Friday 1 October 2021

                                         
                                 


 Reflection for 27th Sunday in Ordinary Time (03/10/2021) By Bro. Justin Dhavade





सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार

दिनांक – ०३/१०/२०२१

पहिले वाचन:  उत्पत्ती : २:१८-२४

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र २:९-११

शुभवर्तमान: मार्क १०:२-१६

“जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नये.”



प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचणे आपल्याला देवाने जे पवित्र, पावन व मंगल केले होते ते मानवाने स्वतःच्या स्वार्थापायी, ते पवित्र बंधन त्याने पायळी तुडविले आहे. देवाला प्राधान्य न देता, सैतानाला स्वतःच्या जीवनात प्रथम स्थान दिले; आणि ह्याच कारणास्तव आपण स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करून घेतली.

     आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला असे दिसून येते की, परमेश्वराने सर्व काही चांगले ते निर्माण केले व त्यांना नाव ध्यावे ह्याकरिता मनुष्याला त्यांच्यावर परिपूर्ण अधिकार गाजवायला दिला. तसेच आदाम व ऐवेला निर्माण करून परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले, जेणे करून ते फलद्रूप होतील. दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की, येशूने मरण सोसल्यामुळे त्याला गौरव व थोरवी प्राप्त झाली. जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे, ते सर्व एकापासूनच आहेत; हे इब्रीलोकांस पाठवलेल्या पत्रात आपल्याला सांगण्यात येते. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये परमेश्वर एक अतूट बंधनाविषयी आपल्याला सूचित करत आहे. “जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नेये.”

     देवाने आपल्याला नर व नारी म्हणून निर्माण करून संपूर्ण जग आपल्या हवाली केले. आपल्याला परीपूर्ण असा आशीर्वाद दिला. जेणे करून आपण देवाच्या सानिध्यात राहू व जगू. जर आपण देवाच्या सानिध्यात राहण्यास व जगण्यास कमी पडलो असले तर परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधूनो. अनेकदा आपल्या मनामध्ये विचार येत असतील की, लग्न म्हणजे काय? लग्न हा शब्द नेमका आला तरी कुठून? लग्नानंतर आपल्याला काय मिळते? एकदा एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र होते. ते एकाच शाळेमध्ये असल्याकारणाने एकमेकांची खूप मदत करायचे. शाळेत एकत्र जाणे, एकत्र अभ्यास करणे, एकमेकांना गृहपाठ करण्यासाठी मदत करणे इतकेच नाही तर परीक्षेच्या वेळी एकमेकांकडून नक्कल करणे, अशा गोष्टींमुळे त्यांची मैत्री ही शाळेमध्ये प्रसिद्ध होती. शाळेनंतर पुढे कॉलेज ही त्यांनी एकत्रच निवडली. त्यांना एकमेकांविषयी खूप आदर आणि जिव्हाळा होता. त्यांची ही मैत्री आता हळू-हळू प्रेमामध्ये बदलत चालली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना होत्या. पण दोघेही एकमेकांना सांगायला घाबरत होते. एके दिवशी दोघांनीही वेलंकनी येथे मरियामातेच्या नेव्हेनाला जाण्याचा निर्णय केला. वेलंकनीला गेल्यावर लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे दोघेही एकमेकांपासून हरवून गेले. दोघांना एकमेकांशिवाय राहायची सवय नसल्याकारणाने दोघेही एकदम अस्वस्थ झाले. दोघांचाही जीव एकदम कासाविस झाला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुलीने जागेवर गुडघे घालून मरियामातेकडे विनंती करण्यास सुरुवात केली. इतक्यात मागून कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती मागे वळून पाहताच तिला तिचे अश्रू अनावर झाले. कारण तिच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती हा तिचा हरवलेला मित्रच होता. लागलीच त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आपल्या मनातील भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या. कालांतराने दोघांचे लग्न झाले आणि त्यांनी नवीन जीवनाला सुरवात केली.

वरील गोष्टीमध्ये त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम होते हे लक्षात येते. त्या प्रेमाद्वारेच ते भल्यामोठ्या गर्दीमध्ये हरवून सुद्धा एकत्र झाले. परंतु आज आपण समाजामध्ये पाहिले तर, विवाहित जोडपी ही स्वतःच्या घरांमध्येच हरवलेली दिसतात. एकमेकांविषयी प्रेम, आदर भावना ह्या गोष्टी ते हरवून बसलेली आहेत. आज प्रभू येशूख्रिस्त हा आपल्याला पती आणि पत्नी ह्या पवित्र नात्याविषयी बोध देत असताना म्हणत आहे की, पती-पत्नी हे नाते एक पवित्र नाते आहे. लग्न संस्काराद्वारे पती-पत्नी हे दोघे नसून एकात्म झालेली असतात. त्यामुळेच पती आणि पत्नी हे दोघेही एकमेकांसाठी एक जबाबदारी बनत असतात. आजची तिन्ही वाचणे ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यासाठी आमंत्रण करत आहेत. १) मानवाची निर्मिती, २) दुःख आणि मरण, आणि ३) दोन देह आणि एक जीव.

. मानवाची निर्मिती: आपण उत्पत्तीचे पुस्तकांमध्ये वाचतो की, देवाने पहिल्यांदा जगाची निर्मिती केली आणि सर्वात शेवटी मानवाला उत्पन्न केले. मानवाला इतर प्राणीमात्रांवर अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर इतर जीवांची काळजी घेण्यासाठी उत्पन्न केले, याचा अर्थ माणूस हा सर्व प्राणीमात्रांचा रक्षणकर्ता आहे. माणसाच्या निर्मितीनंतर देवाने माणसाच्या फासळीपासून स्त्रीची निर्मिती केली; जेणेकरून ते दोघे एक म्हणून सुखी समाधानी जीवन जगतील.

. दुःख आणि मरण: दुःख आणि मरण, हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे पैलू आहेत. ह्या  विश्वातील प्रत्येक जीव हा एक ना एक दिवस मरणाला सामोरे जात असतो. हेच जीवनाचे सत्य आहे. प्रभू येशूख्रिस्त हा मरण पावला. परंतु आपल्या मरणाने त्याने मरणावर विजय मिळवला. कारण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. आपणही आपल्या मरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये उठले जाणार आहोत. त्यामुळे मरणाला न भिता आपण आनंदाने त्याचा स्वीकार करायला हवा.

. दोन देह एक जीव: लग्न संस्कार हे मानवासाठी एक मोठी जबाबदारी असते. लग्न संस्काराद्वारे पती आणि पत्नी जन्मभरासाठी एक होत असतात. जर एखाद्या वेळी पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव गैरसमज किंवा भांडण झाले असेल, तर त्याचा निर्णय किंवा निकाल पर्याय हा घटस्फोट नसतो. कुठलीही समस्या ही पती-पत्नीने एकजुटीने समजून घेतल्यास सहजपणे पार पाडता येते. यामुळे कुटुंबामध्ये प्रार्थना ही नेहमी महत्त्वाची असते.

आज आपण देवाची मुले म्हणून नेहमी त्याच्या नियमाप्रमाणे चालावे व त्यासाठी देवाची भरपूर अशी कृपा शक्ती आपणा सर्वांना नेहमी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभो, आम्हा सर्वाना सदैव तुझ्या कृपेच्या छायेत राहू दे.

१) परमेश्वराने पवित्र, मंगल नर-नारी बनवली. पण आम्ही आमच्या स्वार्थासाठी, आमच्या स्वतःच्या ‘मी’ पणासाठी हे पवित्र बंधन जे देवाने निर्माण केलेले आहे ते तोडत आहोत. जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने स्वतःच्या स्वार्थापाही तोडू नये म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२) येशू ख्रिस्ताने आम्हा सर्वाना प्रकाशाची लेकरे बनवली आहेत. पण आम्ही खोट्या सुखाच्या मोहाला बळी पडून परमेश्वरापासून दुरावले आहोत. त्यामुळे कुटुंबात शांतता नाही. कुटुंबामध्ये संशय व अहंकार भरलेला आहे. तर या पवित्र बलीदानाद्वारे देवाचा व आम्हा सर्वाचा पुन्हा एकदा नव्याने समेत व्हावा म्हणून प्रार्थान करूया.

३) आजच्या युगामध्ये लग्न हा एक प्रकारचा व्यवहार व खेळ झाला आहे. लोक आपसात करार करून स्वतःच्या स्वार्थापही एकत्र राहून पवित्र संस्काराला व देव निर्मितीला जुमानत नाही. त्यामुळे कुटुंबाना व चरण घरपण राहिले नाही. परमेश्वराने त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हा सर्वांवर करावा जेणे करून आम्ही ख्रिस्ती आहोत याची जाणीव  आम्हला व्हावी म्हणून परमेश्वराकडे याचन करूया.

४) प्रत्येक कुटुंबाचे ख्रिस्तामध्ये नुतनीकरण व्हावे. लेकरांना, आई-वडिलांच्या कष्टाची  जाणीव व्हावी. व त्यांनी आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांनी त्यांचा आधार बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५) आम्ही सर्वजण देवाची मुले आहोत; म्हणून आमच्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदाभेद न होता, प्रेमाने, प्रीतीने प्रार्थानामय जीवन, पवित्र शास्त्राच्या वचनाद्वारे जीवनाचा कायापालट व्हावा, समाजामधील प्रत्येक कुटुंबाने देंवाचा गौरव करावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment