Wednesday 30 April 2014

Reflections for homily By:Leon D'Britto.









पुनरूत्थानकाळातील तिसरा रविवार


त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले


दिनांक ०४/०५/२०१४.
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-२८.
दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
शुभर्वतमान: लूक २४:१३-३५.

प्रस्तावना:

            आज आपण पुनरुत्थानकाळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की ज्या येशूने देवाच्या सामार्थ्याद्वारे चमत्कार घडवले त्यालाच भीती व मत्सरामुळे वधस्तंभावर खिळले गेले. संत पेत्रूस आपल्या भाषणाद्वारे स्पष्ट करतो की ह्याच येशूला देवाने मरणातून उठविले आहे व आपण सर्व ह्याचे साक्षीदार आहोत. तर दुस-या वाचनात पेत्र म्हणतो, ‘सोने देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने आपण व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झालो आहोत.
शुभवर्तमानात अम्माउसच्या वाटेवर पुनरुत्थित येशूचे शिष्यांना भेटण्याचा प्रसंग आपण पाहतो. हा प्रसंग येशू मरणावर विजयी झाल्याची मोहोर लावतो. येशूच्या मरणानंतर विश्वासात डगमगलेले व निराश झालेले दोन शिष्य पुनरुत्थित येशूला ओळखण्यात असमर्थ ठरतात. आपल्याही जीवनात निराशा येते, अपेक्षाभंग होतो परंतु अशावेळी विश्वासात कमी न पडता आपण प्रभूवरील विश्वासात दृढ राहावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करुया.  
सम्यक विवरण:-
पहिले वाचनः प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-२८.
येशू हाच मसीहा (ख्रिस्त) आहे:
पेत्राने आपल्या भाषणाद्वारे स्पष्ट केले की ज्याला लोकांनी नाकारले होते तोच येशू मसीहा आहे. पेत्र नि:संदिग्धपणे सांगतो की येशूचे जीवन व त्याने केलेली कृत्ये, ह्यावरून तो देवाला मान्य असलेला व देवाला संतोष देणारा होता. परंतु त्याला आरोपी ठरवून वधस्तंभावर खिळून मारले. असे असूनही देवाने त्याला मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठविले. आता, हा येशू जिवंत आहे, असे पेत्र जाहीर करतो.

दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
            ज्या विखुरलेल्या ख्रिस्ती यहूदी लोकांचा येशूवरील विश्वासामुळे छळ होत होता त्यांना उद्देशून व उत्तेजन आणि धीर देण्यासाठी पेत्राने हे पत्र लिहिले होते. ह्या उता-यात पेत्र म्हणतो, ‘सोने देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झाला आहात’(ओवी.१८-१९). ख्रिस्त कोण आहे हे लक्ष्यात घ्या. ख्रिस्ताद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला आहात तर तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.

शुभर्वतमान: लूक २४: १३-३५.
अ. उता-याची बांधणी:
१. शिष्य येरुशलेममधून परत जात होते (१३-१४).
२. येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर प्रवास करतो (१५).
३. देवाने त्यांना येशूला ओळखण्यापासून रोखले (१६).
४. मध्यांतर व संवाद (१७-३०).
३. देवाने त्यांना येशूला ओळखण्यास मदत केली (३१).
२. येशू त्यांच्यातून निघून जातो (३१ब).
१. शिष्य येरुशलेममध्ये परत आले (३२-३५).

            ह्या उता-याच्या मध्यांतरमध्ये (ओवी १७-३०) झालेल्या घटनांची पुनरावृत्ती, संवाद आणि येशूचे दर्शन ह्यांचा अनोखा मेळ साधला गेला आहे. येशू, शिष्यांकडून झालेल्या घटनांची पुनरावृत्ती त्यांच्या शब्दांमध्ये करून घेतो(१७-२४). ओवी २५-३० मध्ये, येशू व शिष्य ह्यामधील संवाद नोंदलेला आहे. ओवी ३१ येशूचे दर्शन तर ओवी ३२-३५ शिष्याचे येरुशलेमला परत जाणे दर्शवतात.
अम्माउसच्या वाटेवरील वृतांत हा आपल्याला येशूच्या दु:खसहनापूर्वी गालीलातून येरुशलेमकडील प्रवासाची आठवण करून देतो(लूक ९:५१-५६). गालीलातून येरुशलेमकडील प्रवासअम्माउसच्या वाटेवरील वृतांत स्पष्ट करतात की दोन्ही वेळेला, शिष्य येशूला संपूर्णपणे समजू शकले नाहीत म्हणूनच ते ख-या येशूला अनुभवू शकले नाहीत. त्यांचे प्रत्यक्षात येशूबरोबर राहणे येशूला ओळखण्यास पुरेसे नव्हते. त्यासाठी त्यांना येशूचा अनुभव घेणे जरुरीचे होते(ओवी.२९).  

ब : उता-याचे स्पष्टीकरण
नाराज झालेले तसेच मनोबल खचलेले शिष्य अम्माउसच्या वाटेवर होते व त्यावेळेला ते पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटण्याच्या अपेक्षित नव्हते. आजपर्यंतच्या शिकवणीवरून मसिहा दु:ख सोसून गौरवीला जावे असे शक्य नव्हते. त्यांचे गोंधळलेले मन शांत होण्यासाठी ख्रिस्त जुन्याकारारात त्याच्याविषयी- म्हणजेच त्याचे दु:खसहन, मरण व पुनरुत्थान-  जे शिकवलेले होते त्याचा अर्थ सांगतो. पवित्र शास्त्राच्या उलघडयाने त्यांना नवा प्रकाश मिळतो व ते येशूला भोजन समयी ओळखतात.
अश्याच आध्यात्मिक निष्काळजीपणामुळे आपण ख्रिस्ताच्या उपस्थितीला ओळखू शक नाही. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहण्यासाठी फक्त शारिरीक डोळे पुरेसे नसून त्यासाठी विश्वासातला स्पष्टपणा, आध्यात्मिक जबाबदारी आणि दैवी रोषणाईची गरज आहे.

बोधकथा:
एकदा एक फुटबॉल प्रशिक्षकाला, आपल्या कौटुंबिक कारणास्तव, आपल्या पदाचा राजीनामा दयावा लागला. त्यांचे हे अकस्मात जाणे तरुण प्रशिक्षण घेणा-या युवकांना धक्कादायक होते. कारण ते एक चांगले प्रशिक्षक गमावनार होते. त्याच्या दृष्टीकोनातून ते फार चांगले प्रशिक्षक होते, जे त्यांना समजायचे व त्यांच्या चुकांना प्रेमाने मार्गदर्शन करून दुरुस्त करायचे. त्यांना वाटले की प्रशिक्षक आमच्या वागणुकीला वैतागून आमच्यापासून दूर जात आहे. प्रशिक्षकाने जेव्हा त्यांचा निरोप घेतला तेव्हा ते त्यांना म्हणाले, ‘तुमच्यात अंत:सामर्थ्य ठसून ठसून भरलेले आहे. तुम्हीं जर हा खेळ १००% देऊन खेळलात तर नक्कीच तुम्हांला यश प्राप्त होईल’.
परंतु असे काहीही झाले नाही. पुढच्या हंगामात आपल्या बेजबाबदार खेळामुळे ते कुठलाही सामना किंवा कुठेलीही स्पर्धा जिंकले नाहीत. त्या हंगामातल्या शेवटच्या स्पर्धेत आपला पहिला सामना खेळताना त्यांची नजर आपल्या लाडक्या प्रशिक्षकावर गेली. त्यांनी सांगितलेले प्रत्येक शब्द त्यांना आठवले. प्रशिक्षकाने दाखवलेला विश्वास त्यांनी खेळात उतरवला. आणि समानाच नव्हे तर ती स्पर्धा सुद्धा जिंकली. देवाने दिलेला विश्वास आपल्या जीवनात उतरवणे म्हणजेच देवाला ओळखणे असे होय.

मनन चिंतन:
१. आध्यात्मिक आंधळेपणा:
लूक २४:१९-२० मध्ये आपण पाहतो की ते दोन शिष्य येशूच्या जीवन व मरणाविषयी अगदी सखोलपणे माहिती देत होते व त्यांचे शब्द जणू (creed) प्रेषितांचा विश्वाससंगीकार आहे  असे भासत होते. येशूच्या जीवनात घडलेल्या घटनांची पुरेपूर माहिती त्यांना होती तरीही त्यांचा त्यावर पूर्ण विश्वास नव्हता. अम्माउसच्या वाटेवर चालत असताना येशूने त्यांना पवित्र शास्त्र समजावून सांगितले. परंतु, येशू मरणातून उठला आहे, ह्या सत्यावर विश्वास ठेवण्यास ते पुरेसे ठरले नाही. येथे येशूला ओळखण्यासाठी येशूविषयी फक्त माहिती असणे पुरेसे नव्हते. ह्या प्रसंगात दोन महत्वाच्या बाबीमुळे (आतिथ्यशीलता व प्रभूभोजन) त्यांचे डोळे उघडले व ते येशूला ओळखू शकले.
अ) आतिथ्यशीलता: अम्माउसच्या वाटेवर त्यांना भेटलेला हा गृहस्थ व्यक्ती अनोळखी होता. त्याच्याविषयी त्यांना काहीही माहिती नव्हती. तरी त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर रात्री घरात विश्रांती घेण्यास आमंत्रण दिले. समजा शिष्यांनी येशूला त्यांच्या घरात विश्रांती घेण्यास आमंत्रित केले नसते तर त्यांच्यापुढे जे काही घडले ते कदाचित घडले नसते. ह्या प्रसंगातून लूक आपल्याला आतिथ्यशीलतेचे महत्व समजावून देतो.
ब) प्रभूभोजन: दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रभूभोजन. शेवटच्या भोजनाच्या वेळेला प्रभूभोजानाद्वारे येशूचे खरेपण शिष्यांसमोर आले. लूक २२:१६,१८ मध्ये येशू म्हणाला होता; “देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही; देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.जेवताना भाकर मोडण्याच्या प्रथेमुळे शिष्यांचे डोळे उघडले व ते पुनरुत्थित ख्रिस्ताला ओळखू शकले. ह्या प्रसंगात येशू शिष्यांसोबत भाकरी मोडत भोजन घेत आहे म्हणजेच देवाच्या राज्याला सुरवात झालेल्याची आठवण करून देत आहे.
येशूच्या शिष्यांबरोबर भाकरीच्या मोडण्यात झालेली भेट फक्त त्या दोन शिष्यांसाठी नव्हती. होय, त्या प्रसंगामुळे त्यांच्या येशूवरील विश्वासात भर पडली होती व त्यांचा विश्वास दृढ झाला होता परंतु त्यामुळे त्यांना त्यांचा विश्वास दुस-यांना देण्यास व इतरांपर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहान मिळाले. ह्याचाच परिणाम म्हणून लागलीच ते येशू पुनरुत्थित झाल्याची शुभवार्ता पसरविण्यासाठी येरुशलेमला परतले.         
अम्माउसच्या वाटेवर येशूच्या शिष्यांना येशूची भेट ही घटना एका साध्या प्रसंगापेक्षा अधिक महत्वाची आहे. ही घटना आपल्याला येशूचे जीवन, मरण पुनरुत्थानाविषयी माहिती देते. ज्याप्रकारे भाकर मोडल्याने त्यांचे डोळे उघडले तसेच मिस्साबळीमध्ये आपल्याला येशूचे पूर्ण अस्तित्व जाणवते. परंतु मिस्साबळी अथवा आपली उपासना ही येशूला त्या पवित्र भाकारीद्वारे स्वीकारण्याने पूर्ण होत नाही तर जेव्हा आपण मिस्साबळीदानात ख्रिस्ताला सेवन करतो तेव्हा आपण आपल्या प्रभुशी व शेजा-यांशी एकरूप झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तसेच ज्याप्रकारे शिष्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख पडताच ते ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी येरुशमेला परतले तसेच प्रत्येक उपासनेत अथवा मिस्साबळीदानात आपण अनुभवलेल्या ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास आपण प्रयत्न केले पाहिजेत.
२)  अम्माउसच्या वाटेवरचा हा प्रसंग वाचताच आपल्या नजरेस येते की  दोन्ही शिष्यांचा ख्रिस्तावरील विश्वास  डगमगला होता. येशू त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकला नाही म्हणून निराश होवून ते आपल्या इतर बांधवाना सोडून परत आपल्या गावी जात होते. परंतु येथे समस्या येशूविषयी नाही तर त्या दोन शिष्यांनी येशूकडून केलेल्या अपेक्षांची आहे. ब-याच वेळी आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही अथवा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत अश्या वेळी हार किंवा अपयश मानून मागे फिरण्याएवजी प्रथम आपल्या अपेक्षा, प्रार्थना विनंत्या पडताळून त्या योग्य, निस्वार्थी व गरजेच्या आहेत का हे पाहून त्यांना बदलण्यात आपले हित आहे.  
 
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमचा विश्वास वाढव
१) आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व धार्मिक अधिका-यांनी त्यांच्या जीवनाद्वारे  व कार्याद्वारे प्रभूचा अनुभव प्रत्येक भाविकांपर्यंत पोहोचवावा व सर्वांना जिवंत प्रभूचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
२) जे निराश होऊन देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन यावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
३) आपल्या देशात सुरु असलेल्या निवडणुका शांततेत व पारदर्शकपणे पार पडून आपल्या देशाला एक दृढ व सक्षम सरकार लाभावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
४) आपल्या सर्व मिशनरी बंधू-भगिनींना त्यांचे कार्य जोमाने सुरू ठेऊन प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोप-यात पसरविण्यास सामर्थ व कृपा लाभावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
५) जे लोक विश्वासामध्ये अडखळत आहेत त्यांचा विश्वास दृढ व्हावा म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
६) थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तीत गरजा प्रभूचरणी ठेऊ या.

No comments:

Post a Comment