Thursday 12 May 2016

Reflection for the homily of the Feast of Pentecost (15/05/2016) By: Dominic Brahmne.












पवित्र आत्म्याचा सण



दिनांक: १५/०५/२०१६.
पहिले वचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११.
दुसरे वाचन: १करिंथकरांस पत्र १२:२-७, १२-१३.
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३. 

“ते विविध भाषा बोलू लागले”




प्रस्तावना:

     आज आपण पवित्र आत्म्याचा सण साजरा करत आहोत. ह्याच सणाला ‘पेंन्टेकॉस्ट’ असेही म्हणतात. पेंन्टेकॉस्ट’ म्हणजे ‘पन्नासावा दिवस’. ह्या सणाला देऊळमातेचा किंवा ख्रिस्तसभेचा वाढदिवस म्हणुनही संबोधले जाते. कारण ह्या दिवशी भयभीत होऊन खोलीत दडून बसलेल्या शिष्यांना प्रभू येशूने दर्शन देऊन त्यांच्यावर पवित्र आत्म्याची फुंकर घातली व त्याच पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्यांनी निर्भीडपणे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची शुभवार्ता जगजाहीर केली. त्यांना नवजीवन प्राप्त झाले.
     आजच्या पहिल्या दोन वाचनात पवित्र आत्म्याच्या वर्षावाचे कथन व त्यातून त्यांना प्राप्त झालेल्या दानांचे वर्णन करण्यात आले आहे. तर शुभवर्तमानात ‘तुम्हांला शांती असो’ ह्या प्रभूच्या दर्शनात्मक अभिवादनाने शिष्यांना दिलासा प्राप्त होऊन त्यांच्यात नवचैतन्य संचारले.
पवित्र आत्म्याची दाने ख्रिस्ताठायी लीन असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होत असतात. त्या दानांच्या प्रेरणेने आपल्या समाजात आपण प्रेमाचे, बंधुत्वाचे व ऐक्याचे नाते निर्माण करावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११.
ज्यू पंथीयांसाठी वल्हांडणाचा, कापणीचा, आणि पवित्र कोशाचा सण हे तीन सण अतिशय महत्वाचे होते; व ह्या सणांसाठी उपस्थित असणे त्यांना अनिवार्य होते.
‘पेंन्टेकॉस्ट’ म्हणजे ‘पन्नासावा दिवस’ ह्यास ‘आठवड्याचा दिवस’ म्हणून सुद्धा ओळखले जात असे. वल्हांडणाचा व पवित्र आठवड्याचा सण एकमेकाला लागुनच येत असे, त्यामुळे वल्हांडणाच्या सणासाठी उपस्थित असलेले लोक, कापणीच्या सणासाठी सुद्धा हजर असत. हा सण महत्वाचा मानला जात असे कारण: १) हा एक ऐतिहासिक क्षण होता, ह्याच दिवशी सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञांची आठवण केली जात असे. २) ह्या सणाला कृषी उत्पादनाचे सुद्धा महत्व लाभले होते. वल्हांडणाच्या सणानिमित्ताने बार्ली नावाचे धान्य देवाला अर्पण केले जात असे आणि पेंन्टेकॉस्ट सणाच्या दिवशी न गोळा केलेल्या धान्याबद्दल, धन्यवाद देण्यासाठी दोन भाकरी अर्पिल्या जात असे.  ह्या दिवशी कोणतेही मेहनतीचे काम केले जात नसे (गणना २८:२६; लेवी २३:२१). येरुशलेमच्या रस्त्यावर अधिक गर्दी, जमाव असण्याचे हेच एक कारण होते.
     येरुशलेमातील सगळा जमाव येथे एकत्र जमत असे ह्याच कारणास्तव हा सण प्रेषितांवर येशूचा आत्मा उतरण्यासाठी योग्य असावा. ख्रिस्ती धर्म हा वैयक्तिक धर्म नसून सर्वमान्य जागतिक असा धर्म आहे आणि ह्याचीच अनुभूती आपल्याला ‘ते विविध भाषांत बोलू लागले’ (प्रे.कृत्ये २:४) ह्या वाक्यातून समजते. कारण ऐकणाऱ्यांनी त्यांच्या भाषांत  ते जे बोलत होते ते ऐकले. ह्यांतून जागतिक ऐक्यता दिसुन येते. परमेश्वराने सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्या फक्त यहुद्यांसाठी होत्या. परंतु ख्रिस्ताने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे दिलेली नवीन आज्ञा हि सर्वांसाठी एकतेचे प्रतिक म्हणून दिली होती. पॅलेस्तीन शहरातून मोठ्या प्रमाणात आलेल्या ज्यू पंथीयांना ख्रिस्ताचा हा संदेश पेत्राच्या मुखातून देण्यासाठी ही एक उत्तम संधी होती.

दुसरे वाचन: १ करिंथ १२:२-७,१२-१३.

     पहिल्या ख्रिस्ती समूहाच्या वागणुकीतून पवित्र आत्म्याची दाने स्पष्ट दिसून येत होती; कारण त्यांनी ती दाने आत्मसात केली होती. हाच एक पुरावा विधर्मी लोकांना पुरेसा होता कि, ख्रिस्ती धर्म हा जिवंत, खऱ्या देवाचा धर्म आहे, ज्याचा ह्या सृष्टीवर अधिकार आहे.
     संत पौल ह्या परीच्छेदात विशेषरित्या आणि अगदी ठामपणे सांगू इच्छितो की, हि पवित्र आत्म्याची दाने स्वत:च्या किंवा वैयक्तिक नावलौकिकांसाठी नव्हे तर त्याद्वारे प्रत्येकाने इतरांना ख्रिस्तामध्ये एकत्र आणून चर्चबांधणी (ख्रिस्ती समूह एकवटावा) करावी हाच एक उद्देश आहे असे तो सांगतो. पवित्र आत्म्याच्या दानांचा महत्वाचा घटक म्हणजे ‘आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासात पूर्णपणे ठाम होतो, दृढ होतो. आणि ज्याने ख्रिस्तात आपला विश्वास प्रकट केला तो पवित्र आत्म्यात एकवटला असे आपण म्हणू शकतो’. विश्वास हि देवाने दिलेली एक महत्वाची देणगी होय.
     पहिल्या ख्रिस्तीसमूहामध्ये असलेली दाने हि एकाच पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना प्राप्त झाली आहे; त्यामध्ये कोणतेही दान उच्च किंवा नीच असे मानु नये हे निक्षूण सांगण्यासाठी संत पौल म्हणतो मी, ‘दाने वेगवेगळी आहेत परंतु पवित्र आत्मा एकच आहे आणि हे स्पष्टपणे निर्देशित करण्यासाठी तो शरीर व त्याच्या अवयवाची उपमा येथे वापरतो. कारण चर्च हे ख्रिस्त मस्तीश्क असे शरीर होय. येशूने स्वर्गरोहणावेळी स्वर्गातून पवित्र आत्मा पाठविला तो अशासाठी कि, नवीन स्थापन केलेल्या ख्रिस्ती समूहाला मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी व आपण ख्रिस्तशरीरात एकरूप, एकदेह असे बनावेत.

शुभवर्तमान: योहान २०: १९-२३.

येशूच्या क्रूसावरील भयावह मरणानंतर भयभीत झालेले प्रेषित शेवटले भोजन घेतलेल्या ठिकाणी जमत असत. निर्दयी यहुद्यांनी येशूचा केलेला छळ व क्रूसावरील यातनामय मरण हे त्यांच्या भयाचे कारण होते. कारण ते भ्याले होते. त्यांना वाटले कि, आपलेही मरण जवळ आले आहे; ते निर्दयी यहुदी त्यांचा नक्कीच पाठलाग करत असतील. असा विचार त्यांना सतत भेडसावत असता, येशू त्या माडीवरील खोलीत शिष्यांना दर्शन देऊन “तुम्हांस शांती असो” असे म्हणतो. ह्याचा अर्थ खालील प्रकारे घेता येईल. १) तुम्ही भयातून मुक्त असा २) देवाकडून तुंम्हाला योग्य त्या गोष्टी प्राप्त होवो. मग येशूने त्यांना त्याचे साक्षीदार होण्यासाठी आज्ञा दिली. जसे देवाने मला पाठविले तसे मी देखील तुम्हांला पाठवतो.
अ) ख्रिस्ताला ख्रिस्तसभेची (देऊळमातेची) गरज आहे.
हाच मुद्दा पौल इफी. पत्र १:२३, १करिंथ १२:१२. ह्या त्याच्या पत्रात ‘आपण ख्रिस्तात एकदेह आहोत’ अशा शब्दात मांडतो. येशू पित्याचा संदेश घेऊन ह्या भूतलावर अवतरला परंतु तो आता त्याच पित्याकडे निर्गमन करत आहे. ख्रिस्तसभेने हा संदेश इतरांपर्यंत पोहचविल्या शिवाय प्रत्येकाला त्या संदेशाची महती कळणार नाही. ह्या संदेशाद्वारे येशू ख्रिस्तसभेला त्याची मुखवाणी बनण्यास पाचारीत आहे. म्हणून येशू ख्रिस्तसभेवर अवलंबून आहे असे थोडक्यात म्हणता येईल.
आ) ख्रिस्त सभेचा येशू हा केंद्रबिंदू आहे.
एखाद्या विशेष कार्यावर पाठविल्या गेलेल्या मनुष्यास पाठविणारा, संदेश, मार्गदर्शनकर्ता व अधिकार ह्या सर्वांची नितांत गरज असते हे सर्व ख्रिस्तसभेला देऊळमाते कडून प्राप्त होते म्हणून ख्रिस्त हा ख्रिस्तसभेचा केंद्रबिंदू आहे.
इ) ख्रिस्ताने देवपित्याची आज्ञा पाळली.
तो देवपित्याशी पूर्णतः आज्ञाधारक राहिला त्यायोगे त्याने पित्याचा, तारणाचा संदेश त्याच्या कृतीद्वारे सर्वश्रुत केला हीच अपेक्षा येशू ख्रिस्त त्याचे शरीर असलेल्या ख्रिस्तसभेकडून बाळगतो. ती ख्रिस्तसभा त्याने दिलेल्या निरोपाचे, संदेशाचे वाहक व साधन आहे. ख्रिस्तसभेने स्वत:चा नव्हे तर ख्रिस्ताचा संदेश सर्वश्रुत करणे यथायोग्य ठरेल. अर्थात तिने (ख्रिस्तसभेने) ख्रिस्ताच्या मताशी एकनिष्ठ असावे.
येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर पवित्र आत्म्याची फुंकर घातली. योहानाच्या ह्या लिखाणाप्रमाणे (यह्जक्वेल ३७:९; उत्पत्ती २:७) ह्याची ती पाश्वर्भूमी असावी. उत्पत्ती २:७ मध्ये आपण वाचतो कि, देवाने मानवाची मातीपासून निर्मिती करून त्याच्या नाकपुड्यांत नवजीवनाची फुंकर घातली तसेच (यह्जक्वेल ३७: ९) मध्ये वाचतो कि, ‘विखुरलेल्या अजिवित हाडांना परमेश्वराने जीवित केले. म्हणजेच त्यांस जीवन प्राप्त झाले. अगदी त्याचप्रकारे पवित्र आत्म्याची फुंकर घालून येशू त्याच्या शिष्यांना नवजीवन देऊन त्यांना धाडस देतो आणि त्यांना त्यांच्या कार्यास प्रबळ बनवतो. तो त्यांना इतरांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार देतो आणि हाच अधिकार शिष्यांद्वारे ख्रिस्तसभेस प्राप्त झाला आहे. ख्रिस्तसभा त्यामुळे दैवी दयेचे व करुणेचे साधन बनते.

मनन चिंतन :

रविवारचा दिवस होता दिपक झोपला होता. त्याची आई त्याच्या खोलीत जाते आणि धक्के देऊन उठविते. ‘दिपक उठ मिस्साला जाण्याची वेळ झाली आहे’. ‘नाही, मला जायचे नाही’, पांघरूणातून आवाज येतो. ‘आई मी तुला चर्चला न जाण्याचे दोन कारणे देतो. एक म्हणजे, मला ते आवडत नाही आणि दुसरे, त्यांना मी आवडत नाही’. ‘मीही तुला चर्चला जाण्यासाठी दोन कारणे देऊ शकते, एक, तू आता चाळीस वर्षाचा आहे आणि दुसरे म्हणजे, तू त्या चर्चचा पास्टर आहेस’.
     भयभीत झालेले शिष्य हे त्या दिपकप्रमाणेच येशूचे साक्षीदार होण्यास थरारले होते. येशूच्या क्रूर मरणानंतर त्यांचे येशूचे साक्षीदार होण्याचे स्वप्न छिन्नविछिन्न झाले होते. त्यांनी स्वत:ला माडीवरच्या खोलीत दडून ठेवले होते. येशूने दिलेला संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी रोमन अधिकाऱ्यांच्या व ज्यू पंथीयांच्या भयावह धजावत नव्हते.
     त्यांच्या ह्या भयाला दूर करण्यासाठी व ईश्वराची सुवार्ता पसरविण्याचे कार्य अखंडित चालू ठेवण्यासाठी येशू आपल्या शिष्यांना दर्शन देतो आणि त्यांच्यावर पवित्र आत्माची फुंकर घालतो आणि त्याचे साक्षीदार बनण्यास त्यांना उत्तेजित करतो. असेच उदाहरण आपल्याला जुन्या करारात उत्पत्तीच्या पुस्तकात वाचायला मिळते. परमेश्वराने मनुष्यास मातीतून निर्माण केले आणि त्याच्या नाकपुड्यांत श्वास फुंकला; तेंव्हा त्यास जीवन प्राप्त झाले. अगदी तसेच आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचे येण्याने  शिष्यांना नवजीवन प्राप्त झाले. दुसरे म्हणजे यहज्वकेल पुस्तकात परमेश्वराने निर्जीव, विखुरलेल्या हाडांमध्ये जीव भरला व त्या हाडांस जीवन प्राप्त झाले. म्हणून आजचा हा सण देऊळ मातेचा वाढदिवस म्हणूनही साजरा केला जातो.
     आजचा हा सण आपल्याला उत्पत्ती ११ मधील बाबेलच्या बुरुजाविषयी आठवण करुन देतो.
१) बाबेलचा हा बुरुज लोकांनी स्वबळावर विसंबून बांधण्याचा ठरवला होता. त्यांत त्याचा स्वार्थीपणा व अहंमपणा होता. परंतू पेंटेकॉस्ट (पवित्र आत्म्याचा) सण हा देवाचा मानवाशी घडवून आणण्यासाठी केलेला समेट होय. हा देवाने मानव व देव ह्यांच्यात बांधलेला पूल होय. हि एक दैवी कृती पवित्र आत्म्याच्या माध्यमातून घडवून आणली गेली. घाबरून गेलेल्या शिष्यांना पवित्र आत्म्याद्वारे ग्रीक तत्त्ववेत्त्यांसमोर तसेच रोमन अधिकाऱ्यांसमोर येशूची शुभवार्ता घोषवण्याचे धाडस मिळाले, ते त्यांच्या स्वबळावर नव्हे तर देवाच्या कृपेने व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. बऱ्याचदा देवाने त्याच्या प्रत्येक विश्वासू व्यक्तीला दिलेले कार्य हे अवघड व कठीण वाटते परंतु पवित्र आत्म्याने प्रेरणेने व दैवी दयेने असफल असे काहीच नाही. संत पौल म्हणतात, ‘देवामध्ये मला सर्वकाही शक्य आहे’.
२) बाबेलचा बुरुज हा गैरसमजाचे कारण बनले, तर पेंटेकॉस्ट सणाद्वारे सर्व भाषांतील गैरसमज दूर होऊन त्यांमध्ये साम्य निर्माण झाले. बाबेलचा बुरुज बांधण्यासाठी एका भाषेचे, एका पंथांचे लोक एकत्र आले. परंतु त्यांच्या स्वार्थी हेतूमुळे देवाने त्यांच्यात फुट पाडली. नंतर त्यांना एकमेकांची भाषा समजेनाशी झाली. त्याविरुद्ध पेंटेकॉस्ट सणाच्या दिवशी विविध भाषा बोलणारे लोक एकत्र आले आणि त्यांच्या देवावरच्या नितांत प्रेमामुळे पवित्र आत्म्याची कृपा त्यांच्यावर झाली व त्यांच्या भाषा एकमेकांना समजू लागल्या; त्यांना विविध भाषा बोलण्याचे वरदान लाभले. त्यांच्यात एकजूट निर्माण झाली. त्यांना ऐकणाऱ्यांनाही ते काय बोलतात, ते त्यांच्या स्वत:च्या भाषेत समजले (प्रे.कृत्ये २:७-८). पेंटेकॉस्ट सणाच्या दिवशी घडलेला चमत्कार हा देवाचा व पवित्र आत्म्याचा अविष्कार होय.
आपल्याला कदाचित प्रश्न उद्भवेल कि, अशी कोणती भाषा आहे जी सर्वांना समजू शकते? होय अशी भाषा आहे. आणि ती म्हणजे ‘प्रेमाची भाषा’. संत अगुस्तीन म्हणतात, ‘Love and do whatever you want’. अगोदर प्रेम करा तदनंतर सर्वकाही करण्यास तुम्हांस स्वातंत्र्य प्राप्त होईल.
३) पेंटेकॉस्ट आणि बाबेलचा बुरुज ह्यांचा झालेला शेवटही अतिशय निराळा आहे. त्यात वेगळेपणा आढळतो. बाबेलच्या बुरुजाचा अंत हा वादविवाद, गैरसमज प्रांतातील दुरावा ह्यांनी झाला, तर पेंटेकॉस्ट सण हा एकजूटतेचे, एकरूपतेचे प्रतिक बनले.
     फुल्टन शीन म्हणतात, ‘God’s chosen people behave like God’s frozen people’. ‘देवाचे निवडलेले लोक हे देवाचे गोठलेले (निकामी) लोक होत चाललेले आहेत. गोठलेले: आपली एकमेकांबद्दलची दुरावलेली वृत्ती, स्वार्थीपणा प्रार्थनेस विसरलेले, देवापासून दूर गेलेले असे आहेत. आपण देवाच्या घरात वास करण्यास आनंदी नाही. आपण कोणत्याही धार्मिक गोष्टीची सुरवात करण्याअगोदरच शेवट करण्यासाठी विचार करतो’ म्हणून आज जसा प्रभू येशूने प्रेषितांवर पवित्र आत्म्याची फुंकर घालून त्यांना नवजीवन दिले, धाडसी बनवले, उत्तेजित केले; तसे आपल्या बाबतीतही व्हावे म्हणून ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आम्हांस तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान दे.
१. विश्वव्यापी खिस्तसभेची धुरा वाहणारे परमगुरु व सर्व अधिकारी ह्यांना ख्रिस्तसभेने प्रभूची शुभवार्ता घोषावण्याची जी जबाबदारी सोपविली आहे, ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या ख्रिस्ती समूहात आपण पवित्र आत्म्याची वरदाने प्रीती, ऐक्य, सहानुभूती ह्यांना अधिकाधिक प्राधान्य द्यावे व त्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक दु:खी आहेत, ज्यांना भविष्याची चिंता भेडसावत आहे, ज्यांचा आत्मविश्वास ढासळत आहे, त्यांचे पवित्र आत्म्याने सांत्वन करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सुका दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. लोकांचे जीवन पाण्याविना असह्य होत आहे. त्यांची हि दुर्बलता जाणून केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. येथे जमलेल्या प्रत्येकावर, धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊन आपल्या घरात शांतता, प्रीती व ऐक्य सदैव नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment