Reflection for the 2nd Sunday in Ordinary Time (19/01/2025) By Fr. Suhas Pereira
सामान्य काळातील दुसरा
रविवार
दिनांक – १९-०१-२०२५
पहिले वाचन: यशया ६२:१-५
दुसरे वाचन: १ करिंथ. १२:४-११
शुभवर्तमान: योहान २:१-११
प्रस्तावना
आज देऊळमाता सामान्य काळातील दुसरा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला प्रभूचे आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचं सामर्थ्य मनन-चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे. आपली हृदये त्याच्या प्रेमासाठी उघडण्यास , त्याच्या कृपेद्वारे नूतनीकरण अनुभवण्यास आणि त्याच्या शांती आणि आनंदाची साधने या जगात बनण्यास आपल्याला प्रभू येशू आज बोलावत आहे. यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराने आपल्याला प्रजेचं नूतनीकरण आणि तिची पुनर्स्थापना करण्याचं जे वचन दिलेल आहे, त्याबद्दल बोलत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिन्थिकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रात पवित्र आत्म्याच्या दानांबद्दल बोलत आहे. पौल सांगतो कि आपल्याला पवित्र आत्म्याची कृपादाने सर्वांच्या कल्याणासाठी आणि त्याचप्रमाणे एकमेकांची सेवा करण्यासाठी आणि ख्रिस्ताचे शरीर, पवित्र देऊळमातेचा उद्धार करण्यासाठी देण्यात आलेली आहेत. देवाच्या प्रेमात आपलं जीवन बदलण्याची आणि नवीन करण्याची शक्ती आहे. देवाचं हेच सामर्थ्य आणि त्याचं प्रेम अनुभवण्यासाठी प्रभू येशू आज आपल्याला बोलावत आहे.
मनन
चिंतन
प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशूने आपल्या दैवी सामर्थ्याने भाकरीचा चमत्कार करून पाच हजार लोकांना जेवण दिले, आणि ती लोकं प्रभूच्या भोजनाने तृप्त झाली, तेव्हा त्या लोकांना येशूला आपला राजा करावयाचे होते. कारण लोकांना वाटत होते, कि एखादा राजाच पाच हजाराच्या मोठ्या जमावाला इतक्या भाकरींनी तृप्त करू शकतो. आजच्या शुभवर्तमानात काना गावच्या चमत्काराबद्दल ऐकल्यानंतर आपणसुद्धा असच काही तरी म्हणू शकतो. काना गावी लग्नसमयी द्राक्षरस संपला. प्रभू येशू हा आपल्या शिष्यांसह त्या समारंभासाठी हजर होता. त्याने त्या ठिकाणी असलेले दगडाचे सहा मोठे रांजण पाण्याने भरण्याची आज्ञा दिली, आणि नंतर आपल्या दैवी सामर्थ्याने पाण्याचं रूपांतर उत्कृष्ठ अशा द्राक्षरसात केलं. अशाप्रकारे प्रभू येशू लोकांना त्या दिवशी असा एक मनुष्य वाटला, जो समाजासाठी फार उपयुक्त आहे. परंतु येशू ख्रिस्त समाजासाठी उपयोगाचा कसा आहे हे सिद्ध करणे हा आजच्या शुभवर्तमानाचा आणि घडलेल्या चमत्काराचा हेतू नाही आहे. काना गावी घडलेल्या चमत्काराचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी शुभवर्तमानकार योहान आपल्याला आमंत्रण देत आहे. काना गावी जे घडले त्याला योहान " एक चिन्ह" असे संबोधितो. या चिन्हाद्वारे शिष्यांना आणि आपणा सर्वांना एक महत्वाचा संदेश दिला गेलेला आहे.
तो संदेश काय आहे? काना गावी घडलेल्या त्या घटनेत एक नाही तर अनेक चिन्हे आहेत. त्यातील पहिलं चिन्ह आपण येशूची आई मरीया हिच्यामध्ये ओळखू शकतो. मरीया
हि एक शहाणी आणि जागृत स्त्री होती आणि तिने काना गावच्या त्या परिवाराची गरज ओळखली: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही (योहान २,३).” प्रभू येशूने मात्र मरीयेला नकार देऊन म्हटले, “बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आलेली नाही (२,४).” येशूने आपल्या आईला दिलेलं थोडसं उद्धट वाटणारं उत्तर आपल्याला बारा वर्षाचा असताना आणि मंदिरात हरवलेला असताना येशूने आपल्या आई-वडिलांना दिलेल्या उत्तराची आठवण करून देते: "मी माझ्या पित्याच्या घरात असलो पाहिजे हे तुम्हाला ठाऊक नाही का?".
बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? इथे मरीयेला लक्षात घ्यावं लागलं, कि आपल्या मुलाने काय केलं पाहीजे, हे ती ठरवू शकत नाही.
तेथे असलेल्या नोकरांना बोलावून मारिया त्यांना सांगते, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.” मारिया आपल्याला देवावर श्रद्धा ठेवण्यास शिकवते. देवासमोर आपण प्रथम शांत राहून त्याची वाणी ऐकण्यास शिकलो पाहिजेत.
परंतु काना येथील चमत्कारातील चिन्ह खरे पाहता प्रभू येशू स्वतः आहे. शुभवर्तमान आपल्याला सांगते कि येशूने द्राक्षरसाच्या चमत्कारासाठी सहा पाण्याच्या रांजणांचा उपयोग केला. प्रत्येक रांजणात जवळ-जवळ शंभर लिटर पाणी होते. याचा अर्थ असा, कि प्रभू येशूने समारंभातील उपस्थित पाहुणे तृप्त झाल्यानंतरसुद्धा जवळ-जवळ सहाशे ते सातशे लिटर द्राक्षारस बनवण्याचा चमत्कार केला. त्याद्वारे आपल्याला कळते, कि परमेश्वर आपल्याला आपल्या गरजेच्या मदत करून तो आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त देत असतो. "भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है"I
परमेश्वर आपल्याला देतो, तेव्हा तो आपल्याला संकुचित वृत्तीने नाही तर एकदम उदार अंतःकरणाने देत असतो, आपल्याला पुरेल आणि पुरून उरेल अशा प्रमाणात देत असतो. ज्या प्रमाणे भाकरीच्या चमत्कारावेळी पाच हजार लोकं तृप्त जेवून अजून किती तरी टोपल्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या, त्याच प्रमाणे येशूच्या आजच्या शुभवर्तमानात पहिल्या चमत्कारावेळी, किंव्हा चिन्हावेळी त्याच्या उदात्त आणि स्वर्गीय उदारतेच अनुभव लोकांनी घेतला. परमेश्वर आपल्याला आपण मागतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि आपल्या अपेक्षेपेक्षा विपुल प्रमाणात आपल्याला आशीर्वाद देत असतो. प्रभू येशू स्वतः सांगतो, "मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे (योहान १०,१०)".
काना गावातील चमत्काराद्वारे प्रभू येशू आपल्याला स्वर्गीय पित्याची फक्त सांत्वनकर्ता म्हणून नाही तर आपल्या आनंदात सहभागी होणार आनंदी देव अशी ओळख करून देतो. प्रोटेस्टंट धर्मपंडित कार्ल बार्थ, म्हणतो. कि, "परमेश्वर मनुष्य झाला आणि या पृथ्वीवर आला, कि जेणेकरून तो आपल्या दुःखात आणि सुखात आपल्याला बरोबर असू शकेल. कारण आपल्याला देवाची सदैव गरज आहे".
खरोखरच आपल्याला देवाची नितांत गरज आहे. काना गावातील द्राक्षारसाचा चमत्कार आपल्याला सांगतो, कि आपल्या जीवनातील सर्व परिस्थितींमध्ये परमेश्वर आपल्या जीवनात प्रवेश करतो. तो फक्त आपल्या दुःखात आपलं सांत्वन करून आपल्याला बळ देत नाही, तर आपल्या सुखातसुध्दा तो सामील होतो आणि आपला आनंद परिपूर्ण करत असतो. ज्या प्रमाणे प्रभू येशूने आजच्या शुभवर्तमानात सहा खाली रांजण पाण्याने भरण्यास सांगितले, त्याचप्रमाणे प्रभू येशूला आपली हृदये, आपलं जीवन त्याच्या शांतीने, आनंदाने आणि आशेने भरावयाची आहेत.
तर मग आपण माता मरियेकडे वळू या. प्रभू येशूला, देवाला आपल्याला कोणती दाने किंव्हा कोणते आशीर्वाद द्यावयाचे आहेत हे आपण स्वतः ठरवू शकत अहित हे सत्य पवित्र मरीयेप्रमाणे आपणसुद्धा समजण्याचा प्रयत्न करू या. पवित्र मारिया प्रभूकडे आपलं लक्ष वेधून आपल्याला सांगत आहे, "तो काय सांगतो ते ऐका आणि करा". पवित्र मारिया सांगते त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न आपण करू या, म्हणजे मग परमेश्वरसुद्धा आपल्याला आपल्या जीवनासाठी आणि तारणासाठी जे आवश्यक आहे ते सर्व बहाल करेल.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
परमेश्वर त्याच्या कृपेने
आपलं जीवन बदलू शकतो. उघड अंतःकरणांनी आणि विश्वासाने भरलेल्या हृदयाने आपण
त्याच्याकडे येऊ या.
प्रतिसाद: हे प्रभू आमचे नूतनीकरण कर.
१) शहाणपणाने आणि दयेने सर्व लोकांना तुझ्या जवळ आणण्यासाठी आणि
तुझ्या सामर्थ्याचा अनुभव देण्यासाठी आमचे परमगुरु फ्रान्सिस आणि ख्रिस्तसभेच्या सर्व सेवक नेत्यांना तुझी कृपा आणि शक्ती दे.
२) आमच्या राजकीय नेत्यांनी आणि सत्तेत असलेल्या सर्वानी सर्वांचा विकास आणि सर्वांच्या गरजा लक्षात ठेऊन सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गाने चालावे म्हणू त्यांना तुझी कृपा आणि सदबुद्धी दे.
३) आमच्या समाजातील सर्व गोर-गरीब, गरजू आणि पीडितांना तुझ्या प्रेमाचा, करुणेचा आणि दयेचा अनुभव यावा म्हणून
त्यांना तुझी कृपा दे.
४) सर्व ख्रिस्ती कुटुंबांना आणि इतर सर्व कुटुंबाना प्रेम, दया, क्षमा, सामंजस्य, विश्वास या मूल्यांद्वारे जगता यावे आणि त्यांनी तुझ्या शांतीचा प्रचारक व्हावे म्हणून तू त्यांना सहाय्य्य कर.
५) आमच्या कुटुंबातील आणि समाजातील मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना तुझ्या स्वर्गीय नंदनवनात चिरशांती दे.
No comments:
Post a Comment