. परूशी धार्मिक, देवभिरू, सचोटीचे जीवन जगणारे व देवाच्या नियमाविषयी नेहमी चिंतन करणारे असे होते. नियम शास्त्रानुसार आवश्यक ते सर्व करीत असत, उदा. आठवड्यात दोन वेळा उपवास, नियमानुसार प्रार्थना व मिळकतीतील उत्पन्नाचा दशांश देणे (लुक १८:१२).
तथापि, परूशाचे ढोंगीपण येशूला आवडले नाही. परूशी हा परमेश्वराकडे प्रार्थना करण्यास गेला नव्हता तर स्वत:शी प्रार्थना करीत होता. खरी प्रार्थना परमेश्वराला अर्पण केली जाते, स्वत:ला नव्हे. तो प्रार्थना करण्यासाठी प्रमुख मोक्याच्या जागी उभा राहिला. त्याने आपल्या धर्माचरणाबद्दल स्वत:चीच प्रशंसा केली (त्याची सर्व प्रार्थना 'मी', 'माझे', 'मला' या विषयीच आहे). त्याने आपल्या सद्गुणाचा तक्ता तयार केला जेणेकरून देवापुढे इतरापेक्षा तो जास्त नीतिमान ठरेल. शेजा-यांची हेटाळणी करीत आता आपल्याला काही उणे नाही असे त्याने देवाला सुचवले. दैवी कृपेमुळे नव्हे, तर स्वत:च्या उत्कृष्टपणामुळे प्रभूच्या आर्शिवादाला आपण पात्र ठरतो अशी त्याची धारणा होती.

जकातदाराची प्रार्थना: परूशासारखे जकातदाराला समाजामध्ये कोणताच दर्जा नव्हता. रोमन अधिका-यासाठी तो ज्यू लोकांकडून कर वसूल करीत असे. स्वत:चे खिशे भरण्यासाठी जकातदार लोकांकडून जास्त कर उकारीत; त्यामुळे ज्यू लोकांच्या मनात त्याच्याविषयी तिरस्काराची भावना होती. जरी एखादा प्रामाणिक असला तरी समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा खूपच खालच्या दर्जाची होती. त्याला सार्वजनिक पापी म्हणून ओळखत.
जकातदार परमेश्वराकडे प्रार्थना करण्यास आला तेव्हा मंदिरातील पवित्र स्थानापासून खूपच दूर उभा राहिला. कारण स्वत:च्या पापी जीवनाची जकातदाराला पुर्व कल्पना असल्यामुळे आपण देवाच्या कृपेसाठी लायक ठरत नाही हे तो मान्य करतो. त्याला परमेश्वराकडे डोळे वर करून पाहण्याचे ही धैर्य नव्हते. मग हात उभारून देवाला विंनती करण्याचे धाडस तरी कोठले? परमेश्वराच्या महान प्रतिमेकडे मी कसं पाहणार? झुकलेल्या नयनांनी व दु:खी अंतकरणाने त्याने आपली छाती पिटली. पाप स्विकारत व तिरस्कारत त्याने म्हटले, ''हे देवा, मज पाप्यावर दया कर.'' त्याने आपल्या पापीपणाची सरळ-सरळ कबुली दिली आणि काकुळतीस येऊन देवाकडे दयेची याचना केली. देवाने त्यांच्या प्रेमळ दयेने आणि करूणेने आपणाला स्पर्श करावा व आपले तारण करावे अशी याचना केली.

जीवन -बोध:
. आज जगात सुखी व समाधानी जीवन जगणारे क्वचितच सापडतात. बहुतेकजण आपल्या जीवन पद्धतीवर असमाधानी आहेत. सुखी जीवन जगण्यासाठी विश्व दररोज हजारो मार्ग आपणापुढे उभे करते आणि आपण आधंळ्यासारखे सुखी जीवन प्राप्त करण्यासाठी ह्या मार्गावर धावत असतो. पण आपल्या पदरी सदैव निराशाच पडते.
परूशी आणि जकातदारचा दाखला आपणाला आपल्या प्रवृत्तीतील लबाडीचा दोष दाखवून देतो. परूशाप्रमाणे आपण जीवनात नेहमी स्वत:ची वाहवा करीत असतो. आपणाला वाटते की, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी मुबलक प्रमाणात फक्त आपणालाच मिळाव्यात. कारण मी पुष्कळ सत्कार्य करतो; दुस-यापेक्षा मी चांगला, नीतिमान व निष्पाप आहे; माझ्या तुलनेत माझ्याबरोबरीचा कोणीच नाही; इतर सर्वजण पापी, बलात्कारी, गर्विष्ठ, अनाचारी, इतराना लुबाडणारे व पिळवणूक करणारे आहेत असा भ्रम ठेवतो. आजचे शुभवर्तमान आपल्याला दैंनदिन जीवनात नम्रता धारण करण्यास आवाहन करत आहे. मोबदल्याचा लोभ, गर्व आणि ढोंगीपणा परमेश्वर व माणसामध्ये कुंपण निर्माण करते तर नम्रता, प्रेम व करुणा हे कुंपण घालवण्यास आपणास मदत करू शकते.

. प्रार्थना ही ख्रिस्ती निष्ठेचा मूलभूत घटक आहे तर नम्र प्रार्थना तिचा कळस आहे. नम्र प्रार्थनेद्वारे माणूस देवाबरोबर (चांगले) नाते स्थापन करतो. ह्याद्वारे माणसाची देवाबरोबर गौरवशाली व विलक्षणीय भेट होते व  मानवी हृदये देवाच्या प्रेममय हृदयाशी जुळतात. नम्रतेच्या गाभा-यातून केलेली स्तूती, आराधना, आभार, विंनती आणि क्षमेची याचना देवाकडून असंख्य कृपेचा व आर्शिवादाचा वर्षाव भाविकांवर करते.
प्रभू हा पावित्र्याने परिपूर्ण आहे. त्यांच्या पावित्र्यापुढे आपण सर्व पापी, अपात्र व अयोग्य आहोत; ह्या भावनेतून आपल्या प्रार्थनेचा उगम झाला पाहिजे. प्रार्थनेत आपली प्रवृत्ती नम्रतेची असायला हवी. आपणाकडे स्वत:ला गौरविण्यासाठी काहीच नाही. प्रभूच्या अमर्यादेत नतमस्तक झालेला मनुष्य आंतरिक शांतता व मनपरिवर्तन अनुभवतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद, हे देव आम्हा पाप्यावर दया कर.
१. पोपमहाशय, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी, जे फलदायी अध्यात्मिकतेचे आदर्श आहेत, त्यांना मिशन कार्य करण्यासाठी व खरे प्रेम, शांती इतरांनामध्ये प्रस्थापित करण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
२. जे धार्मिक जीवन जगण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यांना -या प्रार्थनेची ओढी लागावी व देवाच्या सानिध्यात अधिकाधिक वेळ घालविता यावा, म्हणून प्रार्थना करूया.
३. सर्वत्र ख्रिस्ती भाविकांना दु:खात व संकटात धैर्य व सामर्थ्य मिळावे, तसेच येशु ख्रिस्तावर व त्याच्या शुभवर्तमानावर त्यांचा विश्वास बळकट व्हावा, म्हणून प्रार्थना करूया.
४. बाह्य-स्वरुपीय धार्मिक विधीवर समाधानी न होता, अध्यात्मिक प्रवासात उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, म्हणून प्रार्थना करूया.
. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करू या.








6 comments: