Reflection for the 8th Sunday in Ordinary Time (02/03/2025) By Br. Oliver Munis
सामान्य काळातील आठवा
रविवार
दिनांक: ०२/०३/२०२५
पहिले वाचन: बेनसिरा २७:४-७.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:५४-५८.
शुभवर्तमान: लूक ६:३९-४५.
प्रस्तावना
ख्रिस्ताठायी जमलेल्या
माझ्या प्रिय भाविकांनो, आज ख्रिस्तसभा आपल्या स्वतःची ‘माणुसकी’ जोपासण्यास आमंत्रण
करीत आहे. जर आपण एखादे द्राक्ष किंवा स्ट्रॉबेरी खाल्ले आणि त्याची चव गोड न लागता
आंबट वाटली, तर आपल्याला ते फळ नकोसे वाटते. कारण त्या फळात द्राक्षे-पणा
किंवा स्ट्रॉबेरी-पणा जाणवत नाही. त्याचप्रमाणे माणसाचा ‘माणुसकीपणा’ त्याच्या चांगल्या
जीवनशैलीत दिसून येतो. हे माणुसकीपण दुसऱ्यांना मदत करण्यात, मार्गदर्शन देण्यात
आणि आदर देण्यात प्रकट होते. अशा कृतीमधून माणूस स्वतःच्या माणुसकीचा आनंद दुसऱ्यामध्ये
आणि स्वतःमध्ये ओळखतो.
आजच्या पहिल्या वाचनात
आपण पाहतो की, फळाच्या प्रकारावरून झाडाची गुणसंपन्नता दिसून येते, तसेच माणसाच्या बोलण्याच्या
प्रकारावरून त्याची मनोवृत्ती कळून येते. माणसाचे बोलणे हे त्याच्या अंतरात्म्याचे
प्रतिबिंब असते. दुसऱ्या वाचनातून आपल्याला समजते की, पाप माणसाला माणुसकीपासून
दूर नेते. परंतु प्रभु येशूने पापांवर विजय मिळवून आपल्याला माणुसकीचा
धडा शिकवला आणि तारणाचा मार्ग दाखवला आहे. शुभवर्तमानात आपल्याला हे समजते की, जर आपण स्वतःच्या
आयुष्याकडे लक्ष दिले नाही तर आपण आध्यात्मिक दृष्ट्या आंधळे होतो. अशावेळी आपण दुसऱ्यांच्या
चुका काढण्यात वेळ वाया घालवतो आणि आपल्या अंतःकरणातून वाईट गोष्टी बाहेर पडतात. त्यामुळे
माणूस आपला ‘माणुसकीपणा’ गमावतो आणि पापांच्या जाळ्यात अडकतो.
आजच्या ह्या
पवित्र मिस्साबलिदानात आपण देवाकडे विशेष कृपा मागूया, जेणेकरून तो आपल्याला
माणुसकीत राहण्यासाठी मदत करो आणि आपले हृदय प्रेमाने परिपूर्ण करो.
मनन
चिंतन
जेव्हा आम्ही नाशिकला
तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना आम्हला एक व्याख्या शिकवली होती. “जसा माळी आहे, तशीच त्याची बाग असते.” (As the gardener
is, so is the garden.) आपलं आयुष्य म्हणजे एक बाग आहे आणि आपण त्या बागेचे माळी
आहोत. आपल्या वागण्या-बोलण्यातून आणि स्वभावातून आपली अंतःकरणातील अवस्था दिसून येते.
जर माळी शहाणा, संयमी आणि दयाळू असेल तर बाग नक्कीच फुलते. पण माळीने जर मुळांकडे
दुर्लक्ष केलं, तर त्याचे परिणाम फळांवर दिसतात. आजच्या वाचनांमधून आपल्याला
शिकवले जाते की, माणसाचं खरं स्वरूप त्याच्या शब्दांमधून आणि कृतीतून उघड होतं.
(बेन सिरा २७: ४-७)
आज आपल्याला
तिन्ही वाचणे, आपल्याला आपले मानवी स्वरूप किंवा आपल्यामध्ये माणुसकीपणा आहे कि
नाही ह्यावर विचार करण्यास बोलावत आहेत. म्हणून नेहमी आपण प्रभूकडे वळले पाहिजे, त्याच्या
मार्गावर चालले पाहिजे आणि त्याच्या शिकवणीनुसार वागले पाहिजे. कारण प्रभूमध्ये
आपले श्रम व्यर्थ नाहीत हे आपण जाणले पाहिजे. आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक
तत्पर असले पाहिजे. (करिंथकरास पहिले पत्र १५: ५८)
मैं तुझको पसंद आऊं ,
मैं तेरे दिल को भाऊं,
ऐसा मुझको बना ,
ऐसा मुझको बना।
मेरे अंदर तेरी आदतों को भर दे ,
मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे।
चांगले व समाधानी
आयुष्य जगायचं असेल तर ढोंग सोडलं पाहिजे. आज शुभवर्तमानात येशू आपल्याला दाखला
सांगत असताना सांगतो की, “बंधू, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे, अरे ढोंग्या, पहिल्याने
स्वत:च्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास
तुला स्पष्ट दिसेल. (लुक ६: ४२) याचा अर्थ म्हणजे आधी स्वतःकडे बघणे. आपण अनेकदा
दुसऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवतो पण स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो. आपल्या मनात
राग, अभिमान, आणि द्वेषाची जी झुडुपं
वाढली आहेत, ती काढून टाकली पाहिजेत. कारण ह्याद्वारे आपली दृष्टि स्पष्ट
होते आणि मन शुद्ध होतं.
फक्त देवच आपल्या
अंतःकरणातील सत्य जाणतो. आपण बहुतेक वेळा वरवरचं पाहून निर्णय घेतो. एखादा माणूस चुकतो
तेव्हा आपण लगेच टीका करतो, पण त्याने कोणती वादळं झेलली आहेत
ते आपण पाहत नाही. बेन सिरा २७: ५ मध्ये सांगितलं आहे की, कुंभाराच्या मडक्याची
परीक्षा भट्टीत होते, तशीच माणसाची परीक्षा संभाषणात होते. संत फिलिप नेरी म्हणाले
होते, "जर देवाची कृपा नसती
तर मी तो मद्यपी (drunkard)असतो" यावरून लक्षात येतं
की आपण सगळे कमजोर आहोत.
एक जुनी म्हण आहे, "दुसऱ्यावर बोट दाखवताना
लक्षात ठेवा, उरलेली तीन बोटं तुमच्याकडेच दाखवतात." यहुदी (Jew) रब्बी म्हणतात, "जो इतरांवर दयाळूपणे
न्याय करतो, त्याच्यावर देव दयाळूपणे न्याय करतो." आणि येशू आपल्याला
सांगतात की, अंतिम न्याय देवाकडेच आहे.
बोधकथा:
एक शेतकरी आपल्या
शेतात एक कोमेजलेलं झाड पाहतो. लोक म्हणतात, "हे झाड तोडून टाक." पण शेतकरी
तसं करत नाही. तो झाडाच्या मुळांना खत घालतो, माती बदलतो आणि दररोज पाणी देतो.
काही महिन्यांनी तेच झाड गोड फळं देतं. लोकांनी विचारलं, "तू का कापलं नाहीस?" तो म्हणाला, "झाड वाईट नव्हतं, माती कमकुवत होती."
माणसं ही अशाच झाडांसारखी असतात. वरवर पाहून सगळं कळत नाही. जर आपण आपल्या मनात दया, सहनशीलता आणि प्रेम
वाढवलं, तर आपण दुसऱ्यांचे
आणि स्व:ताचे आयुष्यही फुलवून देवू.
C. S Lewis ने म्हटले आहे: "एक व्यक्ती आहे ज्याच्यावर मी प्रेम करतो, जरी त्याची वागणूक मला मान्य नसली तरी.
एक
व्यक्ती आहे ज्याचा मी स्वीकारतो, जरी त्याच्या काही विचारांनी आणि वागणुकीने मला अस्वस्थ केले तरी.
एक
व्यक्ती आहे ज्याला मी क्षमा करतो, जरी त्याने माझ्या सर्वात प्रिय व्यक्तींना दुखवले तरी.
ती
व्यक्ती म्हणजे मीच!" याचा अर्थ असा की, आधी स्वतःवर प्रेम
करा, स्वतःच्या चुका माफ
करा, मगच इतरांवर दया आणि
क्षमा करता येईल.
आजच्या दुसऱ्या वाचनात
(करिंथकरास पहिले पत्र १५: ५४-५८) आपल्याला खात्री दिली आहे की, ख्रिस्ताने मृत्यूवर
विजय मिळवला आहे. जर आपले आयुष्य प्रेम आणि सत्यावर आधारलेले असतील तर आपले संघर्ष, प्रयत्न आणि अपयशही
निरर्थक नाहीत. जसं एखादा शेतकरी धान्य पिकेपर्यंत संयमाने वाट पाहतो, तसंच देव आपल्याला
सहनशीलतेने वाढवतो व आपली तुटलेली मनं पूर्णतेकडे नेत असतो.
माणुसकी म्हणजे समाधानी
आयुष्याचा आत्मा आहे. जर आपण प्रामाणिक, दयाळू आणि क्षमाशील राहिलो तर
आपलं आयुष्यही सुंदरतेने फुलून येईल. माणुसकीचं बियाणं रुजवा आणि बघा तुमच्या बागेची
फुललेले सौदर्य आणि फळांचा गोडवा.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: हे
प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरू व सर्व
व्रतस्थांनी आपल्या प्रेमळ सेवाकार्याद्वारे व सुवार्तेद्वारे सर्व ख्रिस्ती
भाविकांना देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२. आपले राजकीय नेते
स्वत:च्या इच्छेचे गुलाम झालेले आहेत. लोकांची इच्छा न स्वीकारता आपली इच्छा, योजना व कृतीला
फार महत्व देतात. ह्या कारणाने समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे.
परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मी-पणा, अहंकार, नावलौकीक
इत्यादींचा त्याग करावा व लोकांच्या इच्छा समाजाच्या प्रगतीसाठी स्वीकाराव्यात
म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.
३. आज आपला समाज राग, द्वेष व अशांतेने
व्यापून गेलेला आहे; म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती
भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेम, एकोपा व शांतीची
ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.
४. ज्या लोकांना
आपल्या प्रार्थनेची गरज आहे – विशेषकरून; आजारी, गरीब, शोकांकीत, तुरुंगात अडकून
पडलेले आणि व्यसनाधीन झालेले इत्यादी. ह्या सर्वांवर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने
आनंदाचा, कृपेचा आणि
चांगल्या आरोग्याचा वर्षाव व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया.
५. थोडा वेळ शांत
राहून आपण आपल्या
वैयक्तिक, कौटुंबिक व
सामजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.