Tuesday 10 November 2015


Reflection for the Homily of 33rd Sunday in Ordinary Times  (15/11/2015) By: Dominic Brahmane.
                                  









                                   सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार




पहिले वाचन: दानिएल १२:१-१३.
दुसरे वाचन : इब्री लोकांस पत्र १०:११-१४;१८.
शुभवर्तमान : मार्क १३:२४-३२.


"अखेरपर्यंत जो वाट पाहिलं, तो खूप सुखी होईल"




प्रस्तावना:

     आज आपण सामान्याकाळातील तेहत्तीसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगण्यास पाचारण करत आहे.
     दानिएलच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींविषयी केलेले भाकीत आपण ऐकतो. त्या काळात ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली आहेत ते सर्व बचावतील; मृत उठवले जातील, काहींना चिरंजीवीत्व तर काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल असे परमेश्वर म्हणतो. इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रात संत पौल म्हणतात, ‘जेथे पापांची क्षमा झाली तेथे अधिक अर्पणाची गरज भासणार नाही’. तर मार्कलिखित शुभवर्तमानात येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या पुनरागमनाची परिपूर्ती कशी होईल ह्याबाबतचे चिन्हे सांगत आहे.
     प्रभू येशूच्या पुनरागमनाने आंम्हा सर्वांचे तारण होणार आहे; परंतु त्यासाठी आपण धार्मिकतेचे व नितीमत्वाचे जीवन जगायला हवे. ह्यासाठी आजच्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण :
पहिले वाचन: दानिएल १२:१-१३
हा उतारा दानिएल पुस्तकास दिलेली एक कवितामय सांगता होय. ह्यात शेवटच्या घटकेत होणारा विध्वंस व हा देवाच्या न्यायनिवाड्याचा दिवस असेल असे सांगण्यात आले आहे. ह्यामध्ये देवाने निवडलेले अथवा देवावर विसंबून राहणाऱ्यांचे तारण होईल. मिखाएल देवदूत जो इस्त्रायलचा आश्रयदाता मानला जातो, तोच इस्त्रायल लोकांच्या बऱ्या-वाईटपणाचे वृत्त परमेश्वराला कळवील. जे कबरेत निजले होते, त्यांना नवजीवन प्राप्त होईल. हे वैयक्तिक दिलेले पुनरुत्थानाचे वचन नव्या कराराशी अतुलनात्मक आहे (यशया २६.१९).
ज्या देवभिरू, विश्वासू लोकांनी संकटात देवावर विश्वास ठेवला, त्यांना हे अनंतकाळचे जीवन लाभणार आहे असे येथे प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. जुन्या करारात ‘शियोल’ नावाच्या ठिकाणी सर्व मृतात्मे पुरले जात. ह्या जागेत असणाऱ्या व्यक्ती देवापासून दूर गेलेल्या आहेत आणि त्याचा देवापासूनचा संबंध तुटला असे समजले जात असे (यशया ३८:१८; स्तोत्र ८८:१०-१२).
ह्या पुस्तकाचा लेखक (v-४) मध्ये अंतिम दिनाचे गुढ कायम ठेवत आहे, कारण हे सर्व कधी घडेल याचा उल्लेख स्पष्टपणे येथे करण्यात आलेला नाही. (v.५)मध्ये नमूद केल्याप्रमाणे, दोन देवदूत नदीच्या दुतर्फा उभे असतील आणि शुभ्र वस्र परिधान केलेला व्यक्ती त्यांचा न्याय करील असे (v.७) मध्ये सांगतो. (v.८) मध्ये दानिएल जेव्हा ह्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यास इच्छा प्रगट करतो, तेव्हा त्यास नकारात्मक प्रतिसाद मिळतो.

दुसरे वाचन: इब्री १०:११-१४,१८.
     ह्या प्रास्ताविक उताऱ्यात इब्री पत्राचा लेखक येशूने केलेल्या स्व-अर्पणात आणि पूर्वीच्या काळी धर्मगुरुंनी केलेल्या प्राणार्पनात असलेली तफावत आपल्या दृष्टोत्पत्तीस आणून देण्याचा प्रयत्न करत आहे.
ह्या पत्राचा लेखक येशूने अर्पण केलेल्या अर्पणावर विशेष भर देत आहे. कारण येशूने अर्पिलेले अर्पण हे अनंत काळासाठी होते व त्यास पुन्हा हे अर्पण करण्याची गरज नव्हती. त्याउलट पूर्वीच्या धर्मगुरुंनी केलेली होमार्पण, प्राणार्पणे, जलार्पणे ही प्रत्येक वर्षी त्यांना करावे लागत असे, त्यात अनंतकाळचा घटक नव्हता. ह्यास विसंगती होती ती येशूने केलेल्या अर्पणाची.
हे ह्या विशेष दोन घटक आढळतात.
अ)   ह्याची पुनरावृत्ती करण्याची गरज भासणार नाही. कारण ते त्याने स्व-अर्पणाने एकदाच सर्वकाळासाठी परिपूर्ण असे केले होते.
आ)   ह्या अर्पणाची पुनरावृत्ती कोणीच करू शकत नाही.
येशू ख्रिस्ताद्वारे आपण सर्वांनी देवाचे प्रेम अनुभवले. येशुद्वारेच आपणाला “अब्बा पिता” कळला. येशूचे मरण व पुनरुत्थान हे आज्ञाधारकतेचे अत्यंत मार्मिक उदाहरण आहे आणि हे सर्व येशुत असल्याने पित्याकडून आलेला तो परीपूर्ण असा पुत्र होता आणि त्याने केलेले अर्पण हे परिपूर्ण असे होते. म्हणून अश्या परिपूर्ण अर्पणाची पुनरावृत्ती कोणीच करू शकत नाही.
     (v.१८) ह्या अध्यायाअंती लेखकाने त्याच्या लेखनशैलीनुसार यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या वाक्यावर विशेष जोर दिला आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही” (यिर्मया ३१:३४). येथे यिर्मया संदेष्टा नवीन कराराबद्दल बोलत आहे. हा करार त्यांच्या ह्र्दयपटलावर कोरला गेला होता. नव्या करारातही येशूने त्याच्या स्व-अर्पणाने मनुष्याचा देवाबरोबर पापामुळे असलेला दुरावा दूर करून त्यांच्यातील पापाचा अडथळा कायमस्वरूपी नष्ट केला आणि त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळवली.

शूभवर्तमान: मार्क १३:२४-३२.
     ह्या परिच्छेदात येशू न चुकता त्याच्या पुनरागमनाबद्दल भाष्य करतो. ह्या त्याच्या पुनरागमनाने कोणकोणते बदल घडून येतील हे तीन भागात विभागता येतील.
१)        येशूच्या पुनरागमनात युद्ध होतील. ४ एज्रा मध्ये ह्याची विशेष नोंद मिळते. ‘तेव्हा धरणीकंप होईल, लोकांचा गलाटा उठेल, शहरांमध्ये तह होतील, अधिकाऱ्यांची धांदल उडेल, असे लिहिलेले आढळून येते’ (९:६). बारुखच्या दुसऱ्या पुस्तकातही ह्याबद्दल वाचावयास मिळते (२७:५-१३). (४८:३२) मध्ये, ‘पृथ्वीवर राहणारे सर्व एकमेकांविरुद्ध होतील; त्यांची भांडणे होतील; ह्याच कल्पनेचा किंवा यहुद्यांच्या भविष्याविषयी केलेल्या भाकीताचा (स्वप्नाचा) येशूने येथे वापर केला असावा.
२)                 येशूचा पुनरागमनाने सर्वत्र अंधार पसरेल. जुन्या करारात ह्याविषयी आपल्याला बरेच संदर्भ दिलेले आढळतात. उदा. आमोस ८:९, योएल २:१०, ३:१५, यशया १३:१०,३४:४, बारुख ३२:१.
‘त्याकाळात महान व्यक्तींच्या आगमनाने सर्व पृथ्वी थरारली जाईल’. ह्यावरून येशून सर्वश्रुत अशा जुन्या करारातील भाषेचा वापर करतो असे समजते.
३)     ज्यू पंथीयांच्या हा एक कल्पनेचा भाग होता की, सर्व ज्यू पंथीय एक दिवशी चारही बाजूंनी येऊन पालेस्तीन शहरात एकवटतील, ह्याविषयी दिलेला संदर्भ आपणास जुन्या करारात यशया २७:१३, ३५:८-१०; मिखा ७:१२  आणि जखऱ्या १०:६-११ ह्या पुस्तकांत सापडतो. ह्या येशूने वापरलेल्या चित्रयुक्त भाषेत आपल्याला प्रभूच्या पुनरागमनाची शास्रशुद्ध अशी तारीख व दिवस सांगितलेला नाही, परंतु येशूने ज्यू-पंथीयांनी पुरातन काळात वापरलेली भाषा परत एकदा वापरली. ह्या उताऱ्यात येशूने जरी विध्वंसाचे चित्रमय वर्णन केलेले असले तरी येशूच्या पुनरागमनाचे सत्य त्यातून वगळता येणार नाही.

बोधकथा:
    1. एक विदेशी व्यक्ती खेडेगावातून फेरफटका मारत होता. गरीब आणि संसाराच्या तारेवरची कसरत करणाऱ्या जनतेला बघून तो कळवळला. त्याने एका सर्वात गरीब सुताराला काम देण्याचे ठरवले. त्या विदेशी माणसाने सुताराला बक्कळ पैसा दिला आणि सांगितले ह्या पैश्यांतून मला सुंदर असे लाकडाचे घर व फर्निचर बनवून दे. असे सांगून तो परदेशी निघून गेला. सुताराने ह्या गोष्टीचा फायदा घेतला आणि सगळ्यात कमी किंमतीचे लाकूड, फळ्या वापरून घर अगदी कमकुवत, तकलादी बनवले. त्यातून झालेल्या पुष्कळ फायद्यात स्वतःची मौजमजा व छानछौकीचे जीवन जगण्यात घालून पैश्यांची उधळपट्टी केली.
     काही दिवसांनी तो विदेशी माणूस घर बघण्यासाठी आला व घर बांधलेले बघून तो आनंदी झाला. त्याने त्या सुताराला बोलावले व त्याची प्रशंसा करत त्याला आश्चर्याचा धक्का दिला. तो म्हणजे त्या परदेशी माणसाने त्या सुताराने बनवलेल्या घराच्या चाव्या त्यालाच परत सोपवल्या आणि हे घर आता तुझेच आहे असे म्हणत त्या घरात त्याला राहण्यास सांगितले आणि तो मायदेशी परतला. सुताराला पश्चाताप झाला आणि स्वत:शी म्हणू लागला, ‘जर मला अगोदर माहित असते की, मीच ह्या घराचा मालक असणार आहे, तर मी सर्वात उच्च प्रतीचे लाकूड, फळ्या, फर्निचर वापरले असते. त्याने बांधलेल्या कमकुवत घराचा कटू अनुभव त्याला पावसाळ्याच्या दिवसात आला. सर्वत्र पाणी गळू लागले आणि घरात पाणी साचले. सुतार पुन्हा डोक्याला हात लावून अश्रू गाळत बसला.
तात्पर्य: येशूच्या पुनरागमनाची निश्चित वेळ आपणास ठाऊक नाही. परंतु त्या शेवटच्या घटकेस जर आपण विश्वासू आणि नीतिमान असलो तर केलेल्या पापांचे दुष्परिणाम आपणास भोगावे लागणार नाहीत. तर आपल्या विश्वासाचे व नितीमत्वाचे प्रतिफळ नक्कीच प्राप्त होईल.


2.   डॉमनिकन संस्थेचे थोर तत्वज्ञानी आणि विचारवंत थॉमस अक्वायनस, सह्भोजनानंतर आपल्या साथीदारांसोबत विरंगुळा करत गप्पा-गोष्टी मारत होते. एकमेकांच्या सहवासात त्यांना सुखदायक अनुभव येत होता. इतक्यात त्यांच्यातील एकाने संत थॉमस यांना प्रश्न विचारला, ‘येणाऱ्या पंधरा मिनिटांत जगबुडी होणार आहे, असे जर तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?’ त्यावर स्मितहास्य करत ते उत्तरले, ‘जे मी आता सध्या करत आहे तेच चालू ठेवील’.

तात्पर्य: जर आपण देवाने दिलेल्या आज्ञेनुसार आपले जीवन जगत आलो असेल तर शेवटी पश्चाताप करण्याची काहिच गरज पडणार नाही. प्रभूच्या पुनरागमनासाठी आपण आहोत तसे तयार असणे फार गरजेचे आहे. प्रत्येक क्षण आपण नितीमानाने व विश्वासाने परमेश्वरचरणी समर्पित करायला हवा.

मनन चिंतन:
‘आपले ह्या पृथ्वितलावरचे वास्तव्य हे क्षणिक आहे, कारण आपले येथे  अस्तित्व हे एका वाटसरू किंवा यात्रेकरूप्रमाणे आहे, त्यास कायमचा ठावठिकाणा कदापि नाही’ असे संत अगुस्तीन म्हणतात. आजच्या पहिल्या व शुभवर्तमानातील वाचनातून आपल्याला ह्याची प्रचीती नक्कीच येते. दानिएल संदेष्ट्याच्या पुस्तकात ह्या युगाच्या समाप्तीविषयी भाकीत केल्याचे आपण ऐकले आणि शुभवर्तमानातही येशूच्या पुनरागमनापुर्वी होणारा विध्वंस ऐकला. येशूने शुभवर्तमानात सांगितलेला विध्वंस हा इ.स. नंतर सत्तर वर्षांनी येरुशलेम मंदिराच्या झालेल्या नाशाबाबत काही प्रमाणात खरा ठरला. त्याकाळी रोमन लोकांनी ते मंदिर युद्धामध्ये जमीनदोस्त केले होते. परंतु आजच्या शुभवर्तमानात येशू त्याच्या पुनरागमानापुर्वी होणाऱ्या अकालाची चाहूल करून देत आहे.
येशू जेंव्हा पुन्हा येईल तो न्यायनिवाड्याचा दिवस असेल. तेव्हा येशू नव्याने त्याचे राज्य नीतिमान व विश्वासू असलेल्या लोकांबरोबर प्रस्थापित करेल. ह्यास समरूप दानिएलच्या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन आपणास सांगण्यात येते की परमेश्वर जे मरण पावले आहेत त्यांस उठवील; काहीना चिरंजीवित्व तर काहींना कायमस्वरुपाची अप्रतिष्ठा लाभेल.
पुष्कळदा आपण ह्या अश्या वाचनांनी घाबरून जातो. त्यात भर ती म्हणजे नाविन्यप्रघातक भाकिते करणारी प्रसार माध्यमे. २०१२ मध्ये ह्या पृथ्वीचा अंत होणार व तो थोडक्यात कसा होणार हे दाखवणारा ‘२०१२ The end of the world’ अश्या नावाचा कल्पनात्मक चित्रपट प्रदर्शित केला गेला होता. त्यामध्ये युगाच्या समाप्तीअंती होणारा विध्वंस खूप भयावह स्वरुपात दाखवण्यात आला होता. असेच काहीतरी सांगणाऱ्या विशिष्ट लोकांनी ह्या अकालाविषयी बिनबुडाचे भाकितेही केली. परंतु ह्यात भयावह असे काही नाही, त्यासमयी येशू आपल्या बरोबर असणार आहे, कारण तो न्यायनिवाड्याचा दिवस असेल व आपण सर्वजण त्याच्या सानिध्यात पुनरुत्थित केले जाणार आहोत. फक्त आवश्यकता आहे ती आपल्या येशूवर असलेल्या विश्वासाची आणि प्रत्येक क्षण नितीमत्वाने व विश्वासाने जगण्याची. कारण मदर तेरेसा म्हणतात, ‘आपल्याला यशस्वी होण्यासाठी नव्हे तर देवाबरोबर आजन्म विश्वासू राहण्यासाठी पाचारीत केले गेले आहे’.
आपल्या जीवनात भरपूर अशी संकटे येतात, प्राणघातक हल्ले होतात तसेच ह्या छानछौकीच्या युगात येशुविरहित जीवन जगण्यासाठी मोह होतात परंतु आपली देवावरील असलेली नजर ढळता कामा नये. दुसऱ्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर कोणी विचारले की, ‘आता ह्या क्षणी जर अकाल येण्याची चाहूल तुम्हाला लागली तर तुम्ही काय कराल?’ तर आपले सर्वांचे उत्तर काय असेल? संत अक्वायनससारखे उत्तर असायला आम्ही आमच्या जीवनात ख्रिस्तानुरूप जीवन भरून जगायला हवे. भविष्यात काय होईल ह्याची कल्पना करून जीवन फुकट घालवण्यापेक्षा आपला वर्तमान देव-इच्छेनुरूप जगून शेवटच्या, न्यायाच्या दिवसासाठी तयार असणे केव्हाही चांगले होय. प्रभूच्या पुनरागमनात आम्ही त्याच्यासमोर नीतिमान व विश्वासू असून आपल्याला सार्वकालिक चिरंजीवित्व लाभावे म्हणून प्रार्थना करूया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमचे तारण कर.
१)विश्वव्यापी ख्रिस्तसभा तिचे सर्व पुढारी व सदस्य ह्यांना प्रभूसुवार्ता घोषवण्यासाठी लागणारी कृपाशक्ती व सामर्थ्य परमेश्वराने बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)     आजच्या समृद्ध युगात ‘पाप’ हि संकल्पनाच प्रत्येकाच्या मनातून नाहीशी होत चालली आहे. प्रत्येकाला तो सर्वकाही बरोबरच करतो असे भासते. हि अबुद्धी बदलावी व परमेश्वरचरणी त्यांनी नम्र होऊन, पापांची क्षमा मागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)     बहुतेक धार्मिकस्थळे हे राजकारणाचे व्यासपीठ बनत चालले आहे, त्यातून धार्मिक मतभेद निर्माण केले जात आहेत, अश्या समाज-विघातक विकृतींना आळा बसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     प्रभू येशु जेंव्हा नव्याने आमचे तारण करावयास आगमन करील तेंव्हा त्याच्यासमोर आम्ही सर्वजण एक नीतिमान व धार्मिक व्यक्ती असे उभे असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)     आपल्या धर्मप्रांतावर, धर्मग्रामावर, व प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा कृपापूर्ण आशिर्वाद असावा म्हणून आपण थोडावेळ शांतपणे प्रार्थना करूया.  





No comments:

Post a Comment