Friday, 28 March 2025

 Reflection for the Fourth Sunday of Lent (30/03/2025) By Fr. Brijal Lopes

दिनांक: ३०/०३/२०२५

पहिले वाचन: यहोशवा ५:९-१२

दुसरे वाचन: २ करिंथ. ५:१७-२१

शुभवर्तमान: लुक १५:१-३, ११-३२




प्रस्तावना

      ख्रिस्तसभा आज प्रायश्चित्त काळातील चौथा रविवार साजरा करते. हा रविवार लैतारे रविवारम्हणून ओळखला जातो, जो आनंद आणि हर्षाचा रविवार आहे. प्रायश्चित्त काळाच्या अगदी अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. आजची उपासना आपणा सर्वांना देवाची क्षमा आणि प्रीती ह्यावर मनन-चिंतन करण्यास बोलावते. प्रायश्चित्त काळातील चौथ्या रविवारीचे वाचणे आपणा सर्वांना खोलवर मनन-चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. देवाच्या अथांग दयेविषयी आणि समेटाविषयी असलेला आनंद व देवाकडे येण्यासाठी मनन-चिंतन करण्यासाठी सांगत आहे.

जोसुआच्या पुस्तकातील पहिल्या वाचनात, आम्ही इस्त्राएल लोकांसाठी वल्हांडण सण साजरे करत असताना आणि वचन दिलेल्या देशाच्या उत्पादनातून ते खातात असा महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत. देव त्यांना सांगतो: आज मी तुमच्यापासून इजिप्तची निंदा काढून टाकली आहे. हे नूतनीकरण आणि जिर्णोद्धाराची एक शक्तिशाली प्रतिमा आहे. हे त्याच्या भटकंतीच्या वेळेच्या समाप्तीचे प्रतीक आहे. हे आपल्याला स्मरण करून देते की आपण देखील देवाकडे परत येऊन नूतनीकरणाचा अनुभव घेऊ शकतो, विशेषतः या प्रायश्चित्त काळात.

आजच्या दुसऱ्या वाचनात, करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात संत पौल ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती असल्याबद्दल बोलतो. तो आपल्याला सांगतो की येशूद्वारे आपण देवाशी समेट केला आहे. आपल्या भूतकाळातील चुका आणि अपयश आपल्याला निश्चित करत नाहीत. तर त्याऐवजी, आपल्याला सलोख्याचे कार्य दिले आहे, जे आपल्याला सभोवतालच्या लोकांपर्यंत प्रेम आणि क्षमाशीलतेने पोहोचण्याचे सामर्थ्य देते.

संत लूकच्या शुभवर्तमानात आपण उधळपट्टीच्या पुत्राची सखोल कथा पाहतो. ही एक बोधकथा जी पापाच्या मूर्खतेवर आणि पित्याच्या प्रेमाच्या आश्चर्यकारक कृपेवर प्रकाश टाकते. धाकटा मुलगा आपला वारसा वाया घालवल्यानंतर स्वतःला अत्यंत कठीण व हताश परिस्थितीत सापडतो. तरीही, जेव्हा तो परत येतो, तेव्हा शिक्षेच्या ऐवजी त्याचे उधळ्या हातांनी स्वागत होते आणि त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या मुलाकडे धावत जाणाऱ्या वडिलांची ही प्रतिमा आपल्याला देवाचे अपार प्रेम दर्शविते. आपण कितीही दूर भटकलो तरी देव नेहमी आपल्या परतीची वाट पाहत असतो आणि आनंदाने आपल्याला मिठी मारण्यासाठी तत्पर असतो.

मनन चिंतन

      क्षमाशील पित्याचे दिलेले उदाहरण व त्याद्वारे परमेश्वर पित्याचे मानवजातिवरील प्रेम हा सलोखा, आजच्या शुभवर्तमानातून आपल्या समोर दर्शवित आहे.

शास्त्री व परुशी लोकांनी येशूला केलेले आव्हान, तसेच येशू ख्रिस्त क्षमाशील पित्याचे उदाहरण कसे देत आहे, याबद्दल आपण ऐकणार आहोत. शास्त्री व परुशी लोकांना दिलेले उत्तर आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला दिसून येते. उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारे, देवाच्या दयेची व प्रेमाची खोली विचारात घेण्यास आजची उपासना आपल्याला बोलावीत आहे. परुशी व यहुदी नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करणारे होते व ते तसे शिकवत होते. परुशी व शास्त्री येशूची तक्रार करतात आणि त्याला आव्हान देतात, कारण तो पापी लोकांचे आपल्या मेजावर स्वागत करतो. आजच्या शुभवर्तमानात येशूने पापी लोकांना परमेश्वराकडे नेण्यासाठी वापरलेले तीन दाखले आहेत: हरवलेले नाणे, हरवलेले मेंढरू आणि आजच्या शुभवर्तमानातील उधळ्या पुत्राचा दाखला. ही उदाहरणे आपल्यासमोर देवाची आपुलकी व एकात्मतेचे उदाहरण देत आहेत.

क्षमाशील पिता

आपण उधळ्या पुत्राची कथा ऐकताना, धाकट्या मुलावर लक्ष केंद्रित करणारे वडिलांचे असामान्य वर्तन पाहतो. त्याप्रमाणेच वर्तन असणे गरजेचे आहे. धाकटा मुलगा गेला, पण परत आला. मोठा मुलगा गेला नाही, तरी तो रागावला आणि घरात येण्यास नकार दिला. धाकट्या मुलाने पश्चात्ताप केला, तर मोठ्या मुलाने प्रतिकार दर्शविला. परंतु, या दृष्टांतातील उल्लेखनीय व्यक्तिरेखा म्हणजे एक दयाळू पिता. पित्याच्या कृतीमधून  त्याचे महान प्रेम व दया दिसून येते.

त्याने दूरून पाहिले: ह्याचा अर्थ वडील आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होते. जरी मुलगा त्याच्यापासून दूर गेला असला, तरीही त्याला अजूनही आशा होती की एक दिवस तो परत येईल. म्हणूनच, जो आपल्या मुलाला दूरून पाहू शकला, हे आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण पाप करतो आणि देवापासून दूर जातो, तेव्हा तो नेहमी आपल्या परत येण्याची वाट पाहतो. देव करुणामय आहे. वडिलांचे हृदय आपल्या मुलाबद्दल करुणेने भरले होते. तो आपल्या मुलावर रागावला नाही, ओरडला नाही. "मुलाने असं का केलं?" अशी विचारपूस केली नाही किंवा त्याच्या मालमत्तेविषयी चौकशी केली नाही. त्याऐवजी त्याला आपल्या मुलावर दया आली. हे आपल्याला आठवण करून देते की देवाच्या दयेचा आणि प्रेमाचा सीमा नाही. तो आपल्याला आपल्या अपराधांबद्दल शिक्षा करत नाही, तर आपण जसे आहोत तसे स्वीकारतो.

तो त्याच्याकडे धावला: वडिलांच्या हृदयात निर्माण झालेली पोकळी, जी मुलाच्या दूर जाण्यामुळे तयार झाली होती, ती वेदना त्याने सहन केली होती. ती सर्व वेदना त्याच्या मुलाला पाहिल्यावर त्याच्याकडे धावतो. ही हृदयातून निर्माण झालेली प्रेरक शक्ती आपल्याला पाहायला मिळते. वडील मुलाकडे धावतात, कारण त्यांचे प्रेम हृदयातून असते.

आपल्याला हेही आठवण करून देते  की जर आपण देवाकडे एक पाऊल टाकले, तर देव आपल्या दिशेने दहा पावले टाकतो. मिठी मारतो, चुंबन घेतो. मिठी आणि चुंबन ही प्रेमाची अभिव्यक्ती आहेत. वडील मुलाजवळ पोहोचतात आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे प्रेम दाखवण्याची. हे आपल्याला आठवण करून देते की पश्चात्ताप करणाऱ्या लोकांसाठी नेहमीच देवाचे हृदय खुले असते.

देवाचे प्रेम आपल्या पापांचा हिशोब ठेवत नाही. जरी आपण देवाला दुखावले, तरी तो आपल्यावर प्रेम करतो. त्याचे आपल्यावरील प्रेम कमी होत नाही. आपण अविश्वासू असलो, तरी तो विश्वासू आहे.

त्याने मुलाला झगा अंगठी व बूट घातले. अशा प्रकारे, वडिलांनी आपल्या मुलाला सजवले व त्याला नवीन बनवले. त्याचे घाणेरडे कपडे काढून त्याला शुद्ध, चांगले कपडे घातले. प्रायश्चित्त संस्कारात, पापाची कबुली दिल्याने आपणासोबत हेच घडते. आपण पापांच्या  घाणीपासून शुद्ध होतो आणि देवाच्या कृपेने नव्याने जन्म घेतो. त्यांनी वासरू कापले व आनंद साजरा केला. वडिलांनी गमावलेल्या संपत्तीबद्दल शोक केला नाही, तर मुलगा परत आल्याबद्दल आनंद साजरा केला. "माझा हा मुलगा मरण पावला होता आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे."
आपला मुलगा भूतकाळ विसरून आराम मिळावा म्हणून त्याने एक उत्सव साजरा केला. देव आप्ल्यालाल आपल्या पापाची क्षमा करत नाही तर आपले अपराधही दूर करतो. देव आपल्याला केवळ क्षमा करत नाही, तर आपले पाप दूर करून आपल्याला पूर्णपणे नव्याने निर्माण करतो. पश्चात्ताप करणाऱ्या पाप्यांबद्दल स्वर्गातही आनंद होतो.

 

विश्वासू लोकांची प्रार्थना

धर्मगुरू: देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला एक नवीन निर्मिती बनवले आहे. आपल्या तारणहार ख्रिस्ताच्या दुःख, मरण व पुनरुत्थानाद्वारे आपण देवाशी समेट करतो. आपल्या सर्व मागण्या आत्मविश्वासाने आपल्या सदैव प्रेमळ पित्याकडे सादर करूया.

प्रतिसाद: प्रभू, आम्हाला तुझी दया आणि प्रेम दाखव.

1.  आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि धर्मबंधू यांनी ख्रिस्ताच्या प्रेमाचे साधन बनून, हरवलेल्या लोकांना देवाकडे आणावे आणि हर्षभराने त्यांचे देवाच्या कार्यात स्वागत करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

2.  पापाच्या बंधनात जगणाऱ्या लोकांनी शुद्धीवर यावेत आणि देवाच्या क्षमेच्या प्रकाशात येण्याचा मार्ग त्यांना मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

3.  आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांनी एकत्र यावे. आपल्यातील सर्व वाद-विवाद दूर करून ख्रिस्ताचे राज्य वाढावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

4.  तुरुंगात खितपत पडलेल्या व्यक्तींनी आपल्या जीवनात बदल घडवावा. त्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेच्या माध्यमातून सुधारणा घडून यावी व जीवनाचे नूतनीकरण करण्याची संधी त्यांना मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

5.  ज्या आई-वडिलांचा आधार नाही किंवा ज्यांनी स्वतःच्या आई-वडिलांना नाकारले आहे, अशा सर्वांना पुन्हा एकत्र येण्याचा आनंद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

धर्मगुरू: हे प्रेमळ पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन निर्मिती बनवल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या पुत्राच्या मरणाने व पुनरुस्थानाने आम्ही पाप मार्ग सोडून आमच्या जीवनात नूतनीकरण करावे. म्हणून आम्हाला कृपा दे हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन


Thursday, 20 March 2025

 Reflection for the Third Sunday of Lent (23/03/2025) By Fr. Brian Motheghar

प्रायश्चित काळातील तिसरा रविवार

दिनांक:२३/०३/२०२५

पहिले वाचन: निर्गम ३:१-८ , १३-१५.

दुसरे वाचन: १ करिंथ. १०:१-६, १०-१२.

शुभवर्तमान: लुक १३:१-९.


प्रस्तावना

      आज आपण प्रायश्चित्त काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. हा काळ आपल्याला आत्मपरिक्षण, पश्चात्ताप आणि नवजीवनाचा आढावा घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. प्रायश्चित्त काळामध्ये परमेश्वर आपल्याला नवीन निर्मिती बनण्यासाठी पाचारण करीत आहे. तसेच संपूर्ण जगभर आज आपण फ्रान्सिस्कन कॅप्युचिन मिशन संडे सुद्धा साजरा करीत आहोत. जेणेकरून आपण त्यांच्या सेवाकार्याचा आदर्श आपल्या जीवनात गिरवून आपल्या स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा संकल्प करू शकू.

आजच्या आधुनिक जगात पश्चात्तापाविषयी बोलणे फारसे लोकप्रिय नाही, कारण जग पापाकडे दुर्लक्ष करणे पसंत करते. तरीही, आपण ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून साक्ष देऊ शकतो की पश्चात्ताप हा क्षमेला आणि मुक्तीला पोहोचण्याचा मार्ग आहे. तोच देवाच्या अमर्याद दयेला उघडणारी गुरुकिल्ली आहे. तर या पवित्र मिस्साबालीदानात आपण आपले आत्मपरीक्षण करूया, दैविक दयेचा खरा अनुभव घेवून या प्रायश्चित्त काळात देवाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करूया.

मनन चिंतन

      एका गावात प्रेम नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो नेहमी दुसऱ्यांना दोष देत असे देवाने मला गरिबी का दिली? माझे नशीब इतके वाईट का आहे? तो कधीच स्वतःच्या चुका मान्य करत नसे. एके दिवशी, गावात एक कॅप्युचिन मिशनरी बंधू मिशन कार्यासाठी आला होता. त्यांनी प्रेमला सांगितले, "देवाने तुला एक सुंदर जीवन दिले आहे. जर तू प्रामाणिकपणे कष्ट केले आणि चांगले काम केले, तर तुझे जीवन बदलू शकते." ह्या गोष्टीने प्रेरित होऊन प्रेमने मेहनत करायला सुरूवात केली. तो दुसऱ्यांना मदत करू लागला, प्रामाणिकपणे काम करू लागला. हळूहळू लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. काही वर्षांतच, तो एक सुखी आणि समाधानी जीवन जगू लागला. हीच प्रायश्चित्त काळाची शिकवण आहे. प्रभू आपल्याला संधी देतात, फक्त आपल्याला बदलायची तयारी असली पाहिजे.

आजच्या पहिल्या वाचनात (निर्गम ३:७-८) परमेश्वर म्हणतो: "मी माझ्या लोकांचे दुःख पाहिले आहे, मी त्यांचा आक्रोश ऐकला आहे आणि मी त्यांच्या यातना जाणतो." इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले, म्हणून त्यांनी मिसर देशामध्ये गुलामीचे हालाकीचे कठीण जीवन भोगले. पण त्यांनी आपल्या चुका ओळखून देवाला हाक मारली, आणि त्यांच्या प्रार्थना ऐकून देवाने त्यांना मुक्त करण्यासाठी मोशे ह्याला पाठवले. देव नेहमी आपल्या लोकांची काळजी घेतो, पण तो आपल्याला जबरदस्तीने वाचवत नाही, तर तो आपल्याला संधी देतो, पश्चात्तापासाठी आमंत्रित करतो, आणि प्रेमाने वाट दाखवतो.

आपल्या जीवनात कठीण प्रसंग येतात. अनेकदा आपण असे समजतो की देव आपले दुःख ऐकत नाही, पण सत्य हे आहे की तो सर्व काही जाणतो, पाहतो आणि समजतो. नीतिसूत्रे ३:१२ मध्ये लिहिले आहे की,
"
कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.” संत आणि पापी, दोघांनाही देवाच्या शिस्तीचे प्रेम अनुभवावे लागते. आपण कधी-कधी चुकीच्या निवडी करतो, आणि त्याचे परिणाम भोगतो. पण देव आपल्याला सोडून देत नाही.

दुसऱ्या वाचनात (१ करिंथ १०:१-६, १०-१२) संत पौल इस्राएलींच्या इतिहासातून शिकवन घेण्यास आवाहन करीत आहे. इस्राएल लोकांनी देवाच्या कृपेला हलक्यात घेतले, म्हणूनच त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागले. देव प्रेमळ आहे, पण तो न्यायी आहे. म्हणूनच, आपण पाप, वासनात्मक जीवन आणि मूर्तिपूजेला दूर ठेवले पाहिजे.

प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात (लूक १३:१-९) दोन घटनाविषयी सांगत आहे. त्या काळात काही लोकांचा अन्यायाने मृत्यू झाला. इतरांनी विचारले की ते लोक मोठे पापी होते का? प्रभू येशू उत्तर देताना म्हणतात की, "नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल." त्यानंतर येशू निर्जन अंजीराच्या झाडाचा दृष्टांत सांगतो. मालक झाडावर तीन वर्षे फळ शोधत होता, पण फळ नव्हते. तो ते तोडून टाकण्यास सांगतो, पण माळेकऱ्याने विनंती केली, "महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे." हा दृष्टांत आपल्यासाठी खूप मोठा संदेश देत आहे. देव आपल्याला वेळ देत आहे, परंतु तो अनंतकाळ वाट पाहणार नाही. आजच पश्चात्ताप करून त्याच्याकडे वळावे हीच त्याची परम इच्छा आहे.

यावर्षी कित्येक लोक मृत्यू पावले असावेत काही आजाराने, काही अपघाताने, काही नैसर्गिक आपत्तीने. त्यांचा मृत्यू म्हणजे देवाने त्यांना शिक्षा दिली असे नाही, किंवा आपण त्यांच्यापेक्षा अधिक चांगले आहोत असे काही नाही. आपले जिवंत असणे हा एक विशेष आशीर्वाद आहे, ही आपल्याला लाभलेली दुसरी संधी आहे! यहेज्केल १८:२३ मध्ये परमेश्वर म्हणतो की, "दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे ह्याने मला संतोष होतो ना?" म्हणूनच, आपण पश्चात्ताप करणे आणि देवाकडे परत जाणे आवश्यक आहे.

प्रायश्चित्त काळ म्हणजे काय? हा कृपेचा काळ आहे, आपल्या चुका सुधारण्याची पवित्र संधी आहे, देवाकडे परत येण्याचा मार्ग आहे.  प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करतो, जसे माळेकऱ्याने अंजीराच्या झाडासाठी मध्यस्थी केली. तो म्हणतो: "परमेश्वरा, आणखी थोडा वेळ दे, कदाचित तो/ती पश्चात्ताप करेल!" प्रायश्चित्त काळ म्हणजे आत्म्याच्या झाडाला खत घालण्याचा काळ आहे. त्यात प्रार्थनेची वाढ करावी, दानधर्माचा पाणी शिंपडावा, इतरांना माफ करण्यासाठी प्रेम आणि करुणेचे खुरपे वापरून शंभर पट फळ द्यावे.

डि. टॉड ख्रिस्तोफरसन हे म्हणतात की, "पश्चात्तापाशिवाय, जीवनात खरी प्रगती नाही. पाप लपवले तरी ते दूर होत नाही. फक्त पश्चात्तापच जीवन उज्ज्वल करू शकते." म्हणून, प्रिय बंधूं आणि भगिनींनो, वेळ संपण्यापूर्वी पश्चात्ताप करा. उद्याची कोणतीही हमी नाही. आज संधी आहे देवाकडे परत चला,  प्रभूच्या करुणेचा स्वीकार करूया.

आज आपण फ्रान्सिस्कन कॅप्युचिन मिशन संडे साजरा करतो. कॅप्युचिन मिशनरी बंधू हे संत फ्रान्सिसच्या आदर्शावर चालणारे लोक आहेत. त्यांनी आपले जीवन गरिबांसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या कार्यात अनाथ मुलांना शिक्षण, गरिबांना आरोग्यसेवा, उपेक्षितांसाठी मदत, येशूच्या क्षमेचा, प्रेमाचा आणि शुभवर्तमानाचा प्रचार, ह्या मुख्य सेवेंसाठी आपले योगदान दिले आहे. आपण प्रार्थना, वेळ किंवा आर्थिक मदतीने त्यांना हातभार लावून त्याच्या मिशन कार्यात मदत करूया आणि ज्या मिशनरी बंधू आणि भगींनीनी प्रभू सेवेत आपले प्राणार्पण केले आहे त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करूया.

प्रायश्चित्त काळ हा आपल्याला खऱ्या पश्चात्तापाकडे बोलावत आहे त्यासाठी आपण आपल्या जीवनात काही ठोस पावले उचलू शकतो:

१. प्रार्थना: मिशनरी बंधू - भगिनींसाठी आणि त्यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी आपण प्रार्थना करूया.

२. दानधर्म: जितके शक्य असेल तेवढी मदत गरजूंसाठी देऊया. अन्न, कपडे किंवा थोडी आर्थिक मदतही मोठा बदल घडवू शकते.

३. सेवा: आपले हात पुढे करून समाजातील गरीब, वृद्ध, अनाथ यांना मदतीचा हात देऊया.

४. आध्यात्मिक परिवर्तन: आपल्या जीवनातील चुकीच्या सवयी सोडून, प्रभूच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया.

प्रायश्चित्त काळ हा फक्त उपवास करण्याचा आणि निर्जळी राहण्याचा काळ नाही. तर, तो आपल्या आत्म्याचे नूतनीकरण करण्याचा आणि ख्रिस्ताच्या अधिक जवळ जाण्याचा काळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पुन्हा संधी देत आहे आपण त्याचा योग्य उपयोग करूया. फ्रान्सिस्कन कॅप्युचिन बंधूंनी दाखवून दिले आहे की, येशूचा खरा शिष्य होण्यासाठी प्रेम आणि सेवा हे आवश्यक आहे. आपण त्यांच्या कार्यात सहभागी होऊया, आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी ख्रिस्ताचे प्रेम दाखवूया.


विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”

१) आमचे परमगुरु फ्रान्सिस आणि अखंड ख्रिस्तसभेची धुरा वाहणाऱ्या सर्वांनी ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा आणि ख्रिस्ती मूल्यांच्या आधारावर ख्रिस्तसभा सदैव मजबूत ठेवण्यासाठी त्यांना कृपा आणि सदबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२) आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून  त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आपल्या धर्मग्रामातसभोवताली आणि कुटुंबात जी लोकं आजारी आहेतत्यांना तुझ्या दयेने आणि कृपेच्या स्पर्शाने बरेपण लाभावं आणि त्यांच्या जीवनात आनंद यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४) आपल्या कुटुंबातील आणि धर्मग्रामातील सर्व मृतजणांना परमेश्वराने दया दाखवावी आणि त्यांना प्रेमाचं आलिंगन देऊन स्वर्गराज्यात त्यांचा स्वीकार करावा आणि त्यांना चिरंतन शांती द्यावीम्हणून आपण प्रार्थना करू या.

५) आपल्या सर्व वयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना  करूया.